शुक्रवार, मे 16, 2025
Home Blog Page 1046

गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्नपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका):  गणरायाचा मंगलमय सण निर्विघ्णपणे साजरा करत प्रशासनाला सहकार्य करूया असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. आज पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांसमवेत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न झाली.

यावेळी खासदार धैर्यशील माने, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रिया पाटील,  शहर उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पोलीस व महानगरपालिकेचे अधिकारी, शातंता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

पालकमंत्री केसरकर यांनी उपस्थित गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना येणारा उत्सव शांततेने संयमाने साजरा करण्याचे आवाहन केले. उपस्थितांच्या मागणीनुसार मिरवणुकीदरम्यान वाहनांच्या रुंदी बाबत येत्या काळात सूचनाही देवू असे आश्वासन दिले. कोल्हापूर जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा आहे आपण ती परंपरा जपत उत्साहाने येणारा गणेशोत्सव साजरा करू असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

            बैठकीच्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक श्री. पंडित म्हणाले की, गणेशोत्सव पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केली आहे. एक खिडकी योजनेतून नियमाने मंडळाना परवानगी देण्यात येत आहे. उत्साहाच्या भरात काही मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होते. याचा त्रास अन्य मंडळांसह मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या मंडळांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. जिल्ह्यात व शहरातही बैठका घेवून सण शांततेत व उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

            खासदार धैर्यशील माने म्हणाले की, गणरायाचा सण आनंदानी साजरा करूया. पोलीस प्रशासनातील सर्वच अधिकारी व सहकारी सण आनंदाने व सुरक्षित साजरा करण्यासाठी तत्पर असतात. गणेश मंडळांनी उत्सवात इर्शा न बाळगता सहकार्य करावे.

            पालकमंत्री केसरकर म्हणाले की, गणेश उत्सव आनंदाने व शांततेने साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे. गणरायाचे आगमन व विसर्जन करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे. उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त सूचनांमध्ये खड्डेमुक्त रस्ते,  प्रदुषणमुक्त पंचगंगा नदी, डॉल्बी मुक्त सण साजरा करणे, उत्कृष्ट मंडळाना देण्यात येणाऱ्या   पारितोषिकामध्ये रोख रक्कम देणे, सणाबाबत परवानगी व सुविधा आदीबाबत प्रशासनाची बैठक घेवून लवकरच निर्णय घेण्याबाबत आश्वासन यावेळी दिले.

00000

नंदुरबारला साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची आदिवासी क्रीडा प्रबोधिनी – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार: दिनांक ९ सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त) आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे गुण उपजत असतात. त्यांना जर योग्य संधी व सुविधा मिळाल्या तर ते क्रीडाक्षेत्रात देशाचे नाव जागतिक स्तरावर गाजवू शकतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आदिवासी खेळाडूंनी दाखवून दिले आहे. त्यामुळे नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणारी आदिवासी क्रीडा प्रबोधिनी साकारण्याचा विचार असून, त्यात आदिवासी खेळाडूंना सांघिकसोबत वैयक्तिक क्रीडा प्रकाराचे धडे दिले जातील, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील सर्व तालुका क्रिडा संकुलांच्या निर्मिती संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,तहसीलदार नितीन गर्जे, नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी नितीन कापडणीस, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका क्रिडा अधिकारी व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उत्तम कलागुण, बौद्धिक क्षमता आहे. या मुलांच्या क्रीडा गुणांना चालना देणे व क्रीडाविषयक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील पहिली आदिवासी क्रीडा प्रबोधिनी नाशिकमध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या धर्तीवर ती नंदुरबारमध्ये सुरू करण्याची बाब  विचाराधीन आहे. त्यात पाचवी च्या वर्गापासून प्रवेश दिला  जाईल. त्यात ८० टक्के आदिवासी व २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये  प्रचंड ऊर्जा व काटकता असते, धावणे, पोहणे, लांब, उंच उडी आणि नेमबाजीसह विविध क्रीडा प्रकारांचे कौशल्य नैसर्गिकरीत्या असते. सांघिक प्रकाराबरोबरच वैयक्तिक क्रीडा प्रकारात पदके मिळविण्याची संधी जास्त असल्याने या आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत सामुहिक क्रीडा प्रकारांसोबत कनो-कायाकिंग, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, धनुर्विद्या, बॉक्सिंग, स्विमिंग या वैयक्तिक खेळांचाही समावेश असेल. या वैयक्तिक क्रीडा प्रकारात खेळानुसार स्वतंत्र प्रशिक्षकाची नियुक्ती सोबतच त्यांच्या दर्जेदार व पोषक आहारावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच क्रीडा प्रबोधिनी परिसरात वसतिगृहाच्या सुविधा असणार आहेत. तसेच या खेळाडू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह शाळेत जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वैयक्तिक तसेच सांघिक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडांगणांमध्ये अद्ययावत क्रीडा साहित्याद्वारे उत्तम दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करता येणार असल्याचेही डॉ गावित यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील क्रिडा संकुलांच्या निर्मितीसाठी  येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करून त्यांचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा  क्रिडा संकुलांच्या प्रस्तावित जागेसंदर्भात तहसीलदार व संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी  आठ दिवसाच्या आत अहवाल सादर करावा. तसेच नंदुरबार, नवापूर, शहादा येथील तालुका क्रिडा संकुलांच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असल्याने त्यांचे आराखडे तयार करून तात्काळ कामे सुरू करण्यात यावीत. नंदुरबार क्रिडा संकुलाकडे जाणारा रस्ता अरूंद असल्याने तो रूंद करण्यासाठी नंदुरबार-खामगाव रस्ता तातडीने प्रस्तावित करावा. शहादा क्रिडा संकुलात ४०० मीटरचा ट्रॅक तयार करण्यासाठी नियोजित रचनेचा आराखडा तयार करावा. नंदुरबार क्रिडा संकुलाचे आजूबाजूला असलेल्या  सर्व व्यापाऱ्यांना क्रिडा संकुलातच गाळे देण्यात येणार असून त्याबाबत सर्व व्यापाऱ्यांशी करार केला जाईल. ज्यांना अधिकचे गाळे पाहिजे असतील त्यांना  लिलावात सहभागी होवून ते घेता येतील, असेही यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी नंदुरबारसह सर्व तालुका क्रिडा संकुलांचा नियोजित रचनात्मक आराखड्याची पाहणी करून सूचना केल्या.  तसेच नंदुरबार क्रिडा संकुलाच्या आजूबाजूला असलेल्या व्यापारी बांधवांशी सकारात्मक चर्चा केली.

०००००

आवश्यक सोयीसुविधांकरिता नगरोत्थान, दलितवस्ती सुधार व इतर योजनेतून नगरपंचायतींसाठी २१.३ कोटी रू. निधी – पालकमंत्री दीपक केसरकर

  • नागरी भागाच्या सुशोभीकरणासह, स्मारकांचा विकास करणार
  • ६ नगरपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देवून समस्यांबाबत घेतला आढावा
  • नृसिंहवाडी पर्यटन स्थळ विकासासाठी ५ कोटी ९० लाखांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका):  कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागात पायाभूत सुविधांच्या निर्मितीतून सर्वसामान्यांना विविध योजनांच्या माध्यमातून कामे करण्यासाठी 6 नगरपंचायतींच्या मागणीनंतर नगरोत्थान व इतर योजनांमधून 21.3 कोटी रुपये निधी  देण्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्राच्या नागरी क्षेत्रात पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रस्ते अशा विविध पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने विविध योजनांमधून निधी दिला आहे. यातून पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हयातील भेटी दिलेल्या 6 नगरपंचायतींना सुमारे 21.3 कोटी रूपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. त्यांनी दोन दिवसात जिल्हयात 6 नगरपंचायतींना भेटी देवून सर्वसामान्यांच्या विकास कामांबाबतच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी सोबत खासदार धैर्यशील माने, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह, नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर,  संबंधित तहसिलदार, मुख्याधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि.8 सप्टेंबर रोजी त्यांनी वडगाव नगरपरिषद विकास कामांबांबत तेथील कार्यालयात बैठक घेतली. माजी पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी विविध कामांबाबत शासनाकडे निधीची मागणी केली. नगरोत्थान व डीपीसीमधून मिळत असलेल्या 99 लक्ष रूपयांच्या निधीत वाढ करत पालकमंत्री यांनी 2.20 कोटी रूपये देण्याचे जाहीर कले. तसेच सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 8 कोटी रूपये लागणार आहेत. यासाठी शासनाकडून निधी येईपर्यंत काम थांबू नये म्हणून जिल्हा पर्यटन लेखाशीर्षमधून 1 कोटी रूपये देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. तेथील पंतप्रधान आवास योजनेसाठी 520 घरकुलांच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावणेबाबतही जिल्हाधिकारी यांना सूचना केल्या. हातकणंगले नगरपंचायतीत 1.38 कोटी रुपये निधी शासनाकडून मिळत होता, त्यात वाढ करत तब्बल 3 कोटी रूपये देण्याचे आश्वासन पालकमंत्री केसरकर यांनी दिले. तसेच नव्याने स्थापन झालेल्या सर्वच नगरपंचायतींना प्रोत्साहनात्मक शासनाकडून निधी मिळतो. त्याअंतर्गत ५ कोटी रूपये शासनाकडून अद्याप न मिळाल्याने त्याची मागणी यावेळी झाली. हातकणंगले नगरपरिषदेला तो निधी मिळण्यासाठी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हुपरी येथील नगरपरिषदेला स्व:मालकीची इमारत नाही, ज्येष्ठांसाठी विरंगूळा केंद्र, नगरोत्थानमधून वाढीव निधी मिळावा, पाण्याच्या योजनेबाबत तसेच सिटी सर्वेच्या दुरूस्तीबाबत मागण्या नागरिकांनी केल्या. यावेळी पालकमंत्री महोयदयांनी 83.5 लाख रूपयांच्या निधीत वाढ करत 2.10 कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. ज्येष्ठांसाठीच्या विरूंगळा केंद्राच्या जागेबाबत 15 दिवसात जिल्हाधिकारी यांना ती जागा हस्तांतरीत करण्याच्या सूचना केल्या. नियमानूसार स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हुपरी येथील चांदी व्यावसायिकांच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा करून येथील चांदी व्यावसायाला गतवैभव प्राप्त होण्यासाठी नियोजन करू असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले. सुर्य तलावाच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक निधी, चैत्यभूमी साठी नगर विकास विभागातून निधी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दि.9 सप्टेंबर रोजी जयसिंगपूर नगरपंचायत मध्ये आढावा घेताना माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विकास कामांबाबतची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली. तसेच त्यांनी नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणी व लागणाऱ्या निधीबाबतही माहिती सांगून  वाढीव निधी मिळण्याची विनंती केली. यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी जयसिंगपूर नगरपंचायतीला मिळत असलेल्या 4 कोटी रुपये निधीमध्ये वाढ करून 8 कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले. पुढे शिरोळ नगरपंचायतीसाठी  2 कोटी रुपये, महाराणी ताराराणी स्मारकाच्या कामासाठी 50 लक्ष, नगरपंचायतीसाठी अग्निशमन वाहन व त्याकरिता शेड तयार करण्यासाठी पूर्वीच्या चाळीस लाखांमध्ये अजून 40 लाख असे मिळून 80 लाख  व कुरुंदवाड नगरपंचायतीसाठी 5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. कुरुंदवाड येथील संताजी घोरपडे समाधी स्थळ स्मारकाला पर्यटनामधून सुशोभीकरणासाठी 1 कोटी निधी देण्याचे जाहीर केले. नृसिंहवाडी पासून धनाजी घोरपडे स्मारकापर्यंत नदी पात्रातून जाण्यासाठी अत्याधूनिक बोट देण्यात येणार.

नगरपंचायतींना भेटी देवून समस्या जाणणारे जिल्हयातील पहिले पालकमंत्री – खासदार, धैर्यशील माने

कोल्हापूर जिल्हयाच्या इतिहासात विविध विकास कामांबाबत, नागरिकांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष नगरपंचायतींना भेटून दौरे करणारे पहिले पालकमंत्री दिपक केसरकर असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिपादन केले. ते म्हणाले, पालकमंत्री नेहमीच जिल्हास्तरावर बैठका घेवून विविध कामांबाबत चर्चा करत असतात. परंतू नागरिकांच्या भावना, त्यांच्या समस्यांची जाण प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दिपक केसरकर स्वत: जावून नगरपंचायतींच्या विकास कामांचा आढावा घेत आहेत. त्यांनी उपस्थितांना नागरी भागाचा विकास करताना समग्र विकास व्हावा यासाठी आवाहन केले. तसेच त्यांनी यावेळी त्यांच्या मतदार संघात येणाऱ्या नगरपंचायतींमधील विकास कामे व समस्यांबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली.

 

श्रीक्षेत्र कुंथुगिरी येथील विकासकामांचे भूमिपूजन रामलिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी 50 लक्ष रुपये मंजूर

श्रीक्षेत्र कुंथुगिरी येथे जिल्हा नियोजन, पर्यटन स्थळ विकास योजनेतून मंजूर झालेल्या संरक्षक भिंत बांधणे व अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या कामांमध्ये 2 कोटी रुपये निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंजूर कामांमध्ये शांतिनाथ मंदिर, सभा मंडप, कैलास पर्वत ते यात्री निवास रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच संपूर्ण कुंथुगिरी क्षेत्र परिसरात संरक्षक भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. तेथील रामलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी 50 लक्ष रुपये देण्याचे जाहीर केले.

नृसिंहवाडीतील 5 कोटी 90 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत पर्यटन स्थळ विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा पुरवणे या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर झालेल्या 5.90 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नृसिंहवाडी येथे संपन्न झाले. या कामांमध्ये नृसिंहवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण करणे व चौक सुशोभीकरण करणे, विठ्ठल मंदिर येथे सांस्कृतिक हॉल बांधणे, छत्रपती संभाजी महाराज विक्री केंद्र व भक्तनिवास बांधणे, श्री.स्वामी समर्थ मंदिर व शुक्ल तीर्थ मार्ग रस्ता करणे आणि सांस्कृतिक हॉल व भक्तनिवास बांधणे इत्यादी कामांचा समावेश आहे. या भूमिपूजन समारंभा वेळी पालकमंत्री यांच्या समवेत खासदार धैर्यशील माने, माजी राज्यमंत्री तथा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, नृसिंहवाडी येथील सरपंच, उपसरपंच, तहसीलदार श्री. हेळकर, गट विकास अधिकारी श्री.कवितके व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री.केसरकर म्हणाले ग्रामपंचायतीने पर्यटनाच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने एक चांगला आराखडा तयार केला आहे. यावेळी त्यांनी धार्मिक व ऐतिहासिक संगम करून नृसिंहवाडी परिसरातील संताजी घोरपडे समाधी स्थळ, विठ्ठल मंदिर तसेच आजू बाजूच्या ठिकाणी जाण्यासाठी 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक नौका देण्याचे जाहीर केले.

यावेळी ते म्हणाले स्मारकांच्या संवर्धनातून छ्त्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराराणी, सरसेनापती धनाजीराव जाधव, संताजी घोरपडे यांच्यासह सर्व शूरवीर यांचा इतिहास पुन्हा जागृत करायचा आहे. त्यासाठी जिल्हयात अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पूर्वीचे ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

00000

 

 नवी दिल्लीत दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली, दि. ९: भारताला १८ व्या जी-२० शिखर परिषदेचे मिळालेले यजमानपद, हे आम्हा सर्व देशवासियांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये सन्मानाने घेतले जात आहे, हीसुद्धा अभिमानाची बाब असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथील प्रगती मैदान परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम्’मध्ये जी-२० च्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे दिल्लीत दाखल झाले. परिषदेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सदनात उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 

राजधानी दिल्लीत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश असलेल्या देशांचे प्रमुख जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले असून, यंदा भारताने बांग्लादेश, इजिप्त, नेदरलँड, मॉरिशस, नायजेरिया, सिंगापूर, स्पेन, यूएई, ओमान या देशांच्या राष्ट्राध्यक्षांना विशेष आमंत्रित केले आहे.

दोन दिवसीय परिषदेची सुरुवात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. त्यांनी याप्रसंगी उपस्थित सर्व राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. या परिषदेत आरोग्य, व्यापार, शिक्षण, सुरक्षा आणि हवामान बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन दिवसीय चर्चासत्र असणार आहे. शनिवारी सकाळीपासून जी-20 शिखर परिषदेचे पहिले सत्र ‘एक सृष्टी’चे (One Earth) आयोजन करण्यात आले. दुस-या सत्रात, ‘एक कुटुंब’ (One Family) यावर विचारमंथन झाले.

‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजेच एक सृष्टी, एक कुटुंब, एक भविष्य (One Earth, One Family, One Future) ही 18 व्या जी-20 शिखर परिषदेची थीम आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये सन्मानाने घेतले जात आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणणे, यशस्वी चंद्रयान-3 अभियान, गेल्या नऊ वर्षांपासून देशात राबविण्यात आलेले विकास प्रकल्प, प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली देशाचे नाव उज्ज्वल झाले असल्याची  प्रतिक्रियाही मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

शिखर परिषदेच्या संध्याकाळी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून उपस्थित सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनातील मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, सचिव, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

सर्व राज्यांच्या विविध हस्तकला वस्तू प्रर्दशनाचे दालन

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन संघाच्या वतीने (TRIFED) पारंपरिक आदिवासी कला, कलाकृती, चित्रे, मातीची भांडी, वस्त्र, सेंद्रीय नैसर्गिक उत्पादने आदी भारत मंडपम येथील हॉल क्रमांक तीन मध्ये ‘क्राफ्ट्स बाजार’ (Tribes India) उभारण्यात आले आहे.  या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे दालनही उभारले असून, यामध्ये पैठणी साड्या, वारली चित्रे, कोल्हापुरी चप्पल, हिमरू शाली, बांबूची उत्पादने आदी वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. भारतातील विविध भागांतील हस्तकला उत्पादने ज्यात ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ आणि जीआय-टॅग केलेल्या वस्तूंवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. या निमित्ताने परदेशी प्रतिनिधींना स्थानिक पातळीवर एका छताखाली उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वर्षभरात 14 बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.  मुंबईत  आठ, पुण्यात चार, औरंगाबाद व  नागपूर मध्ये प्रत्येकी एका बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बैठकांमध्ये राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणुकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख परदेशी पाहुण्यांना करून देण्यात आली होती.

..:……

अमरज्योत कौर अरोरा/ १६९/

 

जिल्ह्यातील ४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

सांगली दि. 9 (जि.मा.का.):- ‘आयुष्मान भव’ योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधून जिल्ह्यातील 46 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. एस.आर.सी.सी. रुग्णालय, मुंबई येथे या बालकांवर हृदय शस्त्रक्रिया होणार आहेत. बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया, औषधोपचार, निवास, भोजन व्यवस्था या सर्व सोयी शासन मोफत करत आहे. त्यामुळे  कोणीही चिंता करू नये. सर्व बालकांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी होवून ती तंदुरूस्त होवून येतील असा दिलासा देवून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बालक व पालकांना शुभेच्छा दिल्या.

             जिल्हाधिकारी कार्यालय येथून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी  बालकांना स्वतंत्र बसने मुंबईकडे पाठविण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर,  जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस, व्यवस्थापक कविता पाटील तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, एस.आर.सी.सी. रुग्णालय, मुंबई येथील डॉक्टर मुलांच्या बॉडीचा फिटनेस बघून हृदय शस्त्रक्रिया करतील. ज्या मुलांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी काही अडचण आहे, अशा मुलांना औषधोपचार करून त्यांच्याही हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जातील. सर्व मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया व्यवस्थित होतील याची काळजी डॉक्टर्स, हॉस्पीटल, प्रशासनाबरोबर आम्ही सर्वजण घेत आहोत. पालकांनी मुलांबरोबरच त्यांच्या तब्बेतीचीही काळजी घ्यावी. येत्या मंगळवारी किंवा बुधवारी एस.आर.सी.सी. रुग्णालयात येवून तेथील डॉक्टर्स यांच्याबरोबरही बालकांवर केल्या जाणाऱ्या हृदय शस्त्रक्रियेसंदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असून आजअखेर 1 हजार 520 लाभार्थ्यांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. 15 हजार 40 लाभार्थी बालकांवर इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या असून 120 कर्णबधिर लाभार्थी बालकांवर 10 लाख इतक्या खर्चाच्या कॉकलिअर इम्पलांट या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इको तपासणी शिबिरामध्ये तपासणी केलेल्या 205 लाभार्थी बालकांपैकी 60 लाभार्थी बालकांवर शस्त्रक्रियेची गरज असल्याचे  निदर्शनास आले. त्यापैकी एस.आर.सी.सी. रुग्णालयाने संदर्भित केलेले 30 लाभार्थी बालक आणि यापूर्वी शस्त्रक्रिया प्रलंबित असलेल्या  बालकांपैकी तात्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणारे 16 लाभार्थी बालक अशा 46 लाभार्थी बालकांवर या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मंजूर अनुदानातून करण्यात येणार असून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त अनुदान हे मुंबईतील खाजगी सेवाभावी व धर्मादाय संस्था यांच्याकडून एस.आर.सी.सी. हॉस्पिटलकडे उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

00000

 

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ‘सखी निवासा’करिता प्रस्ताव पाठविण्याचे संस्थांना आवाहन

मुंबई दि.९ : जिल्ह्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी राहत असलेल्या शहरात सुरक्षित आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘सखी निवास’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत मुंबई उपनगर येथे सहा सखी निवास भाडेतत्वावरील इमारतीमध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी केंद्र शासनाने निश्चीत केलेल्या संस्था तसेच एजन्सीजकडून  दिनांक १८ सप्टेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोयीस्कर पध्दतीने निवासाच्या व्यवस्थेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत ‘संबल’ आणि ‘सामर्थ्य’ या दोन योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनेतील ‘सामर्थ्य’ या उपयोजनेत नोकरी करणाऱ्या महिलांकरीता ‘सखी निवास’ या घटक योजनेचा समावेश आहे. मुंबई उपनगर या जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेल्या नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहांव्यतिरिक्त आणखी नविन ०६ सखी निवास कार्यान्वित करावयाची आहेत.

या योजनेंतर्गतचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती केंद्र शासनाचे दि. १४ जुलै २०२२ रोजी ‘मिशन शक्ती’ या योजनेच्या मार्गदर्शक सुचना, प्रस्ताव सादर करावयाच्या अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण पध्दत, संस्था एजन्सीच्या पात्रतेचे निकष, सखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत व भौतिक सोयीसुविधा,अनुदान, कर्मचारी वर्ग, शासन निर्णय इ. सर्व सविस्तर माहिती आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या https://www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत ‘सखी निवास’ योजना कार्यान्वित करुन ती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाचे शासन निर्णय व या संबंधीचे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सुचनेनुसार सदरची योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था  तसेच एजन्सीकडून याद्वारे दि.१८ सप्टेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

तरी याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत १ ला मजला, दुसरा टप्पा, आर. सी मार्ग, चेंबूर, मुंबई -७१, दूरध्वनी: ०२२-२५२३२३०८ येथे संपर्क करावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एस. नागरगोजे यांनी केले आहे.

 

******

 

कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन गणेशोत्सव उत्साहात साजरा करुया – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक: 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त): कायदा व सुव्यवस्थेला बाधा न येता सर्वांच्या समन्वयातून व सहकार्याने आगामी गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा करुया, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त अशोक करंजकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटये, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, नाशिक जिल्ह्याला सण, उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. हा नावलौकीक कायम राखण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुन या उत्सावाच्या माध्यमातून सामाजिक विचारमंथन आणि राष्ट्रप्रेम जागृतीसाठी प्रयत्नशील राहूया. गणेशोत्सव मंडळांना कुठलीही अडचण येवू नये तसेच त्यांच्या अडचणीचे तातडीने निवारण होण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात पोलीस, महापालिका व वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी यांचे एक पथक नेमण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्यात.

त्याचबरोबर गणेशोत्सावाच्या काळात शहरात स्वच्छता राखली जाईल, तसेच वेळोवेळी जंतुनाशक फवारणी करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्यात. गणेश विसर्जन मार्गावरील खड्डेबुजविणे, या मार्गावरील अतिक्रमण काढणे, मिरवणुकीस अडथळा येणाऱ्या विद्युत तारा हटविणे, नागरीकांसाठी रस्ते मोकळे राहतील याबाबत दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

सर्वोत्कृष्ट गणेश मंडळासाठी राज्य शासनाने 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. यात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 6 लाख रुपये उपलब्ध करुन देऊन जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंडळास 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केली. तसेच नागरीकांना विविध गणेश मंडळांनी केलेली आरास बघता यावी याकरीता शेवटचे चार दिवस रात्री 12 वाजेपर्यंत आरास खुली ठेवण्यास परवानगी देण्याबाबत तसेच गणेश मंडळांना जाहिरात शुल्क न आकरण्याबाबत प्रशासनाने निर्णय

घेण्याबाबत सुचित केले. त्याचबरोबर मुस्लीम बांधवांनी ईद ए मिलाद ची मिरवणुक दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पालकमंत्री यांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक करुन आभारही मानले. या बैठकीत विविध मंडळांनी ज्या समस्या मांडल्या त्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यात येतील असे आश्वासन यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिले.

गणेश मंडळांच्या अडचणी सोडविण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असून एक  खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवानगी तातडीने देण्याच्या नियोजन सर्वांच्या सहकार्याने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे  यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, गणेशोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी तसेच गणेश मंडळांना कोणत्याही अडचणी येवू नये याकरीता जिल्हा प्रशासन सर्व उपाययोजना राबवित असून गणेश मंडळांनीही नियमांचे पालन करावे. त्याचबरोबर राज्य

शासनाने गणेश मंडळांसाठी आयोजित केलेल्या गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा त्याचबरोबर शासनाच्या लोाकोपयोगी योजनांवर आधारित देखावे, आरास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून गणेश मंडळांना चांगल्या सुविधा दिल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटये यांनी  प्रशासनाचे आभार माणून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले.

यावेळी माजी महापौर विनायक पांडे, गजानन शेलार, रामसिंग बावरी, सत्यम खंडाळे,  गणेश बर्वे आदिंसह विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मौलीक सुचना मांडल्या.

मनपा, वीज वितरण कंपनी, पोलीस विभागामार्फत गणेशोत्सवासाठी केलेल्या नियोजनाची व उपयोजनांची माहिती बैठकीत दिली. बैठकीचे सुत्रसंचलन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले.

000000

कलाग्राम प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दिनांक: 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्त): कलाग्राम प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी 5 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून हे कलाग्राम लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने येथील उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

गोवर्धन येथे दिल्ली हटच्या धर्तीवर साकारत असलेल्या कलाग्राम प्रकल्पाची मंत्री भुजबळ यांनी आज पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण, अभियंता महेश बागुल, पर्यटन विभागाचे उप अभियंता ज्ञानेश्वर पवार, गोवर्धन गावचे सरपंच बाळासाहेब लांबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, कलाग्राम प्रकल्पाचे काम हे त्वरीत पुर्ण करण्यात यावे. सद्यस्थितीत येथे बांधण्यात आलेल्या दुकानांचे अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण करणे, पथदिवे बसविणे त्याचप्रमाणे दुकानांना शटर, दरवाजे, खिडक्या बसविण्याची कामे सुरू करण्यात यावीत. कलाग्राम येथील अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, उपहागृह व प्रसाधन गृह येथे आवश्यक असलेली प्लंबिंगची कामे, वाहनतळ पार्कींग व्यवस्था ही कामे दर्जात्मक झाली पाहिजे. त्याचप्रमाणे कलाग्रामच्या बाह्य बाजुस बाग-बगिचा व परिसर सुशोभिकरण करणे यासोबतच लहान मुलांसाठी खेळणी पार्क तयार करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी भुजबळ यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर मेगा पर्यटन संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर आणि अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूटच्या कामांचाही आढावा घेतला. बोटक्लब नाशिक येथे 1 हजार अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर बांधण्यात येत असून यात पहिल्या टप्प्यात 600 अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असा 1 हॉल, 200 अतिथी बसण्याची व्यवस्था होईल असे 2 हॉल, ऍप्मीथिअटर, उपहारगृह, प्रसाधान गृह, केंद्रीकृत वातुनूकुलित यंत्र, प्रोजेक्टर वीथ साउंड सिस्टीम ही कामे पूर्ण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगदीश चव्हाण यांनी दिली. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मंजूर झालेल्या 2 कोटी 20 लाख

निधीतून अंतर्गत फर्निचर व सजावट, वाहनतळाची व्यवस्था बाह्य बाजूस बाग-बगीचा व सुशोभिकरण करणे, पथ दिवे आणि अंतर्गत रस्ते यांची कामे त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट सूरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत भुजबळ यांनी निर्देश दिले.

00000000

शिक्षकांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक : 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकांचे  स्थान महत्वपूर्ण असते. विद्यार्थ्यांना  भविष्यवेधी शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत असतात, अथक परिश्रम व ज्ञानार्जनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

गंगापूर रोड येथील कै. रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, नितीन बच्छाव (प्राथमिक) यांच्यासह सर्व शिक्षक पुरस्कारार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, भविष्यातील आदर्श नागरिक घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. आज असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी, शाळांसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम देखील शिक्षकच राबवित असतात. त्यासाठी काही शिक्षक स्वखर्चातून शाळांच्या विकासाला हातभार लावतात. तर काही गावातील नागरिकांना प्रेरीत करून त्यांच्या सहभागाने शाळांचा व विद्यार्थ्यांचा विकास साधत असतात. अशाच प्रतिकुल परिस्थिती व अथक परिश्रमातून ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या शिक्षकांची यापुढील जबाबदारी अधिकच वाढली आहे. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कामातून प्रेरणा घेवून इतर शिक्षकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे जाळे खूप विस्तारले असल्याने या डिजिटल युगात भविष्यातील नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनी देखील तंत्रस्नेही होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण समित्यांनी तेथील शिक्षकांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या 128 शाळा मॉडेल स्कूल (आदर्श शाळा) म्हणून विकसित करण्यात येत आहे. येत्या वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांना स्मार्ट स्कूल बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री  श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षी राबविण्यात आलेला ‘सुपर 50’ हा उपक्रम यशस्वी झाला असून या उपक्रमामध्ये यावर्षी 50 ऐवजी 100 विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे. सुपर 50 मध्ये निवड झालेले विद्यार्थी हे भविष्यात नक्कीच आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसोबतच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सक्षमपणे उभे करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. याचप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यात येणारा प्रत्येक नाविन्यपूर्ण शिक्षणाचा उपक्रम राज्यात शिक्षणाचा नाशिक पॅटर्न म्हणून राबविला जाईल, असा विश्वास ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

                                                                         

आमदार सिमा हिरे म्हणाल्या, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत. आपल्या ज्ञानदानाच्या कामातून उद्याचे आदर्श नागरिक घडणार असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर देखील भर द्यावा, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण क्षेत्रात सुरु असून त्याअनुषंगाने शिक्षकांच्या कार्यशाळा देखील घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेतील अनेक शाळांमधील शिक्षक हे नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत असतात. असे सर्व शिक्षक हे आदर्श व गुणवंत आहेत, अशा सर्व शिक्षकांकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता नक्की वाढेल असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अधिकाधिक शिक्षकांनी गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन ही त्यांनी केले.

गुणवंत शिक्षक म्हणून यांचा झाला सन्मान:

  • प्रमिला भावराव पगार, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा भिलदर, ता.बागलाण,
  • वैशाली विलास जाधव, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा एकरुखे, ता.चांदवड,
  • अर्चना दादाजी आहेर, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा पिंपळेश्वर (वा), ता. देवळा,
  • नौशाद अब्बास मुसलमान, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा परमोरी, ता.दिंडोरी,
  • चित्रा धर्मा देवरे, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा अभोणा मुली, ता. कळवण,
  • अनिल सारंगधर शिरसाठ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, जामुंडे, ता.इगतपुरी,
  • प्रतिभा सुनील अहिरे, प्राथमिक शिक्षका, जिल्हा परिषद शाळा, वजीरखेडे, ता. मालेगाव,
  • देवेंद्र वसंतराव वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, देवीचा माथा, ता.निफाड,
  • उत्तम भिकन पवार, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, हनुमान वाडी, ता.नाशिक,
  • राजकुमार माणिकराव बोरसे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, साकोरा, ता.नांदगाव,
  • रवींद्र सुभाष खंबाईत, पदवीधर प्राथ. शिक्षक, मोहपाडा ता.पेठ,
  • संतोष बाळासाहेब झावरे, जिल्हा परिषद शाळा, आशापुरी(घोटेवाडी) ता.सिन्नर,
  • परशराम पंडीत पाडवी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा शिंदे (दि) ता.सुरगाणा,
  • बालाजी बिभीषण नाईकवाडी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडववाडी, ता. येवला,
  • अर्चना ज्ञानदेव गाडगे, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, हेदुलीपाडा ता. त्र्यंबकेश्वर

000000

‘मराठवाडा मुक्तीसंग्राम-अमृत महोत्सवी वर्ष’सांगतानिमित्त होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

औरंगाबाद, दि :9 (जिमाका)- ‘मराठवाडा मुक्ती संग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज सर्व विभागांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ,पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्यासह ,जलसंधारण कृषी, शिक्षण , विविध विभागाचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रकल्पासाठी आवश्यक निधीची मागणी, तसेच विविध विभागातील वेगवेगळ्या कामासाठीचे प्रस्ताव याबाबत आढावा पालकमंत्री भुमरे यांनी घेतला. जिल्ह्यातील शिक्षण विभागाअंतर्गत शाळा खोल्या बांधकाम , कृषी, रस्ते विकास , पर्यटन, वैद्यकीय शिक्षण,  आरोग्य विभाग यांच्यामार्फतही काही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात आल्या. शासकीय दंत महाविद्यालय, पर्यटन, पोलीस स्टेशनसाठी, पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी प्रस्ताव, महापालिकेचे, भूमिगत गटार योजना,स्मशानभूमी, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, शहरात 5 प्रवेशद्वाराचे निर्मिती याबाबत मागणी प्रस्ताव,  जिल्हा परिषद अंतर्गत जलसंधारण आणि आरोग्य विभागाच्या आरोग्य विभागाच्या बळकटी करणासाठी, क्रीडा विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचा रिंगरोड उड्डाणपूल ,रस्ता अशा प्रस्तावांचा आढावा घेतला.

०००००

ताज्या बातम्या

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

0
पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील...

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय

0
मुंबई दि १६ – खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. या ऐतिहासिक यशाचे मानकरी असलेल्या विजेत्यांचे...

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

0
मुंबई, दि. १६:- 'भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा...

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या...

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण...