शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 896

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन दिवस राखीव – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. १६ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय,दंत महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक झाली. बैठकीमध्ये राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्वंकष आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त यांनीही सर्व शासकीय अधिष्ठातांना अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अख्यत्यारितील सर्व वैद्यकीय, दंत, अतिविशेषोपचार महाविद्यालये रुग्णालयांमार्फत ६० वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळस मोफत आरोग्य चाचणी, तपासणी करण्यात यावी. ही आरोग्य तपासणीची नोंद आभा कार्ड, एच. एम. आय. एस. प्रणालीमध्ये घेतली जाईल.

ज्येष्ठ नागरिकांनी राज्यातील १.५० कोटी संख्या विचारात घेता सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीसाठी डॉक्टर व संबंधित चाचणी, तपासण्यांकरीता आठवड्यातील दोन दिवस राखीव ठेवण्यात येतील. सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीत दुर्दैवाने काही आजार आढळून आल्यास त्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अटी व शर्ती अनुसार उपचार करण्यात यावेत,

सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना आभा कार्ड उपलब्ध करुन देण्याची सुविधा असावी. अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

00000

राजू धोत्रे/विसंअ

 

‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’

मुंबई, दि. १६: पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून राज्याची संस्कृती, समृद्ध इतिहासाला उजाळा मिळणार आहे. इतिहासाची साक्ष देणाऱ्या जुन्नर शहरात तीन दिवस कला, संगीत, साहस अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यटक आणि सर्व नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

शिवनेरी फेस्टिवल २०२४ मध्ये विविध उपक्रम

पारंपरिक संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा समावेश असेलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, हस्तकला प्रदर्शन, चवदार आणि मनमोहक अशा पाककृती, कार्यशाळा, क्वाड बायकिंग, पेंटबॉल, तिरंदाजी, गिर्यारोहण, रॅपलिंग, झिपलायनिंग, स्पीड बोटींग, वॉल क्लाईंबिंग अशा साहसी खेळांचा अनुभव, कुकडेश्वर मंदिर, नागेश्वर मंदिर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर, काशी ब्रह्मनाथ मंदिर, अष्टविनायक मंदिर, लेण्याद्री मंदिर, ओझर मंदिर, ज्योतिर्लिंग मंदिर, भीमाशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन, निरभ्र रात्री लेकसाईड ग्लँपिंग आणि स्टारगेझिंगचा आनंद अनुभवता येणार आहेत. किल्ले हडसर, निमगिरी – हनुमंतगड, नाणेघाटासोबत जिवधनगड, कुकडेश्वर मंदिरासोबत चावंडगड. दोन दिवसीय गिर्यारोहण स्पर्धेत सहभागी व्हावे, कँपिंगसोबत हरिश्चंद्रगड ट्रेक आणि हडपसर – निमगिरी – हनुमंतगड – नाणेघाट – जिवधन येथे गिर्यारोहण  हा उपक्रम देखील आयोजित केला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम व विविध बचतगटांचे प्रदर्शन

या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून हे सर्व कार्यक्रम शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदान, तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे होणार आहेत. १७ ते १९ फेब्रुवारी २०२४ रोजी स.१० ते रात्री ९ वा. विविध बचत गटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे प्रदर्शन असेल. दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी, सायं. ६:३० ते ७:३० वा. छत्रपतींची मानवंदना शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाडा पर कार्यक्रम., सायं. ७.३० ते रात्री ९.३० वा. जाणता राजा (महानाट्य) चे आयोजन. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. ६.३० ते ७.३० वा. गर्जा महाराष्ट्र माझा ही नृत्य नाटिका, सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा गनिमी कावा हा कार्यक्रम. दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ११ शिवजन्मोत्सव सोहळा, सायं. ६:१५ ते ७ वा. महा शिवआरती कार्यक्रम, सायं. ६.३० ते ७.३० वारी सोहळा संताचा (नृत्य), सायं ८:३० ते ९.३० वा. शिवशंभु शौर्यगाथा-शिव सह्याद्री (महानाट्य) या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

जळकोट तालुक्याला विकासाचे नवे मॉडेल बनविणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

लातूर, दि. 15 (जिमाका) : जळकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सिंचन, रस्ते, पायाभूत सुविधांसह विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. तसेच तालुक्यात एमआयडीसी उभारण्यास राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार असून यापूर्वी मागास म्हणून जात असलेल्या जळकोट तालुक्याला विकासाचे नवे मॉडेल बनविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

जळकोट येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी ना. बनसोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे होते. माजी आमदार गोविंद केंद्रे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव, तहसीलदार सुरेखा स्वामी, गट विकास अधिकारी श्री. मेडेवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रा. श्याम डावळे यावेळी उपस्थित होते.

जळकोट येथे नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून करण्यात येत होती. आता बसस्थानकाची नवीन इमारत उभा राहणार असून यासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 1300 चौरस फुटाच्या या बांधकामामध्ये दहा फलाट, स्वच्छतागृहे, चालक आणि वाहकांसाठी विश्रांतीगृह, महिलांसाठी विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, वाहतूक नियंत्रण कक्षासह विविध आस्थापनांसाठी दुकान गाळ्यांचा समावेश असेल. येत्या वर्षभरात बसस्थानकाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास ना. बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच जळकोट येथे बस डेपो सुरु करण्याबाबत प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जळकोट आणि उदगीर येथे विविध समाजाचे स्वतंत्र भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नुकतेच उदगीर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भवनासाठी 14.96 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु असून ही कामे दर्जेदार आणि विहित कालावधीत होण्यासाठी सरपंच आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. उदगीर शहरासाठी भूमिगत गटार योजनेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. जळकोट शहरातही अशाच प्रकारे भूमिगत गटार योजना राबविण्यासह पायाभूत सुविधा निर्मितीला प्राधान्य दिले जाईल. जळकोट तालुक्यात स्वतंत्र न्यायालय सुरू करण्यासाठी लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे ना. बनसोडे यांनी सांगितले.

राज्य शासनाने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागातील आणखी 7 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट आणि उदगीर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु असून या कामांना गती देण्याबाबत संबंधित विभागाला आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार गोविंद केंद्रे, उपनगराध्यक्ष  मन्मथ किडे, व्यंकट पवार, श्याम डावळे, श्री. टाले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. विभागीय नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी प्रास्ताविकात जळकोट बसस्थानक नूतन इमरतीच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली. प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण व  भूमिपूजन करण्यात आले.

लोकाभिमूख प्रशासन राबविण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 16 : शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत, अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांत सांघिक भावना निर्माण होते. स्पर्धाच्या आयोजनातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रशासकीय कामाचा तणाव दूर सारल्या जावून नवचैतन्याने लोकाभिमूख प्रशासन राबविण्यास सहाय्यता होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले. विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहाने व दर्जेदारपणे पार पडतील, असा आशावाद व्यक्त करुन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय आयुक्तांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023-2024 चे दिप प्रज्वलन व क्रीडा मशाल पेटवून विभागीय आयुक्तांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक आर.एल. पोकळे, जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, रमेश आडे, संतोष कवडे, हर्षल चौधरी, प्रबोधिनीचे संचालक अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, राजू फडके, वैशाली पाथरे, क्रीडा व युवक सेवा विभागाचे उपसंचालक विजय संतान यांच्यासह विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा क्रीडा अधिकारी व पाचही जिल्ह्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचही जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंचे पथ संचलन होऊन मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बुलीदान राठी मुक बधीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांव्दारे श्रीराम भक्तीपर नृत्य आणि हेमंत नृत्य कला मंदीराच्या कलाकारांकडून शिवस्तुती नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्तम नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून टाळ्यांची दाद व वाहवाह मिळविली. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चमूने पथसंचलनात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांनी चमूचे अभिनंदन केले.

विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दि. 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत सलग तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे. यात पाचही जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी खेळाडू म्हणून सहभागी झाले आहे. क्रीडा स्पर्धे अंतर्गत दिवसाला क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बुध्दीबळ, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, थ्रोबॉल, रिंग टेनिस, क्रिकेट, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, धावणे, जलद चालणे, कॅरम आदी खेळांचा समावेश आहे. स्पर्धेची नियमावली तयार करण्यात आली असून स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी व्यवस्थापक, संपर्क अधिकारी व पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. दि. 18 फेब्रुवारीला स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेतांसाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी श्री. वाघमारे यांनी प्रास्ताविकातून दिली.

000

बारामती शहराच्या प्रगतीत उद्योग जगताचे महत्त्वाचे योगदान- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १६:  बारामतीच्या शहराला उद्योग-व्यवसायाचा समृद्ध वारसा असून शहराच्या औद्योगिक विकासात, पर्यायाने परिसराच्या प्रगतीत उद्योजकांनी मोठा हातभार लावलेला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती औद्योगिक विकास संघटनेच्यावतीने आयोजित उद्योजक मेळाव्याप्रसंगी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खनिजदार अबीरशाह शेख, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, जागतिक पातळीवर देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे. सन २०२८ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी त्यावेळी राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर असली पाहिजे. याकरीता राज्य शासन विशेष  प्रयत्न करीत आहे.

उद्योगधंद्याना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. विविध उद्योगपती, व्यापारी यांच्यासोबत चर्चा करुन त्यांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. अधिकाधिक उद्योजकांना आकर्षित करुन गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासोबत आवश्यक सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येत आहे.  विजेच्या दरात सवलत देऊन अधिकाधिक उद्योजकांना त्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न आहे.

उद्योजकांनी राज्यात माहिती व तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, डेटा सेंटर तसेच खाण उद्योग आदी विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ‘हरित हायड्रोजन धोरण’ करणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य आहे. ऊर्जा, वीज निर्मितीसाठी सौर पॅनल वापरण्यावर भर देण्यात येत असून शासकीय इमारती, सौर कृषीपंप तसेच अधिक वीज लागणाऱ्या घरगुती उद्योगधंद्याकरीता सौरऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे श्री.पवार म्हणाले.

नैतिक अधिष्ठानाने उद्योग, व्यवसाय करत असताना ते सचोटीने केले पाहिजे. उद्योग क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेचा वापर आवश्यक आहे. उद्योजक आणि ग्राहक यामध्ये विश्वाचे नाते निर्माण करुन उत्पादनाबरोबर ग्राहकांना उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल’ म्हणून बारामतीची ओळख

अलीकडच्या काळात बारामती तालुका विद्येचे, आरोग्याचे माहेरघर म्हणून ओळखला जात आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यवसायिक अशा सर्व क्षेत्रात बारामतीने सर्वसमावेशक प्रगती साधलेली आहे. परिसरात होत असलेल्या विविध विकासकामांमुळे राज्यात ‘सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल’ म्हणून तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. यामध्ये बारामतीकरांचे फार मोठे योगदान असून उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून बारामतीच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.पवार यांनी केले.

विमानतळ आणि रेल्वेमुळे विकासाला गती मिळते. त्यामुळे परिसराच्या विकासासाठी बारामती ते लोणंद ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योगधंद्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बारामती येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाचे १०० खाटांची क्षमता असलेल्या मंजूर रुग्णालयांच्याकरीता पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, या रुग्णालयासाठी आणखीन १००  खाटा वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बारामती येथे २ मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

काळाची गरज ओळखून युवकांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उद्योगांना अधिक कुशल कामगार मिळण्यासह बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता राज्यातील प्रत्येक महसूली विभागात ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि नमो हब स्किल मॅनेजमेंट प्रा. लि यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २ मार्च रोजी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पुणे विभागाचा ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बारामतीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये विविध कंपन्या आणून त्याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आज परिसरातील उद्योजक छोट-मोठे उद्योग उभारुन उत्पादनाची निर्यात करण्यापर्यंत यशस्वी झाले आहेत. वडिलोपार्जित आणि पारंपरिक उद्योगाचा विस्तार करताना आजच्या पिढीने त्यामध्ये काळानुरूप नवनवीन उद्योग सुरु केलेले आहेत. उद्योग क्षेत्राने अशीच प्रगती करीत शहराच्या विकासातही सहभागी व्हावे, असेही श्री. पवार म्हणाले.

बारामतीतील उद्योजकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक घेणार

बारामती औद्योगिक विकास संघटनेच्या विविध मागणीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत, संबंधित विभागाचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत मंत्रालयीन स्तरावर बैठक आयोजित करुन मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

यावेळी उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार, उद्योगमित्र पुरस्कार, निर्यातदार लघुउद्योजकांचा सन्मान करण्यात आला. तसेच संघटनेच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बारामती क्लब येथे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.

यावेळी बारामती औद्योगिक विकास संघटनेचे अध्यक्ष श्री. जामदार यांनी विचार व्यक्त केले.

0000

शाश्वत सिंचन आणि टंचाईमुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियान २.०

महाराष्ट्रात अलिकडच्या काही वर्षात पिकाच्या ऐन वाढीच्या काळात पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होतो असे आढळून आले आहे. राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्राची मोठी व्याप्ती, हलक्या व अवनत जमिनीचे मोठे प्रमाण, अनिश्चित व खंडित पर्जन्यमान यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता ह्या बाबी विचारात घेऊन टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 ते सन 2018-19 पर्यंत राबविण्यात आले‌.

जलयुक्त शिवार अभियानामध्ये एकात्मिक पद्धतीने ग्रामस्थ, शेतकरी व सर्व संबंधित विभागाच्या समन्वयाने शिवार फेरी करून नियोजनबद्ध रित्या कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे यामुळे हा कार्यक्रम एक लोकचळवळ झाली आहे. विविध मृद व जलसंधारणाचे क्षेत्रिय उपचार व ओघळ नियंत्रण उपचार, जुन्या उपचारांचे बळकटीकरण, आवश्यकतेनुसार दुरुस्ती, गाळ काढणे इत्यादी कामे/ उपचार एकूण 22 हजार 593 गावात मोहीम स्वरूपात राबवून त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये सहा लाख 32 हजार 896 कामे पूर्ण झाली असून 20 हजार 544 गावे जल परिपूर्ण झाली आहेत . अभियानांतर्गत झालेल्या कामामुळे जवळपास 27 लाख टी.सी.एम. पाणीसाठा साठवण क्षमता निर्माण करण्यात येऊन 39 लाख हेक्टर शेतीसाठी संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यात येऊन कृषी उत्पादकतेमध्ये शाश्वतता आणण्यात आली.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये क्षेत्र उपचार कामे यामध्ये कंपार्टमेंट बंडिग, ढाळीचे बांध, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, मजगी, अनघड दगडी बांध, शेततळे, जुनी भात शेती बांध दुरुस्ती, शेतबांध दुरुस्ती जुन्या बोडीचे नुतनीकरण/खोलीकरण इत्यादी. तसेच नाला उपचार कामे यामध्ये सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, गॅबियन बंधारा, वळण बंधारा, रिचार्ज शाफ्ट इत्यादीचा समावेश आहे.

या योजनेमध्ये 5700 गावांची निवड करण्यात आलेली असून  प्रस्तावित कामांची एकूण संख्या -1लाख 57 हजार 142 आहे. प्रस्तावित आराखड्याची प्रशासकीय मान्यता किंमत – रुपये  4412 कोटी आहे.

जलयुक्त शिवार अभियानाप्रमाणे जलसंधारणासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम), आदर्श गाव अशा काही योजना राबविल्या गेल्या.जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यश लक्षात घेता, राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ चा दुसरा टप्पा   03 जानेवारी, 2023 रोजी शासन निर्णयानुसार सुरू केला आहे. ज्यामध्ये पाणलोट विकास उपक्रमांच्या विविध कामांचा समावेश आहे, यामुळे पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत होऊन शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे.

0000

दत्तात्रय कोकरे,

विभागीय संपर्क अधिकारी,

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय मुंबई-३२

 

मराठा समाजासाठी शासनाच्या विविध योजना; भरीव निधीचा दिलासा

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात असलेल्या मागणीच्या अनुषंगाने इतर समाजाप्रमाणेच मराठा समाजासाठी देखील विविध योजना राबविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषगाने गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे मराठा समाजास मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांसाठी भरून निधी उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये शिक्षणाच्या योजनांना सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याने मराठा समाजातील नवी पिढी घडण्यास निश्चितच मदत होणार आहे. शासनाकडून या योजनांची  परिणामकारकपणे अंमलबजावणी होत असल्याने मराठा समाजाकडून शासनाबद्दल धन्यवाद देण्यात येत आहेत.

मराठा समाजाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय

या योजनांमध्ये प्रामुख्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत ७४ हजार ८७३ लाभार्थ्यांना ५ हजार ६५९ कोटी बँक कर्ज मंजूर त्यावरील ६०८.१२ कोटी रूपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आला आहे. महामंडळाकडून ३५ गट प्रकल्पांना  ३.३५ कोटी कर्ज वितरित करण्यात आले आहे. सारथी संस्थेचे पुणे येथील मुख्यालय इमारत आणि ६ विभागीय कार्यालये आणि लातूर व कोल्हापूर येथील उपकेंद्र तसेच ५०० मुले आणि ५०० मुलींच्या वसतिगृहासाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली. बांधकामासाठी रु.१ हजार १८८.८२ कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेंतर्गत ३ लाख ७९ हजार ३७३ विद्यार्थ्यांना १ हजार २९३ कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १७ लाख ५४ हजार ४९४ विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी रु.१ हजार २६२ कोटी मंजूर करण्यात आले आहे . छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी ३२ हजार ६३९ विद्यार्थ्यांना रु. ३१ कोटी वितरित करण्यात आले आहेत. तसेच यावर्षी ४४ हजार १०२ विद्यार्थ्यांना रु.४२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

मराठा समाजाच्या ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी रु.२१ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच ह्या योजनाचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थाना मिळणार आहे.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  प्रती विद्यार्थी, प्रती वर्ष  ६० हजार महानगराच्या ठिकाणी, रु.५१ हजार विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी, रु.४३ हजार जिल्ह्याच्या ठिकाणी आणि  रु.३८ हजार तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या १ हजार ५५३ उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

विविध न्यायालयीन प्रकरणात कोविड-१९ मुळे नोकरभरती प्रक्रिया रखडलेल्या उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन एम. पी. एस. सी. व अन्य शासकीय सेवेत ३ हजार २०० उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. एस. ई. बी. सी. मधून इ. डब्ल्यू. एस. व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय, अशा प्रकारे एकूण ४ हजार ७०० उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या ५८ विद्यार्थ्यांची यू. पी. एस. सी. (१२ आय. ए. एस., १८ आय. पी. एस., ८ आय. आर. एस., १ आय. एफ. एस., २ भारतीय वन सेवा, ५ सी. ए. पी. एफ. व इतर सेवा १२) तर ३०४ विद्यार्थ्यांची एम. पी. एस. सी. मार्फत निवड झाली आहे. सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत (पी. एच. डी. करीता) मराठा समाजाच्या २ हजार १०९ विद्यार्थ्यांना रु.११६.३४ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे.इ. डब्ल्यू. एस. अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश. तसेच एम. पी. एस. सी. मार्फत शासकीय सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सारथीमार्फत ३६ हजार ७२६ विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध योजना राबवताना त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही याबाबत सातत्याने आढावा घेत असतात त्यामुळे विविध योजनांच्या अंमलबजावणीत गती निर्माण झाली आहे.

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

कायद्याच्या चौकटीत टिकणारे व इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याच्या दृष्टिने चर्चा करण्यासाठी दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी  विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी  मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला आहे.

विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्धल कौतुक

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा   सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही

मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

0000

राजू धोत्रे

विभागीय संपर्क अधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,

मंत्रालय मुंबई-३२

 

नायगाव दादर येथे २२ व २३ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १६ : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर व  मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, ३ रा. मजला, शारदा मंगल कार्यालय, १७२, नायगाव, दादर (पूर्व) येथे होणार असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०-३० वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष लेखक, कवी, समीक्षक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत मुंबई शहर व जिल्ह्याच्या ग्रंथोत्सवाचे आयोजनानिमित्त ग्रंथ दिंडी, प्रदर्शन, विक्री, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असून या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्यिक-रसिकांनी लाभ घ्यावा, असे  आवाहन संयोजकांनी केले आहे.

ग्रंथोत्सवामधील कार्यक्रम-

गुरूवार दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता  ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. ग्रंथ दिंडीचा मार्ग : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू.) मनपा अग्निशमन केंद्र, दादर- रणजित बुधकर चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग – निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज चौक – – एस.एस. वाघ मार्ग-महात्मा गांधी चौक- महात्मा फुले रोड – शाहीर मधु कडू चौक – कार्यक्रम स्थळापर्यंत आहे. त्यानंतरसकाळी १०.३० वाजता ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार कालीदास कोळंबकर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उप सचिव प्रताप लुबाळ उपस्थित राहणार आहेत.

सकाळी ११ ते १ प्रमुख मान्यवरांचे स्वागत व मनोगत. महाराष्ट्रातील वाचन चळवळ उपक्रमांतर्गत १००० किशोर मासिकाचे वितरण, (प्रातिनिधिक स्वरूपात १०  विद्यार्थी) दु.२ ते ३.३० आभिवाचनात्मक  दृकश्राव्य कार्यक्रम मध्ये “महाराष्ट्रीय भारतरत्ने” दु. ४ ते ५.३० लेखक तुमच्या भेटीला मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रवीण बांदेकर यांची मुलाखत कवी विजय सावंत  घेणार आहेत.

शुक्रवार दि.२३ फेब्रुवारी २०२४ सकाळी. १०.३० वाजता मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनाचे भाषा संचालनालयाच्या भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते उद्घाटन. स. ११ वाजता माझे वाचन या विषयावर डॉ. नरेंद्र जाधव (अर्थतज्ञ, लेखक, शिक्षण तज्ञ, माजी राज्यसभा सदस्य, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व माजी मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई) व्याख्यान दु. १२.३० ते २  वसा वाचनसंस्कृतीचा सहभाग  या विषयावर परिसंवाद ( सहभाग डॉ. नंदकिशोर मोतेवार विभाग प्रमुख, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई) श्री. किरण येले (साहित्यिक, मुंबई) श्री. अशोक मुळे (डिंपल प्रकाशन, मुंबई) डॉ. दीपक पाटील (वाचक व ग्रंथप्रेमी, मुंबई)

दु. २.३० ते ४ वाजता ओंकार साधना, मुंबई निर्मित “कुटुंब रंगले काव्यात” एकपात्री काव्यनाट्यानुभव (सादरकर्ते : श्री. विसुभाऊ बापट, मुंबई) दु. ४ ते ५ या वेळात सह्याद्री वाहिनी कार्यक्रम वृत्त निवेदिका  दीपाली केळकर या “हास्यसंजीवनी” हास्य व विनोदाचे महत्त्व, साहित्यातील विनोदाचे विविध प्रकार, मान्यवरांचे किस्से, विडंबन, वात्रटिका, संत साहित्यातील विनोद यांनी सजलेला  कार्यक्रम सादर करतील.  सायं. ५-३० वाजता  ग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधीक गौरव व ग्रंथोत्सव समारोप. या  समारंभास एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबईच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे विभाग डॉ. सुभाष चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विशेष मुलाखत

मुंबई, दि. 16 : ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा चेतनेचा संचार करणारा प्रेरणामंत्र आहे. त्यांचे विचार जगभरात जनाजनांत आणि मनामनांत पोहोचविण्याचा निश्चय राज्य शासनाने केला आहे. यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री यांचे तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमातून केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ आदी प्रत्येक गोष्ट प्रेरणादायी आहेत. या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले. महाराजांच्या देदिप्यमान कारकिर्दीतील शिवराज्याभिषेक हा सर्वासाठी प्रेरणादायी दिवस असून त्यांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे सुरू आहे. या वर्षानिमित्त शिवराज्याभिषेकाचे महत्व अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी राज्य शासन राबवित असलेले उपक्रम, महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय, तसेच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यशासनामार्फत करण्यात आलेली तयारी याबाबत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून प्रधान सचिव श्री. खारगे यांनी माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव श्री. खारगे यांची मुलाखत शनिवार दि.17, सोमवार दि. 19 आणि मंगळवार दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत रविवार दि. 18 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदका पल्लवी मुजूमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

 

 

नवे संकेतस्थळ सांस्कृतिक कार्य विभागाला लोकाभिमुख करणारे ठरेल – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १६ :राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे संकेतस्थळ विभागाच्या कार्यप्रणालीला लोकाभिमुख करणारे ठरेल. सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सर्वांसाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणारे असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मंत्रालयात मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्य विभागाच्या https://cultural.maharashtra.gov.in/ या नव्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव  नंदा राऊत, अवर सचिव बाळासाहेब सावंत व सुमंत पास्ते, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे, दार्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक आणि सचिव डॉ. दिलीप बलसेकर आदी यावेळी उपस्थिती होते.

या नव्याने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर विभागातील विविध कार्यासने, क्षेत्रीय कार्यालये, महामंडळे आदींची माहिती देण्यात आली आहे. यावेळी अधिनस्त कार्यालये असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पुराभिलेख संचालनालय, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, दर्शनिका विभाग, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य हिंदी-सिंधी- गुजराती साहित्य अकादमी, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव आणि कोल्हापूर चित्रनगरी यांची माहितीही देण्यात आली आहे.

याशिवाय, विभागांची एकत्रित माहिती. विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती, विविध कार्यक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडिओच्या समावेशाने हे संकेतस्थळ वापरकर्त्यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सांस्कृतिक विभागाच्या विविध योजना, पुरस्कार, स्पर्धा व शिबिरे, महोत्सव, प्रशिक्षण कार्यक्रम आदींची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...