रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 984

गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.30(जिमाका) :- धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

22 नंबर सर्कल, किसननगर या भागातील यु.आर.सी. क्र.1 व 2 येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी नागरी पुनरुत्थान (क्लस्टर) पुनर्विकास योजनेतील नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर येथील नेचरपार्क व इतर विविध विकास कामांचा ई-शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे  संचालक श्री. मल्लिकार्जुन, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे आणि माजी नगरसेवक, नगरसेविका, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, क्लस्टरसाठी अनेक संघर्ष करावे लागले. साईराज बिल्डिंगची दुर्घटना अजूनही लक्षात आहे. त्यातील 18 जण मृत्युमुखी पडले, ही घटना माझ्या मनाला चटका लावून गेली. धोकादायक इमारती सर्वांनाच काळजीत टाकणाऱ्या असतात. या पार्श्वभूमीवर ही योजना राबविण्याचा संकल्प केला. काही इमारती अनधिकृत जरी असल्या तरी त्यातील जिवंत माणसे, त्यांचा जीव महत्त्वाचा, ही माणुसकीची भावना महत्त्वाची, या भावनेतूनच क्लस्टर योजनेचा जन्म झाला. क्लस्टर योजनेत काही त्रुटी होत्या. मात्र देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्रुटी दूर करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. महापालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास आणावी.

ते म्हणाले, या योजनेतील पुढील टप्प्यातील कामांकरिता आपल्याला वेगवेगळे भूखंड मिळत आहेत. क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात साडेदहा हजार घरांचे काम पूर्णत्वास जाणार आहे, पुढील काम हे दोन टप्प्यातच पूर्ण करण्याचे मी निर्देश दिले आहेत. क्लस्टर योजनेसाठी पूर्वी काम केलेल्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पंधराशे हेक्टर भूखंडावर होणारा हा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला इतका मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण समाजासाठी जगणे, ही होती. हीच शिकवण घेऊन मी आता जगतोय. मुख्यमंत्रीपदाचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवन बदलण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय.

डीप क्लीन ड्राईव्हविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हे अभियान यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात हे अभियान राबविले जाणार आहे आणि हे केवळ एक-दोन दिवसासाठी नव्हे तर नियमितपणे राबविले जाणार आहे. सर्वांनाच नियमित स्वच्छतेची सवय व्हायला हवी.

केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत, याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानून मुख्यमंत्री म्हणाले की, “आनंदवन” ही संकल्पना मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त अशी संकल्पना आहे. या योजनेंतर्गत ठाण्यातील पहिल्या टप्प्यात 27 किलोमीटर आणि 500 मीटर रुंदीचा श्रीनगर ते गायमुख या भागात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्षारोपण, ग्रीन पॅच, ऑक्सिजन पार्क, अर्बन फॉरेस्ट हे उपक्रम राबविले जाणार आहेत. शासनाकडून राज्यात बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

या प्रकल्पात बांधकाम करणाऱ्या शिर्के कन्ट्रक्शन कंपनीचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की, लोकांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची घरे बांधून द्यावीत. नुसत्या इमारती उभ्या न करता नियोजित शहर निर्माण करायचे आहे. येथील लोकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा मिळायला हव्यात. क्लस्टर हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध असून आनंदवन, क्लस्टर आणि डीप क्लीन ड्राईव्ह या अभियानाचा परिणाम निश्चितच येत्या काळात सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने दिसून येईल. भविष्यात ठाण्यातील व राज्यातील इतर शहरांचाही क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून विकास केला जाईल. सर्वांच्या सहकार्याने ठाणे शहर, ठाणे जिल्हा अन् राज्याचाही सर्वांगीण विकास करावयाचा आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविक करताना क्लस्टर पुनर्विकास योजनेबद्दलची माहिती सांगितली. तसेच “आनंदवन” Forest in the City  आणि क्लस्टर समूह विकास योजना” याबाबतची चित्रफीत दाखविण्यात आली. शेवटी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

सोलापूर, दिनांक 28 (जिमाका):- श्री सिद्धेश्वर महा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होम मैदानावर सलग 53 वे श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील नागरिकांनी-शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा व यातील अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेऊन त्याचा शेतीमध्ये प्रत्यक्ष वापर करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झालेले असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देवस्थान समितीचे महादेव चाकोते, बाळासाहेब भोंगडे, बसवराज शास्त्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

या कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्स ना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. स्टॉल वरील विविध तंत्रज्ञान व अद्ययावत तंत्रज्ञाने उत्पादित शेती पिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन येथील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री सिध्देश्वर देवस्थान, सोलापूर, कषी विभाग, आत्मा व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 डिसेंबर 2023 ते दिनांक 1 जानेवारी 2024 या कालावधीत या कषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात कृषीशी संबंधित 350 स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शेतकरी उत्पादक, महिला बचतगट, कृषीशी संबंधित अद्ययावत तंत्रज्ञान, कृषी अवजारे विक्रेते कंपन्या यासह विविध  स्टॉल्स आहेत. सलग 53 वर्षापासून हे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असून या प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने यांनी दिली.

या कृषी प्रदर्शनाला परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांनी मानले.

उदगीर : विविध विकासकामांचे मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन, लोकार्पण

सर्व समाज घटकांना सोबत घेऊन उदगीर तालुक्याच्या विकासाला गती – मंत्री संजय बनसोडे

लातूर, दि. ३० (जिमाका) : केंद्र आणि राज्य सरकार समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून याकरिता विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. तर उदगीर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकासकामे सुरू असून यापुढेही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास कामांना गती देण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

उदगीर येथे तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये ना. चव्हाण व ना. बनसोडे बोलत होते.

खासदार सुधाकर शृंगारे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे, अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, गणेश हाके, कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यावेळी उपस्थित होते.

देशात ग्रामीण व शहरी भागात शासकीय योजनांचा लाभ पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने पोहविण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वाखालील सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचे ना. चव्हाण म्हणाले. तसेच गोरगरिबांना घरकुल, आरोग्य विषयक सुविधा, महिलांच्या सन्मानासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची, विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.

उदगीर तालुक्यातील रस्ते, सिंचन, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, प्रशासकीय इमारतीच्या कामांसह विविध समाजांच्या विकासाला चालना देण्यावर आपला भर असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक विकासकामे पूर्णत्वास आली आहेत, तसेच केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे 570 कोटी पेक्षा अधिक निधीतील कामे प्रगतीपथावर आहेत. उदगीर तालुक्याचा विकास करण्यासाठी यापुढेही सर्व समाज घटकांना सोबत घेऊन अधिक गतीने काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार श्री. शृंगारे यांनी आपल्या मनोगतात केंद्र सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात होत असलेल्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

कुलगुरु डॉ. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. पांढरे, माजी आमदार श्री. केंद्रे, माजी नगराध्यक्ष श्री. निटुरे, प्रवीण घुले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. माधव पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय इमारत, मलकापूर येथे रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत उदगीर येथील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले. तसेच अहमदपूर ते शिरूर ताजबंद ते उदगीर राज्य मार्गावर उदगीर तालुक्यातील मलकापूर गावाजवळ होणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले.

दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय इमारतीच्या बांधकामासाठी 59 कोटी 18 लाख 8 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधून महाविद्यालयाच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम होणार आहे. तर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 35 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या पुलाची लांबी 120 मीटर तर रुंदी 12.90 मीटर असेल. दोन्ही बाजू मिळून 800 मीटर लांबीच्या जोड रस्त्यांचाही यामध्ये सामावेश आहे. या पुलामुळे उदगीर शहरातून होणारी जड वाहतूक कमी होवून शहारातील वाहतूक सुरळीत होईल.

उदगीर शासकीय विश्रामगृह नवीन इमारत, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय इमारतीचे लोकार्पण

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर शासकीय विश्रामगृह नवीन इमारत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कार्यालय इमारतीचे लोकार्पण झाले.

शासकीय विश्रामगृह नवीन इमारतीमध्ये तळ मजला व पाहिला मजला यमध्ये व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी दोन कक्ष, चार साधे कक्ष, 150 व्यक्तींची बैठक व्यवस्था असलेले सभागृह, 25 व्यक्तींसाठी बैठक कक्ष आणि भोजन कक्षाच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी 4 कोटी 20 लक्ष 38 हजार रुपये खर्च आला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदगीर येथील कार्यकारी अभियंता कार्यालय इमारतीच्या बांधकामाला 6 कोटी 7 लक्ष रूपये खर्च आला आहे. या इमरतीमध्ये तळ मजल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय, तर पहिल्या मजल्यावर उपविभागीय कार्यालय असणारं आहे.

लोकार्पण झाल्यानंतर ना. चव्हाण आणि ना. बनसोडे यांनी दोन्ही इमारतींची पाहणी केली. तसेच ना. चव्हाण आणि ना. बनसोडे यांनी कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांना नूतन इमारतीेमधील कार्यकारी अभियंता यांच्या कक्षातील खुर्चीवर बसवून शुभेच्छा दिल्या.

उदगीर नगरीत राज्य युवा महोत्सवाचे थाटात उदघाटन

लातूर दि.30 (जिमाका) : राज्यातील युवकांचा खेळासह, सांस्कृतिक आणि इतर सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून आशियायी स्पर्धेतील सहभागी खेळाडूसह, पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रक्कमेत, तालुका, जिल्हा आणि विभागा पातळीवरच्या क्रीडा संकुलाच्या निधीत मोठी वाढ करण्याचा निर्णय क्रीडा व युवक कल्याण विभागाने घेतला. उदगीर येथे राज्य युवा महोत्सव पार पडत असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 12 जानेवारीला नाशिकला राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करत असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर येथे तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्य युवा महोत्सवाचे उदघाटन श्री . बनसोडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार गोविंद केंद्रे, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, ऍड. व्यंकट बेंद्रे, प्रशांत पाटील यांच्यासह शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आशियायी स्पर्धेतील विजेत्या सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 75 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असून आता आशियायी खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही 10 लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. राष्ट्रीय स्तरावर 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो, तसाच ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या कुस्तीपटू कै. खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्म दिवस राज्याचा क्रीडा दिन आपण घोषित केल्याची माहिती या वेळी श्री. बनसोडे यांनी दिली.
देशात आणि राज्यात खेळाला मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही मोठे बदल घडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपला देश जगात खेळाच्या क्षेत्रातही उज्वल कामगिरी करेल. देशातले युवक खेळाकडे आता करियर म्हणून पाहत आहेत हे चित्र खूप आशादायी आहे, असे प्रतिपादन खासदार श्री. शृंगारे यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील आणि राज्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, शिव छत्रपती पुरस्कार विजेते यांचा विशेष गौरव करण्यात आला.
 उदगीरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी
राज्य युवा महोत्सवा मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन एक हजार कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यातील काही गटांनी खुल्या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण केले. उदघाटनानंतर इंडियाज गॉट टॅलेंट या प्रसिद्ध शो मधील चमुने सादर केलेल्या नृत्याला उदगीरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले.
तृणधान्य प्रदर्शनीचे उद्घाटन
जागतिक तृणधान्य वर्षानिमित्त युवकांना अन्नातील पोषणमूल्य कळावे, यासाठी कृषी विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात राज्यातील विविध जिल्ह्यानी सहभाग नोंदविला आहे. त्याचे उदघाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंती

मुंबई दि. 30मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरु व्हावी, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आजपासून सुरु झालेली जालना-मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे हेदेखील होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते अयोध्या रेल्वे देखील सुरू करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाला केली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. राज्यात रेल्वेने 1 लाख 7 हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. आज हे वर्ष संपत असताना राज्याला सातवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे, असेही ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी एकदा ठरवले की तो प्रकल्प किंवा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने पूर्ण होतोच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रारंभी मध्य रेल्वेचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक चित्तरंजन स्वैन यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

प्रवाशांची उत्स्फूर्त दाद

जालना –मुंबई वंदे भारत ट्रेनचे आगमन झाले तेव्हा मुख्यमंत्री भाषण करत होते. उतरलेल्या प्रवाशांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताच या प्रवाशांनीसुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली.

त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि  उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प तसेच मिठाई दिली. या ट्रेनमधल्या सोयी आणि सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले . प्रवाशांचे अनुभव उत्सुकतेने ऐकत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमवेत रेल्वे कोचमध्ये तब्बल अर्धा तास दिला. प्रवाशांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले.

या रेल्वेमुळे आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदौर, नागपूर ते बिलासपूर अशा सात ट्रेन्स धावतील.

मुंबईत उद्या १० ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’; गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ९ वाजता प्रारंभ

महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकर तसेच सर्व घटकांनी स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन 

      मुंबई,दि.30:-बृहन्‍मुंबई महानगरपालिका राबवित असलेली ‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महाराष्ट्र शासनाकडून राज्‍यभर विस्‍तारली जाणार आहे. त्या अनुषंगाने स्वच्छतेचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर करता यावे, यादृष्टीने उद्या रविवारी म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत एकूण १० ठिकाणी ‘महा स्वच्छता अभियान’अर्थात “मेगा डीप क्लिनिंग ड्राइव्ह” उपक्रम राबविला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता या महा स्वच्छता अभियानाला भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया येथून प्रारंभ होणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून केली जाणारी स्वच्छता, संयंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेची प्रात्यक्षिके आणि स्थानिक लोकसहभाग असा सर्वांचा मेळ साधून ही महा स्वच्छता होणार आहे.

राज्‍याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी देखील यावेळी उपस्थित असतील.

मुख्‍यमंत्री श्री.शिंदे यांच्‍या निर्देशानुसार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चहल यांच्‍या मार्गदर्शनाखाली, बृहन्‍मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून दर आठवड्यात एक दिवस प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) राबविण्‍यात येत आहे. ही मोहीम महाराष्ट्रभर विस्तारण्याची घोषणा मुख्‍यमंत्री महोदयांनी नुकतीच केली होती. या पार्श्वभूमीवर, येत्‍या रविवारी म्हणजे दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजेपासून मुंबईत दहा ठिकाणी महा स्‍वच्‍छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्यात, परिमंडळ १ मधील भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया (ए विभाग), वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय (ई विभाग); परिमंडळ २ मध्ये सदाकांत धवन मैदान (एफ दक्षिण); परिमंडळ ३ मध्ये वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम (एच पश्चिम विभाग); परिमंडळ ४ मध्ये वेसावे (वर्सोवा) चौपाटी (के पश्चिम विभाग); बांगूर नगर (पी दक्षिण विभाग); परिमंडळ ५ मध्ये  सावरकर मैदान, कुर्ला पूर्व (एल विभाग); अमरनाथ उद्यान (एम पूर्व विभाग); परिमंडळ ६ मध्ये डी मार्ट जंक्‍शन, हिरानंदानी संकूल (एस विभाग); परिमंडळ ७ मध्‍ये ठाकूर गाव (आर दक्षिण विभाग) या ठिकाणांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहिमेसाठी तयार केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार (एसओपी) या ठिकाणी मोहीम राबवली जाणार आहे. 

      महा स्वच्छता अभियान संदर्भात अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे म्‍हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत असलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात शासनाकडून राबवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महा स्वच्छता अभियानाचा प्रमुख कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. या ठिकाणी सुमारे एक हजार गणवेशधारी स्वच्छता कर्मचारी आवश्यक त्या संसाधनांसह तसेच ई स्वीपर, पॉवर स्वीपर आदी संयंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करतील. ही प्रात्यक्षिके व प्रत्यक्ष स्वच्छतेची एकूणच कार्यवाही महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवरुन थेट प्रक्षेपित करण्यात येतील. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार केलेली प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्याआधारे त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सुयोग्य अशी स्वच्छता मोहीम राबवता येईल. एकूणच, बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही मोहीम राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक स्वरुपाची ठरणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

डॉ.शिंदे म्हणाले, महा स्वच्छता अभियानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा आवश्यक त्या तयारीनिशी सज्ज आहे. स्‍वच्‍छता कर्मचारी व पुरेशी यंत्रणादेखील तैनात आहे. स्‍वच्‍छतेची कार्यपद्धती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यातील इतर शहरे व स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील त्यांच्या स्तरावर अंमलबजावणी करता येईल, अशी सूचना केली आहे. स्‍वच्‍छतेची मोहीम प्रशासकीय स्वरुपाची न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरुप मिळत आहे. लोकप्रतिनिधींसह शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, स्काऊट व गाईड, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्वयंसेवी संस्था, ख्यातनाम व्यक्ती व समाजातील सर्व भागधारक, स्थानिक नागरिक यांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे, यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी दिली.

वन विभाग सतत अग्रेसर असल्याचे समाधान – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून राज्य शासनाला यावर्षी सन 2022-2023 या वर्षासाठी 5 कोटी 82 लक्ष रुपयांचा लाभांश मिळणे प्रस्तावित असून महामंडळाची स्थापना झाल्यापासून शासनाला प्राप्त होणारा हा सर्वाधिक मोठा लाभांश आहे. चंद्रपूर येथे नुकतेच (दि. 28 डिसेंबर) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे एफडीसीएम च्या अहवालाबाबत कॅगने देखील ‘निल’ चा शेरा देऊन अहवाल पारदर्शी असल्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे.

यासंदर्भात बोलताना मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाला वनविकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक फायदा होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून काम करणाऱ्या मोजक्याच महामंडळाकडून आर्थिक लाभ शासनाला मिळतो. त्यात वनविभाग कुठेही मागे नाही, तर सतत अग्रेसर असल्याचे अत्यंत समाधान होत आहे. वनक्षेत्र विकास, बांबू लागवडीला प्रोत्साहन, विक्रमी वृक्ष लागवड, उत्तम दर्जाचे सागवान लावून योग्य विपणन व्यवस्था यांसह प्रत्येक बाबतीत वन विकास महामंडळाचे नियोजन उल्लेखनीय आहे. अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरासाठी गेलेले काष्ठ, संसदेच्या नवीन इमारतीत सेंट्रल व्हिस्टासाठी गेलेले काष्ठ महाराष्ट्राच्या वन क्षेत्रातून पाठवले गेल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वनबल प्रमुख शैलेश टेंभूर्णीकर आणि त्यांच्या पथकाचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.

नवनवीन संकल्पना राबवून वनक्षेत्र वाढीसाठी तसेच वनांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचे काम गतीने सुरू आहे. एमआयडीसी च्या धर्तीवर एफआयडीसी ची निर्मिती करून फर्निचर व इतर साहित्याकरिता मोठे दालन उभे राहणार आहे. यामुळे उद्योगाला आणि रोजगाराला चालना मिळणार आहे.

वनविकास महामंडळाकडून गेल्या दहा वर्षात शासनाला मिळालेल्या  लाभांशाचा आढावा घेतल्यास तो  सन  2014-2015 मध्ये 45.42 लक्ष रुपयांपासून  2022-2023 मध्ये 582.00 लक्ष रुपये असा प्रगतीचा आलेख अधोरेखित होतो.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त १४ ते २८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रम राबविण्याचे आवाहन

मुंबई, दि. ३० – राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात येत्या १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय शासकीय आणि अधिनस्त कार्यालयांनी मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागामार्फत करण्यात आली आहे.

या कालावधीत सर्व कार्यालयांमधून मराठी भाषेसंबंधी परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिर, कविसंमेलन, नाट्य, घोषवाक्य, अभिवाचन, कथाकथन, पुस्तकांचे रसग्रहण, वादविवाद यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करावे. याशिवाय मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता विविध माध्यमांतून याबाबतचे दृक श्राव्य संदेश प्रसारित करावेत. ग्रंथ प्रदर्शन, दिंडी, पुस्तक भेट देणे, पुस्तक जत्रा, समाजमाध्यमांवर मराठी वाचन कट्टा आदी उपक्रम आयोजित करण्यात यावेत, असे या अनुषंगाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

मराठी भाषेच्या प्रसार प्रचारासह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, स्व-प्रकाशन, ई बुक, ऑनलाईन विक्री, लेखक प्रकाशक करार, संहिता लेखन, लघुपट, माहितीपट लेखन आदी विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशीही सूचना करण्यात आली आहे.

भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल ॲप) तसेच मराठी भाषा विभागाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळांबद्दलची माहिती भाषा पंधरवड्याच्या निमिताने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्याबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, मुंबई मराठी साहित्य संघ आदी साहित्य सस्थांची मदत घेता येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले आहे.

‘डीप क्लीन ड्राईव्ह’ यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि.30(जिमाका) :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘डीप क्लीन ड्राईव्ह’चा शुभारंभ आज मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. ‘डीप क्लीन ड्राईव्ह’यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील सर्वच शहरांना आवाहन केले होते. मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेप्रमाणे मीरा-भाईंदर येथील स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनीदेखील या मोहिमेत सहभाग नोंदविला.

डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेचा उद्देश  रस्ते आणि पदपथावरील धूळ कमी करणे, हा आहे. या मोहिमेदरम्यान अनेक नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. महापालिका सफाई  कामगारासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. झाडू चांगल्या प्रतीचे वापरावे, अशीही सूचना त्यांनी पालिका प्रशासनास केली. त्याचबरोबर कामगारांचे त्यांनी कौतुकही केले.

मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये शनिवारी प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 22 पथके अथकपणे काम करताना दिसली. यानंतर दर शुक्रवारी 8 मार्च 2024 पर्यंत संपूर्ण शहरात ही मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये वॉर्डांमध्ये रस्ते, दुभाजक, फूटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. बस स्टॉपवरील, भिंतींवरील पत्रिका आणि स्टिकर्स काढून टाकणे, तसेच शहरातील थुंकलेले रेड स्पॉट्स स्वच्छ करणे, ही कामे केली जातील. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करीत मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी हनुमान मंदिर आणि गोल्डन नेस्ट रोड सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांचा सहभाग आणि क्यूआर कोड मॉनिटरिंगद्वारे कचरा वर्गीकरणावर भर दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी आयुक्तांचे कौतुक केले.

मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांनी मोहिमेदरम्यान मेरी गोल्ड सोसायटी येथे अभिनव कचरा वर्गीकरण प्रणालीचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी नागरिकांशीही संवाद साधला, उपक्रमातील त्यांची भूमिका समजून घेऊन स्वच्छतेच्या सामूहिक जबाबदारीचे महत्त्व त्यांनी सांगितले.

मीरा-भाईंदर महानगरपालिका पुढील काळात हा स्वच्छतेचा जागर कायम चालू ठेवणार असून शहरातील रहिवाशांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही महानगरपालिका नेहमीच कार्यरत राहील, यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त श्री. काटकर यांनी यावेळी केले.

ग्रामीण नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचे केंद्र शासनाचे काम – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

सातारा दि.३०: विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे काम केंद्र शासन करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी फलटण तालुक्यातील विडणी येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमप्रसंगी केले.
याप्रसंगी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार अभिजीत जाधव आदी उपस्थित होते. यावेळी श्री. मिश्रा यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
केंद्र शासनातर्फे अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या जात असून त्या सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे सांगून केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. मिश्रा म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरजूंना घरे उपलब्ध करून देण्यात आली. शौचालय नसलेल्यांना बांधकामासाठी अनुदान देण्यात आले. जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घराला नळ जोडणीच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे काम देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा ही देशातील प्रत्येक ग्रामीण भागात जात आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना त्यांच्या गावातच विविध योजनांचा लाभ देणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असून यात्रा जात असलेल्या प्रत्येक गावात अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लाभ दिला जात आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. मिश्रा यांनी यावेळी केले.
खासदार श्री. नाईक निंबाळकर म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. कोविड काळात मोफत अन्नधान्य, सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या प्रभावीपणे राबविल्या जात असलेल्या योजनांमुळे आज देशाबरोबर ग्रामीण भागाचाही मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे यावेळी सांगितले.
यात्रेमध्ये पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, सुरक्षा विमा योजना, जीवनज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना, बचत गटांना अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार योजना आदी विविध योजनांच्या लाभासह माहिती देण्याबरोबर अर्ज भरून घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
या यात्रेसाठी एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून स्क्रीनवरून योजनांच्या ध्वनीचित्रफिती प्रसारित करण्यासह योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रिका वितरीत करण्यात आल्या. यावेळी उपस्थितांनी संकल्प शपथ घेतली.
यावेळी विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन नागपूर, दि. १३: महाराष्ट्रात देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर न्यायसहायक वैज्ञानिक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. आधुनिक सायबर प्रयोगशाळांसह मोबाईल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत....

युवकांना स्वयंरोजगाराकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य-मंत्री मंगलप्रभात लोढा

0
पुणे, दि.१३: राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करुन त्यांचे भविष्य घडविणे राज्य शासनाची जबाबदारी असून स्वयंरोजगाराकरिता युवकांना राज्य शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन...

सामाजिक न्याय विभागाच्या शैक्षणिक सहाय्य योजना

0
वंचित घटकांतील नागरिकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग...

कामठीतून जाणाऱ्या जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होणार

0
▪️कामठीत साकारणार भव्य व्यापारी संकुल नागपूर, दि. १२ : कामठी शहरातून नागपूर-जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने कामठी शहरात होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडीवर मात काढण्यासाठी आज...