शुक्रवार, जून 6, 2025
Home Blog Page 451

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर

मुंबई, दि. ४ :  महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठवा ते दहावा मजला या जागेत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्थलांतरित कार्यालयांचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय असलेल्या जागेवर भव्य मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असून लवकरच मराठी भाषा भवन चे भूमिपूजन होणार आहे. यासाठी या इमारतीमधील कार्यालयांचे मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या इमारतीत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे आदी उपस्थित होते.

या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले, शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी हिताचे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. ‘समग्र शिक्षा’ च्या माध्यमातून उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणावरही भर देण्यात येत आहे. जागतिक स्तरावर आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्याचाही आपला प्रयत्न आहे, याचाच एक भाग म्हणून पात्र आणि इच्छुक युवकांना जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्यात रोजगार मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा विभागामार्फत भाषा धोरण जाहीर झाले आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मराठी भाषा भवनचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. हे करीत असताना विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील कार्यालयात उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगून या कार्यालयांतून दर्जा उंचावणारे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्य प्रकल्प संचालक आर.विमला यांनी प्रास्ताविक करताना स्थलांतरित कार्यालयात आवश्यक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. या कार्यालयातून ‘समग्र शिक्षा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम अधिक जोमाने केले जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर, विभागीय शिक्षण उपसंचालक श्री. संगवे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांचे अभिनंदन करून स्थलांतरित कार्यालयासाठी मोठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा’ योजना लागू -कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. ४ : ऊसतोड कामगार व वाहतूकदार, मुकादम आदींसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा’ योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

मंत्री श्री. धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याअंतर्गत यासंदर्भातील योजना प्रस्तावित केली होती.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे कवच या निर्णयानुसार लागू करण्यात येत आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च ‘स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा’च्या भांडवलातून करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, मुकादम, कारखाना यांपैकी कुणावरही कसलाही आर्थिक भार राहणार नाही.

मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ व नियोजन विभागाच्या समन्वयातून या योजनेला मूर्त स्वरूप दिले असून, त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. ऊसतोड कामगारांना विम्याचे कवच असावे, हे दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न शासनाने पूर्ण केले आहे. याचा मनापासून आनंद वाटतो आहे, याबाबद्दल मी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे मनापासून आभार मानतो, असे उद्गार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले.

बीडसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील 10 लाख ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शेजारील राज्यात कमीत कमी 6 महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र अत्यंत मेहनत व जोखमीचे काम त्यांना करावे लागते. ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा शॉक, सर्पदंश, वाऱ्या-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना ऊसतोड कामगारांचे अनेकदा जीव जातात, अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात व त्यांच्या कुटुंबाचा आधार नाहीसा होतो. त्यामुळे या ऊसतोड कामगारांना, वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या पशूंना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी, व दुर्दैवाने मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा निरनिराळ्या तरतुदी असाव्यात असे श्री. मुंडे यांनी प्रस्तावित केले होते.

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित करून घेत श्री. मुंडे यांनी या महामंडळाला मूर्त स्वरूप दिले. महामंडळाचे कार्यकारी संचालक मंडळ तसेच लेखाशीर्ष निर्माण करून ऊसतोड कामगारांची प्रथमच ‘ऊसतोड कामगार’म्हणून नोंदणी केली. साखर कारखाना व त्याच्या समप्रमाणात निधी शासनाकडून अशी कायमस्वरूपी निधीची व्यवस्था केली.

 

याच महामंडळाच्या माध्यमातून राज्यात संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजना सुरू करून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे सुरू करून ऊसतोड कामगारांच्या हातात वडिलोपार्जित कोयता न देता पाटी-पुस्तक देऊन शिक्षणाचा मार्ग खुला केला आहे. त्यापाठोपाठ आता ऊसतोड कामगारांच्या विम्याचा प्रश्न मार्गी लागला असून विकासापासून वंचित वर्गाला खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू असल्याचेही कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी सांगितले.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

मंत्रिमंडळ निर्णय (भाग – २)

मंत्रिमंडळ निर्णय (भाग – २ एकूण निर्णय -१७)

 

पदुम विभाग

महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ

मच्छिमार बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र भू-जलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या महामंडळाचे मुख्यालय नागपूर येथे राहील. तसेच मत्स्य व्यवसाय मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली या महामंडळाचे कामकाज चालेल. मच्छिमारांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, मासे टिकवून राहण्यासाठी उपाय सूचविणे तसेच परंपरागत मच्छिमारांच्या हिताचे जतन करण्यासाठी हे महामंडळ काम करेल.

०००

मृद व जलसंधारण

आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार

कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी योजनेत बंदिस्त पाईपलाईन टाकण्याच्या कामास मंजूरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

वेळवट्टी योजनेत १३०.१० हेक्टर क्षेत्रात, तर गवसे योजनेत १३८.६३ हेक्टर आणि घाटकरवाडी योजनेत १७९.५९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. हा भाग अतिपावसाचा असून, डोंगर भागात छोटे कालवे दरवर्षी फुटतात किंवा गाळाने भरतात, म्हणून बंदिस्त पाईपलाईनचा निर्णय घेण्यात आला.

०००

ग्रामविकास विभाग

बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल

बंजारा, लमाण, लभाण तांड्यात ग्रामपंचात स्थापण्यासाठी लोकसंख्येची अट शिथील करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या ही लोकसंख्येची अट एक हजार इतकी असून, या निर्णयामुळे ही आता सातशे अशी होणार आहे. राज्यात २० ते २५ लाख बंजारा समाज ४ हजारांहून अधिक तांड्यात राहतात.

०००

वैद्यकीय शिक्षण विभाग

कागल येथील सांगावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात मौजे सांगाव येथे नवीन शासकीय होमिओपॅथी आणि रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्न ५० रुग्ण खाटांचे होमिओपॅथी रुग्णालय स्थापन करण्यात येईल. त्यासाठी ४ एकर सुयोग्य जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या महाविद्यालयासाठी २४८ कोटी ९० लाख रुपये इतक्या खर्चा मान्यता देण्यात आली.

०००

मत्स्य व्यवसाय विभाग

महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार

सागरी मच्छिमारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री या महामंडळाचे अध्यक्ष राहतील. यासाठी सहा पदांची निर्मिती करण्यात येईल. तसेच पन्नास कोटी रुपये एकवेळचे अनुदान म्हणून उपलब्ध करून देण्यात येईल.

०००

मृद व जलसंधारण विभाग

कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पडवे (डोंगरेवाडी) येथे साठवण तलावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या तलावासाठी येणाऱ्या 46 कोटी 76 लाख 61 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेमुळे 1005 सघमी पाणी साठा होऊन 85 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

०००

मृद व जलसंधारण विभाग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार;२ हजार ६०४ कोटी खर्चास मान्यता

राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या योजनेत यंत्र सामुग्री व इंधनासाठी प्रति घनमीटर जीएसटीशिवाय ३१ रुपये एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी ३५ रुपये ७५ पैसे घनमीटर प्रति एकर १५ हजार रुपये एवढे तसेच जास्तीत जास्त ३७ हजार पाचशे रुपये अनुदान अडीच एकर मर्यादेपर्यंत देण्यात येईल. या योजनेसाठी २ हजार ६०४ कोटी रुपयांस मान्यता देण्यात आली आहे.

०००

उद्योग विभाग

राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार; १ लाख ६० हजार कोटींची गुंतवणूक

राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यातून 1 लाख 60 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसाठी विशेष धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून याद्वारे डेटा सेंटर क्षेत्रामध्ये कार्यरत बहु-राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील प्रमुख कंपन्यां आकर्षित होणार आहेत. परिणामी सुमारे USD  20 अब्ज डॉलर्सच्या (रु. 1.60 लक्ष कोटी )  लक्षणीय गुंतवणूकीच्या माध्यमातून डेटा सेंटर क्षेत्रातील राज्याचे अव्वल स्थान अबाधित राहण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पांद्वारे प्रोत्साहन कालावधी संपल्यानंतर शासनास पुढील कालावधीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर व करेत्तर महसूलाद्वारे राज्याला कायमस्वरुपी महसूल मिळेल. हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क हा उदयोन्मुख प्रकल्प असल्यामुळे त्यासाठी एकूण प्रत्यक्षपणे अंदाजे 500 अतिकुशल तज्ञ व्यक्तिंना रोजगार उपलब्ध होणार असून, अप्रत्यक्षपणे अंदाजे 3000 व्यक्तिंना उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोजगार उपलब्ध होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या आगमनाने डेटा स्टेारेज व प्रोसेसिंगची मागणी अनेक पटींनी वाढत आहे. परंतु याच बरोबर डेटा सेंटरद्वारे जास्त प्रमाणात वापरण्यात येणा-या ऊर्जेमुळे ग्लोबल वॉर्मिंगची एक मोठी चिंता आहे. भारत देश सन २०७० पर्यंत कार्बन फुटप्रिंट विरहित देश होण्याच्या दृष्टीने पावले उचलित असल्याने भविष्यातील हरित तंत्रज्ञानाची वाढणारी मागणी लक्षात घेता हरित तंत्रज्ञानावर आधारीत उद्योग भविष्यात महत्वपूर्ण ठरणार आहेत. याकरिता “हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कस” ची संकल्पना आहे. या वैशिष्टयपूर्ण प्रकल्पांमुळे डेटा सेंटर क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपन्या आकर्षित होवून भारतातही याकरीता सक्षम परिसंस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे.

राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसकरीता अतिरिक्त प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 मध्ये अंशत: सुधारणा करण्यात येवून,त्यामध्ये तीन (3) हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कस उभारण्याकरीता मंत्रीमंडळ प्रस्तावातील अटी व शर्तींच्या अधीन राहून, सोईसवलती तसेच नियमित प्रोत्साहनांबरोबर नमूद अतिरिक्त प्रोत्साहने देय करण्याकरीता मान्यता देण्यात आली. सदर प्रकल्पांसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत:-

किमान 500 मे.वॅट क्षमता असलेले तीन हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कस प्रस्तावित असून, त्यांची 10 वर्षाच्या गुंतवणूक कालावधीमध्ये स्थिर भांडवली गुंतवणूक किमान रु. 30,000 कोटी इतकी असणार आहे. सदर प्रकल्पांसाठी प्रोत्साहन कालावधीत हा 20 वर्षे अनुज्ञेय करण्यात आला आहे.

स्थिर भांडवली गुंतवणूक निकषांची पुर्तता करणा-या पात्र नवीन हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कसना त्यांच्या सह-स्थानातील गुंतवणूकीसह किमान रु. 10,000 कोटींची गुंतवणूक केल्यानंतरच प्रोत्साहने दिली जातील. राज्यात पहिले तीन (3) हरित एकात्मिक डेटा सेंटर प्रकल्प स्थापन झाल्यानंतर सदरची योजना आपोआप संपुष्टात येईल.

०००

उद्योग विभाग

उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन

उच्च तंत्रज्ञानावरील अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा करून, अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन देणारे धोरण राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात कुठेही स्थापन होणाऱ्या दहा हजार कोटी एवढ्या गुंतवणूकीच्या अतिविशाल प्रकल्पांना क्षेत्रनिहाय वर्गीकरण विचारात न घेता, त्यांना प्रचलित सामुहिक प्रोत्साहन योजनेत स्थिर भांडवली गुंतवणूकीच्या किमान शंभर टक्के तर वीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूकींच्या ११ टक्के या प्रमाणे औद्योगिक प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल.

आतापर्यंत एकूण ५ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, दोन प्रकल्प मंत्रिमंडळ उपसमितीसमोर आहेत. अजून तीन प्रकल्पांना मान्यता देणे बाकी आहे.अशा या सात प्रकल्पांतून राज्यात १ कोटी ७९ लाख रुपये गुंतवणूक येऊन साठ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आणखी तीन प्रकल्पांद्वारे म्हणजेच दहा प्रकल्पांद्वारे दोन लाख कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक येणार आहे. तसेच एक लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होईल. या योजनेत तातडीने निर्णय घेता येणे शक्य व्हावे म्हणून काही सुधारणा व नवीन तरतुदी करण्यात आल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीस निर्णय घेण्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.

याशिवाय एरोस्पेस व डिफेन्समधील उद्योगांना भांडवली अनुदान व पाच उत्पादन क्षेत्रांतील व प्रत्येक क्षेत्रांमध्ये दोन प्रकल्पांची मर्यादा जास्तीत जास्त तीन करून एकूण दहा प्रकल्पांची मर्यादा ठेवण्यात येईल. पालघर जिल्ह्याचा समावेश, विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबार या क्षेत्रात करणे तसेच थर्स्ट सेक्टरमध्ये दहापेक्षा अधिक प्रस्ताव आल्यास, भांडवली अनुदान न देता सामुहिक प्रोत्साहन योजनेनुसार विशेष प्रोत्साहने देण्यात येतील.

०००

मृद व जलसंधारण विभाग

राळेगणसिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्था उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यासाठी ९ कोटी ९७ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. ही योजना ३७ वर्षे जुनी असून, हिचे सक्षमीकरण केल्यास ९० टक्के सिंचन पुन्हा होऊ शकते व शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊ शकतो.

०००

जलसंपदा विभाग

शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवण्याच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सतत येणाऱ्या पूरामुळे होणारे नुकसान लक्षात घेता, शिरोळ तालुक्यातील नांदणी, आलास, शिरटी, उमळवाड, हसूर, शेडशाळ, बस्तवाड या गावांमध्ये पथदर्शी भूमिगत चर योजना राबवण्यात येईल. त्यासाठी २२ कोटी ९७ लाख रुपये खर्च येणार आहे. या भागातील नैसर्गिक नाले, ओढे आणि प्रवाह गाळाने भरल्याने उघड्या प्रकारचे मुख्य चर ठेवल्यास भुमिगत चराचे पाणी पुन्हा शेतात येईल, असे लक्षात आल्यामुळे निर्णय घेण्यात आला.

०००

अल्पसंख्याक विकास विभाग

बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना

राज्यातील बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान देणाऱ्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकावन्न टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध विश्वस्त व सदस्य असलेल्या संस्थांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

०००

विमानचालन विभाग

सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार

सोलापूर- पुणे ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सोलापूर विमानतळ हे नवीन असून, राष्ट्रीय विमान वाहतूक धोरणांतर्गत या ठिकाणी बिडींगची प्रक्रिया सुरु आहे. ही योजना प्रत्यक्ष सुरु होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने, पुढील एक वर्षासाठी सोलापूर विमानतळावरून हवाई सेवेसाठी शंभर टक्के व्हायबिलिटी गॅप फंडिंग करण्याचा निर्णय झाला.

०००

सार्वजनिक आरोग्य विभाग

वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ  संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ (एस-20) व त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीतील अधिकाऱ्यांना तसेच  दंतशल्यचिकीत्सक गट- ब (एस-20) व दंतशल्यचिकीत्सक विशेषज्ञ संवर्ग (एस-23)  यांना 7 व्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2019 पासून ३५ टक्के दराने व्यवसायरोध भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ विविध वेतनश्रेणीतील ५२९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना होणार आहे.

०००

उच्च व तंत्र शिक्षण

डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना

पुण्यातील डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या तीनही अभिमत विद्यापीठातील २०१६ नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदांना देखील दोन लाभांचीच (१२ व २४ वर्षे) सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू राहील.

०००

विधि व न्याय विभाग

इंदापूर येथे न्यायालये स्थापण्यास मान्यता

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय  व दिवाणी न्यायालय (वरिष्ठ  स्तर) यांची स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करून त्यासाठी 20 नियमित  पदे व 6 पदांची सेवा  बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यात येईल. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरसाठी 20 नियमित  पदे व 4 पदांसाठी  बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मंजूरी देण्यातआली. याशिवाय शासकीय अभियोक्ता कार्यालयासाठी 3 नियमित पदे मंजूर करण्यास व एका पदाची सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली. ही न्यायालये  स्थापन झाल्यामुळे  इंदापूर येथील प्रलंबित प्रकरणे  जलद गतीने चालविणे सुलभ होईल व नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय दूर होईल. तसेच या तालुक्यामधील जनतेच्या दृष्टीने न्यायदान प्रक्रिया जास्त लोकभिमुख होईल.

०००

वैद्यकीय शिक्षण विभाग

बुलढाण्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

बुलढाण्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयासाठी प्रस्तावित केल्याप्रमाणे शासन मान्यतेने वेळोवेळी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासाठी ४८७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पाचव्या वर्षानंतर पुढील प्रत्येक वर्षी आवश्यक आवर्ती खर्चासाठी प्रति वर्ष सुमारे रूपये ३८ कोटी ७२ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

०००

रत्नागिरी येथे २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि.४: रत्नागिरी येथील वाटद, झाडगाव महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात २९ हजार ५५० कोटीं गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. यामुळे ३८हजार १२० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित या गुंतवणुक प्रकल्पांमध्ये सिलीकॉन वेफर्स, एटीएमपी, फॅब आणि अवकाश तंत्रज्ञान (एरोस्पेस)  आणि संरक्षण  या  क्षेत्राशी संबंधित आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सिलीकॉन वेफर्स, फॅब, एटीएमपी निर्मितीचा राज्यातील  हा तिसरा अतिविशाल प्रकल्प आहे.  हा प्रकल्प वाटद व झाडगाव एमआयडीसी या भागात होणार आहे. या प्रकल्पामध्ये १९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यातून ३३ हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

दुसरा प्रकल्प रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा असून तो एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्याद्वारे ४५०० रोजगार निर्मिती होणार आहे. एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील हा पहिलाच अतिविशाल प्रकल्प आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे या भागात वाढीव रोजगार आणि व्यावसायिक उपक्रम स्थापित होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. सदर प्रकल्पामुळे तांत्रिक नवकल्पना संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होऊन सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांची रोजगारक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे.

०००

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती – ⁠केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

  • दहिवडी मायणी विटा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
  • नवीन मुंबई-पुणे-बंगळुरू द्रुतगती मार्ग बांधणार
  • मुंबई ते बंगळुरू 800 किलोमीटरचे अंतर आठ तासात पार करता येणार
  • राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास 600 कि. मी. 
  • ⁠सांगली तासगाव बाह्य वळणास मंजुरी

सांगली दि. 4 (जि.मा.का.) : दहिवडी मायणी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास 600 कि. मी. पर्यंत पोहोचली आहे. 60 किलोमीटर लांबीच्या रू. 173 कोटीच्या सांगली तासगाव बाह्य वळणासही मंजुरी देण्यात आली आहे. त्याचे भूसंपादन सुरु झाले आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल. या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळे आर्थिक विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 दहिवडी – मायणी – विटा कि.मी. 340/250 ते 392/950 या रस्त्याचे काँक्रीट दुपदरीकरण, चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जोन्नतीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण श्री. गडकरी यांच्या हस्ते विटा येथे करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, माजी आमदार दिलीप येळगावकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आदि उपस्थित होते.

रस्त्याचे भूमिपूजन झाल्याचे जाहीर करून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, नवीन मुंबई – पुणे – बंगळुरू द्रुतगती मार्ग बांधायचे ठरवले आहे. या द्रुतगती मार्गामुळे मुंबई ते बंगळुरू हे जवळपास 800 किलोमीटरचे अंतर आठ तासात पार करता येऊ शकेल. या मार्गावर 5 ठिकाणी विमान उतरण्याची सोय करण्यात आली आहे. या मार्गाची सांगली जिल्ह्यात 74 किलोमीटर लांबी आहे. या नवीन द्रुतगती मार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपण केंद्रीय जलसंधारण मंत्री असताना टेंभू, म्हैसाळ योजनाना मंजुरी देण्याची संधी मिळाल्याचे सांगून या उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागाचा कायापालट होऊन हिरवं शिवार फुलल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रारंभी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रस्ते कामाच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. महामार्ग प्रकल्प माहिती देणारी चित्रफीत दाखविण्यात आली. प्रारंभी मंत्री महोदयांनी महामार्ग नकाशा पाहणी केली.

भूमिपूजन केलेल्या महामार्गाची माहिती पुढीलप्रमाणे –

राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 दहिवडी – मायणी – विटा हा प्रकल्प दहिवडी बसस्थानक येथे सुरू होऊन विटा नगरपरिषद हद्द येथे समाप्त होतो. याची एकूण लांबी 52.70 कि.मी. आहे. यामुळे बारामती – फलटण – विटा – तासगाव – सांगली ही शहरे जोडली जाणार आहेत. संपूर्ण लांबी दुपदरीकरण / चौपदरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी 631 कोटी 76 लाख रूपये रक्कम मंजूर करण्यात आली आहे. कामाचा कालावधी 2 वर्षे आहे. 6.4358 हेक्टर इतके भूसंपादन करण्यात येत असून यासाठी 3 कोटी 90 लाख रूपये रक्कम खर्च होणार आहे. या कामाची तांत्रिक निविदा 27 सप्टेंबर 2024 रोजी उघडण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे लोक, स्थानिक लोक तसेच वाहतूक, रहदारी या सर्वांची सुरक्षितता वाढणार आहे आणि अपघाताच्या प्रमाणात घट होणार आहे. प्रवास सुखकर व आरामदायी होणार आहे. हा रस्ता सातारा व सांगली जिल्ह्याला तसेच इतर राज्यमार्गांना जोडणारा दुवा आहे. हा रस्ता NH 166E ला जोडला जात असून तो कोकण ते कर्नाटक राज्याला जोडला जातो. या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरण होऊन या विस्तारामुळे सातारा, सांगली, तासगाव, विटा हा कृषी पट्टा आणि औद्योगिक क्षेत्राचा संभाव्य विकास होईल. तसेच येथील वाहनांची गर्दी कमी होईल त्यामुळे प्रदूषण कमी होईल, इंधनाचा वापर व वेळेची बचत होईल.

या रस्त्यामुळे शिर्डी, शनी शिंगणापूर, शिखर शिंगणापूर यासारख्या धार्मिक स्थळांशी संपर्क सुलभ होईल, ज्यामुळे धार्मिक पर्यटन उपक्रमामध्ये वाढ होईल आणि संबंधित क्षेत्रांचा विकास होईल. त्याचबरोबर ऊस, हळद आणि द्राक्षे वाहतुकीस लाभदायक ठरणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सभोवतालच्या परिसराच्या, शहरांच्या सर्वांगीण विकास व रोजगार निर्मितीस सहाय्यक ठरणार आहे.

०००००

तीर्थदर्शनातून ज्येष्ठांना अध्यात्मिक समाधानाची पर्वणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शनासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे. तीर्थयात्रा अध्यात्मिक मानसिक समाधानाची बाब आहे. कोल्हापूर, जळगाव नंतर तीर्थदर्शनासाठी तिसरी ट्रेन मुंबईतून आज रवाना होत आहे. योजनेअंतर्गत सर्व जिल्ह्यातून तीर्थ दर्शनासाठी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे तीर्थक्षेत्र दर्शनातून अध्यात्मिक व मानसिक समाधानाची  पर्वणी ज्येष्ठ नागरिकांना मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संदेशामधून केले.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून आज रवाना झाले. मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर या तीर्थयात्रेकरुंच्या प्रवासाला सुरूवात झाली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर साकारले आहे. प्रभू रामाचे दर्शन घेण्याची संधी या यात्रेच्या निमित्ताने आपल्या यात्रेकरूंना मिळते ही भाग्याची गोष्ट असून याचे समाधान वाटते. पुढील काळात शेगाव, पंढरपूर बोधगया, दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणीही या तीर्थदर्शन यात्रेचे नियोजन केले जाणार आहे. ही योजना पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यातून निवडलेला लाभार्थी हा भारतातील एकूण ७३ तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांना भेटी देणार आहेत. ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास तसेच ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’तून वृद्धावस्थेत उपयुक्त उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयांचे सहाय्य शासनाने दिले असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते गोपीचंद देसाई, चंद्रभागा वरेकर या यात्रेकरूंना प्रातिनिधिक स्वरूपात तिकीट देण्यात आले. मंत्री श्री.केसरकर यांनी रेल्वेच्या डब्यात जावून प्रवासी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत तीर्थयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून 150, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून 306 व ठाणे जिल्ह्यातून 471 अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी आज रवाना झाले आहेत. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर, अजमेर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर या तीर्थ क्षेत्रासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून  2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू असल्याची माहिती मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, वंदना कोचुरे यांनी दिली.

तीर्थयात्रेत सहभागी ज्येष्ठांसाठी पाणी,चहा, बिस्कीट, नाष्टा, जेवण ही व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून  त्यांच्या सोबत वैद्यकीय पथक, इतर सहायक पथक सोबत असणार आहे. यात्रेकरू अयोध्या दर्शनासाठी जात असल्यामुळे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभुषेत कलाकार मंचावर होते,पारंपरिक नृत्य यावेळी सादर करण्यात आले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, आयआरसीटीसी चे  गौरव झा, सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

मंत्रिमंडळ निर्णय (भाग -१)

मंत्रिमंडळ निर्णय (भाग -१ निर्णय १५ )

महसूल विभाग

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ

राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सद्या गावातील गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरुपी माफ आहे. मात्र गावठाणाबाहेर रहिवासी घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखालील जमिनींचा संपूर्ण अकृषिक कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याचप्रमाणे वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनीवरील अकृषिक कर रद्द करण्यात येईल.

०००

 

महसूल विभाग

महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष, सदस्य नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज

राज्यातील महसूल न्यायाधीकरणांच्या अध्यक्ष व सदस्य पदांवर नियुक्तीसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाप्रमाणेच महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधीकरणातील अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरात काढून अर्ज मागवण्यात येतील. नियुक्तीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. या संदर्भातील महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधीकरण नियम,२०२४ च्या प्रारूपातील नियमांवर नागरिकांच्या हरकती व दावे मागवण्यात येतील.

०००

 

महसूल विभाग

दौंड येथील बहूउद्देशीय सभागृह-नाट्यगृहासाठी शासकीय जमीन

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मंजूरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

दौंड नगरपंचायतीला बहुउद्देशीय सभागृह व नाट्यगृहासाठी विनामुल्य कब्जे हक्काने भोगवटादार वर्ग-२ मध्ये ८० आर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात दौंड नगरपंचायतीने शासनास प्रस्ताव सादर केला होता.

०००

 

जलसंपदा विभाग

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामांना मान्यता

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे ब्राह्मणवाडे येथील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. किकवी पेयजल प्रकल्पाचे माती धरण, सांडवा, पाणी पुरवठा कम विद्यूत विमोचक आणि अनुषंगीक कामांना मान्यता देण्यात येत आहे. या कामांची विखंडीत केलेली निविदा मूळ अटी व शर्तीनुसार पुनरूज्जिवीत करण्यात येईल.

०००

 

जलसंपदा विभाग

टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिलभाऊ बाबर यांचे नांव

सांगली जिल्ह्यातील टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या विस्तारित टप्प्यास स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना, टप्पा क्रं.६ असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संदर्भात या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती.

०००

 

जलसंपदा विभाग

पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती

सिल्लोडला सिंचनाचा लाभ मिळणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

एकूण सहा उच्च पातळी बंधारे व चार कोल्हापूरी बंधारे अशा दहा बंधाऱ्यामुळे सिल्लोड तालुक्यातील १२ गावांमधील १ हजार ४२२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यासाठी येणाऱ्या ५३४ कोटी ९२ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

०००

 

पर्यटन विभाग

प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद

राज्यातील प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षांच्या तुरूंगवासाची तसेच एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अशा वास्तूंना हानी पोहचवून त्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ही तरतूद करण्यात येत आहे.

सध्या, महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पूराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम १९६० (१९६१चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१२) मधील तरतुदींनुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगावस किंवा पाच हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. १९६० सालापासून या दंडात वाढ झालेली नाही. या कायद्यात कठोर तरतुदींचा आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या १९५८च्या अधिनियमातील सुधारणांशी सुसंगत अशा तरतूदी करणे आवश्यक असल्याने हा वाढीव शिक्षेचा प्रस्ताव मान्य करण्यात आला.

०००

 

क्रीडा विभाग

राज्यातील खेळाडूंसाठी पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ

आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना पाच कोटी रुपये, रौप्यपदकासाठी तीन कोटी, कांस्यपदकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पन्नास, तीस व वीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी सुवर्णपदक विजेत्यांना तीन कोटी रुपये, रौप्यपदकासाठी दोन कोटी, कांस्य पदकासाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीस, वीस व दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

एशियन गेम्ससाठी सुवर्णपदक विजेत्यांना एक कोटी रुपये, रौप्यपदकासाठी पंच्याहत्तर लाख, कांस्य पदकासाठी पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दहा लाख, सात लाख पन्नास हजार व पाच लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

वरिष्ठ कॉमनवेल्थसाठी सुवर्णपदक विजेत्यांना सत्तर लाख रुपये, रौप्यपदकासाठी पन्नास लाख, कांस्यपदकासाठी तीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात, पाच व तीन लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

युथ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्यांना तीस लाख रुपये, रौप्यपदकासाठी वीस लाख, कांस्यपदकासाठी दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे तीन, दोन व एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

तसेच सांघिक खेळात ऑलिम्पिक, पॅराआलिम्पिंमध्ये सुवर्णपदक विजेत्यांना तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये, रौप्यपदकासाठी दोन कोटी पंचवीस लाख तर कांस्यपदकासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सदतीस लाख पन्नास हजार, बावीस लाख पन्नास हजार व पंधरा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळात वरिष्ठ चॅम्पियनशीपमधील सुवर्णपदक विजेत्यांना दोन कोटी पंचवीस लाख लाख रुपये, रौप्यपदकासाठी एक कोटी पन्नास लाख लाख तर कांस्यपदकासाठी पंच्याहत्तर लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे बावीस लाख पन्नास हजार, पंधरा लाख आणि सात लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळात एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक विजेत्यांना पंच्याहत्तर लाख रुपये, रौप्यपदकासाठी ५६ लाख पंचवीस हजार तर कांस्यपदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे सात लाख पन्नास हजार, पाच लाख बासष्ठ हजार पाचशे रुपये व तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळात वरिष्ठ कॉमनवेल्थ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना बावन्न लाख पन्नास हजार रुपये, रौप्य पदकासाठी सदतीस लाख पन्नास हजार, तर कांस्य पदकासाठी बावीस लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे पाच लाख पंचवीस हजार, तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये व दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

सांघिक खेळात युथ ऑलिम्पिंमधील सुवर्णपदक विजेत्यांना बावीस लाख पन्नास हजार रुपये, रौप्यपदकासाठी पंधरा लाख, तर कांस्यपदकासाठी सात लाख पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. तर मार्गदर्शकांना अनुक्रमे दोन लाख पंचवीस हजार, एक लाख पन्नास हजार रुपये व पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

०००

 

सामाजिक न्याय विभाग

संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

राज्यातील सर्व ऊसतोड, वाहतूक कामगार व मुकादमांना झोपडी व बैल जोडी करिता विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय आज आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति मेट्रीक टन दहा रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या विमा योजनेसाठी खर्च करण्यात येईल. दि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी ही यासाठी विमा कंपनी असेल.

०००

 

जलसंपदा विभाग

लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण

राज्यातील लहान जलविद्युत प्रकल्पांचे व सहःस्थित सौर ऊर्जा प्रकल्पांचे खाजगीकरणातून बांधा, वापरा व हस्तांतरण करा (BOT) तत्वावर विकास करण्याच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

यापूर्वीच्या लहान जलविद्युत प्रकल्पांचे खाजगीकरणातून विकासाच्या धोरणांतर्गत १६३.६५ मे. वॅ. क्षमतेचे एकूण ४२ जलविद्युत प्रकल्पांची उभारणी करण्यात आलेली आहे. हे धोरण सुधारित करण्याची गरज होती. त्यानुसार प्रवर्तकाने स्वतः शोधलेल्या जलविद्युत प्रकल्पांचा थेट विकसनाचा पर्याय या नव्या धोरणात उपलब्ध असेल. शासन संकेतस्थळावरील १०१.३९ मे. वॅ. क्षमतेच्या ३७ जलविद्युत प्रकल्पांच्या विकसनाकरिता पारदर्शक निविदा पद्धतीचा अवलंब करुन प्रवर्तकाची निवड करण्यात येईल. ज्या प्रकल्पांकरिता आदान संरचना (Intake Structure) उपलब्ध असेल, त्या प्रकल्पांकरिता रु. ५० लक्ष प्रति मे.वॅ. इतके निर्धारित अधिमुल्य (Threshold Premium) निश्चित करण्यात आलेले आहे.

या धोरणानूसार महामंडळाच्या मालकीच्या जागांकरीता रु. ३५ प्रति कि.वॅ. / प्रति वर्ष भाडेपट्टी, संकरित भू पृष्ठावरील सौर ऊर्जा प्रकल्पांकरीता १० पैसे प्रति युनिट तर जल पृष्ठावरील तंरगत्या सौर प्रकल्पाकरिता ५ पैसे प्रती युनिट अतिरिक्त भाडेपट्टा व जलसंपदा विभागाच्या आदान संरचनेकरिता १० पैसे प्रति युनिट आदान संरचना देखभाल शुल्क महामंडळास महसूल स्वरुपात मिळेल.

०००

 

मदत व पुनर्वसन विभाग

कोकण पुणे विभागासाठी एसडीआरएफच्या दोन कंपन्या

कोकण व पुणे विभागासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या-एसडीआरएफच्या दोन कंपन्या स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

कोकणात नवी मुंबई येथे आणि पुण्यात दौंड येथे या कंपन्या असतील. प्रत्येक कंपनीत एकूण चार टिम असतील. त्यापैकी तीन टिम्स प्रत्यक्षात आपत्ती प्रतिसादात काम करतील. या दोन्ही कंपन्यांसाठी ४२८ पदे पोलीस महासंचालकांमार्फत निर्माण केली जातील. यासाठी ३७ कोटी रुपये खर्च येईल.

०००

 

वैद्यकीय शिक्षण विभाग

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात पात्र शिक्षकेतर अधिकारी व कर्माचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत दोन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या विद्यापीठातील २४ संवर्गातील २२७ शिक्षकेतर पदांना या योजनेत लाभ मिळणार आहे. वित्त विभागाच्या १ एप्रिल २०१०, ५ जुलै २०१० आणि ६ सप्टेंबर २०१४च्या शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने तरतुदी लागू होतील.

०००

 

वैद्यकीय शिक्षण विभाग

राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे

राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अखत्यारितील महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संसोधन संस्था ही मुख्य उत्कृष्टता केंद्र असेल. यासाठी येणाऱ्या ७० कोटी ७५ लाख रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. या केंद्रांच्या कार्यान्वयानासाठी कंपनी कायदा २०१३ मधील सेक्शन ८ अंतर्गत कंपनी स्थापन करण्यात येईल.

०००

 

इतर मागास बहूजन कल्याण/अल्पसंख्याक विकास विभाग

विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे

राज्यातील जैन, बारी, तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करतील. यात जैन समाजासाठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल. या महामंडळाच्या कामासाठी १५ पदे मंजूर करण्यात आली. याशिवाय बारी समाजासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) स्थापन करण्यात येत आहे. याशिवाय तेली, हिंदू-खाटीक, लोणारी या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

०००

 

सार्वजनिक बांधकाम विभाग

पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या कामास मान्यता

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ-एमएसआरडीसीमार्फत पुणे शहराभोवती बांधण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या कामास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पुणे रिंग रोडच्या पूर्व भागात ऊर्से ते सोलू ते सोरतापवाडी (पुणे-सोलापूर रस्ता) या रस्त्याच्या १९ हजार ९३२ कोटी ९८ लाख रुपये इतक्या किंमतीच्या कामांना, तसेच पुणे रिंग रोड पश्चिम भागात ऊर्से ते वरवे (बु.) सातारा रोडसाठी २२ हजार ७७८ कोटी ५ लाख इतक्या किंमतीच्या कामांना सुधारित मान्यता देण्यात आली.

०००

 

 

 

माझी ‘अभिजात’ मराठी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अधिकृतपणे प्राप्त झाला याचा सर्वच मराठी भाषिकांना अभिमान आहे. याचा संदर्भ थेट बीड सोबत असल्याचा विशेष आनंद समस्त बीडवासियांना आहे. याच बीडच्या भूमीत आद्यकवी मुकुंदराज यांनी शके १११०  मध्ये पहिला मराठी ग्रंथ विवेकसिंधू लिहिला.

मराठी भाषा ही मूळची आर्यांची भाषा मानली जाते. भाषेचा उगम उत्तरेकडे झाला असला तरी ही भाषा सातपुडा पर्वतरांगांपासून खाली कावेरी नदीच्या खोऱ्यापर्यंत विस्तारली व स्थिरावली. भाषा दर दहा कोसांवर बदलते आणि त्यानुसार मराठी संभाषणाच्या विविध शैली विकसित होत गेल्या.

मराठी भाषा बोलणारे राज्य म्हणून १९६० साली भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. त्यानंतर आजपर्यंत मराठी भाषेचा सतत विकास आपण बघतो. त्यापूर्वी असणाऱ्या काळातील मराठी भाषेचा प्रवास देखील तितकाच महत्त्वाचा आहे.

इसवी सन ५०० ते ७०० या काळात पूर्ववैदिक, वैदिक नंतर संस्कृत, पाली प्राकृत यात विविध उत्क्रांत होत मराठी भाषेचा उगम झालेला मानला जातो. ‘श्री चामुन्डाराये करविले’ असे शिलालेखावरील मराठी भाषेत लिखित पहिले वाक्य श्रावणबेळगोळ येथे असल्याचा दाखला उपलब्ध आहे.

संत वाङमयातून मराठीचा लिखित प्रसार होत गेला. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यांच्या रचनांमधून लिखित तसेच बोलीभाषेतील मराठी प्रगत आणि प्रगल्भ होत होती. मराठी भाषेबाबत संत ज्ञानेश्वर यांनी केलेले वर्णन सार्थ आहे. ‘परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरेचि रसिके मेळविण’.

भाषेत असणारे सौंदर्य आणि ते अधिक खुलविणारे अलंकार सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्याचाही स्विकार करणारी भाषा म्हणून मराठीला पाहिले जाते. सर्व भाषांमधील शब्दांना जोडत आल्याने मराठी अधिकच समृद्ध झालेली आहे.

इतक्या वर्षांच्या प्रवासात विविध शासकांचा अंमल या प्रांतावर राहिला त्यामुळे मराठी भाषेत शब्दसंग्रह सातत्याने वाढत राहिला. अरबी, फारसी, उर्दू, इंग्रजी अशा अनेक भाषेतील शब्द मराठीत कायमचे आले आणि आज ते मराठी भाषेचा भाग बनलेले आपणास दिसतात. आज संगणक युगात मराठी इंटरनेटच्या प्रमुख भाषांपैकी एक आहे आणि मराठी भाषक आवर्जून मराठीचा वापर करतात, ही अतिशय अभिमानाची बाब आहे.

साधारण २०१० च्या प्रारंभी फेसबुकच्या सारख्या माध्यमातून मी मराठी वापरायला सुरुवात केली. त्यावेळी इंग्रजी शब्दावलीत मराठी संदेश लिहिणारे अधिक होते व मराठीचा असा मराठीचा वर्ग मी सुरू केल्यावर अनेक जण मराठी कडे आकर्षित झाले. संगणक क्रांतीत ‘युनिकोड’ आल्याने या आभासी जगात मराठीचा झपाट्याने विस्तार झाला. मी स्वतः या माध्यमाला दिलेले शब्द आज दरमहा कोट्यावधी वेळा वापरल्याचे संदेश येतात. त्यावेळी मराठी भाषक म्हणून याचा मलाही अभिमान वाटतो.

मराठी भाषेचा प्रवास केवळ पुस्तकातूनच नव्हे तर प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मला शासकीय नोकरीच्या निमित्ताने मिळाली. २२  जिल्ह्यांमधून फिरताना त्या त्या ठिकाणचा मराठीचा लहेजा आणि गोडवा जाणवतो. रत्नागिरी ते गडचिरोली असा कार्यक्षेत्राचा प्रवास राहिल्याने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जशी भाषा वेगवेगळी बोलली जाते तशीच ती वऱ्हाडात, झाडीपट्टीत, पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकणात, खानदेशात आणि पुण्या – मुंबईतही वेगळी राहते.

महानगरीय प्रभाव असणारी मुंबईची मराठी खूपच वेगळी आहे. विद्येचं माहेरघर पुण्याची मराठी तितकीच सरळ आहे. आत्मियता जपणारी आणि विशिष्ट शब्दांना खेळवणारी वर्धा – नागपूरची मराठी वेगळी आहे. सिमावर्ती जिल्ह्यांमध्ये सिमेलगत असणाऱ्या नजिकच्या राज्यातील भाषेच्या प्रभावाखाली असणारी मराठी आणखीनच वेगळी वाटते.

कोकणातली मराठी, तळकोकणची मालवणी आणि गडचिरोलीतील मराठी एकदम भिन्न आहेत. जिल्हा बदल झाल्यास जाणवतं की पदार्थ, वस्तू आणि भांड्यांची नावे एकाच भाषेतली असली तरी ती जुळत नाही.

पुण्यात अमृततुल्य अर्थात चहा करतात तर मुंबईत चहा बनवतात. विदर्भात मात्र चहा मांडतात ही भाषिक गंमतच आहे. साधारणपणे रस्त्यावर डावीकडे किंवा उजवीकडे वळतात मात्र खानदेशात डावीकडे फाकाचं असतं.

मराठवाडी माणसं अंगावर कपडे घालतात मात्र वैदर्भिय मराठीत कपडे लावतात..खूप वाटत असला तरी तोच मराठीचा वेगळेपणा आहे. अगदी भाषा तीच फरक.. काई त नी. (वर्धा) अर्थात काही तर नाही….!

 0000

– प्रशांत विजया अनंत दैठणकर

जिल्हा माहिती अधिकारी, बीड

 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; ५६,१०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ

नवी दिल्ली, दि. ४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, वाशिम आणि ठाणे येथे विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. प्रधानमंत्री सकाळी 11.15 वाजता वाशिममधील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील आणि संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहतील.

प्रधानमंत्री यांचे वाशिममधील कार्यक्रम

वाशिममध्ये प्रधानमंत्री 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्रातील विविध उपक्रमांचा शुभारंभ करतील. या योजनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित केला जाणार असून, यामुळे सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुमारे 1,920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित करतील. तसेच, 9,200 शेतकरी उत्पादक संघटनांचे राष्ट्रार्पण करतील. तसेच, बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेल्या “बंजारा विरासत संग्रहालयाचे” प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

ठाण्यातील नागरी गतिशीलता वाढवण्यासाठी 32,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ

प्रधानमंत्री ठाणे येथे सुमारे 32,800 कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये मुंबई मेट्रो लाईन 3 फेज 1 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हा प्रकल्प मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.याशिवाय, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी होईल. ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचा पायाभरणी समारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्राच्या विकासासाठी नैना (NAINA) प्रकल्पाची पायाभरणी

ठाण्यातील आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (NAINA) प्रकल्प, ज्याची फेज-1 पायाभरणी होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागातील पायाभूत सुविधा विकासाला गती मिळणार आहे.

या दौऱ्यात प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या कृषी, नागरी आणि औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत, ज्यामुळे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल.

०००

३ ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार

मुंबई, दि. ४ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल आज राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्रीगण या बैठकीस उपस्थित होते.

३ ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. यात म्हटले आहे की, या ऐतिहासिक निर्णयाबद्धल राज्य मंत्रिमंडळ  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार व्यक्त करते, तसेच राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने केंद्रीय मंत्रिमंडळाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या प्रस्तावाचा आशय असा, मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. गेले दशकभर यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते. यासाठी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी भाषा समितीने मोठे काम केले. मराठी भाषा विभागाने भाषा संचालनालय , मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ,  साहित्य संस्कृती महामंडळ, राज्य मराठी विकास संस्था यांच्या माध्यमातून मराठीचा अखंड जागर सुरू ठेवला आहे. मराठी साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषकांसह मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी पर्वणी ठरत आले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तमाम मराठी भाषिकांना आनंद झाला आहे. मराठी माणसांसाठी हा निर्णय ऐतिहासिक आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक थोर साहित्यिक, संशोधक, अभ्यासकांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मेहनतीला या निर्णयामुळे यश लाभले आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषेच्या विकासासाठी आणखी ऊर्जा, प्रेरणा मिळाली आहे. मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. रिद्धपूर येथे या विद्यापीठाचे मुख्यालय असणार आहे. मराठी भाषेतील अभ्यास, संशोधन याला चालना देता येणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे जगभरातील मराठी प्रेमींसाठी अभिमानास्पद, गौरवास्पद आहे. या निर्णयासाठी हे मंत्रीमंडळ केंद्र सरकारचे अभिनंदन करत आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री श्री. केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडवणीस, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदनही केले.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने भाषा संवर्धनाच्या दृष्टीने मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे, भारतातील सर्व  विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे. प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालयांचे बळकटीकरण, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थ्यांना भरीव मदत करणे या गोष्टी साध्य होणार असल्याचेही प्रा. पठारे यांच्या समितीने नमूद केले आहे.

०००

 

ताज्या बातम्या

चैत्यभूमी पासून इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंतच्या मार्गाच्या कामांचा आढावा

0
मुंबई, दि.5 :- चैत्यभूमी येथे भेट देणाऱ्या अनुयायांना चैत्यभूमीपासून इंदू मिल येथे निर्माण होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकापर्यंत जाण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या...

श्री जोतिबा देवस्थान विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
कार्बन न्यूट्रल देश करण्यासाठी ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्त्वाची - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पर्यावरण दिनी वृक्षारोपण मोहिमेतून मंदिर व परिसर विकास आराखडा अंमलबजावणीस...

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल – मुख्यमंत्री...

0
ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि...

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि.5 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असून अण्णासाहेब मगर स्टेडियम व सिटी सेंटर भवन हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश...

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी – अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर

0
मुंबई, दि. ५ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहोचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची...