रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 93

भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंडमधील ‘बीएलओ’ पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई, १९ : भारत निवडणूक आयोगातर्फे झारखंड राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील अग्रभागी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय क्षमता-विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) येथे करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केले. प्रशिक्षणात झारखंडमधून आलेले ४०२ सहभागी अधिकारी सहभागी झाले असून, यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO), मतदार नोंदणी अधिकारी (ERO), BLO आणि पर्यवेक्षक यांचा समावेश आहे. मागील तीन महिन्यांत IIIDEM तर्फे देशभरातील ३००० पेक्षा अधिक निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त श्री.कुमार यांनी मतदार नोंदणीसाठी झारखंडमधील अधिकाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले. त्यांनी अधिकाऱ्यांना जनतेमध्ये मतदार यादी संदर्भातील प्रथम व द्वितीय अपील प्रक्रिया (आरपी कायदा १९५० च्या कलम २४(अ) आणि २४(ब)) बाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.

जानेवारी २०२५ मध्ये पार पडलेल्या विशेष सारांश पुनरावलोकनानंतर झारखंडमधून कोणतीही अपील प्राप्त झाले नाही.

या प्रशिक्षणात सहभागी अधिकारी मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रिया संदर्भातील आणि कायदे लोकप्रतिनिधि कायदा १९५०, १९५१, मतदार नोंदणी नियम १९६०, निवडणूक नियम १९६१ यांचे प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये फॉर्म ६, ७ व ८ भरण्याचे प्रत्यक्ष सराव, घरोघरी सर्वेक्षणाचे अनुकरण, आणि Voter Helpline App व इतर आयटी साधनांचा वापर यांचा समावेश आहे.

याशिवाय, सहभागी अधिकाऱ्यांना EVM आणि VVPAT यंत्रांची तांत्रिक माहिती, तसेच मॉक पोल्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

००००

संजय ओरके/विसंअ/

 

 

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास

मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्‍यमातून करण्यात आला आहे. या चित्र प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड् आशिष शेलार यांनी सांगितले..

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संत, महापुरुष, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास उलगडणाऱ्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात 21 मे पर्यंत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.

या चित्रप्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांपासून आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या मुख्यमंत्री व लोकनेत्यांपर्यंतच्या ऐतिहासिक वाटचालीचे दर्शन घडते. या प्रदर्शनात संत परंपरा, समाजसुधारणा चळवळी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, तसेच विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे.

महोत्सवाच्या माध्यमातून वैभवशाली परंपरेचा गौरव

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे. राज्यातील जनतेला गौरवशाली महाराष्ट्राची माहिती मिळावी यासाठी हे चित्र प्रदर्शन जिल्ह्यात फिरत्या वाहनाद्वारे आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले त्यांनी सांगितले.

अनेक संत-महापुरुषांचे कार्य, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्मे, महाराष्ट्र स्थापनेनंतर राज्याच्या प्रगतीसाठी कार्यरत मुख्यमंत्र्यांचे कार्य भित्तीचित्रांच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहे

स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे  छत्रपती शिवाजी महाराज, सार्वजनिक सत्यधर्म स्थापणारे महात्मा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संविधानाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य, समता, बंधूता ही मूल्ये देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अध्यात्माच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे संत बसवेश्वर, संत सावता माळी, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा यांच्या कार्याची माहिती सांगणारी भित्तीचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ऐतिहासिक लढ्याला सलाम करणारे ‘गर्जा महाराष्ट्र’ या दालनाअंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील, प्रबेाधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, शाहीर शेख जैनू चांद यासह अनेक हुतात्मांच्या माहितीद्वारे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास उलगडला आहे. तसेच समाजसुधारक, तत्वचिंतक, गायक, लेखक, खेळाडू आणि उद्योजक अशा दिग्गजांची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्री ज्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले अशा सर्व मुख्यमंत्री आणि लोकनेत्यांची माहितीही या प्रदर्शनाद्वारे पहावयास मिळणार आहे.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

संग्राह्य असे बीड कॉफी टेबल बुक – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड, दि. 19 (जि.मा.का.)  बीड जिल्ह्याची सचित्र आणि उत्तम अशी मांडणी कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे पुस्तक कुणालाही आपल्या संग्रही  ठेवावे असे वाटेल असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी केले.

बीड जिल्हा माहिती कार्यालयातर्फे नियोजन निधीतून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत  हा विमोचन सोहळा पार पडला.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार धनंजय मुंडे आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने तसेच पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

0000

बीडच्या विकासासाठी वाढीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड, दि. 19 (जि.मा.का.)  बीड जिल्हयाच्या विकासासाठी मी स्वत: अर्थमंत्री म्हणून अधिकाधिक निधी देत आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज झालेल्या बैठकीत जिल्हयाचा 575 कोटी रुपयांचा (सर्वसाधारण) आराखडा सादर करण्यात आला.

या बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने तसेच पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांची प्रमुख उपस्थिती होती.

समिती प्रतिनिधींमध्ये आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार धनंजय मुंडे आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित आदींनी या बैठकीत सहभाग घेतला.

वर्ष 2024-25 चा आराखडा 484 कोटी रुपयांचा होता ही संपूर्ण रक्कम 100 टक्के खर्च झाली आहे. याचा आढावा देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पुढील वर्षीच्या प्रस्तावित आराखडयाबाबत सादरीकरण केले.

मागील बैठकीतील इतिवृत्तावर या बैठकीत चर्चा होवून त्यास मंजुरी देण्यात आली.

गुणवत्तापूर्ण कामे आणि पारदर्शी कामांवर भर द्या व दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असे सांगून श्री पवार यावेळी म्हणाले की यापुढील काळात निधी जिल्हयाला थेट वर्ग न करता तो मुंबईहुन झालेल्या कामाच्या प्रमाणात जारी करण्याचे धोरण अंमलात आणले जाणार आहे.

गतवर्षी 484 कोटींचा आराखडा होता परंतू प्रत्याक्षात 446.30 कोटी इतका अंतिम आराखडा मंजूर झाला होता यात वर्ष 2025-26 करिता 128 कोटी रुपयांची वाढ करुन तो 575 कोटींचा करण्यात आला आहे. 2022-23 च्या तुलनेत यंदाचा आराखडा दुप्पट आहे हे उल्लेखनीय.

नियोजन समितीमधील कोणतेही काम 15 लाख रुपयांपेक्ष कमी असू नये तसेच कामाचे तुकडे पाडण्यात येवू नयेत प्रस्तावित जागेची मालकी तसेच त्याचे अक्षांश-रेखांश प्रस्तावित सामिल हवे अशा अटी यावर्षी घालण्यात आलेल्या आहेत.

कामाच्या ठिकाणी कामाच्या माहितीचे फलक अनिवार्य करण्यात आले असून कामांना प्रशासकीय मंजूरी प्रदान झाल्यावर 15 दिवसात त्याची निविदा प्रक्रिया करणे आवश्यक असेल अशा सर्वसाधारण सूचना नियोजन विभागाने यावर्षी जारी केल्या आहे.

वर्ष 2025-26 साठी ग्रामीण विकास अंतर्गत जनसूविधा व नागरी विकास 21 कोटी, जिल्हा आरोग्य अधिकारी 18.2 कोटी, जिल्हा शल्य चिकित्सक 28.50 कोटी, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय 20 कोटी, प्राथमिक शिक्षण 28. 50 कोटी, जलसंधारण 36 कोटी, महिला व बाल कल्याण 18. 39 कोटी, ग्रामीण रस्ते 105 कोटी रुपये आदीप्रमाणे नियोजन आहे.

पशुधन विकासासाठी 22.28 कोटींचा आराखडा आहे सोबतच राज्य शासन, सी.एस.आर. आणि नियोजन निधिमधून वेगळा दुग्धोत्पादन अर्थात धवल क्रांती योजना राबविण्याचा प्रस्ताव पशुधन विकास तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. तो या बैठकीत स्विकारण्यात आला.

यासोबत नागरी क्षेत्र विकास 63. 66 कोटी, उर्जा विकास 31 कोटी, पोलीस व तुरुंग आस्थापना 16.35 कोटी, महसूल व आपत्ती व्यवस्थापन 7. 43 कोटी, क्रींडागण विकास 4.20 कोटी रुपय असे नियोजन या आराखडयात आहे.

******

संयुक्त संसदीय समितीची समांतर निवडणुकांबाबत आढावा बैठक; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी साधला संवाद

मुंबई, दि. १९ : संविधान (१२९वा दुरुस्ती) विधेयक, २०२४ आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२४ संदर्भातील संयुक्त समितीची बैठक खासदार पी.पी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत एकत्रित निवडणुकांच्या संकल्पनेवर सविस्तर चर्चा झाली.

या चर्चेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व इतर प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. समितीने समांतर निवडणुकांच्या संविधानिक, व्यवस्थापकीय आणि संभाव्य परिणामांबाबत सखोल चर्चा केली.

शासनाच्या स्थिरतेच्या अनुषंगाने, संविधानातील दहावी अनुसूची आणि पक्षांतरविरोधी कायद्यावरही चर्चा करण्यात आली. याशिवाय, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल, मुंबई उच्च न्यायालय वकील संघटना, एमएनएलयू मुंबई, NSE, BSE, MACCIA आणि महाराष्ट्र अ‍ॅग्रो-इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

एकत्रित निवडणुकांमुळे होणारे कायदेशीर व आर्थिक फायदे, तसेच धोरणात्मक स्थिरतेतून मिळणारे लाभ या मुद्द्यांवर विचारमंथन झाले. संबंधित संस्थांनी एकत्रित निवडणुकांवर अधिक सखोल अभ्यास करून समितीसमोर अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.

या बैठकीदरम्यान प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांच्याशीही संवाद साधण्यात आला. यासंदर्भात त्यांनी आपली मते मांडली.

000

संजय ओरके/विसंअ

‘बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ पुस्तिका उपयुक्त ठरतेय – आयुक्त कैलास पगारे

मुंबई, दि. १९ : गरोदर माता व सहा वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागाच्या ‘एकात्मिक बालविकास सेवा योजने’अंतर्गत प्रकाशित करण्यात आलेली ‘बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ ही मार्गदर्शक पुस्तिका पालकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचे आयुक्त कैलास पगारे यांनी व्यक्त सांगितले.

जागतिक महिला दिनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

बालकांच्या कुपोषणाच्या समस्येवर मात करणे, बालमृत्यू दरात घट आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिले १००० दिवस महत्त्वाचे असतात. या कालावधीत गरोदर मातांनी स्वतःची योग्य काळजी कशी घ्यावी, बाळाच्या मानसिक आणि भावनिक गरजा कशा पूर्ण कराव्यात, यासंदर्भात तज्ञांच्या मदतीने ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

“मूल ही केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. बालपणापासून योग्य संगोपन झाले, तर देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत होतो,” असेही श्री.पगारे यांनी सांगितले.

पुस्तिकेच्या मलपृष्ठावर ‘माता-बाल संगोपन कार्ड’ आणि लसीकरणाबाबतची माहिती देणारा QR कोड देण्यात आला आहे. यामुळे पालकांना वेळेवर लसीकरणाची माहिती मिळू शकते. या QR कोडच्या साहाय्याने शासनाच्या योजनांची माहितीही मिळू शकते.

गरोदर स्त्रियांचे आरोग्य, पोषण, पूरक आहार, बालकांची वाढ आणि विकास याविषयी संक्षिप्त व उपयुक्त माहिती या पुस्तिकेत देण्यात आली असून, बालकांची सशक्त पिढी घडवण्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास पगारे यांनी व्यक्त केला.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १९ : पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून दहावीनंतर अभियंता होण्याचा मार्ग खुला करणाऱ्या पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या २० मे २०२५ पासून सुरू होत असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.

पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम हा नोकरी आणि उद्योगासाठी उपयुक्त पर्याय असून, अल्पकालावधीत तांत्रिक कौशल्य मिळवून रोजगार किंवा उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम शिक्षण महत्त्वाचे आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक क्षमतांनी सज्ज करणाऱ्या या अभ्यासक्रमामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

तंत्र शिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांमध्ये १०० टक्के प्रवेश सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. विद्यार्थ्यांना या शाखेकडे आकर्षित करण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करावेत.दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वास्तुकला विषयक तीन वर्ष कालावधीच्या पदविका अभ्यासक्रमामार्फत विद्यार्थी तंत्रज्ञ, अभियंता व यशस्वी उद्योजक होऊ शकतात, असेही श्री.पाटील सांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा तपशील, वेळापत्रक, नाव नोंदणी व अर्ज भरण्यासाठी https://dte.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

विलेपार्ले येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय मार्गी लावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. १९ : विलेपार्ले मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्रलंबित विषय संबधित यंत्रणांनी प्राधान्याने मार्गी लावावेत, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार पराग अळवणी, सचिव संदीप देशमुख, मुख्य अभियंता रामा मिटकर, उप सचिव चं. द. तरंगे, अवर सचिव दुर्गाप्रसाद मैलावरम आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले, उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांसंदर्भात विभागाने नियमानुसार उचित कार्यवाही करावी. तसेच भूखंड क्रमांक १८७, नगर योजना, विलेपार्ले (पूर्व) या भूखंडावरील योजनेमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. भोयर यांनी दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी समुपदेशन कार्यक्रम घ्यावा – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर 

मुंबई, दि.१९:- अतिरिक्त  ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात येते. ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झालेले नाही त्या शिक्षकांसाठी पुन्हा एकदा समुदेशन कार्यक्रम घ्यावा, असे  शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सांगितले.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत राज्यमंत्री श्री. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीस  संचालक (माध्यमिक) श्री. पालकर, संचालक (प्राथमिक) श्री. गोसावी, शिक्षण उपसंचालक संदीप संगवे, मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. कंकाळ आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले, मुंबईत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत समायोजन होण्यासाठी महापालिका व शिक्षण विभागाने एकत्रित बैठक घ्यावी. पती – पत्नी शिक्षक समायोजन संदर्भातील प्रकरणे वेगळी कळवावीत.

या बैठकीत शिक्षक संघटनांनी अतिरिक्त शिक्षक समायोजन, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन यासह शिक्षकांच्या समस्या मांडल्या. शिक्षक संघटनांनी मांडलेल्या शिक्षकांच्या समस्या सकारात्मकतेने सोडवल्या जातील असे, राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

राज्याचे ‘पार्किंग’ धोरण लवकरच आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १९  : वाहनांच्या पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ आणण्याचा विचार परिवहन विभाग करत आहे. या धोरणाची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (MMRDA) करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री  ‌प्रताप सरनाईक यांनी दिली.

या संदर्भात मंत्रालयात आयोजित मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमधील महापालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये श्री. सरनाईक बोलत होते. बैठकीस परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह  एम.एम.आर.डी.ए. मधील सर्व महापालिका आयुक्त उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एकात्मिक पार्किंग धोरण आणण्याआधी  अंमलबजावणी दृष्टीने कोणती त्रुटी राहू नये. यासाठी ज्या महापालिका क्षेत्रामध्ये  वाहतूक कोंडी समस्येने उग्र रूप धारण केले आहे, त्या महापालिका आयुक्तांच्या सूचना, अभिप्राय यांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाहनधारकाकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नसेल, तर  संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे असून त्यादृष्टीने महापालिका क्षेत्रामध्ये अशा पार्किंग जागा विकसित करण्याला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने राज्यासाठी पार्किंग धोरण तयार करत असताना सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये येणाऱ्या महापालिकांमध्ये ते प्रभावीपणे राबवावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचविले असल्याचेही श्री.सरनाईक यांनी सांगितले.

महापालिका क्षेत्रामध्ये पार्किंगच्या समस्येमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या सूचना तसेच अभिप्राय यांचा येणाऱ्या पार्किंग धोरणामध्ये समावेश केला जाईल, असे  श्री. सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रत्येक महापालिकेने त्यांच्या उद्यान आणि मैदानाच्या खाली पार्किंगची व्यवस्था निर्माण होईल, अशा पद्धतीने रचना करावी. ठाणे महापालिकेने मैदानाच्या खाली तयार केलेले वाहनतळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी पोलीस प्रशासन व मोटार वाहन विभागाच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करावी. रस्त्यावर अनेक वर्ष बंद असलेली वाहने तातडीने टोईंग करून हलवण्यात यावीत, रस्ते मोकळे करावेत. विकास आणि सुविधासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्यात यावेत. यासाठी मुंबई महापालिकेने उभारलेले पार्किंग प्लाझा धोरण इतर  महापालिकांनी स्वीकारावे, जेणेकरून भविष्यात शहराची पार्किंग समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

ताज्या बातम्या

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...