बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 760

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

????????????????????????????????????

धुळे, दि. १६ (जिमाका) : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या व अखेरच्या टप्प्यासाठी सोमवार, 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, येत्या सोमवारी राज्यात पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून मतदारांना मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यात प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, मतदारांसाठी शेड, मेडीकल किट, मतदार सहाय्यता केंद्राची व्यवस्था करावी. मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शिका पुस्तिका तसेच अंध दिव्यांगासाठी ब्रेललिपी वोटर स्लिप मतदारांपर्यंत वेळेत पोहोचतील याची दक्षता घ्यावी. उन्हाची तीव्रता तसेच पावसाचे सावट या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या इपीक कार्डाचे वितरण झाल्याची खात्री करावी. एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्र असेल तेथे गर्दी टाळण्यासाठी मतदारांना बसण्यासाठी वेटींग रुमची व्यवस्था करावी. सूक्ष्म निरीक्षकांना विविध अहवाल देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावेत. दर दोन तासांनी मतदानाची अचूक आकडेवारी देण्यात यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्वरीत कार्यवाही करावी. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, मतदानाच्या काळात सोशल मीडीयावर प्रसारीत होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करावेत. कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी. चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांची तपासणी काटेकोरपणे करावी, ईव्हीएम मशीन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करुन आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.

ईव्हीएम मशीन हाताळतांना काळजी घ्यावी. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मतदारांना मोबाईल फोन वापरण्यास प्रतिबंध असल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मतदानाच्या दिवशीचे सर्व अहवाल विहित नमुन्यात आणि विहित वेळेत पाठवावे. मतदानासाठी मतदारांवर कुठलाही दबाव येणार नाही तसेच त्यांना कोणतेही अमिष दाखविले जाणार नाही याची दक्षता घेऊन निवडणूक निर्भय व निरपेक्ष पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, साक्री व शिरपूर विधानसभाक्षेत्रात मतदान प्रक्रिया पुर्ण झाली असूनही संबंधित क्षेत्रात एसएसटी पक्षक कार्यान्वित करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार दिव्यांगासाठी व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदारांना व्होटर स्लीप तसेच मतदान मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे.  निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार संघातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कॉस्टींगची सुविधा करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी 153 झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून 17 अतिरिक्त अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहे. ज्याठिकाणी गत पंचवार्षिकेत मतदानाची टक्केवारी कमी होती त्याठिकाणी स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, आचार संहिता कक्ष तसेच इतर कक्ष करीत असलेले कार्य, दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे श्री.गोयल यांनी यावेळी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी श्री. नरवाडे यांनी मतदार जनजागृती व सहभागीता कार्यक्रम (स्वीप) अंतर्गत राबविण्यात आलेल्या व सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच गृहभेटी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहचून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदिंबाबत माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपआपल्या विधानसभा मतदार संघात निवडणुकीबाबत केलेल्या तयारीची माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविक केले तर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या बैठकीस सहाय्यक निवडणूक अधिकारी राहुल जाधव (धुळे ग्रामीण), महेश जमदाडे (शिंदखेडा), सीमा अहिरे (धुळे शहर), बबनराव काकडे (बागलाण), नितीन सदगीर (मालेगाव बाह्य), पल्लवी निर्मळ (मालेगाव मध्य), राजय उत्पादन शुल्कच्या अधिक्षक स्वाती काकडे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपजिल्हाधिकारी संदिप पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

०००

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा    

चंद्रपूर, दि. १६ : निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

नियोजन सभागृह येथे आज (दि.16) मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आढावा घेताना ते बोलत होते. मंचावर सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे, नितीन हिंगोले आदी उपस्थित होते.

19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली असून ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले की, 4 जून रोजी तडाळी येथील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व इतर सर्वजणांचे अतिशय बारकाईने या प्रक्रियेवर लक्ष असते. तसेच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतमोजणीची प्रक्रिया समजावून सांगणे / दाखविणे आवश्यक आहे.

पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणेच आणि मॅन्युअलचा अभ्यास करून अतिशय पारदर्शक आणि अचूकपणे मतमोजणी करावयाची आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचा-याने गोपनीयता पाळणे आवश्यक असून कोणीही स्वत:चे मत व्यक्त करू नये तसेच प्रक्रियेची माहिती इतरांना देऊ नये. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकारी , कर्मचाऱ्यांनी तटस्थ असणे गरजेचे आहे. मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी, कर्मचारी व इतरांना मोबाईल, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास परवानगी नाही. संपूर्ण प्रक्रियेसाठी तीनवेळा रँडमायझेशन होणार असून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतमोजणी बाबत सर्वांनीच तयारी करून ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी सादरीकरण केले. तसेच ईव्हीएम मतमोजणीकरीता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल, पोस्टल बॅलेटकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएस मतमोजणी करीता 8 टेबल राहणार आहे. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट च्या मतमोजणीला सुरवात होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

वृक्ष लागवड आणि संपूर्ण स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर राबवा -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा दि. १५ :  निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून ग्रीन इम्‍पॅक्ट तयार करा. धरण क्षेत्रात आणि उजाड डोंगर, माळराणे या ठिकाणी विविध शासकीय योजना, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी माध्यमातून वृक्ष लागवड मोहिम मोठ्या प्रमाणावार राबवा, असे सांगून प्लॅस्टिक निर्मुलन उपक्रम हाती घेवून संपूर्ण स्वच्छता माहिमेही युध्द पातळीवर राबवा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई परिस्थिती आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपायुक्त नगरपालिका प्रशासन पुनम मेहता, टंचाई निवारण नोडल अधिकारी निलीमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, विजया यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, यांच्यासह प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेवून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उजाड डोंगर, वैराण माळराणे दिसत आहेत. ती हिरवीगार करा. वनविभागासह सर्व यंत्रंणानी पुढाकार घेूवन मोठ्या प्रमाणावर पुन्हा नवीन झाडे लावली पाहिजेत ती जगवली पाहिजेत आणि संवर्धित केली पाहिजे. याबरोबरच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, कचरा, घाण ही आपल्या डोळ्याला खटकली पाहिजे. आपण समाजाचा घटक आहोत. देशाचा नागरिक आहोत. आपला परिसर आपला गाव स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून संपूर्ण स्वच्छता मोहिम राबवा. पुढच्या पिढीसाठी प्लॅस्टिक घातक आहे याची जाणीव ठेवून कोणाचेही भय न बाळगता प्लॅस्टिकचे अनधिकृत साठे विक्री उत्पादन आदी ठिकाणी मोठया प्रमाणावर छापे टाका आणि प्लॅस्टिक निर्मुलनाची मोहिम युद्ध पातळीवर राबवा.

प्लॅस्टिक माणसांच्या आणि जनावरांच्या शरीरात पोहचले आहे. पाणी अन्न प्रदुषित होत आहे. हे दुष्ट चक्र तोडण्यासाठी सर्वांनी या मोहिमेमध्ये झटून सहभागी व्हा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी जलसिंचन विभागाने अनेक ठिकाणाची गळती काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे पाण्याच्या दोन आवर्तनामधील  कालावधी वाढून शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थितपणे पाणीपुरवठा झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीत दिली असता विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सातारा जिल्ह्यात हे काम अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी झाले असल्याचे सांगून त्यामुळे इतर कालव्यांची पाण्याची गळती काढून शेवटच्या घटकापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले.

चारा डेपो/ चारा छावणी मागणीचे फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी आणि सासवड या दोन ठिकाणचे प्रस्ताव शिफारशीसही शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा आढावा सादर केला यामध्ये त्यांनी मे 2024 मध्ये जिल्ह्यात टंचाई ग्रस्त गावे 210, आणि वाड्या 694 असून 3 लाख 25 हजार 156 बाधित लोकसंख्या आहे तर 2 लाख 8 हजार 806 बाधित पशुधन आहे. या साऱ्यांना 199 टँकरर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून 114 खाजगी विहीर आणि बोअर अधिग्रहीत करण्यात आल्याचे सागितले. सातारा जिल्ह्यात वाई व खंडाळा तालुक्यसाठी दुष्काळ निधी शासनाकडून प्राप्त झाला असून यामध्ये वाई तालुक्यासाठी 22 कोटी 41 लाख तर खंडाळा तालुक्यासाठी 17 कोटी 82 लाख इतका निधी बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी वितरीत करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. सदरचा निधी हा ई पंचनामा पोर्टलवर तहसलिदारांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात वाई व खंडाळा या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर करण्यात आला असून त्यामध्ये वाई तालुक्यातील 7 आणि खंडाळा तालुक्यातील 4 महसूल मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 89 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ/ दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या महसूल मंडळांमध्ये शासन निर्णयानुसार सवलती लागु करण्यात आलेल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पुर्ण करणे, विहीर खोलीकरण गाळ काढणे, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, रोजगार हमीतील कामे यासारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

खरीप हंगाम 2024 दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई परिस्थितीबाबत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुरघास लागवड उपक्रमास गती देण्यात येवून त्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. ज्या भागांमध्ये प्रकल्पांचे पाणी पोहोचले आहे तेथील शेतकऱ्यांना ज्वारी आणि मका यांचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पशुधनासाठी ओला आणि सुका चाऱ्याचे जुलै 2024 पर्यंत नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात बांबू लागवड अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून 10 हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे. पावसाला सुरुवात होताच पुन्हा या मोहिमेला गती देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

माझी वसुंधरा अभियान 4.0 शहरी भागासह ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा, दि. १५:  ग्रामीण भागातील गावे व शहरे स्वच्छ व सुंदर होण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 4.0 प्रभावीपणे राबवावे. हे अभियान राबविताना जास्तीत जास्त नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात माझी वसुंधरा अभियान 4.0 आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपायुक्त नगर पालिका प्रशासन पुनम मेहता, टंचाई निवारण नोडल ऑफीसर निलीमा धायगुडे, नगर प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील, नगर परिषदांचे  मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियानाचा  लाभ शहरी व ग्रामीण भागात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला झाला पाहिजे, असे सांगून आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लावणे आपल्या हातात आहे. गावे व शहरे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करा. या अभियानात शहरी व ग्रामीण भागातील शाळेंच्या नोंदी कराव्यात. नोंदी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा.

ग्रामीण भागातील गायरान जागेवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. मागील वर्षी ज्या गावांनी व शहरांनी माझी वसुंधरा अभियानात नामांकन प्राप्त केले होते त्यांनी नामांकन टिकविण्यासाठी पूर्ण वर्षभर हे अभियान राबवावे. या पुढे बैठक न घेता माझी वसुंधरा अभियानात सहभागी गावांची व शहरांची प्रत्यक्ष पहाणी करणार असल्याचेही आयुक्त  डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी शहरी व ग्रामीण भागात माझी वसुंधरा अभियान कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे याची माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

०००

२३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर युवा, महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रे – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव

ठाणे, दि. १५ (जिमाका):    लोकसभा निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहे, या निवडणुकांसाठी सर्व लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू आहे. मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून  23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहे.  यामध्ये युवा, महिला संचलित मतदान केंद्र आणि दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात युवा, महिला व दिव्यांग अशी मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

युवा मतदारसंघात मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी हे युवा असणार आहेत. युवा मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे 134 भिवंडी ग्रामीणमध्ये मतदान केंद्र क्रमांक 10 वाडा नगरपंचायत वाडा, मतदान केंद्र क्रमांक 291 ओसवाल इंग्लिश मीडियम हायस्कूल अंजुर, मतदान केंद्र क्रमांक 91 शिशुविहार शाळा दांडेकर पोस्ट ऑफिस जवळ, मतदान केंद्र क्रमांक 197 न्यू हायस्कूल जोशीबाग कल्याण, मतदान केंद्र क्रमांक 308 न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड, मतदान केंद्र क्रमांक 157 युवा मतदार केंद्र खाडे विद्यालय शहापूर या ठिकाणी युवा मतदान केंद्र असणार आहेत.

सखी महिला मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी या सर्व महिलाच असणार आहेत. महिला मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे महिला संचलित  135 शहापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्र क्रमांक 170 जिल्हा परिषद शाळा,वाशिंद, मतदान केंद्र क्रमांक 208 जिल्हा परिषद शाळा कांबे, मतदान केंद्र म्हणून 258 होली मेरी हायस्कूल राहनाळ, 136 भिवंडी विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्र क्रमांक 166 महिलां कर्मचारी संचलित  राईस हायस्कूल, भिवंडी, 137 भिवंडी पूर्व  मतदान केंद्र म्हणून 299 माध्यमिक विद्यालय नवीन बिल्डिंग भादवड, 139 मुरबाड अंतर्गत महिलांकरता मतदान केंद्र क्रमांक 238 हेवेनबल कॉन्व्हेंट स्कूल शिरगाव, आपटेवाडी बदलापूर याठिकाणी महिला मतदान केंद्र असणार आहेत.

तर दिव्यांग मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान कर्मचारी हे सर्व दिव्यांग कर्मचारी असणार आहेत.दिव्यांग मतदान केंद्रे पुढीलप्रमाणे केंद्र 154 मतदान केंद्र खाडे विद्यालय शहापूर, मतदान केंद्र क्रमांक 66 प.रा. विद्यालय, मतदान केंद्र 145 विस्डम अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल, अंसार नगर नागाव,  138 कल्याण पश्चिम मतदान केंद्र 6 महर्षी रघुनाथ कर्वे महापालिका शाळा क्रमांक 12 उंबर्डे, मतदान केंद्र क्रमांक 353 जिल्हा परिषद शाळा नांदप, मतदान केंद्र क्रमांक 60 राजश्री शाहू महाराज विद्यालय पवार कॉम्प्लेक्स बेलवली येथे असणार आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

०००

कल्याण पूर्वेतील खासगी आस्थापना, हॉटेलमधील मतदारांमध्ये स्वीपने केली मतदान जागृती

ठाणे,दि.१५ (जिमाका): येत्यालोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी कल्याण पूर्व येथील दुकानदार, हॉटेलचालक तसेच खासगी आस्थापनांमध्ये स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 24 कल्याण लोकसभा मतदार संघातील 142 कल्याण (पूर्व) विघानसभा मतदार संघाचे  सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अति.सहा.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वाती घोंगडे यांचे मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकाच्या (मतदार जनजागृतीपथक )  माध्यमातून सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो… लोकशाही बळकट करण्यासाठी आपले मत अमूल्य आहे .. तेव्हा सर्वानी मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन यावेळी दुकानदार, हॉटेलचालक व खाजगी आस्थापनांमधील मतदारांमध्ये स्वीप पथकाने केली. महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली मलंग रोड येथील महेश डेअरी, हॉटेल जयमल्हार, आहेर होंडा बाईक शोरुम, रंगीला बार ॲण्ड रेस्टॉरंट, कशीश बार ॲण्ड रेस्टॉरंट,  हॉटेल 50-50 धाबा इत्यादी खाजगी आस्थापनांमध्ये  जाऊन मतदान विषयक पत्रके वितरीत करुन तेथील कर्मचाऱ्यांना व नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच येत्या 20 मे रोजी मतदान करणेबाबत आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी प्रणव देसाई, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, भारती डगळे उपस्थित होते.

०००

१४२ कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील स्थिर सर्व्हेक्षण पथकाकडून ७ लाखांची रोख रक्कम जप्त

ठाणे, दि. १५ (जिमाका) :  24-कल्याण लोकसभा मतदारसंघातील 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) पथकाने काल रुपये 7 लाख इतकी संशयास्पद रोख रक्कम जप्त केली. कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन त्यांच्याकडे आढळलेल्या बेकायदेशीर वस्तू जप्त करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

कल्याण (पूर्व) रेल्वे स्थानक येथे काल दि. 14 मे 2024 रोजी एसएसटी पथकातील कर्मचारी प्रवासी पुलावरील टिकीट खिडकीजवळ प्रवाशांच्या सामानाची तपासणी करीत असताना जयेश पोटे (रा.पुना लिंक रोड कोळसेवाडी, कल्याण (पूर्व)) यांच्याकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा केली. त्यावेळी बॅगेमध्ये रोख रक्कम असल्याचे संबंधितानी सांगितले. परंतू, सदर रोख रक्कमेबाबत संबंधितांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच रक्कमेच्या पुराव्याबाबत काहीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे सदरची रक्कम रुपये 7 लाख पंचनामा करून जप्त करण्यात आली. जप्त केलेली रक्कम कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात सीलबंद करून जमा करण्यात आले असल्याची माहिती 142 कल्याण (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे पथकप्रमुख दीपेश राठोड यांनी दिली आहे.

०००

दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये १३३३ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

मुंबई, दि. १५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने निवडणूक विषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात पार पडले. या दोन दिवसीय प्रशिक्षणात 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

येत्या 20 मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी चारही लोकसभा मतदार संघांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील दहिसर विधानसभा मतदारसंघात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. हे प्रशिक्षण दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले.

प्रशिक्षण सत्राचा उद्देश मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना निवडणुकीसंबंधित आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करून निवडणुकांचे निर्विघ्न आणि विनाविलंब संचालन सुनिश्चित करणे हे होते. प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रिया, मतदार पडताळणी, मतदार व्यवस्थापन, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट  मशीनचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि संकट व्यवस्थापन इत्यादी विषय अंतर्भूत होते. दिनांक 14 आणि 15 मे या 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

अधिकाऱ्यांना प्रशिक्षणामार्फत प्रदान केलेल्या ज्ञानाचे कितपत आकलन झाले हे ऑनलाईन परीक्षेद्वारे पडताळण्यात आले. या प्रशिक्षणासाठी उपस्थितांनी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना निवडणूक व्यवस्थापनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली.

 

मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५४३ ज्येष्ठ नागरिक व ९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले, टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते. ३०-मुंबई दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात अर्ज केलेल्या ३१० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेत टपाली मतपत्रिकेद्वारे घरून मतदान केले. ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात २३३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सुविधेचा लाभ घेत घरून मतदान केले आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवार (दि.१४ मे) पासून गृह मतदानास प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय २ टीमची नियुक्ती केली आहे. ही टीम मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहे.

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात ७७३ ज्येष्ठ नागरिक व ४८ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली असून ३०-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ६०४ ज्येष्ठ नागरिक व २९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती श्री. यादव यांनी दिली.

मुंबई शहरात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत १९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सोमवार, १४ मे पासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी १९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील १३७३ कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले.

तर ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ६०१ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला. १६ मे, २०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.

टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित कर्मचारी यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे स्वागत

मुंबई, दि. १५ : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे आज भारताच्या दौऱ्यावर मुंबईत आगमन झाले.  पंतप्रधान डॉ. रॉली व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांचे ओबेरॉय हॉटेल येथे राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलींद हरदास यांनी स्वागत केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक  पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळात त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे परिवहन मंत्री रोहन सिनानन, क्रीडा व समुदाय विकास मंत्री शामफा कुडजो लेविस, भारतातील उच्चायुक्त डॉ. रॉजर गोपॉल आदींचा समावेश आहे.

००००

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था; मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, दि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ वयावरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदार समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक अधिकाऱ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
१५२ बोरीवली- कृतिका गंधारे- ९८३३४४०४२३,
१५३ दहिसर- वंदना हरीनामे- ९८२०११८४५७
१५४ मागठाणे- दिलिप दुर्गे-८७७५७२२४६० / स्मिता परमार- ९८२०४५७३२७
१५५ मुलुंड- राजाराम शेळके-९६५३१५८०७८ / कैलास जाधव- ९५६१४५८७९४
१५६ विक्रोळी- सुनिल पावळे-७२७६००९१४७ / सुप्रिया मोरे- ९८९२६६९५३०
१५७ भांडुप- निखिल मराठे- ८८८८८२४९५० / नम्रता कुलकर्णी – ७७३८३७६५७३
१५८ जोगेश्वरी- नुतन वंजारा- ९१६७१६६४१२ / स्मिता परब- ९८१९३६८८२७
१५९ दिंडोशी- प्रमोद पाटील-९८६९७२८१०० / योगेंद्र वसंत भांड-८०८७५००८९७
१६० कांदिवली- राजेंद्र माळवे-९९७०२३४९०९ / बिपीन वडे – ९०४९३६५०१८
१६१ चारकोप- रेखा गांगुडे – ९८२०९११२९०
१६२ मालाड- अर्चना लाळगे- ९९६९७९५०७८
१६३ गोरेगाव-  मंजू वैश्य-८३६९३०६८६० / साक्षी लाड- ९८३३३१७२१२
१६४ वसोवा- बालाजी कांबळे- ९९६०२८३१३१ / राजेश्री सदावर्ते- ७०५८७०६७८७
१६५ अंधेरी प- सचिन कटके- ८६२३९५२२८६ / अर्चना जाधव- ९९३०९९०७८९
१६६ अंधेरी पूर्व- सुनिता चव्हाण- ७९७७७६३४८७
१६७ विलेपार्ले- गोविंद पेडेकर- ९३२१९८२८०६
१६८ चांदिवली- बालाजी जानते-९८६९५६१७५६, ९७०२९५३८१५ / उज्वला चव्हाण- ९९६९३५०७६७
१६९ घाटकोपर (पश्चिम)- माधवी सावरकर- ८८५००७६६८२ / अश्विनी पळशीकर- ९८१९९३७८३७
१७० घाटकोपर (पूर्व)- प्रफुल्ला पुरबिया-९९१९७४८४५५ / संजीवनी पाटील- ७२०८०१८०४६
१७१ मानखुर्द- बाळू खोमणे- ९८९००००९०५  / सुरेश चव्हाण- ९२२१७७६९६१
१७२ अणुशक्ती- रेखा भोजने- ९८२०५८९७६१ / सुनिल आडे- ९८३३०२४९७६
१७३ चेंबुर- रश्मी तावडे- ९६१९८९७८९८  / सुनिता चिंदरकर- ९८२१४३४४६८
१७४ कुर्ला- संजू सोनावणे- ८९७६२३१९९० /  प्रशांत गर्गे – ९५२७०७६५६३
१७५ कलिना- सोमनाथ मठपती- ९८७२६५९६१९, ८०८७१०२९३२ / दौलतसिंग चव्हाण- ९८६ ०८७१५४६
१७६ बांद्रा (पूर्व)- सुभाष गढरी- ९८६९९४४४०५ / निलेश वांळूज- ९८९०३४२७६०
१७७ बांद्रा (पश्चिम)- अनिता ताटे- ९९६९००६७२४/ मिलिंद पांजरी- ८८०५७६८९२४

०००

ताज्या बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी

0
गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत मिलच्या एक तृतियांश जमीन संपादनाच्या नियमाची अंमलबजावणी - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १६ : मुंबईतील गिरणी जमिनीसंदर्भात 2019 पासून लागू...

विधानपरिषद इतर कामकाज

0
विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही - मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे  मुंबई, दि. १६ :...

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १६ : मेट्रो लाईन समवेत असणारे काशिगाव मेट्रो स्थानक ते काशिमिरा नाक्यापर्यंत तसेच मीरागाव ते काशिगाव मेट्रो स्थानकापर्यंतचे वाया आकाराचे पूल मुख्य...

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा मुंबई दि. १६ : वसई -...

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
नीरा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. १६ : नीरा उजवा कालवा १०० वर्षांहून अधिक जुना झाला असून, त्याच्या...