शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 965

जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई, दिनांक २६ : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे आज व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  गुरुदेव श्री श्री रवीशंकर उपस्थित होते.

याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.

 

२४ जिल्ह्यात कामे करणार

जलयुक्त शिवार २ मध्ये गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली. या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यातील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळे कामे होणार आहेत. यासाठी तीन वर्षांचा कालावधी असेल.

कृषी विभागाशी झालेल्या करारानुसार राज्यात व्यक्ती विकास केंद्र हे सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती पिकविणे, मनुष्यबळ विकास, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, सध्याची रसायने व खतांवर आधारित पारंपरिक शेती नैसर्गिक शेतीमध्ये बदलणे ही कामे कृषी विभागाशी समन्वयाने करेल.

चांगल्या योजनेसाठी गुरूदेवांचा आशीर्वाद

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण नेहमी म्हणतो की, जल हे तो कल है. पण हे पाणी जपून ठेवण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. ग्लोबल वॉर्मिगमुळे आज अनेक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले. आज हा सामंजस्य करणारा करून जलयुक्त शिवारच्या कामाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची जोड देऊ शकलो ही मोठी गोष्ट आहे. मिशन मोडवर आम्ही जलयुक्त शिवार 2 टप्पा राबविणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जलयुक्त शिवार ही लोकांची चळवळ बनली याचे उदाहरण मुख्यमंत्र्यांनी दिले. जालना जिल्ह्यात वाटुरमध्ये मी गेलो असताना जलयुक्त शिवारमुळे झालेली किमया पाहिली असेही ते म्हणाले.

गुरुदेव श्री श्री रवीशंकर हे चांगल्या कामांच्या पाठीशी नेहमी असतात, त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत हे भाग्य आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

धरणांमधील गाळ ही काढणार

यावर्षी पाऊस ही कमी झाला आहे त्यामुळे अगदी योग्य वेळी हा जलयुक्त शिवारचा करार होतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. तेथील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करीत आहे.

कॅन्सर सारखे रोग वाढत चालले आहे, त्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जलयुक्त शिवारचे देशात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 22 हजार गावांमध्ये मोठे काम झाले. केंद्राने 2020 मध्ये जो अहवाल दिला त्यात महाराष्ट्रातला वॉटर टेबल इतर सर्व राज्यांच्या तुलनेने वर आला असे नमूद केले आहे. यामध्ये अर्थातच सिंहाचा वाटा हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा आहे.

जलयुक्त शिवार दुसरा टप्पा तसेच विषमुक्त शेतीचा कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम राबवून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राची भूमी अध्यात्मिक विचारांची- श्री श्री रवीशंकर

यावेळी बोलताना गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणाले की, गेल्या वर्षी 1 हजार शेतकरी महाराष्ट्रातून बंगलोरमध्ये आले होते. ते त्यांच्या खर्चाने आले होते, त्यांचे उत्पन्न वाढले होते. ते धन्यवाद देण्यासाठी आले होते. योजनेला राजाश्रय मिळून लोकांचा सहभाग मिळाला आणि त्यामुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली असे सांगून ते म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांनी स्वच्छ भारताची चळवळ सुरू केली आणि एक इतिहास निर्माण झाला हे उदाहरण आहे.

या जमिनीत विषारी घटक टाकून टाकून तिला आपण निष्प्रभ करतो आहोत. त्यामुळे नैसर्गिक शेतीची गरज आहे असेही ते म्हणाले. महाराष्ट्राची भूमी अध्यात्माची शिकवण देणारी आहे असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी विकासकामांना गती देण्याचे निर्देश

बारामती, दि. २६ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील नागरिकांना विविध सोई-सुविधा मिळण्याकरीता सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करून ही कामे गतीने व दर्जेदार करण्याचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभाग, गरुड बाग, जवाहरबाग, श्रीमंत बाबुजीनाईक वाडा, कऱ्हा नदी सुशोभीकरण, पाटस रोडवरील जलतरण तलाव आणि बाल विकास मंदिर शेजारील विकास कामांची पाहणी  करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली.

कऱ्हा नदीचे सुशोभिकरण करीत असताना जीर्ण झालेल्या संरक्षण भिंती नव्याने उभारण्याची कार्यवाही करा. नदीच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करावे. नदीतील पाण्याचे वहन होत असताना अडथळा निर्माण होणार नाही, पुराच्या वेळी पाण्याच्या अधिकाधिक प्रवाह होईल, या परिसरात स्वच्छता राहील, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

कन्हेरी वनविभाग परिसरातील विकास कामे करीत असताना हवामानानुरुप वाढणारी, कमी प्रमाणात पानगळ होणाऱ्या विविध प्रजातीचे वृक्षारोपण करा. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेदृष्टीने विचार करुन पायऱ्या व बैठक व्यवस्था करा. सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध ठिकाणी जाळ्या लावाव्यात. विकासकामे करतांना निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

गरुड बाग, जवाहरबाग, बाल विकास मंदीर शेजारील विकासकामे करताना पदपथावर स्वच्छता राहील, याची काळजी घ्यावी. व्यवसायिकदृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या दुकानांच्या गाळ्याचे काम मजबूत होईल, याची दक्षता घ्या. नागरिकांना रात्रीच्या वेळी फिरताना स्पष्ट दिसेल, अडथळा निर्माण होणार नाही, याचा विचार करुन वीजेचे खांब बसवावे. सुशोभिकरण अंतर्गत लावण्यात येणाऱ्या पदपथाच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या फुलझाडांच्या रंगानुसार परिसराची रंगरंगोटी करावी. नटराज मंदीर येथील कार्यक्रम झाल्यानंतर परिसरात स्वच्छता राहील, याची दक्षता घ्यावी, असेही श्री.पवार म्हणाले.

श्रीमंत बाबुनाईक वाडा परिसर विकासकामे करतांना जुन्या बारामतीकडून नव्या बारामती दरम्यान तालुक्यातील ऐतिहासिक वास्तुंची विविध छायाचित्रे लावावी. प्रकाशाच्या उजेडामुळे डोळ्यांना त्रास होणार नाही, अशा एलईडी दिव्यांची निवड करा. शौचालय बांधकाम करताना ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या सुविधांचाही विचार करण्यात यावा. पाटस रोडवरील जलतरण तलाव व मुख्य रस्त्यामध्ये लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जाळ्या लावाव्यात. तलाव व परिसर स्वच्छ ठेवा,  असेही ते म्हणाले.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील आदी उपस्थित होते.

000

संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

बारामती, दि.२६ : संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत मुंबईवरील २६ नोव्हेंबर रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्य जय पाटील आदी उपस्थित होते.

000

‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ

बारामती, दि.२६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंचायत समिती आवारात भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचा एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी चित्ररथाची पाहणी केली. ‘विकसित भारत’संकल्प यात्रेची उद्दिष्टपूर्तीकरीता लोकप्रतिनिधी, प्रशासन व लाभार्थ्यांनी मिळून मोहीम यशस्वीपणे राबवावी, असे श्री. पवार म्हणाले. यावेळी लाभार्थ्यांना लाभ पत्राचे वाटपही करण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रा रथ तालुक्यातील एकूण ९९ गावात जाणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामंपचायत स्तरावर उपसमिती गठीत करण्यात आली आहे. ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचे उद्दिष्टपूर्तीकरीता लोकप्रतिनिधी व लाभार्थ्यांनी सोबत मिळून मोहीम प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अनिल बागल म्हणाले.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्य जय पाटील आदी उपस्थित होते.

000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’चा शुभारंभ

बारामती, दि.२६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ मधील अर्धमॅरेथॉन स्पर्धेला विद्या प्रतिष्ठानच्या बायोटेक्नोलॉजी मैदान येथे हिरवी झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, स्पर्धेचे आयोजक आयर्नमॅन सतीश ननवरे आदी उपस्थित होते. ४२ कि.मी ची मॅरेथॉन, २१ कि.मी. ची अर्धमॅरेथॉन आणि १० कि. मी. दौड अशा तीन प्रकारात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याशिवाय ५ कि. मी. फन दौडचे सुद्धा आयोजन करण्यात आले.श्री. बनसोडे यांच्या हस्ते १० कि. मी. आणि ५ कि. मी. दौड स्पर्धेला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

श्री. बनसोडे यांच्या हस्ते विजेत्या धावपटुला पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, खेळाडूंच्या सोईसाठी हरियाणा, पंजाब, ओडीसा राज्यातील ऑलिम्पिक भवनच्या धर्तीवर राज्यातही ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी ७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच पुण्यामध्ये त्याचे भूमीपूजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मागील चार महिन्याच्या कार्यकाळामध्ये विविध निर्णय खेळाडूंना समोर ठेवून आपण घेतले आहेत. कोविडच्या काळापासून रखडलेले मागील तीन वर्षाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. क्रीडा पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. स्व. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

चीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राज्यातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला १० लाखावरुन १ कोटी रुपये, रौप्य पदक ७५ लाख आणि कास्य पदक विजेत्या खेळाडूला ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सहभागी खेळाडूला जाण्या-येण्याकरीता १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा सुविधांचा विकासासाठी क्रीडा संकुल बांधकामासाठीही भरीव निधी देण्यात येत आहे.

बारामती परिसरात कृषी, उद्योग, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उत्तम काम होत असून त्याला चालना देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलातील सुरू असलेल्या नवीन इमारती करिता १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’करीता राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल. या स्पर्धेचे बारामती सोबत राज्यातही आयोजन करण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. बनसोडे म्हणाले.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि स्पर्धेचे आयोजक आयर्नमॅन सतीश ननवरे यांनीही विचार व्यक्त केले.

भारताचे संविधान जगातील अनेक देशांना मार्गदर्शक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. २६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले देशाचे संविधान हे जगातील अनेक नवनिर्मित देशांना आपल्या संविधान निर्मितीमध्ये मार्गदर्शक ठरले आहे. संविधान दिन साजरा करण्याबरोबरच संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे अधिक महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

संविधान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘संविधान सन्मान दौड २०२३’ ला मंत्री श्री. पाटील आणि कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटीक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष व स्पर्धेचे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर, राहुल डंबाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, आपल्या संसदेने संविधान स्वीकारले याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी संविधान सन्मान दौड आयोजित करण्यासह विविध कार्यक्रमाद्वारे सर्व देशभर हा दिवस साजरा केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समस्त भारतीयांवर खूप मोठे उपकार आहेत. संविधानाच्या माध्यमातून भारताची लोकशाही सदृढ करण्याचे काम त्यांनी केले. हजारो वर्षे बदलावेच लागणार नाही असे परिपूर्ण संविधान त्यांनी लिहिले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी नागरिकांचे अभिनंदन करून, सदृढ आणि सक्षम समाजासाठी खेळ महत्वाचे आहेत, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.

या ‘संविधान सन्मान दौड’ मध्ये तब्बल ३१ देशातील विद्यार्थ्यासह एकूण सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या सुरवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

दरम्यान,  या स्पर्धेत धावू शकल्या नाही अशा महिलांनी  ‘वॉक फॉर संविधान’ रॅली काढली होती. या उपक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली.  विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी केले.

000

भारतीय संविधानामुळे माणूस म्हणून जगण्याची समान संधी – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : भारतीय संविधानामुळेच माणूस म्हणून जगण्याची समान संधी सर्वांना मिळाली आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री, तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कोल्हापुरातील बिंदू चौकात संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. भारतीय संविधानाचे रक्षण ही आम्हा सर्व भारतीयांची जबाबदारीच आहे, असेही ते म्हणाले.

संविधान दिनानिमित्त कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये भारतरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले  यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अभिवादन केले. उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना पालकमंत्री मुश्रीफ यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची शपथ दिली. त्यानंतर त्यांनी संविधान रॅलीला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅली सुरू झाली.

संविधान रॅलीमध्ये ‘भारतीय संविधानाचा विजय असो’,  यासह छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत अकरा महिने, अकरा दिवस जगातील अनेक महत्त्वांच्या देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यामुळेच जगातील सर्वात जुन्या असलेल्या अमेरिकेच्या राज्यघटनेपेक्षाही सरस अशी भारतीय राज्यघटना तयार झाली. या राज्यघटनेने सर्वांना एकच मताचा अधिकार देऊन माणसामाणसातील जातिभेदाच्या, वर्णभेदाच्या आणि उच्चनीचतेच्या भिंती पाडून माणूस म्हणून समान पातळीवर जगण्याची ऊर्जा दिली. संविधानाची रक्षा करणे ही आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे.

संविधान रॅलीमध्ये प्रायव्हेट हायस्कूल, न्यू हायस्कूल, नेहरू हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, इंदुमतीदेवी हायस्कूल, साई हायस्कूल आदी शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, बाळासाहेब भोसले, दगडू भास्कर, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख जयश्री देसाई, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, संभाजी पवार, सुनिल खमितकर, सचिन पाटील, अरविंद रंगापूरे, बाळासाहेब भोसले, डी.जे.भास्कर, संदानंद दिघे, नामदेव कांबळे, वसंतदादा मुळीक, बबन रानगे, राजेश लाटकर, आदिल फरास, शरयू खत्री तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयाचे शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

संविधान दिनाची रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून केला. रॅलीमध्ये संविधानिक मुल्ये, संविधानाची कलमे, लोकशाहीची तत्वे, घोषवाक्ये आदी फलके होती. बिंदू चौक, छ. शिवाजी महाराज पुतळा, गंगाराम कांबळे यांचे स्मारक असे मार्गक्रमण करून दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन परब यांनी केले.

000

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा

नवी दिल्ली, दि. २६ : महाराष्ट्र सदन येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहिकपणे वाचन करण्यात आले.

यावेळी निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग  ,सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर  यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांच्या उपस्थित राज्य घटनेच्या  उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी निवासी आयुक्त सिंह यांनी राज्य घटनेच्या उद्देशिकेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, संविधान उदेशिका ही आपल्या देशाच्या मार्गदर्शक तत्त्वे आहेत. या उद्देशिकांवर आधारित आपण एक सुखी, समृद्ध आणि न्याय्य समाजाची निर्मिती करू शकतो.

या कार्यक्रमाला सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावर यांच्यासह महाराष्ट्र सदनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते..

संविधान ‍दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) संविधान ‍दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत आहे. आपण सर्वांनीही संविधानाचा आदर करून पुढे वाटचाल करूया, असे ते म्हणाले.

यावेळी मकरंद देशपांडे, महादेव कुरणे, गजेंद्र कुल्लोळी, मोहन वनखंडे, पांडुरंग कोरे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

000

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना

मुंबई दि. २६ : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.

यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबाची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या.

000

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...