रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 64

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

पंढरपूर, दि. ५ (जिमाका): आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमवेत पालखी खांद्यावर घेऊन दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.

टाळ मृदंगआणि विठू माऊलीच्या गजरात वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघाले. प्रारंभी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे श्री माऊलींची प्रतिमा देऊन स्वागत केले.

वाखरी येथे जिल्हा प्रशासनाने वारकरी, भाविक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांची पाहणीदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर, अभिजित पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह हजारो वारकरी भाविक उपस्थित होते.

०००

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth Level Officers – BLO) यांनी दिलेली पहिली भेट पूर्ण झाली आहे. दिनांक २४ जून २०२५ रोजी बिहारमधील ७.९० कोटी मतदारांपैकी ८७ टक्के म्हणजेच ६,८६,१७,९३२ गणना फॉर्म वितरित करण्यात आले आहेत.

घरे बंद असणे, नागरिक प्रवासात असणे, स्थलांतरित कुटुंबे किंवा मृत मतदार अशा काही कारणांमुळे अद्यापही काही घरी बीएलओ पोहोचू शकलेले नाहीत. तेथे बीएलओ प्रत्येकी तीन वेळा भेटी देतील, त्यामुळे वितरित फॉर्मची संख्या पुढील काळात वाढण्याची अपेक्षा आहे.

गणना फॉर्म ऑनलाईन देखील उपलब्ध असून भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://voters.eci.gov.in आणि ECINET App वर अंशतः भरलेले फॉर्म डाऊनलोड करता येतात. मतदार स्वतःही भरलेले फॉर्म ECINET App वर अपलोड करू शकतात.

राजकीय पक्षांकडूनही सक्रिय सहभाग मिळत असून राज्यात १,५४,९७७ बूथ स्तर एजंट्स (Booth Level Agents – BLAs) विविध राजकीय पक्षांकडून नेमले गेले आहेत. २ जुलै २०२५ रोजीपर्यंत भाजपकडून सर्वाधिक ५२,६८९ एजंट्स नेमले गेले आहेत. त्यानंतर RJD (४७,५०४), JD(U) (३४,६६९), काँग्रेस (१६,५००) यांचा क्रमांक लागतो. इतर पक्षांनीही BLAs नेमले असून, प्रत्येक एजंट दररोज ५० प्रमाणित फॉर्म सादर करू शकतो.

सध्या बीएलओंकडे सुमारे ५ टक्के म्हणजेच ३८ लाख भरलेले व स्वाक्षरीयुक्त फॉर्म जमा झाले आहेत. आयोगाने वेळोवेळी ‘प्रथम समावेश’ या घोषवाक्यावर भर दिला असून, या उपक्रमाचा उद्देश राज्यातील सर्व पात्र नागरिकांना मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करणे हा आहे.

जो कोणी १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रकाशित होणाऱ्या मसुदा मतदारयादीत आपले नाव समाविष्ट करू इच्छितो, त्याने २५ जुलै २०२५ पर्यंत स्वाक्षरीयुक्त गणना फॉर्म सादर करणे आवश्यक आहे.

२ ऑगस्टपासून यादीतील नावांची पडताळणी मोठ्या प्रमाणावर सुरू केली जाईल. या मसुद्यावर कोणतीही हरकत किंवा दावा २ ऑगस्टपासून कोणताही राजकीय पक्ष किंवा सामान्य नागरिकाला दाखल करता येईल.

अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील सादर करता येईल, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

०००

संजय ओरके/वि.स.अं.

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे, असे  प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकटे यांनी केले.
आज सिन्नर तालुक्यातील उजनी येथील 33/11 केवव्ही वीज उपकेंद्राचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंता अनिल झटकरे,  कार्यकारी अभियंता (स्थापत्य)  शीतलकुमार घुमे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) सुनिल काळोलीकर, उप कार्यकारी अभियंता विठ्ठल हरक, सहाय्यक अभियंता स्थापत्य कृष्णा थोरात, दिनेश राजपूत, वैभव पवार, सरपंच निवृत्ती सापनर  यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, यापूर्वी पूर्व भागातील पांचाळे, उजनी, दहिवाडी व सांगावी परिसरातील शेतकरी व ग्राहक यांना विजेच्या समस्या उद्भवत होत्या. परंतु आज कार्यान्वित झालेल्या 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या माध्यमातून  वीजपुरवठा सुरळीत होणार असल्यामुळे  शेतकरी व  ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
 नवीन कृषी धोरणाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक विकासात्मक योजना राबविण्यात येणार आहेत. वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत सिन्नर तालुक्यातील गावांसाठी थ्री-फेज व वाडी- वस्त्यांसाठी सिंगल-फेज विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा नवनवीन शेती साधनांद्वारे  उत्पादक खर्च कमी करून शेतीतील उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. आपत्ती पासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र स्थापित करण्यात येणार असल्याचे मंत्री कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
000000

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव 

बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य यंत्रणेने प्रामाणिकपणे कराव,  असे आवाहन करत कामात कुचराई करणाऱ्यावर कडक करवाई करावी, अशा सूचना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज दिल्यात

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आरोग्य विभागाची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली त्यावेळी  त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, आरोग्य उपसंचालक डॉ भंडारी, आरोग्य विभागाचे राज्य समन्वयक सोहम वायाळ, डॉ जीवन बच्छाव, उपसचिव विशाल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते उपस्थित होते.

यावेळी  केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागेचा आढावा घेत रिक्त जागा त्वरित भरण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य यंत्रणेतील सर्व  घटकांनी  सामूहिकरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे . त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. क्षय मुक्त भारत बनविण्यासाठी निक्षयमित्र योजनेत सर्व अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संघटना, लोकप्रतिनिधी यांना सहभागी करुन घ्या, अशा सूचना यावेळी केद्रीय राज्यमंत्री ना. जाधव यांनी दिल्या.

ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यन्वीत  करण्यासाठी भौतीक सुविधा पोहचविणे आणि बांधकाम हे  चांगल्या दर्जाचे करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . पीएमजेवाय  योजने अंतर्गत आयुष्मान कार्डची संख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत, तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करून एक महिन्याच्या आत सर्व लोकांचे आयुष्यमान कार्ड काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जिल्ह्यातील जन्मदर आणि मृत्युदराचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालयात अमृत औषधालय आणि जन औषधी केंद्र सुरू करा. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना उपचार सुविधा सहज उपलब्ध करून द्याव्यात. नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  जाधव यांनी यावेळी दिले.      

०००

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

जळगावच्या ‘ह्युमन मिल्क बँके’तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार

आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध पाजू शकत नाही – आजारपण, अति कमी वजनाचं बाळ, किंवा अगदी अनाथत्व. अशा वेळी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे त्या नवजातासाठी जीवदान ठरतं. जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) ‘ह्युमन मिल्क बँक’ हे त्याचं अत्युत्कृष्ट उदाहरण ठरतं आहे.

मार्च २०२४ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात आजपर्यंत १८४६ मातांनी स्वखुशीने दुग्धदान केलं असून, २००० हून अधिक नवजात बाळांना सुरक्षित, आरोग्यदायी दूध मिळालं आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर या अभिनव उपक्रमाची संकल्पना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडली, पालकमंत्री, जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी यांना संकल्पना आवडली, तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या पुढाकारातून झाली. “मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही पर्याय स्वीकारण्यासारखा नसतो. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम उभा राहिला आहे,” असं डॉक्टर पाटील सांगतात.

“मातेचे दूध म्हणजे फक्त अन्न नव्हे, ती जीवनरेषा आहे” – असे सांगत प्रमुख जयश्री पाटील आणि डॉ. शैलजा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत मिल्क बँकची पाच सदस्यीय टीम समुपदेशन व सेवा कार्यात समरस आहे.

‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे काय?

‘ह्युमन मिल्क बँक’ ही अशा प्रकारची सुविधा आहे जिथे नवजात बाळांसाठी आईच्या दुधाचा पर्याय म्हणून दुसऱ्या आरोग्यदायी स्त्रीचे दूध गोळा करून सुरक्षितरीत्या साठवले जाते आणि गरजूंना दिले जाते. ही संकल्पना विशेषतः अशा बाळांसाठी उपयुक्त ठरते, ज्यांच्या मातेला कोणत्याही कारणामुळे थेट स्तनपान करता येत नाही — जसे की अकाली बाळंतपण, आईचे आजारपण, मृत्यूनंतर किंवा दूध कमी असणे इत्यादी.

कशी कार्य करते ह्युमन मिल्क बँक?

  1. दुग्धदान (Milk Donation):

निरोगी स्त्रियांनी (आईंनी) त्यांच्या बाळाला दूध पाजून उरलेले दूध स्वेच्छेने या बँकेत दान केले जाते. त्यासाठी महिलांची वैद्यकीय तपासणी होते, त्यांच्या आरोग्याचा इतिहास तपासला जातो.

  1. दूध संकलन व तपासणी:

संकलित दूध हे प्रमाणित प्रक्रियेनुसार पाश्चराइज (अती उष्ण व अती शीत)केले जाते. त्यामुळे त्यातील जंतू, बॅक्टेरिया नष्ट होतात.

  1. साठवण व वितरण:

हे दूध विशेष थंड तापमानात डीप फ्रीझरमध्ये साठवले जाते. गरजूंना – विशेषतः NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मधील कमी वजनाच्या बाळांना – डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते.

का आहे ही गरज?

अनेक वेळा अकाली जन्मलेल्या किंवा कमकुवत बाळांना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचनासाठी आईचे दूधच सर्वोत्तम असते. पण काही प्रसंगी आई दूध देऊ शकत नाही, अशा वेळी दुसऱ्या महिलांचे दूध अत्यावश्यक ठरते. हे दूध बाळाच्या जीवितासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे “ह्युमन मिल्क बँक” म्हणजेच आईच्या मायेचा एक सामाजिक विस्तार म्हणता येईल.

फायदे:

  • बाळाचा आरोग्य विकास योग्य होतो.
  • मृत्यू दरात घट येते.
  • स्तनपानास प्रोत्साहन मिळते.
  • आईच्या अनुपस्थितीतही बाळाला आईच्या दुधासारखे पोषण मिळते.

ह्युमन मिल्क बँक ही विज्ञान, सेवा आणि मातृत्व यांचा सुंदर संगम आहे. ती म्हणजे एक जीवनदायिनी यंत्रणा आहे – बाळांच्या आरोग्याचे रक्षण करणारी!

ooooo

-युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

 

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या संस्थांमुळेच. बॉम्बे बार असोसिएशन ही संस्था माझी कुटुंबासारखी आहे. या संस्थेच्या पाठिंब्याशिवाय मी आज या पदावर असू शकलो नसतो. ही वकिल संघटना म्हणजे न्यायव्यवस्थेला विचारवंत देणारी मातृसंस्था आहे, अशा शब्दांत भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भावना व्यक्त केल्या.

न्यायमूर्ती श्री. भूषण गवई यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. गवई बोलत होते.  यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, श्री. गवई यांच्या सुविद्य पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल देशमुख, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, ॲडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रशांत रेळेकर, बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठक्कर, उपाध्यक्ष व्ही आर धोंड, सचिव फरहान दुभाष आदी उपस्थित होते.

आज सत्कार होत असलेल्या कोर्टरुमध्येच लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,” ही गर्जना आजही आपल्याला प्रेरणा देते, असे सांगून न्यायमूर्ती श्री. गवई यांनी आजपर्यंतचा प्रवास उलगडला. न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या कारकिर्दीत मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजी नगर व गोवा खंडपीठांवर काम करतानाचे अनुभव सांगितले आणि हे सर्व अनुभव त्यांच्या न्यायिक दृष्टिकोनाच्या जडणघडणीत कसे उपयुक्त ठरले, हेही स्पष्ट केले.

सरन्यायाधीश श्री. गवई म्हणाले की, “संविधान हेच आमचे अंतिम मार्गदर्शक तत्त्व आहे आणि न्यायाधीश म्हणून आमची जबाबदारी केवळ अधिकार वापरण्याची नाही, तर कर्तव्य बजावण्याचीही आहे. रिक्त न्यायाधीश पदं भरली गेली तर प्रलंबित खटल्यांवर नियंत्रण येईल. आम्ही नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणत आहोत. गेल्या काही दिवसांत अनेक नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

त्यांनी बार असोसिएशनने सुरू केलेल्या ‘पॉडकास्ट सिरीज’, व ‘बीबीए अ‍ॅप’चे कौतुक केले.

कार्यक्रमात न्यायमूर्ती दीपांकर दत्ता न्यायमूर्ती गवई यांचे विशेष कौतुक करताना म्हणाले की, न्यायमूर्ती श्री. गवई यांची विधी आणि संविधानातील जाण, विनम्रता आणि कायद्याचा अभ्यास यांचे उदाहरण देशभरातील न्यायाधीशांसाठी आदर्श आहे. नागपूरमधील न्यायालयातून सुरू झालेली न्यायमूर्ती गवई यांची कारकीर्द ही मेहनत, प्रामाणिकपणा आणि मूल्यनिष्ठा यांचे प्रतिक आहे. न्यायमूर्ती श्री. गवई यांचा मुंबई उच्च न्यायालयातील काळ केवळ त्यांच्या ऐतिहासिक निर्णयांसाठीच नव्हे, तर त्यांच्या शांत संयमी, प्रखर कायदेशीर बुध्दिमत्ता आणि सौम्य विनोदबुद्धीसाठीही लक्षात राहतो. त्यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून निवड हा फक्त मुंबई बारच नव्हे, तर संपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठीही गौरवाचा क्षण आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. आराधे यांनी मनोगतात श्री. गवई यांच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले की, लोकसेवा व न्यायव्यवस्था हीच खरी सेवा हे श्री. गवई यांचे तत्वज्ञान आहे. त्यांनी आतापर्यंत दिलेले निर्णय न्यायव्यवस्थेतील संवेदनशीलता आणि संविधान निष्ठा दर्शवतात. ते दूरदर्शी आहेत. त्यांच्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला.

यावेळी महाधिवक्ता श्री. सराफ, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल श्री. सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले. बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री. नितीन ठक्कर यांनी प्रास्ताविक केले. सचिव फरहान दुभाष यांनी सूत्रसंचालन केले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे पार पडली.

या बैठकीला महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, छत्तीसगड व पंजाबचे अर्थमंत्री आणि  यांच्यासह नऊ राज्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर दोन राज्यांचे प्रतिनिधी आभासी पद्धतीने सहभागी झाले. यावेळी आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणा राज्यांच्या प्रतिनिधींनी आपली सविस्तर सादरीकरणे सादर केली.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, ही जीएसटी, आयजीएसटी आणि एसजीएसटी उत्पन्नासंबंधी पहिलीच बैठक होती. यापूर्वी मंत्र्यांच्या गटाच्या विविध मुद्द्यांवर बैठका झाल्या असल्या, तरी जीएसटी उत्पन्नावर केंद्रित अशी ही पहिली बैठक आहे. यावेळी तांत्रिक चर्चा मर्यादित राहिली, परंतु पुढील बैठकींमध्ये सर्व राज्यांकडून सखोल सूचना आणि चर्चा अपेक्षित आहे. महाराष्ट्र नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2025 मध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आपले सादरीकरण करेल, त्यामुळे आजच्या बैठकीत महाराष्ट्राकडून सादरीकरण करण्यात आले नाही.

बैठकीत राज्यनिहाय महसूल प्रवृत्ती, आर्थिक घटकांचा प्रभाव, करचोरीविरोधी उपाय आणि धोरणात्मक शिफारशींवर सविस्तर चर्चा झाली. जीएसटी अंमलबजावणी समितीने महसूल संकलन आणि करचोरीविरोधी साधनांचा आढावा घेतला. राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC), जीएसटी नेटवर्क (GSTN) आणि आंध्र प्रदेश, गुजरात व तेलंगणा यांनी एकसमान अंमलबजावणी आणि अनुपालन व्यासपीठ विकसित करण्यावर जोर दिला. करचोरीला प्रवण क्षेत्रांमधील समस्यांचे निराकरण, नोंदणी, ई-वेबिल आणि बीटूसी अनुपालन यावरही लक्ष केंद्रित झाले. जीएसटी अंमलबजावणी समितीने पुढील बैठकीत या मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचे ठरवले.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले, ही बैठक जीएसटी धोरणांना स्पष्ट दिशा देण्यासाठी आणि केंद्र-राज्य यांच्यातील आर्थिक समन्वय बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

000000

 

प्रधानमंत्री सुर्य घर – मोफत वीज योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. ४ : प्रत्येक घरात मोफत वीज पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजना राबविण्यात येत आहे. शासनामार्फत सुरू असलेल्‍या या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी ऊर्जा विभागाशी समन्वय साधून, सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, प्रधान सचिव हर्षदिप कांबळे, आयुक्त सुरेंद्र पवार आदिसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ऊर्जा विभागाशी समन्वय साधून प्रधानमंत्री सुर्य घर- मोफत वीज योजना राबवावी. तसेच, पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याची खात्री करण्यासाठी आयुक्तालयामार्फत यंत्रणा राबवावी. प्रत्येक लाभार्थ्याच्या घरावर सौर पॅनल उभारल्यास त्यांना 300 मेगावॅट वीज मोफत मिळणार असून, वीजेची बचतही होणार आहे. याचा लाभ त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य – सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई, दि. 4 : व्यक्तीच्या जडणघडणीत चांगले संस्कार आणि सकस मुल्यांची जोपसना या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात, कोणत्याही यशाचा मार्ग हा खडतर असतो. मात्र प्रामाणिक मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून ध्येयप्राप्ती शक्य असते, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

कुलाबा येथील होली नेम हायस्कूलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना सरन्यायाधीश भूषण गवई बोलत होते. यावेळी आर्च बिशप जॉन रॉडरिक्स, बिशप डॉमनिक्स फर्नांडिस, व्यवस्थापक फादर कॉनस्टॉन्सीयो नोरोना, प्रिन्सिपॉल सिस्टर लॉरेन्सीया  परेरा यांच्यासह संबंधित मान्यवर उपस्थित होते.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, प्रत्येकाच्या वाटचालीत शालेय जीवनाचा काळ हा सर्वात महत्वाचा असतो. शालेय जीवनातील अनेक आठवणी होली नेम हायस्कुलमधील आहेत, त्याच  शाळेत आज विशेष सत्कार होत असल्याचा क्षण निश्चितच खूप आनंदाचा आणि अभिमानाचाही आहे. आईवडिलांसोबतच या शाळेने आपल्यावर धर्मनिरपेक्षता, एकात्मता, बंधुभावाचे संस्कार केले. या  शाळेत वेगवेगळ्या समुहाच्या मित्र-परिवारासोबत एका उत्तम वातावरणात शालेय जीवन जगता आले. भारतीय संविधानाचे समतेचे तत्वही शालेय जीवनात या ठिकाणी शिकायला आणि अनुभवायला मिळाले. आपल्या आजपर्यंतच्या वाटचालीत होली नेम शाळेच्या शिकवणुकीचे, येथील शिस्त, संस्काराचे मोठे योगदान असल्याचे सांगून श्री.गवई म्हणाले की, यशाचा मार्ग हा खडतर असला तरी कोणत्याही क्षेत्रात करियर करण्याचे ठरवत असताना विद्यार्थ्यांनी त्यासाठी कष्ट घेण्याची, प्रामाणिक मेहनत करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे. जिंकण्याच्या इच्छाशक्तीमुळेच ध्येय प्राप्त करणे शक्य होत असते. आपल्या वडिलांच्या इच्छेमुळे आपण वकिली क्षेत्रात करियर करण्याचे ठरवले असेही श्री.गवई यांनी यावेळी सांगितले.

आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद असलेल्या सरन्यायाधीश पदी विराजमान होत असल्याचा सार्थ अभिमान आणि  आनंद शाळा व्यवस्थापनाला असून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आपण एक प्रेरणा असल्याच्या भावना  आर्च बिशप जॉन रॉडरिक्स यांनी यावेळी व्यक्त केल्या.

००००

वंदना थोरात/विसंअ

 

भविष्य निर्वाह निधी वार्षिक खाते पत्रके २०२४-२५ वर्षासाठी आता ऑनलाईन उपलब्ध

मुंबई, दि.4 : सन 2024–25 या आर्थिक वर्षासाठीचे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) खाते पत्रके महालेखापाल (लेखा व अनुदान)–I, मुंबई, महाराष्ट्र यांच्या कार्यालयामार्फत जारी करण्यात आली आहेत. ही पत्रके लेखावाहिनी व कोषागारे संचालक यांना प्रदान करण्यात आली असून ती आता राज्य शासनाच्या सेवार्थ (SEVAARTH) पोर्टलवर (https://sevaarth.mahakosh.gov.in) अपलोड करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या जीपीएफ सदस्यांना त्यांच्या वार्षिक खाते पत्रकांची पाहणी, डाउनलोड व प्रिंट वरील संकेतस्थळावरून करता येईल. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांक GPF-2019/प्र.क्र.61/क्र.24 दिनांक 11.06.2020 नुसार, 2019–20 या वर्षापासून जीपीएफ पत्रकांची हार्ड कॉपी देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.

खाते पत्रकात काही तफावत आढळल्यास, संबंधित आहरण व संवितरण अधिकारी (डीडीओ) यांच्या माध्यमातून ती महालेखापाल (लेखा व अनुदान)–I, मुंबई कार्यालयातील उपमहालेखापाल (निधी) यांच्याकडे कळवावी. खाते पत्रकावर जन्मतारीख, नेमणुकीची तारीख तसेच क्रेडिट/डेबिट तपशील मुद्रित नसेल तर ती माहिती त्वरित महालेखापाल कार्यालयाकडे पाठवावी, जेणेकरून ती तपासून अभिलेख अद्ययावत करता येतील.

सदस्यांना हवी असल्यास विरोध/तफावतीची माहिती या agaeMaharashtral@cag.gov.in ईमेलवरही पाठवू शकतात, असे महालेखापाल (लेखा व अनुदाने ) कार्यालयामार्फत कळवण्यात आले आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....