शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 613

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ शासनाची महत्त्वाकांक्षी योजना – मंत्री दीपक केसरकर

  • योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण
  • नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा 
  • रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई, दि. १७:  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही योजना जाहीर केली. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास मुंबई शहर, उपनगर आणि मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे केसरकर बोलत होते.

या समारंभास मुंबई उपनगर चे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच आमदार यामिनी जाधव, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, तसेच मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेश क्षीरसागर, मुंबई उपनगर महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी शोभा शेलार, भायखळा समितीचे अध्यक्ष अतुल शहा, शिवडी समिती अध्यक्ष आशा मामेडी, उपजिल्हाधिकारी श्री. सुरवसे,  तहसीलदार दीपाली गवळी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, एकात्मिक बाल विकास योजनेचे उपायुक्त विजय सागर, मुंबई उपनगरचे नोडल अधिकारी अबुल चौधरी, मुंबई शहरचे नोडल अधिकारी  शशिकांत चौहान, तसेच जिल्हा  बाल विकास विभागातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, या सरकारने सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या माता-भगिनीसाठी दिवसरात्र काम करुन ही योजना त्यांच्यापर्यंत पोहचवली, त्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्वांचा सकारात्मक सहभाग राहिल्यामुळे ही योजना कमी वेळेत राबविता आली. महिला जर सक्षम असेल तर संपूर्ण कुटूंब सक्षम होते. यामध्ये महिलांना मिळणाऱ्या रकमेला महत्व नसून तिच्याप्रती कुटुंबप्रमुख म्हणून व्यक्त केलेली भावना महत्त्वाची आहे. यामुळे महिलांचा आत्मसन्मान वाढीस लागणार आहे, तसेच कुटुंबाचे उत्पन्नही वाढीस लागण्यास हातभार मिळणार आहे. या योजनेचा समाजातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा.

नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमाद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे. सर्वासाठी स्वयंरोजगार आणि रोजगार  मिळावा यासाठी  हे सरकार काम करत आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी  कौशल्या विभागाने एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. त्याद्वारे नोंदणी करून आपल्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती देता येणार आहे. यामध्ये आपला माल कसा तयार करायचा, कुठे विकायचा याचे प्रशिक्षण या ॲपद्वारे देण्यात येणार आहे.

यावेळी मुंबई शहर आणि उपनगरमधील लाभार्थी महिलांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुंबई उपनगर महिला व बालविकास अधिकारी, शरद कुऱ्हाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वाती गवाणकर यांनी केले. मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी,  शोभा शेलार यांनी आभार मानले

०००

 

 

 

 

 

 

शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तर भारतीय संघातर्फे रक्षाबंधनानिमित्त स्त्रीशक्ती सन्मानसोहळा

मुंबई दि.१७ : शासनाने ज्या ज्या योजना जाहीर केल्या त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे.आजच पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत एक कोटी पेक्षा अधिक बहिणीच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .

उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित रक्षाबंधन निमित्त स्त्रीशक्ती सन्मान सोहळा आणि पाच हजार बहीणींना साड्या भेट देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, उत्तर भारतीय संघाचे संतोष आरएन सिंह, उत्तर भारतीय संघाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

उत्तर भारतीय संघाचे सामाजिक क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. सरकार नेहमीच तुमच्या सोबत राहील. अयोध्या हे सर्वांसाठी पवित्र स्थळ आहे. तेथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. उतर भारतीय संघाने महिला भगिनींसाठी चांगला उपक्रम आयोजित केला आहे. तसेच येथील महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर ३१ ऑगस्टपर्यंत भरावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर भारतीय महिला, भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या. महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.

०००

कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

नाशिक, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

नाशिक जिल्ह्यात दि. १६ ऑगस्ट रोजी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (शहर) संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली.

जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने समन्वयाने जिल्ह्यात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती संयमाने व संवेदनशीलतेने हाताळल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, 16 ऑगस्ट रोजी नाशिक शहर येथे उद्भवलेल्या परिस्थितीवर नाशिक शहर पोलिसांनी वेळीच कार्यवाही करून शांतता प्रस्थापित केली आहे. परिस्थिती शांत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यानी यावेळी केले. तसेच, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी परिस्थितीवर सतर्कतेने नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट केली. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी तणावपूर्ण परिस्थिती वेळेत हाताळलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

०००

जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ

पुणे दि.१७: जवाहरलाल नेहरु विद्यापीठात माय मराठीच्या जागरासाठी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषेचे अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली येथे ७० वर्षानंतर होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांनी मिळून यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर, मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, माजी मंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूत भेट देण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिल्लीत साहित्य संमेलन होणे ही महाराष्ट्र, मराठी साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानाची बाब आहे. अशा संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे मोठेपण जगभरातील नागरिकांना कळायला हवे. साहित्यिकांचे समाजासाठी मोठे योगदान आहे, जीवनाचा अर्थ त्यांच्यामुळे कळतो, नवी पिढी घडविताना समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य साहित्यिक करतात. म्हणून अशा साहित्य संमेलनाचा समाज जागरणासाठी उपयोग होतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  देशाच्या राजधानीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या आयोजनाला विद्येच्या माहेरघरातून सुरूवात होत आहे. मराठी संस्कृतीच्या राजधानीपासून सत्तेच्या राजधानीपर्यंत मायमराठीचा डंका वाजतो आहे. संमेलनाच्या तयारीची सुरूवात चांगली झाली असून या संमेलनाला काही कमतरता भासणार नाही. जगातल्या १२ कोटी मराठी नागरिकांना जोडणारे हे संमेलन आहे. परदेशातही मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. प्रत्येक मराठी माणसांचा अभिमान असणारा हा भाषेचा उत्सव ७० वर्षानंतर दिल्लीत होत आहे.

संत नामदेवांनी भक्तीमार्गाने मराठीचा झेंडा पंजाबपर्यंत नेला होता. मराठी राज्यकर्त्यांनी देशभर पराक्रम गाजविला. मराठी माणसे जेथे गेली तिथे त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती रुजविण्याचे कार्य केले. इंदोर, ग्वाल्हेर, हैदराबाद, तंजावर आदी भागात मराठी संस्कृती रुजलेली दिसते. सरहद संस्थेच्या माध्यमातून राज्याची सरहद्द ओलांडून मायमराठी राष्ट्रीय पातळीवर जात आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दिल्लीसह उत्तर भारतात राहणाऱ्या मराठी भाषिकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी शासन संस्थेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येत आहे. विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. इतर योजनांसोबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा आपला अभिमान असल्याने त्यासाठी आवश्यक सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन ते प्रामाणिकपणे पार पाडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्र्यांनी सरहद संस्थेतर्फे जम्मू काश्मिरमध्ये करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा महाराष्ट्रात एकमताने मंजूर झाला. गेल्या दोन वर्षात ज्या शाळेमध्ये मराठी शिक्षक नसल्याने मराठी शिकवले जात नव्हते त्या शाळांमध्ये मुलांना मराठीचे अध्ययन करता यावे, यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. दुकानाच्या पाट्या मराठी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी साहित्य परिषद म्हणजे मराठी भाषा भवनच आहे. भारतातील मराठी प्रेमींना जोडून घेण्यासाठी सरहदचे कार्य मोलाचे आहे. त्यामुळे दिल्लीतील हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या स्थळ निवडीबाबत प्रक्रिया सांगून संमेलनाचा निधी ५० लाखाहून वाढवून २ कोटी केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. संजय नहार यांनी सरहद संस्थेच्या कार्याची माहिती देऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाला माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

०००

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रस्तरावर कडक कायदा करण्याबाबत सकारात्मक विचार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याची केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा

मुंबई, दि. १७ : राज्यासह देशात डॉक्टरांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशातील आयएमए इत्यादी संघटनेच्या डॉक्टरांनी संप, मोर्चा आंदोलन केले आहे. राज्यातील मार्ड संघटनाही आंदोलनात आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यास सरकार सकारात्मक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिट केले जाईल. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल, तसेच हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. आरोग्य सेवा संरक्षण कायद्यासंदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मार्डच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासमवेत चर्चा करुन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळण्यासाठी कायदा करण्याबाबत चर्चा केली.

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे. सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कारवाई करत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

०००

राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. १७ : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांनी सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे सामाजिक सलोख्याचे राज्य आहे. राज्याच्या या समृद्ध परंपरेला धक्का लावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. कोणत्याही समाज घटकाने कायदा हातात घेऊ नये. काही समस्या असल्यास त्या संवादाच्या माध्यमातून सोडविण्यात याव्यात. येत्या काळात विविध सण येत असून या सर्व उत्सवांमध्ये सर्व समाजांनी सहभागी होऊन ते आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपले सण हे आपल्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे प्रत्येक समुदायाने इतरांच्या भावना लक्षात घेऊन आपले सण साजरे करावेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून कोणतीही अफवा किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर देखील कडक नजर ठेवली जात असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्सवर त्वरित कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना एकजुटीने राहण्याचे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

००००

भव्य आणि नेटक्या कार्यक्रमाच्या आयोजनाने भगिनी भारावल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम

पुणे, दि. १७: राज्यस्तरीय भव्य आणि नेटक्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार असल्याने आणि त्यापेक्षाही योजनेचा लाभ देणाऱ्या लाडक्या भावांची भेट होणार असल्याने कार्यक्रमाला आलेल्या महिला भगिनी भारावून गेल्या.

शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये मुख्य कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या योजनेच्या लाभार्थी भगिनींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात हा लाभ वितरण सोहळा दिमाखात पार पडला.

मुख्य मंचासमोर रांगोळीत भव्य राखी साकारण्यात आली होती. मुख्य सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या हॉलमध्येही महिलांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बैठक व्यवस्थेसाठी बॅडमिंटन हॉलच्या दोन्ही बाजूसही मोठे हँगर्स उभारण्यात आले. तसेच क्रीडा संकुल परिसरात इतर ठिकाणी उत्कृष्ट अशी बैठक व्यवस्था करण्यात आली. या सर्व महिलांशी थेट संवाद साधण्यासाठी हॉलच्या मध्यातून बनविण्यात आलेल्या उंच पदमार्गावरून जात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बाजूच्या महिलांशी संवाद साधला. सर्व महिलांनी आपल्या मोबाईलचे दिवे सुरू करून त्यांचे स्वागत केले.

येणाऱ्या प्रत्येक महिलेची प्रवास आणि इतर व्यवस्था प्रशासनाने केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला येऊनही कुठेही गैरसोय झाली नाही.

योजनेचे आकर्षक सेल्फी पॉइंटही प्रशासनाने प्रवेशद्वारांवर उभारले होते. क्रीडा संकुलाच्या एवढ्या मोठ्या भव्य परिसरात पहिल्यांदाच येण्याची संधी मिळालेल्या महिला उत्साहाने या सेल्फी पॉइंट तसेच ठिकठिकाणी असलेल्या बॅनर्ससमोर सेल्फी घेत होत्या.

 

सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली बहार

लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत आदींनी सादर केलेल्या एकाहून एक सरस गीतांनी कार्यक्रमात बहार आणली. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात, आपल्या जागी उत्स्फूर्त नृत्य करत या गीतांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना दाद दिली.

सासुरवाशीणी आज खऱ्या अर्थाने आल्या माहेरी

यावेळी वैशाली सामंत यांनी कार्यक्रमाला आलेल्या सासुरवाशीणी आज खऱ्या अर्थाने आपल्या माहेरी आलेल्या माहेरवाशिणीसारख्या दिसत असल्याच्या अतिशय समर्पक शब्दात महिलांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी वैशाली सामंत यांनी ‘गुलाबाची कली बघा हलदीनं माखली’,’गोजिरी’, ‘मेरा इंडिया’, ‘ऐका दाजीबा’, आदी सर्वांना भावणारी रंगतदार गीते सादर केली.

अवधूत गुप्ते यांनी ‘एक हजारो मे मेरी बेहना है’ या गाण्याने सुरुवात करताच उपस्थित महिला हळव्याही झालेल्या पाहायला मिळाल्या. मनमोराचा कसा पिसारा फुलला, पोरी जरा हळू हळू चाल, शिवबा राजं नाव गाजं जी आदी गुप्ते आणि बांदोडकर यांनी गणाधीशा मोरया, स्वप्नील बांदोडकर यांनी ‘जहा डाल डाल पर सोने की चिडिया’ यासह गायलेल्या ‘राधा ही बावरी’ या गीताला महिलांनी कोरसची साथ देत उत्स्फूर्त दाद दिली. मुग्धा कराडे यांनी आधुनिक रूपातील छबिदार छबी गीत सादर केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगतदार सूत्रसंचालन टिव्ही कलाकार अभिजित खांडकेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आदींनी खुसखुशीत शैलीत केले.

देखणे आणि नेटके आयोजन असलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभही तेवढाच दिमाखदार झाला. सभागृहाच्या मध्यभागी येऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कळ दाबताच संपूर्ण सभागृह रंगीत पताकांची वृष्टी आणि आकर्षक आतिषबाजीने भरून गेले.

मान्यवरांच्या स्वागताला महिला ढोल पथकाने केलेले सादरीकरण, प्रत्येक महिलेची आवर्जून भेट घेणारे मान्यवर मंत्रीगण, घरगुती सोहळ्याप्रमाणे महिलांचा सहभाग हीदेखील स्मरणात राहणारी क्षणचित्रे होती.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, जिल्हा परिषद आदी विभागांनी अतिशय नेटके नियोजन केल्यामुळेच हा सोहळा दिमाखदार झाला.

०००

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात महिलांचा आनंदोत्सव

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने भगिनी भारावल्या

यंदाचा रक्षाबंधनाची ओवाळणी कायम स्मरणात राहणार असल्याच्या व्यक्त केल्या भावना

पुणे, दि. १७ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर महिला भगिनींनी फुलला होता. सर्वत्र महिलांचे आनंदी आणि उत्साही चेहरे दिसत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीने उपस्थित महिला भगिनी भारवल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळालेली रक्षाबंधनाची ओवाळणी कायम स्मरणात राहणार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी केलेल्या जल्लोषाने त्यांना झालेला आनंद दिसून आला.

पिंपरीच्या संगीता विलास वाकोडे यांनी मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन सण गोड केला अशा शब्दात उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केला. मुलांसाठी दोन पैसे अधिक खर्च करता येतील, असे त्या म्हणाल्या.

ढोल ताशांचा गजर, लेझीम पथके, महिलांच्या मनोरंजनासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताचे सूर असे घरगुती समारंभाचे स्वरुप अनुभवतांना महिलांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. शासनाने सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधनपूर्वी योजनेत रक्कम जमा झाल्याने शासनाविषयी विश्वासाची भावनाही कार्यक्रमात दिसून आली. आताप्रमाणे दर महिन्यात रक्कम जमा होईल याची खात्री आहे अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.

राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आत्मनिर्भर करणे, महिलांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने कुटुंबातील आमची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने महिलांना दिलेला आधार खूप मोलाचा आहे. लाडक्या बहिणींना हक्काचा आधार दिला असल्याच्या प्रतिक्रियाही महिलांनी दिल्या.

या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना सुरु केल्याने शासनाचे आभार मानत व रक्कम जमा झाल्याचा मोबाईल संदेश मोठ्या उत्साहाने महिला एकमेकींना दाखवत होत्या.

मुळशी तालुक्यातील नांदगाव येथून आलेल्या मनीषा वसंत भालेकर म्हणाल्या, मी गृहिणी आहे. या योजनेत मिळालेल्या रकमेमुळे अडचणीच्या वेळेला कुटुंबाच्या खर्चासाठी उपयोग होईल. माझ्या स्वतःसाठीही काही खर्च करता येईल. दर महिन्याला हक्काचे पैसे मिळणार असल्याने आमच्या संसाराला आधार झाल्याचे पेरणेगाव येथून आलेल्या निर्मला कानिफनाथ वाळके यांनी सांगितले. रक्षाबंधनाला मुलांसाठी गिफ्ट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवरीच्या मनीषा सुभाष सावंत यांनी योजनेमुळे मुख्यमंत्र्यांची बहीण झाल्याचा आनंद व्यक्त केला. लसूण विक्रीचा व्यवसाय वाढविण्यास हातभार लागू शकेल याचा आनंद त्यांना होता. शासनाने लाडक्या बहीण योजनेत मला हक्काचे पैसे दिले असून मला बहिणीचा मान दिला आहे. त्या रकमेचा उपयोग मी मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे, असे जांभेगावच्या रेश्मा मोहंमद शेख यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीच्या ममताबाई जारकड व रत्नाबाई भोजने या शेतात काम करत असल्याने ही रक्कम आमच्यासाठी खूप मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागापर्यंत ही योजना पोहोचली याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अशा अनेक चांगल्या प्रतिक्रिया कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी व्यक्त केल्या. शासनाची ही भेट त्यांच्यासाठी अमूल्य असल्याचे दिसून आले आणि त्यामुळेच शासनाला त्यांनी धन्यवादही दिले.
000

लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे, हीच या भावाची इच्छा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी
  • लाडक्या भावाकडून रक्षाबंधानाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण

पुणे, दि. १७: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. या दीड हजार रुपयांचे मोल गरजू बहिणींसाठी खूप आहे. त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल. आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाही.

महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. प्रत्येक पात्र भगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल. लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला निश्चित रक्कम जाईल याचे खूप समाधान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महिला भगिनींसाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’च्या माध्यमातून वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न  आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, आजचा हा सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल. सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुपकुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.

विकसित भारत करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो, असे प्रधानमंत्री कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात आम्ही स्त्रियांना केंद्रस्थानी ठेऊन योजना सुरू केल्या. लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे.

ही योजना म्हणजे आम्ही महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्षाबंधनानिमित्त दिलेली ओवाळणी आहे. आईचं आणि बहिणीचं प्रेम जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपयांचे मोल समजते, असेही ते म्हणाले.

रक्षाबंधनानिमित्त भावांकडून बहिणीला ओवाळणी-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान, हसू दिसून येत आहे. रक्षाबंधनानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली आहे.

माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा – अपेक्षा असतात परंतु, स्वतःचे हीत बाजूला ठेऊन कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा- अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या हिताकरीता बेरोजगारी कमी करण्यासाठी, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी, मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून काम करीत असून नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांना दिलासा मिळेल – डॉ. नीलम गोऱ्हे

तीन दशकांच्या महिला धोरणाच्या इतिहासात या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेत मान्यवरांच्या नावापुढे आईचे नाव लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महिलांची संख्या निम्मी असून दोन तृतीयांश तास त्या काम करतात. जगातील १ टक्के संपत्ती महिलांच्या नावावर आहे. अशा स्थितीत या योजनेमुळे महिलांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रबोधनाची परंपरा आणि महिला विकासाचा वारसा असलेल्या पुण्यात या योजनेचा समारंभ होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न- मंत्री आदिती तटकरे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री आदिती तटकरे यांनी केले. दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तीन लाडक्या भावांनी आधीच ओवाळणी दिली. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. १ कोटी ३५ लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी १ कोटी ३ लक्ष महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘यशस्विनी प्लॅटफॉर्म’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, प्रसाद लाड, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहुल कुल, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, सुनील कांबळे, सुनील शेळके, महिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, एकात्मिक बालविकास योजना सेवा आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

०००

बहिणी, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती – पालकमंत्री अनिल पाटील

  • सर्वांना स्वावलंबी आणि समृद्ध करण्यासाठी शासनाच्या योजनांची आखणीआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणाचा आदेश वितरण सोहळा संपन्न

 नंदुरबार, दि. १७ (जिमाका) : आज नंदुरबार शहरात आल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजने’च्या लाभार्थ्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, त्यामुळे मी अक्षरश: भारावून गेलो आहे. बहिणी आणि युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासनाने राबवलेल्या या योजनांच्या यशाची खरी पावती असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

ते आज शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ व मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या आदेश वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, रतन पाडवी अभिजित मोरे, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, कृष्णा राठोड (जि.प.), कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेत भगिनींच्या खात्यात 14 ऑगस्टपासून पैसे जमा व्हायला सुरूवात झाली असून  जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 61 हजार 997 महिला भगिनींच्या खात्यात येत्या 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशीपर्यंत  जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी जमा होणार आहे. या भगिनींना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजनेत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त 2 लाख 70 हजार 99 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या लेक लाडकी योजनेत चालू वर्षात 1 हजार मुलींच्या बॅंक खात्यावर 5 हजार रूपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. तरुणांना खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, म्हणुन सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेत जिल्ह्यात 2 हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये लाभ मिळणार असुन सध्या 617 उमेदवार या योजनेंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत. आज 63 लोकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे.  65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता 100 टक्के अर्थसहाय्य देणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ शासनाने सुरू केली आहे.  दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे या योजनेत खरेदी करता येणार आहेत, या सर्व योजना समाजातील सर्व घटकांसाठी असून या योजनांपासून जिल्ह्यातील एकही नागरीक वंचित राहणार नाही, असा विश्वासही यावेळी पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिला.

सर्वांना स्वावलंबी आणि समृद्ध करणाऱ्या योजनांची शासनाकडून आखणीआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व कुटुंब नजरेसमोर ठेवून योजना तयार केल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व यासारख्या काही योजना यापूर्वी मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये राबवल्या गेल्या आहेत. त्यांची फलश्रृती आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचे झालेले समाधान लक्षात घेवून महाराष्ट्र शासनानेही आता अशा प्रकारच्या योजना हाती घेतल्या आहेत. या सर्व योजना अतिशय विचारपूर्वक सुरू करण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरूणांमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी विकास विभागाने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना गाईंचे वितरणाची योजना सुरू केली, ती योजना आता सर्वांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर राबवली जाणार आहे. सर्व सामान्य जनतेच्या डोक्यावर असलेले वीजबिल, रोजगार, पाणी यासारख्या प्रश्नांवर शासनाने प्राथमिकता दिली असून शहरे आणि गावे या सर्वांना बारमाही  पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

सर्वसामान्य जनतेच्या गणिताच्या या योजनांच्या अंमलबजवणीतील गतीमानता बघून त्याचा अपप्रचार केला जातो आहे, अशा अपप्रचार करणाऱ्यांपासून सावध राहून या योजनेचा लाभ सर्वांनी घेणे हेच या अपप्रचाराचे खरे उत्तर असेल. जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी 704 कोटी रूपए खर्चाच्या रस्ते, संरक्षक भितं व लहान पूलांच्या एकूण 902 कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. यात 300 किलोमीटर रस्ते व 30 लहान, मोठ्या पुलांचा समावेश आहे, असेही यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांसाठी प्राथमिकता-धनंजय गोगटे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या सर्व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत, या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राथमिकता ठेवली आहे, या योजनांची जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आपल्या प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले आहे.

सहा लाडक्या बहीणींना दिला प्रातिनिधीक लाभ

यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील 06 लाभार्थी महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरीत करण्यात आले, तसेच त्यांनी यावेळी आपल्या बोली भाषेतून मनोगतही व्यक्त केले. त्यात सावित्री सुभाष पाडवी, नंदिता उखाजी वसावे, अरुणा शरद राठोड, पूनम कृष्णा बागुल, उषा सुदाम भिल, अनिता आत्माराम गावित यांचा समावेश होता.

21 आस्थापनांवर 63 युवकांना दिल्या नियुक्त्या

आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील 21 शासकीय आस्थापनांमधील 63 पदांवर युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.

राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रसारण

या कार्यक्रमानंतर पुण्यातील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी येथून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित अतिथी व लाभार्थी तसेच नागरिक यांच्यासाठी प्रसारित करण्यात आले.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘उमेद’ अभियान बचतगटातील महिला एक कोटी राख्या पाठविणार

विविध योजना आणल्याबद्दल महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई, दि. १७:  राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह ‘मुख्यमंत्री माझी  लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरित करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे राज्यातील बचतगट चळवळीतील उमेद अभियानातील महिला ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविणार आहेत.

राज्यातील बचत गटाच्या महिलांमार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राखी पाठविण्यात येणार आहे. शासनाने आणलेल्या नवीन योजनांमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी ‘चलो मुंबई’ असा नारा गावोगावात महिला देत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन ‘उमेद’ संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राखी बांधली जाणार असल्याची माहिती ‘उमेद’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लेक लाडकी अभियान, महिलांना ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास योजना यापूर्वीच सुरु झाली आहे. व्यक्तिचे नाव लिहिताना त्यामध्ये पित्यासोबत आता मातेचे नाव टाकण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अशा विविध निर्णयांमुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी महिलांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांत अधिक योजना आणत आहेत. मुख्यमंत्री हे आपले मोठे भाऊ आहेत, अशी भावना राज्यातील महिलांमध्ये निर्माण होत आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्रीसाहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखाएवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत.  या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

१४ ऑगस्टपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रातिनिधीक स्वरूपात ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून जर्मन भाषेचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशा शब्दात ई – संवादात सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील साक्षी सुरुशे यांनी लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनापूर्वीच आम्हाला ओवाळणी दिली, अशी हृदयस्पर्शी भावना मैना कांबळे यांनी व्यक्त केली. पल्लवी हराळे यांनी शिलाई व्यवसाय वाढवता येईल, असे सांगताना मुख्यमंत्री स्वतः बोलले याचा आनंद योजनेच्या लाभपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. उमेद अभियानाने महिलांना आर्थिक उन्नतीची उमेद दिली अशा शब्दात कविता कंद यांनी शासन बचतगटांना करीत असलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे, तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने १०८ योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या संवादावेळी केले.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...