बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 915

पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी समिती नेमणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. १३ : पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणी मधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पीक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी केली.

चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरघोस तरतूद केली. सन 2016 नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला. तथापि, याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने पिक विम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला असून त्याची कार्यपद्धती, योजना व अंमलबजावणी यांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठित करावी असे आदेश कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

या समितीची कार्यकक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करुन एक महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुंडे यांनी दिले.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील फळपीक बागायतदारांना विमा भरपाईबाबत शासन सकारात्मक – कृषीमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील काजू उत्पादकांना विमा भरपाई देण्याबाबत तसेच वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण मंडळातील पात्र शेतकरी बागायतदारांना फळ पीक विमा अनुदान देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी  सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कृषी संचालक दिलीप झेंडे, अवर सचिव नीता शिंदे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी तसेच वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2022 -23 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील माडखोल, शिरशिंगे, कलंबिस्त, ओवाळीये, वेर्ले, पालपोली, कारिवडे निरुखे व भोम गावातील काजू उत्पादकांची नुकसान भरपाईची मागणी होती. वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण मंडळांतर्गत बागायतदार शेतकऱ्यांचीही अनुदानासंदर्भात मागणी होती. माडखोल येथील शेतकऱ्यांना सावंतवाडीऐवजी आंबोली महसूल मंडळाच्या अंतराची तांत्रिक बाब दुरुस्त करण्यासाठी पीक विमा तक्रार निवारण समितीकडे तक्रारी दाखल करण्याच्या सूचना करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – उद्योगमंत्री उदय सामंत

लातूर, दि. 13 (जिमाका): जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 760 प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. राज्यात सर्वप्रथम हे उद्दिष्ट पूर्ण केले असून जिल्ह्यात आतापर्यंत 762 नवउद्योजकांना कर्ज उपलब्ध करून त्यांना उद्योग उभारणीसाठी सहाय केले आहे. लातूर जिल्हा प्रशासनाने यासाठी राबविलेल्या कार्यपद्धतीचा ‘लातूर पॅटर्न’ आता राज्यातही राबविण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योग विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत उद्योग मंत्री ना. सामंत बोलत होते. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, नितीन वाघमारे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महासंचालक प्रवीण खडके, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, विविध बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रशासन आणि बँकांनी समन्वयाने काम करीत नवउद्योजकांना मदत केली ही अतिशय समाधानाची बाब आहे. यामुळे अनेकांच्या कुटुंबाला आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळणार असल्याचे ना. सामंत म्हणाले. तसेच लातूर जिल्ह्यात या योजनेसाठी राबविलेली कार्यपद्धती राज्यभर राबविण्यात येणार असून लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करून योजनेच्या लातूरमधील अंमलबजावणीबाबत माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यातील अतिरिक्त औसा, उदगीर आणि जळकोट येथील एमआयडीसीला उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाली आहे. लातूर अतिरिक्त एमआयडीसी, तसेच विमानतळासाठी 9.88 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांसोबत बैठक घेवून निर्णय घ्यावा. तसेच जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा निर्मितीचा सूक्ष्म कृती आराखडा सादर करावा. विमानतळासाठी एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या 38 हेक्टर जमिनीवर विकासकामे तातडीने सुरु करावीत. या जागेच्या संरक्षक भिंतीसाठी 8 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. या कामाची निविदा प्रक्रिया तातडीने सुरु करावी, असे ना. सामंत म्हणाले.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही ग्रामीण भागातील कारागीरांसाठी अतिशय उपयुक्त असून जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. मोहीम स्वरुपात काम करून या योजनेतून जास्तीत जास्त लोकांना सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही ना. सामंत यांनी यावेळी केल्या.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांचा सन्मान

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करणारा लातूर हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँकेचे अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

लातूरच्या नमो महारोजगार मेळाव्यात उद्योजकांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार

मराठवाडास्तरीय नमो महारोजगार मेळावा लातूर येथे 24 फेब्रुवारी 2024 होणार आहे. या महारोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी होवून युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योग विभागाच्यावतीने जास्तीत जास्त उद्योजकांना या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सांगण्यात येईल, असे ना. सामंत म्हणाले.

रेल्वे बोगी निर्मिती कारखान्याला पूरक उद्योग उभारणीसाठी स्वतंत्र बैठक घेणार

लातूर येथे रेल्वे बोगी निर्मिती कारखाना उभारण्यात येत असून याठिकाणी वंदे भारत रेल्वेच्या कोचची निर्मिती होणार आहे. या कारखान्यासाठी आवश्यक पूरक लघुउद्योग लातूर येथे सुरु होण्यासाठी लवकरच मंत्रालयात संबंधित विभागांची आणि उद्योजकांची बैठक घेण्यात येईल, असे ना. सामंत यांनी सांगितले.

उद्योजकांशी संवाद साधून जाणून घेतल्या समस्या

लातूर जिल्ह्यातील उद्योजकांशी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृह येथे संवाद साधला. यावेळी उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसी मार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती ना. सामंत यांनी उद्योजकांना दिली. तसेच काही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.

*****

महासंस्कृती महोत्सव, विभागीय १०० वे नाट्य संमेलनाचे थाटात उद्घाटन !

  • महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून मराठी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध

  • चांगले नाट्य लेखक घडविण्यासाठी नाट्य परिषदेने उपक्रम हाती घ्यावेत

लातूर, दि. 13 (जिमाका): मुंबईतील गरीब वयोवृद्ध नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्याकरिता वृद्धाश्रम उभारण्यासाठी मुंबईजवळच जमीन देण्याचे आपण जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेने अंबरनाथ येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत दोन एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. तसेच मराठी नाट्य कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने महासंस्कृती महोत्सव आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित महासंस्कृती महोत्सव, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाचे उद्घाटन उद्योग मंत्री श्री. सामंत बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी नमन गोयल, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर, सतीश लटके, शैलेश गोजमगुंडे, प्रदीप पाटील खंडारपूरकर, संजय अयाचित यांची यावेळी उपस्थिती होती.

राज्य शासन मराठी कलावंतांसोबत असून अखिल भारतीय नाट्य परिषदेला विविध उपक्रमांसाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यातही चांगले नाट्यकर्मी तयार होण्यासाठी नाट्य परिषदेने विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. महासंस्कृती महोत्सव, नाट्य संमेलनासारखे उपक्रम सातत्याने आयोजित होण्याची गरज आहे. चांगल्या नाटकासाठी चांगली संहिता गरजेची असते. त्यामुळे राज्यात चांगल्या नाट्य संहिता लेखकांचा शोध घेण्यासाठी स्पर्धांचे आयोजन केले जावे. नाट्य चळवळीच्या विकासासाठी बालनाट्य, हौशी आणि प्रायोगिक नाट्य रंगभूमीला बळ देण्याची गरज असल्याचे श्री. सामंत म्हणाले.

मराठी कलावंत आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महासंस्कृती महोत्सव सुरु केला आहे. यासोबतच लातूर येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विभागीय 100 वे नाट्य संमेलन होत असून जिल्हा प्रशासन आणि नाट्य परिषदेने या दोन्ही कार्यक्रमांचे चांगले नियोजन केल्याबद्दल श्री. सामंत यांनी समाधान व्यक्त केले.

सध्या ग्रामीण भागात अनेक चांगली नाटके लिहून सादर केली जात आहेत, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण कलाकारांनी भाषेची भीड न बाळगता आपल्या नाटकांची संहिता लेखन आणि सादरीकरण दमदार करण्यावर भर देण्याची गरज आहे. यामधूनच उद्याची व्यावसायिक नाटके आणि नाट्य कलावंत घडतील, असा विश्वास नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांनी व्यक्त केला. तसेच प्रायोगिक रंगभूमी ही व्यावसायिक रंगभूमीची प्रयोगशाळा आहे. येथेच कलाकार खऱ्या अर्थाने घडतात. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीला बळ देवून प्रायोगिक नाटकांची चळवळ रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महासंस्कृती महोत्सव, तसेच विभागीय 100 वे नाट्यसंमेलनामुळे लातूरचे सांस्कृतिक वैभव उजळणार आहे. तसेच लातूरमधील नाट्य चळवळ रुजण्यासाठी या कार्यक्रमांची मदत होईल, असा विश्वास पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांनी सांगितले.

लातूर येथे होत असलेल्या महासंस्कृती महोत्सव व विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाचे अतिशय चांगले आयोजन करण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अचूक कार्यक्रमांची निवड करून रसिकांना सांस्कृतिक मेजवानी देण्याचा प्रयाण कौतुकास्पद असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.

लातूर जिल्हावासियांना महासंस्कृती महोत्सव, तसेच विभागीय 100 वे नाट्यसंमेलनामुळे अतिशय चांगली सांस्कृतिक मेजवानी मिळाली असून या कार्यक्रमांच्या आयोजनाची संधी लातूरला दिल्याबद्दल आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

महासंस्कृती महोत्सव, तसेच विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाच्यामाध्यमातून जिल्हा प्रशासन आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या लातूर शाखेने नागरिकांसाठी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. यामाध्यमातून स्थानिक कलावंतांना संधी देवून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे भाऊसाहेब भोईर, सतीश लटके यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश गोजमगुंडे यांनी केले. यामध्ये त्यांनी महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलन आयोजनाचा हेतू विशद केला. नटराज पूजन आणि दीपप्रज्वलनाने महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय 100 वे नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नाट्यसंमेलन स्मरणिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मेहनत घेत असलेले शासकीय अधिकारी, नाट्य परिषदेचे पदाधिकारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

‘येळवस’ च्या दालनाला ना. उदय सामंत यांची भेट

महासंस्कृती महोत्सवात लातूरच्या आगळ्यावेगळ्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या वेळ अमावस्या अर्थात ‘येळवस’चे स्वतंत्र दालन दयानंद महाविद्यालय मैदानाच्या खाद्य दालनात उभारण्यात आले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटनाला उपस्थित मान्यवरांनी आज या दालनाला भेट दिले. तसेच येळवसला बनविण्यात येणाऱ्या भज्जी, आंबिल आणि उंडे या पदार्थांचा आस्वाद घेतला.

0000

 

चारचाकी वाहनांच्या आकर्षक व पसंती क्रमांकाद्वारे ४१ लाख रुपयांचा महसूल

मुंबई, दि. १३ : नागरिकांनी विविध आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांकासाठी परिवहन कार्यालयामध्ये येऊन अर्ज सादर केले आहेत. मान्यतेअंती पात्र अर्जदारांनी धनादेशाद्वारे व पसंती क्रमांकासाठी देय असलेले शासकीय शुल्क जमा केले आहे. यापोटी शासनाच्या तिजोरीमध्ये ४१ लाख ७३ हजार ६३३ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

परिवहन कार्यालयाच्या एमएच 03 ईएल या श्रृंखलेत विशेष करून 0001 या क्रमांकासाठी 4 लाख रूपये, दोन वेगवेगळ्या क्रमांकांसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये, 8 वेगवेगळ्या पसंती क्रमांकासाठी प्रत्येकी 70 हजार रुपये, 16 पसंती क्रमांकांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये, एका पसंती क्रमांकासाठी 22 हजार 500, 49 वेगवेगळ्या आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपये, 98 विविध आकर्षक व पसंती क्रमाकांसाठी प्रत्येकी 7 हजार 500 रुपये, 54 पसंती क्रमांकांसाठी 5 हजार रूपये, अशा प्रकारे एकूण 229 आकर्षक व पसंती क्रमांकांसाठी 38 लाख 22 हजार 500 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.  12 फेब्रुवारी पर्यंत एकूण 234 अर्जदारांकडून आकर्षक व पसंती क्रमांकासाठी एकूण 41 लाख 73 हजार 633 रुपयांचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे.

तसेच एकाच क्रमांकाला एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केल्यास त्या वाहन क्रमांकाचे लिलाव करून अर्जदाराला पसंती क्रमांकासाठी विहीत केलेल्या शासकीय शुल्का व्यतिरिक्त, अतिरिक्त शुल्क जमा करावे लागते. त्यानुसार या कार्यालयामध्ये 0901, 5050, 3333, 1111 व 6699 या पाच क्रमांकांसाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी क्रमांक आरक्षित करण्याकरीता अर्ज सादर केला होता. या पाचही क्रमांकासाठी एकूण 11 अर्ज प्राप्त झाले होते. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याने या पाच क्रमांकाचा लिलाव करण्यात आला व त्या – त्या क्रमांकासाठी अर्जदारांनी एकापेक्षा अतिरिक्त शुल्क संबंधित कार्यालयात जमा करून क्रमांक आरक्षित केला. या पाच क्रमांकांसाठी लिलावाद्वारे एकूण 3 लाख 51 हजार 133 रूपये शासकीय महसूल प्राप्त झाला आहे.

दुचाकी व चारचाकी वाहनांची नोंदणी डिलर पॉइंट नोंदणी प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. खासगी चारचाकी वाहनांची मालिका एमएच 03 ईएफ (MH03EF) ही पूर्ण झाल्याने चारचाकी वाहनांसाठी एमएच 03 ईएल ही नवीन मालिका 6 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे. या श्रृंखलेत आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा- डॉ. भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- ज्या योजनांचा लाभ दिल्याने लोकांचे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावते अशा योजना प्रभावीपणे राबवून लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज डॉ. कराड यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. प्रभारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत केंद्राच्या विविध योजना तसेच राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी बचतगटांना द्यावयाचा अर्थपुरवठा, चांगले काम करणाऱ्या गटांना कर्ज उपलब्ध करुन देणे, शहरी व ग्रामिण भागातील बचत गटांच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. तसेच उज्ज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना, रेशन कार्ड व त्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ याबाबतही डॉ. कराड यांनी आढावा घेतला. ते म्हणाले की, आयुष्मान कार्ड ही योजना म्हणजे आरोग्याची काळजी घेणारी योजना असून लोकांना आरोग्यावर होणारा आकस्मिक खर्चाचा भार कमी करणारी ही योजना आहे. तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा योजना ह्या गरिबांना अर्थ सहाय्य करणाऱ्या योजना असून त्यातून रोजगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक योजनेसाठी लाभ घेतांना आधार कार्ड संलग्नता असणे आवश्यक असून त्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावे,सए निर्देश डॉ. कराड यांनी दिले.

०००००

 

मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

मुंबई, दि.१३: महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा पोलीस विभाग करीत आहेत. निर्भया प्रकल्पांतर्गत प्राप्त निधीचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करून मुंबईत महिलांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी विविध बाबींवर आज मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

निर्भया योजनेंतर्गत मुंबई पोलिसांचे ‘श्वान पथक’ सक्षम करून गुन्हे सिद्धतेसाठी अधिकचे पुरावे मिळणार आहे. त्यामुळे महिला अत्याचार गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्यास मदत होईल.  वितरीत करण्यात आलेला निधीमधून या पथकाचे सक्षमीकरण होईल. यामधून श्वान पथकाची निश्चितच क्षमतावृद्धी होणार आहे.

रेल्वे पोलिसांना निर्भया प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या निधीचा उपयोग करून रेल्वे, लोकलमध्ये महिला सुरक्षेच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबई शहरातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये महिला सुरक्षिततेसाठी असलेल्या निर्भया पथकातील कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना ‘बॉडी वॉर्म कॅमेरे’ देण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे सिद्ध करतेवेळी पुरावे गोळा करण्यासाठी  निर्भया पथकातील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या अशा कॅमेऱ्यांमधील रेकॉर्डींग उपयोगी ठरणार आहे.

त्याचप्रमाणे या प्रकल्पांतर्गत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमधील तपास कार्य जलद गतीने पूर्ण  करण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने संवदेनशील भागात फिरत्या गस्त वाहनांची संख्याही वाढविण्यात येईल. तसेच महिला सुरक्षेबाबत जनजागृती मोहीमही राबविण्याचे प्रस्तावित आहे. अशा विविध बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

ग्रंथोत्सवास उत्साहात प्रारंभ

ग्रंथ आहेत जीवनाची प्रेरक शक्ती -ऋषिकेश कांबळे

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- मानवी जीवनाच्या प्रवासाच्या उद्वहनाचे विवेचन ग्रंथांमध्ये केले जाते. या जीवनाच्या परिक्रमेचा वेध  घेण्यासाठी ग्रंथाशिवाय उपाय नाही. ग्रंथ हेच जीवनाची प्रेरक शक्ती  आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी आज येथे केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, यांच्या विद्यमाने समता दर्शन वाचनालय सभागृह, समता नगर येथे ‘छत्रपती संभाजीनगर ग्रंथोत्सव 2023’ चे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे आज उत्साहात उद्घाटन झाले.

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले ग्रंथदिंडीचे स्वागत

प्रारंभी सकाळी क्रांती चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. तेथे राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. तसेच श्री. सावे यांनी ग्रंथोत्सवास शुभेच्छा दिल्या.  ग्रंथदिंडीत त्यात विद्यार्थी व साहित्यप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला. ग्रंथ दालनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सहाय्यक संचालक ग्रंथालय सुनील हुसे, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, ग्रंथालय संघाचे कार्यवाह गुलाबराव मगर, कैलास पब्लिकेशनचे कैलास आतकरे, राजशेखर बालेकर, समता दर्शन संस्थेच्या अध्यक्ष वर्षा वासाडीकर यांच्यासह विद्यार्थी, नागरिक आणि ग्रंथ प्रेमींची उपस्थिती  होती.

ग्रंथांतून मिळते सामर्थ्य

ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक ऋषिकेश कांबळे की, मनाची जोपासना ग्रंथ करत असतात. ग्रंथ वाचनातून भावनांची प्रेरक शक्ती प्राप्त होत असते. जीवनाचे संकल्प करण्याचे आणि ते प्रत्यक्ष आणण्याचे सामर्थ्य ग्रंथामधून व्यक्तीला मिळत असते. जीवन विकासाच्या प्रक्रिया समजून घेण्यासाठी ग्रंथाशिवाय  उपाय नाही.  उत्क्रांतीची प्रक्रियात श्रद्धा,प्रेम, आदरद्वेष, करुणा अशा विविध भावनांची ग्रंथाच्या वाचनातून माणसाला  प्रचिती येते.  संत वाड.मयाने परोपकाराची, समतेची भावना आपल्या साहित्यातून वाढीस लावली व माणूस म्हणून जगण्याची भावना केंद्रस्थानी ठेवून समतेचा संदेश दिल. ग्रंथ वाचनातून सर्व भावनांचे प्रगटीकरण होत. अनुभवसिद्धता मानवाला वाचनातून येत असते. अभिव्यक्तीसाठी ग्रंथाचे महत्त्व  अनन्यसाधारण आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.

बुधवार दि.१४ चे कार्यक्रम

दुसरा दिवस  सकाळी 11 वा. मंथन विषय ‘वाचन संस्कृती संवर्धानात माझा खारीचा वाटा’, अध्यक्ष डॉ. दादा गोरे, सहभाग दै.सकाळ चे मराठवाडा आवृत्ती संपादक संतोष शालीग्राम,  लेखाधिकारी शरद भिंगारे, साहित्यिक डॉ. ललित अधाने, साईबाबा वाचनालयाचे सचिव दुष्यंत आठवले, प्रकाशक भास्कर सरोदे.दुपारी 2 वा. परिसंवाद विषय : सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासासाठी विविध योजना, दुपारी 4 वा.समारोप होईल. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. धर्मराज वीर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, मसापचे कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे यांची उपस्थिती असेल.

ग्रंथोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी  सुभाष साबळे, समन्वय समिती  सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, शिक्षणाधिकारी (माध्य) एम.के.देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कार्यवाह मसाप डॉ. दादा गोरे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुभाष सोळंके आदींनी केले आहे.

00000

 

 

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १३ : देशात इंद्रधनुष्याप्रमाणे कृषी क्षेत्रात हरित क्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, डाळींच्या उत्पादनात पित क्रांती, मत्स्य उत्पादनात नील तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली. आगामी काळात पशुपालन, मत्स्य शेती व दुग्धव्यवसाय हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक  होणार असून या क्षेत्रात गुंतवणूक, उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला.

राज्यपाल श्री. बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूरचा (माफसू)  ११ वा दीक्षान्त समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालनाची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगून पशुविज्ञान विद्यापीठातील स्नातकांकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची तसेच रोजगार निर्मिती करुन ग्रामीण भागात उपजीविका उपलब्ध करुन देण्याचे सामर्थ्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या क्षेत्रातील स्नातकांनी पशुपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन या क्षेत्रात उद्योग सुरु करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विद्यापीठातील प्राध्यापक – स्नातकांनी २०२२ या वर्षी ‘लम्पी’ त्वचा रोगाच्या निर्मूलनाचे कार्य करताना अनेक प्राण्यांचे जीव वाचवले तसेच स्वदेशी गायींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

दोन महिन्यांपूर्वी आपण गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती असे सांगून मनुष्य व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या दीक्षान्त भाषणात मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अनिलकुमार श्रीवास्तव यांनी दुग्ध उत्पादन क्षेत्रातील श्वेतक्रांतीचा प्रभाव व सकल मूल्य हरित क्रांतीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. अन्नधान्य उत्पादनात देश आत्मनिर्भर आहे. पोषण सुरक्षेची समस्या दूध, अंडी, मासे व मांस यांच्या माध्यमातून सोडविता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.  वातावरणातील टोकाच्या बदलांचा मोठा परिणाम कृषी व अन्नधान्य उत्पादनावर होत असून राज्यात तसेच देशात पशुसंवर्धन व मत्स्यपालन उद्योग यातील मोठ्या क्षमतांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षान्त समारोहात १७९० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या, ९५ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके देण्यात आली तर तीन स्नातक विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली.

यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. ‘माफसु’चे कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी विद्यापीठ अहवाल सादर केला.

दीक्षांत समारोपाला विद्यापीठाचे माजी कुलगुरु, इतर विद्यापीठांचे कुलगुरु, विभाग प्रमुख, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.

०००

धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात २ हजार गाईंचे वितरण करणार; आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी ८ कोटींचा निधी ! – डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. 13: (जिमाका वृत्त) आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात १ हजार याप्रमाणे २ हजार गाईंचे वितरण करण्यात येणार असून आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी या दोनही तालुक्यांसाठी सुमारे सव्वा आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते धडगाव तालुक्यात बचत गटांना शेळी वाटप, महिला गृहिणींना गॅस कनेक्शन वितरण व वनपट्टेधारकांना लाभाच्या योजनांचे वितरण करताना बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नतिशा माथूर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, देवेंद्र वळवी व पंचक्रोशीतील स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले, आदिवासी भागातील सर्व रस्ते जून अखेरपर्यंत पूर्णत्वास येतील. या रस्त्यांच्या माध्यमातून शाळा, रूग्णालये, तालुका मुख्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा थेट रस्त्यांनी जोडले जाणार आहेत. त्यामुळे दळण-वळण व त्या भागातील उद्योग व्यवसायांच्या भरभराटीसही चालना मिळणार आहे. त्यात दुधाळ गाईंचे वाटप केल्याने दुग्ध व्यवसाय भरभराटीस येणार आहे. तसेच वनपट्टेधारतांना शेळ्यांचेही वितरण केले जाणार आहे. धडगाव अक्कलकुवा तालुक्यात आमचूरवर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ३ हजार महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीचेही वितरण करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना मार्गदर्शनाखाली आदिवासी, दुर्गम भागातील महिलांचे चुलीच्या धुरापासून बिघडणारे आरोग्य  लक्षात घेवून उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांच्या आरोग्य जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. येणाऱ्या काळात आदिवासी दुर्गम भागातील महिलांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत.

या कार्यक्रमात ४२ गटांना शेळी गट प्रमाणपत्र, ८८१ महिलांना गॅस कनेक्शन तर १०३ वनपट्टेधारकांना प्रत्येकी १० शेळी, बोकड वितरण करण्यात आले.

00000

ताज्या बातम्या

उमेदवारांनी रोजगार स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा – मंत्री प्रा. डॅा. अशोक उईके

0
Ø जाजू महाविद्यालयात रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्ती प्रतिसाद Ø मंत्र्यांच्याहस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण यवतमाळ, दि.23 (जिमाका) : युवकांच्या हाताला काम देणे शासनाचे प्राधान्याचे धोरण आहे. त्यामुळेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून...

राजधानीत लोकमान्य टिळक जयंती दिनी अभिवादन

0
नवी दिल्ली, 23 :  "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" या घोषणेचे प्रणेते, थोर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी निवासी आयुक्त तथा...

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास – सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

0
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्राचा ६० टक्के वाटा आहे. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये या सहकारी संस्थाचा...

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई दि. २३ : राज्य शासनाच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात कॉर्पोरेट फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने बाएफ (BAIF) द्वारे  राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरातील स्थानिक रोजगार...

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. २३ : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व...