बुधवार, जुलै 2, 2025
Home Blog Page 105

सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६  चा ९३५ कोटींचा निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 25 या वर्षाच्या 857.84 कोटीच्या खर्चास नियोजन समितीची मान्यता

सोलापूर, दिनांक 16 (जिमाका) :- जिल्हा वार्षिक योजना सन 2025 – 26 अंतर्गत सर्वसाधारण योजना 783 कोटी, अनुसुचित जाती उपयोजना 147 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 5.44 कोटी असे एकूण 935.44 कोटींचा निधी मंजूर आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी माहे मार्च 2026 पूर्वी हा निधी खर्च करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहिता विचारात घेऊन सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी निविदा प्रक्रिया राबवावी. तसेच ज्या यंत्रणांचा निधी खर्च होणार नाही अशा यंत्रणा प्रमुखावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवतडे, सचिन कल्याणशेट्टी, राजू खरे, अभिजीत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, उत्तम जानकर(ऑनलाईन), प्र. पोलिस अधीक्षक तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्या सह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर असलेला 857.84 कोटीचा सर्व निधी शासकीय यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी खर्च केलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व यंत्रणांनी नियोजन समितीकडून कामांच्या याद्या अंतिम करून घ्याव्यात. प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही त्वरित पूर्ण करावी. ज्या यंत्रणा त्यांनी प्रास्तावित केलेला निधी वेळेत करू खर्च करू शकणार नाहीत त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या यंत्रणा प्रमुखाची राहील याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले. त्याप्रमाणेच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025- 26 करता मंजूर तरतुदी व कामांच्या याद्याचा प्रारुप आराखडा जिल्हा नियोजन समिती पुढे आल्यानंतर समितीची मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील घरकुलाचा एकही लाभार्थी जागे अभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही. प्रशासनाने 134 घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिलेली आहे तर उर्वरित दोन हजार लाभार्थ्यांना पुढील दीड महिन्यात जागा उपलब्ध केली जाणार आहे. राज्य शासनाने एकाच वर्षात 30 लाख घरकुले लाभार्थ्यांना मंजूर केलेली असून सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाही दुप्पट घरकुले मंजूर करण्यात आलेली असून सर्व पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के घरकुले उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याच्या पाणी नियोजनात थोडीशी गफलत झालेली दिसून येत आहे. तरी पाण्याच्या अनुषंगाने कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी लावण्यात येत असून सर्व लोकप्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहावे. तसेच याच बैठकीत उजनी वरील जल पर्यटनाच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या छोट्या वाहनावर दंडात्मक कारवाई करू नये. अनेक लोकप्रतिनिधी यांच्याकडून या अनुषंगाने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या छोट्या छोट्या वाहनावर मोठ्या दंडाच्या कार्यवाही करण्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने परिवहन विभागाने याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी जिल्हा नियोजन समिती समोर मागील बैठकीचे इतिवृत्त व अनुपलन अहवाल ठेवला. तसेच  जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 25 अंतर्गत झालेला खर्च व सन 2025 – 26 चा प्रारूप आराखडा याची माहिती दिली.

यावर्षीच्या सर्वसाधारण योजनेसाठी शासनाकडून 121 कोटीचा अतिरिक्त निधी मंजूर

शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता रु. 661.89 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. राज्यस्तरीय बैठकीत 121.11 कोटीच्या वाढीसह जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 करीता एकूण रक्‍कम रु. 783.00 कोटीचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

जिल्हा बार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन 2025-26 मंजूर तरतूदी :-

 कृषी व संलग्नसेवा (पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय,वने,सहकार)  – रु. 51.26 कोटी

  • ग्रामीण क्षेत्राच्या विकासाच्या योजना  – रु. 64.00 कोटी
  • जलसंधारण विभागाच्या योजना    – रु. 59.50 कोटी
  • ऊर्जा विकास (MSEBव अपारंपारीक ऊर्जा ) – रु. 67.00 कोटी
  • शिक्षण विभागाच्या योजना    – रु. 42.00 कोटी
  • महिला व बाल विकासाच्या योजना  – रु. 21.08 कोटी
  • आरोग्य सेवांचे बळकटीकरण   – रु. 50.15 कोटी
  • नगर विकास विभाग- रु. 130.00 कोटी
  • रस्ते व  परिवहन  – रु. 73.50 कोटी
  • पर्यटन,तिर्थक्षेत्र,गड किल्ले,संरक्षित स्मारके यांचे संवर्धन व विकास -रु. 49.93 कोटी
  • पोलिस व तुरुंग व्यवस्थेचे बळकटीकरण  – रु. 23.08 कोटी
  • दिव्यांगांकरीता 1 % राखीव – रु. 7.00

लोकप्रतिनिधी यांनी नियोजन समिती केलेल्या मागण्या व मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे….

मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी देण्यात यावे, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाहीत ती भरपाई त्वरित मिळवून द्यावी, सांगोला तालुक्यासाठी मान नदीत पाणी सोडावे, सूर्यघर योजना नागरिकापर्यंत पोहोचवावी तसेच शेतकऱ्यांसाठी असलेले मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा पंप योजनेचे प्रबोधन करावे, शेतातील रोहित्र साठी नियोजन समितीतून दुप्पट निधीची तरतूद करावी, सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या निर्माण कराव्यात, मोहोळ तालुक्याला हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तुषार व ठिबक सिंचन योजनेची सबसिडी शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करावी, उजनी जलाशयातील गाळ व वाळू काढल्यास पाणी साठवून क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, सोलापूर शहरातील सुंदरम नगर येथील जलतरण तलाव महापालिका किंवा क्रीडा विभागाने हाती घेऊन तो त्वरित सुरू करावा, शहरात एलईडी बल्ब लावावेत त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, अवैध डान्सबार वर कारवाई करावी, सांगोला येथे ट्रॉमा केअर सेंटरची इमारत उभी असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, सोलापूर शहराची स्वच्छता तसेच सिद्धेश्वर तलाव प्रदूषण थांबवण्याबाबत महापालिकेने लक्ष घालावे तसेच सोलापूर येथून विमानसेवा लवकर सुरू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशा विविध मागण्या खासदार व आमदार महोदय यांनी नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री महोदय यांच्याकडे केल्या.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा – रोहयो मंत्री भरत गोगावले

रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या.
महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ.  त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे.
शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा, मंडप, खानपान, राजशिष्टाचार, परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्यादृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मुढाळे येथे महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता संदीप हाके, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योजक, शेतकरी आणि घरगुती वापराकरिता लागणारी वीज तसेच राज्यातील वाढते औद्योगिकरण लक्षात घेता सर्व घटकांना योग्य दाबाने वीजपुरवठा झाला पाहिजे याकरीता शासनाच्यावतीने वीजेचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी याकरीता याकरीता सुमारे २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतात सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपाना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे.

पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजनेअंतर्गत १ लाख ३० हजार घरांच्याकरीता ५०० मेगॉवटपेक्षा अधिक क्षमतेचे छतावर सौरसंच बसविण्यात आले आहेत तसेच या योजनेअंतर्गत १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान लाभार्थ्यांना दिले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांनाही सोलरच्या माध्यमातून वीज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) वापरासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासर्व प्रयत्नामुळे वीजेच्या देयकात बचत होण्यास मदत होईल.

मुढाळे वीज उपकेंद्रामुळे परिसरातील वीजेच्या समस्या सोडविण्यास मदत होणार

मुढाळे गावासहित परिसरातील गावांची वीजेची समस्या विचारत घेता मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३  के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या उपकेंद्राकरीता सुमारे ६२ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे, उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर मुढाळे, माळेगाव, पणदरे, सांगवी, होळ, कऱ्हावागज, कोऱ्हाळे आदी गावांना नियमित दाबाने अखंड वीजपुरवठा होण्यासह विजेचा भारही कमी होणार आहे. ही यंत्रणा नसून राज्य शासनाच्या सक्षमीकरणाची पायरी आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या उपकेंद्राचे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. उपकेंद्र परिसरात अधिकाधिक वृक्षारोपन करुन ती जगविण्याकरीता प्रयत्न करावे.

राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष मोहिमेअंतर्गत बारामती तालुक्यात १ हजार कोटी रुपयांची विकास कामे मंजूर

राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष मोहिमेअंतर्गत काळानुरुप बदल विचारात घेता नागरिकांना सोई-सुविधा मिळण्याकरीता सुमारे १ हजार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. ही सार्वजनिक विकासकामे करीत असताना ती दर्जेदार, टिकाऊ व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.  विकास कामे करतांना समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्यात येत आहे, याकामी नागरिकांनीही सहकार्य करावे.  राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा खरीप हंगाम आढावा आवश्यक ते नियोजन करण्यात येईल. याबाबतीत कुठलीही कमतरता भासणार नाही, याकरीता कृषी खात्यासोबत लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत दर्जेदार रोपे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

पीएम जनमन व धरती आबा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके

जिल्ह्यात एकही पात्र आदिवासी कुटुंब वंचित राहू नये; प्रलंबित विहीर अधिग्रहनाचे पैसे सातडीने द्या

यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : आदिवासी व आदिम जमातींमधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने पीएम जनमन व धरती आबा या योजना सुरु केल्या आहे. या दोन्ही अतिशय चांगल्या योजना असून जिल्ह्यात या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करा. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे डॉ.वुईके यांनी प्रधानमंत्री जनमन, धरती आबा, शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती मागील वर्षाचा खर्च, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पाणी टंचाई व आगामी 150 दिवसांचा सुधारणा कार्यक्रम आदी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला आ.राजू तोडसाम, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पीएम जनमन या योजनेत 13 विभागांचा सहभाग आहे. या विभागांच्या योजना प्राथम्याने आदिवासी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहे. धरती आबा योजनेंतर्गत देखील आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवायच्या आहे. जिल्ह्यात या दोनही योजनेचे उत्तम काम झाले पाहिजे. मी स्वत: आदिवासी विकास विभागाचा मंत्री असल्याने या योजनांचे जिल्ह्यात अधिक जास्त काम होणे आवश्यक आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, समित्यांना तेंदुपत्ता संकलन निधी, एकत्र असलेली आदिवासी गावे वेगळी करून स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करणे आदींबाबत डॉ.वुईके यांनी निर्देश दिले.

शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमात जिल्ह्याने चांगले काम केले परंतू अधिक चांगले काम होऊन राज्यस्तरावर जिल्ह्याचा गौरव झाला पाहिजे. येत्या काही दिवसात शासन 150 दिवस सुधारणा कार्यक्रम राबवित आहे. त्यात चांगली कामगिरी होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जिल्हा वार्षिक योजना व खनिज प्रतिष्ठानची कामे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करा, कामांची त्यांना माहिती द्या, विभागांनी लोकप्रतिनिधींच्या संपर्कात रहावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा घेतांना त्यांनी सद्या सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. जिल्ह्यात 4 कोटी 31 लक्ष रुपयांचा आराखडा राबविण्यात येत असून 468 गावांमध्ये 539 टंचाईची कामे प्रस्तावित आहे. सद्या जिल्ह्यात 34 टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. 189 विहीरी तर 31 बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. विहीर अधिग्रहणाचे प्रलंबित पैसे तातडीने वितरीत करण्याचे निर्देश डॉ.वुईके यांनी दिले.

यावेळी आ.राजू तोडसाम व आ.किसन वानखेडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना डॉ.वुईके यांनी केल्या. संबंधित विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागाची माहिती सादर केली.

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि.16 (जिमाका)- पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज कोसळून जीवित आणि वित्तहानी होते, ही हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा, असे निर्देश  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनास दिले.

सुभेदारी विश्रामगृह येथे आज डॉ. श्रीमती गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत  अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, आरोग्य, ऊसतोड कामगार या विषयांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे, शिक्षणाधिकारी प्राथमिक  जयश्री चव्हाण,महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव आदी बैठकीस उपस्थित होते.

वीज कोसळून होणारी जीवित व वित्तहानी  टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करावी. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची विशेष तरतूद करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये लाडक्या बहिणी व त्यांच्या किमान पाच सहकाऱ्यांची  आरोग्य तपासणी करावी. महिलांना होणारे गर्भाशयाचे कर्करोग, स्तनाचे कर्करोग, रक्तक्षय व इतर आजारासंदर्भातची तपासणी होऊन त्यावर उपचार करणे शक्य होईल. त्याद्वारे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यास मदत होईल. प्रत्येक शासकीय आरोग्य केंद्रातआरोग्य सुविधा सह औषधे यांचा साठाही उपलब्ध करून देण्याबाबतही नियोजन करावे. शाळेमध्ये ‘गुड टच बॅड टच’ सारखे उपक्रम राबवून पोलीस यंत्रणेने शाळेमध्ये निर्भय वातावरण करण्यासाठी पोलीस दीदी आणि पोलीस काका यांच्या माध्यमातून वारंवार भेटी द्यावेत. विद्यार्थ्यांमध्ये निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यामध्ये दशसूत्री उपक्रमा अंतर्गत शाळा महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य, तांत्रिक कौशल्य, निर्भय वातावरण, यासाठी उपक्रम राबविले जात असून या उपक्रमाची माहिती यावेळी दिली . विद्यार्थ्यांना समुपदेशन, तक्रारपेटी, शाळांमध्ये तक्रार करण्यासाठी संपर्क  क्रमांक यासाठीचे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

जिल्ह्यामधील ऊसतोड कामगारांची नोंदणी एकूण 25813 असल्याचे पंचायत विभागामार्फत सांगितले. या ऊसतोड कामगारांसाठीच्या कामगार विभाग, सामाजिक न्याय विभाग व इतर विभागाने समन्वयाने ऊसतोड कामगारांच्या शैक्षणिक,आर्थिक  विकासासाठी योजनांचा लाभ द्यावा,असे निर्देश श्रीमती गोऱ्हे यांनी दिले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राष्ट्रीय पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 16 : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करते. वर्ष 2024 साठी विविध श्रेणींमधील पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विविध श्रेणींमध्ये 35 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. महिला उद्योजक, अनुसूचित जाती/जमातीतील उद्योजक तसेच ईशान्येकडील राज्यांमधील ‘एमएसएमई’ उद्योजकांना विशेष तरतुदीद्वारे पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गत, पुरस्कारप्राप्त ‘एमएसएमईं’ना 3 लाख रुपये (प्रथम पुरस्कार), 2 लाख रुपये (द्वितीय पुरस्कार) आणि 1 लाख रुपये (तृतीय पुरस्कार) पुरस्कार रक्कम स्वरूपात दिले जातात. त्याचबरोबर  चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते.

राष्ट्रीय पुरस्कार 2024 च्या विविध श्रेणीसाठी ‘एमएसएमई’कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. 20 मे 2025 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे  (https://dashboard.msme.gov.in/na/Ent_NA_Admin/Ent_index.aspx) हे अर्ज सादर केले जाऊ शकतात. इच्छुक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारेदेखील (https://awards.gov.in/)  त्यांचे अर्ज सादर करू शकतात. याबाबतचा तपशील www.dcmsme.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जकर्ते यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या एमएसएमई – विकास आणि सुविधा कार्यालय (MSME – DFO) किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23063342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे.

 

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून सक्षम अधिकारी व कर्मचारी तयार होतील – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.16 मे, (विमाका) :- मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून सक्षम अधिकारी व कर्मचारी तयार झाल्याचे चित्र राज्याला निश्चितपणे पहायला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज व्यक्त केला.  सर्वसामान्य जनतेला तत्परतेने सेवा देण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नाथनगर (उत्तर) पैठण येथील मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशिक्षण व निवासस्थान इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर विकास जैन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, प्रबोधिनीचे संचालक खालिद ब.अरब व निबंधक रतनसिंग साळोक, सहायक प्राध्यापक विवेक मंडलीक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. शिरसाट म्हणाले, नाथसागर लगतच्या परिसरात असलेली ही प्रशिक्षण प्रबोधिनी मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. या प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी-कर्मचारी नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासोबतच योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतील. त्यातुन मराठवाडा प्रगतीपथाकडे जाण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना शासकीय सेवेत येणारे नवीन बदल स्वीकारण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. शासकीय सेवेत असलेल्या विविध पदावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून संवाद निर्माण होईल. तसेच प्रशिक्षणातून कामकाजात बदल होण्यासही मदत होईल. त्यामुळे प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय सेवेतील बदल स्वीकारण्यासोबतच शासनाने निश्चित केलेले प्रशिक्षण आवडीने पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले.

शासकीय सेवेत कामकाज करताना अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर ते निश्चितपणे अधिक चांगली सेवा देतील. आपल्या कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले पाहिजे. असे सांगुन पालकमंत्री श्री.शिरसाट म्हणाले, पैठण येथे कार्यरत असलेले प्रशिक्षण केंद्र राज्यातील एक चांगले प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाईल, या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी संवाद वाढवावा, तसेच पुढील कालावधीत या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सक्षम अधिकारी कर्मचारी तयार झालेले राज्याला पहायला मिळतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा शुभेच्छा संदेश असलेली चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. शुभेच्छा संदेशात बोलतांना श्रीमती सौनिक म्हणाल्या, पैठण येथील ही प्रबोधिनी केवळ एक प्रशिक्षण केंद्र न राहता एक विचार केंद्र ठरेल, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल गव्हर्नंस, सायबर सुरक्षेची जाणीव, आणि डेटा आधारित निर्णय प्रक्रियेवर विशेष भर या ठिकाणी देण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, पैठण येथील प्रशिक्षण संस्थेला 2013 मध्ये विभागीय प्रशिक्षण संस्थेचा दर्जा मिळाला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी वर्ग-२ व वर्ग-३ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही प्रशिक्षण संस्था सातत्याने प्रशिक्षण देण्याचे काम करते. प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासकीय सेवेतील पहिले प्रशिक्षण, उजळणी प्रशिक्षण व पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण अशा पातळीवर वर्षभर प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. राज्यात सहा महसूली विभागात असलेल्या प्रशिक्षण संस्थेपैकी पैठण येथील प्रशिक्षण संस्थेचे राज्यात चांगले नाव आहे. या संस्थेने 28 वर्षात 20 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

पैठण येथील या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेले अधिकारी तसेच कर्मचारी केंद्र व राज्य शासनाच्या योजना, सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करतील असा विश्वास व्यक्त करून या प्रशिक्षणाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी करावा, असे आवाहनही श्री.गावडे यांनी केले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, पैठण येथील प्रशिक्षण प्रबोधिनी ही मराठवाड्यासाठी नामांकित प्रबोधिनी आहे. राज्य शासनाने सद्य:स्थितीत अनेक उपक्रम हाती घेतले आहे. यामध्ये 100 दिवस, 150 दिवस या उपक्रमासह माहिती अधिकार, सेवाहक्क अधिनियम कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे. पैठण येथील प्रबोधिनीमध्ये जलदगतीने पारदर्शक व संवेदनशील पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या शुभेच्छा संदेश असलेली चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते  बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (दूरदृश्य प्रणालीद्वारे),  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे,  निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. वारी कालावधीत अन्न शुद्धतेची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि येत्या काळात अन्न भेसळ करणाऱ्याविरोधात व्यापक मोहीम राबवावी. पालखी सोहळ्यासंदर्भातील राज्यस्तरीय बैठकीपूर्वी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण करावी. इतर जिल्ह्यात किंवा विभागात बदली झालेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा घेण्याबाबत संबंधितांना विनंती करावी. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत परस्पर समन्वय ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त पुढे  म्हणाले, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी. पालखी सोहळ्यादरम्यान आणि नंतरही स्वच्छता रहावी यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील यासाठी आवश्यक उपाय योजावेत. नीरा नदी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पालखी पुढे गेल्यावर मागील गावात त्वरित स्वच्छता करावी. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतांना रुग्णवाहिकेत पुरेशा प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय अधिकारी असतील याची दक्षता घ्यावी.

पालखी मार्ग खड्डे मुक्त राहतील व उत्तम वाहतूक व्यवस्थापन राहील याची काळजी घ्यावी. पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. घाट परिसरात दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तिन्ही जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील व्यवस्थेबाबत एकत्र पुस्तिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरणीकरणाद्वारे पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. सोहळ्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली स्थापण्यात आली आहे २५ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सोहळ्यादरम्यान १ हजार ८६० स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. पालखी मार्गावर पाणी, विद्युत, आरोग्य, गॅस सिलेंडर, स्वच्छता आदी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात येत आहेत. वारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत चाचणी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील व सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी जिल्ह्यातील तयारीची माहिती दिली. बैठकीला पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय

मुंबई दि १६ – खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. या ऐतिहासिक यशाचे मानकरी असलेल्या विजेत्यांचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले.

बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण १५८ पदकांसह ५८ सुवर्ण, ४७ रौप्य व ५३ कांस्य  पदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. तिरंदाजी, मल्लखांब, जलतरण, कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा २६ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा मंत्री भरणे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

ही कामगिरी म्हणजे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संघटनांचे योगदान आणि पालकांचे प्रोत्साहन यांचे फलित आहे. राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

००००००

 

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

मुंबई, दि. १६:- ‘भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदविणे अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

‘ग्रामीण भागांतून येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘खेलो इंडिया स्पर्धा’ 2018 पासून सुरू झाली. या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राने पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरणे ही बाब आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेची चुणूक दाखवणारी आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

00000

 

ताज्या बातम्या

विधानपरिषद इतर कामकाज

0
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक - मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा...

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....