शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 106

मत्स्यव्यवसायात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या युगात प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या मदतीने जलाशयांचे व्यवस्थापन, मत्स्यसंवर्धन आणि माहिती संकलनासाठी ‘स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम’ (Smart Fish Stock Assessment System – SFSS) तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला.

या करारावर स्वाक्षरीचा कार्यक्रम ८ जुलै २०२५ रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. मार्वल या शासकीय कंपनीसोबत झालेल्या या करारामुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे. यावेळी पदुम विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे तसेच मार्वल कंपनीचे संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या करारानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून जलाशयांची माहिती व त्यांचे सर्वेक्षण, मत्स्य उत्पादनाची अचूक आकडेवारी तयार करणे, मच्छींच्या साठ्याचे परीक्षण (Stock Assessment), विविध प्रकारच्या माहितीचे डिजिटल संकलन, मच्छीमारांना माहिती व सल्ला देणाऱ्या प्रणालींचा विकास या सर्व गोष्टी अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम

कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित ‘स्मार्ट फिश स्टॉक असेसमेंट सिस्टीम’ हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात प्रथमच राबविण्यात येणार आहे. यामुळे जलाशयांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल तसेच शाश्वत मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने धोरणे आखणे सुलभ होईल.

या उपक्रमामुळे मच्छीमारांना योग्य मार्गदर्शन मिळणार असून, उत्पादन वाढीबरोबरच जलसंपत्तीचे संवर्धनही साधता येणार आहे. मत्स्यव्यवसायामध्ये विज्ञानाधारित निर्णय प्रक्रिया राबवण्याची ही महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे.

यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, “मत्स्यव्यवसायाच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. यामुळे पारंपरिक मत्स्यव्यवसायाला नवे बळ मिळेल आणि शेतकरी व मच्छीमारांना आधुनिक व्यवस्थापनाची जोड मिळेल.”

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

जेएनपीटी परिसरातील तरंगता कचरा आणि तेलगळती संदर्भात तपासणी करणार – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ९ : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) परिसरातील तेलगळती रोखण्यासाठी आणि समुद्रातील तरंगता कचरा गोळा करण्यासाठी जेएनपीटीने एमटीयूएलच्या माध्यमातून यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तथापि, या बाबींवर समाधानकारक कारवाई व्हावी, यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेएनपीटीच्या यंत्रणांची पाहणी करण्यासाठी पाठवण्यात येईल, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांनी जेएनपीटीने बंदरात होणारी तेलगळती, कोळसा वाहतूक होऊन प्रदूषण आणि त्यामुळे मासेमारीचे नुकसान होत असल्याच्या प्रश्न विचारला, त्यावर मंत्री श्रीमती मुंडे यांनी उत्तर दिले. यात सदस्य भाई जगताप यांनीही उपप्रश्न विचारला.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जेएनपीटीच्या आजूबाजूच्या समुद्र परिसरात मत्स्यमारीस बंदी आहे. हा परिसर मत्स्यमारीसाठी अधिसूचित क्षेत्र नसल्यामुळे आणि तिथे जहाजांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या भागात मत्स्यमारीस परवानगी नाही, अशी माहिती मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिली.

0000

संजय ओरके/विसंअ/

प्रदूषण नियंत्रणासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य; ग्रीन क्रेडिटसाठीही नियोजन – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ९ : राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीमती मंत्री मुंडे बोलत होत्या. यावेळी सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, प्रसाद लाड, सतेज पाटील, प्रवीण दरेकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

पाणी, वायू, ध्वनी तसेच औद्योगिक प्रदूषणाचे तंत्रज्ञानाच्या मदतीने रिअल टाईम परीक्षण केले जावे आणि ही माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व उपलब्ध असावी यासाठी काम सुरू असल्याचे सांगून मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, सध्या पाणी, वायू व ध्वनी प्रदूषणाचे परीक्षण करत आहोत, पण औद्योगिक प्रदूषणाचाही डेटा लोकांसाठी ॲक्सेसिबल व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना त्यांच्या परिसरातील प्रदूषण स्थितीबाबत माहिती मिळावी यासाठी हायटेक पद्धतीने प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. प्रत्येक उद्योगाला त्यांच्या भागात हरित आच्छादन (Green Cover) राखणे बंधनकारक आहे. परंतु काही जुने उद्योग आहेत, ज्यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नसते. अशा वेळी त्यांना गायरान किंवा दुसऱ्या उपलब्ध जागांमध्ये वृक्षारोपण करून ग्रीन क्रेडिट मिळवण्याची संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

उद्योगांना परवानग्या देताना पर्यावरणाशी संबंधित कठोर निकष पाळावे लागतात. या प्रक्रियेत वेगवेगळ्या स्तरांवर बैठक होतात आणि अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणामार्फत घेतला जातो, असेही श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की,  राज्यात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमित चाचण्या घेतल्या जात असून, नियमभंग करणाऱ्या उद्योगांवर सक्त कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 311 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या, 279 उद्योगांना सूचनात्मक आदेश (Proposed Directions), 204 उद्योगांना अंतिम निर्देश (Final Directions) आणि 218 उद्योगांवर बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

तंत्रज्ञान आधारित नियंत्रणाची गरज

मंत्री श्रीमती मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रदूषणाचे प्रभावी नियंत्रण तंत्रज्ञानाच्या आधारेच शक्य आहे. रिअल टाईम डेटा, डिजिटल सेन्सर्स, AI आधारित विश्लेषण यांचा वापर करून प्रदूषणाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करता येईल. या सर्व उपाययोजना राबवल्यास महाराष्ट्र राज्य पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये मोठी प्रगती करेल, असेही मंत्री मुंडे म्हणाल्या.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

राज्यातील प्रदूषित नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ९ – केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल गुणवत्ता मोजमाप योजनेनुसार झालेल्या सर्वेक्षणानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात राज्यातील ५६ प्रदूषित नदी पट्ट्यांचा समावेश आहे. या नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राज्यातील प्रदूषित नद्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाची  विविध कारणे आहेत. त्यानुसार नदीपट्ट्यांचे वर्गीकरण करुन संबंधित विविध विभागांच्या सहाय्याने नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येईल. तसेच उद्योग विभागासोबत पाण्यावर प्रक्रिया करुन सोडण्याबाबत काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर रसायन उत्पादक कंपन्यांसोबत आढावा घेऊन रसायनयुक्त पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येऊ नये याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून नदी पुनरुज्जीवनासाठी निधी उपलब्ध होत असून केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून नद्या स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाग, मुळा-मुठा, चंद्रभागा या नद्या स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले असून उल्हास, वालधुनी या नद्या देखील स्वच्छ करण्यात येतील असे त्या म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यातील वेल्हाळ तलावात जाणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येईल, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबतच्या उपप्रश्नांच्या उत्तरात सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

अवैध मद्य विक्रीवर तातडीने कारवाई – गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. ९ – राज्यात अवैध मद्य विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.

सदस्य भाई जगताप यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगाव परिसरात अवैधरित्या मद्यविक्री होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

पुसेगाव येथील कारवाईबाबत माहिती देताना गृह राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, पुसेगाव पोलीस स्थानक हद्दीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे वेळोवेळी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. मे २०२५ अखेर अवैध दारुबंदीच्या २२ गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली असून यामध्ये २१,१०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच जुगाराच्या सात गुन्ह्यांमध्ये ४३,४२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

सांगली महापालिकेतील वीजबिल गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई – राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. ९ : सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या वीजबिल देयकांमध्ये तब्बल १ कोटी २९ लाख ९५ हजार रुपयांच्या झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून यामध्ये दोषी असलेल्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ.भोयर बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, परिणय फुके यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

महावितरणकडे महापालिकेने ९ कोटी ८८ लाख ६६ हजार १३३ रुपयांचा धनादेश दिला, मात्र प्रत्यक्षात महापालिकेचे वीजबिल केवळ ८ कोटी ८५ लाख ७० हजार रुपये होते, असे सांगून राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, उर्वरित रक्कम खासगी ग्राहकांच्या वीजबिलापोटी भरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींची नावे निश्चित झाली आहेत. तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. या पथकात पोलीस निरीक्षक, चार्टर्ड अकाउंटंट आणि तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांचा समावेश होता. मात्र, तपासादरम्यान श्री.साबळे स्वतः लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आणि त्यांनी ज्या प्रकरणात लाच घेतली, त्याचा संबंध सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी असल्याचा संशय व्यक्त झाला आहे.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून एक महिन्याच्या आत संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. चौकशी दरम्यान खासगी ग्राहकांचे वीजबिल महापालिकेच्या निधीतून भरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात महापालिकेतील तसेच बँकेतील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय एसआयटी चौकशीत व्यक्त करण्यात आला असल्याचेही राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले की, शुभम गुप्ता दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सर्व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

 

विधानपरिषद कामकाज

छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेला अत्याचार ही अतिशय गंभीर बाब आहे. यामध्ये जे प्रकार उघड झाले आहेत, ते भयावह आहेत. यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करत संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यासंदर्भात विधानपरिषद सदस्य श्रीमती चित्रा वाघ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अल्प सूचना प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी चौकशीसाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांनी ८० मुलींशी संवाद साधला आहे. सुरुवातीला त्या बोलायला तयार नव्हत्या, मात्र हळूहळू त्यांनी या प्रकरणाबाबत काही गंभीर माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर संबंधितांवरही कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. यावरील समितीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होणार असून, त्यानंतर दोषी ठरलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल.

उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, विशेष निरीक्षकाची नियुक्ती केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीसोबतच सरकार स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

आमदाराकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला झालेली मारहाण अयोग्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : आमदार निवासात स्वच्छतेच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास त्याबाबत अधिकृतरित्या तक्रार मांडून त्यासंदर्भात कारवाईची मागणी करता येवू शकते. भाजीपाला, पदार्थ खराब असणे, दुर्गंधी येणे, या गोष्टी निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाहीत. तथापि, तेथील कर्मचाऱ्यांना मारहाणीचा मार्ग योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

एका आमदारांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य ॲड.अनिल परब यांनी सभागृहात विशेष सूचना मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीला भूषणावह नाही. यामुळे संपूर्ण विधिमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलीन होते, असेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात अध्यक्षांनी या घटनेची दखल घ्यावी, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

000

संजय ओरके/विसंअ/

 

 

विधानपरिषद लक्षवेधी

नंदुरबारच्या तळोदे शहरातील अनुसूचित जमातींच्या घरांचे कायदेशीर संरक्षण करण्यासाठी शासन सकारात्मक – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या घरांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी शासनाने गंभीर विचार सुरू केला आहे. महाराष्ट्र कुल व शेतजमीन अधिनियम 1948 च्या कलम 18 आणि 19 नुसार नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा शहरातील गावठाणमधील घरे अनुसूचित जमातीच्या कुटुंबांची असून, त्या जमिनीवर अनेक वर्षांपासून ते वास्तव्यास आहेत. शासन या जमिनींच्या कायदेशीर नियमितीकरणासाठी सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सुचनेद्वारे प्रश्न मांडला, या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.

मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, यासंदर्भात उच्च न्यायालयाने काही आदेश पारित करून जहागीरदारांचे हक्क मान्य केले आहेत. तथापि, या आदेशाविरोधात रिव्ह्यू पिटिशन किंवा सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमति याचिका (SLP) दाखल करता येऊ शकेल का, याचा शासन विचार करत आहे.

हे अतिक्रमण जवळपास ७५ वर्षांपूर्वी झाले असल्याने महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमनुसार अशा अतिक्रमणांचे कायदेशीर रूपांतर करता येईल का, याचाही गांभीर्याने अभ्यास केला जात आहे. आदिवासी कुटुंबांची घरे नियमित करून त्यांचे घर सुरक्षित करणे ही तातडीची गरज असून लवकरच यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. कायदेशीर, प्रशासकीय आणि न्यायालयीन मार्गांचा उपयोग करून या नागरिकांचे संरक्षण केले जाईल, असे महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

खाणकामानंतर निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या पुनर्वापरासाठी नियोजन – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ९ : खाणकाम पूर्ण झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या मोठ्या खड्ड्यांचा पुनर्वापर करण्यासाठी १२ जानेवारी २०१८ रोजी जारी अधिसूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य कृपाल तुमाने यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

तलाव, जलसाठा, मत्स्यव्यवसाय किंवा कचरा व्यवस्थापनासाठी या खड्ड्यांचा वापर केला जावा, असे निर्देश असल्याचे सांगून महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने याबाबत प्राधान्याने पावले उचलावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वडार समाजाला ५०० ब्रासपर्यंत उत्खननाची परवानगी तत्काळ द्यावी, यासाठी शासनाने नियम ठरवले आहेत. कोल्हापूरमधील खाण बुजवण्याच्या कामासाठी स्थानिक प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करुन तत्काळ अंमलबजावणी करावी, असेही महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सर्व दगड व वाळू खाणींवर ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून, खाण क्षेत्र, रॉयल्टी व उपलब्धता याची नियमित तपासणी केली जात आहे.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रक्रिया सुलभ करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ९ : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष पाच लक्ष रुपये रकमेचे आरोग्य संरक्षण पुरविण्यात येत आहे. ही योजना कॅशलेस आहे. यापेक्षा अधिक खर्च झाल्यास प्रशासकीय विभागामार्फत वैद्यकीय प्रतिपूर्ती करण्यात येते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सत्यजित तांबे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले, शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना सुलभतेने परतावा मिळावा यासाठी ही प्रक्रिया ऑनलाइन, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यात येईल. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आणखी काही आजारांचा समावेश करण्यात येईल तसेच राज्यात सर्व रुग्णालयांमध्ये ही योजना लागू होण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागासोबत समिती तयार करून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

वर्धा जिल्ह्यातील जळगाव ग्रामपंचायतीच्या साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार नाही – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ९ : वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीमधील साहित्य खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार झालेला नसल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. गोरे बोलत होते.

कोणत्याही कारणाशिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी अचानक जळगाव ग्रामपंचायतीची चौकशी केल्याचे सांगून मंत्री श्री. गोरे म्हणाले की, ही चौकशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली होती. यावेळी ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले. त्यानंतर गट विकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीमध्ये कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या खरेदीची सखोल चौकशी करण्यात आली आहे. त्यामध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याची माहितीही मंत्री श्री. गोरे यांनी यावेळी दिली.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/ 

अकरावी प्रवेश प्रक्रियेत कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही – शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. ९ :- राज्यातील ग्रामीण तसेच शहरी विद्यार्थ्यांना विविध शाखेमध्ये तसेच विविध भागात जास्तीत जास्त संधी मिळावी, यासाठी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अवलंब केला आहे. राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.

ग्रामीण भागात लागू करण्यात आलेली अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन करावी, यासंदर्भात विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे प्रश्न विचारला होता. या लक्षवेधी दरम्यान सदस्य राजेश राठोड, डॉ. परिणय फुके, एकनाथ खडसे यांनीही सहभाग नोंदविला.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, महानगर भागात राबविण्यात येत असलेली ऑनलाईन प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली जात आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत मागे राहू नये, हा उद्देश आहे. यामुळे खेड्यातील विद्यार्थ्याला शहरी भागात प्रवेश घेता येऊ शकेल. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अनेक फायदे असल्याचेही डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यातील शाळेत २१ लाख विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात ११ लाख विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचे दिसते. त्यामुळे पारदर्शकतेसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आवश्यक असल्याचे डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले की, पूर्वी अकरावीमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजची 500 रुपयांपर्यंत माहितीपुस्तिका विकत घ्यावी लागायची. आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने अतिशय कमी किमतीत प्रवेश मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

 

 

 

 

 

विधानसभा लक्षवेधी

अतिक्रमित जमिनींवरील अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ९ : नंदुरबार जिल्ह्यात अतिक्रमित जमिनींवर उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात येतील. तसेच तक्रारी करण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाबाबत विभागीय आयुक्त यांच्यामार्फत पुढील सहा महिन्यात संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाबाबत सदस्य अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार, डॉ. संजय कुटे, गोपीचंद पडळकर, शंकर जगताप यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, फसवणूक करून विविध प्रलोभने दाखवून जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरणावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून गृह विभागाच्या माध्यमातून कडक कायदा करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 मे 2011 च्या निकालानुसार व 7 मे 2018 च्या गृह विभागाच्या निर्णयानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई करण्यात येईल.

यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके म्हणाले, धर्मांतरण केलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना त्यांच्या मूळ प्रवर्गाच्या लाभाची तपासणी करण्याबाबत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 26 आमदारांची बैठक घण्यात येईल. तसेच आदिवासी कुटुंबातील जबरदस्तीने धर्मांतरण केलेल्या नागरिकांना परत हा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आमदारांची समिती गठीत करण्यात येईल. या समितीमार्फत चौकशी करून एखाद्या विशेष योजनेचे नियोजन या घटकांसाठी करता येईल का, याचीही पडताळणी करण्यात येईल.

००००

निलेश तायडे/विसंअ

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्दमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

  • आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार
  • ५० लाख कुटुंबांना लाभ

मुंबई, दि.९ : राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत केली.

याबाबतची अधिकची माहिती देताना मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १५ दिवसात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा फायदा होणार आहे. १ जानेवारी २०२५ नंतर अशा व्यवहारांमध्ये प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

याबाबत सदस्य अमोल खताळ यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेचा चर्चेदरम्यान सदस्य जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, प्रकाश सोळंके, विक्रम पाचपुते, अभिजीत पाटील यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाने ८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अकोला आणि रायगड जिल्हे वगळता राज्यातील इतर ३२ जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्षेत्र घोषित करून बागायतीसाठी १० आर आणि जिरायतीसाठी २० आर इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले आहे. यामध्ये महानगरपालिका व नगरपरिषदा हद्दीतील क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही. धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत १९४७ च्या कायद्यातील कलम ७, ८ व ८अ नुसार स्थानिक क्षेत्रामध्ये जमिनीचे तुकडे निर्माण होणार नाहीत, अशा पद्धतीनेच हस्तांतरण करता येते. मात्र, १ जानेवारी २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नगरविकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या, तसेच प्रादेशिक योजनेत अकृषिक वापरासाठी निश्चित केलेल्या जमिनी या कायद्याच्या तुकडेबंदीच्या नियमांपासून वगळण्यात आलेल्या आहेत.

तुकडेबंदी कायद्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित होते. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा कायदा रद्द केल्यामुळे कमी क्षेत्राची खरेदी-विक्री करता येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग व नगरविकास १ चे अपर मुख्य सचिव, जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक अशा चार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठित केली जाणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधीच्या सूचना असतील त्यांनी अपर मुख्य सचिव, महसूल यांच्याकडे लेखी स्वरूपात सात दिवसात पाठवाव्यात असेही मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/  

पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक- मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई, दि. ९ : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करून यामध्ये वाहतूक सुधारणा उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य राहुल कूल, महेश लांडगे, भिमराव तापकीर यांनी पुण्यातील वाहतूक समस्येबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. भुसे म्हणाले की, पुणे शहरासाठी वर्ष २०२४ मध्ये सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये रिंग रोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यांसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा समावेश आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्पाअंतर्गत नऊ बांधकाम पॅकेजेसपैकी ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून, हा प्रकल्प डिसेंबर २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपूल, पुणे-शिरूर उन्नत मार्ग व पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे कामही सुरू आहे.

मेट्रो प्रकल्प व वाहतूक नियोजनावर भर

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत संबंधित विभाग प्रमुख, वाहतूक पोलिस विभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठक घेऊन आढावा घेतला जाईल. अधिवेशन संपण्यापूर्वी पुणे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील वाहतूक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यास उपाय योजना करणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. ९ :- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस (ITMS) प्रणालीच्या माध्यमातून महामार्गावरील वेगमर्यादा, लेन शिस्त आणि इतर १७ प्रकारच्या नियमभंगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक उपाय योजना केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी समृद्धी महामार्गावर होणारे अपघात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य विठ्ठल लंघे यांनीही सहभाग घेतला.

या लक्षवेधीच्या उत्तरात मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत व्हावी यासाठी महामार्गावर अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद २१ वाहने (या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी फायर फायटिंग, हायड्रॉलिक जॅक, कटरर्स, ऑक्सिजन सिलेंडर सिस्टीम इत्यादी प्रथमोपचार सुविधांची सोय करण्यात आली आहे), २१ रुग्णवाहिका,  १६ गस्त वाहने,  महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र १६ आणि ३० टन क्षमतेच्या १६ क्रेन यासह महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १७२ सुरक्षा रक्षक अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच २१ रुग्णवाहिका १०८ (आपत्कालीन वैद्यकीय सेवा महाराष्ट्र राज्य) अशी जोडलेल्या आहेत.

याव्यतिरिक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका (१०८) अहिल्यानगर जिल्ह्यात ४०,  अमरावती  ३१,  छत्रपती संभाजीनगर ३१, बुलढाणा  २३,  जालना १५, नागपूर ४०, नाशिक ४६, ठाणे ३९, वर्धा ११, वाशिम ११ अशा २८७ रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध असतात, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य श्री. दाते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित अपघात घटनेबाबत मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, या अपघाताची माहिती कंट्रोल रूमला मिळताच तत्काळ मदतीसाठी वाहन पाठविण्यात आले. सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांस आवश्यक उपचार मिळाले नाहीत या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच सदस्य विठ्ठल लंघे यांच्या मतदारसंघातील रुग्णालयाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी बैठक घेणार – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई दि. ९ :- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना उपयुक्त आहे. या महापालिका क्षेत्रातील आशा इमारतीच्या पुनर्विकास संदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य नरेंद्र मेहता यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य राजन नाईक यांनीही सहभाग घेतला.

मिरा भाईंदरमध्ये २४ क्लस्टर तयार करण्यात आले असून, त्यापैकी सात क्लस्टरची कार्यवाही सुरू असल्याचे सांगून राज्यमंत्री श्रीमती मिसाळ  म्हणाल्या, मिरा भाईंदर ग्रामपंचायतची नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका झाली आहे. महापालिकेने घोषित केलेल्या युआरपी (URP) मधील बहुतांशी इमारती या ग्रामपंचायत कालावधीतील अनधिकृत इमारती तर काही इमारती या अधिकृत आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिकेने यावर्षी महापालिका क्षेत्रात ४२ अतिधोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. या इमारतींपैकी १६ इमारती या क्लस्टर मध्ये अंतर्भूत असल्याचेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

मिरा भाईंदर मधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीसाठी तेथील लोकप्रतिनिधीना आमंत्रित केले जाईल, असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ९  : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ. तुषार राठोड व श्रीजया चव्हाण यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, तत्कालीन अर्धापूर ग्रामपंचायतीने युनानी दवाखान्याच्या बांधकामासाठी काही जमीन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दानपत्राद्वारे हस्तांतरित केली होती. मात्र, या जागेवर एका व्यक्तीकडून अनधिकृतपणे अतिक्रमण करून घराचे बांधकाम करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकरण सध्या जिल्हा न्यायालय, नांदेड येथे न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाच्या निर्णयानुसार त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जळगाव दि.०९ जुलै – राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, तसेच भूसंपादन करीत असताना दुजाभाव होता कामा नये, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र. ७५३-एल (बोरगांव बुजूर्ग मुक्ताईनगर) येथील मौजे मुक्ताईनगर, अंतुर्ली व सातोड ता. मुक्ताईनगर जि. जळगांव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन दराबाबत व इतर प्रलंबीत विषयांबाबत नुकतीच विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी श्री. बावनकुळे यांनी निर्देश दिले आहेत.

इंदूर ते छत्रपतीसंभाजीनगर (एल-७५३) राष्ट्रीय महामार्गाचा मुक्ताईनगर तालुक्यातून जाणारा मार्ग काहीसा वळणाचा असून त्यामध्ये दिशा (अलाइनमेंट) बदल केल्यास संपूर्ण रस्त्याचे अंतर कमी होऊ शकते तसेच खर्चातही बचत होईल. महामार्गाच्या संदर्भात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले भूसंपादन करण्यात आलेल्या व ज्यांना भूसंपादनाचा मोबदला दिला आहे, याबाबत शासनस्तरावर तक्रारी प्राप्त होत असल्याने याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे. असे श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

शेत जमिनीचे भूसंपादन करताना यंत्रणांनी व्यक्तिभेद न करता सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने स्वीकारावी, जमिनीचे दहा-बारा वर्षा पूर्वीचे दर व आताचे चालू वर्षातील दर यामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना सुधारित दराने जमिनीचा मोबदला दिला पाहिजे. असे यावेळी राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री श्री गिरीश महाजन यांनी सुचित केले.

यावेळी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, उपस्थित होते तर दूरदृष्य प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी जळगाव आयुष्य प्रसाद, यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, प्रांत अधिकारी, भूसंपादनाधिकारी, शेतकरी संघर्ष समिती मुक्ताईनगर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

 

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सज्ज  आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे काही प्रवासी एसटी बसमध्ये अडकले होते. त्यांना नजिकच्या शाळेत स्थलांतरित करण्यात येऊन सर्व प्रवाशांना सुखरूपपणे घरी पाठवण्यात आले आहे.

गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद असून, पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर शहरातील सखल भागांत पाणी साचले असून यावर संबंधित यंत्रणा लक्ष ठेऊन आहे, बचावकार्य सुरू आहे. या पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याचीही माहिती मिळाली आहे. याठिकाणी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यांना सज्ज ठेवले आहे. आजही नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे, आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित ठेकेदार आणि महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या खात्यात जमा होणाऱ्या वेतनातील रक्कम दुसऱ्याने काढल्यास, तो प्रकार फौजदारी गुन्हा मानला जाईल आणि दोषींवर कडक फौजदारी कारवाई केली जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून कामगारांचे वेतन थेट व सुरक्षितपणे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे.

ही अधिसूचना काल (7 जुलै) राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, पुढील तीन वर्षांसाठी हे प्राधिकरण कार्यरत राहणार आहे.

महाराष्ट्रातील विविध शासकीय आणि खासगी प्रकल्पांना सीआरझेड अंतर्गत मान्यता आवश्यक असते. यासाठी 1998 पासून महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत होते. मात्र, या प्राधिकरणाची मुदत डिसेंबर 2024 मध्ये संपुष्टात आली. त्यामुळे नवीन प्रकल्पाना मंजुरीसाठी अडचणी निर्माण होतं होत्या.

राज्य शासनाने नव्या प्राधिकरणाची स्थापना लवकर व्हावी म्हणून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. यानंतर राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेत, सातत्याने केंद्राशी संपर्क ठेवत हा विषय मार्गी लावला.

प्राधिकरणाच्या पुनर्रचनेमुळे राज्यातील प्रकल्प मार्गी लागतील आणि राज्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल. या निर्णयामुळे विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये समतोल राखत कार्य करता येईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते, असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

प्राधिकरणाची रचना

नव्या प्राधिकरणात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक, पर्यावरण तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्था यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई येथून हे प्राधिकरण कामकाज पाहणार आहे.

प्राधिकरणातील प्रमुख सदस्य पुढीलप्रमाणे :

– पर्यावरण व हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव – अध्यक्ष (कार्यभारिक)

– महसूल, ग्रामविकास, नगरविकास, मत्स्यव्यवसाय व उद्योग विभागांचे सचिव – सदस्य

– मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी – सदस्य

– मँग्रोव्ह सेलचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक – सदस्य

– केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ – सदस्य

– पर्यावरण तज्ज्ञ: डॉ. एल. आर. रंगनाथ, डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. अमित बन्सीवाल, डॉ. अनिश अंधेरिया

– बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष

– स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी

– पर्यावरण विभागातील संचालक स्तरावरील अधिकारी – सदस्य सचिव

प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या :

* सीआरझेड अधिसूचनेनुसार प्रकल्प प्रस्तावांचे परीक्षण व शिफारस

* सागरी व किनारी परिसंस्थेचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन

* किनारी क्षेत्रातील विकास कामांवर नियंत्रण ठेवणे

* अधिनियमाचे उल्लंघन झाल्यास चौकशी आणि कारवाई

* केंद्र सरकारकडे आवश्यक बदलासाठी प्रस्ताव पाठवणे

* पारदर्शकतेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ स्थापन करून कामकाजाची माहिती प्रसिद्ध करणे

* पारंपरिक मच्छीमार व किनारपट्टी समाजाच्या हक्कांचे रक्षण

दर सहा महिन्यांनी अहवाल देणे बंधनकारक

प्राधिकरणाने कामकाजाचा तपशीलवार अहवाल दर सहा महिन्यांनी केंद्र सरकारला सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे केवळ पर्यावरण रक्षण नाही, तर शाश्वत विकासाच्या दिशेनेही राज्य शासनाची वाटचाल अधिक गतीमान होणार आहे. प्राधिकरणाची ही पुनर्रचना म्हणजे पर्यावरण रक्षण आणि विकास यामधील समतोल राखण्याचा प्रयत्न असून, मंत्री पंकजा मुंडे यांच्या सक्रिय पुढाकारामुळे प्राधिकरण गठीत झाले आहे.

000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था (ECA) या सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहेत. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक ‘आयटीआय’ संस्थाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. दरवर्षी ५००० ते ७००० विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या कौशल्यांचे प्रशिक्षण मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, एम.डी अटल सोल्युशन इंटरनॅशनल बीव्ही नेदरलँडचे  व्यवस्थापकीय संचालक एडविन सिएसवर्दा, रुरल एन्हासन ग्रुपचे अंबर आयदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, वाढवण बंदर विकास कंपनी लिमिटेडचे संचालक उन्मेष वाघ, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाढवणसारख्या मोठ्या प्रकल्पात आता रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. या करारामुळे आवश्यक मनुष्यबळ निर्मिती होऊन तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील. कौशल्य विभागाने खासगी आणि सार्वजनिक भागीदारी धोरणातून महाराष्ट्राला कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. आजच्या करारामुळे राज्यातील तरुणांना वाढवणच नाही तर इतर ठिकाणीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास आहे.  बंदरे क्षेत्रातील कौशल्य विकासात महाराष्ट्र जागतिक ओळख निर्माण करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘आयटीआय’ आता सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था ‘आयटीआय’ या देशाच्या कौशल्य विकास व्यवस्थेचा कणा आहेत, ज्या व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवतात. सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ आवश्यकता लक्षात घेऊन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी आयटीआय सज्ज झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उ‌द्योजकता विभागाकडून पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) मॉडेलनुसार ‘आयटीआय’ संस्थांना जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा उ‌द्देश आहे. हा सामंजस्य करार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत स्किल इंडिया मिशन, महाराष्ट्र आयटीआय आधुनिकीकरण धोरण 2025 आणि शाश्वत विकास उद्द‍िष्ट  यांच्याशी सुसंगत आहे. या निर्णयामुळे रोजगार निर्मिती होऊन आयटीआय काळानुरूप प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाली आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

जेएनपीटी, वाढवण बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत असते. सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापन मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन जेएनपीटी, वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. परस्पर  सहकार्यातून कुशल मनुष्यबळ तयार करून रोजगार निर्मितीद्वारे राज्याच्या विकासाला नक्कीच अधिक चालना मिळेल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राला उच्च दर्जाच्या कौशल्य विकासाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी ‘आयटीआय’चे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर काळानुरूप व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा ‘आयटीआय’च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात येत आहे. सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापनमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेवून जेएनपीटी, वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक येथील ‘आयटीआय’ संस्थांचा समावेश असेल. महाराष्ट्र शासनाच्या सागरी केंद्राच्या व्हिजनला पूरक असे हे धोरण आहे.

‘आयटीआय’चे आधुनिकीकरण करणे, प्रगत सिम्युलेशन लॅब्स निर्माण करणे, ‘आयटीआय’मध्ये सागरी वाहतूक अभ्यासक्रम शिकवणे, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांचा समावेश करणे, या प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे प्रशिक्षण, प्रमाणपत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे भारतातील पहिले “निर्यातसक्षम” व्यावसायिक शिक्षण मॉडेल तयार होईल ज्याचे इतर राज्य नक्कीच अनुकरण करतील. या प्रकल्पासाठी ईसीए-आधारित वित्तपुरवठा मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे. यामध्ये 12 दशलक्ष युरोची गुंतवणूक असून या प्रकल्पाची रूरल एनहान्सर ग्रुप ऑफ इंडिया अंमलबजावणी करणार आहे. जेएनपीटी व महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यासाठी निधी सहाय्य करणार आहे. यामध्ये 98 टक्के राजकीय आणि 95 टक्के आर्थिक जोखीम कव्हर असलेले विमा संरक्षण (ECA framework) अंतर्गत हा एक सामाजिक परिणाम आधारित प्रकल्प आहे. भविष्यातील बंदरे कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा सामंजस्य करार निर्णायक ठरेल.

 

*****

संध्या गरवारे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...