मंगळवार, जून 10, 2025
Home Blog Page 544

महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • एआय आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे
  • शहरी भागात बचतगटांची संख्या वाढवावी

मुंबई, दि. 16 : राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत बैठक झाली. बैठकीस कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, दोन दिवसांपासून राज्यातील महिला भगिनींच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होत आहे. काल मी यातील काही भगिनींनीशी संवाद साधला. त्यांना मिळणारी रक्कम छोट्या व्यवसायासाठी उपयोगात आणणार असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समजले. त्यामुळे आता महिला भगिनी करीत असलेल्या छोट्या-मोठ्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

राज्यात सुमारे ७ लाख ८२ हजार बचत गट कार्यरत असून उमेद अंतर्गत सुमारे सहा लाख, एनयुएलएम अंतर्गत ३१ हजार, माविम अंतर्गत ग्रामीण ८७ हजार आणि शहरी ६५ हजार असे बचत गट कार्यरत आहेत. महानगरांमध्ये बचत गट, महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना स्टॉलची उभारणी करण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. मोकळ्या जागा, मैदाने याठिकाणी  काही दिवसांकरीता स्टॉलची उभारणी करून देण्यात यावी. जेणेकरून याठिकाणी हक्काची बाजारपेठ या गटांना मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बचतगटांच्या वस्तूंना मोठी मागणी असते. त्याची दखल घेऊन राष्ट्रीयस्तरावर देखील त्याला बाजारपेठ मिळावी यासाठी उमेद, एनयुएलएम, माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी धर्मवीर आनंद दिघे महारोजगार  ॲपच्या माध्यमातून शासकीय स्तरावर असंघटीत कामगारांचे डिजीटल जॉबकार्ड तयार करण्याची संकल्पना यावेळी सादर करण्यात आली.

बैठकीस नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील आदी उपस्थित होते.

००००

 

रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख होण्यासाठी जगजागृती आवश्यक – पालकमंत्री गिरीश महाजन

  • बदलत्या जीवनशैलीत रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण
  • जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्धाटन

धुळे, दि. १६  (जिमाका) : मानवी आहारात रानभाज्याचे अनन्य साधारण महत्त्व असून या रानभाज्या पावसाळ्यातील दिवसातच येत असून त्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे रानभाज्यांची नवीन पिढीला ओळख होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उद्धाटनप्रसंगी केले.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे, प्रकल्प संचालक आत्मा, कृषि विज्ञान केंद्र, धुळे व स्वामी समर्थ सेवा केंद्र, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कैलास शिरसाठ, प्रकल्प संचालक (आत्मा) नवनाथ कोळपकर, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक दिनेश नांदे, डॉ. पंकज पाटील, उपप्रकल्प संचालक हितेंद्र सोनवणे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे, तालुका कृषि अधिकारी वाल्मिक प्रकाश, संजय पवार, शीतल तवर, योगेश सोनवणे याचेसह कृषि विभागाचे सर्व अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, रानभाज्यांचे जतन व नवपिढीला त्यांची ओळख होण्याच्या दृष्टीने जनजागरण मोहिम राबविणे, प्रदर्शन भरवणे तसेच रानभाजी महोत्सव राबविणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. आदिवासी भागामध्ये पावसाळ्यात जंगलातच रानभाज्या मिळतात त्यामुळे त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक भाजीच्या मागे एक शास्त्र असून प्रत्येक रानभाजी मानवी शरीराला लाभदायक असते. आजकालच्या फास्टफूडच्या जगात आपण पूर्वीच्या रानभाज्या विसरत चाललो आहे. अलीकडच्या काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी अमर्यादीत प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर होत आहे. यामुळे त्यांची नैसर्गीक चव व माणसातील रोग प्रतिकार शक्ती कमी होत आहे. पावसाळ्यात जंगलात आणि पहाडी भागात मोठ्या प्रमाणावर कंद व हिरव्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये माहिती होण्यासाठी तसेच त्यांच्यात असलेल्या विविध औषधी गुणधर्माची ओळख होणे गरजेचे आहे. रानभाजी वनस्पतीपासून विविध पदार्थ बनविता येतात व ते आहारात वापरता येतात, यापैकी बऱ्याचशा वनस्पती ह्या मधूमेह, खोकला, पोटदुखी आदींवर औषधी म्हणून तर काही वनस्पती गर्भवती महिला व बाळांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या आहे. काळाच्या ओघात परिसरातील रानभाज्या नष्ट होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांनी रानभाज्याचा आस्वादही घेतला.

यावेळी पालकमंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते रानभाज्यांची मांडणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच रानभाज्या विषयक उपयुक्त माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्वामी समर्थ सेवा केंद्र, शिवाजीरोड येथील बापूसाहेब सोनवणे, महेंद्र सुर्यवंशी, शांताराम देसले, कल्याण सिसोदे, भैय्या शिंपी यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी बहुमोल सहकार्य लाभले. कृषिभूषण शेतकरी दिलीप पाटील, वाल्मिक पाटील, प्रकाश पाटील, उद्यानपंडीत विजय चांडक,माजी महापौर प्रतिभाताई चौधरी,अनुप अग्रवाल,कमलाकर अहिरराव, नागरीक उपस्थित होते.

 

०००

‘फिरते मेडिकल क्लिनिक’ मुळे रुग्णांना घरपोच उपचार सुविधा- पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. १६: ‘फिरते मेडीकल क्लिनिक’च्या माध्यमातून मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते मेडिकल क्लिनिक असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधिर विद्यालयाला सदिच्छा भेट प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते.

यावेळी आमदार बच्चू कडू, माजी आमदार प्रवीण पोटे पाटील, बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मेळघाटातील अतीदुर्गम गावात रस्ते सुविधा कमी असल्याने प्राथमिक औषधोपचारासह इतर वैद्यकीय उपचार सुविधा घेण्यासाठी खूप अडचणी येतात. वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी दूर अंतरावरच्या आरोग्य केंद्रात जावे लागते. फिरते मेडिकल क्लिनिकमुळे आजारी व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचणे शक्य होऊन वेळेत संबंधित रुग्णाला उपचार सुविधा देता येईल, असे त्यांनी सांगितले. फिरते मेडिकल युनिट असलेली ही अँबुलन्स मेळघाटातील 25 गावात वैद्यकीय सेवा पुरविणार आहे. या मोबाईल मेडिकल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, रक्त चाचण्या उपलब्ध आहेत, अशी माहिती बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधिर विद्यालयाला येथे सदिच्छा भेट देवून विद्यालयाची पाहणी केली.

०००

बालकांमधील श्रवणदोष दूर करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाची ‘साद’

मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या ‘मिशन साद’ उपक्रमाला सुरूवात

  • ‘उमंग’ आणि ‘आरबीएसके’च्या सहाय्याने राबविला जाणार उपक्रम
  • जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची होणार तपासणी
  • प्रत्येक अंगणवाडीत होणार आरोग्य आणि शारीरिक तपासणी शिबीर

लातूर, दि. १६ :  जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील श्रवणदोष असलेल्या बालकांचा शोध घेवून, त्यांच्यावर वेळीच आवश्यक उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासाने ‘मिशन साद’ हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. उमंग इन्स्टिट्यूट आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम चमूच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार असून क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात झाली.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी संगीता टकले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, शरद झाडके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जावेद शेख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, उमंग इन्स्टिट्यूट डॉ. प्रशांत उटगे, डॉ. अपर्णा उटगे, किरण उटगे, डॉ. श्रीशैलम तलारी, डॉ. गणेश डोंगरे, डॉ. विरेश मयनाळे, डॉ. प्रतीक केंद्रे, डॉ. वैभव उटगे, डॉ. प्रवीण राठोड, डॉ. अर्जून राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमची टीम, उमंगचे व्यवस्थापक ॲड. श्रीहरी गोरे, रामेश्वर जाधव यावेळी उपस्थित होते.

एक हजारातील ५ मुलांमध्ये श्रवणदोष आढळून येतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास या मुलांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतो. ऐकण्याची क्षमता नसल्याने संभाषण क्षमतेवरही परिणाम होवून या मुलांमध्ये ऐकण्याचे व बोलण्याचे दिव्यांगत्व येते. त्यामुळे जिल्ह्यातील अशा बालकांचा वेळीच शोध घेवून त्यांच्यावर आवश्यक उपचार करणे आणि लातूर जिल्हा श्रवणदोष मुक्त करण्यासाठी लातूर जिल्हा प्रशासनाने ‘मिशन साद’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

ग्रामीण भागातील पालकांना आपल्या बालकांमधील श्रवणदोषासारखे आजार, दिव्यांगत्व लवकर लक्षात येत नाही. किंवा त्यावर काय उपचार केले जातात, याची माहिती त्यांना नसते. त्यामुळे श्रवणदोषाचे निदान आणि उपचारासही विलंब होवून बालकांमध्ये दिव्यांगत्व निर्माण होण्याची होते. हे टाळण्यासाठी ‘मिशन साद’ अंतर्गत उमंग आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमचे चमू प्रत्येक अंगणवाडीमध्ये जावून शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करणार आहे.

या आरोग्य तपासणीमध्ये श्रवणदोष आढळणाऱ्या बालकांवर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता असल्यास कॉक्लिअर इम्प्लांट सारख्या शस्त्रक्रिया करून बालकांमधील श्रवणदोष दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमासाठी कोणताही स्वतंत्र निधी उपलब्ध नसल्याने कॉक्लिअर इम्प्लांट सारख्या खर्चिक शस्त्रक्रियेसाठी सीएसआर निधीतून सहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ. उटगे यावेळी म्हणाले.

श्रवणदोष असलेल्या बालकांवर शून्य ते सहा वर्षे या वयातच आवश्यक उपचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक गावात आणि प्रत्येक अंगणवाडीमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. बालकांमधील श्रवणदोष दूर करून भविष्यात लातूर जिल्हा ‘श्रवणदोष मुक्त’ केला जाणार आहे. त्यामुळे शेकडो मुलांमधील श्रवणाचे आणि बोलण्याबाबतचे दिव्यांगत्व दूर होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला.

 ‘मिशन साद’साठी सीएसआर अंतर्गत निधी देण्यासाठी प्रयत्न करणार : मंत्री श्री. बनसोडे

जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला ‘मिशन साद’ हा उपक्रम लातूर जिल्ह्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्यासाठी सुरु करण्यात आलेला हा उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या उपक्रमातून जास्तीत जास्त बालकांचा श्रवणदोष दूर होण्यासाठी, त्यांना चांगले उपचार मिळण्यासाठी या उपक्रमाला सीएसआर निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी सांगितले. श्रवणदोष दूर करण्यासाठी यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या, तसेच उपचार सुरु असलेल्या बालकांना यावेळी मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते औषधीचे वितरण करण्यात आले.

प्रारंभी बालकांच्या तपासणीसाठी तयार करण्यात आलेल्या फिरत्या तपासणी आणि उपचार केंद्राला मंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी त्यांनी फिरत्या तपासणी आणि उपचार केंद्रातील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.

०००

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी विविध पुरस्कारांचे वितरण

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी विविध पुरस्कारांचे वितरण

लातूर, दि. १६ :  भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या अनुषंगाने द्वितीय अपील प्राधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. निलंगाचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव, जळकोटचे गट विकास अधिकारी एन. एस. मेडेवार, लातूरचे नायब तहसीलदार गणेश सरोदे, रेणापूरचे नायब तहसीलदार श्रावण उगिले, निलंगा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांचा यामध्ये समावेश आहे.

सर्वाधिक वृक्ष लागवड करणाऱ्या उदगीर तालुक्यातील बामणी, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील गणेशवाडी आणि निलंगा तालुक्यातील सरवडी या तीन ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक यांना यावेळी प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कृषि विभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपविभागीय कृषि अधिकारी डी. पी. जाधव आणि सहायक प्रशासकीय अधिकारी अशोक श्रीधर जालन यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीमध्ये आठवा क्रमांक मिळविल्याबद्दल कारसा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी श्रेया दत्तात्रय बेद्रे, इयत्ता पाचवीमध्ये सीबीएससी/आयसीएसईमध्ये आठवा क्रमांक मिळविलेली अहमदपूर किलबिल इंटरनॅशनल स्कूलची उन्नती मारोती जाधव, इयत्ता आठवीमध्ये आठवा क्रमांक मिळविलेली लातूर येथील केशवराज माध्यमिक विद्यालयाची वृष्टी मनोज श्रीमंगले, इयत्ता आठवीतील संस्कार रमेश राऊतराव, इयत्ता आठवी सीबीएससी/आयसीएसईमध्ये पाचवा क्रमांक मिळविलेला लातूर येथील पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा आकाश बळीराम नागरगोजे, आणि १३ वा क्रमांक मिळविलेला सोहम बालाजी दंडनायक यांचाही यावेळी प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

०००

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पोलीस दलातील उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

लातूर, दि. १६ :  भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. खडतर सेवा पूर्ण केल्याने विशेष सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यावेळी उपस्थित होते.

विशेष सेवा पदक जाहीर झालेले पोलीस उपनिरीक्षक गजानन व्यंकटराव तोटेवाड, पोलीस उपनिरीक्षक अक्षय माधवराव पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता हवाप्पा मडोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू अशोक गाडवे, विशेष दल सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक सुरेश काशीराम पोगुलवार, पोलीस प्रशिक्षण उत्कृष्टता गृहमंत्री पदक जाहीर झालेले कनिष्ठ श्रेणी लिपिक युवराज अशोक गायकवाड, पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेले पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक माधव दत्तात्रय केंद्रे, सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी रामचंद्र जाधव, सहायक पोलीस उपनरीक्षक अरुण रुक्माजी डोंगरे, हेड कॉन्स्टेबल परमेश्वर बाबुराव अभंगे, हेड कॉन्स्टेबल शिवाजी निवृत्ती गुरव, बाळासाहेब मस्के यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

०००

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते खेळाडू, मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण

लातूर, दि. १६ :  भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना सन २०१९-२० ते २०२२-२३ या काळातील जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यावेळी उपस्थित होते.

सन २०१९-२० चा जिल्हा क्रीडा पुरस्कार ज्योती व्यंकट पवार (बेसबॉल) आणि महेफुजखान हाफिजउल्लाखान पठाण (तलवारबाजी) या खेळाडूंना आणि गुणवंत मार्गदर्शक महेश प्रकाश झुंजे-पाटील (मलखांब) यांना देण्यात आला. सन २०२०-२१ मधील पुरस्कार सोनाली लघु गायकवाड (तलवारबाजी), स्वप्नील शिवाजी मुळे (मल्लखांब) आणि गुणवंत मार्गदर्शक संतोष श्रीकृष्ण कदम (तलवारबाजी) यांना वितरित करण्यात आला.

सन २०२१-२२ मधील जिल्हा क्रीडा पुरस्काराने माही किशोर आरदवाड (तलवारबाजी) आणि भाऊराव बाबुराव कदम (तलवारबाजी) या दोन खेळाडूंना गौरविण्यात आले. तसेच सन २०२२-२३ मध्ये सुरज कालिदास कदम (तलावरबाजी), दिव्यांका संतोष कदम (तलवारबाजी) आणि गुणवंत मार्गदर्शक प्रशांत शिवराज माने (तलवारबाजी) यांना गौरविण्यात आले.

सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक यांचे मंत्री श्री. बनसोडे यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

०००

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी साधला बहीणींशी संवाद  

ठाणे,दि.15(जिमाका) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बहीणींशी संवाद साधला. यावेळी  जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उपायुक्त मनोज रानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

यावेळी ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथील सुनिताताई गाडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देवून त्यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासनाने यासाठी मदत केली असेही त्यावेळी म्हणाल्या.

000

नाशिकला एज्युकेशन हब बनविण्यासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री दादाजी भुसे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन संपन्न

नाशिक, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सेवा- सुविधा मिळतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात नाशिकला एज्युकेशन हब बनविण्याच्या दृष्टीने सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज केले. दिंडोरी तालुक्यातील मौजे शिवनई येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र परिसर संरक्षक भिंतीचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, हेमलता बीडकर, अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. संपत काळे, बाकेराव बस्ते, राजेंद्र भांबर, प्रशांत सूर्यवंशी, प्रा. चिंतामणी निगळे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, विद्यापीठाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून बहुप्रतिक्षेत असणारे नाशिक उपकेंद्र हे पूर्णत्वास जात आहे ही आनंदाची बाब आहे. 31 हजार स्क्वेअर फुटाचे 3 मजली भव्य मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मागील 2 वर्षातील काळात उभे राहिले आहे. या ठिकाणी आज 63 एकर जागेला संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले आहे. या वर्षात येथे एमबीए व बीबीए रिसर्च सेंटर सह टेंपल मॅनेजमेंट हे कोर्स सुरू होणार असून उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात ही मोठी भर पडणार आहे. सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, संस्था प्राध्यापकांची कामे या ठिकाणी झाल्यास हे केंद्र जिल्ह्यातील 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सोयीचे होईल. तसेच या कामी पुणे येथे जाण्याचे श्रम वाचून नाशिककरांच्या वेळ व पैशाची बचत होईल व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचाही ताण कमी होईल, असे मत पालकमंत्री दादाजी भुसे यांनी याप्रसंगी मांडले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्पसला नाशिक शहराशी अधिकाधिक जोडण्याच्या दृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून येणारा रस्ता तसेच आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच आमदार, खासदार निधीसह जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी निर्णय घेवून यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शैक्षणिक विभागाच्या इमारती, रस्ते व मुलभूत विकासाच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. तसेच येत्या महिनाभरात या उपकेंद्राचे लोकार्पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
00000

मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा संवाद; लातूर जिल्ह्यातील महिलांचीही कार्यक्रमाला उपस्थिती

लातूर, दि. १५ : कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची तीन हजार रुपये इतकी एकत्रित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत राज्यातील सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे…अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथूनही काही लाभार्थी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. यापैकी काही महिला आज जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जावेद शेख, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना चिंचोली राववाडी येथील शेतमजुरी करणाऱ्या उषा सगर म्हणाल्या की, आमच्या सारख्या शेतमजुरी करणाऱ्या महिलांना अनेकदा इतरांकडे पैशासाठी हात पसरावा लागत होता. मात्र, आता प्रत्येक महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दीड हजार मिळणार असल्याने फार मोठी मदत होणार आहे. ही योजना सुरु केल्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत. याच गावातील शेतमजुरी करणाऱ्या हलीमा अजीज सय्यद यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार बँक खात्यात जमा झाल्याबद्दल शासनाचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या पैशामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या खर्चासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उदगीर तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी आणि सध्या लातूर येथे राहत असलेल्या स्वाती सुडे यांनी सांगितले की, शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी मी शिवण क्लास पूर्ण केला आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून मी नवीन शिलाई मशीन घेणार आहे. यातून स्वतःचा शिलाईचा व्यवसाय सुरु करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

लातूर येथील अश्विनी खंदाडे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा झाल्याचे सांगून आनंद व्यक्त केला. तसेच या पैशामुळे घर खर्चासाठी फार मोठी मदत होणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आणि शासनाचे आभार मानून पाखर सांगवी येथील सीमा नंदगवळी यांनी या योजनेतून दरमहा जमा होणाऱ्या रक्कमेतून नवीन शिलाई मशीन घेणार असल्याचे सांगितले.

लातूर येथील अनिता बेंबडे, सरोजनी देशपांडे यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अतिशय चांगली असून ही योजना सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जिल्ह्यातील अनेक बहिणीच्या खात्यात जमा, बहिणींनीकडून आनंद व्यक्त

जळगाव दि. 15 ( जिमाका ) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे 3 हजार रुपये जळगाव जिल्ह्यातील बहिणीच्या खात्यावर यायला सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी सागर पार्कवर झालेल्या महिलांच्या मेळाव्यात राखी पौर्णिमेची ओवाळणी लवकरच मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तारखेच्या दोन दिवस आधीच पैसे आल्यामुळे बहिणी आनंद व्यक्त करत आहेत.
जळगाव मधील ज्या महिलांना 3 हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला, काही बहिणींना प्रतिनिधीक विचारले असता, सौ सुनिता दिलीप चांदेलकर म्हणाल्या,’मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला, आमच्या मुलाच्या शिक्षणा करता तुम्ही 3000/-रुपये दिल्या बदल मी तुमची आभारी आहे’ तर सौ. वंदना विनोद आवारे म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मला मिळाला. रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्ही ओवाळणी म्हणून ३०००/- रुपये बहिणीला दिले, खुप आनंद वाटला.

श्रीमती मोनिका महाजन या आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाल्या, आम्हाला वाटले नव्हते एवढ्या लवकर पैसे मिळतील. पैसे आल्याचा मेसेज बघून आनंद वाटला. सुनिता धनगर या अंगणवाडी मदतनीस आहेत, त्या म्हणाल्या, मला तर खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाच, पण आम्ही ज्या महिलांचे फॉर्म भरून घेतले त्यांचे पैसे जमा झाल्याचे फोन करून आनंद व्यक्त करत आहेत.
जळगाव जिल्ह्यात या योजनेसाठी 5 लाख 33 हजार 791 एवढे अर्ज आले आहेत. तालुकानिहाय अर्ज पुढील प्रमाणे आणि कंसात पात्र झालेल्या लाभार्थी बहिणींची टक्केवारी आहे.

जळगाव -79,350 ( 97.11 ) , जामनेर 52,071 ( 98.72 ), चाळीसगाव -51,308 ( 98.41 ) , रावेर -46,386 ( 98.57 ), पाचोरा -40,165 ( 97.23 ), चोपडा – 38,244 ( 97.21) , भुसावळ -36,350 ( 98.01 ), अमळनेर -33,921 ( 99.29 ) , यावल – 33,482 ( 98.02 ) , पारोळा – 24,927 ( 97.59 ), मुक्ताईनगर – 23,237 ( 98.4 ) , भडगाव- 20,681 (96.71 ), एरंडोल – 20,148 ( 96.19 ), धरणगाव – 19,853 ( 99.14 ), बोधवड – 13,668 ( 98.71 ) आधार सिडींग जोडणीचे काम सुरु आहे. हा लाभार्थी बहिणींचा आकडा अजून वाढू शकतो अशी माहिती महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाने दिली.

भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

भंडारा दिनांक 15 : राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या संदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधला.

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन बैठकीद्वारे हा संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजक,र मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, भंडारा नगरपरिषदचे मुख्याधिकारी करण चव्हाण, व अन्य अधिकारी उपस्थित होते.

सौ. समिता भंडारी, सौ. प्रियंका नागपुरे, सौ. रंजना साखरकर, सौ. गीता धकाते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी संवाद साधला. या योजनेच्या अंमलबजावणीवर समाधान व्यक्त करत यामुळे आर्थिक रित्या आत्मनिर्भर झाल्याची भावना या माता भगिनींनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे, दि. 9 : ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-3 या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद...

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये उद्या भाषण

0
मुंबई, दि. 9 : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सध्या स्वीडनमध्ये इंटरनॅशनल आयडिया स्टॉकहोम निवडणूक प्रामाणिकता परिषद (International IDEA Stockholm Conference on Electoral...

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

0
मुंबई, दि. 9 : दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण आठ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील...

दिवा-मुंब्रा रेल्वे अपघातातील जखमींना मंत्र्यांची भेट, तातडीच्या उपचाराचे निर्देश; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांना श्रद्धांजली

0
ठाणे,दि.09(जिमाका):- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश...