बुधवार, जुलै 9, 2025
Home Blog Page 1023

वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी करावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

समाजात अवयवदानासाठी जनजागृती करण्याची गरज

नागपूर दि. 1: माफक दरातील सुलभ वैद्यकीय उपचार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असून कोविडसारख्या महामारीने मजबूत आरोग्य यंत्रणेची गरज अधोरेखित केली आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवा क्षेत्रात देशाला अग्रणी बनविण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करुन जागतिकस्तरावर नाविन्यपूर्णतेचे केंद्र म्हणून देशाची ओळख प्रस्थापित करावी, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित  होते.

 

नव्या आधुनिक तंत्रज्ञानासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रात नवे परिवर्तन घडविण्याची गरज प्रतिपादित करुन राष्ट्रपती म्हणाल्या की, वैश्विक स्तरावर सर्वांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचे ध्येय साध्य करण्यात डॉक्टरांची अपुरी संख्या हे एक महत्वाचे कारण आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा लाभ प्राप्त होण्यात असमानता निर्माण झाली आहे. ती दूर व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून जिल्हा रुग्णालय संलग्नित वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यास मदत केली जात आहे. यामुळे प्रादेशिक असमतोल आणि शहरी-ग्रामीण दरी  कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्य सेवांच्या विकासासोबतच त्या परवडणाऱ्या असाव्यात, या उद्देशाने जगात सर्वात मोठी असणारी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून आरोग्य विषयक दस्तावेजांचे डिजिटायझेशन करण्याचे सरकारचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा अधिक गुणवत्तापूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अवयवदानाबाबत समाजात पुरेशी जागरुकता नसल्याने गरजू रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, त्यासोबतच अवैधरित्या अवयव विक्रीचे  प्रकारही घडत असल्याबाबत खंत व्यक्त करुन वैद्यकीय क्षेत्राने अवयवदानासाठी जनजागृती करावी तसेच मानसिक आरोग्याच्या समस्येचाही सहानूभूतीने विचार करावा असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

मध्य भारतात गेल्या 75 वर्षांपासून वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची त्यांनी विशेष प्रशंसा केली. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणाऱ्या वैद्यकांची मोठी फळी निर्माण केल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या नुतनीकरणासाठी शासनाने भरीव निधी दिल्याबद्दल समाधान व्यक्त करुन श्री. गडकरी म्हणाले की, नव्या सुविधांनी सुसज्ज होणारे हे रुग्णालय व महाविद्यालय वाढती गरज भागवू शकणार आहे. या महाविद्यालयाने नागपूरसह लगतच्या राज्यातही उल्लेखनीय वैद्यकीय सेवा दिली असून विशेषत: कोविडकाळातील योगदान प्रशंसनीय आहे. पूर्व विदर्भात सिकलसेल, थॅलेसेमियाचे रुग्ण लक्षणीय संख्येने आढळून येतात. अमृत महोत्सवाचे औचित्य साधत लवकरच बोन मॅरो विषयक उपचार सुविधेची सुरुवात होणार आहे.

स्थापनेवेळी आशियातील सर्वात मोठे वैद्यकीय महाविद्यालय अशी ओळख असणाऱ्या या संस्थेने प्रारंभापासूनच सेवाभाव जपत असंख्य रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. ही देशातील एक महत्वाची वैद्यकीय संस्था असून अनेक विख्यात तज्ज्ञ या संस्थेने दिल्याचा विशेष उल्लेख करुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  महाविद्यालयाच्या सुविधांमध्ये काळानुरूप बदलाची गरज होती. यासाठी अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाविद्यालयाला नवे स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी शासनाकडून ५५० कोटींचा निधी देण्यात आला असून लवकरच कायापालट होणार आहे. एक अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून त्यास नवे रुप मिळणार आहे. त्याअंतर्गत  शस्त्रक्रिया कक्ष, अद्ययावत यंत्र सामग्री,  वसतिगृह, नवीन इमारती, क्रीडांगण, कॅन्सर इन्स्टिट्यूट आदींची उपलब्धतता होणार असून पुढील ५० वर्षांची गरज या निमित्ताने पूर्ण होणार आहे. सर्वसामान्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यात या संस्थेचे योगदान मोलाचे ठरणार आहे. आयजीएमसीसाठीही ४०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्यात दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती देऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, निवासी वैद्यकीय अधिका-यांची १ हजार ४३२ पदांची पदभरती होणार आहे. या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.  नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यासोबतच नवीन  प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयांसाठी  आशियाई विकास बँकेमार्फत चार हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बी.एसस्सी नर्सिग आभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. नर्सिंग, तांत्रिक, अतांत्रिक संवर्गातील  5  हजार 182 पदांची भरती प्रकिया पूर्ण झाली असून लवकरच नियुक्तीपत्र देण्यात  येणार असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, महाविद्यालयांशी संबधित चार मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  या महाविद्यालयातून उत्तीर्ण पहिल्या तुकडीचे विद्यार्थी डॉ. बी. जे. सुभेदार, महाविद्यालयासाठी जमीन दान करणारे कर्नल डॅा. कुकडे यांचे नातू ॲड. दिनकर कुकडे आणि या महाविद्यालयाला मदत करणाऱ्या डॉ. शकुंतला गोखले यांचे नातेवाईक रवी लिमये व डॉ. प्रमोद गिरी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. नवनिर्मित सभागृहाचे डिजिटल पद्धतीने उद्घाटनही करण्यात आले. विशेष डाक तिकिटाचे अनावरण करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते स्मरणिका आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिष्ठाता डॅा. राज गजभिये यांनी केले.

00000

मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनासह संवर्धनाबाबत इंडियन ओशन टुना कमिशनमध्ये होणार चर्चा

मुंबई, दि. 01- टुना मत्स्यपालन क्षेत्रात सुधारित आणि सुयोग्य व्यवस्थापनाची गरज आहे. याशिवाय, मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी विविध देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज हिंद महासागर टुना आयोगाच्या (इंडियन ओशन टुना कमिशन) मुंबई येथे आयोजित बैठकीत व्यक्त करण्यात आली. या परिषदेत सहभागी असलेल्या विविध देशांच्या मान्यवरांनी आज भाऊचा धक्का, मुंबई येथे व तेथील मासळी बाजारास भेट दिली. दरम्यान, आयोगाच्या मुख्य वैज्ञानिक समितीची बैठक हॉटेल सेंट रेजिस येथे 4 ते 8 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.  केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला तसेच राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी सुरुवात होणार आहे. ट्युना आणि शाश्वत व्यवस्थापनाशी संबंधित वैज्ञानिक शिफारसींसंदर्भात यामध्ये चर्चा होणार आहे.

केंद्र शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग आणि राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने 28 नोव्हेंबरपासून इंडियन ओशन टुना कमिशनच्या 19 व्या डाटा संकलन आणि सांख्यिकी बाबतच्या कार्यकारी समितीच्या बैठकीस सुरुवात झाली. केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहसचिव नितुकुमारी प्रसाद, केंद्रीय मत्स्यव्यवसाय उपायुक्त संजय पांडे, राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, सहआयुक्त महेश देवरे यावेळी उपस्थित होते.

जगभरातील टुना मत्स्यपालन क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना एकत्र आणणारी ही आंतरराष्ट्रीयस्तरावरील आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक आहे. ट्युना आणि इतर मोठ्या पेलाजिक प्रजाती, जसे की बिलफिश, शार्क आणि रेस यांचे मत्स्यव्यवसायात आर्थिकदृष्ट्या महत्व आहे.  यात टुनाचा मोठा वाटा आहे. या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्याप्तीसाठी बहुराष्ट्रीय मत्स्यव्यवसायाद्वारे अति मासेमारी करण्याची त्यांची संवेदनशीलता लक्षात घेता, सुधारित व्यवस्थापन आणि मत्स्यव्यवसाय संवर्धनासाठी सर्व राष्ट्रांच्या सहयोगी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी विविध मान्यवरांनी व्यक्त केले.

या बैठकीकरिता इंडोनेशिया, फ्रान्स, स्पेन, युरोपियन युनियन  देश, सेशेल्स, टांझानिया, इराण, थायलंड, जपान, श्रीलंका, ओमान आणि भारत या देशांतील प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय, इतर विविध देशांतील अनेक प्रतिनिधी आणि वैज्ञानिक संस्था दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे देखील बैठकीला उपस्थित आहेत.

मत्स्यव्यवसाया संदर्भातशास्त्रज्ञ विविध देशांनी केलेला डेटा संकलन, आणि आयोगाला अहवाल देण्यासाठी अवलंबलेल्या विद्यमान वैज्ञानिक पद्धतींवर विचारमंथन आणि विश्लेषण करत आहेत आणि हिंद महासागर क्षेत्रातील डेटा/माहिती संकलन आणि आकडेवारीच्या प्रगत आणि सरलीकृत पद्धती तयार करणार आहेत.

आजच्या बैठकीनंतर प्रतिनिधींच्या भाऊचा धक्का, मुंबई येथे व तेथील मासळी बाजारास भेटीचे नियोजन सहआयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय माने, मत्स्य व्यवसायविकास अधिकारी अशोक जावळे यांच्यासह नीरज चासकर, रवी बादावार, निखिल नागोठकर, दीपाली बांदकर, सागर कुवेस्कर यांनी भरीव प्रयत्न केले आहेत. या भेटी दरम्यान मान्यवरांनी तेथील नौकांची पाहणी केली तसेच टुना/ कुपा हा मासा किती प्रमाणात बाजारात येतो. त्याची मासेमारी याची पाहणी केली. भाऊच्या धक्क्यालगत उभ्या असलेल्या बोटींची आणि शाश्वत पद्धतीने मासेमारी बाबत माहिती घेतली. भाऊच्या धक्क्यालगत लिलाव सभागृह, मासेविक्री बाजार व्यवस्था, इंधन पुरवठा याचे व्यवस्थापन याची पाहणी करुन त्यांनी सूचनाही केल्या. नौका मासेमारी करुन आल्यानंतर मासे उतरविताना नौकांमधील ठराविक अंतर हे अत्यंत शिस्तबद्ध असल्याचे मान्यवरांनी सांगून मुंबईतील मच्छीमारांच्या सांधिक समन्वयाबद्दल अभिनंदन केले. भाऊचा धक्का सीफूड सप्लायर्स असोसिएशनचे सचिव फैजल अल्वारे यांना त्यांचे कामकाज कसे चालते याबाबत सखोल माहिती विचारण्यात आली. तसेच पाहणी दरम्यान महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल इमॅन्यूअल चॅसॉट, सेशेल्स यांनी विशेष उल्लेख केला.

000

दीपक चव्हाण/विसंअ

मुंबईत ९ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद – कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,  पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत दि. 9 जानेवारी, 2024 रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच उद्योग क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शन करणार आहेत.

श्री.पटेल यावेळी म्हणाले की, राज्य शासन पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आपली भूमिका ठामपणे निभावत असताना आता पुढील काळात खासगी  क्षेत्रातील अग्रणी उद्योगांनी देखील पुढे येऊन बांबू लागवड आणि वापर यातील संधीकडे लक्ष देऊन देशाच्या शाश्वत विकासात शासनाच्या बरोबरीने आपला वाटा उचलणे गरजेचे आहे. यासंदर्भात खासगी आणि सरकारी संस्था, तसेच पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना बांबू वृक्ष लागवड आणि वापर यात असलेल्या संधीबाबत अवगत करण्यासाठी या परिषदेचा उपयोग होणार आहे .

जागतिक औद्योगिक क्रांतीमुळे मागील शतकात वाढलेले कार्बन उत्सर्जन, त्यामुळे झालेला हवामान बदल आणि त्या अनुषंगाने पृथ्वीवर येणारी संकटे ही मागील काही वर्षात आपण अनुभवत आलो आहोत. मानवी जीवनात जरी ती नित्याची बाब मानली जात असली तरी याकडे वेळीच लक्ष न दिल्यास पुढील दोन-तीन दशकांत संपूर्ण मानवजातीचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. याची प्रचिती आपल्याला मागील काही महिन्यात आली आहे. मग ती नागपूर मधील ढगफुटी असो, दुबई किंवा न्यूयॉर्क मधील प्रलय किंवा उत्तराखंड मधील भूस्खलन. लिबिया या देशात तर  एरवी 18 महिन्यांत पडणारा पाऊस केवळ दोन तासांत पडल्यामुळे सव्वा लाख लोकवस्तीचे शहर वाहून गेल्याचे दिसून आले आहे. मागील दशक आणि यावर्षीचा जुलै मानवजातीच्या इतिहासातील अनुक्रमे सर्वात उष्ण दशक आणि उष्ण महिना म्हणून गणले गेले आहेत.

इंटरगव्हर्मेनटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या अलीकडील अहवालानुसार सन २०५० पर्यंत वाढत्या तापमानामुळे समुद्रातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल आणि त्यामुळे किनारपट्टीवरील शहरांचे अस्तित्व धोक्यात येईल. हवेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ४५० पीपीएम पेक्षा जास्त झाल्यास पृथ्वीवर महाविनाश संभवतो. आज हे प्रमाण सन १७५० मधील २८०पीपीएम वरुण ४२२पीपीएम वर आले आहे.

यापासून पृथ्वीचे आणि पर्यायाने मानवजातीचे संरक्षण करण्यासाठी आता आणीबाणीचे उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. अलीकडील काही काळात पवनऊर्जा, सौरऊर्जा, इथेनॉल आणि तत्सम स्वच्छ इंधनांच्या वापरास चालना देऊन केंद्र आणि राज्य शासनाने या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु  केले आहेत. परंतु समस्येची गंभीरता लक्षात घेतल्यास ते अपुरे पडत आहेत. वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करायचे, तर प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड हा एकच शाश्वत उपाय ठरू शकतो. यासाठी लागणारी जमीन शहरांमध्ये उपलब्ध होणे शक्य नसल्याने त्यासाठी ग्रामीण भागावर लक्ष देणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन राज्यशासनाने या समस्येवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी व्यापक आणि महत्वाकांक्षी अशी बांबू -लागवड योजना आणली आहे. अतिशय शीघ्र गतीने वाढ होणाऱ्या झाडापैकी बांबू या झाडाची निवड करून त्याची १० लाख हेक्टरवर लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पर्यावरण संरक्षणाबरोबरच या योजनेमुळे अनेक सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य होणार आहेत. देशात बहुसंख्येने असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेल्या या योजनेमध्ये बांबू रोप लागवडीसाठी प्रतिहेक्टर ७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत असून पाण्यासाठी विहीर पाडल्यास त्यावर अनुदानापोटी ४ लाख रुपये अधिक मिळतील. बांबूच्या विक्रीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढणार आहे. त्यामुळे ‘मनरेगा’ अंतर्गत राज्यात होणारी ही बांबू लागवड योजना संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरणार आहे.

या योजनेसाठी बांबूची लागवड करण्याचे कारण म्हणजे बांबू तीन वर्षात उत्पन्न देण्यास सुरवात करतो. व ५० ते १०० वर्षापर्यंत हमखास उत्पन्न देते.  बांबू हे झाड इतर झाडापेक्षा अधिक प्राणवायू निर्मिती होते. परंतु याहून सर्वात महत्वाचे म्हणजे बांबूमध्ये शाश्वत आर्थिक विकासात महत्वाची भूमिका पार पडण्याची क्षमता सर्वाधिक आहे. अशावेळी केवळ बांबू मध्येच हा बायोमास मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची क्षमता असल्याचे दिसून आले आहे. तसेच बांबूपासून ईथेनॉल तयार करणे देखील शक्य झाले असून त्यासाठी केंद्र शासनाने नेदरलँड आणि फिनलंड च्या सहकार्याने आसाममध्ये नुमालिगढ येथे रिफाईनरीचे लोकार्पण लवकर होणार असल्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी यावेळी सांगितले.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतीच्या बांधावर जाऊन केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकाची शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु येथील रुस्तुमराव शिंदे यांच्या शेतावर जाऊन  अवकाळी  पावसामुळे नुकसान झालेल्या कापूस या पिकाची पाहणी केली. हिंगोली तालुक्यातील भिरडा येथील धोडींबा श्रावण खंदारे यांच्या कापूस व साहेबराव श्रावण खंदारे यांच्या तूर पिकाची तसेच कानरखेडा बु. येथील विठ्ठल रामजी भालेराव यांच्या कापूस पिकांची पाहणी केली.

या पीक पाहणीवेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांच्यासह हिवरा जाटू येथे तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, तालुका कृषि अधिकारी सांगळे यांच्यासह  संबंधित गावातील सरपंच, विविध गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोजेगाव येथील मयत शेतकरी राजू जायभाये यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन

तातडीची मदत म्हणून दिला चार लाख रुपयाचा धनादेश

औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे रविवारच्या मध्यरात्री वीज अंगावर पडून तरुण शेतकरी राजू जायभाये  यांच्या घरी जाऊन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची पत्नी दुर्गा राजेंद्र जायभाये यांच्याकडे नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदानाचा चार लाखाचा धनादेश दिला व शासन आपल्या कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आपल्या कुटुंबाला शासनाच्या ज्या ज्या योजनाचा लाभ मिळवून देता येईल त्या त्या योजनाचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सांगून मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचित केले. तसेच मयत राजू जायभाये यांची पत्नी दुर्गा जायभाये, आई सुशीला जायभाये, अपंग भाऊ जालिंधर जायभाये यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तालुका कृषी अधिकारी गजानन पवार, गोजेगाव सरपंच वर्षा अच्चुतराव नागरे, हिवरा जाटू या गावचे संरपंच लखन शिंदे यांच्यासह  शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३५ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. १ : राज्य शासनामार्फत ९.३५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची दि. ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १ जानेवारी, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १ जानेवारी, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँक शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे,  त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ९.३५ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे  सचिव  (वित्तीय सुधारणा) शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

एअर मार्शल मकरंद रानडे निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे नवे महासंचालक

नवी दिल्ली, 01: भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

एअर मार्शल श्री.रानडे यांनी 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलात लढाऊ विभागातून शासकीय सेवेला सुरुवात केली. त्यांनी  36 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या काम केले आहे. लढाऊ विमानांच्या तुकडीचे आणि दोन हवाई स्थानकांचे कमांड म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. रणनीती आणि हवाई लढा प्रशिक्षण विकास संस्था आणि संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांची कारकीर्द राहिली आहे. काबूल आणि अफगाणिस्तानच्या भारतीय दूतावासांमध्ये त्यांनी एअर अट्टॅचे म्हणून कर्तव्य निभावले आहे.

हवाई दलाच्या मुख्यालयात त्यांनी संचालक, कार्मिक अधिकारी, हवाई दल कर्मचारी निरीक्षण संचालनालयाचे मुख्य संचालक आणि हवाई दल कार्यकारी (अवकाश) विभागाचे सहाय्यक प्रमुख या पदांवर कार्यरत राहिले आहे. या नियुक्तीपूर्वी ते नवी दिल्ली येथील पश्चिम एअर कमांडच्या मुख्यालयात वरिष्ठ कर्मचारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

एअर मार्शल श्री. रानडे यांना वर्ष 2006 मध्ये वायु सेना (शौर्य) पदक आणि वर्ष 2020 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले होते. एअर मार्शल संजीव कपूर यांचा हवाई दल सेवाकार्याचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण झाल्यानंतर एअर मार्शल श्री. रानडे यांनी त्यांच्याकडून महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे.

0000

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार

मुंबई, दि. 1 (रानिआ) : ग्रामपंचायत निवडणुकांतील सर्व उमेदवार ट्रू व्होटर ॲपबरोबरच आता पारंपरिक पद्धतीनेदेखील (ऑफलाइन) निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करू शकतात, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांचा निकाल 6 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक आहे. नक्षलग्रस्त/ दुर्गम भागात मात्र 7 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे तेथील बिनविरोध विजयी झालेल्यांसह निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी 7 डिसेंबर 2023 पर्यंत निवडणूक खर्च सादर करणे आवश्यक आहे.

सर्व उमेदवारांना ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते; परंतु त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले होते. त्यामुळे आता ज्यांना ट्रू व्होटर ॲपद्वारे निवडणूक दाखल करणे शक्य नाही, त्यांना पारंपरिक (ऑफलाइन) पद्धतीने देखील निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करता येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

०-०-०

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपतींची राजभवनात घेतली भेट

नागपूर दि. 1 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे आज भेट घेतली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवी सोहळ्यावरून परत आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राजभवनात पोहोचल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री नागपूर येथे आल्यानंतर विमानतळावरून थेट राजभवनात पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲण्ड‌. आशिष जायस्वाल उपस्थित होते.

0000

विद्यार्थ्यांमध्ये कायम संशोधन वृत्ती असावी – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 01 : आजचे युग हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुसंधानचे आहे. आजही विद्यार्थ्यांमधील न्यूटन जागा होणे आवश्यक आहे. एखाद्या घटनेचे विश्लेषण करून त्यामागचे शास्त्रीय कारण शोधण्याची प्रवृत्ती वाढली तरच विद्यार्थ्यांचा प्रवास भविष्यात संशोधक म्हणून होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती कायम जागृत असली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बामणी (ता. बल्लारपूर) येथील सेंट पॉल हायस्कूल येथे आयोजित 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,उपविभागीय अधिकारी स्नेहल राहाटे, बल्लारपूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप, गटविकास अधिकारी अनिरुध्द वाळके,संस्थेचे अध्यक्ष अविनाश खैरे, निना खैरे, गटशिक्षणाधिकारी शरद बोरीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मेनका भंडूला, काशिनाथ सिंह आदी उपस्थित होते.

शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांच्या डोक्यात येणा-या नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे, हा या प्रदर्शनीच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या डोक्यात अभ्यासक्रमासोबतच प्रश्नांची निर्मिती कायम होत राहिली पाहिजे. विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी व्हावा. विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आयुष्यात निर्भय व्हावे. त्यासाठी अभ्यास व मेहनत दोन्ही करून आयुष्य सार्थकी लावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शरद बोरीकर यांनी तर संचालन सरोज चांदेकर यांनी केले. यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदर्शनीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक कलाकृती बघितल्या व त्यांच्याशी संवाद साधला.

जय जवानजय किसानजय विज्ञानजय अनुसंधान’ : भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला होता. त्यानंतर श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ हा नारा दिला. तर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’ हा नारा दिला आहे.

भारत कोव्हीड व्हॅक्सीन निर्यातदार देश : कोरोनाच्या काळात भारतामध्ये संशोधन करण्यात आलेली व्हॅक्सिन जगातील जवळपास 50 देशांनी वापरली. तर व्हॅक्सिन प्रमाणपत्र देण्याचे भारताचे सॉफ्टवेअर ब्रिटनने वापरले. या काळात भारत हा इतर देशांसाठी व्हॅक्सिन निर्यातदार देश म्हणून जगात नावारुपास आला.

मुल्यमापन हे धनावर नाही तर गुणांवर : घरांच्या नावफलकांवर संबंधित व्यक्तिची संपत्ती, धन दौलत, जमीन या बाबींचा उल्लेख आढळत नाही तर त्या व्यक्तिच्या पदव्या लिहिलेल्या असतात. मुल्यमापन हे कधीच धनावर होत नाही तर गुणांवरच होत असते. मुलांची मेरीटची गुणवत्ता हीच आई-वडीलांसाठी सर्वात मोठी भेट आहे.

जिल्ह्यात सायन्स पार्कचे नियोजन : विद्यार्थ्यांना संशोधकांची नावे माहित होण्यासाठी व त्यांचा आदर्श घेण्यासाठी सायन्स पार्क असणे आवश्यक आहे. या सायन्स पार्कच्या माध्यमातून विविध विषयांची माहिती, वेगवेगळ्या विषयात करण्यात आलेले संशोधन, त्याचा उपयोग आदींची माहिती मिळण्यास मदत होईल.

०००

राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि.१ : राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे राज्याच्या विविध भागात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले. त्यानुसार राज्यात नुकसानाचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.

२ हेक्टर ते ३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानाचे पंचनामे करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून पिकांच्या प्राप्त नुकसानींचे अहवाल एकत्र आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष जयस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांचे विमानतळावर स्वागत केले.

००००

ताज्या बातम्या

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य...

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण...

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

0
मुंबई, दि. 8 : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील...