सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 1042

‘ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून नवीन पद्धती व तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांपर्यंत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २७ – दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन  शेतकऱ्यांसाठी एक नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह घेऊन येणारा कार्यक्रम असतो. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात व पद्धतीमध्ये होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन’ चा आज समारोप झाला. 24 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अमरावती मार्गावरील दाभा परिसरातील समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, अरुणाचल प्रदेशचे कृषी मंत्री तागे टाकी, उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्य प्रताप शाही,  खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री टेकचंद सावरकर, हरिष पिंपळे, दादाराव केचे, माजी खासदार विकास महात्मे आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

विषमुक्त शेती ही संकल्पना आता रुजायची गरज आहे. शासन स्तरावरून येत्या दोन वर्षात सुमारे ३५ लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे. यासोबतच जलसंधारणाच्या कामासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. 22 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कामे करण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी दोन ते तीन पीके घेणे शक्य झाले आहे. आता या योजनेचा दुसरा टप्पा हाती घेण्यात आला असून अवर्षणग्रस्त भागात जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांना नैसर्गिक अडचणीतून बाहेर काढण्यात सहाय्यभूत ठरण्यासाठी एक रुपयात पीक विमा देण्यात आला. एक कोटी 60 लाख खातेदारांनी पीक विमा काढला. हा देशातील एक विक्रम आहे. राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजनेची सुरुवात केली असून सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. पहिला हप्ता नुकताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत पहिल्या टप्प्यात जागतिक बँकेने 4 हजार कोटी रुपये दिले आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश करण्यात आला होता. आता दुस-या टप्प्यात सहा हजार कोटी रुपये मिळाले असून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचा या योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची वर्षभर दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी असते. त्यादृष्टीने शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. नागपुरात जागतिक दर्जाच्या ॲग्रो कन्वेंशन सेंटरसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येत्या काळात ॲग्रो व्हिजन प्रदर्शन या कन्व्हेन्शन सेंटर मध्ये घेता येईल. संत्र्याच्या निर्यातीवर बांगलादेशने  आकारलेल्या शुल्कामुळे निर्यातीवर परिणाम झाला आहे. लवकरच शासन स्तरावर निर्णय घेत शुल्कासंदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, असे शेवटी श्री. फडणवीस म्हणाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. इथेनॉलवर चालणारी वाहने बाजारात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच आमच्याकडे इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारसायकल आणि ऑटोरिक्षाही असतील. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी लवकरच इथेनॉल वेंडिंग पंप बसवणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल. तसेच इंधन आयात करण्यासाठी लागणारे 16 लाख कोटी वाचतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. त्याचप्रमाणे, वर्धा येथील एमएसएमई केंद्राने दीड लाख रुपयांचे मशिन विकसित केले आहे. ज्याद्वारे बांबूचे छोटे तुकडे करता येतात. याचा उपयोग ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाच्या जागी फीडस्टॉक म्हणून करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.२७ (जिमाका) : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक ३७७ मौजे पाचपाखाडी, चंदनवाडी, पाठक इस्टेट, ठाणे श्री.जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता सदनिकेच्या चाव्यांचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नरेश म्हस्के व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महानगर प्रदेश प्राधिकरण (MMR) चे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्याने ठाण्यातील गरजूंना लवकर घरे मिळतील. संपूर्ण एमएमआर क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासनाने लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले. शासनाची महत्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाण्यात सुरू करण्यात आली असून 10 हजार घरांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करीत आहोत. नियम-कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, हे शासन त्यासाठीच काम करीत आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे.


ते पुढे म्हणाले, श्री.जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या प्रकल्पात 400 घरे, 100 दुकाने आहेत. याशिवाय व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही आहेत. या उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची निगा राहणे, येथील परिसर स्वच्छ ठेवणे, ही येथील सर्वांची जबाबदारी आहे. वातावरण चांगले ठेवले की सर्वच चांगले होते. समरीन ग्रुप ने वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पाचे विकासक श्री. मुश्ताक शेख यांचे अभिनंदन करुन मुंबई-ठाणे शहरातील रखडलेल्या इतर प्रकल्पांचेही काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री. जगन्नाथ (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित,ठाणे या संस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकेच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले.

000

धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांच्या संस्कारानुसार जनतेचे भले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे दि.२७ (जिमाका) :- सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्यांचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत. दिघे साहेबांनी दिलेल्या संस्कारानुसार आपल्या हातून जनतेचे भले होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

धर्मवीर-२ या चित्रपटाच्या मुहूर्त शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, मुख्य कलाकार प्रसाद ओक, झी-24 चे मंगेश कुलकर्णी, धर्मवीर-2 चित्रपटाची निर्मिती टीम व कलाकार उपस्थित होते.


याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री महोदयांनी सर्वप्रथम धर्मवीर स्व.आनंद दिघे यांचे संपूर्ण जीवन जगासमोर आणणाऱ्या धर्मवीर १ व २ चे सर्व कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, तांत्रिक सदस्य, अशा सर्व टीमचे अभिनंदन केले. ते म्हणाले, धर्मवीर चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. धर्मवीर स्व.आनंद दिघे यांनी समाजातल्या सर्वस्तरातील घटकांचे कल्याण केले, ते सर्वांसाठी जगले, गोरगरिबांसाठी स्वतःचे आयुष्य झोकून दिले. त्यांच्याच संस्कारावर व शिकवणीवर आपले शासन काम करीत आहे. गेल्या वर्षभरात शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अद्ययावत कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले असून या माध्यमातून अनेक गरजूंना काम मिळणार आहे. समृद्धी महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळण्याच्या उद्देशाने “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राज्यात यशस्वीपणे राबविला. आजपर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून १ कोटी ८० लाख लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.


कोणतीही भूमिका साकारताना सर्वस्व अर्पण केल्यावरच यश मिळते, त्याप्रमाणे हे शासन सदैव गोरगरीब जनतेच्या कल्याणाचा विचार करीत काम करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांचे धन्यवाद मानले. सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आणि धर्मवीर स्व.दिघे साहेबांचे लोकसेवेचे कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांनी आवर्जून पाहावे, असे आवाहनही केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व त्यानंतर त्यांच्या हस्ते मुहूर्ताची पूजा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माता मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी प्रस्तावना करताना चित्रपटाची पार्श्वभूमी सांगितली. याप्रसंगी धर्मवीर स्व.आनंद दिघे यांची भूमिका साकारलेल्या श्री. प्रसाद ओक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

000

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ इंटरसेप्टर वाहने महामार्ग पोलिसांना हस्तांतरित

ठाणे दि. २७ (जिमाका) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्फे एकूण १५ इंटरसेप्टर वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज महामार्ग पोलिसांना  हस्तांतरित करण्यात आली.

येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर सर्व वाहने समृद्धी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

७०१ कि.मी लांबीपैकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समूद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता. इगतपुरी (६०० कि.मी.) वाहतूकीस खुला झाला आहे. हजारो वाहने समृद्वीचा प्रति दिन वापर करीत आहेत. समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणे तसेच अपघातांना आळा घालण्यासाठी  अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांनी १५ महामार्ग पोलिसांच्या केंद्राकरिता इंटरसेप्टर वाहन उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळांकडे केली होती. त्यानुषंगाने महामंडळाकडून १५ स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहने अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवी फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह-व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, सह – व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड व पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलीस पथक) अरविंद साळवे, नरेश म्हस्के व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

७०१ कि.मी लांबीपैकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर, ता इगतपुरी (६०० कि.मी) वाहतुकीस खुला आहे. आतापर्यंत अंदाजे  ५७ लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळ तत्पर असून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महामार्गावरील घटनांबाबत सेंट्रल कंट्रोल रुम स्थापित केले असून त्याद्वारे शीघ्र प्रतिसाद वाहने, १०८ रुग्णवाहिका, महामार्ग पोलीस, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ इत्यादींना अपघातांची / इतर घटनांची सूचना देण्यात येते. जेणेकरून घटनास्थळी जलदगतीने मदत पोहोचविणे सोयीचे होते. प्रवाशांना तातडीने मदत मिळण्याकरिता महामार्गावर हेल्पलाईन नंबरचे फलक लावण्यात आले आहेत.याशिवाय, समृद्धी महामार्गावर घटना व्यवस्थापन ( Incident Management) सुरळीत होण्याच्या अनुषंगाने स्टॅण्डर्ड आपरेटिंग प्रोसिजर ( SOP) तयार केलेली असून त्याचप्रमाणे घटना व्यवस्थापन प्रतिसाद प्रणाली मार्फत कामकाज पाहिले जाते.

याव्यतिरिक्त रहदारी व घटना नियंत्रणासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम ( ITS) महामार्गावर स्थापित केली जाणार आहे. महामार्गावरील चालकाचे लक्ष वेधण्यासाठी प्रति २५ कि.मी वर रम्बर्लस स्ट्रीप, जागोजागी वेगवेगळ्या रंगाचे झेंडे व विविध शिल्प उभारण्यात आले आहेत. तसेच पथकर नाक्यावर वेग मोजण्याचे भोंगे ( Hooters) लावण्यात आले असून त्यामुळे वेगमर्यादा ओलांडणारी वाहने ओळखून त्या चालकाचे प्रादेशिक परिवहन (RTO) विभागामार्फत समुपदेशन केले जाते.

महामार्गावर बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली असून वन्य प्राण्यांची व मोकाट जनावरांची ये – जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरिअरच्या बाजूने चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहने – २१, रुग्णवाहिका – २१, ई.पी.सी गस्त वाहने – १४, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्रे- १३, ३० टन क्षमतेची क्रेन – १३, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत – १४२ सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.

000

शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 27 (जिमाका) : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (1) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दि. 4 जून 2023 रोजी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचे रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असे वसतिगृह देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांना दिले होते. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण करून, सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून 90 दिवसात वसतिगृहाचे पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी वसतिगृहाचे कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात, तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

वसतिगृहाचे उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचे लोकार्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देवून या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. त्या मातांशी त्यांनी संवादही साधला.

याप्रसंगी, आयुक्त श्री. बांगर यांनी दोन्ही प्रकल्पांबाबत सादरीकरण केले. तसेच, विद्यार्थी प्रतिनिधींनी पत्र रुपाने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत आढळून येणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करुन शहरातील गर्भवती महिला, नवजात शिशू यांना उत्तम प्रतीच्या अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना’ सुरू केली आहे.या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

 १. या योजनेत प्रसुतीगृहांचे बळकटीकरण करुन दिवस-रात्र तातडीची सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविणे, जेणेकरुन माता मृत्यू दर कमी होणेस मदत होईल.

२. महानगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाव्यतिरिक्त कोपरी प्रसुतीगृह येथे 18 खाटांचे एसएनसीयू तयार करणे. यामुळे अर्भक मृत्यू दर कमी करणेस मदत होईल.

  1. गरोदर माता12आठवडयाच्या आतील नोंदी, अति जोखमीच्या मातांची विशेष काळजी, रक्तक्षय असणा-या मातांचा पुन: तपासणी इत्यादी करिता आशा स्वयंसेविकांसाठी अतिरिक्त कामावर आधारित मोबदला देणे.
  2. जोखमीच्या गरोदर मातांना पोषण आहाराकरिता अनुदान देऊन मातेची व बाळाची पोषण विषयक स्थिती सुधारणे.
  3. महापालिकेचे प्रसुतीगृह व रुग्णालयांमध्ये प्रसुत होणाऱ्या मातांना मातृत्व भेट म्हणून उपयोगी वस्तूंचे संकलन करुन एक किट देणे. सदर किटचा वापर प्रसुतीपश्चात मातेची व बाळाची काळजी घेण्यास होईल. याप्रमाणे एक वर्ष कालावधीसाठी एकूण10हजार प्रसूतींकरिता सदरचे किट मातृत्व भेट म्हणून देण्यात येईल.
  4. शहराच्या विशिष्ट प्रभागांमध्ये नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पुरुष स्वयंसेविकांना मोबदला अदा करणे.
  5. महापालिकेच्या कॉल सेंटरव्दारे गरोदर मातांना संपर्क करुन त्यांनी घ्यावयाची काळजी,औषधे,चाचण्या लसीकरण तसेच बालकांचे लसीकरण याबाबत माहिती उपलब्ध करुन देणे.

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृह राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात दिलेल्या भेटीत वसतिगृहाची दुरवस्था पाहून तेथील मुलांशी संवाद साधून सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. सद्य:स्थितीबाबत सर्व प्रशिक्षणार्थींनी वसतीगृह तसेच कॅन्टीनच्या समस्या त्यांच्याजवळ मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी निर्देश देवून अत्यंत चांगल्या दर्जाच्या सेवासुविधा निवासी डॉक्टरांना उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे नमूद केले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या सूचनेनुसार कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे असलेल्या वसतीगृहाच्या इमारत नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले आणि काम सुरू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत या वसतिगृहाचे पूर्ण रूप पालटून टाकण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 11 कोटी रुपये खर्च आला. वसतिगृहाचे काम सुरू करण्यापूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानुसार इमारतीतील कॉलम्स, बीम, स्लॅब आदीची डागडुजी सर्वोच्च दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. प्रत्येक खोलीत दोन बेडस्, फर्निचर, अभ्यास करण्यासाठी टेबल, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे वसतीगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये भरपूर उजेड येईल अशी रचना केली आहे. मोकळ्या जागेतील प्रकाश व्यवस्था, रुममधील फरशी, रंग याबाबतची निवड काळजीपूर्वक करण्यात आली आहे. त्यासोबत, या इमारतीच्या तळमजल्यावर उत्तम सुविधांनी युक्त व्यायामशाळा आणि अद्ययावत कॅन्टीन तयार करण्यात आले आहे.

000

श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली – उपराष्ट्रपती जगदीप धनखड    

मुंबई, दि. २७ : भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याणाच्या मार्गातून मानवतेची सेवा केली आहे. त्यांचे मुंबईत निर्माण करण्यात आलेले स्मारक लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यांनी आज येथे काढले.

भारतीय संत श्रीमद् राजचंद्रजी यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त श्रीमद् राजचंद्रजी मिशन, धरमपूरच्या वतीने आयोजित आत्मकल्याण पर्व कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते चर्नी रोड स्थानकाजवळील रॉयल ऑपेरा हाऊस जवळ उभारलेल्या श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण आणि मॅथ्यूज रोडचे नामकरण श्रीमद् राजचंद्रजी मार्ग असे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजी, मिशनचे अध्यक्ष अभय जसाणी, उपाध्यक्ष आत्मर्पीत नेमीजी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड यांना पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते ‘जनकल्याण हितैशी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उपराष्ट्रपती श्री. धनखड म्हणाले की, महात्मा गांधींचे अध्यात्मिक प्रेरणास्थान असलेले श्रीमद् राजचंद्रजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणे हे माझे भाग्य आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांचे कार्य श्रीमद् राजचंद्रजी मिशन व त्यांचे संस्थापक गुरुदेवश्री राकेशजी अविरतपणे चालवित आहेत. प्रत्येक सजीवासाठी ही पृथ्वी आहे. फक्त मानवासाठीच नाही, ही त्यांची शिकवण असून श्रीमद् राजचंद्रजी मिशनचे पशुवैद्यकीय दवाखाना हे मानवतेचे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या तीस वर्षांच्या आयुष्यात श्रीमद् राजचंद्रजी यांनी  आपल्या कार्यातून ठसा उमटवला. मुंबईतील स्मारक आणि मार्ग यामुळे राजचंद्रजी यांची आठवण देत राहील व लोकांना प्रेरणा देत राहिल. महात्मा गांधी व सध्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर श्रीमद् राजचंद्रजी यांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे.

महात्मा गांधी हे मागील शतकातील महापुरूष होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अंहिसेने इंग्रजापासून आपल्याला स्वातंत्र्य दिले. तर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळ्या प्रगतीपथावर नेऊन ठेवले, असेही उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी यावेळी सांगितले.

गुरुदेवश्री राकेशजी यांच्या आशीर्वादामुळे माझ्यात ऊर्जा निर्माण झाली असून त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे.  आज सामान्य माणूस भौतिक सुखाच्या शोधात आहे. तो अस्वस्थ, चिंतेत आहे. शिक्षण,समानता आणि चांगल्या वर्तणुकीतूनच देशात बदल होऊ शकतो. जनतेने आपले आचरण कायद्यानुसार केले तर संपूर्ण जगाला बदललेला भारत दिसेल. आपली संस्कृती वाढवून आपला देश अग्रस्थानी ठेवण्यावर भर द्यावा. आपल्या भारतीयत्वावर विश्वास ठेवावा, आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा भारतीय म्हणून अभिमान बाळगावा, असेही श्री. धनखड यांनी सांगितले.

संसदेच्या सभागृहात चर्चा व विचार विनिमय होण्याऐवजी गदारोळ व कटुता निर्माण होत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना संसद सदस्यांनी गुरुदेवश्री राकेशजी यांचे प्रवचन ऐकले तर त्याचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल असे श्री. धनखड यांनी सांगितले.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, संत श्रीमद् राजचंद्र हे एक यशस्वी उद्योजक होते. एकेकाळी त्यांनी संसाराचा त्याग केला आणि आत्मकल्याण हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. गुरुदेवश्री राकेशजी यांच्या माध्यमातून ‘श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर’ हे संत राजचंद्रजींनी दाखवलेल्या मार्गावर अखंडपणे चालत आहे, त्यासाठी मिशनचे सर्व सदस्य अभिनंदनास पात्र आहेत. ‘श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर’ आणि ‘श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर’ या संस्थांच्या मानवतावादी कार्यासाठी पुरस्कार मिळाले होते.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या वेळी संत जन्मले आणि अवतरले आणि इतर राज्यांतून स्थायिक झाले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, समर्थ रामदास, शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंगजी यांचे पवित्र वास्तव्यही या भूमीत होते. त्याचप्रमाणे श्रीमद राजचंद्रजी यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी याच मुंबई शहरात ‘शतावधन’ आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. याच शहरात त्यांची महात्मा गांधींची भेट झाली. श्रीमद राजचंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाचा महात्मा गांधींच्या जीवनावर नेहमीच प्रभाव पडला, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

श्री. बैस म्हणाले की, जैन तत्त्वज्ञानात सांगितलेल्या अध्यात्माच्या महान तत्त्वांनी जगभरातील लोकांच्या अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे. त्याच्या अहिंसेच्या चिरस्थायी वारशाने जीवन आणि निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आकारला आहे. आज जगाला शांततेची गरज असून मानवी जीवनातून शांतता दूर होत आहे. लोक तणावग्रस्त आहेत. समुदाय अस्वस्थ आहेत, राष्ट्रे युद्धात आहेत. आज वैयक्तिक पातळीवर, समाजात आणि राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. शाश्वत शांतीसाठी बंधुत्व व सेवेची भावना आवश्यक आहे. सेवेच्या भावनेनेच खरी शांती शक्य आहे. प्रेम, करुणा आणि सामायिकरण आणि सेवेच्या भावनेद्वारे शांतता प्राप्त करू शकतो. स्वातंत्र्याच्या अमृत काळात केवळ आत्मज्ञानच माणसाला अमरत्व आणि आत्मकल्याणाचा मार्ग दाखवू शकते, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रास्ताविकात मिशनचे अध्यक्ष अभय जसाणी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे सामाजिक अभियान हे मुंबई आणि महाराष्ट्रातील मानवतावादी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. यातून बहुसंख्य नागरिकांच्या जीवनात लाभ झाला असून त्यांनी उन्नती केली आहे. श्रीमद् राजचंद्र लव अँड केअर गेल्या दोन दशकांपासून देशातील ग्रामीण भागातील पीडित लोकांना विविध आरोग्य सुविधा मोफत पुरवत आहेत. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरच्या वतीने महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसेच उपराष्ट्रपतींचे मूळ गाव असलेल्या राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यामध्ये  दोन मोठ्या मोफत वैद्यकीय शिबिराची घोषणा करण्यात आली.

असे आहे स्मारक

‘श्रीमद् राजचंद्र स्मारक’ येथे श्रीमद् राजचंद्रजींच्या जीवनाला आदरांजली वाहणारी 70 फुटांहून अधिक भव्य भित्तीचित्रे आहेत. यामध्ये त्यांच्या जीवनतील महत्त्वाच्या घटना रेखाटल्या आहेत. स्मारकात खेळाचे क्षेत्र, रेखीय उद्यान, रिफ्लेक्सोलॉजी पथ, योग प्लाझा, बोटॅनिकल गार्डन, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्ये दर्शविणारी सार्वजनिक कला समाविष्ट आहे.

000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल’चे उद्घाटन

नागपूर, दि. 27 – ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टीव्हलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  दोन दिवसीय फेस्टीव्हल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत कानसेन मोजिदा होते. यावेळी ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख तथा ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ड्रॅगन पॅलेस टेम्पलला पुढच्या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विकास कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची जगभरात ओळख निर्माण होत असून अनेक सामाजिक  व विकास कार्य होत असल्याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

जपानच्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे यावेळी अभिनंदन करीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘फूड कोर्ट’ चा शुभारंभ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील ‘फूड कोर्ट’ चा शुभारंभ करण्यात आला परिसरात येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यामुळे परिसरात उपलब्ध होणार  आहेत.

प्रदूषणमुक्त व शाश्वत शहरांसाठी ‘सर्कुलर इकॉनॉमी पार्क’ची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २७ – प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्कुलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्कुलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आ. टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केदार वझे, मृणाल ठाकूर आदी उपस्थित होते.

नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थापनांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.

अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासनस्तरावरून दूर करीत आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. गेल्या दहा वर्षात नागपूरचा वेगाने विकास झाला आहे. मात्र, घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत व अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची आता क्रमवारी नव्हती ती सुधारण्यास आता मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. देशाच्या एकूण जीडीपी मध्ये 65 टक्के वाटा हा शहरांचा आहे. शहरांचे महत्त्व लक्षात घेता शहरे प्रदूषणमुक्त असावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध उपाययोजना, प्रकल्प शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

नागपुरासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रॉडक्ट तयार होणार असून, मनपाला रॉयल्टी प्राप्त होणार आहेत. प्रदूषणमुक्तीकडे नागपूरचे हे पाऊल असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

आ. कृष्णा खोपडे यांनीही यावेळी आपले विचार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. तर  उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मानले.

 

000

 

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत – पालकमंत्री अनिल पाटील

नंदुरबार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ (जिमाका वृत्त) – नंदुरबार जिल्ह्यात २६, २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

जिल्ह्यात २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अवकाळी पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व अनुषंगिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांचे तहसीलदार व तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका शासनाची नेहमिच राहीली आहे, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनीही संबंधित तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करून घेण्याचे आवाहनही पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

000

अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 27 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार  अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमंगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहाय्यक योगेश निरभवणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करावी. कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री  दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना अश्वासित केले.

000

ताज्या बातम्या

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
देयके अदा केल्याने १०२ क्रमांक रुग्णवाहिकांची सेवा सुरळीत - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. १४ : राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध...

बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत

0
नवी दिल्ली, दि.१४ : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री...

विधानसभा प्रश्नोत्तरे 

0
अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १४ : मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या...

विधानसभा इतर कामकाज/निवेदन

0
छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन मुंबई, दि. १४ : महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,...