गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 756

पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जूनपासून बंधनकारक

कोरोनानंतर सार्वत्रिक साथीचे आजार समाजासाठी आव्हान ठरत आहे. मनुष्य प्राण्यांसोबत पशुंनाही साथीच्या आजाराची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था उपलब्ध करताना नोंदणी अभावी कोणतेही पशुधन वंचित राहू नये यासाठी आधार कार्ड च्या धरतीवर पशुंसाठी ईअर टॅगिंग केले जात आहे. सुदृढ, निरोगी व उपयोगी पशुधनासाठी १ जून पासून प्रत्येक पशूचे ईअर टॅंगिंग आवश्यक करण्यात आले आहे. जनावरांची खरेदी विक्री करताना देखील ही बाब आवश्यक करण्यात आली आहे. याची समस्त शेतकऱ्यांनी, पशुपालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

 

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी. संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करणे सोयीचे व्हावे यादृष्टीने, एखाद्या भागात उद्भवणारे आजार विचारात घेवून उपाययोजना करणे, पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्यादृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात येत्या 1 जून 2024 पासून तर ईअर टॅग शिवाय पशुधनाची खरेदी-विक्री बंद करण्यात येणार आहे. पशुंना शासनाकडून देण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यातून देय होणाऱ्या पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत  याचाही यात समावेश करण्यात आला आहे. याबाबत पशुपालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने सर्व पशुपालकांना नियमीतपणे करण्यात येत आहे.

पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम-2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व पशुधनास ईयर टॅगिंग करणे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे. बाजारात विक्रीसाठी  येणाऱ्या सर्व पशुधनास ईअर टॅगिंग करणे गरजेचे आहे.  दिनांक 1 जून 2024 पासून तर ईअर टँग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजार समितीमध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी-विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समिती घेणार आहे.

1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंग शिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था,दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाहीत. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले आर्थिक सहाय्य देय होणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाई रक्कम देय होणार नाही. राज्यातर्गंत विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणाऱ्या राज्यातील पशुधनास ईअर टॅगिंग केल्याचे व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेतल्याची खात्री करूनच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांनी आरोग्य प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी वाहतुक प्रमाणपत्र द्यावे. पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय ती करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर कार्यवाही होवू शकते. राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या राज्याबाहेरील प्रत्येक पशुनास ईअर टॅगिंग केले नसल्यास तपासणी नाक्यावरील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी या पशुधनास ईअर टॅगिंग करुन घ्यावी. तसेच त्यांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेण्यात यावी. 1 एप्रिल 2024 पासून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय बंद आहे. तसेच 1 जून 2024 पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा-गावातील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेले पशुधन बाजारसमित्यामध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी. पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरीत अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी संबंधित पशुपालकांची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशुंच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअर टॅगिंग क्रमांक नमूद करण्यात येणार आहे.

०००

  • अलका पाटील, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड

लोकसेवा मिळविण्यासाठी अडचणी आल्यास आयोगाकडे दाद मागा – आयुक्त डॉ. एन. रामबाबू

  • कायद्याविषयी दिली माहिती
  • लोकसेवा ऑनलाईन प्राप्त करण्यासाठी ‘आपले सरकार पोर्टल’चा करा वापर

अमरावती, दि. २४ : महाराष्ट्र राज्यातील पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अमंलात आणला आहे. त्याद्वारे प्रत्येक शासकीय विभागाने पात्र व्यक्तींना लोकसेवा प्रदान करणे कायद्याद्वारे बंधनकारक केले आहे. या कायद्याद्वारे राज्य शासनाच्या विविध 38 विभागाच्या एकूण 642 लोकसेवा अधिसूचित केलेल्या आहेत. त्यापैकी 451 सेवा ह्या ऑनलाईन पोर्टलवर प्रदान करण्यात येतात. नागरिकांनी कायद्याचे महत्त्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करुन घेण्यासाठी ‘आपले सरकार पोर्टलचा’ वापर करावा तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. एन. रामबाबू,  यांनी केले.

राज्य शासनाच्या विविध विभागाने अधिसूचना निर्गमित करुन अधिसूचित केलेल्या सेवांचा तपशिल,  त्या प्रदान करण्यासाठी लागणारी विहित कालमर्यादा, सेवा प्रदान करणारे पदनिर्देशित अधिकारी, सेवा प्रदान करण्यास विलंब होत असल्यास किंवा दिरंगाई होत असल्यास करावयाच्या प्रथम व द्वितीय अपिलाबाबतची माहिती प्रसिद्ध केलेली आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

या कायद्याच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. उर्वरित सहा महसूल विभागामध्ये आयोगाची प्रत्येकी एक विभागीय कार्यालय आहे. राज्य सेवा हक्क आयोग, अमरावती विभाग, अमरावती या कार्यालयाची स्थापना डिसेंबर 2021 मध्ये करण्यात आली आहे. अमरावती महसूल विभागासाठी डॉ. एन. रामबाबू,(भा.व. से.) (से. नि.) यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाचे कार्यालय ‘कार्य आयोजना इमारत, पहिला मजला, वन विभाग, उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहत मार्ग, कॅम्प, अमरावती 444602’ येथे कार्यरत आहे.

शासनाच्या विविध विभागानी अधिसूचित केलेल्या सेवा प्रदान करण्यामध्ये विलंब होत असल्यास अथवा दिरंगाई होत असल्यास, त्यानुषंगाने पात्र व्यक्ती या आयोगाकडे तृतीय अपिल दाखल करु शकतो, जास्तीत जास्त नागरिकांना या कायद्याची ओळख व्हावी यासाठी अमरावती विभागामध्ये झालेल्या विविध कृषि प्रदर्शनी, शासन आपल्या दारी कार्यक्रमांमध्ये आयोगातर्फे माहितीवर्धक स्टॉल लावण्यात आले होते. तसेच या कायद्याचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी आकाशवाणीवर मुलाखती व ध्वनीफिती प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. याशिवाय अमरावती महसूल विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व इतर जिल्हास्तरीय तसेच उपविभागस्तरीय शासकीय कार्यालयांमध्ये आयोगाकडून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 बाबत सजगता आणण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम व आढावा बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या अपिल प्रकरणांवर आयोगाव्दारे कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी अधिसूचित असलेली लोकसेवा प्रदान करण्यामध्ये दिरंगाई अथवा दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या प्रकरणांमध्ये आयोगाकडून दंडात्मक कार्यवाही सुध्दा करण्यात आलेली आहे.

या  कायद्याचे महत्व समजावून घेऊन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक लोकसेवा ह्या ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करुन घेण्यासाठी “आपले सरकार पोर्टलचा” सर्वसामान्य नागरिकांनी वापर करावा. तसेच अधिसूचित केलेल्या लोकसेवा प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्यास नागरिकांनी आयोगाकडे दाद मागावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयोज आयुक्त डॉ. एन. रामबाबू यांनी केले आहे.

०००

प्रवरा नदीपात्रात बचाव दलाच्या तीन जणांना वीरमरण

मुंबई. दि. २४ :  अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांच्या आदेशान्वये घटनास्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाअंतर्गत असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथील एक बचाव तुकडी दि.२२.०५.२०२४ रोजी १९.४४ वाजता रवाना करण्यात आली होती.

ही तुकडी घटनास्थळी पोहचून दिनांक २३.०५.२०२४ रोजी सकाळी ०६.०० वाजता अतिशय शौर्याने शोध व बचाव कार्य करतेवेळी नदी पात्रामधील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पाण्याचा तीव्रवेग व पाणी उसळी खात असल्यामुळे बोट पाण्याच्या भोवऱ्यात उलटून दुर्देवी घटना घडली. त्यात १ पोलीस अधिकारी व ४ पोलीस अंमलदार हे पाण्याच्या प्रवाहात अडकले, त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, सपोशि/०३ वैभव सुनिल वाघ आणि पोशि/ २८६ राहुल गोपिचंद पावरा यांना वीरमरण आले. तसेच दुर्घटनाग्रस्त बोटीमधील २ पोलीस अंमलदार यांना वाचवण्यात यश आले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस दल यांनी दिली आहे.

या घटनेची माहिती प्राप्त होताच महसूल मंत्री व अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार किरण लहामटे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, व स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली व वीरमरण आलेल्या

०००

८.९९ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड २५ जून रोजी

मुबंई, दि. २४: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.९९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.२४ जून, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि.२५ जून, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल,असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. २५ जून, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.९९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील.

०००

वंदना थोरात/वि.स.अ

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

मुंबई, दि. २४ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे सदस्य दिनांक ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर शुक्रवार, ७ जून २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी सोमवार, १० जून २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६  जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जुलै २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करु – राज्यपाल रमेश बैस

सातारा दि. २३ (जिमाका):  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्याची प्रत राज्यपाल कार्यालयास पाठवावी. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

या विद्यापीठाच्या कामकाज, अडीअडचणीबाबत महाबळेश्वर येथील राजभवनात राज्यपाल श्री. बैस यांनी आढावा घेतला. यावेळी राज्यपालांच्या सहसचिव श्वेता सिंघल, विद्यापिठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विजय कुंभार, उपसचिव रविंद्र धुरजड आदी उपस्थित होते.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची (समूह विद्यापीठ) स्थापना ऑक्टोंबर 2021 मध्ये झाली आहे. रयत शिक्षण संस्था ही देशातील अत्यंत जुनी व मोठी शिक्षण संस्था आहे. या संस्थेअंतर्गत सुमारे साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या समूह विद्यापीठाला शासनाने मंजुरी दिली असून समूह विद्यापीठांना मंजुरी देत असताना शासनाचे जे धोरण होते त्या प्रमाणे आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून उपलब्ध व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

यावेळी राज्यपालांनी विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असणाऱ्या करिअर संबंधित उपक्रम, स्किल ओरिएंटेड उपक्रम, त्यातून विद्यार्थ्यांसाठी निर्माण होत असलेला रोजगार, नोकऱ्या यांचाही आढावा घेतला. रयत शिक्षण संस्थेमार्फत बेळगावमध्ये चालविण्यात येत असणाऱ्या शाळांबद्दलही राज्यपाल श्री. बैस यांनी जाणून घेतले.

०००

जनतेशी घट्ट नाळ जुळलेला कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.२३: कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेले नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती.  त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेले नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

त्यांच्या जाण्याने कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दिवंगत पी. एन. पाटील यांचे कुटुंबिय, सहकारी, कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

०००

आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २३ : कोल्हापूरमधील येथील आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक असल्याचे सांगून त्यांनी पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, कोल्हापूर शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. एक सजग नेतृत्व, धडाडीचा लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रश्नांची उत्तम जाण आणि ते सोडवण्यासाठी ते सदोदित आग्रही असायचे. शेतकरी, पुनर्वसन,  कामगार, मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू असायचा. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सामजिक, राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

कालच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजल्यावर त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा राहुल पाटील यांच्याशी बोलून प्रकृती जरा स्थिर झाल्यास त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला आणून त्यांच्यावर उपचार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मलवल्याचे वेदनादायक वृत्त मला समजले. मी पी. एन. पाटील यांचे कुटुंबिय, सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या या सहृदयी नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.

०००

राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन

सातारा दि.२३ : राज्यपाल रमेश बैस यांनी आज सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन घेतले.

यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, क्षेत्र महाबळेश्वरचे सरपंच सुनिल बीरामने आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी पंचगंगा मंदिर दर्शन घेऊन कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री नदीच्या उगमस्थानास भेट दिली. तसेच श्री महाबळेश्वरची अभिषेक पूजा केली.

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनधिकृत व बेढब विकास कामे करुन विकास आराखडा हाणून पाडण्याचे प्रकार करणाऱ्यावर फौजदारी कार्यवाही करा : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

छत्रपती संभाजीनगर दि.22: महानगर प्रदेश विकास क्षेत्रात अनधिकृत व बेढब विकास कामे करुन मंजूर विकास आराखडा हाणून पाडण्याचे प्रकार होत आहेत. यामध्ये सामील शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, विभागीय कार्यवाहीस व दिलेल्या सूचनेस जुमानत नाहीत, असे स्पष्ट होत असल्याने अशा प्रकारात सामील विकासक व त्यांना मदत करणारे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही  होणे गरजेचे वाटते व त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 व इतर अनुषंगिक कायद्याखाली उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना प्राधिकृत करुन अशी प्रकरणे तपासून, फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशित करावे व याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास वेळोवेळी सादर करावा, असे पत्र विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

विकास आराखड्यामध्ये बनावट झोन दाखल्या आधारे निर्गमीत करण्यात येत असलेल्या अकृषिक परवानग्यांबाबत नगररचना विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सदर बाबीस आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, प्राप्त प्रकरणांची चौकशी करणे व संबंधितांवर गुन्हे दाखल करणे इत्यादी प्रकारची कार्यवाही करणे अपेक्षित असतानाही अधिकारी तसेच कर्मचारी स्वतःहून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नसल्याने मंजूर आराखड्यात अनुचित फेरबदल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे विकास आराखड्याचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे संबंधितांवर उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबतचा प्रस्ताव नगररचना विभागाचे संचालक अविनाश पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला मात्र संबंधितांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असेही विभागीय आयुक्त श्री. अर्दड पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम 2016 चे कलम 2 (ब) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर शहरा भोवतालचे काही क्षेत्र विशेष करुन “औरंगाबाद महानगर औरंगाबाद” म्हणून घोषित करण्यात आले आहे. अनुसूचित नमूद केलेल्या क्षेत्राचा उचित व सुव्यवस्थित विकास होण्यासाठी औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष प्राधिकरण म्हणून स्थापना करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत विकास परवानगी ही एकच शाखा कार्यरत असून, अन्य शाखांकरिता शासनाकडून अधिकारी तसेच कर्मचारी यांची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही. प्राधिकारणाचे कामकाम हाताळण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने, प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकामे होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरुपात संबंधित तहसिलदार यांना नियंत्रक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार नियंत्रक, अनधिकृत बांधकाम यांनी त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील आवश्यक अधिकारी तसेच कर्मचारी यांची नियुक्ती करुन, कार्यक्षेत्रात अनधिकृत होत असलेली बांधकामे तसेच अनधिकृत विकासकावर कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षित असल्याचे विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी पत्रात म्हटले आहे.

प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, गंगापूर, वैजापूर व पैठण या तालुक्यातील एकूण 313 गावांचा समावेश करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष 15 ऑगस्ट 2019 पासून विकास परवानगी, अनधिकृत बांधकाम प्रतिबंध व निर्मूलन इत्यादी कामकाज सुरू आहे. त्या अनुषंगाने कामकाजाबाबत क्षेत्रिय स्तरावरुन महसूल विभाग, नगरविकास विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या कामकाजातील अनियमिततेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळपाहणी व अभिलेख तपासणी केली असता चिन्हांकन केलेले नसणे, जलनिःसरणाची व्यवस्था नसणे, रस्ते नाहीत व पथदिवे नाहीत, खुल्या जागेबाबत नियमावलीचे पालन केल्याचे दिसून येत नाही. अंतिम परवानगी दिलेली असताना, जायमोक्यावर वाटसरु व प्रवासी व्यक्ती पाल ठोकून थांबलेले आढळून आल्याची निरीक्षणे देखील विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी पत्रात नमूद केल्या आहेत.

प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील या प्रकाराच्या अनुषंगाने संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून विसंगती आढळून येत असलेल्या प्रकरणांच्या अनुषंगाने उपायुक्त (विकास-आस्थापना) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करुन, युडीसीआर व एमआरटीपी तरतुदीखाली सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लेखी, मौखिक व बैठकीद्वारे वारंवार सूचना देण्यात येऊनही संबंधित नगररचना विभाग, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, दुय्यम निबंधक, नोंदणी विभाग, मुद्रांक जिल्हाधिकारी, सहजिल्हा निबंधक यांना विषयाची जाणीव झालेली असताना व संबंधित तहसिलदार कदाचित महसूल व निवडणुकीच्या कामामुळे कोणीही अजिबात लक्ष दिलेले नाही. या अधिकाऱ्यांच्या कामकाजांमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा अथवा प्रगती झाली नसल्याने, महानगर प्रदेश विकास आराखड्याचे अभंगत्व धोक्यात आल्याचा उल्लेख विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी पत्रात केला आहे.

महानगर प्रदेश विकास क्षेत्रात शासनास खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व नियोजनात्मक हानी पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनधिकृत व बेढब विकास कामे करुन, शासन मंजूर विकास आराखडा हाणून पाडण्याचे प्रकार आजही होत आहेत. यामध्ये सामील शासनाचे विविध विभागाचे अधिकारी, विभागीय कार्यवाहीस व दिलेल्या सूचनेस जुमानत नाहीत, असे स्पष्ट होत असल्याने अशा प्रकारात सामील विकासक व त्यांना मदत करणारे सर्व संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यावर फौजदारी कार्यवाही होणे गरजेचे वाटते व त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 व इतर अनुषंगिक कायद्याखाली उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना प्राधिकृत करुन, अशी प्रकरणे तपासून, फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेशित करावे व उपरोक्तप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास वेळोवेळी सादर करण्याबाबतही विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी पत्रात म्हटले आहे.

15 ऑगस्ट 2019 पासून खरेदी-विक्री व्यवहाराच्या प्रती उपलब्ध करून देण्याबाबत दुय्यम निबंधक यांना सूचना दिलेल्या असतानाही, सदर प्रति उपलब्ध न झाल्याने यामध्ये काही गडबड झाली असल्याचा संशय बळावत असल्याचेही विभागीय आयुक्त श्री अर्दड यांनी म्हटले आहे.

प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील अकृषिक परवानगी व त्या अनुषंगाने होत असलेल्या कामकाजासंबंधाने महानगर नियोजनकार, निवासी उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर, संबंधित तहसिलदार व संबंधित दुय्यम निबंधक यांची संयुक्त आढावा बैठक घेत देण्यात आलेले निर्देश

  1. केवळ छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाने मंजूर केलेल्या रेखांकनातील भूखंडांचीच खरेदी-विक्री दस्त नोंदणी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाने करावी.
  2. नियमितीकरण न झालेल्या गुंठेवारी भूखंडांची कोणत्याही परिस्थितीत खरेदी-विक्री दस्त नोंदणी करु नये.
  3. दस्त नोंदणी करताना शेतजमीन तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  4. मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी यासंबंधी तपासणी करावी व नियमित आढावा घ्यावा.
  5. मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी प्राधिकरण कार्यक्षेत्रातील 15 ऑगस्ट 2019 पासून भुखंडाचे नोंदणीकृत दस्ताऐवजांची कायदेशिर सत्यता तपासावी व त्याबाबतचा सविस्तर अहवाल नोंदणीकृत दस्ताऐवजांच्या प्रतीसह सादर करावा.
  6. नियोजन प्राधिकरणाने विकास परवानगी दिलेली नसताना देखील कोणत्या तरतुदीच्या आधारे अकृषक आदेश तसेच सनद निर्गमित करण्यात येतात? याबाबतची माहिती संबंधित तहसिलदारांनी सादर करावी.
  7. परस्पर बोगस अकृषक सनद तसेच आदेश बनवणाऱ्या विरुद्ध तसेच बनावट कागदपत्रे सादर करुन अकृषक आदेश प्राप्त करणाऱ्यांविरुद्ध कोणती कायदेशीर कार्यवाही केली जाते? याबाबतची माहिती संबंधित तहसिलदारांनी सादर करावी.
  8. यापुर्वी बोगस अकृषक आदेशाबाबत जी माहिती या कार्यालयाने तहसिल कार्यालयाकडून मागितली होती ती फक्त अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांनी अर्धवट सादर केली. उर्वरीत संबंधित तहसिलदारांनी परीपुर्ण माहिती तात्काळ सादर करावी.
  9. अकृषक सनद निर्गमित करतांना संचिकेसोबत सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांची सत्यता पडताळणी करावी व दस्तऐवजांचे प्रमाणिकरण झाल्यानंतरच अकृषक आदेश/सनद निर्गमित करावेत.
  10. तहसीलदार यांनी नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या विकास परवानगीतील नमूद मंजूर प्रयोजनासाठी अकृषक सनद/आदेश निर्गमित करावेत. केवळ झोन दाखल्याच्या आधारे तहसील कार्यालयाने कोणतीही अकृषक सनद निर्गमित करू नये.
  11. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपरोक्त सर्व बाबींची तपासणी करून नियमित आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल वेळोवेळी या कार्यालयास सादर करावा.
  12. 24 फेब्रुवारी 2020 रोजीच्या आदेशान्वये संबंधित तहसिलदार यांना प्राधिकरण क्षेत्रातील नियंत्रक, अनाधिकृत बांधकाम म्हणून प्राधिकृत केलेले आहे. त्यानुसार तहसिलदार यांनी त्यांच्या हृदीतील अनाधिकृत बांधकामाचा आढावा घ्यावा व प्राप्त /प्रदान अधिकारान्वये अनाधिकृत बांधकामावर कार्यवाही करावी.
  13. तहसिलदार यांनी स्वतः च्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करुन अनधिकृत विकास/ बांधकाम करणाऱ्या बांधकाम धारकास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 व 54 अन्वये विहित मुदतीची नोटीस देण्याची कार्यवाही करावी.
  1. विना परवानगी बांधकाम करत असलेल्या बांधकाम धारकांचे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 54 अन्वये काम थांबवणे व त्यांना नियमानुसार संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी घेण्याबाबत सूचना द्याव्यात.
  2. उक्त प्रमाणे बजावलेल्या नोटीसीनुसार मुदतीत अंमल न केलेल्या बांधकामधारकांचे अनधिकृत बांधकामे निष्कासित करावे.
  3. अनधिकृत बांधकाम निष्कासित न केल्यास संबंधित बांधकाम धारका विरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 व 54 अन्वये पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद करण्याची कार्यवाही करावी.
  4. तहसीलदार यांनी यासंबंधी नियमितपणे कार्यवाही करुन विहित नमुन्यात मासिक अहवाल सादर करावा.

******

ताज्या बातम्या

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
गोंदिया जिल्हा रुग्णालयातील अडचणींबाबत तात्काळ बैठक घेणार - मंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. १७ : गोंदिया जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या...

सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाकरिता नवीन अभ्यासक्रम ऑगस्टपासून सुरू होणार –...

0
मुंबई, दि. १७ : सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून सर्वतोपरी...

पत्रकारांच्या एसटी प्रवास सवलतीत सुधारणा होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती...

महावितरणला सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १७ : ऊर्जा विभागाने वीज निर्मिती व खर्च याबाबत योग्य नियोजन केले तर ग्राहकांना माफक दरात वीज वितरण करणे शक्य होणार आहे....

आगामी कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 17 : आगामी काळात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या दृष्टीने शिर्डी विमानतळ हे महत्त्वाचे विमानतळ असणार आहे. त्यामुळे हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी नूतनीकरण व...