शनिवार, जून 21, 2025
Home Blog Page 572

नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री दादाजी भुसे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न

नाशिक, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सेवा- सुविधा मिळतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात नाशिकला एज्युकेशन हब बनविण्याच्या दृष्टीने सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. दिंडोरी तालुक्यातील मौजे शिवनई येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, हेमलता बीडकर, अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. संपत काळे, बाकेराव बस्ते, राजेंद्र भांबर, प्रशांत सूर्यवंशी, प्रा. चिंतामणी निगळे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, विद्यापीठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून बहुप्रतिक्षेत असणारे नाशिक उपकेंद्र हे पूर्णत्वास जात आहे ही आनंदाची बाब आहे. 31 हजार स्क्वेअर फुटाचे 3 मजली भव्य मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मागील 2 वर्षातील काळात उभे राहिले आहे. या ठिकाणी आज 63 एकर जागेला संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. या वर्षात येथे एमबीए व बीबीए रिसर्च सेंटर सह टेंपल मॅनेजमेंट हे कोर्स सुरू होणार असून उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी भर पडणार आहे. सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, संस्था प्राध्यापकांची कामे या ठिकाणी झाल्यास हे केंद्र जिल्ह्यातील 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. तसेच या कामी पुणे येथे जाण्याचे श्रम वाचून नाशिककरांच्या वेळ व पैशाची बचत होईल व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाही ताण कमी होईल, असे मत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी याप्रसंगी मांडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिकाधिक जोडण्याच्या दृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच आमदार, खासदार निधीसह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी निर्णय घेवून यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शैक्षणिक विभागाच्या इमारती, रस्ते व मुलभूत विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. तसेच येत्या महिनाभरात या उपकेंद्राचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
00000

मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा संवाद; लातूर जिल्ह्यातील महिलांचीही कार्यक्रमाला उपस्थिती

लातूर, दि. १५ : कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची तीन हजार रुपये इतकी एकत्रित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत राज्यातील सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे…अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथूनही काही लाभार्थी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. यापैकी काही महिला आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना चिंचोली राववाडी येथील शेतमजुरी करणाऱ्या उषा सगर म्हणाल्या की, आमच्या सारख्या शेतमजुरी करणाऱ्या महिलांना अनेकदा इतरांकडे पैशासाठी हात पसरावा लागत होता. मात्र, आता प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दीड हजार मिळणार असल्याने फार मोठी मदत होणार आहे. ही योजना सुरु केल्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत. याच गावातील शेतमजुरी करणाऱ्या हलीमा अजीज सय्यद यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार बँक खात्यात जमा झाल्याबद्दल शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या पैशामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या खर्चासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उदगीर तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी आणि सध्या लातूर येथे राहत असलेल्या स्वाती सुडे यांनी सांगितले की, शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मी शिवण क्लास पूर्ण केला आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून मी नवीन शिलाई मशीन घेणार आहे. यातून स्वतःचा शिलाईचा व्यवसाय सुरु करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

लातूर येथील अश्विनी खंदाडे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा झाल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. तसेच या पैशामुळे घर खर्चासाठी फार मोठी मदत होणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आणि शासनाचे आभार मानून पाखर सांगवी येथील सीमा नंदगवळी यांनी या योजनेतून दरमहा जमा होणाऱ्या रक्कमेतून नवीन शिलाई मशीन घेणार असल्याचे सांगितले.

लातूर येथील अनिता बेंबडे, सरोजनी देशपांडे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अतिशय चांगली असून ही योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जिल्ह्यातील अनेक बहिणीच्या खात्यात जमा, बहिणींनीकडून आनंद व्यक्त

जळगाव दि. 15 ( जिमाका ) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 3 हजार रुपये जळगाव जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यावर यायला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी सागर पार्कवर झालेल्या महिलांच्या मेळाव्यात राखी पौर्णिमेची ओवाळणी लवकरच मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तारखेच्या दोन दिवस आधीच पैसे आल्यामुळे बहिणी आनंद व्यक्त करत आहेत.
जळगाव मधील ज्या महिलांना 3 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, काही बहिणींना प्रतिनिधीक विचारले असता, सौ सुनिता दिलीप चांदेलकर म्हणाल्या,’मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला, आमच्या मुलाच्या शिक्षणा करता तुम्ही 3000/-रुपये दिल्या बदल मी तुमची आभारी आहे’ तर सौ. वंदना विनोद आवारे म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला. रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्ही ओवाळणी म्हणून ३०००/- रुपये बहिणीला दिले, खुप आनंद वाटला.

श्रीमती मोनिका महाजन या आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाल्या, आम्हाला वाटले नव्हते एवढ्या लवकर पैसे मिळतील. पैसे आल्याचा मेसेज बघून आनंद वाटला. सुनिता धनगर या अंगणवाडी मदतनीस आहेत, त्या म्हणाल्या, मला तर खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाच, पण आम्ही ज्या महिलांचे फॉर्म भरून घेतले त्यांचे पैसे जमा झाल्याचे फोन करून आनंद व्यक्त करत आहेत.
जळगाव जिल्ह्यात या योजनेसाठी 5 लाख 33 हजार 791 एवढे अर्ज आले आहेत. तालुकानिहाय अर्ज पुढील प्रमाणे आणि कंसात पात्र झालेल्या लाभार्थी बहिणींची टक्केवारी आहे.

जळगाव -79,350 ( 97.11 ) , जामनेर 52,071 ( 98.72 ), चाळीसगाव -51,308 ( 98.41 ) , रावेर -46,386 ( 98.57 ), पाचोरा -40,165 ( 97.23 ), चोपडा – 38,244 ( 97.21) , भुसावळ -36,350 ( 98.01 ), अमळनेर -33,921 ( 99.29 ) , यावल – 33,482 ( 98.02 ) , पारोळा – 24,927 ( 97.59 ), मुक्ताईनगर – 23,237 ( 98.4 ) , भडगाव- 20,681 (96.71 ), एरंडोल – 20,148 ( 96.19 ), धरणगाव – 19,853 ( 99.14 ), बोधवड – 13,668 ( 98.71 ) आधार सिडींग जोडणीचे काम सुरु आहे. हा लाभार्थी बहिणींचा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाने दिली.

भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

भंडारा दिनांक 15 : राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठकीद्वारे हा संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजक,र मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, भंडारा नगरपरिषदचे मुख्याधिकारी करण चव्हाण, व अन्य अधिकारी उपस्थित होते.

सौ. समिता भंडारी, सौ. प्रियंका नागपुरे, सौ. रंजना साखरकर, सौ. गीता धकाते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संवाद साधला. या योजनेच्या अंमलबजावणीवर समाधान व्यक्त करत यामुळे आर्थिक रित्या आत्मनिर्भर झाल्याची भावना या माता भगिनींनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील लाडक्या बहिणीशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद; लाडक्या बहिणींनी व्यक्त केला आनंद

गोंदिया दि. 15-राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी बहिणींशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. योजना अतिशय चांगली असून आम्हाला लाभ मिळाल्याने आम्ही आनंदी असल्याच्या प्रतिक्रिया सहभागी महिलांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठकीद्वारे हा संवाद साधला. फुलचुर आणि खमारी येथील ज्या महिला लाभार्थ्यांना 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा प्रत्यक्ष लाभ ज्यांच्या बँक खात्यात जमा झाला त्या महिलांशी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुरुंगानंथम एम , जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद संजय गणवीर , नगर परिषद मुख्याधिकारी गोंदिया व तिरोडा , बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंदिया व तिरोडा, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका तसेच प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी महिला प्रत्यक्ष उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सदर योजनेचा लाभ सदैव सुरू राहणार असून तो कधींही बंद होणार नाही. तसेच ही योजना यशस्वी करण्यामागे शासनाच्या सर्व विभागाचे सहकार्य मोलाचे आहे.

युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना, बळीराजा मोफत वीज योजना, अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण, नुकसानग्रस्तांना मदत वाटप, आनंदाचा शिधा वाटप या योजनांचाही आमच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ होणार असल्याचे सहभागी महिला लाभार्थ्यांनी सांगितले.

खमारी येथील दुर्गा सेलोकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संवाद साधला. या योजनेच्या अंमलबजावणीवर समाधान व्यक्त करत यामुळे आर्थिकरित्या आत्मनिर्भर झाल्याची भावना या माता भगिनींनी व्यक्त केली.
000

नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींशीही संवाद

दरम्यान या संवाद सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रातिनिधिक लाभार्थींशीही संवाद साधला. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांच्यासह दोन्ही योजनांच्या लाभार्थी उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती खैरनार, ज्योती महाजन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या लाभार्थी तेजस्विनी कुलथे यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती सुनील खैरनार (रा. नांदगाव, ता. नांदगाव) यांनी १७ जुलै रोजी योजनेचा अर्ज स्वत: भरला होता. महिनाभराच्या आतच त्यांच्या बँक खात्यावर काल दुपारी रुपये तीन हजार रक्कम झाल्याचे जमा सांगून आपल्याला ही रक्षाबंधनची ओवाळणी मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या घरी पती, सासू, सासरे व २ छोटी अपत्ये आहेत. त्यांचे पती कापड दुकानात काम करतात. सहा जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्या पगारात भागविताना तारेवरची कसरत व्हायची. कुटुंबाला हातभार म्हणून त्या स्वत: अस्मिता ग्राम संघाच्या सदस्या झाल्या असून, बाजरी प्री मिक्स करण्याचे काम त्या करतात. या पैशांतून संसारासाठी आर्थिक मदत होणार असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती अरुण महाजन (रा. गिरणानगर, ता. नांदगाव) यांनी बँक खात्यावर ३ दिवसांपूर्वी रक्कम जमा झाल्याचे सांगून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. कुटुंबात त्यांच्यासह पती, सासू व दहावी पास मुलगा हे सदस्य आहेत. त्यांचे पती खासगी वाहनचालक आहेत. त्या स्वतः उम्मेद अभियानच्या सी आर पी आहेत. त्यांनी १५ जुलै रोजी स्वत: या योजनेचा अर्ज भरला होता. स्वतः अर्ज भरण्याबरोबरच त्यांनी इतर महिलांनाही प्रेरित केले. त्यांचा मुलगा आय. टी. आय. ला प्रवेश घेत असून त्याच्या प्रवेशासाठी या रकमेचा विनियोग करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
या दोन्ही लाभार्थींनी मुख्यमंत्रीरूपी भाऊ आपल्या पाठिशी असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.
तेजस्विनी नंदकुमार कुलथे (रा. नाशिक) ही पदवीधर युवती नोकरीच्या शोधात असताना अनुभवाअभावी तिचे प्रयत्न अपुरे पडत होते. मात्र, तिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. तिने नोंदणी केल्यानंतर तिला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी तिला मासिक दहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे. यामुळे तिला आर्थिक मदतीसह शासकीय कार्यालयातील कामकाजाचा अनुभव मिळणार असून, भविष्यातील नोकरीसाठी या अनुभवाची मदत होणार असल्याचे सांगून तिने राज्य शासनाचे आभार मानले.
00000

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ३ हजार रूपये खात्यावर जमा, मला लय भारी वाटतंय! – लाभार्थी सरिता कांबळे बहिणीची प्रतिक्रिया

जिल्ह्यातील सरिता कांबळे ठरल्या पहिला लाभार्थी

कोल्हापूर दि. 15 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया आज स्वातंत्र्य दिनी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांना 2 महिन्यांची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली असून उर्वरित पात्र महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत लाभ वितरित होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोल्हापूर येथून या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी एकनाथ कांळबांडे, महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे आदी अधिकारी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्था व अंगणवाडी सेवीका, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी सरिता कांबळे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून त्यांचे आभार मानले. श्रीमती कांबळे यांनी आनंद व्यक्त करताना रक्षाबंधनाची भेट मला 3 दिवस आधीच मिळाली असे मत व्यक्त केले. महिलांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानून कोल्हापूरी भाषेत ‘मला लयं भारी वाटतंय!…’ अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली. अंगणवाडी सेवीकेनी मला नारी शक्ती दूत ॲप द्वारे माहिती भरण्यास मदत केली असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी अनुराधा कुमठेकर यांनी मला व कुटुंबियांसाठी आर्थिक लाभ होणार असल्याने शासनाचे आभार मानले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून मिळणाऱ्या अनुभवाचा भविष्यात निश्चित फायदा होणार

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात प्रशिक्षणासाठी रुजू झालेल्या मृणाली कांबळे यांनी प्रशिक्षण घेवून मला नोकरीसाठी मदत होईल.  यातून मला प्रमाणपत्र मिळणार तर आहेच शिवाय सरकारी योजनेची माहितीही मिळणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तसेच महिला व बाल विकास विभागाअतंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मिळाली या अनुभवाचा भविष्यात फायदाही होणार असल्याने शासनाचे तिने आभार मानले. यावेळी उपस्थित इतर लाभार्थी यांनी मिळालेल्या लाभाबद्दल शासनाचे आभार मानले.

0000000

मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा मनमोकळा संवाद; बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी जमा झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान

मला मिळालेले तीन हजार तीन लाखासारखे

मुख्यमंत्री ‘सर’ नाही तर ‘भाऊ’ असा आवाज देणार…

मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून कुटुंबात आता माझी नव्याने ओळख…

मुंबई, दि. 15: ‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहिले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत.  या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतूद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्यापुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने 108 योजना सुरु केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज या योजनेच्या माध्यमातून बहिणींसोबत एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. सर्वसामान्य, दुर्बल, गरीब, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक – युवती, कामगार यांच्यासाठी सरकार शक्य ते सर्व करत आहे. या सर्वांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला की केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’च्या माध्यमातून बचतगट सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. पूर्वी बचत गटांसाठी असलेली कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख रुपयांपर्यंत केली आहे. आता त्यामध्ये 50 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, शैक्षणिक फीसाठी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मुलींना शिक्षणामध्ये 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, युवक – युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. याचा फायदा उद्योगांनाही होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहेत. त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी फायद्यातच आली आहे. याशिवाय वारकऱ्यांना शासन मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. फक्त रस्ते, पूल बांधणे, दळणवळणाची साधने उभारणे महत्त्वाचे नाही तर लोककल्याणकारी योजना राबवणेही महत्त्वाचे आहे. यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यातील प्रत्येक घटकासाठी शासन योजना राबवित आहे.

शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बील माफ करण्यात आले आहे. 45 लाख कृषिपंप धारकांना याचा लाभ झाला आहे. तसेच नमो सन्मान योजनेमध्ये केंद्राच्या 6 हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासनाचे 6 हजार रुपये आणखी भर घालून आता 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

एखादी योजना सुरु करणे सोपे काम नाही. तसेच ती एका दिवसातही तयार होत नाही. लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम 1 वर्षापासून सुरु होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव  यांच्या परिश्रमामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यापर्यंत योजना पोहोचवल्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचे मी अभिनंदन करतो.

महिलांना सक्षम  व आत्मनिर्भर बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींना वंदन करण्याचा दिवस – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे  

परभणी, दि. 15 (जिमाका) : पारतंत्र्यात असणाऱ्या आपल्या मातृभूमीस स्वतंत्र होण्याच्या घटनेस आज 77 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी असंख्य महामानवांनी आपले सर्वस्व पणास लावले. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचे अन्याय, अत्याचार सहन केले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. महान स्वातंत्र्य सेनानीसह अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावले. त्या सर्वांना वंदन करण्याचा, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री. गावडे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पुढे श्री. गावडे म्हणाले की, हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात नेत्रदिपक प्रगती साधली, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतातील लोकशाही मूल्यांचे जतन झाल्याने आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था निर्माण करुन जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. आपल्या देशाने मिश्र पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारल्याने विकास प्रक्रिया सर्वसामान्यांपर्यंत पोहचत असल्याचे आपण पाहत असल्याचे सांगितले.

आपल्या जिल्ह्यासमोर विविध समस्या आहेत, परंतू या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याकरीता शासन आणि प्रशासनामार्फत देखील सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आपण सर्वांनी मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करू, नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु असे सांगत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, आणि पत्रकार उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर श्री. गावडे यांनी उपस्थितांना अभिवादन करत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार केला.

यावेळी जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षातील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या चित्ररथाचे आणि सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांग संघटना द्वारा नशामुक्त भारत अभियानास हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

कुळगाव बदलापूर नगरपरिषद इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

बदलापूरवासियांना दिले महानगरपालिका करण्याचे आश्वासन

ठाणे,दि.15 (जिमाका) : आज बदलापूर बदलत आहे. लोक बदलापूरला पसंत करु लागले आहेत. लोक बदलापूरला राहायला यायला लागले आहेत. तुम्ही सांगा आम्हाला महानगरपालिका पाहिजे, तेव्हा महानगरपालिका केली जाईल. सरकार शेवटी लोकभावनेचा विचार करणारे आहे. तुमचा आवाज ऐकणारे सरकार आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापूर येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या उर्दू शाळा क्र. ०२ व कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  लोकार्पण करण्यात आले, त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश(बाळ्या) म्हात्रे, आमदार किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कुळगाव बदलापूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड, विविध विभागाचे प्रशासकीय  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेची ही इमारत भव्यदिव्य आहे. या इमारतीसाठी मी मुख्यमंत्री असल्याने 25 कोटी रुपये देऊ शकलो. शेती व पायाभूत सुविधामध्ये आपण चांगले काम केले आहे. जे प्रकल्प बंद होते ते आपण सुरू केले. लोक उपोषण करतात, आंदोलन करतात, कारण मुख्यमंत्री देणारा आहे. लोकांचा विश्वास आहे. देशामध्ये सर्वात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रात आहेत. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपला पहिला नंबर आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे. त्याला मदत करताना आपण आपला हात आखडता घेतला नाही. हे सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे.

आम्ही सांगितले होते की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस आपल्या बँक खात्यात जमा होतील. राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा केले आहेत. हे सरकार जे बोलत आहे, ते करीत आहे. आपल्या अर्जात त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करुन घेऊ. आपले 31 ऑगस्टनंतर जरी अर्ज आले तरीही आपणाला  जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे देणार आहोत. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आमचे सरकार बहिणीच्या खात्यात पैसे भरणारे आहे. आपण वेगाने निर्णय घेतले आहेत.महिलांसाठी 107 निर्णय  आपण घेतले आहेत,असेही यावेळी सांगितले.

देशातील हे पहिले राज्य आहे. तरुणांना प्रशिक्षण पण देत आहे आणि पैसे पण देत आहे.आपल्या राज्यात उद्योग येत आहेत.त्यांना मनुष्यबळ आपण त्यांना देत आहोत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजेनमधून 547 तरुणांना ठाणे महानगरपालिकेने नियुक्तीपत्र दिले आहेत.तसेच आपणही कुळगाव बदलापूर  नगरपरिषदेमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार द्या. आपण उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण दिले आहे.मुलींना यापुढे कोणतेही शिक्षणासाठी पैसे भरावे लागणार नाहीत. शेतकऱ्यांना मोफत वीज योजना सुरु केली आहे.ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.

या सर्व योजना चालू राहणार आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका. जे आपणास आवश्यक आहे, ते आपणास देण्यात येईल.असेही यावेळी श्री.शिंदे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या

0
बुलडाणा, (जिमाका) दि. २०:  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२  व राज्य शासनाच्या आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 1 लाख 20 हजाराहून जास्त घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात...

उद्योगस्नेही वातावरणातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

0
छत्रपती संभाजीनगर दि. २०: राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी समन्वय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

0
पुणे दि.२१: आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवार (२०) रोजी दर्शन...

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान – केंद्रीय मंत्री अमित शाह

0
मुंबई, दि. २०: देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना व्यापार व उद्योगांचे...

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात विचारवंत दिले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २० : पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात थोर विचारवंत व क्रांतिकारक दिले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल - बाल - पाल या त्रयींसह...