रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 964

श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली – उपराष्ट्रपती जगदीप धनखड    

मुंबई, दि. २७ : भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याणाच्या मार्गातून मानवतेची सेवा केली आहे. त्यांचे मुंबईत निर्माण करण्यात आलेले स्मारक लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यांनी आज येथे काढले.

भारतीय संत श्रीमद् राजचंद्रजी यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त श्रीमद् राजचंद्रजी मिशन, धरमपूरच्या वतीने आयोजित आत्मकल्याण पर्व कार्यक्रमात उपराष्ट्रपती श्री. धनखड बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते चर्नी रोड स्थानकाजवळील रॉयल ऑपेरा हाऊस जवळ उभारलेल्या श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण आणि मॅथ्यूज रोडचे नामकरण श्रीमद् राजचंद्रजी मार्ग असे करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवश्री राकेशजी, मिशनचे अध्यक्ष अभय जसाणी, उपाध्यक्ष आत्मर्पीत नेमीजी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. समारंभात उपराष्ट्रपती श्री. धनखड यांना पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांच्या हस्ते ‘जनकल्याण हितैशी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

उपराष्ट्रपती श्री. धनखड म्हणाले की, महात्मा गांधींचे अध्यात्मिक प्रेरणास्थान असलेले श्रीमद् राजचंद्रजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणे हे माझे भाग्य आहे. श्रीमद् राजचंद्रजी यांचे कार्य श्रीमद् राजचंद्रजी मिशन व त्यांचे संस्थापक गुरुदेवश्री राकेशजी अविरतपणे चालवित आहेत. प्रत्येक सजीवासाठी ही पृथ्वी आहे. फक्त मानवासाठीच नाही, ही त्यांची शिकवण असून श्रीमद् राजचंद्रजी मिशनचे पशुवैद्यकीय दवाखाना हे मानवतेचे एक उत्तम उदाहरण आहे. आपल्या तीस वर्षांच्या आयुष्यात श्रीमद् राजचंद्रजी यांनी  आपल्या कार्यातून ठसा उमटवला. मुंबईतील स्मारक आणि मार्ग यामुळे राजचंद्रजी यांची आठवण देत राहील व लोकांना प्रेरणा देत राहिल. महात्मा गांधी व सध्याचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर श्रीमद् राजचंद्रजी यांच्या विचारांचा प्रभाव पडला आहे.

महात्मा गांधी हे मागील शतकातील महापुरूष होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत. महात्मा गांधी यांनी सत्य आणि अंहिसेने इंग्रजापासून आपल्याला स्वातंत्र्य दिले. तर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळ्या प्रगतीपथावर नेऊन ठेवले, असेही उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी यावेळी सांगितले.

गुरुदेवश्री राकेशजी यांच्या आशीर्वादामुळे माझ्यात ऊर्जा निर्माण झाली असून त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली आहे.  आज सामान्य माणूस भौतिक सुखाच्या शोधात आहे. तो अस्वस्थ, चिंतेत आहे. शिक्षण,समानता आणि चांगल्या वर्तणुकीतूनच देशात बदल होऊ शकतो. जनतेने आपले आचरण कायद्यानुसार केले तर संपूर्ण जगाला बदललेला भारत दिसेल. आपली संस्कृती वाढवून आपला देश अग्रस्थानी ठेवण्यावर भर द्यावा. आपल्या भारतीयत्वावर विश्वास ठेवावा, आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा भारतीय म्हणून अभिमान बाळगावा, असेही श्री. धनखड यांनी सांगितले.

संसदेच्या सभागृहात चर्चा व विचार विनिमय होण्याऐवजी गदारोळ व कटुता निर्माण होत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना संसद सदस्यांनी गुरुदेवश्री राकेशजी यांचे प्रवचन ऐकले तर त्याचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल असे श्री. धनखड यांनी सांगितले.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, संत श्रीमद् राजचंद्र हे एक यशस्वी उद्योजक होते. एकेकाळी त्यांनी संसाराचा त्याग केला आणि आत्मकल्याण हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. गुरुदेवश्री राकेशजी यांच्या माध्यमातून ‘श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर’ हे संत राजचंद्रजींनी दाखवलेल्या मार्गावर अखंडपणे चालत आहे, त्यासाठी मिशनचे सर्व सदस्य अभिनंदनास पात्र आहेत. ‘श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर’ आणि ‘श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर’ या संस्थांच्या मानवतावादी कार्यासाठी पुरस्कार मिळाले होते.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या वेळी संत जन्मले आणि अवतरले आणि इतर राज्यांतून स्थायिक झाले. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, समर्थ रामदास, शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंगजी यांचे पवित्र वास्तव्यही या भूमीत होते. त्याचप्रमाणे श्रीमद राजचंद्रजी यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी याच मुंबई शहरात ‘शतावधन’ आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. याच शहरात त्यांची महात्मा गांधींची भेट झाली. श्रीमद राजचंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाचा महात्मा गांधींच्या जीवनावर नेहमीच प्रभाव पडला, असेही राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

श्री. बैस म्हणाले की, जैन तत्त्वज्ञानात सांगितलेल्या अध्यात्माच्या महान तत्त्वांनी जगभरातील लोकांच्या अनेक पिढ्यांवर प्रभाव टाकला आहे. त्याच्या अहिंसेच्या चिरस्थायी वारशाने जीवन आणि निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आकारला आहे. आज जगाला शांततेची गरज असून मानवी जीवनातून शांतता दूर होत आहे. लोक तणावग्रस्त आहेत. समुदाय अस्वस्थ आहेत, राष्ट्रे युद्धात आहेत. आज वैयक्तिक पातळीवर, समाजात आणि राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. शाश्वत शांतीसाठी बंधुत्व व सेवेची भावना आवश्यक आहे. सेवेच्या भावनेनेच खरी शांती शक्य आहे. प्रेम, करुणा आणि सामायिकरण आणि सेवेच्या भावनेद्वारे शांतता प्राप्त करू शकतो. स्वातंत्र्याच्या अमृत काळात केवळ आत्मज्ञानच माणसाला अमरत्व आणि आत्मकल्याणाचा मार्ग दाखवू शकते, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रास्ताविकात मिशनचे अध्यक्ष अभय जसाणी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे सामाजिक अभियान हे मुंबई आणि महाराष्ट्रातील मानवतावादी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. यातून बहुसंख्य नागरिकांच्या जीवनात लाभ झाला असून त्यांनी उन्नती केली आहे. श्रीमद् राजचंद्र लव अँड केअर गेल्या दोन दशकांपासून देशातील ग्रामीण भागातील पीडित लोकांना विविध आरोग्य सुविधा मोफत पुरवत आहेत. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरच्या वतीने महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये तसेच उपराष्ट्रपतींचे मूळ गाव असलेल्या राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यामध्ये  दोन मोठ्या मोफत वैद्यकीय शिबिराची घोषणा करण्यात आली.

असे आहे स्मारक

‘श्रीमद् राजचंद्र स्मारक’ येथे श्रीमद् राजचंद्रजींच्या जीवनाला आदरांजली वाहणारी 70 फुटांहून अधिक भव्य भित्तीचित्रे आहेत. यामध्ये त्यांच्या जीवनतील महत्त्वाच्या घटना रेखाटल्या आहेत. स्मारकात खेळाचे क्षेत्र, रेखीय उद्यान, रिफ्लेक्सोलॉजी पथ, योग प्लाझा, बोटॅनिकल गार्डन, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्ये दर्शविणारी सार्वजनिक कला समाविष्ट आहे.

000

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल’चे उद्घाटन

नागपूर, दि. 27 – ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टीव्हलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  दोन दिवसीय फेस्टीव्हल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत कानसेन मोजिदा होते. यावेळी ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख तथा ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ड्रॅगन पॅलेस टेम्पलला पुढच्या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विकास कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची जगभरात ओळख निर्माण होत असून अनेक सामाजिक  व विकास कार्य होत असल्याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

जपानच्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे यावेळी अभिनंदन करीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘फूड कोर्ट’ चा शुभारंभ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील ‘फूड कोर्ट’ चा शुभारंभ करण्यात आला परिसरात येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यामुळे परिसरात उपलब्ध होणार  आहेत.

प्रदूषणमुक्त व शाश्वत शहरांसाठी ‘सर्कुलर इकॉनॉमी पार्क’ची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २७ – प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्कुलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्कुलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आ. टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केदार वझे, मृणाल ठाकूर आदी उपस्थित होते.

नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थापनांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.

अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासनस्तरावरून दूर करीत आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. गेल्या दहा वर्षात नागपूरचा वेगाने विकास झाला आहे. मात्र, घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत व अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची आता क्रमवारी नव्हती ती सुधारण्यास आता मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. देशाच्या एकूण जीडीपी मध्ये 65 टक्के वाटा हा शहरांचा आहे. शहरांचे महत्त्व लक्षात घेता शहरे प्रदूषणमुक्त असावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध उपाययोजना, प्रकल्प शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

नागपुरासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रॉडक्ट तयार होणार असून, मनपाला रॉयल्टी प्राप्त होणार आहेत. प्रदूषणमुक्तीकडे नागपूरचे हे पाऊल असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

आ. कृष्णा खोपडे यांनीही यावेळी आपले विचार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. तर  उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मानले.

 

000

 

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत – पालकमंत्री अनिल पाटील

नंदुरबार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ (जिमाका वृत्त) – नंदुरबार जिल्ह्यात २६, २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.

जिल्ह्यात २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अवकाळी पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व अनुषंगिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांचे तहसीलदार व तलाठी यांना नुकसानीचे पंचनामे तात्काळ करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका शासनाची नेहमिच राहीली आहे, नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांनीही संबंधित तहसीलदार, तलाठी यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करून घेण्याचे आवाहनही पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

000

अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 27 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदि पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आज निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार  अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमंगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहाय्यक योगेश निरभवणे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे येत्या दोन दिवसांत पूर्ण करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करावी. कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री  दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना अश्वासित केले.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्री गुरु नानक देव यांना अभिवादन

मुंबई,दि. २७ :- शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
नानकदेव यांचा जन्मोत्सव प्रकाशदिनाच्या मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिले.त्यांनी प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव यांची शिकवण दिली. त्यांचा शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. नानकदेव यांच्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांचे आयुष्य सदैव उजळून काढत राहील,’ अशा प्रकाशदिनाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी श्री गुरु नानकदेव यांच्या चरणी कोटी प्रणाम अर्पण केले आहेत.

000

राज्यपालांच्या हस्ते सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप यांना यावर्षीचा मदर टेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान

 मुंबई, दि.26 : सामाजिक न्यायासाठी मदर टेरेसा मेमोरियल अवार्डची स्थापना केल्याबद्दल आणि या पुरस्कारासाठी सर्वात योग्य व्यक्ती आणि संस्थांची निवड केल्याबद्दल मी हार्मनी फाउंडेशनचे अभिनंदन करतो.या वर्षीच्या मदर टेरेसा  स्मृती पुरस्कारासाठी सील आश्रम संस्थेचे संस्थापक के.एम. फिलिप यांना मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. हार्मनी फाऊंडेशनला त्याच्या भविष्यातील प्रत्येक कार्यात यश मिळो अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सांताक्रुझ येथील  हॉटेल ताज येथे मदर टेरेसा स्मृती पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल रमेश बैस बोलत होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले, डॉ. अब्राहम मथाई हे समाजातील विविध घटकांमध्ये समंजसपणा, सद्भावना आणि बंधुता वाढवण्यासाठी हार्मनी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करीत आहेत. आज खऱ्या अर्थाने जगाला भगवान महावीरांची गरज आहे, आज आपल्याला भगवान बुद्ध, महात्मा गांधी आणि मदर टेरेसा  यांच्यासारख्या महान राष्ट्र पुरुषांची गरज आहे, जे संपूर्ण मानवतेला पुन्हा शांती आणि सौहार्दाचा मार्ग दाखवू शकतील. सील आश्रम संस्था 1999 पासून मुंबईच्या रेल्वे फलाट आणि रस्त्यांवर आढळणाऱ्या निराधार, आजारी आणि बेघर लोकांसाठी काम करते. सील संस्थेने मुंबई आणि त्यालगतच्या उपनगरात सापडलेल्या बेघर आणि निराधार लोकांना केवळ वाचवलेच नाही तर त्यांचे पुनर्वसनही केले आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

सील आश्रमाच्या  कार्यामुळे आतापर्यंत 504 लोक त्यांच्या कुटुंबियांशी जोडले गेले आहेत, जे खरोखरच प्रशंसनीय आहे.राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले की,’सील’ आश्रमात तरुण आणि वृद्ध, स्त्री-पुरुष, आजारी, हरवलेल्या आणि सोडून दिलेल्या जीवांना नवीन जगण्याची संधी देतो. या आश्रमात मानसिक आधाराबरोबरच अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्यसेवा आणि उत्तम शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांचा शोध घेण्याचा आणि हरवलेल्यांना पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातो.

जमशेद जीजीभॉय, नाना शंकरशेठ आणि इतरांनी मुंबई शहर आणि येथील लोकांसाठी खूप सेवाभावी आणि परोपकारी कार्य केले. आजही अनेक उद्योजक आपल्या व्यवसायातील काही वाटा सामाजिक कार्यासाठी वापरतात. त्यांनी सील आश्रमासारख्या संस्थांना पाठिंबा द्यायला हवा, असे मत राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशा लोगो यांनी केले.

000

दिव्याज फांऊडेशनतर्फे शहिदांच्या कुटुंबियांचा सत्कार; श्री श्री रविशंकर यांना आतंरराष्ट्रीय शांतता पुरस्कार

मुंबईदि 26 : 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण झाले. यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारीकर्मचारी तसेच सैन्यातील शहिदांच्या स्मरणार्थ दिव्याज फाऊंडेशनच्यावतीने  गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित केलेला ग्लोबल पीस ऑनर‘  हा कार्यक्रम भर पावसात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजलसंधारण मंत्री संजय राठोड,  कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार अशिष शेलारश्री श्री रवी शंकरदिव्याज फाऊंडेशनच्या अमृता फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री यांनी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना प्रदान केला. यावेळी भर पावसात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाजी बाजी लावून मुंबई शहराला वाचवले. आज जी मुंबई दिसते ती त्यांच्या बलिदानाच्या भरोशावर उभी आहे. त्या शहिदांना कोटी कोटी नमन करुन त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. तसेच जगात शांतता नांदावी यासाठी श्री श्री रविशंकर यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. शांततेच्या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली आहेअसेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबईला वाचविण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या 26/11 च्या दहशतवादी हल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ आयोजित ग्लोबल पीस ऑनर‘ कार्यक्रमाला वर्षाराणिने सुद्धा हजेरी लावली आहे. ग्लोबल शांतता राबविण्यात अग्रेसर असणारे आणि जगाला शांतताप्रिय जागा बनविण्यासाठी सतत कार्यरत असणारे आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना आंतरराष्ट्रीय समुदायाने ग्लोबल पीस ऑनर‘ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. हा  पुरस्कार त्यांना देऊन एकप्रकारे  पुरस्काराचेच महत्त्व वाढले आहेअसेही त्यांनी यावेळी नमूद केले.

000

श्री क्षेत्र कपिलधार मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण तीर्थस्थान – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

बीड दि. 26, (जिमाका) : आपले राज्य हे शेतकऱ्याच, समाज सुधारकांच संत परंपरेचे राज्य आहे. या भूमित अनेक महान संत होवून गेले. वीरशैव समाजाचे संत मन्मथ स्वामी एक महान संत होते. त्यांचे मराठवाडा आणि आसपासच्या राज्यात असलेला प्रभाव बघून मी धन्य झालो, श्री क्षेत्र कपिलधार हे एक महत्त्वपूर्ण तीर्थस्थान असल्याची, भावना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी तीर्थक्षेत्र कपिलधार येथील जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली.

रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमेनिमित्त वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीश्रेत्र कपिलधार येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊली यांच्या संजीवन समाधीची शासकीय महापूजा शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच राज्याचे कृषि मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते सायंकाळी 4 वाजता झाली. त्यानंतर अखिल भारतीय शिवा संघटनेच्या वतीने आयोजित 28 व्या राज्यव्यापी मेळाव्यात संबोधित करतांना श्री. केसरकर बोलत होते.

दरवर्षी कार्तिक पोर्णिमे निमित्त श्री श्रेत्र कपिलधार येथे यात्रोत्स्वाचे आयोजन केले जाते. या निमित्त शासकीय महापूजा ही मागील 22 वर्षापासून होत आहे. यावर्षी शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या शासकीय महापूजेला वीरशैव लिंगायत समाजाचे शिवाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्यासह यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे तसेच असंख्य भाविक उपस्थित होते. या महापूजेनंतर आयोजित मेळाव्यात श्री. केसरकर संबोधित करतांना

ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा पाठविल्या असून ते लवकरच मन्मथ स्वामीच्या समाधीला भेट देतील. बीड जिल्हयातील  कपिलधार हे महत्वाचे तीर्थश्रेत्र असून या ठिकाणी आवश्यक तो निधी दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

शिक्षण खात्याचा मंत्री या नात्याने कौशल्य विकासावर भर दिला जात असून अधिकाधिक तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यासह पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या वर्गापासून कृषि हा विषय शिकविला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

बळीराजाच संकट दूर होवो श्रीश्रेत्र कपिलधारा येथे साकड – कृषि मंत्री धनंजय मुंडे

बळीराजाच संकट दूर होवो अस साकड श्री श्रेत्र कपिलधारा येथील महापूजेला केले असल्याचे  कृषि मंत्री श्री. मुंडे यांनी उपस्थित भाविकांना सांगितले.

पालकमंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, बीड जिल्हामध्ये ऐकीकडी परळी वैद्यनाथ येथे जोर्तिलिंग आहे. तर श्रीश्रेत्र कपिलधारा येथे मन्मथ स्वामीची समाधी आहे. असा सुवर्ण अध्यात्मिक  योग बीड जिल्ह्याला लाभला आहे.  आपण सर्वजण त्याचे पाईक आहोत, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. दि. माजी मुख्मंत्री विलासराव देशमुख आणि दि. केद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे  यांच्यामुळे येथे शासकीय पुजा सुरु झाल्याची आठवणही त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले बीड जिल्ह्यासाठी 100 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यापैकी 11 कोटी जिल्ह्याला मिळालेले आहेत. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी करुन उर्वरित निधी दिला जाईल.

बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ सुरु करण्याचे मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. श्रीश्रेत्र कपिलधार येथे येणाऱ्या पालख्या, दिंडी यांची निट व्यवस्था व्हावी यासाठी  प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी यावेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीश्रेत्र कपिलधारा येथे उपस्थित सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या तसेच लवकर संत मन्मथ स्वामीचे दर्शन घेण्याचे वचनही दिले.

या मेळाव्याचे प्रास्ताविक शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केले. या कार्यक्रमात मान्यवर मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आदिवासी आणि सर्वसाधारण क्षेत्राचा समतोल विकास साधणार -आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक २६ नोव्हेंबर, २०२३ (जिमाका वृत्त) – नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यात आदिवासी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असला तरीही, सर्वसाधारण क्षेत्रासाठी आदिवासी विकास विभाग व राज्याकडून निधी आणून आदिवासी आणि सर्वसाधारण क्षेत्राच्या विकासाचा समतोल साधला जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज शहादा तालुक्यातील टेंभे सह पंचक्रोशीतील गावांमध्ये आयोजित विविध विकास कामांच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या कृषि, पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्या वृंदावणी नाईक, गुलाब मालचे शहादा पंचायत समितीचे सभापती विरसिंग ठाकरे, राजू पाटील, पप्पू गिरासे, बापू गिरासे, दिलावर मालचे, करणसिंग गिरासे, भगवानसिंग गिरासे, भिकेसिंग गिरासे, आधार माळिच, महेंद्रसिंग गिरासे, दिवानसिंग गिरासे, राजेद्र पाटील, गजानन माळी व पंचक्रोशील स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, येणाऱ्या काळात शहादा तालुक्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र व उपयोजना बाहेरील क्षेत्र यात योग्य समतोल साधून गरजेनुसार विकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेथे आदिवासी विकास विभागामार्फत निधी द्यायचा तो देण्याबरोबरच सर्वसाधारण योजनांच्या निधीमधूनही भरीव तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून विद्युतीकरणासाठी २७ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, शासनाने प्रत्येक गरजूंना २ वर्षात घरकुल देण्याचे योजले आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यात एकाच वर्षात प्रत्येक गरजूला घर मिळेल यासाठी तरतूद करण्यात आली आहे. जो पात्र आहे, ड यादीत ज्याचे नाव नाही, ज्याच्याकडे स्वतंत्र रेशनकार्ड, आधार कार्ड, बॅंक पासबूक आहे त्याला अर्ज केल्यानंतर एका महिन्यात अर्ज केल्यानंतर त्याला घरकूल मंजूर केले जाईल. आदिवासी बांधवांसाठी ‘शबरी’ घरकुल योजना, अनुसूचित जातीच्या बांधवांसाठी ‘रमाई’ घरकुल योजना, भटके-विमुक्तांसाठी ‘अहिल्याबाई होळकर’ घरकुल योजना तसेच इतर मागासवर्गिय समुदायातील बांधवांसाठी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी’ घरकुल योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला स्वत:च्या हक्काचे घर मिळू शकते.

ते पुढे म्हणाले, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आनंदाच्या शिधा सोबत आता प्रत्येकाला साडी, पॅंट-शेर्ट दिला जाणार आहे. तसेच येणारे पाच वर्ष प्रत्येकाला मोफत धान्य देण्याचीही घोषणा प्रधानमंत्री यांनी केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून मुलींच्या शिक्षणालाठी ७५ हजार रूपयांची मदत, महिला बचत गटांना अर्थसहाय्याबरोबरच त्यांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून दिली जातेय. येणाऱ्या पाच वर्षात एकाही मजूराला स्थलांतरीत व्हावे लागणार नाही यासाठी त्यांना घरात रोजगार, गावात बाजारपेठ मिळवून देण्याचा शासनाचा मानस आहे. आपल्या जिल्ह्यात दुष्काळ प्रभावित क्षेत्रात शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण, विज सवलत, कर्जाचे पुनर्गठन, पिकविम्याची भरपाई यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. येणाऱ्या काशांत कर्जमाफीसाठी शासनाकडे आग्रही असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी टेंभे, देऊर,भडगाव, खैरवे, फेस या गावातील जलजीवन मिशनच्या ग्रामिण पाणीपुरवठा योजना, ठक्कर बाप्पा योजनेच्या आदिवासी वस्ती, सामाजिक सभागृह, रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, तीर्थक्षेत्र विकास, भक्त निवास उभारणे या कामांचे भूमीपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

000

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...