गुरूवार, जून 19, 2025
Home Blog Page 582

नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार -गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.१०,(विमाका) :  नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे  हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीत पुर्ण होईल, असा विश्वास गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर  क्षेत्रविकास मंडळ प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत  नक्षत्रवाडी येथील 1056 अत्यल्प उत्पन्न गट अंतर्गत गृह प्रकल्पाचे भूमिपूजन गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल ना सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

नक्षत्रवाडी येथे आयोजित कार्यक्रमाला आमदार संजय सिरसाट, गृहनिर्माण  क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वैद्य, कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, अनिल मकरिये, हर्षदा सिरसाट, विवेक देशपांडे  आदी उपस्थित  होते.

गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरजू कुटुंबाला आपले हक्काचे असावे म्हणून त्यांनी 2014  पासून प्रधानमंत्री योजनेतंर्गत देशभरात 3 कोटी घरे उभारण्यात आली आहेत तर 3 कोटी घरांची कामे बाकी आहेत. नक्षत्रवाडी मधील 6.4 हेक्टर क्षेत्रावर 1056  सदनिकांच्या प्रकल्पास मंजूरी मिळाली असून सदर घराची किंमत 14 लाख ठेवण्यात आली आहे.  त्यापैकी 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्रदान करण्यात येणार आहे.

नक्षत्रवाडी प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे  हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीमध्ये पुर्ण होईल. यामध्ये स्लॅबप्रमाणेच भिंतीचेही काम करण्यात येणार आहे.सर्व इमारती भूकंप अवरोधक असण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये रस्तालगत, मोकळया जागेवर बाग, वृक्षरोपण, पथदिवे, सुरक्षा सुरक्षा विभाग आदी सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर विभागात म्हाडाकडून यापुर्वी  1494 घराची लॉटरी प्रमाणे सोडत काढण्यात आली आहे.  2800 घराची उपलब्धता बाकी आहे.

महाराष्ट्रात  म्हाडाने 1 लाख घरे तयार करण्याचा संकल्प केला आहे. तर मुंबई येथील गिरणी कामगार यांच्यासाठी 98 हजार कुटुंबीयांची स्वतंत्र गृह प्रकल्प निर्मितीचा संकल्प आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रकल्पासाठी 50 ते 52 हजार कोटी रुपयाची  नवीन कंपन्याची गुतंवणूक करण्यात येणार आहे.

आमदार संजय सिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे 200 कोटी रुपयाचा निधी हा ड्रेनेज लाईनसाठी मंजूर करण्यात आला असून भविष्यात पाईपलाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच म्हाडा हा प्रकल्प माझ्या मतदार संघात निर्सगरम्य ठिकाणी उभा राहतोय याचा  मला आनंद आहे. सुत्रसंचालन ज्योती सुर्यवंशी यांनी केले तर आभार सिमरन सोळंखी यांनी मानले.कार्यक्रमास नक्षत्रवाडी येथील ग्रामस्थ व म्हाडाचे अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

०००

निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यात नोकरशाहीची भूमिका महत्त्वाची -मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

  •  मतदार याद्या बिनचूक असाव्यात याबाबत दक्षता घ्यावी
  • शाळा- महाविद्यालयातील अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी

सोलापूर, दि. १० (जिमाका): लोकशाहीच्या बळकटीकरणात नोकरशाहीचाही सहभाग मोठा व महत्त्वाचा असतो. त्यामुळे नोकरशाहीने निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे आवाहन राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत श्री. चोक्कलिंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, स्वीप चे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे व सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, आगामी निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे. विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादया अत्यंत बिनचूक होतील याची संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांनी खात्री करावी. मतदार यादीतून नावांची वगळणी करत असताना निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी. स्थलांतरित होणाऱ्या मतदाराबाबत संबंधित जिल्ह्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून नावे वगळणे अथवा मतदार यादीत ठेवण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचित केले.

जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील मतदारांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शाळा महाविद्यालयात विशेष मोहीम राबवावी. या गटातील मतदारांची मोठ्या प्रमाणावर मतदार म्हणून नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रारूप मतदार या प्रत्येक राजकीय पक्षाला त्वरित पोहोच कराव्यात. तसेच या याद्या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध होतील याची खात्री करावी. सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री आत्ताच करणे आवश्यक आहे, ऐनवेळी मतदानाच्या दिवशी मतदान यादीत नाव नसल्याबाबतच्या तक्रारी येतात, त्या होऊ नयेत यासाठी संबंधित मतदारांनी व प्रशासनाने ही योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर जिपीएस ट्रॅकिंग सिस्टीम व वेब कास्टिंग ॲप हे राज्यस्तरावरून प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चांगला अभ्यास करावा व तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक कामकाज अधिक सुलभ व गतीने कशा पद्धतीने करता येईल यावर अधिक भर द्यावा, असे श्री. चोक्कलिंगम यांनी सांगून लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचा 57 कोटीचा खर्च झालेला असून राज्याकडून 22 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यापैकी फक्त 11 कोटीचा खर्च झालेला दिसून येत आहे. तरी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने सर्व उपविभागीय अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 1 जुलै 2024 च्या अहर्ता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या असून पाच राजकीय पक्षांनी सदरील याद्या घेऊन गेलेले असून उर्वरित पक्ष प्रतिनिधींना त्वरित याद्या पोहोच करण्यात येणार आहेत. दिनांक 6 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकूण 36 लाख 92 हजार 409 इतके मतदार असून मतदान केंद्राच्या संख्येत 124 ने वाढ होऊन सध्या 3 हजार 723 इतकी मतदान केंद्रांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 35 हजार 576 इतकी मतदार संख्या वाढलेली आहे. मतदार नोंदणी प्रलंबित अर्ज, वयानुसार मतदार संख्या, फॉर्म नंबर 6 ची सद्यस्थिती, होम टू होम सर्व्हेची माहिती तसेच स्वीप कार्यक्रमाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

श्री. चोक्कलिंगम यांची रामवाडी गोदामाला भेट व पाहणी:

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी आज सकाळी रामवाडी येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाला भेट देऊन ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी उपस्थित होते.

०००

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चंद्रपूर शहरात प्रथमच भव्य रॅली व प्रबोधन कार्यक्रम

चंद्रपूर, दि. १० : प्रकल्प कार्यालय चंद्रपूर व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चंद्रपूर शहरात भव्य रॅली तसचे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रकल्प कार्यालयअंतर्गत येणाऱ्या 13 शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरवात वीर बाबुराव शेडमाके स्मारक, चंद्रपूर येथून झाली. यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुधाकर अडबाले, आमदार  किशोर जोरगेवार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, प्रकल्पाअंतर्गत येणारे सहभागी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात केली. उपस्थित रॅलीला संबोधित करतांना त्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व शासनामार्फत आदिवासी समाजासाठी विधिध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, याची माहिती दिली. अशा प्रकारच्या रॅलीचे आयोजन केल्यामुळे चंद्रपूर प्रकल्प कार्यालयाचे कौतुक केले.

यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रकल्प कार्यालय व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात अशा प्रकारचे प्रथमच विविध कार्यक्रम व भव्य रॅली तसचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ज्या ज्या सामाजिक संघटना, चंद्रपूर प्रकल्पातील शाळा वसतिगृह, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला व हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

सदर रॅलीमध्ये जवळपास 30 ट्रॅक्टरवर आदिवासी संस्कृतीवर आधारीत झॉकी तयार करण्यात आल्या होत्या. सदर रॅली वीर शहिद बिरसा मुंडा स्मारक जेल रोड, चंद्रपूर येथून सुरु होऊन गांधी चौक मार्गे येऊन प्रियदर्शनी सभागृह येथे रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर आदिवासी नृत्य, पथनाट्य, विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, सादर करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन श्री. वड्डेट्टीवार यांनी तर आभार विस्तार अधिकारी श्रीमती कुत्तरमारे यांनी मानले.

 

संपूर्ण कार्यक्रम प्रकल्प अधिकारी श्री. विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आला. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी डी. के. टिंगुसले,  जी. एम. पोळ, आर एस. बोंगीरवार, आर. टी. धोटकर, श्री. जगताप, श्री पाटील, वाय. आर. चव्हाण, एम, डी. गीरडकर, पी. पी. कुळसंगे, एस. डी. श्रीरामे, पी. बी. कुत्तरमारे, आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर, अमोल शिंदे, श्री. कुंटेवार व प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी, आदिवासी सामाजिक संघटना, सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.

या विषयांवर होत्या झॉकी: आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजना, प्रकल्प कार्यालयाने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, आदिवासी संस्कृती, मिशन शिखरमुळे शिक्षणामध्ये झालेला बदल, जल, जंगल, जमीन याबाबत बिरसा मुंडा यांचे कार्य, महाराष्ट्रातील विविध आदिवासी भाषा, जमाती, वेशभुषा, वारली पेंटीग, जंगलातील जीवन इत्यादी.

०००

 

 

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध – मंत्री शंभूराज देसाई

 ‘आर्टी ‘ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय मातंग समाजाच्या मेळाव्यात शासनाचे आभार

 मंत्री श्री. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने समाज बांधवांतर्फे स्वीकारला सत्कार

नांदेड दि. १० : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना झाली आहे. आरक्षणाचाही प्रश्न लवकरच निकाली निघेल.राज्य शासन मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. मुखेड येथे कै. गोविंदराव राठोड सभागृह क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात राज्यातील समस्त मातंग समाजाच्यावतीने राज्यस्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज्य शासनाने ‘आर्टी ‘ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे मातंग समाजाच्या धुरीनांकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी समाजाकडून जाहीर सत्कार स्वीकारला.

या कृतज्ञता सोहळ्याला मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आ.डॉ. तुषार राठोड, आ.बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आ. सुभाष साबणे, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. राम पाटील रातोळीकर, मा.मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,आयोजक नारायणराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील मातंग समाज संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती महोत्सवानिमित्त ‘अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (आर्टी) या संस्थेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, विकास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्याची मागणी मातंग समाजाची होती. आझाद मैदानामध्ये यासाठी आंदोलनही झाले होते. ही मागणी पूर्ण झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव गायकवाड यांच्या पुढाकारात समस्त मातंग समाज बांधवाकडून  महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. देसाई यांनी राज्य शासन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक  असल्याचे सांगितले. मातंग समाजाने आझाद मैदान येथे ज्या ज्या प्रमुख मागण्या मागितल्या होत्या. त्या मागण्या जवळपास पूर्ण झाल्या असून अन्य मागण्याही कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

आझाद मैदान येथील मातंग समाजाच्या आंदोलनातील आपल्या आश्वासनानंतर व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना झाली असून गोवंडी ( मुंबई ) येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अंतर्गत आरक्षण अबकड गटाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला अभ्यास गट गठीत करून ज्या राज्यामध्ये हे आरक्षण देण्यात आले होते. तेथील अभ्यास करण्यात आला. आरक्षण विषयक अंतर्गत वर्गवारी न्यायालयाच्या निर्देशानंतर पूर्ण केल्या जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी या विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी ‘आर्टी ‘साठी आपण सभागृहात बोललो होतो. त्याची पूर्तता झाल्याचे समाधान आहे, असे सांगितले. मुखेड एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच लेंडी नदीवरील प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबतही पाठपुरावा करण्याची विनंती केली.

मुखेड -देगलूर परिसरातील भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी ‘आर्टी ‘च्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील यावेळी समाजाने आपला शैक्षणिक आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माजी खासदार हेमंत पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. तसेच समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.या कृतज्ञता सोहळ्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका कोमल पोटाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

०००

 

राज्यातील पहिल्या १ हजार खाटांच्या पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयास मान्यता

शासन निर्णय जारी; आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा पुढाकार

मुंबई, दि. १०:  आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघ या चार वारी कालावधीत दाखल होणारे लाखो वारकरी तसेच दैनंदिन वाढत असलेल्या रूग्णांची मोठी संख्या लक्षात घेत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सर्व सुविधायुक्त राज्यातील पहिले १ हजार खाटांचे सामान्य रूग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे विशेष बाब म्हणून यासाठी मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

पंढरपुरात सध्या १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय कार्यरत आहे. मात्र, वर्षभरात येथे भरणाऱ्या प्रमुख चार वारीच्या कालावधीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल होतात. यासह श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज वारकरी, भाविकांची वर्दळ असते. पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय महामार्गांनी जोडले आहे. त्यामुळे बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर रूग्ण येथे येत असतात. या सर्वांचा मोठा ताण उपजिल्हा रूग्णालयावर पडतो. तसेच अनेकांना नाईलाजास्तव खासगी रूग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागतात. या पार्श्वभूमिवर नुकतेच आषाढी यात्रा कालावधीत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयाची क्षमता तसेच आरोग्य सेवेवर पडणारा ताण याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ येथे १ हजार खाटांचे सर्व सोयी-सुविधांनीयुक्त रूग्णालय उभारणीस मंजुरी देण्याचे सूतोवाच केले होते. तसेच याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले होते.

दि.५ ऑगस्ट रोजी आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक यांनी पंढरपूर येथे १ हजार खाटांचे सामान्य रूग्णालय उभारणीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यात विशेष बाब म्हणून येथील उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे प्रस्तावित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने तात्काळ मान्यता दिली असून शासन निर्णयही गुरूवारी जारी करण्यात आला आहे.

नवनिर्मित सामान्य रुग्णालयात अशी असेल रचना

नवनिर्मित १ हजार खाटांच्या या रूग्णालयात सामान्य रूग्णालय ३०० खाटा, महिला व शिशु रूग्णालय ३०० खाटा, ऑर्थोपेडिक व ट्रामा केअर रूग्णालय १५० खाटा, सर्जरी रूग्णालय १०० खाटा, मेडिसीन अतिदक्षता रूग्णालय १०० खाटा व मनोरूग्णालय ५० खाटा अशी रचना असणार आहे. यासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम व पदनिर्मितीची स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असे निर्णयात नमूद करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागास एकत्रित अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यास सूचित करण्यात आले असण्याची माहिती देण्यात आली आहे.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिन्नरमधील शासकीय इमारतींचे लोकार्पण

नाशिक, दि. १० (जिमाका):  सिन्नर तालुक्यातील सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय यासोबतच सिन्नर व एमआयडीसी पोलीस ठाणे अशा चार इमारतींचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय लोकार्पण

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी फित कापून तसेच कोनशीलेचे अनावरण करुन केले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी  हेमांगी पाटील, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता पी.आर.भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय हे 1 मे 2020 पासून कार्यरत असून कोरोना साथरोगाच्या काळात येथे रूग्णांसाठी 200 खाटांची व्यवस्था करून अविरत सेवा देण्यात आली होती. एप्रिल 2022 नंतर या रूग्णालयात इतर सेवाही कार्यान्वित करण्यात आल्या. येथे 30 खाटांचे ग्रामीण रूग्णालय सुद्धा कार्यरत असून 3 वैद्यकीय विशेतज्ञ अधिकारी नियुक्त केलेले आहेत. याठिकाणीच मुत्रपिंड आजाराच्या रूग्णांसाठी 5 खाटांचे डायलेसिसची सुविधा देणारे केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तहसिल कार्यालय प्रशासकीय इमारत लोकार्पण

तहसिल कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आमदार माणिकराव कोकाटे जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, सहाय्यक अभियंता पी.आर.भोसले, निवासी नायब तहसिलदार सागर मुंदडा उपस्थित होते.

पोलीस ठाणे एमआयडीसी व पोलीस ठाणे इमारतीचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील 4 कोटी 42 लाख निधीतून साकारलेले पोलीस ठाणे एमआयडीसी सिन्नर व सिन्नर पोलीस ठाणे या दोन्ही इमारतींचे लोकार्पण पार पडले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आमदार माणिकराव कोकाटे, पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक यशवंत बावीस्कर व संभाजी गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

विजय कदम यांच्या रूपाने हरहुन्नरी आणि मनस्वी कलाकार हरपला  – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.१०: मराठी मालिका, आणि रंगभूमी, मराठी चित्रपट या सर्व क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप पाडणारे दिग्गज कलावंत म्हणून विजय कदम यांची ओळख होती. विशेषतः त्यांच्या विनोदी भूमिकांनी रसिकांना मनमुराद आनंद दिला. असा हा हरहुन्नरी कलाकार हरपला असल्याची, भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

विजय कदम यांनी विविधरंगी भूमिका मराठी रंगभूमीवर साकारल्या. मराठी मालिकांमध्येही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सध्याच्या नव्या कलावंतांसोबत काम करतानाही ज्येष्ठतेचा कुठलाही आव न आणता त्यांनी आपल्या भूमिकांना न्याय दिला. सही रे सही’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘पप्पा सांगा कुणाचे’ आणि ‘टूरटूर’ या नाटकांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत केलेले टुरटुर नाटकाने रसिकांना मनमुराद हसवले.

विजय कदम यांनी रंगभूमी गाजवलीच शिवाय सिनेसृष्टीमध्येही दमदार भूमिका साकारल्या. ‘चष्मेबद्दूर’, ‘ब्लफमास्टर’, ‘टोपी घाला रे’, ‘भेट तुझी माझी’, ‘देखणी बायको नाम्याची’ या चित्रपटांत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. युवा रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या पिढीची नाटकं पाहायला जाणे असो, सहायक कलाकारांना प्रोत्साहन,  विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावून कलाकारांचं कौतुक करणे असो यामध्ये … त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. आजारपणातून ते बाहेर आले असतानाच एक मनस्वी कलावंत काळाने हिरावला, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

०००

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २० कोटींची अर्थिक मदत देणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • ऐतिहासिक बाज कायम ठेवून पूर्वीप्रमाणे नाट्यगृह युद्धपातळीवर पुन्हा उभारण्यात येणार असल्याची ग्वाही

कोल्हापूर दि. १० (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर भक्कमपणे उभारलेले संगीतसूर्य केशवराव भोसले ऐतिहासिक नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची अर्थिक मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली. आगीने नुकसान झालेल्या भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, दिनांक 8 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झाले ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युद्धपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा ५ कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल.

 

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला. माध्यमांशी संवाद साधून त्यांच्यामार्फत त्यांनी कोल्हापूर मधील नागरिकांना आवाहनही केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचे जिव्हाळ्याचे नाते असते. जशा कोल्हापूर वासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला खूप फोन आले, खूप मेसेजेस आले. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारे असून कलावंत आणि श्रोत्यांचादेखील आदर करणारं आहे. ते पुढे म्हणाले, स्थानिक कलावंतांशी संवाद साधल्यानंतर नाट्यगृहाशी भावनिक नातं किती घट्ट होतं याची एक प्रचिती येते. नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, याबाबत फॉरेन्सिंक विभाग व पोलीस विभाग या घटनेची चौकशीही करीत आहेत. परंतु हे नाट्यगृह उभे पुन्हा राहणे हे महत्त्वाचे आहे. चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्याच्यावर पुढे कारवाईही होईल.

०००

९.०१ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुबंई,दि. १०: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ९.०१ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि. ९ सप्टेंबर , २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि.१० सप्टेंबर, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ९ सप्टेंबर,  २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या  शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील. तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ९.०१ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत.  लोकऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे वित्त विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

०००

मुंबई-नाशिक महामार्गावर डेब्रिज टाकणाऱ्यांबाबत स्पष्टीकरण मागविले

ठाणे,दि.१० (जिमाका): मुंबई – नाशिक महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर करण्यात येणाऱ्या उपायोजनांविषयीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शुक्रवार (९) रोजी संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेवून संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. यादरम्यान हायवे दिवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत महामार्गालगत डेब्रिजचा मोठा ढिगारा रस्त्याच्या कडेला टाकलेला आढळून आला. डेब्रिजच्या ढिगाऱ्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष जाताच त्यांनी याबाबत संताप व्यक्त करत त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना याबाबत विचारणा करीत सर्वप्रथम डेब्रिज तात्काळ हटविण्यासाठी संबंधिताना तात्काळ सांगावे आणि तद्नंतर डेब्रिज टाकणाऱ्यावर व संबंधित यंत्रणेवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले.

या घटनेनंतर तहसिलदार अभिजित खोले यांनी तात्काळ या आदेशाची अंमलबजावणी करीत या परिसरातील नियोजन प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीए व पंचायत समिती प्रशासनाकडून तातडीने स्पष्टीकरण मागविले असून हे डेब्रिज नेमके कोणी टाकले आहे व संबंधित यंत्रणा कोण आहे, याविषयी चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

०००

ताज्या बातम्या

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रदीप कोकरे, डॉ. सुरेश सावंत यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

0
मुंबई, दि. १८: साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’  मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या...

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

0
मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साहित्यिकांची निवड डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य  अकादमी पुरस्कार जाहिर नवी दिल्ली, दि. १८: साहित्य...

धान साठा करण्यासाठी गोदामांची उभारणी करण्यात येणार-  मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. १८: आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी उपयोजना क्षेत्रामध्ये आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी करण्यात येते. आदिवासी क्षेत्रात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान उघड्यावर राहून...

दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, दि. १८: राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री सावे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास...

मोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

0
मुंबई,दि. १८ : शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना १००...