शुक्रवार, जून 27, 2025
Home Blog Page 398

महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावणार ‘जयंती फलक’-मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १० :- महाराष्ट्र शासनातर्फे मंत्रालयात, राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात आणि प्रशासकीय मुख्यालयात थोर महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमांच्या वेळी सर्वसामान्य जनतेस महापुरुषांच्या कार्याची माहिती मिळावी यासाठी शासनाने थोर महापुरुषांची जयंती असताना त्यांच्या प्रतिमेसह जीवन कार्याबाबत माहिती देणारे फलकही लावण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

आज त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित झाला आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मंत्रालय, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये येथे त्यांच्या प्रतिमेसह जीवन चरित्राची माहिती देणारे फलकही लावण्यात येतील. तसेच ‘जयंती फलक या शीर्षकाखाली https://gad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

००००

मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १० : सनातन धर्म हा केवळ धर्मच नाही; तर ती जीवन पद्धती आहे. सनातन धर्माने प्रत्येक धर्माचा स्वीकार व आदर केला आहे. सहिष्णुता व सर्वसमावेशकता ही सनातन धर्माची बलस्थाने आहेत. त्यामुळे मानवतेच्या रक्षणासाठी सनातन धर्माचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांनी मुंबईतील महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान गोरेगाव येथे सुरु असलेल्या ४ – दिवसांच्या हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्याला गुरुवारी (दि. ९) संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे आयोजन हिंदू आध्यात्मिक व सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

भारतातील लोक स्वभावतःच धर्मनिरपेक्ष आहेत. दयाभाव येथील संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळेच कोरोना महामारीच्या काळात भारताने कोविड लस स्वतःपुरती न वापरता जगातील गरीब देशांना देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली, असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे मानवतेच्या सेवेसाठी भारताला बलशाली होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल म्हणाले.

यावेळी राज्यपालांनी मेळाव्यात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. हे  प्रदर्शन दि. ९ ते १२ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून या भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे हा या मेळाव्याचा उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला हिंदू आध्यात्मिक आणि सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत सिंह कोठारी, शारदा रामप्रकाश बुबना,सीए के सी जैन, गिरीश भाई शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor addresses ‘Hindu Spiritual and Service Fair’

Mumbai, 10th Jan : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan today addressed the grand ‘Hindu Spiritual and Service Mela 2025’ organized by the Hindu Spiritual and Service Foundation at Maharani Ahilyadevi Holkar Maidan in Goregaon Mumbai on Thu (9 Jan). The main objective of the 4 – day festival of Spirituality and Service is to preserve the rich social and cultural heritage of Sanatan Dharma.

Gunvant Singh Kothari, National Convenor of Hindu Spiritual and Service Foundation (HSSF), Sharda Bubna, CA  K C Jain, Girish Shah, Co – Convenor Ashok Doshi, Suresh Bhageria and other dignitaries were present.

0000

कर्मवीर दादासाहेबांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर, दि. १० : तुलनेने अतिशय मागास असलेल्या कष्टकरी समाजात दादासाहेब कन्नमवार यांनी जन्म घेतला, मात्र स्वत:च्या मेहनतीवर त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. दादासाहेब हे ध्येयवादी नेते होते. राज्याचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन ते संपूर्ण जीवन जगले. अशा नेत्यांचे विचार आणि कार्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे मनोगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे बेलार समाज संघटना व रौप्य महोत्सव समितीच्या वतीने आयेाजित कर्मवीर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय वडेट्टीवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, सुधाकर अडबाले, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, आयोजन समितीचे राहुल कन्नमवार, सूर्यकांत खनके आदी उपस्थित होते.

लोकनेते दादासाहेब कन्नमवारांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आज येथे उपस्थित राहता आले, याचा अतिशय आनंद आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, दादासाहेब यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला होता. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. भारत – चीन युध्दाच्या वेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना देशाच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मा.सा. कन्नमवार यांनी राज्याची सूत्रे सांभाळली. या पदावर ते १ वर्ष ४ महिने होते. युध्दाचा तो काळ होता. अशा परिस्थितीत आर्थिक सहाय्य करण्यासाठी दादासाहेबांनी जनतेला आवाहन केले. त्याकाळात चंद्रपूर जिल्ह्याने तसेच महाराष्ट्राने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशासाठी सोने-नाणे, आर्थिक मदत केली.

शिक्षण आणि आरोग्य हे अतिशय महत्वाचे विषय आहेत. प्रत्येक गावात आरोग्य केंद्र असावे, असा सर्वप्रथम विचार कर्मवीर दादासाहेबांनी मांडला. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी अनेकांना प्रेरीत केले. राज्याच्या प्रगतीसाठी अतिशय मोठे योगदान दादासाहेबांनी दिले आहे. विधानसभेच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येईल.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सामान्य माणसांचा विकास करणे, हेच आपल्या सरकारचे सुध्दा ध्येय आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करावे.  त्यामुळे जिल्ह्याच्या संदर्भात सर्व अडचणी सोडविण्यात येतील. तसेच ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यासुध्दा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी मनोगत व्यक्त केले.

सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते मा.सा. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ. गजानन कोटेवार, प्रभा चिलखे, रुपेश कोकावार, देवराव कासटवार, गजानन चंदावार यांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी घेतले माता महाकालीचे दर्शन : चंद्रपूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचे मनोभावे दर्शन घेतले व महाकाली मातेची महाआरती केली.

००००

खेळामुळे संघर्षाला तोंड देण्याची ताकद मिळते- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

सातारा, दि.१० :  खेळामुळे मानसिक ताकद, आत्मविश्वासाबरोबर आंतरिक ताकद मिळते. यामुळे जीवनात कोणत्याही मोठ्या संघर्षाला तोंड देता येवू शकते. ग्राम विकास विभागाच्या जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धांचे दर वर्षी आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा परिषदेच्या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे १० ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.  यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री म्हणून नाही तर एक सहकारी म्हणून या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला आलो आहे, असे सांगून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सावाचे चांगले नियोजन केले आहे. याबद्दल सर्व अधिकारी, कर्मचाऱ्याचे अभिनंदनही त्यांनी केले.

बलशाही देश घडविण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करित आहेत. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. सातारा जिल्हा परिषद नेहमीच विविध योजना राबविण्यात अग्रेसर राहीली आहे. पुढील काळातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजना गतीने सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात. शासनाच्या १०० दिवसांच्या आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांमध्ये सातारा जिल्हा राज्यात प्रथम राहील, अशी अपेक्षाही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी व्यक्त केली.

वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात १२ संघांनी भाग घेतला आहे. १० ते १२ जानेवारी या कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांबरोबर सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही सभाग असणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी प्रस्ताविकात सांगितले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ठ संचलन व चित्ररथाद्वारे संस्कृती व परंपरेचे दर्शन

वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग असून त्यांनी आज उत्कृष्ट असे संचलन केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी चित्ररथाद्वारे ऐतिहासिक, संस्कृती, परंपरा यासह आरोग्य, शिक्षण व पर्यंटन याची माहिती चित्ररथाद्वारे दिली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फिश मार्केटमध्ये अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सांगली, दि. १०, (जि. मा. का.) :  महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.

सांगली येथील खणभाग येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत फिश मार्केटच्या भूमिपूजनांतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, पुणे विभाग मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ, महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, सम्राट महाडिक, स्वाती शिंदे, सुनंदा राऊत यांच्यासह महानगरपालिकचे आजी, माजी पदाधिकारी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले, हा अतिशय चांगला प्रकल्प आहे. विकासाची प्रक्रिया अशीच चालू ठेवावी. अधिकच्या चांगल्या सोयीसाठी या वास्तूमध्ये आणखी एक मजला वाढविण्यासाठी व कोल्ड स्टोरेजबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा. लवकरात लवकर तो मंजूर करू. शासन म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबध्द आहे. फिश मार्केट तयार झाल्यानंतर मत्स्य व्यावसायिकांनी रस्त्यावर  विक्री न करता फिश मार्केटमध्येच करावी, असे ते म्हणाले.

यावेळी खासदार विशाल पाटील म्हणाले, सांगली शहरात एक चांगली वास्तू उभारत आहे. यासाठी आवश्यकता भासल्यास खासदार फंडातूनही मदत करू.  हा चांगला प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.

महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले, फिश मार्केट पूर्ण होईपर्यत येथील व्यावसायिकांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरात लवकर ही वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न करू. या वास्तूमध्ये आणखी एक मजला व कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करू. या माध्यमातून मत्स्य व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची चांगली संधी उपलब्ध होईल असे ते म्हणाले.

स्वाती शिंदे यांनी ही वास्तू उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर सांगली शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात अतिरीक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या फिश मार्केटच्या कामाची माहिती दिली. या कार्यक्रमास नागरिक, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

पणन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी संचालनालयाने ताकदीने काम करावे – पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे, दि. 9 : शेतकरी, आडते, व्यापारी तसेच हमाल शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीतील महत्त्वाचे घटक आहेत. शेतमालाला योग्य व वाजवी किंमत मिळावी हे पणन कायद्याचे वैशिष्टय आहे. शेतकऱ्यांचे काही मध्यस्थांकडून होणारे शोषण टाळण्यासाठी व पणन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी पणन संचनालयाने ताकदीने काम करावे तसेच जागतिक बदलांचा वेध घेऊन,शेतकरी हितासाठी संचालयानाच्या कामात तातडीने सकारात्मक बदल घडवावेत. असे निर्देश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

आज मध्यवर्ती इमारत पुणे येथील पणन संचालनालयाला पणन मंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी अधिकाऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पणन संचालक विकास रसाळ, पणन सहसंचालक आर.एस.दराडे, श्रीमती स्नेहा जोशी, पणन उपसंचाक मोहन निंबाळकर, रविंद्र गोसावी यावेळी उपस्थित होते.

सहकारी ग्राहक संस्थाचे प्रश्न आणि मागण्या सोडविण्यासाठी राज्यस्तरावर संमेलन आयोजित करण्यात यावे, सर्वसोयींनीयुक्त मार्केट कमिटीची स्थापना, खाजगी बाजार समित्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आयोजित करावा असे सांगून मंत्री श्री.रावल यांनी विमान, रस्ते आणि समुद्रमार्गे जोडण्यात येणारे जागतीक दर्जाचे महामुंबई टर्मिनल मार्केट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पणन संचालनालयाच्या कामाकाजाचा आढावा मंत्री रावल यांनी यावेळी घेतला. पणन संचालक विकास रसाळ यांनी पणन विभागाच्या नियोजित कार्याची माहिती दिली. बैठकीला पणन संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बदलत्या जीवनशैलीत तृणधान्याचे आहारात महत्त्वाचे स्थान, मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज -पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे, दि. 9 : तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वामुळे वर्तमान युगात त्याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर खूप महत्त्वाचा आहे, तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविन्यपूर्ण कल्पना तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगला मदत करुन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी पणन मंडळाची आहे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी केले. गणेश कला क्रिडा मंडळ येथे आयोजित दुसऱ्या मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कृषी पणन मंडळाचे संचालक विकास रसाळ, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, सिंदखेडा बाजार समितीचे सभापती आणि मंडळाचे माजी संचालक नारायण पाटील उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, जगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करावे अशी भूमिका मांडली. त्याला जवळपास 71 देशांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’म्हणून साजरे करण्यात आले. तृणधान्याचा वापर हा एक वर्षापुरता मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजार उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे. तसेच उत्पादन विक्रीसाठी नाविण्यपूर्ण कल्पना तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पॅकेजिंग, ब्रॅडिंग आणि मार्केटिंगला मदत करुन त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी पणन मंडळाची आहे, असेही रावल म्हणाले. तृणधान्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोवण्यासाठी विविध माध्यमातून प्रचार, प्रसिध्दी करावी. तृणधान्य महोत्सव राज्यातील इतर जिल्ह्यातही घेण्यात येणार आहेत. त्यासाठी पणन मंडळ हे उत्पादक ते ग्राहक यांना जोडणारा पूल म्हणून काम करेल असे सांगून आपल्या शेतकऱ्यांचा माल जगाच्या बाजारपेठेत पोहोचेल असा संकल्प  सर्वांनी करुया असे ते म्हणाले.

हा तृणधान्य महोत्सव 12 जानेवारी पर्यंत सुरु असून महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविकात दिली.

सुरुवातीस पणनमंत्री श्री. रावल यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी मिलेट जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीस श्री. रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

आदिवासी बांधवांना हक्क व सोयी सुविधा वेळेत मिळाव्यात – राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य

मुंबई, दि. 9 : आदिवासी बांधवांना विकासाची संधी मिळाली पाहिजे,  मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी त्यांना आर्थिक, सामजिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक अशा मूलभूत सोयीसुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत. यासह आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी आयोग काम करीत असल्याचे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी सांगितले.

राज्यातील अनुसूचित जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांविषयी आढावा बैठक आज आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ट्रायडंट येथे झाली.

अध्यक्ष श्री. आर्य म्हणाले, आदिवासी विकासासाठी महाराष्ट्रात उत्तम काम सुरु आहे. केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदिवासी बांधवांसाठी असणाऱ्या योजनांची  प्रभावी अंमलबजावणी आखणी व्हावी. आदिवासी बांधवांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी संबंधित यंत्रांनी अधिक गतीने काम करावे, यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा सुद्धा वेळेत मिळाल्या पाहिजे तसेच आदिवासी बांधवांनी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीसाठी केलेल्या अर्जांचा आढावा घेऊन या प्रक्रियेला अधिक गती देण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करावे अशा सूचनाही यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय  ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाची सुरवात केली असून  त्यानुसार देशभरात ‘एक पेड माँ के नाम’ अभियानातंर्गत वृक्षारोपण करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभाग व वनविभागाने फळवृक्ष लागवडी संदर्भात पुढाकार घ्यावा. आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी हे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग ‘युवकांशी संवाद’ हा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील आदिवासी आश्रम शाळांना व विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक साहित्य व अन्य मूलभूत शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

आयोगाने महाराष्ट्रातील नंदुरबार, पालघर, नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, जळगाव, नागपूर, या जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांची आर्थिक, सामाजिक, परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आदिवासीच्या विकासासाठी आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आयोगाकडून सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस आयोगाचे सदस्य आशा लाक्रा,निरुपम चाकमा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, सचिव डॉ.अनुपकुमार यादव, सचिव जयश्री भोज, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे,आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंह आर्य यांनी पत्रकार परिषद घेवून  बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माध्यमांना माहिती दिली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ९ : मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानण्यात आला आहे. युवकांना व युवतींना त्यांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या नवीन युवा धोरणानुसार राज्य व जिल्हा युवा पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. जिल्हास्तर युवा पुरस्कार स्वरुप एक युवक व एक युवती यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. १०,०००/- व नोंदणीकृत संस्थेस गौरवपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. ५०,०००/- असे आहे.

विहीत नमुन्यातील अर्ज व माहिती तसेच शासन निर्णय www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर २०१३९९९२११२२०४३३२९ या संगणक संकेतांकावर उपलब्ध आहे. एका जिल्ह्यामध्ये जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती राज्यातील अन्य जिल्ह्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग ५ वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्जावरील लिंकवर सोबतच्या संकेतांकावरील शासन निर्णयात शेवटी उपलब्ध आहे. ३१ मार्च २०२५ या कालावधीत कार्यालयीन कामकाज दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण भरलेल्या विहीत अर्जाची प्रत, आवश्यक ती छायांकित केलेली कागदपत्रे (सत्यप्रत केलेली), तीन पासपोर्ट फोटो इ. सर्व कागदपत्रे पुस्तिकेच्या स्वरूपात एकत्रित करून बंद लिफाफ्यातच या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, शारीरिक शिक्षण महावि‌द्यालय परिसर, समता नगर, कांदिवली, मुंबई येथे १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सादर करावे.

अधिक माहितीसाठी ०२२-२०८९०७१७ या क्रमांकाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा युवा पुरस्कार सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षाकरिता मूल्यांकन करण्यात येणार आहे. युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील पुरस्कार वर्षाच्या गत तीन वर्षामध्ये केलेले कार्य व कामगिरी विचारात घेण्यात येईल. युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनु-सूचित जाती, जमाती, जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्यशिक्षण, प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वागीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडप‌ट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण इ. बाबत कार्य, साहस इ. बाबतचे कार्य यानुसार मूल्यांकन होवून जिल्हास्तर युवा पुरस्कार ०१ मे २०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातून युवक व युवती तसेच नोंदणीकृत संस्थांनी प्रस्ताव या कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 :  ‘राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची गतिमान उभारणी करा. यात वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा,’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये योग्य संतुलन राखत महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच राज्य सरकारचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून शासनाच्या धोरणांद्वारे विकासाची समान संधी सर्व भागांमध्ये निर्माण केली जावी, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रूम येथे उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच प्रकल्पांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आणि त्यांना गती देण्याच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी आवश्यक निर्णय या आढावा बैठकीत घेण्यात आले.

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर देशाच्या सागरी व्यापाराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्याच्या उभारणीसाठी आवश्यक परवानग्या आणि भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि निर्यात धोरणाला चालना देणारा ठरणार आहे.

तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेसाठी सोमवारी कार्यआदेश देण्यात यावेत, लोअर पेंढी प्रकल्प ग्रस्तांना तातडीने जागा देण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, जलस्रोत व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे. तसेच वर्धा – नांदेड रेल्वे मार्ग आणि वडसा – गडचिरोली प्रकल्पाचे भूसंपादन वेगवान करावे, तुळजापूर मंदिर विकास आराखडा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावा, छत्रपती संभाजीनगरच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि वाढती पाणीटंचाई लक्षात घेता जलपुरवठा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना आरओबीचा प्रश्न मार्गी लावावा आणि पहिला टप्पा 31 मार्च पर्यंत सुरू करावा.  विरार – अलिबाग मल्टी मॉडेल कॅरिडोरचे सर्वेक्षण पुढील महिन्यात पूर्ण करावे, जालना – नांदेड मुल्यांकनाचे प्रश्न तातडीने सोडवावेत, मुळा मुठा नदी संवर्ध जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा. बीडीडी चाळ पुनर्विकास, वरळी ट्रान्झिट इमारत लवकर उपलब्ध करून द्यावी. मुंबई मेट्रो 3 जून जुलैपर्यंत पूर्ण करावा. वाढवण बंदरासाठीची संपूर्ण जागा 31 मार्च पर्यंत देण्यात यावी आणि पालघर विमानतळासाठी सल्लागाराची नेमणूक करावी अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

मुंबईसह राज्यभरातील मेट्रो, रेल्वे, महामार्ग, विमानतळ, बंदरे, सिंचन, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रांतील एकूण १९ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये निम्न पेडी सिंचन प्रकल्प, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना, विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, वांद्रे – वर्सोवा सि लिंक, ठाणे रिंग मेट्रो, ना.म. जोशी मार्ग,  नायगाव, पुणे रिंग रोड, पुणे मेट्रो – 3 आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प आदी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी  प्रामुख्याने प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, भूसंपादन, पुरवणी मागणी आणि कार्यवाही प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवण्यात यावी असे निर्देश दिले.

पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून पुणे रिंग रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्याच्या भूसंपादन प्रक्रियेस गती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा ताण कमी होणार आहे आणि वेळेची व इंधनाची बचत होईल.

तसेच, श्री तुळजाभवानी मंदिर परिसर सुशोभीकरण योजनेद्वारे यात्रेकरूंसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून पर्यटन क्षेत्रासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, वाढवण बंदर ते नाशिक मार्गाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासह वाढवण येथे नवीन विमानतळ उभारणीच्या शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याबाबत संबंधित विभागांना मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचेही आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट निर्देश दिले की, प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबांना आक्रमकपणे तोंड द्यावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या विलंबास संबंधित विभागांना जबाबदार धरले जाईल आणि आवश्यक ती तातडीची पावले उचलली जातील. यासोबतच, प्रत्येक प्रकल्पासाठी जबाबदारी निश्चित केली जाईल, जेणेकरून प्रकल्प वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होतील. संबंधित विभागांनी ठराविक कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान आणि संसाधनांचा योग्य वापर करावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यातील पायाभूत प्रकल्पांना गती देण्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही देणार भर – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

0
नागपूर,दि.२७ : ज्या विश्वासाने पालक शासकीय आश्रमशाळेत मुलांना दाखल करतात त्या विश्वासाला सार्थकी लावण्याची जबाबदारी ही शिक्षक व शाळेवर असते. पालकांच्या मनात आपल्या मुलांप्रती...

सहकार पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर १८ जुलै पूर्वी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

0
पुणे,दि.२७ : राज्याच्या सहकार चळवळीच्या विकासात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या सहकारी संस्थांना राज्य शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील...

कोल्हापूर चित्रनगरीत मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण

0
मुंबई, दि. २७ : कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्री...

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. २७ : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती...

दिव्यांग व्यक्तींना सर्व क्षेत्रात संधी मिळणे आवश्यक – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि.२७ जून : दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, रोजगार, आरोग्य, सरकारी सेवा, आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून सन्मान मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी सर्व क्षेत्रात संधी...