रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 460

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 21:- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉ. किसन महाराज साखरे यांनी संत साहित्याचा गाढा अभ्यास करून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे आध्यात्मिक प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत यांसारख्या ग्रंथांवर भाष्य करत संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

ज्ञानेश्वरीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संत विचारांची प्रभावी मांडणी केली. श्रीमद्भगवद्गीता व संत साहित्य प्रचारासाठी देशभरात त्यांनी ज्ञानयज्ञाचे आयोजन केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे महाराष्ट्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले आहे. साखरे महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्म, शिक्षण आणि संत साहित्य क्षेत्राची अपरिमित अशी हानी झाली आहे. साखरे महाराजांच्या स्मृती आणि विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.20 (जिमाका): दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. झालेल्या कार्यवाहीबाबत पुढील महिन्यात आढावा बैठक घेण्यात येईल, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल -राधानगरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, तहसीलदार अमरदीप वाकडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दूधगंगा प्रकल्पातील सर्व धरणग्रस्तांच्या जमिनींची स्वामित्व योजनेअंतर्गत प्राधान्याने मोजणी करुन घेवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्या. जमिनीची मागणी व भूखंड वाटपाच्या अनुषंगाने जमिनीची मागणी असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी अर्ज सादर करावा. पात्रता तपासून याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. संकलन रजिस्टर मध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांना सुनावणीची संधी देऊन संकलन रजिस्टर अद्ययावत करा. प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या जमिनीबाबत निर्णय घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच अतिरिक्त वाटप झालेल्या जमिनी सरकारजमा करण्याबाबतचा निर्णय घ्या. तसेच दूधगंगा प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना देवून पाण्याच्या पातळीच्या बाहेर राहिलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याबाबत वनविभागासोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच मौजे मुडशिंगी पैकी न्यू वाडदे येथील डावा कालव्याची पाहणी करुन सुरक्षा भिंतीबाबत योग्य ती कार्यवाही करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी संबंधित भूमी अभिलेख विभागाकडून करवून घेवून या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत कार्यवाही केली जाईल. आतापर्यंत वाटप झालेल्या जमिनींचा सातबारा देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन घेतली जाईल, असे सांगून पुनर्वसनाच्या अनुषंगाने तक्रार असल्यास याबाबत अर्ज सादर करा. यावर चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण यांनी आतापर्यंत केलेल्या व सध्या करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत माहिती दिली.

0000

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावी चा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव याने आज “डे विथ कलेक्टर” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले…. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकांमध्ये प्रसादने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतल्याचे पाहून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे कौतुक केले.

वयाच्या मानाने प्रसादची उंची सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. याचा उपचार भारतामध्ये होत नसून परदेशात होत असल्याची माहिती त्याच्या शिक्षिका स्वाती कोकीतकर यांनी दिली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसादच्या उंची वरील उपचारासाठी त्याला परदेशात पाठविण्याबाबत सहकार्य करण्यात येईल,असे सांगितले.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी. तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि ‘जिल्हाधिकारी’ यांच्या करिअर व कार्याची माहिती घेवून यातून त्यांना प्रेरणा मिळावी. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  “डे विथ कलेक्टर” हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. उत्सुक, प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे.

या उपक्रमाची पहिली संधी मिळालेला प्रसाद जाधव हा दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो. प्रसादने मागील 3 वर्षामध्ये भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच त्याने वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रसादला भावी जीवनात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. आजच्या “डे विथ कलेक्टर” उपक्रमात त्याने आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार यादव, पर्यवेक्षिका सुरेखा रोकडे, आई-नम्रता व वडील संजय जाधव यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले आहे. तसेच विज्ञान शिक्षिका स्वाती विनायक कोकीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तिन्ही वर्षी विज्ञान उपकरणे तयार करुन ती प्रदर्शनात सादर केली होती.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  “डे विथ कलेक्टर” या उपक्रमाबरोबरच जिल्ह्यातील शालेय स्तरावरील शिक्षकांसाठी “कॉफी विथ कलेक्टर” हा अभिनव उपक्रमही राबविण्यात येणार आहे.  दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात निवड केलेल्या शाळेतील शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी श्री. येडगे संवाद साधणार आहेत.

*****

आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर; पाच महिन्यांत दुप्पट वाढ

मुंबई, दि.२० : ‘आधार’द्वारे सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार संवाद या कार्यक्रमाला BFSI, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील ५०० हितधारक उपस्थित होते. या कार्यक्रमात आधारच्या विविध उपयोजनांवर चर्चा करण्यात आली.

फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांचा ऐतिहासिक उच्चांक

आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला, केवळ पाच महिन्यांत ५० कोटींवरून दुप्पट वाढ झाली. २०२१ मध्ये सुरू झालेली ही AI/ML आधारित प्रणाली विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षित आणि सुलभ ओळख पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे.

हितधारकांचा सहभाग : बँकिंग, एनबीएफसी, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रांतील तज्ज्ञांनी आधारच्या वापरासाठी चार पॅनल चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. या सत्रांमध्ये आधारच्या माध्यमातून सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना व धोरणांवर विचारमंथन करण्यात आले.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील आधारची भूमिका : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी आधारच्या लोकसंख्याशास्त्रीय वापराबद्दल सांगताना ‘आधार’ने डिजिटल व्यवहारांवरील विश्वास वाढविण्यासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले.

फेस ऑथेंटिकेशनचा वापर: आधार फेस ऑथेंटिकेशन प्रणालीला सध्या ९२ सरकारी आणि खासगी संस्था वापरत आहेत. ही प्रणाली सुरक्षित, संपर्कविहीन आणि कुठेही, कधीही वापरण्यास सोयीस्कर आहे. 

भविष्यातील उद्दिष्टे

UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी आधारद्वारे सेवा वितरण अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने UIDAI च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या कार्यक्रमाने वित्त, दूरसंचार, फिनटेक आणि सार्वजनिक सेवांमध्ये आधारच्या वापराचा विस्तार करण्याचा उद्देश ठेवला आहे.

आधार संवाद कार्यक्रमाचा दुसरा टप्पा मुंबईत यशस्वीरित्या पार पडला. पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला होता.

ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

पुणे,दि.२० : राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी करण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या १०० दिवसांचा विशेष कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या ग्राम विकास विभागाच्या योजनांची आणि कृती कार्यक्रमाची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुकर करावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

विधान भवन सभागृहात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, अपर आयुक्त कविता द्विवेदी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प डॉ. राजाराम दिघे,महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान संचालक सुभाष इंगळे, पेसा योजना राज्याचे संचालक शेखर सावंत, सचिव श्री.कवठेकर, ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे,  उपायुक्त (विकास) विजय मुळीक यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.गोरे म्हणाले, ग्रामविकास विभाग राज्य शासनाची ग्रामीण विकासाची महत्वाची यंत्रणा आहे. ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.  महा आवास योजनेद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुले देण्यात येतात व भूमिहिन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जमीन उपलब्ध करुन देण्यात येते. विशेष मोहिम पध्दतीने या योजनेतील उद्दीष्टांची पूर्तता करुन जनतेला घरकुले उपलब्ध करुन द्यावी. राष्रीगरय ग्राम स्वराज्य योजना, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमासोबत पर्यटन विकास, आपले सरकार सेवा केंद्र योजनेसह विविध योजनांच्या उद्दीष्टपूतीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

लोक प्रतिनिधींनी सूचविलेली कामे या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी  विमानतळ परिसरात विक्रीसाठी केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, लखपती दिदी योजनेद्वारे महिलांना सक्षम करणे व त्यांचा आर्थिक विकास साधणे, महिलांना व्यक्तिगत व्यवसायासाठी कर्ज पुरवठा या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि दिलेले उद्दीष्ट पूर्णपणे साध्य करावे अशी सूचना मंत्री श्री.गोरे यांनी केली.

‘महाआवास योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना होण्यासाठी तसेच योजनेचा लाभ मिळावा यासाठी कुठल्याही कामासाठी अतिरिक्त शुल्क देण्यात येऊ नये’, अशा आशयाचा फलक पंचायत समिती, ग्राम पंचायत परिसरात ऊभारण्याची तसेच तक्रारीसाठी त्यावर संबधित अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक ठळकपणे दर्शवावा अशी सूचना मंत्री श्री.गोरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तसेच आस्थापनाविषयक कामकाजाचा, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ आणि प्रलंबित चौकशी प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कर्मचाऱ्यांची सेवाविषयक प्रकरणे अडवून ठेवण्याच्या कार्यपध्दतीची मंत्री श्री.गोरे यांनी गंभीर दखल घेतली आणि तातडीने प्रलंबित प्रकरणांवर संबधित अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा आणि प्रकरणे निर्गत करावी असे निर्देश यावेळी दिले.

१०० दिवस कृती कार्यक्रमातील योजनांची अंमलबजावणी आणि अन्य विविध योजनांची अंमलबजावणी आणि जिल्हा परिषदनिहाय उद्दिष्ट पूर्तीचा आढावा आगामी काळात घेण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मंत्री श्री.गोरे यांनी दिली.

प्रधान सचिव श्री.डवले यांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद योजनांच्या उद्दिष्टांचा आढावा घेऊन त्याची काटेकोरपणे आणि सकारात्मक पध्दतीने अंमलबजावणी करावे असे सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत इमारतीमधे नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छता गृहे सुस्थितीत ठेवणे याला प्राधान्य देण्याची सूचना केली. योजनांचे उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे त्यांनी सूचित केले.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी सर्व अधिकाऱ्यांनी महाआवास योजनेतील विविध घरकुल योजनांच्या उदिृष्ट पूर्तीसाठी विशेष भर देऊन सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेवून मोहिम स्वरुपात ते पूर्ण करावे अशी सूचना केली. विभागातील योजनांच्या पूर्ततेचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी महा आवास योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना, ग्रामविकास-बांधकाम विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान, कृषि विभाग, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणारी अभियाने, प्रशासकीय व आस्थापनाविषयक बाबी, प्रलंबित अपिले यासह १०० दिवसाचा विशेष कृती कार्यक्रमांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विविध योजनांचे कार्यान्वयन अधिकारी उपस्थित होते.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट

दावोस, दि. 20 – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन दरवर्षी ज्यांच्या पुढाकारातून केले जाते, त्या क्लॉस श्वाब यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. हरित ऊर्जा, ईलेक्ट्रीक व्हेईकल, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासभरारीला त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.

यंदाच्या गणेशोत्सवात क्लॉस श्वाब हे एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी 12 सप्टेंबर रोजी सपत्नीक त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी येऊन श्रीगणेशाची आरती केली होती. या भेटीत त्यालाही उजाळा देण्यात आला. या बैठकीने आज देवेंद्र फडणवीस यांच्या दावोसमधील भेटी, बैठकांचा श्रीगणेशा झाला.

दावोस येथे साकारलेल्या इंडियन पॅव्हेलियनच्या उद्घाटन समारंभाला सुद्धा अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या स्वागत समारंभालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम मध्यरात्रीनंतर होईल.

होरॅसिसच्या अध्यक्षांसोबत बैठक

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालकसुद्धा आहेत. येणार्‍या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी त्यांनी यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबतसुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी आखलाय १०० दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखडा; प्रशासनाला मिळतोय शिस्तीचा धडा…!

“क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. 07 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना दृक परिषदेद्वारे (Video Conferencing), उपमुख्यमंत्री (नगर विकास, गृहनिर्माण) एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार व मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत संबोधित केले.

राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी 100 दिवसांमध्ये 1) संकेतस्थळ (Website), 2) सुकर जीवनमान (Ease of Living), 3) स्वच्छता (Cleanliness), 4) जनतेच्या तक्रारींचे निवारण (Grievance Redressal), 5) कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place), 6) गुंतवणूक प्रसार (Investment promotion), 7) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field visits) या मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी आगामी 100 दिवसांमध्ये कृती आराखड्यानुसार कार्यवाही करावी, असे शासन निर्णयाद्वारे कळविण्यात आले आहे.

सात कलमी कृती आराखड्याविषयी विस्तृत माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवू या..

  1. संकेतस्थळ (Website):-

सर्व कार्यालयांनी आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी. कार्यालयाचे संकेतस्थळ हाताळण्यास सुलभ (Easy-to-navigate) असावे. संकेतस्थळावर माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील तरतुदींनुसार “Proactive Disclosures” या शीर्षकाखाली जास्तीत जास्त माहितीचे स्वयंप्रकटीकरण करण्यात यावे. वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना सेवा उपलब्ध होईल यादृष्टीने वेबसाईट “Interactive” राहील, हे पहावे. “Data Security” बाबत आवश्यक दक्षता घेण्यात यावी. संकेतस्थळ अद्ययावत ठेवतानाच संकेतस्थळाच्या सुरक्षेबाबत (Cyber Security) आवश्यक दक्षता घ्यावी. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने (NIC), GIGW च्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे सर्व माहिती अद्ययावत करावी, तसेच विभागांची लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 मधील तरतूदींनुसार सर्व विभागाच्या सेवांबाबतची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी विभागांना सहकार्य करावे.

  1. सुकर जीवनमान (Ease of Living):-

नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रचलित कामकाजाच्या पद्धतींचे पुनर्विलोकन करुन प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये किमान दोन सेवा अतिशय सुलभ पध्दतीने द्याव्यात. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे याकरीता सातत्याने प्रयत्न करावेत.

  1. स्वच्छता (Cleanliness):-

प्रचलित नियम, कार्यपद्धतीप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये निंदणीकरण, नष्टीकरण व निर्लेखनाची प्रक्रिया प्राधान्याने व निरंतरपणे राबविण्यात यावी. याअंतर्गत कार्यालयांमधील अभिलेख निंदणीकरण करुन तपासाअंती आवश्यक नसल्यास नष्ट करण्यात यावेत. तसेच, सर्व अभिलेखांचे शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-2018/प्र.क्र.9/18(र.-व-का.), दिनांक 15.02.2018 अनुसार वर्गीकरण करण्यात यावे. कार्यालयांमधील जुन्या व निरुपयोगी जडवस्तूंची (उदा. संगणक, टेबल, खुर्च्या, कपाटे, इत्यादी) विहित कार्यपद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी. त्याचप्रमाणे कार्यालयांच्या आवारात असणारी (विशेषतः पोलीस विभागाकडील) जुनी व वापरात नसलेली वाहने यांचे विहित पद्धतीने निर्लेखन करण्यात यावे.

  1. जनतेच्या तक्रारींचे निवारण (Grievance Redressal):-

नागरिकांकडून कार्यालयास प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे (“आपले सरकार”, “P.G. Portal”, यांसह) त्वरेने निराकरण करण्यात यावे व दि.1 जानेवारी 2025 पूर्वीची प्रलंबितता शून्य करावी. सर्व अधिकाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या भेटीसाठी आठवड्यातील दैनंदिन वेळ राखून ठेवावी व तसे फलक कार्यालयामध्ये दर्शनी भागात लावण्यात यावेत. दौऱ्यावर असल्यास अभ्यागतांना भेट देण्यासाठी अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर “लोकशाही दिनाची” अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात यावी. तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर निवारण करता येतील असे प्रश्न/समस्या तत्परतेने सोडविले गेल्यास नागरिकांना शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार नाही.

  1. कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place):-

कार्यालयांमधील कर्मचारी वर्ग तसेच येणारे अभ्यागत यांच्याकरिता पिण्याच्या पाण्याची योग्य व कायमस्वरुपी व्यवस्था असावी. कर्मचारी आणि अभ्यागत यांच्यासाठी कार्यालय व कार्यालयाच्या आवारातील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यात यावीत. तसेच प्रसाधनगृह नादुरूस्त असल्यास आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करावी. कार्यालयांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी सुसज्ज प्रतिक्षालय असावे. कार्यालयांमध्ये सुव्यवस्थित नामफलक व दिशादर्शक फलक असावेत. कार्यालयांमधील वातावरण प्रसन्न व आल्हाददायक राहील याकरिता विशेष प्रयत्न करून कार्यालयाचे व परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. याकरिता आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजन समितीकडील निधीमधून खर्च करण्यात यावा.

  1. गुंतवणुकीस प्रोत्साहन (Investment promotion):-

राज्यामध्ये औद्योगिक धोरण राबविताना विविध ठिकाणांवरुन येणाऱ्या गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे व पोषक वातावरण निर्माण व्हावे आणि गुंतवणूक वाढावी याकरिता सामूहिक प्रयत्न करण्यात यावेत. व्यापारी वर्गाच्या संघटनांशी चर्चा करुन त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. गुंतवणूकदार उद्योजकांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबींची प्रभावीपणे हाताळणी करण्यात यावी.

  1. क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field visits):-

आठवड्यातून किमान दोन दिवस अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देवून पाहणी करावी. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रम / प्रकल्पांना (Flagship Programme/Projects) प्रत्यक्ष भेटी देवून त्यांच्या अंमलबजावणी व प्रगतीची पाहणी करुन त्याचे पर्यवेक्षण करावे. क्षेत्रीय भेटीदरम्यान महत्त्वाचे घटक असणाऱ्या ग्राम पंचायत, शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेटी देवून त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवावी. ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्यांचे अनुभव, त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांनी मांडलेल्या सूचना गांभीर्याने घेवून त्यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

हा 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा दि.15 एप्रिल 2025 पर्यंत यशस्वीपणे राबवून त्याचा अहवाल आपल्या वरिष्ठांना दि.20 एप्रिल 2025 पर्यंत सादर करावा, असे शासनाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दि.13 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र.क्र.7/र.व.का.-1 द्वारे कळविले आहे.

ठाणे जिल्ह्यातील प्रशासनही जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सर्व महानगरपालिका आयुक्त, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह सर्व शासकीय-निमशासकीय विभागांचे विभाग/कार्यालयप्रमुख, कर्मचारी यांनीदेखील या सप्तसूत्रीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या या कृतीशील प्रयत्नांचे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

00000

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी   

ठाणे

 

 

जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत – वनमंत्री गणेश नाईक

ठाणे,दि.20(जिमाका):- जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत. यामध्ये रायवली आंबा, बोर, जांभूळ या रोपांची लागवड करावी, बहाडोली जांभूळ (पालघर) तसेच आंबा कलम करून त्यांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करावीत. ही रोपे जंगलाच्या मध्यवर्ती भागात लावल्यामुळे जंगलातील मांसभक्षी प्राण्यांच्या भक्ष्यांची संख्या या भागात वाढून मनुष्य-वन्यजीव संघर्ष कमी होईल, अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक वनाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या.

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या विविध विषयांवर आढावा घेण्याकरिता शुक्रवार, दि.17 जानेवारी 2025 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर (भा.प्र.से.), प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख शोमिता बिश्वास (भा.व.से.), प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक संजीव गौर तसेच भारतीय वनसेवेतील इतर वरिष्ठ वनाधिकारी, क्षेत्रीय वनकर्मचारी वनविभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत सर्व विभाग प्रमुखांनी वनमंत्री गणेश नाईक यांना प्रत्येक विभागाचा आढावा दिला. यामध्ये कॅम्पा, वन्यजीव, अर्थसंकल्प तरतूदी FCA, संरक्षण, कांदळवन कक्ष, सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ इत्यादी विभागांचा समावेश होता.

वनमंत्री गणेश नाईक हे 1995 ला वन विभागाचे मंत्री असताना त्यांनी जपान येथील सुमीटोमो कॉर्पोरेशन सोबत महाराष्ट्र वन विभागाचे महामंडळ म्हणजेच फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये करार करून वृक्ष लागवड करण्याची योजना व सुमीटोमो कॉर्पोरेशन मार्फत निधीबाबत करार केला होता. याच धर्तीवर आता जगातील इतर देशातील कॉर्पोरेशन सारख्या इतर यंत्रणासोबत संपर्क साधून वनविभागाकरिता नाविन्यपूर्ण प्रस्ताव तयार करून निधी उपलब्ध करण्याकरिता वन अधिकारी यांचे शिष्टमंडळ तयार करण्याच्या सूचना श्री.नाईक यांनी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना दिल्या.

वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ परदेशात अभ्यास दौऱ्यासाठी पाठविणार असून वनामधील कोर भागामध्ये स्थानिक फळझाडे लावण्याबाबत सूचना दिल्या. यामध्ये रायवली आंबा, बोर, जांभूळ या रोपांची लागवड करा, बहाडोली जांभूळ (पालघर) तसेच आंबा कलम करून त्यांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करावीत. ही रोपे जंगलातील मध्यवर्ती भागात लावल्यामुळे त्या भागात मांसभक्षी प्राण्यांच्या भक्ष्यांची संख्या वाढून मनुष्य वन्यजीव संघर्ष कमी होईल.

वनमंत्री महोदयांनी पुढील काळामध्ये प्रत्येक आठवड्याला एका जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे स्पष्ट केले. या दौऱ्यांची सुरुवात कोकणातून करणार असून समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनाची परिस्थिती पाहण्याकरिता जहाजाने समुद्री प्रवास करण्याकरिता नियोजनाबाबत सूचना दिल्या.

वनमंत्री महोदयांनी अटल सेतू ब्रिज वरून कांदळवनाची पाहणी केली असून तेथील खाडीलगतच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवनाचे रोपवन घेण्याकरिता स्थळ पाहणी करण्याच्या सूचना केल्या. क्षेत्रीय वन अधिकारी-कर्मचारी यांच्यासोबतच्या चर्चासत्रामध्ये वनमंत्री श्री.नाईक यांनी प्रत्येक संवर्गामधील वन कर्मचारी यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्याबाबत शासनस्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आश्वसन दिले.

शेवटी पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, वन्यजीव यांचे 2025 वर्षासाठीच्या दिनदर्शिकेचे तसेच भारतीय वन सेवेतील वन अधिकारी यांच्या सिव्हिल लिस्ट 2025 चे प्रकाशन वनमंत्री श्री.नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

00000

पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संशोधकांचे योगदान व नवतंत्रज्ञानाचा अधिक वापर महत्त्वाचा –  पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

नागपूर,दि. 20 :  ग्रामीण भागाला सावरणाऱ्या शेतीपूरक पशु-पक्षी पालन, मत्स्यव्यवसाय उद्योगाला भविष्यात जर अधिक शाश्वत करायचे असेल तर हवामान बदलाचा विचार करुन प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्याचे काटेकोर नियोजन करणे नितांत आवश्यक आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना अन्न सुरक्षिततेसह शेतीपुरक उद्योग व्यवसायातून चांगल्या उत्पन्नाची संसाधने अधिक भक्कम करण्यासाठी संशोधकांनी पुढे यावे असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री  पंकजा मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत आयोजित जागतिक पशु आहार शास्त्र परिषदेच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रजत जयंती सभागृहात आयोजित या समारंभास पशुसंवर्धन विभागाचे  सचिव डॉ. रामास्वामी एन., भारतीय कृषी अनुसंसाधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, पशुविज्ञान शाखेचे उपमहासंचालक डॉ. राघवेंद्र भट्ट, कुलगुरु डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे व ज्येष्ठ संशोधक उपस्थित होते.

पशुधन, वनसंवर्धन, पर्यावरण आणि शाश्वत जीवनशैलीबाबत भारतीय संस्कृतीने आपल्याला एक अमूल्य देणगी दिली आहे. आपल्या ईश्वरांनीही आपले वाहन पशुधनातून घेतले आहे. याच बरोबर पक्ष्यांनाही सन्मान दिला.  पुर्वापार चालत आलेल्या परंपरा व ज्ञानाच्या आधारावर शेतीला पशुधनाची जोड देत यातून अतिरिक्त उत्पादकता आपल्या पुर्वजांनी घेऊन दाखविली. या क्षेत्रातील संशोधकांनी कालपरत्वे दिलेल्या योगदानाच्या साहाय्याने प्रगतीचा एक मोठा पल्ला आपण गाठू शकलो. आजच्या घडीला दुधाच्या उत्पादनात आपण जगात प्रथम क्रमांकावर आहोत. अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. ग्रामीण भागाला विकासाची नवी दिशा देण्याचे सामर्थ्य पशुवैद्यकीय शास्त्रात असल्याचे त्यांनी सांगितले.

उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीत वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे दुध, मांस, अंडी उपलब्ध व्हावेत, यातील पोषण मुलद्रव्य वाढण्यासह पर्यावरणातील संतुलनही राखले जावे यादृष्टीने  आयोजित जागतिक पशु आहार शास्त्र परिषद महत्वाची आहे. या निमित्ताने आपण सर्व संशोधक एकत्र येऊन या क्षेत्राला नवी दिशा द्याल याची खात्री असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मत्स्योत्पादन क्षेत्रातही आज अनेक संशोधने झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्थापनापासून ते मत्स्य बीजोत्पादन, त्यांचे वजन, त्यांना अधिक पौष्टीक करणे यासह जलव्यवस्थापन असे अनेक क्षेत्र संशोधकांसाठी खुले आहेत. दुधाच्या गुणवत्तेपासून गरजेनुरुप उपलब्धतेपर्यंत अनेक क्षेत्रात संशोधक योगदान देत आहेत.  या क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासह चांगल्या बदलासाठी आपण सर्व सिध्द होऊ यात, असे त्या म्हणाल्या.

आजवरच्या प्रशासकीय सेवेतील हा माझा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. याच ज्ञानशाखेत माझे शिक्षण झाले असून इथे गुरुजनांच्या उपस्थितीत मला सहभागी होता आले, या शब्दात पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे  सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सर्व संशोधकांच्या योगदानातून एक उज्ज्वल मार्ग या परिषदेतून मिळेल, असे त्यांनी सांगितले. कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात या परिषदेचे महत्व विषद केले. पर्यावरणाच्या संतुलनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. भविष्यात असणारी मागणी लक्षात घेता या क्षेत्रात मोठी संधी आहे. विद्यापीठातील संशोधन ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यापीठ कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. या समारंभात ज्येष्ठ शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला.

०००००

महसूल विभागाने शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 20 :-  महसूल विभाग हा सामान्य माणसाच्या प्रत्येक कामाशी निगडीत विभाग आहे. महसूल विभागाची सर्वसमावेशक कामे, सुविधा, योजनांच्या परिणामकारक अंमलबजाणीमुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावली जाते. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात राबविण्यात येत असलेला शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलद गतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

महसूल विभाग अंतर्गत शंभर दिवसांत घेण्यात येत असलेले कार्यक्रम, योजनांचा आढावा महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी घेतला. मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव अजित देशमुख, धनंजय निकम, सत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, नागरिकांना महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा online देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा.  यामध्ये जमीन पोर्टल, महाखनिज पोर्टल, आपली चावडी, ई चावडी  यासारख्या प्रणालींचा वापर करावा.

महसूल विभागाचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती  करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात. नोंदणी व मुद्रांक विभागातील कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात. क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजना, उपक्रमांचा आढावा घ्यावा, अशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.

००००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....