मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 104

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे एप्रिल २०२५ मध्ये दि. १२/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र सहयाद्री, दि. १६/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र गौरव, दि. १८/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष, दि.२३/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व दि. २९/०४/२०२५ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे  उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष तिकीट क्रमांक GS 04 / 9381 या गणेश एन्टरप्रायजेस, दादर यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे.

तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ५ बक्षिसे जाहीर झाली आहेत.

याशिवाय एप्रिल- २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १३४७९ तिकीटांना रू. ५४,५३,०५०/- व साप्ताहिक सोडतीतून ५६६९९ तिकीटांना रू. १,९९,४९,७००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रू. १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा),   महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले  आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १६: भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत ०९ जून २०२५ पासून सुरू होत आहे.

या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहलीद्वारे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांनी अनुभव घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मानस आहे. याबाबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी आणि पर्यटन संचालक बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी ऐतिहासिक उपक्रमासाठी विविध अंगांनी सुसज्ज तयारी केली आहे. भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. ५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल. प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने ही यात्रा अधिक संस्मरणीय करण्यात येईल, असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेजोमयी इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.

या प्रेरणादायी यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा चालवावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल, वरीष्ठ व्यवस्थापक श्री. संजय ढेकणे तसेच सर्व संबंधित अधिकारी समन्वय साधत परीश्रम करीत असून, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सांगितले आहे.

🔶 सहल तपशील –

            सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट

            शुभारंभ दिनांक: ०९ जून २०२५

            कालावधी: ५ दिवस / ६ दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)

            प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई

            प्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे

🚆 यात्रेचा प्रवासमार्ग –

मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

 

🏰 प्रमुख स्थळांची माहिती –

            रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.

            लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.

            कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.

            शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.

            भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.

            प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.

            कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर

            पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

 

💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): –

उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3AC), सुपीरियर (2AC) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे.  सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती IRCTC च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

 

✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: –

            भारत गौरव ट्रेनने प्रवास (SL / 3AC / 2AC)

            AC / Non-AC हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था

            सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड

            ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन

            प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)

            सुरक्षा व्यवस्था.

 

❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: –

            साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.

            खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.

            इतर कोणताही वैयक्तिक खर्च.

            कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

 

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): –

            पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.

            दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).

            तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.

            चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.

            पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.

            सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

 

📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संपर्क: –

IRCTC वेबसाईट: www.irctctourism.com

00000

संध्या गरवारे/विसंअ/

‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’त ५८ सुवर्णपदकांसह १५८ पदकं जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या युवा संघाचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या युवा संघाचे अभिनंदन

मुंबई दि. १६ :- महाराष्ट्रानं ५८ सुवर्ण ४७ रौप्य ५३ कांस्य असं एकूण १५८ पदकांची लयलूट करत ‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’त सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविलं. स्पर्धेच्या विजेते पदाची हॅटट्रिक ही राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पथकातील खेळाडू व सर्व सदस्यांचं अभिनंदन केलं आहे. सर्व पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीत उत्तरोत्तर प्रगती होत राहील असा विश्वास व्यक्त करीत त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘खेलो इंडिया युवा स्पर्धे’तील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की बिहारमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रानं केलेली नऊ स्पर्धा विक्रमांची नोंद कौतुकास्पद आहे. स्पर्धेतल्या २७ पैकी २२ खेळांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकं जिंकली. अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक दहा सुवर्णपदकं मिळाली. जलतरण स्पर्धेत सात सुवर्ण पदकांसह महाराष्ट्रानं २९ पदकं जिंकली. राज्याला जिम्नॅस्टिक्स आणि नेमबाजीत प्रत्येकी सहा वेटलिफ्टिंगमध्ये पाच तसंच कुस्ती सायकलिंग नेमबाजीचीही सुवर्णपदकं मिळाली. या युवा खेळाडूंच्या कामगिरीतून प्रेरणा घेऊन अधिकाधिक युवक खेळांकडे वळतील. परिश्रमानं उत्तम खेळाडू बनतील. राज्याच्या क्रीडा संस्कृतीला समृद्ध आणि राज्याला निरोगी सुदृढ ठेवण्यासाठी ही कामगिरी मदत करेल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

—–०००००००—–

नियोजन भवन येथील पालकमंत्री यांच्या दालनाचे उद्घाटन

सोलापूर, दिनांक 16 (जिमाका) :- नियोजन भवन येथे जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्री कार्यालय निर्माण करण्यात आलेले आहे. या दालनाचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६  चा ९३५ कोटींचा निधी वेळेत खर्च करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 25 या वर्षाच्या 857.84 कोटीच्या खर्चास नियोजन समितीची मान्यता

सोलापूर, दिनांक 16 (जिमाका) :- जिल्हा वार्षिक योजना सन 2025 – 26 अंतर्गत सर्वसाधारण योजना 783 कोटी, अनुसुचित जाती उपयोजना 147 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 5.44 कोटी असे एकूण 935.44 कोटींचा निधी मंजूर आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी माहे मार्च 2026 पूर्वी हा निधी खर्च करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहिता विचारात घेऊन सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी निविदा प्रक्रिया राबवावी. तसेच ज्या यंत्रणांचा निधी खर्च होणार नाही अशा यंत्रणा प्रमुखावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवतडे, सचिन कल्याणशेट्टी, राजू खरे, अभिजीत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, उत्तम जानकर(ऑनलाईन), प्र. पोलिस अधीक्षक तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्या सह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर असलेला 857.84 कोटीचा सर्व निधी शासकीय यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी खर्च केलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व यंत्रणांनी नियोजन समितीकडून कामांच्या याद्या अंतिम करून घ्याव्यात. प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही त्वरित पूर्ण करावी. ज्या यंत्रणा त्यांनी प्रास्तावित केलेला निधी वेळेत करू खर्च करू शकणार नाहीत त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या यंत्रणा प्रमुखाची राहील याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले. त्याप्रमाणेच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2025- 26 करता मंजूर तरतुदी व कामांच्या याद्याचा प्रारुप आराखडा जिल्हा नियोजन समिती पुढे आल्यानंतर समितीची मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील घरकुलाचा एकही लाभार्थी जागे अभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही. प्रशासनाने 134 घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिलेली आहे तर उर्वरित दोन हजार लाभार्थ्यांना पुढील दीड महिन्यात जागा उपलब्ध केली जाणार आहे. राज्य शासनाने एकाच वर्षात 30 लाख घरकुले लाभार्थ्यांना मंजूर केलेली असून सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनाही दुप्पट घरकुले मंजूर करण्यात आलेली असून सर्व पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के घरकुले उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याच्या पाणी नियोजनात थोडीशी गफलत झालेली दिसून येत आहे. तरी पाण्याच्या अनुषंगाने कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी लावण्यात येत असून सर्व लोकप्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहावे. तसेच याच बैठकीत उजनी वरील जल पर्यटनाच्या अनुषंगाने ही चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या छोट्या वाहनावर दंडात्मक कारवाई करू नये. अनेक लोकप्रतिनिधी यांच्याकडून या अनुषंगाने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या छोट्या छोट्या वाहनावर मोठ्या दंडाच्या कार्यवाही करण्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने परिवहन विभागाने याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी जिल्हा नियोजन समिती समोर मागील बैठकीचे इतिवृत्त व अनुपलन अहवाल ठेवला. तसेच  जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 25 अंतर्गत झालेला खर्च व सन 2025 – 26 चा प्रारूप आराखडा याची माहिती दिली.

यावर्षीच्या सर्वसाधारण योजनेसाठी शासनाकडून 121 कोटीचा अतिरिक्त निधी मंजूर

शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता रु. 661.89 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. राज्यस्तरीय बैठकीत 121.11 कोटीच्या वाढीसह जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 करीता एकूण रक्‍कम रु. 783.00 कोटीचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

जिल्हा बार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन 2025-26 मंजूर तरतूदी :-

 कृषी व संलग्नसेवा (पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय,वने,सहकार)  – रु. 51.26 कोटी

  • ग्रामीण क्षेत्राच्या विकासाच्या योजना  – रु. 64.00 कोटी
  • जलसंधारण विभागाच्या योजना    – रु. 59.50 कोटी
  • ऊर्जा विकास (MSEBव अपारंपारीक ऊर्जा ) – रु. 67.00 कोटी
  • शिक्षण विभागाच्या योजना    – रु. 42.00 कोटी
  • महिला व बाल विकासाच्या योजना  – रु. 21.08 कोटी
  • आरोग्य सेवांचे बळकटीकरण   – रु. 50.15 कोटी
  • नगर विकास विभाग- रु. 130.00 कोटी
  • रस्ते व  परिवहन  – रु. 73.50 कोटी
  • पर्यटन,तिर्थक्षेत्र,गड किल्ले,संरक्षित स्मारके यांचे संवर्धन व विकास -रु. 49.93 कोटी
  • पोलिस व तुरुंग व्यवस्थेचे बळकटीकरण  – रु. 23.08 कोटी
  • दिव्यांगांकरीता 1 % राखीव – रु. 7.00

लोकप्रतिनिधी यांनी नियोजन समिती केलेल्या मागण्या व मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे….

मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाचे पाणी देण्यात यावे, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाहीत ती भरपाई त्वरित मिळवून द्यावी, सांगोला तालुक्यासाठी मान नदीत पाणी सोडावे, सूर्यघर योजना नागरिकापर्यंत पोहोचवावी तसेच शेतकऱ्यांसाठी असलेले मुख्यमंत्री कृषी सौर ऊर्जा पंप योजनेचे प्रबोधन करावे, शेतातील रोहित्र साठी नियोजन समितीतून दुप्पट निधीची तरतूद करावी, सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या निर्माण कराव्यात, मोहोळ तालुक्याला हक्काचे पाणी उपलब्ध करून द्यावे, तुषार व ठिबक सिंचन योजनेची सबसिडी शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित कारवाई करावी, उजनी जलाशयातील गाळ व वाळू काढल्यास पाणी साठवून क्षमता वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, सोलापूर शहरातील सुंदरम नगर येथील जलतरण तलाव महापालिका किंवा क्रीडा विभागाने हाती घेऊन तो त्वरित सुरू करावा, शहरात एलईडी बल्ब लावावेत त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, अवैध डान्सबार वर कारवाई करावी, सांगोला येथे ट्रॉमा केअर सेंटरची इमारत उभी असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, सोलापूर शहराची स्वच्छता तसेच सिद्धेश्वर तलाव प्रदूषण थांबवण्याबाबत महापालिकेने लक्ष घालावे तसेच सोलापूर येथून विमानसेवा लवकर सुरू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशा विविध मागण्या खासदार व आमदार महोदय यांनी नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री महोदय यांच्याकडे केल्या.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा – रोहयो मंत्री भरत गोगावले

रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या.
महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ.  त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे.
शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा, मंडप, खानपान, राजशिष्टाचार, परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्यादृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मुढाळे येथे महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोळप, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता संदीप हाके, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योजक, शेतकरी आणि घरगुती वापराकरिता लागणारी वीज तसेच राज्यातील वाढते औद्योगिकरण लक्षात घेता सर्व घटकांना योग्य दाबाने वीजपुरवठा झाला पाहिजे याकरीता शासनाच्यावतीने वीजेचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी याकरीता याकरीता सुमारे २४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतात सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपाना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असून सुमारे ४४ लाख शेतकऱ्यांना लाभ घेतला आहे.

पीएम-सूर्य घर : मोफत वीज योजनेअंतर्गत १ लाख ३० हजार घरांच्याकरीता ५०० मेगॉवटपेक्षा अधिक क्षमतेचे छतावर सौरसंच बसविण्यात आले आहेत तसेच या योजनेअंतर्गत १ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान लाभार्थ्यांना दिले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांनाही सोलरच्या माध्यमातून वीज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (एआय) वापरासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासर्व प्रयत्नामुळे वीजेच्या देयकात बचत होण्यास मदत होईल.

मुढाळे वीज उपकेंद्रामुळे परिसरातील वीजेच्या समस्या सोडविण्यास मदत होणार

मुढाळे गावासहित परिसरातील गावांची वीजेची समस्या विचारत घेता मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३  के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या उपकेंद्राकरीता सुमारे ६२ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे, उपकेंद्र कार्यान्वित झाल्यानंतर मुढाळे, माळेगाव, पणदरे, सांगवी, होळ, कऱ्हावागज, कोऱ्हाळे आदी गावांना नियमित दाबाने अखंड वीजपुरवठा होण्यासह विजेचा भारही कमी होणार आहे. ही यंत्रणा नसून राज्य शासनाच्या सक्षमीकरणाची पायरी आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या उपकेंद्राचे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. उपकेंद्र परिसरात अधिकाधिक वृक्षारोपन करुन ती जगविण्याकरीता प्रयत्न करावे.

राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष मोहिमेअंतर्गत बारामती तालुक्यात १ हजार कोटी रुपयांची विकास कामे मंजूर

राज्य शासनाच्या १०० दिवस विशेष मोहिमेअंतर्गत काळानुरुप बदल विचारात घेता नागरिकांना सोई-सुविधा मिळण्याकरीता सुमारे १ हजार कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. ही सार्वजनिक विकासकामे करीत असताना ती दर्जेदार, टिकाऊ व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.  विकास कामे करतांना समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्यात येत आहे, याकामी नागरिकांनीही सहकार्य करावे.  राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. पवार यांनी केले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हा खरीप हंगाम आढावा आवश्यक ते नियोजन करण्यात येईल. याबाबतीत कुठलीही कमतरता भासणार नाही, याकरीता कृषी खात्यासोबत लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत दर्जेदार रोपे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

पीएम जनमन व धरती आबा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके

जिल्ह्यात एकही पात्र आदिवासी कुटुंब वंचित राहू नये; प्रलंबित विहीर अधिग्रहनाचे पैसे सातडीने द्या

यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : आदिवासी व आदिम जमातींमधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने पीएम जनमन व धरती आबा या योजना सुरु केल्या आहे. या दोन्ही अतिशय चांगल्या योजना असून जिल्ह्यात या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करा. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे डॉ.वुईके यांनी प्रधानमंत्री जनमन, धरती आबा, शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती मागील वर्षाचा खर्च, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पाणी टंचाई व आगामी 150 दिवसांचा सुधारणा कार्यक्रम आदी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला आ.राजू तोडसाम, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पीएम जनमन या योजनेत 13 विभागांचा सहभाग आहे. या विभागांच्या योजना प्राथम्याने आदिवासी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहे. धरती आबा योजनेंतर्गत देखील आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवायच्या आहे. जिल्ह्यात या दोनही योजनेचे उत्तम काम झाले पाहिजे. मी स्वत: आदिवासी विकास विभागाचा मंत्री असल्याने या योजनांचे जिल्ह्यात अधिक जास्त काम होणे आवश्यक आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, समित्यांना तेंदुपत्ता संकलन निधी, एकत्र असलेली आदिवासी गावे वेगळी करून स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करणे आदींबाबत डॉ.वुईके यांनी निर्देश दिले.

शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमात जिल्ह्याने चांगले काम केले परंतू अधिक चांगले काम होऊन राज्यस्तरावर जिल्ह्याचा गौरव झाला पाहिजे. येत्या काही दिवसात शासन 150 दिवस सुधारणा कार्यक्रम राबवित आहे. त्यात चांगली कामगिरी होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जिल्हा वार्षिक योजना व खनिज प्रतिष्ठानची कामे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करा, कामांची त्यांना माहिती द्या, विभागांनी लोकप्रतिनिधींच्या संपर्कात रहावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा घेतांना त्यांनी सद्या सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. जिल्ह्यात 4 कोटी 31 लक्ष रुपयांचा आराखडा राबविण्यात येत असून 468 गावांमध्ये 539 टंचाईची कामे प्रस्तावित आहे. सद्या जिल्ह्यात 34 टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. 189 विहीरी तर 31 बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. विहीर अधिग्रहणाचे प्रलंबित पैसे तातडीने वितरीत करण्याचे निर्देश डॉ.वुईके यांनी दिले.

यावेळी आ.राजू तोडसाम व आ.किसन वानखेडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना डॉ.वुईके यांनी केल्या. संबंधित विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागाची माहिती सादर केली.

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि.16 (जिमाका)- पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज कोसळून जीवित आणि वित्तहानी होते, ही हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा, असे निर्देश  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनास दिले.

सुभेदारी विश्रामगृह येथे आज डॉ. श्रीमती गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत  अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, आरोग्य, ऊसतोड कामगार या विषयांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे, शिक्षणाधिकारी प्राथमिक  जयश्री चव्हाण,महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव आदी बैठकीस उपस्थित होते.

वीज कोसळून होणारी जीवित व वित्तहानी  टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करावी. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची विशेष तरतूद करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये लाडक्या बहिणी व त्यांच्या किमान पाच सहकाऱ्यांची  आरोग्य तपासणी करावी. महिलांना होणारे गर्भाशयाचे कर्करोग, स्तनाचे कर्करोग, रक्तक्षय व इतर आजारासंदर्भातची तपासणी होऊन त्यावर उपचार करणे शक्य होईल. त्याद्वारे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यास मदत होईल. प्रत्येक शासकीय आरोग्य केंद्रातआरोग्य सुविधा सह औषधे यांचा साठाही उपलब्ध करून देण्याबाबतही नियोजन करावे. शाळेमध्ये ‘गुड टच बॅड टच’ सारखे उपक्रम राबवून पोलीस यंत्रणेने शाळेमध्ये निर्भय वातावरण करण्यासाठी पोलीस दीदी आणि पोलीस काका यांच्या माध्यमातून वारंवार भेटी द्यावेत. विद्यार्थ्यांमध्ये निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यामध्ये दशसूत्री उपक्रमा अंतर्गत शाळा महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य, तांत्रिक कौशल्य, निर्भय वातावरण, यासाठी उपक्रम राबविले जात असून या उपक्रमाची माहिती यावेळी दिली . विद्यार्थ्यांना समुपदेशन, तक्रारपेटी, शाळांमध्ये तक्रार करण्यासाठी संपर्क  क्रमांक यासाठीचे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

जिल्ह्यामधील ऊसतोड कामगारांची नोंदणी एकूण 25813 असल्याचे पंचायत विभागामार्फत सांगितले. या ऊसतोड कामगारांसाठीच्या कामगार विभाग, सामाजिक न्याय विभाग व इतर विभागाने समन्वयाने ऊसतोड कामगारांच्या शैक्षणिक,आर्थिक  विकासासाठी योजनांचा लाभ द्यावा,असे निर्देश श्रीमती गोऱ्हे यांनी दिले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राष्ट्रीय पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 16 : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करते. वर्ष 2024 साठी विविध श्रेणींमधील पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विविध श्रेणींमध्ये 35 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. महिला उद्योजक, अनुसूचित जाती/जमातीतील उद्योजक तसेच ईशान्येकडील राज्यांमधील ‘एमएसएमई’ उद्योजकांना विशेष तरतुदीद्वारे पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गत, पुरस्कारप्राप्त ‘एमएसएमईं’ना 3 लाख रुपये (प्रथम पुरस्कार), 2 लाख रुपये (द्वितीय पुरस्कार) आणि 1 लाख रुपये (तृतीय पुरस्कार) पुरस्कार रक्कम स्वरूपात दिले जातात. त्याचबरोबर  चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते.

राष्ट्रीय पुरस्कार 2024 च्या विविध श्रेणीसाठी ‘एमएसएमई’कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. 20 मे 2025 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे  (https://dashboard.msme.gov.in/na/Ent_NA_Admin/Ent_index.aspx) हे अर्ज सादर केले जाऊ शकतात. इच्छुक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारेदेखील (https://awards.gov.in/)  त्यांचे अर्ज सादर करू शकतात. याबाबतचा तपशील www.dcmsme.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जकर्ते यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या एमएसएमई – विकास आणि सुविधा कार्यालय (MSME – DFO) किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23063342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे.

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात नवीन सदस्यांची नियुक्ती

0
मुंबई, दि. १ : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (एमपीएससी) राजीव निवतरकर, दिलीप भुजबळ-पाटील व महेंद्र वारभुवन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली...

नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात लवकरच ‘आफ्रिकन सफारी’ चा आनंद

0
मुंबई, दि. १: नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात आज...

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १:  महाराष्ट्राने उर्जा क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून येत्या काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचे महत्त्व आणि आवश्यकता वाढणार आहे. त्या...

विधानपरिषद लक्षवेधी

0
अहिल्यानगर महापालिकेतील २८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीस शासन सकारात्मक - मंत्री उदय सामंत राज्यातील सर्व महानगरपालिकांचा आकृतीबंध मंजूर करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करणार मुंबई, दि. १ :...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
घरकुलांसाठी स्थानिक वाळू घाटांमधून पाच ब्रास वाळू तहसीलदारार्फत मोफत मिळणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. १ : राज्य शासनाने राज्यात एक व्यापक वाळू धोरण...