सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 1013

शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात इन्फल्यूएंझासाठी विलगीकरण कक्षाची स्थापना

मुंबईदि. 05 : राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित रूग्ण सर्वेक्षणसहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू सदृश्य रूग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार करण्यात येत आहे. तसेच राज्यातील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

रूग्णालयांमध्ये आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय व खासगी डॉक्टरांचे क्लिनीकल मॅनेजमेंटबाबत राज्यस्तरावरून पुर्नप्रशिक्षण ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आले आहे. राज्यात 2023 मध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत एकूण संशयीत रूग्ण 15 लाख 97 हजार 234 होतेतर बाधीत इन्फ्लुएंझा ए (एच एन 1 + एच एन 2) 3222 रूग्ण आहेत. सध्या रूग्णालयात 14 रूग्ण दाखल आहेत. तर रूग्णांचा मृत्यू झाला आहेअशी माहिती सहसंचालकआरोग्य सेवा डॉ. प्रतापसिंह सारणीकरण यांनी दिली आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

मुंबई दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली दादर, शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या माहिती स्टॉलचे उद्घाटन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या माहिती स्टॉलमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध महामंडळे कार्यरत आहेत. या महामंडळाच्या योजनांची माहिती पुस्तिकाही मोफत वाटप करण्यात येत आहे.

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी भोजन स्टॉल उभारण्यात आला असून या स्टॉलवर भोजनाचा एक बॉक्स व एक पाणी बॉटल याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या वतीने पुस्तक स्टॉल उभारण्यात आलेला आहे. या पुस्तक स्टॉलवर बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देणारी पुस्तके उपलब्ध आहेत. या माहिती व प्रसिद्धी स्टॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यासारख्या महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके उपलब्ध आहेत. या सर्व पुस्तकांवर ८५% इतकी सूट देण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती व प्रसिद्धी स्टॉलला व मोफत भोजन स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई विभाग श्रीमती वंदना कोचुरे यांनी केले आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी जाहीर

मुंबई, दि. ५ :  मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयांना बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३  रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी स्थानिक सुटी (Local Holiday) जाहीर करण्यात आली आहे.

याबाबतीतचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

मुंबई. दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक सुधारणा याबाबतचे विचार’ या विषयावर उद्योग विभाग प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची विशेष  मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव डॉ. कांबळे यांची मुलाखत उद्या बुधवार दि. 6, गुरूवार दि. 7 आणि शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार, दि. 6 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपट, मुलाखत आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन उद्या प्रसारण

मुंबई, दि. 5 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, दि. 6 डिसेंबर 2023 रोजी ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपटांसह ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत आणि चित्रपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून होणार आहे. तसेच आकाशवाणीवरून ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण सकाळी 11 वा. आणि ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 1 वाजता तसेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 4 वाजता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायं. 7.30 वा. ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमामधून उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. माहितीपट, मुलाखत व चित्रपटाच्या प्रसारणाच्या माध्यमातून महासंचालनालयाने डॉ. आंबेडकर यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक –  https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपटाचे स. ११.०० वा. प्रसारण

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटाचे प्रसारण सकाळी 11 वाजता. महासंचालनालयाच्या एक्स,  फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण तसेच, लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश या 17 मिनिटांच्या माहितीपटात करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै 1968 मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याची ऐतिहासिक घटना, नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंतिम दर्शनाचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे. जी.जी. पाटील यांनी संकलन केले आहे. दिग्दर्शक नामदेव व्हटकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर संगीत दत्ता डावजेकर यांचे आहे. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

 ‘बाबासाहेब आंबेडकर’ माहितीपटाचे दु. ०१.०० वा. प्रसारण

भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ ची निर्मिती असलेल्या ‘बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण दुपारी 1 वाजता महासंचालनालयाच्या एक्स, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरुन करण्यात येणार आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या वतीने एन.एस. थापा यांनी 1981 मध्ये या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला ए.वी. भाष्यम यांचे दिग्दर्शन लाभले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे दु. ०४.०० वा. प्रसारण

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण दुपारी 4 वाजता महासंचालनालयाच्या एक्स, या समाजमाध्यमावरुन करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार  आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी  हा चित्रपट नक्की पहायला हवा.

या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामूट्टी यांनी तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले. सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’; स्पर्धात्मक अभियान

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा ५ डिसेंबर पासून शुभारंभ झाला आहे. या अभियानाविषयी थोडक्यात माहिती…..

राज्यात सन २०२०-२१ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा ही पूर्णत: राज्य पुरस्कृत योजना शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे. भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे या योजनेसाठी निश्चित करण्यात आली असून सद्यस्थितीत 478 शाळांचा समावेश असलेला या योजनेचा पहिला टप्पा कार्यान्वित आहे.

अभियानाची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, क्रीडा आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे, राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करणे व शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची व उत्तरदायित्त्वाची भावना निर्माण करण्याच्या उद्दिष्टाने राज्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.

शाळांना गुणांकन

अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विविध उपक्रमांचे आयोजन ४५ दिवसांत करणे आवश्यक राहील. अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनासाठी ६० गुण व शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित आरोग्य, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, भौतिक सुविधा, तंबाखू मुक्त, प्लास्टिक मुक्त शाळा अशा उपक्रमांसाठी ४० गुण असे एकूण १०० गुण देण्यात येतील.

विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमध्ये शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी १० गुण, विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभागासाठी १५ गुण, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक उपक्रमांसाठी १० गुण, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छतेसाठी १० गुण, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपक्रमास ५ गुण  तसेच विविध क्रीडास्पर्धांच्या आयोजनासाठी १० गुण असे गुणांकन देऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येऊन पारितोषिके देण्यात येतील.

अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात तसेच विभागस्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर तालुका स्तरावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुल्यांकन समितीद्वारे शाळांची निवड करण्यात येईल.

सजग व सुसंस्कृत भावी पिढीच्या निर्मितीसाठी माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तीक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्यासाठीचे प्रयत्न, व्यवसाय शिक्षणाची तोंडओळख, अंगभूत कला-क्रीडा गुणांचा विकास अशा महत्त्वपूर्ण घटकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यातून शाळेचा निश्चितपणे सर्वांगीण विकास होईल यात शंका नाही.

– विभागीय माहिती कार्यालय, पुणे

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार  – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार

नंदुरबार, दि. ५ (जिमाका): अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनाकडे व मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा करणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ यामुळे होणारे शेतपिकांचे व शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचेही मंत्री डॉ. गावित म्हणाले.

शहादा तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या हिंगणी, कोंढावळ, तोरखेडा, उभादगड, काकरदा, खापरखेडा, दिगर, वडाळी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय कषी अधिकारी तानाजी खर्डे, तहसिलदार दिपक गिरासे, तालुका कृषी तालुका अधिकारी काशिराम वसावे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटीया व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींमधील सरपंच, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, गेल्या आठवड्यात ३० व ३१ नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्व्हे नुसार १६० शेतकऱ्यांच्या १५० हेक्टरवरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने पपई व केळी या नगदी फळ पिकांचा समावेश आहे. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाई देण्याबाबकचा अहवाल जलद गतीने शासनास सादर करण्याबरोबरच एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

ज्यांनी शासनाच्या पीकविमा योजनेत सहभाग घेतला त्यांना नियामनुसार भरपाई मिळेलच, परंतु ज्यांनी पीकविमा घेतला नाही त्यांचीही शासनाकडून भरपाईची अपेक्षा आहे. प्रत्येक क्षणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची शासनाची भुमिका असून, वारंवार अवकाळी, वादळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पाहता केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कृषी प्रकिया उद्योग योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन व आर्थिक मदत करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न केले जातील. त्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतमालावर नुकसान झाल्याबरोबर काही प्रक्रिया करून होणारे नुकसान कमी करता येईल. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल,अशी ग्वाहीही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी शेतकऱ्यांना दिली.

०००

पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडण्यांना मीटर बसवा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.५: शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा योजना, वितरण वाहिन्या आदींचे व्यवस्थापन करण्यासह पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडण्यांना मीटर बसविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा नगर परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सातारा नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर परिषद प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, यावर्षी धरणांतील पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती असून पुढील काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कास तलावात पुरेसे पाणी असले तरी त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. पाणी गळती होऊ नये यासाठी सर्व शहरात नळजोडण्यांना मीटर बसवणे आवश्यक आहे.

शहरात स्वच्छ्ता राखण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी कचरा व्यवस्थापन योग्यरित्या करावे. भुयारी गटार योजना शहराच्या ठराविक भागात न करता संपूर्ण शहर समाविष्ट होईल, अशा प्रकारे राबवावी. त्यासाठी उर्वरित भागाचा प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांचा आढावा घेताना श्री. देसाई म्हणाले, उड्डाण पुलांच्या खालील भागांचे सौंदर्यीकरण करत असताना वृद्ध, बालकांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता येईल याचाही विचार करावा.

यावेळी श्री. बापट यांनी सादरीकरण करून नगर परिषदेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. कास धरणाची उंची वाढविण्याचे काम झाले असल्यामुळे कास धरणातील पाणी संपूर्ण शहरासाठी येणार आहे. अमृत २.० अंतर्गत जल विद्युत प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे, प्रस्तावित कास पाणी पुरवठा योजना, शहर सौंदर्यीकरण, गोडोली तळे खोलीकरण, सौंदर्यीकरण, अजिंक्यतारा रस्ता विकसित करणे आदी प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.

०००

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला गती द्यावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ५ : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या शैक्षणिक उपाययोजना करून नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती द्यावी,असे सांगून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात  शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी विद्यापीठाने भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबई येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक,उपसचिव अजित बाविस्कर,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू, सहसंचालक प्रकाश बच्छाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, प्राचार्य अनिल राव, स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात  शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क)  विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी आणि या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत केले. या आवाहनाला प्रतिसाद देत  सर्व कुलगुरूंनी बहुमताने हा निर्णय मान्य केला. त्यामुळे यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले, अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नवमतदारांची नोंदणी व्हावी. यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने  नवमतदार नोंदणी मोहीम विद्यापीठ आणि महाविद्यालयात राबविण्यात  यावी या मोहिमेत ‘एनएसएस’नी पुढाकार घ्यावा त्यामुळे  महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी होईल. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)टीमने पुढाकार घ्यावा.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील  यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील महत्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करून विद्यापीठांवर शैक्षणिक धोरण राबविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे यावेळी सांगितले.

बैठकीत नॅक मूल्यांकन, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती, एबीसी प्राध्यापक भरती, प्रशिक्षण, सायबर गुन्हे, शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपध्दतीचे अचूक नियोजन करावे. अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

विविध स्तरांवर उच्च व तंत्र शिक्षणापासून  काही विद्यार्थी दूर राहतात आणि ते विद्यार्थी व्यवसाय, नोकरीत असतात अशा विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भिती असते, या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल, उद्योग क्षेत्र यांची मदत घेऊन प्रमाणपत्र कोर्स अभ्यासक्रमाची यादी तयार करता येईल का याचाही विचार विद्यापीठाने करावा.

तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत कालबद्धपद्धतीने नियोजन करून अंमलबजावणी करावी, विद्यार्थ्यांच्या हिताची विद्यापीठानी खबरदारी घ्यावी असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ५ :- विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या अथक परिश्रमातून भावी पिढी घडत असते. मुलांना स्वप्न बघण्याचा, उंच भरारी घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या  पंखांना बळ देण्याची जबाबदारी  शासनाची आहे. करिअर मार्गदर्शन उपक्रमातून कोणत्याही शाळेने ५० विद्यार्थ्यांना एकत्र आणून एखादे कौशल्य आत्मसात करण्याचे ठरवले तर त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करणार असून, आज प्रायोगिक तत्त्वावर सुरु झालेला करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर राबविण्याचा मानस आहे, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबईमधील ३०० शाळा आणि महाविद्यालयांतील ६० हजार विद्यार्थ्यांना करियर संदर्भातील मार्गदर्शन देण्यात येणार आहे. मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, शालेय शिक्षण विभाग, शिक्षण संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका यांच्या सयुंक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात प्रायोगिक तत्वावर १५ शाळांमध्ये हा उपक्रम राबवला गेला.

 यावेळी मंत्री श्री. लोढा म्हणाले की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले. त्यामध्ये कौशल्य विकासावर अधिक भर दिला आहे. मुलांना, पालकांना आणि महाविद्यालयांना वेळेत विद्यार्थ्यांचा कल वेळेत कळावा यासाठी हे मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे. भारतात गुरूकूल पध्दतीची आर्दश शिक्षण पध्दती बंद करून इंग्रजानी कारकूनी शिक्षण पध्दती आणली. आज आपण कौशल्य विकास शिक्षणात आमूलाग्र बदल करत आहोत. आज राबविण्यात येणारा उपक्रम फक्त शासनाचा उपक्रम म्हणून पाहू नका. सर्वांचे यामध्ये योगदान मोलाचे आहे. परदेशी भाषा अवगत करण्यासाठी परदेशी भाषांचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे असेही ते म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. लोढा म्हणाले की, जगभरातून कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. नुकतीच इस्त्राईलमधून ५ हजार कुशल मनुष्यबळाची मागणी आली आहे. इस्त्राईलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर तिथे संपूर्ण राहण्याचा व इतर खर्च ते सरकार करणार असून हा खर्च वगळता भारतीय चलनाप्रमाणे दीड लाख रूपये पगाराची नोकरी मिळू शकते. शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास शाळा सुरु करत आहोत. तसेच प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, किमान कौशल्य विकास योजना सुरू आहेत. ३५० गावांत कौशल्य विकास केंद्र सुरू करत आहोत. फक्त विद्यार्थ्यांकडून अपार कष्ट आणि शिकण्याची जिद्द या गोष्टींची आवश्यकता आहे, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.

या कार्यक्रमात करियर मार्गदर्शक आनंद मापुस्कर आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या प्राचार्य मनीषा पवार यांच्या पथकाने करियर संदर्भात मार्गदर्शन केले. विविध अभ्यासक्रमांची माहिती असलेली करियर प्रदर्शनी विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध होती. विविध करियर क्षेत्र, विविध अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना याबाबत अद्ययावत माहिती असलेले करियर प्लॅनर हे पुस्तक विद्यार्थी आणि पालकांना विनामूल्य देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबईचे उपआयुक्त दि.दे.पवार, व्यवसाय शिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, करियर मार्गदर्शक आनंद मापुस्कर, दक्षिण मुंबईचे शिक्षण निरीक्षक देविदास महाजन, मुंबई ‘मनपा’चे शिक्षणाधिकारी राजू तडवी, ग्रोथ सेंटरच्या संचालक स्वाती साळुंखे, सुचित्रा सुर्वे तसेच मुंबई महानगरपालिका शाळातील दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे विद्यार्थी, पालक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

असा आहे कौशल्य मार्गदर्शन कार्यक्रम

मुंबई महानगर क्षेत्रातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये ३०० शाळा, महाविद्यालयांमधील ६० हजार विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी करिअर मार्गदर्शनपर मेळावा पहिल्या टप्प्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये करिअर कसे निवडावे, करिअरच्या विविध वाटा, व्यक्तिमत्व विकास, कृत्रिम बुध्दीमत्तेच्या सहाय्याने अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन केले  जाणार आहे. यावेळी विविध अभ्यासक्रमांची माहिती असलेली करिअर प्रदर्शनी विद्यार्थी आणि पालकांना पाहण्यास उपलब्ध असेल. विविध करिअर क्षेत्रे, विविध अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना याबाबत अद्यायावत माहिती असलेले करिअर प्लॅनर हे पुस्तक विद्यार्थी व पालकांना विनामूल्य देण्यात येईल.

००००

 

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...