सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 1041

बांधकाम कामगार पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन

मुंबई, दि. 29 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून भारतीय मजदूर संघ आणि कन्स्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, श्रमिकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ रोजी  शारदा मं‍दिर महाविद्यालय एच.जी.रोड जे. के. टॉवरजवळ ग्रामदेवी मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.                                                       

000

संध्या गरवारे/विसंअ/

मंत्रिमंडळ बैठक

अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार; सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

आज मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले.  पंचनामे  प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे औपचारिक निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे., पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील  ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील  केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे, बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.

000

राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान; शाळांचे मूल्यांकन करणार, पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा

शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या तसेच सर्व माध्यमांच्या शाळा या अभियानात सहभागी असतील.  बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ग-अ आणि वर्ग-ब महानगरपालिका शाळा, उर्वरित महाराष्ट्र अशा ३ स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.  यामध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येईल.  क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणे हे या अभियानाचे उदि्दष्ट राहील.  ४५ दिवसांमध्ये हे अभियान राबवायचे आहे.  या अभियानातील शाळांसाठी विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम यासाठी मिळून १०० गुण असतील.

शाळांचे मुल्यांकन करण्यासाठी महानगरपालिकांच्या स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील तर उर्वरित महाराष्ट्रासाठी केंद्र प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली मुल्यांकन समिती असेल.  याशिवाय तालुका, जिल्हास्तरांवर देखील गटविकास अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समित्या राहतील.  प्रत्येक विभागातून सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांची पहिल्या ३ क्रमांकासाठी निवड करण्यात येईल.  याकरिता शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती राहील.  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील तसेच अ व ब वर्ग पालिका क्षेत्रातील शाळांना पहिले पारितोषिक २१ लाख, दुसरे पारितोषिक ११ लाख, तिसरे पारितोषिक ७ लाख मिळेल.  तर उर्वरित महाराष्ट्रामधील शाळांना देखील तालुका,जिल्हा तसेच विभागनिहाय पारितोषिके मिळतील.

राज्यस्तरावर तसेच सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी पहिले पारितोषिक ५१ लाखाचे असून दुसरे पारितोषिक २१ लाख आणि तिसरे ११ लाखाचे असेल.  या अभियानासाठी २० कोटी ६३ लाख रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

000

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून ५०० कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या 30 कोटी इतकी शासन हमी देण्यात येते. या शासन हमीचा कालावधी ८ वर्षाचा राहील.

या महामंडळाकडून मुदतकर्ज तसेच डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज तसेच सुक्ष्म पतपुरवठा केला जातो.  या योजना केंद्राच्या निकषानुसार राबविण्यात येतात.  राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास एवं वित्त निगम, नवी दिल्ली यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी महामंडळास ३० कोटी इतकी शासन हमी राज्य शासनाने दिली आहे.  या हमी पोटी वित्त विभागास २ टक्के व्याज देण्यात येते.  महामंडळाने वित्त निगमकडून आतापर्यंत ११० कोटी ३४ लाख इतके कर्ज घेतले असून ८० कोटी ९५ लाख इतकी परतफेड केली आहे.

महामंडळाकडून लाभार्थीला ३० लाखापर्यंत कर्ज देण्यात येते.  आतापर्यंत या वर्षात २४५४ अर्ज प्राप्त झाले आहेत.  मात्र, महामंडळाकडील निधीच्या कमतरतेमुळे सरसकट सर्व लाभार्थींना ३ लाख २० हजार इतकेच कर्ज मंजूर करण्यात आले आहे.  त्यातून त्यांचे व्यवसाय सुरु करणे अशक्य आहे.  त्यामुळेच तत्कालीन वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या महामंडळासाठी पुरेशी तरतूद करण्याची घोषणा केली होती.

000

औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित सेवानिवृत्ती वेतन

औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित सेवानिवृत्ती वेतन व अन्य बाबी लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सर्वोच्च न्यायालयाने 19 मे 2023 रोजी आदेश देऊन या न्याचिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन देण्यास सांगितले होते.  1 जानेवारी 2016 पासून वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित निवृत्ती वेतन लागू करण्यात येईल.  या अधिकाऱ्यांना थकबाकी देण्यासाठी 4 कोटी 10 लाख 63 हजार 926 तर मासिक खर्चापोटी 6 लाख 49 हजार 810 इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

000

झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात झोपडीधारकांना मोठा दिलासा

झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या 1 लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारले जाते, आता ते 50 हजार रुपये घेतले जाईल.

झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका या गरीब झोपडीधारकांना विनामुल्य दिलेल्या असतात.  त्याचे हस्तांतरण करताना मुद्रांक शुल्कासमवेत १ लाख रुपये हस्तांतरण शुल्क आकारले जाते.  यामुळे सदनिका विकत घेणाऱ्याला आर्थिक भुर्दंड होतो.  मुंबईत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली होती.

000

राहाता, कोपरगाव येथील शेती महामंडळाची जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी

 

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील मौजे सावळीविहीर बु. व मौजे सावळीविहीर खु. आणि कोपरगाव तालुक्यातील मौजे चांदेकसारे येथील लक्ष्मीवाडी मळ्यातील शेती महामंडळाची 203.46 हे. आर जमीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याकरीता नवीन औद्योगिक वसाहत विकसित करण्याकरीता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास विनामुल्य हस्तांतरीत करावी किंवा प्रचलित मुल्यानुसार संपुर्ण रक्कम आकारण्यात यावी याबाबत महसूल मंत्री, उद्योग मंत्री आणि मुख्य सचिव हे निर्णय घेतील. तसेच  या औद्योगिक क्षेत्रास ग्रूप ड प्लस औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्याबाबत उद्योग विभागाने नियमातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

000

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

केवळ शासनमान्य मुद्रांक विक्रेत्यांकडून किंवा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेमार्फत विक्री केलेल्या कोणत्याही रकमेच्या मुद्रांक पेपरसाठी  ही सूट मिळेल.

1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील निष्पादित केलेले परंतु, नोंदणीस दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्ताबाबत महसूली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर  दंडामध्ये या अभय योजनेत सूट देण्यात येईल. ही अभय योजना 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा 2 टप्प्यात योजना राबविण्यात येईल.

000

खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणा कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 मधील कलम 28-1 अअ (3) अन्वये माजी पात्र खंडकऱ्यांना अथवा त्यांच्या कायदेशीर वारसांना वाटप करण्यात आलेल्या जमिनीचा भोगवटादार वर्ग-1 करण्यासाठी, राज्यशासनाला शेती महामंडळाकडील गावाच्या गावठाण हद्दीपासुन 5 किलोमिटरच्या परिसरातील जमिनीबाबत  शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक प्रयोजनासाठी विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

तसेच या अधिनियमाच्या कलम 29 च्या पहिल्या परंतुकामध्ये शर्तभंगासाठी  जमिनीच्या चालु बाजारदर मुल्याच्या 50% ऐवजी 75% रक्कम विनिर्दिष्ट करणे, कलम 27 खाली वाटप केलेल्या सिलिंग जमिनीकरीता वाटपाच्या 10 वर्षानंतर शर्तभंग असल्यास नियमानुकुल केल्यानंतर व रुपांतरण अधिमुल्य भरल्यानंतर वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे, तसेच अधिनियमातील शास्तीबाबतचे कलम 40अ व्यपगत करणे यासाठी सुधारणा करण्यात येईल.

000

महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड आणि यंत्रसामग्रींना भांडवली अनुदान देण्यासाठी समिती गठित

मुंबई, दि. 29 : एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे. महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेअंतर्गत महा(Maha-TUFS)  यंत्रसामग्री तसेच इतर सामग्रींना भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी  यंत्रसामग्री निश्चित करण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 28 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या समितीमध्ये सदस्य सचिव सहआयुक्त (तांत्रिक) वस्त्रोद्योगआयुक्तालय, नागपूर असून केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्तालयांचे प्रतिनिधी, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), मुंबई प्रतिनिधी,  वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे प्रतिनिधी, द सिंथेटिक ॲण्ड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशन संस्थेची प्रतिनिधी, दत्ताजीराव कदम तंत्रज्ञान शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी, बॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन संस्थेचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्यादित, मुंबईचे प्रतिनिधी यांची  सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या समितीची कार्यकक्षा अशी राहील :-

A-TUFS  व RR-TUFS अंतर्गत केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या यंत्रसामग्रींच्या यादीमधील यंत्रसामग्रींचा अभ्यास करुन सदर यंत्रसामुग्री महा टेक्नोलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेतंर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामग्रींना भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र यंत्रसामग्री अधिसूचित करण्यासाठी शासनास शिफारस करणे, केंद्र शासनाने A-TUFS व RR-TUFS अंतर्गत अधिसूचित केलेल्या यंत्रसामग्रींच्या यादीमध्ये समावेशित नसलेली परंतु यापूर्वी स्थापित असलेल्या (existing machinery) यंत्रसामग्रींचा अभ्यास करुन ही यंत्रसामुग्री महाटेक्नोलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेतंर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामग्रींना भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र यंत्रसामग्री अधिसूचित करण्यासाठी शासनास शिफारस करणे.

वस्त्रोद्योगाकरीता वेळोवेळी निर्मित होणारी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक यंत्रसामग्री निश्चित करून सदर यंत्रसामग्री महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेंतर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामुग्रींना भांडवली अनुदानाचा लाभ देण्यासाठी पात्र यंत्रसामुग्री अधिसूचित करण्यासाठी शासनास शिफारस करणे. विद्यमान वस्त्रोद्योग प्रकल्पांचे आधुनिकीकरण करताना धोरणाच्या शासन निर्णयात नमूद सर्व निकष तपासून प्राप्त प्रस्तावांचा प्रकल्प अहवाल (DPR) तपासून अंतिम मंजुरीसाठी शासनास शिफारस करणे, प्रत्येक वर्षी महाटेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेतंर्गत (Maha-TUFS) तसेच इतर यंत्रसामग्रींची यादी सुधारीत करून सदर यादी अंतिम करून Maha-TUFS अंतर्गत अधिसूचित करण्यासाठी शासनास शिफारस करणे. वस्त्रोद्योग घटकांना त्यांच्या प्रकल्पामध्ये लॅब मशीन वा इतर प्रायोगिक तत्वावरील यंत्रसामग्री स्थापित करण्यासाठी शिफारस करणे. या समितीची बैठक प्रत्येक महिन्यात किंवा आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येणार आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 29 : राज्यातील सफाई कामगारांच्या सुविधांसाठी राज्य शासनाने लाड-पागे समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत विविध संघटनांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनातील मागण्यानुसार  सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून सफाई कामगारांच्या विविध मागण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आज मंत्रालयात मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सफाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या लाड पागे समिती शिफारशींबाबत बैठक घेण्यात आली.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वारसा हक्काबाबत पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून एकत्रित नवीन शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने स्थगिती दिली आहे. सफाई कामगारांना लाड – पागे समितीच्या शिफारशीबाबत न्यायालयाच्या स्थगितीबाबत सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करून शासनाची बाजू मांडावी, अशा सूचना मंत्री देसाई यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. समन्वय समितीने आंदोलन करू नये, असे आवाहन मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केले.

या बैठकीस समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव र.शि.गोरवे तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी,समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

000

शैलजा पाटील/विसंअ/

रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयात आढावा

मुंबई, दि. २९ :- पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामास गती देण्यात यावी. त्याअनुषंगाने धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे ‘नौकावहनासाठी गाळ्याची उंची व रुंदी’साठीचे ना-हरकत प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाला आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाच्या कामकाजाचा आढावा मंत्रालयातील त्यांच्या दालनात घेतला. बैठकीस खासदार सुनील तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, गृह (बंदरे) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड उपस्थित होते.

रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला गती देण्यासंदर्भात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या महामार्गाचे काम गेल्या चार दशकांहून अधिक काळ रखडले आहे. महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी मार्च २०२२ मध्ये प्रकल्पाच्या अंतिम आखणीस शासनस्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेवस ते कारंजा खाडीदरम्यानच्या धरमतर खाडीपुलासाठी ३ हजार ५७ कोटींच्या अंदाजित खर्चाच्या बांधकामास देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, मेरिटाईम बोर्डामार्फत नौकावहनासाठी आवश्यक असणाऱ्या गाळ्याची उंची व रुंदीसाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र प्रलंबित असल्याने या पुलाच्या निविदेबाबतची पुढील कार्यवाही करता आली नाही. त्यामुळे धरमतर आणि बाणकोट खाडीवरील पुलाचे काम तात्काळ सुरु होण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने आवश्यक बाबींची पूर्तता करून गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

महाराष्ट्राला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला असून या किनारपट्टीवर १४ छोटी बंदरे व २ प्रमुख बंदरे आहेत. पर्यटन विकासासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी रेवस ते रेड्डी महामार्गाची नव्याने आखणी करण्याचे ठरले आहे. त्यानुसार सर्व्हेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

पुणे, दि.29 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.

000

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

मुंबई, दि. २९ : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसून ३ हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्यात येईल, यासाठी महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प्रशासनाने युद्ध स्तरावर काम करावे अशा सूचना दिल्या.

आज मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाने राज्यातील पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत सादरीकरण केले.  पंचनामे  प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी, असे औपचारिक निर्देश महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन) विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना कालच दिल्याची मंत्रिमंडळाने नोंद घेतली. राज्यातील बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्याकरिता निधी मागणीचे प्रस्ताव सर्व जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेऊन निधी वितरित करण्याचे एकत्रित प्रस्तावावर विभागाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मंत्रिमंडळाने यावेळी दिले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे., पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील  ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे., छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील  केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे,

जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे, बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.

मुंबई पोलिसांसह त्यांच्या कुटुंबासाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग

मुंबई,दि.२९: मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता ‘प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजने’च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे येत्या १ डिसेंबर रोजी ताडदेव येथे सकाळी १०.३० आणि वरळी येथे सकाळी ११.३० वाजता कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी माध्यमातून बृहन्मुंबई मधील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल. आयटी, गारमेंट, ब्युटी ॲण्ड वेलनेस, ऑटोमोटिव्ह ॲण्ड फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. यामध्ये पोलिस आणि पोलिसांच्या कुटुंबातील सदस्य याचा लाभ घेऊ शकतील. किमान ३०० तास ते कमाल ५०० तासांचे कौशल्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील. वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील महिला, पुरुष आपल्या आधार ओळखपत्राच्या आधारे प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतील. या प्रशिक्षणासाठी एन.आय.सी च्या माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने प्रशिक्षणार्थींची हजेरी घेण्यात येणार आहे. यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारास सरकारतर्फे (NSQF) एनएसक्यूएफ स्टॅण्डर्डचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थीला रोजगार संधी, शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध असतील. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयंरोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईल, सरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यावयाचे याचे देखील मार्गदर्शन प्रशिक्षणादरम्यान करण्यात येईल.

१ डिसेंबर रोजी ताडदेव पोलीस वसाहत मैदान, वसंतराव नाईक मार्ग, ताडदेव मुंबई येथे सकाळी १०.३० वाजता आणि मुंबई पोलीस कौन्सिलिंग ॲण्ड प्लेसमेंट सेंटर एल विभाग ३, वरळी येथे सकाळी ११.३० वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन होईल. या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, आयुक्त डॉ.रामास्वामी एन., सशस्त्र पोलीस दलाच्या अपर पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह, पोलिस सह आयुक्त एस.जयकुमार, मुख्यालयाच्या पोलीस उपआयुक्त डॉ. महेश्वर रेड्डी या उपस्थित राहतील.

००००

संध्या गरवारे/विसंअ

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार

मुंबई दि. २९ :- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.

विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी  नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.

 

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध विभागाचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत घेणार आहे. हिवाळी अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या (शनिवार व रविवार मिळून) ४ दिवस आहेत.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

 

नागपूर विधिमंडळ व्यवस्थेची आवश्यक काळजी घ्या – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. 28 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून आवश्यक ती सर्व काळजी घ्या, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिल्या.

विधानभवनातील सभागृहात आज विधिमंडळ व्यवस्थेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे मुंबई येथून दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. त्यांनी गेल्यावर्षी आलेल्या काही अडचणींचा उहापोह केला व यावर्षी वीज पुरवठा, सुरक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यागतांना प्रवेश याकडे विशेषलक्ष देण्याच्या सूचना केल्या.

विधिमंडळाचे सचिव विलास आठवले, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार यांच्यासह विविध २२ विभागांचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

व्यवस्थेसंदर्भातील मॅाक ड्रिल ४ डिसेंबरला होणार आहे. फायर ऑडिटचा अंतिम अहवाल ५ डिसेंबर पर्यंत तयार करा, विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्थानिक नागरिकांना वाहतूक व्यवस्था व मोर्चाची अडचण व गैरसोय होवू नये याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली.

या अधिवेशनामध्ये आरोग्य व्यवस्थेत नवे बदल करण्यात आले आहेत. या अधिवेशनाच्या कामकाजाचा व पूरक व्यवस्थेचा डोलारा 8 हजारांवर कर्मचारी विविध आघाड्यांवर सांभाळणार आहेत. त्यामुळे लोक प्रतिनिधींसोबतच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेत यावर्षी मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. या अंतर्गत पोलिसांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या तपासणीची सर्व सोय करण्यात आली आहे. १९२१ पासून विधिमंडळाचे कामकाज सुरू झाले असून ही शतकोत्तर वाटचाल आहे. याचे औचित्य साधत यावर्षी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विधानभवनाची सुरक्षाव्यवस्था चोखबंद ठेवण्यासाठी यावर्षी दिवसाला केवळ  12 तासांची प्रवेशिका देण्यात येणार आहे. माध्यम प्रतिनिधींची वाढती संख्या लक्षात घेऊन सभागृहाचे कामकाज लाईव्ह बघण्याची व्यवस्था गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात येणार आहे. प्रवेशिकांशिवाय विधानभवन परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

जागो- जागी पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, मोबाईल टॅायलेट अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील पेट्रोल पंपावरील सर्व टॅायलेट याकाळात स्वेच्छेने उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. मागील हिवाळी अधिवेशन कालावधी प्रमाणेच यावर्षी महिला लोकप्रतिनिधींसाठी बालसंगोपनाकरिता हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी यावर्षी पासून विधानभवन परिसरात असा हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे.

कामकाज सल्लागार समितीची उद्या दुपारी १२ वाजता विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे.

ताज्या बातम्या

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ जनसहभागासाठी राज्य शासनाचे विशेष अभियान

0
मुंबई, दि. १४ : विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान देण्यासाठी https://wa.link/o९३s९m किंवा https://vikasitmaharashtra.civis.vote/consultations/1245 या लिंकवर यावर आपले मत दि.17 जुलै 2025 पर्यंत नोंदवावे, असे आवाहन...

लोहटा-पूर्व गावास महसुली दर्जा देण्याची कार्यवाही महिनाभरात पूर्ण करा –  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि.१४ : धाराशिव, उल्हासनगर, मुंबई उपनगर या ठिकाणांशी संबंधित विविध महसूल विषयांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली....

महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’

0
मुंबई, दि. १४ : हिंगोली जिल्ह्यातील 'संजीवनी अभियान' हे आरोग्यविषयक नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असून कर्करोगावरील लढ्यात एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. हिंगोलीचे...

बालगृहातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांमध्ये अतिदक्षता बाळगून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष यंत्रणा...

दिवंगत संजय देशमुख यांना मंत्रालयात श्रद्धांजली

0
मुंबई, दि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय 55 वर्षे) यांचे...