शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 859

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

मुंबई, दि. २७ : राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्ग, रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 645 कोटी रूपये खर्चाच्या वर्धा ते कळंब (जि. यवतमाळ) या 39 कि.मी लांबीचा रेल्वे मार्ग  व अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील 645 कोटी रूपये खर्च आलेल्या न्यु आष्टी ते अंमळनेर (जि. बीड) या 32.84 कि.मी लांब रेल्वे मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी रोजी  यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. तसेच वर्धा- कळंब स्टेशनपर्यंत नवीन रेल्वेला व अंमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेचा आरंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

रस्ते प्रकल्पांमध्ये 291 कोटी खर्चाच्या साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंत 55.80 कि.मी दुपदरी रस्ता काम, 378 कोटी रूपये खर्च असलेल्या सलाई खुर्द – तिरोडा (जि. गोंदीया) महामार्गावरील 42 कि.मी लांबीच्या क्राँक्रीटीकरण रस्ता काम, तसेच 483 कोटी रूपये खर्च आलेल्या वरोरा – वणी (जि. यवतमाळ) महामार्गावरील 18 कि.मी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पणही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना कार्डही प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ/

ठाणे येथे ६ व ७ मार्च रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

कोकण विभाग राज्यस्तरीय मेळाव्याच्या तारीख आणि ठिकाणामध्ये बदल

मुंबई, दि. २७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय  कोकण  नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आधी दि. 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होता. त्यानंतर ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी होईल असे जाहीर केले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव या होणाऱ्या मेळाव्याच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. हा मेळावा दि. 6 व 7 मार्च रोजी मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट ,चेक नाका ,ठाणे – ४००६०४ येथे होणार आहे, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता  ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून ६ व ७ मार्च रोजी हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स,इनवेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

या मेळाव्यात दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd   किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in  या लिंक वर उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 -120 -8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

दैनंदिन जीवनातील अधिकाधिक वापर मराठी भाषेला समृद्ध करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरण

मुंबई, दि. २७: तंत्रज्ञान युगात मराठीचाही मोठा पगडा आहे. जेवढी जास्त आपण दैनंदिन जीवनात ही भाषा वापरू तेवढी ती समृध्द होईल. दोन हजार वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा कधीही संपणार नाही. भाषा ही प्रवाही हवी. त्यात शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे.  त्यामुळे आग्रहाने मराठी वाचन, लेखन करावे लागेल. मराठी ही अभिजात होती, आहे आणि राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मराठी भाषा विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव  मनीषा म्हैसकर, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस आणि संस्थेस भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2023 या वर्षासाठी डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर मनोविकास प्रकाशन, पुणे या संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे असून श्री.पु.भागवत पुरस्काराचे स्वरूप तीन लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. त्याचबरोबर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 (व्यक्ती) डॉ.प्रकाश परब यांना तर संस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव या संस्थेस प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२३ (व्यक्ती) डॉ.कौतिकराव ठाले पाटील यांना तर संस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेस प्रदान करण्यात आला. प्रत्येकी दोन लाख रूपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठी दिन राज्यात सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा जागर होत आहे. ‘बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके’ अशी ही आपली मराठी भाषा आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी अजरामर साहित्यकृती तयार केल्या. मराठी समाज, भाषा विज्ञान वर डॉ. परब यांचे प्रभुत्व आहे. साहित्य क्षेत्रात कौतिकराव ठाले पाटील यांचे योगदान मोठे आहे. या आणि अशा अनेक भाषा प्रेमी साहित्यिक, लेखक यांनी मराठी भाषेला मानाचं स्थान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनसाठी राज्य शासनाने भरीव मदत केली. विश्व मराठी संमेलनाला पाठबळ दिले. जगभरातील मराठी बांधव त्यासाठी आले.

खऱ्या अर्थाने मराठी विश्वात्मक झाली असल्याची भावना  त्यांनी यावेळी व्यक्त केली.

परदेशातही मराठी मंडळी आपली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेथील मराठी मंडळांच्या माध्यमातून हे काम होत आहे.

दावोस येथे गेलो असताना प्रचंड थंडीत स्वागतासाठी मराठी मंडळी आली होती. रशियात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली, अशी आठवण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितली.  मराठी बद्दल आपुलकी वाढवायची आहे. त्यासाठी नवलेखकांना आपण प्रोत्साहन देत आहोत.  तांत्रिक व्यावसायिक शिक्षण मराठीत देण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईतील इतर भाषांतील शाळेत मराठी शिकवणे सक्तीचे: मंत्री दीपक केसरकर

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, साहित्यिकांचे वैचारिक स्वातंत्र्य आहे. त्यांच्या भूमिकेला पाठबळ देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख वरून दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. परदेशात आणि बृहन्महाराष्ट्र मराठी  भाषेचा जागर होत आहे. परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या अभ्यासक्रमासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जवळपास ७२ देशात मराठी बोलणारी मंडळी राहतात. बृहन्महाराष्ट्र भागात तेथील लोकांना संमेलनासाठी आपण मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या या क्षेत्रातील खाणाखुणा जपण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे मातृभाषेतून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी राज्य शासनाने सर्वप्रथम केली. मुंबईत मराठी भाषा भवनाची उभारणी होत आहे.  मराठी भाषा बृहन्महाराष्ट्र क्षेत्रात टिकावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबईला साहित्यिक भवनाची उभारणी केली आहे.  मराठी विश्वकोश कार्यालयासाठी वाई येथे नवीन जागा खरेदी करून त्यात स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  सध्या राज्यातील सहा शहरात आपण पुस्तकांचे गाव ही संकल्पना राबवित आहोत.

मराठी भाषा शिकविण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांवर मराठी शिकवणे सक्तीचे करण्यात. आले आहे.  तरीही  या शाळांनी त्याची अंमलबजावणी केली नाही तर त्या बंद करण्याचे पाऊलही उचलले जाईल, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय मंत्रालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये प्रत्येकाने आवर्जून मराठी बोलावे यासंदर्भात परिपत्रक काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विशाखा विश्वनाथ आणि एकनाथ आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ३९ पुस्तकांचे प्रकाशन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नवलेखक अनुदान योजनेत पुरस्कार प्राप्त सुधीर शास्त्री यांच्या माणूस या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर आणि कुणाल रेगे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुत्रसंचलन अभिनेता तुषार दळवी आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले. यावेळी जीवनगाणी प्रस्तुत मान मराठीचा सन्मान महाराष्ट्राचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

०००

दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू

मुंबई, दि. २७ :  अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून शिक्षकांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी घेण्यात आली.

दिव्यांग शिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाहतूक भत्ता वाढविण्याचा आणि २० फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्यातील ६ जिल्हा समन्वयक, ५२ विशेष तज्ज्ञ/ समावेशित शिक्षक व १५८ विशेष शिक्षक अशा २१६ कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रिकरण करून २०१८-१९ पासून केंद्रीय समग्र शिक्षा योजना अंमलात आली आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या योजनेची पुनर्रचना २०२० मध्ये करण्यात आली असून या योजनेत केंद्राच्या ६० टक्के हिस्स्यासोबत राज्य आपला ४० टक्के हिस्सा देत आहे. या योजनेत कार्यरत कर्मचाऱ्यांची भरती करार पद्धतीने करण्यात आली असून केंद्र शासनाने मंजूर केलेल्या एकक दराने मानधन देण्यात येत आहे,  या पदांना वाहतूक भत्ता देताना राज्य हिस्सा प्रमाणाबाहेर जात असतानाही दिव्यांग शिक्षकांच्या पाठिशी ठाम राहत वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापोटी मासिक सहा लाख २९ हजार १०० तर वार्षिक ७५ लाख ४९ हजार २०० इतका अतिरिक्त खर्च राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे.

०००

विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आज शासनाने सादर केला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.

हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वच घटकांचा विचार करणारा तसेच राज्याच्या समतोल विकासाचा आहे. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आधारित या अर्थसंकल्पाने शेतकरी, महिला, युवा, विविध समाज घटकांना मोठा दिलासा देणारा आहे. विदर्भातील सिंचन सुविधांसाठी 2000 कोटींची तरतूद त्यात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजना जाहीर करण्यात आली असून 8.50 लाख कृषिपंप पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. 37,000 अंगणवाड्यांना सुद्धा सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी 34,400 घरकुले बांधण्यात येणार आहेत. नागपूर विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी 578 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. सर्वच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठी आर्थिक तरतूद यात करण्यात आली आहे. राज्यात 2000 नवीन प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. आज मराठी भाषा गौरव दिवस असून कवितेचे गाव म्हणून वेंगुर्ला गावाचा विकास करण्याची सुद्धा तरतूद यात आहे. एकूणच आपल्या संस्कृतीचा गौरव सुद्धा यात आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

**

दीपक चव्हाण/विसंअ/

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गास १० टक्के आरक्षण

मुंबई, दि. २७ : सन २०२४ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१६ नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी २०२४ पासून अंमलात आला आहे.

या अधिनियमान्वये  ‘सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग’ असा नवीन वर्ग निर्माण करण्यात आला असून, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी यापुढे होणाऱ्या नोकर भरतीप्रक्रियेत आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये २६ फेब्रुवारी २०२४ पासून १० टक्के आरक्षण विहित करण्यात आले आहे.

यासाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी सुधारीत बिंदुनामावली विहित करण्यात आली आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण अधिनियम, २०२४. संदर्भात राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट (Caveat) दाखल करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

मागासवर्गीय वसतिगृहांमधील सोयी सुविधांमध्ये काळानुसार बदल आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. २७ : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना गरजेच्या असून 2011 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये बदलत्या काळानुसार बदल करणे आवश्यक असल्याने, शासन निर्णयात वेळोवेळी सुधारणा सोडविण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले बोलत होते. माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या ४४३ वसतिगृहात ४१ हजार विद्यार्थी आहेत.  त्यांना शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता २०११ च्या नियमानुसार देण्यात येतात. दर पाच वर्षांनी शासकीय निर्णयात सुधारणा करण्याचा शासन निर्णय असल्याने यामध्ये सुधारणा करून, आधुनिक काळानुसार विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यात याव्यात. तसेच, वसतिगृहांच्या इमारतींची डागडुजी करण्यात यावी. सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी  घेण्यात यावी. कर्मचारी पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. तसेच,  या समस्यांबाबत विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सफाई कर्मचारी यांच्यासाठीच्या मालकी हक्काच्या गृह योजनेचा आढावा यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी घेतला.

सौर ऊर्जा निर्मितीतून मोफत वीज देणार

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंतर्गत महाप्रीतच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन, सौर ऊर्जा, प्रधानमंत्री सुर्योदय योजना, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत या माध्यमातून मागासवर्गीयांना रोजगार निर्मिती व सौर ऊर्जा कनेक्शन केंद्र शासन देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून समाजातील सर्वस्तरातील नागरिकांना सोलार ऊर्जेद्वारे मोफत वीज देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मागासवर्गातील पात्र लाभार्थ्यांना अनुदान माध्यमातून इलेक्ट्रिक दुचाकी व तीन चाकी देण्यात येणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती करण्यास आणि मोफत वीज निर्मिती करण्यास मदत होणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले. ज्या खाजगी कंपन्या इलेक्ट्रिक वाहने तयार करतात. अशा कंपन्यांसोबत करार करून केंद्र सरकारच्या अनुदानाच्या माध्यमातून राज्यात योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

माटुंगा लेबर कॅम्प परिसरात पंचशील कमान उभारण्यास प्राधान्य द्यावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. २७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, दादर आणि दीक्षाभूमी, नागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

 

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेतला. बैठकीला माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अपर पोलीस आयुक्त अनिल बारसकर, मनपाचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, यांच्यासह प्रवीण मोरे, रेल्वे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी सांगितले की, सामाजिक न्याय, गृह विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेसमवेत सर्व विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर समन्वय करतात. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देतात. समन्वय समिती, नागरिकांकडून नव्याने आलेल्या सूचनांचाही सुविधांमध्ये समावेश करावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून घ्यावी. पाण्याची, शौचालयाची व्यवस्था चोख करावी. चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथील स्तूपाची रंगरंगोटी, सजावट आणि रोषणाईच्या चांगल्या सुविधा द्याव्यात. ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. स्मशानभूमीच्या चिमणीची स्तूपावरील काळवटपणा जाण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या.

अनुयायाच्या मागणीनुसार पाणी, लाडूंची संख्या वाढवावी

देशभरातील लाखो अनुयायी चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे येतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच अनुयायींची मागणी असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने लाडूंची संख्याही वाढवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण

दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन, फेसबुक याशिवाय विविध समाजमाध्यमाद्वारे होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून घरी असणाऱ्या अनुयायांना डॉ. बाबासाहेबांचे दर्शन घेता येईल. शिवाय राज्यभरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांवर परिसंवाद, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहनही श्री. आठवले यांनी केले. फिरते शौचालय, साफसफाई, सुशोभीकरणावर भर द्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था, कायदा सुव्यवस्थेवर भर द्यावा

लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असल्याने गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेवून यासाठी रांगेची चोख व्यवस्था करावी. शिवाय वाहतूक व्यवस्था, दिशादर्शक फलक, कायदा सुव्यवस्था चोख ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

माटुंगा येथे पंचशील कमान उभारण्यासाठी संबंधित विभागाकडे परवानगी मागितली असून प्रस्ताव सादर केल्याची माहिती नागसेन कांबळे यांनी दिली.

समन्वय समितीच्या सूचना

वॉटरप्रुफ मंडपाची व्यवस्था, दिवसभर प्रसिद्ध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. इंदू मिल स्मारकाबाबत होर्डिंग्ज, १५ मिनिटांचा लघुपट दाखविण्यात यावे. चेंबूरच्या उद्यानात अखंड भीमज्योत उभारण्यात यावी. जयंती काळात दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करावे, चैत्यभूमी परिसरातील मद्य दुकाने, बियरबार बंद ठेवावे. रेल्वेने मेगा ब्लॉक टाळावा, शिवाय रात्री उशिरापर्यंत लोकल ट्रेन सुरू ठेवावी. समाजभूषण पुरस्कार द्यावेत. विधानभवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अशोक स्तंभ, भीमज्योतींची सजावट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेजर शो, दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन, उद्यानाचे सुशोभिकरण, 24 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था, दोन स्पीड बोटी, स्वच्छतेसाठी पाच पाळ्यात 290 कर्मचारी, वैद्यकीय सुविधांची माहिती उपायुक्त श्री. सपकाळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलेल्या उपाययोजना, कामांची माहिती सादरीकरणातून दिली.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

विधानपरिषद इतर कामकाज

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली; सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळास मजबूत केलं – मुख्यमंत्री 

मुंबई,दि.२७ : मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत बसणारे आरक्षण दिले आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, ते आरक्षण एकमतानं दिलं आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण दिलं आहे. आज आरक्षण टिकणार नाही असे सांगून अशांतता का निर्माण केली जात आहे. आपण सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळास मजबूत केलं. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे .महाराष्ट्र विधानपरिषद नियम २८९ अन्वये चर्चेला उत्तर देताना  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  विधानपरिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, एकमताने मराठा समाजाला आरक्षण दिलं. आता हे आरक्षण टिकणार नाही, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली हे दुर्दैवी आहे, पण याचे कारण कुणी दिले नाही. गेल्या अनेक वर्षे मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता, अनेक आंदोलने झाली ती सर्व शिस्तबद्ध पद्धतीने होती जे ५६ मोर्चे निघाले होते ते मराठा समाज संयमी आहे आणि शिस्तीने वागणारा आहे हे त्यांनी दाखवून दिले होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील कुणबी समाजाला प्रमाणपत्र मिळत नाही ते प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली, या कामासाठी मदत कक्ष राज्यभरात स्थापन केले. दोन-अडीच लाख लोकांनी काम सुरु केले आणि ज्या नोंदी सापडत नव्हत्या, त्या सापडू लागल्या. त्याचा जो कायदा होता, १९६७ पूर्वीच्या नोंदी असतील तर जात प्रमाणपत्र दिले पाहिजे, ते काम आम्ही सुरु केलं. त्यापुढे जाऊन निवृत्त न्या. शिंदे समितीकडे हे काम सोपवलं. समितीने बारकाईने काम केले. त्यांना मुदतवाढ दिली पाहिजे असे मनोज जरांगे पाटील यांनीही सांगितले.  कुणबी प्रमाणपत्रे देणे सुरू झाले. त्यांनी नंतर सरसकट प्रमाणपत्राची मागणी केली पण तसे देता येणार नाही हे त्यांना सांगितले. कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही हे सांगितलं. इतिहासात कधी झाले नाही, ते पहिल्यांदा झालं तीन-तीन निवृत्त न्यायाधीश तिकडे पाठवले. नंतर सगेसोयरेची मागणी पुढे आली. मराठा आरक्षणावर त्यांच्या मागण्या बदलत गेल्या. अपवादात्मक परिस्थितीत राज्य शासन आरक्षण देऊन शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आपण जे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण आज दिले आहे, ते आरक्षण टिकणारे आहे. त्याचा मराठा समाजातील दुर्बल, गरिबांना लाभ होणार आहे. इतके वर्षे मराठा समाजाला आरक्षण देण्याची काही लोकांना संधी होती, पण त्यावेळी त्यांनी आरक्षण दिले नाही. मराठा समाज हा मागास आहे हे माहित असून देखील त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, मी जे बोलतो ते करून दाखवतो. हे धाडस मी दाखवले मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि आरक्षण दिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. आज आरक्षण टिकणार नाही असे सांगून अशांतता का निर्माण केली जात आहे? आपण सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळास मजबूत केलं. अधिसंख्य पदांवर ५ हजार जणांना नोकऱ्या मिळाल्या. हे प्रामाणिकपणे सरकारने केले. मनोज जरांगे यांना मी स्वतः भेटलो. कुठलाही इगो ठेवला नाही. पण राज्य सरकारने जे काही केले ते विसरून मनोज  जरांगे यांनी राजकीय भाषा सुरू केली. जाती -जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न होतोय. आम्ही कुणालाही फसवणार नाही. अधिसूचनेवर वर ६ लाख हरकती  व सूचना आल्या आहेत. त्यांचे विश्लेषण सुरू आहे. दगडफेक झाली त्याचाही पोलिसांकडे अहवाल आहे.  राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये. कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही, असे ते म्हणाले.

०००

बारीपाडा येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ जाहीर

मुंबई, दि. २७ :  वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा पहिला ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या पुरस्काराबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपूर येथे आयोजित ताडोबा महोत्सवात ३ मार्च रोजी श्री. पवार यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

राज्य शासनाने या पुरस्कार निवडीचा शासन निर्णय जाहीर करुन श्री. चैत्राम पवार यांच्या नावाची घोषणा केली. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सक्षमीकरण, स्वावलंबन, वनहक्क कायदा, कृषि विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर मागील २६ वर्षापासून श्री. पवार हे आदिवासी समाजासोबत काम करीत आहेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास 100 गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे. सध्या श्री. पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागासाठी या वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

वनभूषण पुरस्कार निवडीबद्दल मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले असून श्री. पवार यांचे आदिवासी क्षेत्रातील वनजमिनींच्या अनुषंगाने केलेले काम मोलाचे असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्थानिक नागरिकांना त्यासाठी प्रोत्साहित करणे, राखीव वनक्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातील गावात वृक्षलागवड आणि वनसंवर्धन आणि पर्यावरणासाठी त्यांचे काम उल्लेखनीय आणि इतरांना प्रेरित करणारे आहे, अशा शब्दांत श्री. मुनगंटीवार यांनी कौतुकोद्गार काढले.

चैत्राम पवार यांनी बारीपाडा येथे प्रथम पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर उपलब्ध केले असून धुळे जिल्ह्यात ते नियमितपणे अद्यावत केले जाते. संरक्षित क्षेत्रातून लागवड नसलेल्या रानभाज्यांची रेसिपी करुन जंगलातील पारंपरिक ज्ञान त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवले आहे. सिंचनासाठी भूजलाचा काटकसरीने वापर, मृद व जलसंधारणाची कामे, सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक आदी माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्य शासनाने या सर्वोच्च पुरस्काराच्या माध्यमातून घेतली आहे.

चैत्राम पवार यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी गौरविले गेले असून यामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी-2003, भारत जैवविविधता पुरस्कार -2014, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फौंडेशन सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार आदींचा समावेश आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...