सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 559

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबविताना पारदर्शकता ठेवा -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

  • प्राप्त लाख ५९  हजार ८२७  अर्जापैकी ४ लाख २४ हजार २११ अर्जांना मान्यता
  • प्राप्त सर्व अर्ज तात्काळ निकाली काढा

सांगली, दि. (जिमाका): महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा तळागाळातील लोकांपर्यंत मिळेल. ही योजना राबविताना पारदर्शकता ठेवावी. प्राप्त सर्व अर्ज निकाली काढावेत, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा आढावा पालकमंत्री डॉ. खाडे यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, या योजनेंतर्गत जिल्ह्यात दिनांक 9 ऑगस्ट रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत 4 लाख 59 हजार 827 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 4 लाख 24 हजार 211 अर्जांना मान्यता दिली आहे, अंशता अमान्य अर्ज 33 हजार 313 असून 2 हजार 303 अर्ज अमान्य आहेत. अंशता अमान्य अशा अर्जातील त्रुटी प्रशासनाने संबंधिताना कळविल्या आहेत. संबंधितांनी त्या त्रुटींची पुर्तता तात्काळ करावी. या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत मंजूर होवून शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने  प्राप्त अर्जांना मंजुरी देण्यात आली.  बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्राप्त व निकाली अर्जांची सविस्तर माहिती दिली.

०००

क्रीडा संकुलात विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या -पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. ९, (जिमाका) : क्रीडा संकुलात विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी तात्काळ प्रस्ताव द्या, अशा सूचना राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, कोल्हापूर विभागाचे क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किर्तीकर मिरजकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव दुरूस्ती, 400 मिटर सिंथेटिक ट्रॅकचे बांधकाम, व इतर आवश्यक दुरूस्ती, सुरक्षा रक्षक सेवा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे वसतिगृहाबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिल्या.

०००

वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत कार्यरत हातमाग विणकरांना तहहयात पेन्‍शन देण्याचा लवकरच निर्णय – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

▪️नागपूर येथे राज्यस्तरीय हातमाग पुरस्काराचे शानदार वितरण

नागपूर,दि.: अत्यंत आव्हानांना सामोरे जात आपल्या पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या कलेला जीवंत ठेवण्यासमवेत त्यात आपल्या कौशल्यातून भर टाकणाऱ्या हातमाग विणकरांचे योगदान अनेक पुरस्कारांपेक्षाही मोठे आहे. वयाच्या साठ वर्षापर्यंत कार्यरत असलेल्या हातमाग विणकरांना त्यांच्या योगदानाप्रती वार्धक्यातील शिदोरी म्हणून पेन्‍शन देण्याचा लवकरच निर्णय आम्ही घेत असल्याचे सूतोवाच  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राष्ट्रीय हातमागदिनानिमित्त आज येथील नियोजन सभागृहात आयोजित राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेतील बक्षीस वितरण सभारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी  वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा, रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत व मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या हातमाग धोरणानुसार जास्तीत जास्त व्यक्तींना यातून रोजगार उपलब्ध व्हावेत यादृष्टीने आपण भर दिला आहे. उत्तम काम करणाऱ्या विणकरांचा गौरव व्हावा, त्यांच्या निर्मितीला चालना मिळावी यासाठी आपण घोंगडीपासून करवत काटी साडी, पैठणी, खण, हिमरु शाल आदी पारंपारिक कलाकौशल्यावर भर दिला आहे. याचबरोबर हातमाग व्यवसायाला लागणारे जे रेशीम आहे त्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान झाला पाहिजे याउद्देशाने आपण तुती लागवडीद्वारे भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही पुरस्कार देत आहोत, असे वस्त्रोद्योग मंत्री यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अल्प भू-धारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळाले पाहिजे यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. वस्त्रोद्योग व हातमाग या व्यवसायाला येणारा कच्चा माल हा शेतीतूनच येतो. यात प्रामुख्याने हातमागासाठी  वरचेवर मोठ्या प्रमाणात सिल्कची मागणी वाढत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून तुती लागवडीद्वारे रेशीम कोषाची निर्मिती करणारे शेतकरी वाढले आहेत. यात त्यांनी आपल्या कष्टातून एकरी लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊन कृषी क्षेत्रातला नवा मार्ग समृद्ध केल्याचे गौरोद्गार वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकात पाटील यांनी काढले. माझे वडिल केवळ अडीच एकर शेती असल्याने गाव सोडून मुंबईकडे वळले होते. गावी सिंचनाची सुविधा झाल्यामुळे मी आता महानगरातून गावी परतलो, असे ते म्हणाले.

अगदी प्रारंभीच्या काळात भारताने उत्तम वस्त्र निर्मिती केलेली होती. तेव्हाच्या एकूण जागतिक व्यापारात 32 टक्के वाटा हा आपला होता. हातमाग वस्त्र व मसाल्याच्या पदार्थातून आपण निर्यातीवर पकड ठेवली होती. ब्रिटीशांच्या काळात जहाज निर्मितीलाही भारतीयांनी आपले कौशल्य सिध्द करुन दाखविले होते. हे वैभव ब्रिटीशांनी लुटून नेले हे आपण विसरता कामा नये. अशा परिस्थितीत आपण स्वातंत्र्यानंतर आज पुन्हा जागतिक पातळीवर एक भक्कम स्थिती गाठल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कष्टकरी, विणकरी आणि इतर कारागिरांसाठी अनेक विकासाच्या योजना दिलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनही अनेक योजना घेऊन विणकरांच्या पाठिशी भक्कमपणे उभे असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा यांनी केले तर वस्त्रोद्योग विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत यांनी दिली.

 

असे आहेत विजेते

राष्ट्रीय हातमाग कापड स्पर्धेतील वॅल हँगीग (संत कबीर) या प्रकारात सोलापूर येथील राजेंद्र सुदर्शन अंगम यांनी 50 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले.  पैठणी ब्रोकेट साडी या वाणाच्या प्रकाराला गिराम तालेब कबीर या छत्रपती संभाजीनगरच्या  विणकराला 40 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. भंडारा येथील कोसा करवती साडी वाणाच्या प्रकारातील मुरलीधर निनावे या विणकराला 30 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.

राज्यस्तरीय पारंपारिक कापड स्पर्धेत गिराम तालेब कबीर या विणकराला पैठणीसाठी प्रथम 20 हजार रुपयांचे, दीपक माहुलकर या येवला येथील विणकराला द्वितीय क्रमांकाचे 15 रुपयांचे   तर येवलाच्याच युवराज परदेशी याला तृतीय क्रमांकाचे 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. हिमरु शाल प्रकारात छत्रपती संभाजी नगरच्या इमरान कुरेशी यांना 20 हजार रुपयांचे प्रथम, फैसल कुरेशी यांनी 15 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.

करवतीसाठी प्रकारात अनुक्रमे उद्धव निखारे, गंगाधर गोखले, इशिका पौनीकर यांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कार मिळाले. घोंगडी प्रकारात अक्कलकोट येथील सिद्धम्मा कलमनी, रेव्वंमा सिन्नुर, विजयालक्ष्मी हुलमनी या तिन्ही महिलांनीच अनुक्रमे प्रथम ते तृतीय पुरस्कार मिळविले. खण फॅब्रीक प्रकारात उमरेड येथील कृष्णाजी धकाते, यशवंत बारापात्रे ( नागपूर ) व प्रभाकर निपाने यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय असे पुरस्कार प्राप्त केले. याचबरोबर तुती/टसर लक्षाधीश शेतकऱ्यांना या कार्यक्रमात पुरस्कार बहाल करण्यात आले.

०००

२ लाख ७४ हजार ३४६ भगिनींच्या खात्यावर ८२ कोटी ३० लाख ३८ हजार होणार जमा -पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि. (जिमाका): ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तंर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 74 हजार 346 लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ 82 कोटी 30 लाख 38 हजार रकमेचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

तालुकानिहाय अनुक्रमे प्राप्त अर्जांची संख्या आणि वितरीत होणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे.  मंडणगड-10 हजार 178, रक्कम-5 कोटी 45 लाख 34 हजार.  दापोली-31 हजार 370, रक्कम-9 कोटी 41 लाख 10 हजार.  खेड-29 हजार 304 रक्कम-8 कोटी 79 लाख 12 हजार.  चिपळूण-43 हजार 778,  रक्कम-13 कोटी 13 लाख 34 हजार.  गुहागर-25 हजार 543, रक्कम-7 कोटी 36 लाख 29 हजार.  संगमेश्वर-32 हजार 532 रक्कम-9 कोटी 75 लाख 96 हजार.  रत्नागिरी-53 हजार 912 रक्कम-16 कोटी 17 लाख 36 हजार.  लांजा-18 हजार 901 रक्कम-5 कोटी 65 लाख 3 हजार.  राजापूर- 29 हजार 828 रक्कम-8 कोटी 94 लाख 84 हजार.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत 3 हजार 90 लाभार्थ्यांना 92 लाख 70 हजार होणार वितरण

वयाची 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांनी वयोमानपरत्वे येणारे अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून त्यांना आवश्यक सहाय उपकरणे, साधने खरेदी करण्यासाठी त्याबरोबर मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे.  या योजनेत 3 हजार रुपयांप्रमाणे साधने घेण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.

तालुकानिहाय अनुक्रमे नोंदणी केलेल्या अर्जांची संख्या आणि देण्यात येणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे.

मंडणगड-97, रक्कम-2 लाख 91 हजार, दापोली-137. रक्कम-4 लाख 11 हजार.  खेड-21 रक्कम-63 हजार. चिपळूण 469 रक्कम-14 लाख 7 हजार.  गुहागर 231 रक्कम-6 लाख 93 हजार.  संगमेश्वर-872 रक्कम-26 लाख 16 हजार.  रत्नागिरी-486 रक्कम-14 लाख 58 हजार.  लांजा-117 रक्कम-3 लाख 51 हजार.  राजापूर-660 रक्कम-19 लाख 80 हजार असे एकूण 3 हजार 90 लाभार्थ्यांना 92 लाख 70 हजार रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

०००

शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत-सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि. ९: भारतीय राज्यघटनेने आदिवासी नागरिकांना दिलेले हक्क अबाधित राखून शिक्षणाच्या माध्यमातून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाच्यावतीने कोटमदरा येथे आयोजित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी  गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक, सहायक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी विजया पंढुरे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश घोलप आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने समाजातील सर्व नागरिकांना समान हक्क प्रदान केले असून आदिवासी नागरिकांचे हक्क अबाधित राखून त्यांचे रक्षण करावे, त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. आदिवासी समाजाच्या प्रगतीकरीता शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, शिष्यवृत्ती आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, या सुविधेचा शिक्षणाकरीता उपयोग केला पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्यात परिवर्तन होत असल्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे.

ते पुढे म्हणाले, परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना राबवून त्यांना लाभ देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे याकरीता आश्रमशाळेच्या अत्याधुनिक इमारती, मुला-मुलींची स्वतंत्र वसतिगृहे उभारण्यात येत आहे.  येथील विद्यार्थ्यांना पुणे येथे पुढील शिक्षण घेता यावे, याकरीता ७ हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याबाबत राज्याच्या आदिवासी विकास मंत्र्यासोबत चर्चा करण्यात आली आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचे फार मोठे योगदान असून आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळी विचारांची लढाई लढली, शांततेत आंदोलन करुन चर्चेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले.  आजही आदिवासी समाजानत सामुदायिक विवाह व सामूहिक निर्णयपद्धती, आवश्यकतेनुसार पीक पिकविणे, जंगलाचे रक्षण आदी चांगल्या प्रथांचे जतन केले जाते. आदिवासी समाज  निर्सगाच्या विरुद्ध  पाऊल न टाकता त्याचे रक्षण करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून इतर समाजाला बोध घेण्याची गरज आहे.

आदिवासी भागांचा विकास करताना वन कायदा, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, परिसराला लागून अभयारण्य, पर्यावरणाचे रक्षण या बाबींचा विचार करुनच विकास करावा लागतो, परिसराचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मंत्री श्री. वळसे पाटील यांनी दिली.

प्रकल्प अधिकारी श्री. पाटील म्हणाले, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय योजना, न्यूक्लियस बजेट योजना, ठक्करबप्पा आदिवासी वस्तीसुधार योजना, प्रधानमंत्री आदि आदर्श योजना, शबरी घरकुल योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना आदी विविध योजना राबविण्यात येत आहे. तसेच रस्ते, वीज, पाणी, विद्युत योजना अशा पायाभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आहे, असेही श्री. पाटील म्हणाले.

मंत्री श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थी, शासकीय वसतिगृह व आश्रमशाळेतील स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आदिवासी बचत गटाच्यावतीने मांडण्यात आलेल्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.

०००

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे १४ लाख खातेदारांना ५२१६ कोटी रकमेचे वाटप

पात्र ठरलेल्या ३३ हजार ३५६ कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई, दि. 9 : सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेत आधार प्रमाणीकरण झालेल्या 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरीत करण्यात आला आहे. मात्र, या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या 33 हजार 356 कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही. अशा पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकार विभागाच्या दिनांक 29 जुलै 2022 रोजीच्या शासननिर्णयाद्वारे अंमलात आली. सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल रुपये 50 हजार पर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारा करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण 29 लाख 2 हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी, 4 लाख 90 हजार कर्जखाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: 8 लाख 49 हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

पात्र ठरलेल्या 15 लाख 44 हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी 14 लाख 40 हजार कर्जखात्यांसाठी 5,222 कोटी 5 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी 14 लाख 38 हजार खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ

‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ९ : ०७ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” मधील विहित नमुन्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि. ३१ ऑगस्ट २०२४ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२४ च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्ताव शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देतील.

जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून ३ गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे, सर्व कागदपत्र व्हिडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे सादर करतील. निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणाचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांच्याकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

०००

केशव करंदीकर/व.स.सं

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/Ganeshotsav-GR-२४-ANTIM.pdf” title=”Ganeshotsav GR २४ ANTIM”]

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेत ३,१०,१८६ अर्ज मंजूर

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांचे आवाहन

मुंबई, दि 9 :- राज्य शासनाने राज्यातील महिला, युवक-युवती,ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्यासाठी  सामाजिक न्यायाच्या विविध योजना सुरु केल्या असून या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर जिल्ह्यात या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी करण्यात येत असून या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाने जाहिर केलेल्या सर्व माध्यमांवर व जाहिरातींमधून या योजनांचे निकष व लाभ याबाबत माहिती घेण्याचे आवाहनही मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३,८४,८४३ अर्ज प्राप्त, मंजूर अर्ज – ३,१०,१८६, फेरतपासणीसाठी पाठविलेले अर्ज – ७१,४५९, नामंजूर अर्ज – ११५० आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत नवीन नोंदणी झालेल्या आस्थापना शासकीय – ३६, खाजगी – २८, आतापर्यंत अधिसूचित झालेली रिक्त पदे २७४१, शासकीय – ४०५, खाजगी – २३३६, ऑनलाईन अर्ज केलेले उमेदवार २६३८, अंतिमतः निवड झालेल्या उमेदवारांची संख्या- शासकीय – ११, खाजगी – ३००, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेत अर्ज वाटप – १०००. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज वाटप – १५००, प्राप्त अर्ज – १६३, वैध अर्ज – ९९, इतर जिल्हयातील – ६४ असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

—–000—–

केशव करंदीकर/व.स.सं

मराठा समाजाचे विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन

सातारा येथे मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार

सातारा दि. 9 (जि.मा.का.) :-   मराठा समाज शतकानुशकतके समाजातील अठरा पगड जाती जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाचे आर्थिक, सामाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिले ही शासनाची भूमिका आहे. विकासाच्या सर्व प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहे. कायद्याच्या चौकटीत टिकणारे कल्याणकारी निर्णय घेण्यात येत आहेत. मराठा समाजातील तरुणांनी नोकरी देणारे व्हावे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करण्यात येऊन या महामंडळाला बळकटी देण्यात आली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी मराठा उद्योजक निर्मितीचा 1 लाखाचा यशस्वी टप्पा पूर्ण केल्याबद्दल महामंडळाचे विशेष अभिनंदनही केले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने 1 लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती मेळावा येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री शंभूराज देसाई, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक –निंबाळकर, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

एक लाख मराठा उद्योजक निर्माण करण्याचे काम महामंडळाने केले आहे. ही निश्चतच अभिनंदनीय बाब आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मराठा समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. नोकऱ्यांची निर्मिती पुरेशा प्रमाणात नसल्याने मराठा समाजात नोकरी देणारे उद्योजक निर्माण करण्यासाठी महामंडळाची पुनर्रचना केली आहे. बँकांच्या माध्यमातून साडेआठ हजार कोटींचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. जवळपास 825 कोटी व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगदान अतिशय चांगले राहिले आहे. महामंडळाने बँकांच्या सहकार्याने आणखीन 5 लाख उद्योजक बनवाने व या उद्योजकांनी 25 लाख नोकऱ्या द्याव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सारथी सारख्या संस्थांच्या निर्मितीने गरीब शेतकऱ्यांच्या, मराठा समाजातील सर्वसामान्यांच्या तरुणांना स्पर्धा परीक्षांचे दालन उपलब्ध करुन दिले आहे. समाज, समाजातील तरुण यांच्या विकासासाठी कार्ययोजना करणे आवश्यक असते ते सारथीने करुन दाखविले आहे. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मागणी केल्याप्रमाणे सातारा येथे मराठा समाजातील तरुणांसाठी वसतिगृह उभे करुन दिले जाईल. प्रशासनाने त्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, असे सांगून शासनाने 1 हजार 600 कोटी रुपये मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला आहे. 507 विविध अभ्यासक्रम मुलींसाठी विनामुल्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही सांगितले.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महामंडळाने एक लाखचा उद्योजक निर्मितीचा संकल्प टप्पा पूर्ण केल्याने आपण भावूक झाल्याचे सांगून महामंडळाच्या पुनर्रचनेमुळे मराठा नवद्योजकांना न्याय देण्याचे काम होत असल्याचे सांगितले. महामंडळाचे कार्य सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात फिरुन आपण संवाद साधला आहे. मराठा समाजात व्यावसायीक निर्माण करण्यात महामंडळाचा वाटा मोलाचा आहे, असे सांगून यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शासकीय, सहकारी, एनबीएफसी बँकांनी मिळून साडे आठ हजार कोटींचे कर्ज वितरण मराठा समाजातील उद्योजकांना केले असून महामंडळाने सुमारे  850 कोटींचा व्याजपरतावा दिल्याचे नमूद केले.

यावेळी आमदार श्री. भोसले म्हणाले, महामंडळाने केलेल्या कर्ज वितरणात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वाटा महत्त्वपूर्ण असून बँकेच्या माध्यमातून मराठा समाजातील गरजू उद्योग व्यवसायीकांकडे पोहचू शकलो याचे समाधान आहे.  प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी मंजुरी व निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच मराठा समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह उभे करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सातारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तसहील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले. यावेळी लाभार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, तरुण उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

ज्ञान संपादनासाठी वाचनाची सवय अंगीकारण्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य आणि जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग मध्ये सामंजस्य करार

मुंबई, दि. 9 : प्रत्येक कामात अचूकता येण्यासाठी जर्मनीमध्ये एकाग्रतेने काम करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांनी जर्मन नागरिकांच्या या कार्यसंस्कृतीचे अनुकरण करावे. त्याचबरोबर ज्ञान संपादनासाठी अधिकाधिक वाचनाची सवय अंगीकारावी, असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्याला कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य आणि बाडेन वुटेमबर्ग मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाचा तसेच शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा; महावाचन उत्सव; माझी शाळा, माझी परसबाग; माझी शाळा, स्वच्छ शाळा या प्रोत्साहनात्मक उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्य दूत एचिम फेबिग यांच्यासह शालेय विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आदी यावेळी उपस्थित होते.

जर्मनीमध्ये रोजगार मिळण्यासाठी इच्छुक उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या क्युआर कोडचे तसेच या प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे अनावरण यावेळी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. शालेय शिक्षण विभाग आणि गोथ्ये इन्स्टिट्यूट यांच्यात युवकांना जर्मन भाषा शिकविण्याबाबत झालेल्या करारांचे आदानप्रदान करण्यात आले. तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ, अमेरिकेशी तेथील मुलांना मराठी शिकविण्याबाबत झालेल्या सुधारित करारांचे हस्तांतरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि एकाग्रता अतिशय महत्त्वाची आहे. एकावेळी एका कामावर लक्ष केंद्रित करून त्यात अचुकता येईल यासाठी प्रयत्न करावा. जर्मनीची कार्यसंस्कृती यासाठी प्रसिद्ध असून तेथे रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या बाबींचा अंगिकार करावा. आयुष्यात अडचणी आल्या तरीही त्यावर मात करुन पुढे जाणारे यशस्वी ठरतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या लक्ष्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जात रहावे, असा सल्ला त्यांनी दिला. शालेय शिक्षण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून त्यांनी या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जर्मनीला कुशपोल मनुष्यबळ पुरविणे हा लोकाभिमुख उपक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला चालना देणारा असून या उपक्रमाची गिनिजबुक मध्ये नोंद झाली आहे. महावाचन उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नाळ वाचन संस्कृतीशी जोडली जावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारासाठी जर्मनीमध्ये जाण्याचे नवे दालन खुले झाल्याचे सांगितले. युवकांना याचा लाभ होणार असून राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करणार असल्याचे ते म्हणाले.

ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच चाकोरीबाहेरील शिक्षण देण्याच्या मंत्री श्री.केसरकर यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. माझी परसबाग उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व कळेल तसेच त्यासंदर्भात जागरुकता निर्माण होईल. जर्मनीमध्ये रोजगार उपलब्ध करुन देणारा करार युवकांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मंत्री श्री.लोढा यांनी भारतात कुशल मनुष्यबळाची कमतरता नसल्याचे सांगून आपल्या कर्तृत्वावर भारतीय व्यक्ती जगभर सर्वच क्षेत्रात कार्यरत असल्याचे म्हणाले. राज्य शासनामध्ये युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागासोबत इतर संबंधित विभाग एकत्रित प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविकाद्वारे उद्घाटन होत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. युवकांना कौशल्य प्रशिक्षण घेऊन बाडेन वुटेमबर्ग येथे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करणार असून त्यांनी परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा; अभियानाच्या पहिल्या टप्प्याला मोठा प्रतिसाद लाभला असून यामुळे शाळा अधिक चांगल्या होत असल्याचे ते म्हणाले. रिड इंडियाच्या धर्तीवर राज्यात महावाचन उत्सवाच्या माध्यमातून वाचन ही सवय बनावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे ब्रँड अम्बॅसिडर असून त्यांनीही विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केल्याचे ते म्हणाले. शेती हा देशाचा आत्मा आहे. माझी परसबाग उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय अंगिकारावी याबाबत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा संदेश यावेळी दाखविण्यात आला. तर विविध उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर.विमला, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार आदी यावेळी उपस्थित होते.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...