रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 298

जिल्ह्याच्या विकासासाठी गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्या; १०० दिवस कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

जिल्ह्याच्या ९१२ कोटी ७८ लक्षच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

अहिल्यानगर, दि.१० : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लक्ष अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १४४ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ६५ कोटी ८९ लक्ष अशा एकूण ९१२ कोटी ७८ लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

बैठकीस आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ.किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.

एकूण प्रस्तावित आराखड्यापैकी १७५ कोटी ७२ लक्ष २५ हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. वित्त व नियोजन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) एकूण ७०२ कोटी ८९ लक्ष रुपयांचा आराखडा सादर करण्यात येईल. तसेच बैठकीमध्ये एकूण रु.१५० कोटी अतिरीक्त नियतव्ययाची मागणी करण्याचे निश्चित करण्यात आले.

मंजूर प्रारूप आराखड्यात सर्वसाधारण योजनेअंतर्गत ग्रामीण विकास ३५ कोटी, ऊर्जा विकास ५० कोटी, कृषी आणि संलग्न सेवा ९९ कोटी २८ लक्ष ८४ हजार, पाटबंधारे व पूर नियंत्रण ३१ कोटी ८४ लक्ष ३६ हजार, उद्योग व खाण ४ कोटी ३० लक्ष, परिवहन १०९ कोटी, सामान्य आर्थिक सेवा ८९ कोटी २८ लक्ष ६७ हजार, सामाजिक सेवा २१३ कोटी ८७ लक्ष ६८ हजार, सामान्य सेवा १९ कोटी १५ लक्ष, इतर जिल्हा योजना १६ कोटी आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी ३५ कोटी १४ लक्ष ४५ हजार रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत खालील १३ ग्रामीण आणि एक नागरी तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. श्री दत्त महाराज देवस्थान चैतन्य कानिफ़नाथ (शिप्रागिरी महाराज समाधी) देवस्थान ट्रस्ट, निळवंडे ता. संगमनेर, श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान, पुणेवाडी ता. पारनेर, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान, गळनिंब ता. श्रीरामपूर, श्री सद्गुरू धर्मराज देव मंदिर, तांदळी वडगांव ता. नगर, श्री चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान मांचीहिल, आश्वी बु. ता. संगमनेर, श्री महालक्ष्मी, मारुती मंदिर देवस्थान, टाकळी ता. अकोले, श्री विठ्ठल देवस्थान ट्रष्ट, मेहेंदुरी ता. अकोले, श्री महादेव मंदिर देवस्थान, डाऊच खुर्द ता. कोपरगाव, श्री महादेव मंदिर देवस्थान, सडे ता. कोपरगाव, श्री राजा विरभद्र देवस्थान, भोजडे ता. कोपरगाव या ग्रामीण भागातील, तर श्री विरभद्र देवस्थान, श्री नवनाथ महाराज मंदिर इ. देवस्थान राहाता शहर, ता. राहाता, श्री जगदंबा माता मंदिर अस्तगाव ता.राहता, श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर देवस्थान गळनिंब ता.श्रीरामपूर, श्री भैरवनाथ देवस्थान मिरजगाव कर्जत या शहरी तीर्थक्षेत्राचा यात समावेश आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी उपयोजना) सन २०२४-२५ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्याकरिता एकूण रू. ९३२ कोटी ९३ लक्ष नियतव्यय मंजूर असून एकूण रु. ६९३ कोटी १७ लक्ष किंमतीच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आलेली आहे.

सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२४-२५ आतापर्यंत शासनाकडून प्राप्त ३६४ कोटी ६३ लक्ष रुपये निधीपैकी २४४ कोटी २६ लक्ष निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला आहे. मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणारा निधी १०० टक्के खर्च करुन गुणत्तापूर्ण कामे करण्याचे सर्व विभाग प्रमुखांना निर्देश देण्यात आलेले आहेत.

चालु आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २९७ नविन शाळा खोली बांधकामास मंजुरी देण्यात आलेली असून १०० शाळा खोली बांधकामास मंजुरी देण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शेतीकरीता नविन विद्युत रोहित्रे बसविणे, सिंगल फेज रोहित्रे बसविणे, धोकादायक विद्युत वाहिनींचे स्थलांतरण करणे आदी कामासाठी ४० कोटी ४८ लक्ष रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ६०.८६ टक्के आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ७०.३८ टक्के निधी वितरित करण्यात आला आहे. मार्च अखेर १०० टक्के निधी खर्च करण्याचे नियेाजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी यावेळी दिली.

माजी मंत्री कै. मधुकरराव पिचड यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या विकासासाठी गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा-पालकमंत्री

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीतून गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिले. ते म्हणाले, राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमाअंतर्गत आपल्या विभागासाठी करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यातील विकासाचे नियोजन करताना लोकप्रतनिधींनींच्या सूचना लक्षात घ्याव्या.

वन विभागाने बिबट प्रवण क्षेत्रात घराभोवती कुंपण घालण्यासाठी आर्थिक मदत व्हावी यादृष्टीने जिल्ह्यासाठी विशेष योजना प्रस्तावित करावी. बिबट्यांना पकडण्यासाठी प्राधान्याने पिंजाऱ्याची संख्या वाढवावी, त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल. वनपर्यटनासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे.

जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळांना वर्गखोल्यांसाठी प्रथमच देण्यात आल्या आहेत. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा परिषद शाळांच्या चौथीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. शाळांमध्ये स्वच्छतागृह असावे याकडे विशेष लक्ष घ्यावे आणि त्यांची स्वच्छताही करण्यात यावी. कमी पटसंख्या असलेल्या शाळेजवळ असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल का याचा अभ्यास करावा, अशा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी निधी देण्यात येईल.

बचतगटांच्या विकासासाठी आणि त्यांच्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी, बाजारपेठ मिळवून देण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत विचार करण्यात येईल. विविध शासकीय योजनांची माहिती कार्यालयाबाहेर फलकावर प्रदर्शित करण्यात यावी. कार्यालय स्वच्छता, शून्य प्रलंबितता आणि ई कामकाजावर भर देण्यात यावा. कार्यालय परिसरातील अतिक्रमणे १०० दिवस कार्यक्रमात काढावी. सौर कृषी पंप स्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त ३०० अंगणवाड्यांचे बांधकाम, ३०० जलस्रोतातील गाळ काढणे, ३०० गावे अतिक्रमणमुक्त करणे, पुरातन बारवांची दुरुस्ती, कन्या विद्यालयात सीसीटिव्ही बसविणे आदी कामे करण्यात येणार आहे. नेवासे येथे संत ज्ञानेश्वर सृष्टीचा आराखडा तयार करण्यात आला आहे, लवकरच तो शासनास सादर करण्यात येईल. अकोले, भंडारदरा परिसरात साहसी पर्यटन आणि वन पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीत कालव्याची दुरुस्ती, वीज खंडित होण्याची समस्या, रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे, सोलर वीज पंप योजना, नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, अंमली पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली
***

केंद्रीय बजेटमधून पर्यटन योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. १ (जिमाका) : केंद्रीय अर्थसंकल्प आज लोकसभेत सादर झाला असून इन्कम टॅक्सची मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. सर्वसामान्य माणसांच्या हिताला प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्रीय निधीमधून राज्यातील पर्यटन क्षेत्राला गती देण्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आज ठोस भूमिका घेण्यात आली आहे. देशातील सुमारे 50 नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे, त्याचे मी मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र शासनाची निवास व न्याहारी, होम स्टे ही संकल्पना केंद्र शासनाने उचलून धरली असून मोठमोठे हिल स्टेशन्स, निसर्गरम्य पर्यटन स्थळे यासारख्या ठिकाणी निवास व न्याहारी, होम स्टे योजनेच्या माध्यमातून स्थानिक लोकांना लोकांच्या घरांमध्येच पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्या सारख्या योजनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होत आहे.
पर्यटन क्षेत्राला गती देण्याच्या दृष्टीने ज्या ज्या बाबींचा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये समावेश आहे त्या बाबींसाठी पुढील आठवड्यात पर्यटन विभागाची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या हिस्सेदारीतून कोणत्या योजना राबविण्यात येतील यावर या बैठकीत विचार करण्यात येईल. राज्याच्या पर्यटन क्षेत्र वाढीला केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करण्यात येईल.

बचतगटांच्या माध्यमातून साकारतोय महिलांचा शाश्वत विकास – पालकमंत्री संजय राठोड

समृद्धी सरस प्रदर्शन व विक्रीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; प्रदर्शनीत महिला बचतगटांद्वारे उत्पादित वस्तुंची विक्री दालने

यवतमाळ, दि.1 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदने महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला. उमेद तसेच विविध यंत्रणांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या हजारो बचतगटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचा शाश्वत विकास साकारल्या जात आहे. महिला उद्योजक म्हणून पुढे येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने उमेद अभियानांतर्गत समता मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शन व विक्रीचे पालकमंत्र्यांच्याहस्ते आज उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात उमेद अंतर्गत 2 लाख 56 हजारावर स्वयं सहायता समूह तयार झाले आहे. 2 लाख 62 हजारावर कुटुंब या समुहांशी जोडल्या गेलेले आहे. ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे. जितक्या जास्त महिला गटांशी जोडल्या जातील, तितके कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे. गेल्या काही वर्षात गटांनी अनेक नवीन प्रयोग केले. अनेक गटांचे उद्योजक होण्याचे स्वप्न उमेद अभियानामुळे साकार झाले, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, खनिज विकास योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रभाग संघ, ग्रामसंघांना आपण सक्षम करतो आहे. गटाच्या महिलांना वेगळे नाविण्यपुर्ण उपक्रम करण्याच्या कल्पना असतील तर सांगा त्यासाठी देखील निधी उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 24 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहे. ही देखील जिल्ह्यासाठी आनंदाची बाब असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री.पत्की यांनी महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणासाठी उमेद अभियान राबविले जात आहे. महिलांच्या हातात पैसा आला पाहिजे, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, हा अभियानाचा उद्देश असल्याचे सांगितले. प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी उमेदच्या जिल्ह्याच्या कामाची माहिती व प्रगती सादर केली.

प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी बचतगटांच्या स्टॅालची पाहणी केली. प्रदर्शनीत गटांचे 75 स्टॅाल लावण्यात आले असून त्यात गटाने उत्पादीत केलेल्या विविध वस्तु, कलाकुसर, खाद्य पदार्थ आदींचा समावेश आहे. प्रदर्शन दि.5 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहे. रोज सायंकाळी नामवंत कलावंतांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे. कार्यक्रमास उमेदचे जिल्हा व्यवस्थापक स्नेहा खडसे, सागर वानखडे, जितेंद्र मेश्राम, प्रीतम हस्ते यांच्यासह बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचनल मृणालिनी दहीकर यांनी केले तर आभार स्नेहा खडसे यांनी मानले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अग्निशमन वाहनाचे लोकार्पण

बारामती, दि. १: महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानाअंतर्गत नगरपरिषदेत नव्याने दाखल होणाऱ्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

या अत्याधुनिक अग्निशमन वाहनाच्या पाण्याच्या टाकीची क्षमता ५ हजार लिटर आहे. पाणी फेकण्याची क्षमता ८ मजल्यापर्यंत आणि ती सरळ रेषेत ४५ मीटरपर्यंत आहे. फोम टाकीची क्षमता ५०० लिटर आहे. २० किलोग्रॅमचे २ डीसीपी सिलेंडर, साडेबावीस किलोग्रॅमचे कार्बन डाय ऑक्साईड (सीओ-२) सिलेंडर आहे. ३६० डिग्री सीसीटीव्ही कॅमेरा, वायफाय, उच्चतम व्हिडीओ प्रणाली आहे. या अत्याधुनिक वाहनाचा वापर ए, बी, आणि सी प्रकारची आग विझविण्यासाठी होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी श्री. रोकडे यांनी दिली आहे.
0000

लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

मुंबई, दि. ०१ : आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा अशी भावना आज प्रत्येक घराघरात निर्माण झाली असेल, कारण 12 लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने सर्वसामान्याना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्पातून छप्पर फाड के मिळाल्याची भावना घरोघरी व्यक्त होत असावी असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.

केंद्रातल्या मोदी सरकारने आजपर्यंत देशात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कुणीही कधीही घेतला नाही असा न भूतो न भविष्यती असा निर्णय आयकाराच्या बाबतीत घेऊन देशातल्या करोडो मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे.  बारा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करणे आणि स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा 75 हजार रुपयांपर्यंत वाढवणे या क्रांतिकारी घोषणेसह नव्या करप्रणालीत मोठे बदल केल्यामुळे देशभरातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय दुर्बल घटकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

देशाचा आठवा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातला विकसित भारत साकार करण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे. आयकरातील मोठ्या सवलतीमुळे देशातल्या मध्यमवर्गीय, गरीब, दुर्बल यांना मोठे बळ देऊन देशाच्या विकासामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात.

महिला आणि शेतकरी यांच्याकडे विशेष लक्ष देताना, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानावर भर, रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पावलं या अर्थसंकल्पात टाकून सर्वसमावेशक विकासावर भर दिला आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात नव्या आयकर विधेयकाची घोषणा केली आहे. यामुळे कराच्या संपूर्ण रचनेत सुलभता आणून सर्वसामान्य करदात्यांना योग्य तो न्याय मिळेल अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. बारा लाख उत्पन्नपर्यंत कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय हा मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले

टीडीएसमधील घर भाड्याची मर्यादा वाढवणे, ज्येष्ठ नागरिकांना टीडीएस मर्यादा एक लाखांवर नेणं तसेच कर परतावा न भरलेल्यांसाठी चार वर्षांपर्यंत मर्यादा वाढविणे या गोष्टी करदात्यांना दिलासा देणाऱ्या आहेत असेही ते म्हणाले.

धनधान्य कृषी योजनेमुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईल, किसान क्रेडिट कार्डसाठीची लिमिट वाढविणे, कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. स्टार्टप्ससाठी क्रेडिट लिमिट वाढवणे आणि मध्यम तसेच सूक्ष्म उद्योगांना सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आणि विशेषतः मागास वर्गातील महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी नवी योजना यामुळे गोरगरीब महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील.

आयआयटीची संख्या वाढविणे, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी देशात तीन केंद्रे, युवकांच्या कौशल्य विकासावर भर, सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा, 50 लाख शाळांमध्ये अटल टीकरिंग लॅब्स, या गोष्टीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचेल. शहरी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठीची योजना देखील गरीब वर्गाला बळ देईल. देशात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे त्यामुळे शहरांच्या विकास कामांसाठी स्वतंत्र अर्बन चॅलेंज फंडची केलेली घोषणा क्रांतिकारी राहील असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, पुढील दहा वर्षात उडान योजनेत आणखी चार कोटी प्रवाशांना सामावून घेतल्यामुळे लहान लहान शहरात देखील हवाईसेवा कनेक्टिव्हिटी वाढेल.

हिल इन इंडिया या योजनेमुळे देशात मेडिकल टुरिझम वाढेल, विशेषतः महाराष्ट्रात देखील परदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढून त्याचा मोठा फायदा होईल. व्यवसाय सुलभता म्हणजेच इज ऑफ डूइंग बिजनेसमध्ये महत्त्वाच्या सुधारणा केल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. कस्टम ड्युटीतून कॅन्सरसारख्या 36 इतरही गंभीर रोगांवरील महत्त्वाची जीवरक्षक औषधे वगळल्यामुळे गरीब रुग्णांना किफायतशीर दरात औषधे उपलब्ध होणार आहेत. मेडिकलच्या दहा हजार जागा वाढविल्यामुळे वैद्यकीय शिक्षण आता अधिक विद्यार्थ्यांना घेणं शक्य होणार आहे.

000

कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १: राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन सुसज्ज करणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नातून आगामी काळात कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

पोलीस उपमुख्यालय बऱ्हाणपूर येथे पोलीस विभागाकरीता ४ स्कॉर्पिओ वाहनांचे लोकार्पण तसेच तालुक्यातील नागरिकांना त्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक पकंज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बऱ्हाणपूरचे सरपंच बाळासाहेबत चांदगुडे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, ग्रामीण भागात ड्रोन फिरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी व भीती लक्षात घेऊन जिल्हा ग्रामीण पोलीस दलालाकरीता ३८ लाख रुपयांच्या दोन ड्रोन प्रतिबंधक बंदूक (अँटी ड्रोनगन) खरेदीकरीता मंजूरी देण्यात आली आहे, जिल्ह्याचे कार्यक्षेत्र विचारत घेवून आणखीन दोन ड्रोन प्रतिबंधक बंदूक उपलब्ध करुन देण्यात येईल. बऱ्हाणपूर परिसरात उभारण्यात आलेल्या पोलीस उपमुख्यालयात प्रशासकीय इमारत, पोलीस अधीक्षक निवासस्थान, उपअधीक्षक निवासस्थान, सायबर पोलीस ठाणे, विश्रामगृह, प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय सभागृह, वसतिगृह, निवासस्थाने आदी इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहेत. आता अत्याधुनिक आणि आतंरराष्ट्रीय दर्जाची धावपट्टी, नेमबाजी मैदानाचे (शुटिंग रेंज) काम सूरु आहे.

विविध गुन्ह्याचा शोध लावण्याकरीता श्वानाची भूमिका महत्त्वपूर्ण असते, त्यामुळे गोजुबावी श्वान प्रशिक्षक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. बारामती तालुका पोलीस दलासाठी अजून २ स्कॉर्पिओ वाहने लवकरच उपलब्ध करुन देण्यात येतील. नागरिकांची सुरक्षा अबाधित ठेवण्याकरीता अनूचित प्रकाराला आळा घालण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाने नेहमीच प्रयत्नशील राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे

तालुक्यातील नागरिकांचा चोरी गेलेला एकूण १६ लाख ३३ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना हस्तांरित करण्याच्या कार्यक्रमामुळे पोलीस दलाप्रती नागरिकांच्या मनात विश्वास अधिक वृद्धींगत होणार आहे. परिसरात अनुचित प्रकार घडत असल्यास पोलीसांना कळवावे, नागरिकांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने शक्ती अभियानाअंतर्गत शक्ती पेटी विविध भागात ठेवण्यात आल्या आहेत. तक्रारदारांची नावे गोपनीय ठेवून पोलीस योग्य ती कारवाई करीत आहेत.  वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

विकासाच्या बाबतीत बारामती तालुका देशात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

तालुका व शहरात सर्व प्रकारची विकासकामे दर्जेदार पद्धतीने करुन बारामती एक आदर्श शहर म्हणून देशात उदयास आले पाहिजे, बारामती तालुका देशात विकासकामांच्या बाबतीत क्रमांक एकचा तालुका म्हणून करायचा आहे, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.  सुमारे ३०० कोटी रुपयांचे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम करण्यात येणार आहे. तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून याकरीता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

श्री. देशमुख म्हणाले, नागरिकांचा चोरी गेलेला विविध प्रकारच्या मुद्देमालाचा शोध घेवून तो नागरिकांच्या ताब्यात देण्यात येत आहे, याबाबत जिल्हा पोलीस दलाचा प्रमुख म्हणून आपल्याला सार्थ अभिमान आहे, असेही श्री. देशमुख म्हणाले.

श्री. बिरादार म्हणाले, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने बऱ्हाणपूर येथे  सर्व सुविधांयुक्त पोलीस उपमुख्यालय एक प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प म्हणून उभारण्यात आलेला आहे. या उपमुख्यालयाची ख्याती राज्यभर आहे. पोलीस दलाला आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. बारामती उपविभागांतर्गत १०० दिवस कार्यक्रमात नागरिकांना मुद्देमाल परत करणे, इमारतीची साफसफाई आदी कामे करण्यात येत आहे, असे श्री. बिरादार आहे.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते बारामती वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृतीपर माहितीपत्रिकेचे लोकार्पण करण्यात आले.

0000

श्रीमंत बाबुजी नाईक यांचा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याच्यादृष्टीने परिसर विकसित करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती, दि. १: श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसराचा विकास प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत आणि वाड्याचे मूळ रूप जतन करत करावा; या माध्यमातून त्यांचा इतिहास तसेच भीमथडी ते बारामती असा बदलता प्रवास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती परिसरातील श्रीमंत बाबुजी नाईक वाडा सुशोभीकरण, दशक्रिया घाट परिसर, गोजुबावी श्वान प्रशिक्षक केंद्र इमारत बांधकाम आदी विविध विकास कामांच्या पाहणी प्रसंगी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

श्रीमंत बाबुजी नाईक वाडा येथील विकासकामे करताना परिसरात भीमथडी ते बारामती असा बदलता प्रवास दाखविणारी छायाचित्रे लावावीत. परिसरात अधिकाधिक सावली देणाऱ्या विविध प्रजातीचे वृक्षारोपण करावे. नागरिकांना बसण्यासाठी वृक्षाला गोल दगडी ओटा करा.

कऱ्हा नदीच्या संरक्षक भिंतीची कामे गतीने करा. परिसरातील चेंबरवर स्थानिक पक्षाची छायाचित्रे लावून त्याची मराठी आणि इंग्रजी भाषेत माहिती नमूद करावी. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. परिसरात स्वच्छता राहील यादृष्टीने   महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवावी. परिसर देखभाल दुरुस्तीसाठी नगर परिषदेने उत्पन्नाचे स्रोत निर्मितीबाबत विचार करावा. दशक्रिया विधी घाट परिसरात स्वच्छता ठेवावी, असेही श्री. पवार म्हणाले.

गोजुबावी श्वान प्रशिक्षक केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करताना पालखी महामार्गापासून साडेपाच फूट उंची ठेवावी. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील तसेच अकारण प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.

0000

केंद्रीय अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यावधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्पाचे स्वागत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि.1  :- “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना 80 हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. 18 लाख उत्पन्नधारकांना 70 हजारांचा फायदा होणार आहे. 25 लाख उत्पन्न असलेल्यांचा कर 1 लाख 25 हजारांनी कमी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजारांहून 1 लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील 36 जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन देखील स्वस्त होणार असल्याने देशातील प्रत्येक घराला, व्यक्तीला या निर्णयाचा लाभ होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार,” असे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला हे मिळाले

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी  596 कोटी 57 लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 52 लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार मानले आहेत.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, देशातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, युवक, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सादर केलेल्या अर्थसंकल्पातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी, प्रत्येक समाजघटकाला बळ मिळणार आहे. देशाला आर्थिक महासत्ता आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ मिळणार आहे. अर्थसंकल्पात विविध वस्तू-सेवांवरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या वस्तू-सेवा स्वस्त होतील. देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पदनांवरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यानी व्यक्त केला.

अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरिकरण, खाणकाम, अर्थ, कर आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकरी, महिला, युवक, गरीब वर्गासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. महिलांच्या कौशल्याविकास प्राथम्याचा विषय आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेंतर्गत शेती उत्पादकता वाढ, शेतमाल साठवणूक सुविधा, सिंचन आणि क्रेडीट सुविधांवर भर देण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होईल. कापूस आणि डाळींचे उत्पादनवाढीसंदर्भात घेतलेले निर्णयही महाराष्ट्राच्या फायद्याचे आहे. किसान क्रेडीट कार्डची मर्यादा 5 लाख करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. देशाला जगाचे फूड बास्केट बनविण्यात महाराष्ट्राची भूमिका प्रमुख असेल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये 5 लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देणे, आयआयटीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल. ऑनलाईन गिग वर्कर्ससाठी ओळखपत्र तयार करून त्यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा निर्णय महत्वाचा असून सुमारे 1 कोटी गिगवर्कर्सना पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. हे सर्व निर्णय विद्यार्थी, युवक, समाजातील सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आले आहेत.

न्यूक्लिअर एनर्जी मिशनच्या माध्यमातून 2047 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य देशाला महासत्तेकडे नेणारं महत्वाचं पाऊल आहे. शहरांमध्ये सुधारणा राबवण्यासाठी सरकार 1 लाख कोटींचा अर्बन चॅलेंज फंड निर्माण करण्याचा निर्णयही तितकचा महत्वाचा आहे.  देशात 120 ठिकाणी उडान योजना राबवण्याचा त्यातून हवाई प्रवासी संख्या 4 कोटींवर नेण्याचा संकल्प आहे.  हेलीपॅड आणि डोंगराळ भागात नवीन विमानतळं उभारण्यात येणार आहेत. ग्रीनफिल्ड एअरपोर्ट उभारण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. देशातील 52 प्रमुख पर्यटनस्थळांचा विकासाचंही धोरण आहे. ही विकसित राष्ट्रासाठीची, महासत्तेच्या वाटेवरील आधुनिक भारताच्या निर्मितीसाठीची मजबूत पायाभरणी असल्याचे सांगत, देशाला विकसित भारत, आर्थिक महासत्ता बनविण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र संपूर्ण सहकार्य करेल, प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नमूर्तीसाठी महाराष्ट्र संपूर्ण योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना व्यक्त केला.

000

ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा, नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन

मुंबई, दि. ०१ : देशातील मध्यमवर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आणि १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला दिला. ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने नेणारा, सर्वसमावेशक आणि विकसित भारताचा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला अधिक प्रगल्भ करणारा ठरेल. अर्थव्यवस्थेला आणखी सदृढ करणारा, मध्यमवर्गीय, पगारदार, युवा आणि शेतकरी, कष्टकरी या सगळ्यांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या अनेक महत्वाकांक्षी धोरणांना बळ मिळेल. विशेषत: महाराष्ट्र हे स्टार्टअपचे कॅपिटल असल्याने नवीन धोरणांचा मोठा लाभ मिळेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

प्राप्तीकराची मर्यादा वाढविल्याने तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल आणि त्यामुळे मागणी वाढेल. करपात्र उत्पन्नाची मर्यादा ७ वरून १२ लाख करणे हा निर्णय ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच ही मर्यादा अडीच लाखांवरून सात लाख करण्यात आली होती. ती आता १२ लाख करण्यात आली. हा प्रवास निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परिणामकारक आहे. यातून मध्यमवर्गीय, पगारदार, युवक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एका मोठ्या वर्गाच्या हाती उत्पन्नाचा मोठा वाटा राहणार आहे. ज्यामुळे बाजारपेठांत चैतन्य निर्माण होईल. खरेदी वाढेल, मागणी वाढेल, उत्पादन वाढेल, रोजगार वाढतील विशेषत: एमएसएमई क्षेत्राला चालना मिळेल. यातून अर्थव्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होईल. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठींही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. देशातील 100 जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना, तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन, यात शंभर टक्के माल खरेदीचे धोरण यामुळे शेतकर्‍यांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. मच्छिमारांना आता 5 लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळणार आहे. यातून त्यांना व्यवसायवाढीसाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल, अशा निर्णंयामुळे शेती आणि शेतकर्‍यांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

युवा उद्योजकांसाठी एमएसएमई क्षेत्र महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविण्याच्या निर्णय महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र ही स्टार्टअपची राजधानी आहे.  स्टार्टअपसाठी 20 कोटी रूपयांची कर्ज मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे स्टार्टअपची इकोसिस्टिम मजबूत होणार आहे. वेगवेगळे स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या रोजगार संधी यामुळे आपल्या राज्याची या क्षेत्रातील वाटचाल आणखी दमदार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

पायाभूत प्रकल्पांच्या विकासाकरिता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर धोरण तयार करण्यात येत आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी राज्यांना 50 वर्षे बिनव्याजी कर्ज योजनेचाही राज्याला सर्वाधिक फायदा झाला आहे आणि या अर्थसंकल्पातही त्या बाबतीत राज्य पुढे असेल. पीपीपी प्रकल्पांमुळे खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकीत प्रोत्साहन वाढेल, यातून मोठी रोजगार निर्मिती होईल. एकंदर हा अर्थसंकल्प देशाला पुढे घेऊन जाणारा, देश प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचे दर्शविणारा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय?

या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय, असा प्रश्न माध्यमांनी विचारला, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, काही प्राथमिक माहिती माझ्याकडे आली, त्यानुसार, महाराष्ट्र रुरल कनेक्टिव्हीटी इम्प्रुव्हमेंट प्रकल्पासाठी 683 कोटी, महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्पासाठी 100 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टरसाठी 1094 कोटी, उपसा सिंचन योजनांसाठी 186 कोटी अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थात आणखी तपशीलवार माहिती यथावकाश दिली जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

पारदर्शी, गतिमान प्रशासनाचा संकल्प करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत विकासाचे ध्येय, जिल्ह्याचा संकल्प आणि पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. यासाठी सर्वांनी गतिमान, पारदर्शी प्रशासनाचा संकल्प करावा. असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.  या़त जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत विविध विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली, तसेच नाविण्यपूर्ण प्रकल्पांवरही चर्चा झाली. तसेच जिल्हा नियोजनचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी सात दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

खासदार बळवंत वानखडे, आमदार किरण सरनाईक, सुलभा खोडके, रवी राणा, प्रवीण तायडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, राजेश वानखडे, केवलराम काळे, गजानन लवटे, प्रवीण पोटे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत प्रास्ताविकेत जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची माहिती दिली.

बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतर्गत सन 2024-25 मधील जानेवारीअखेर झालेल्या 330.72 कोटी रुपयांच्या खर्चाला बैठकीत मान्यता देण्यात आली. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 56.55 कोटी रुपये, तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 40.99 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विविध विकासकामांना चालना देण्यासाठी भरीव तरतुद करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी 21.45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून 83 कामे पूर्ण होणार असून 40.31 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होतील. इतर जिल्हा मार्गांसाठी 14.14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्यामुळे 28 किलोमीटर रस्त्यांची सुधारणा होईल. जिल्ह्यातील 14 नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी 11.83 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्युत विकासासाठी 30 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ऊर्जा उपलब्धता सुनिश्चित होईल. प्राथमिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यावेळी पुढील वर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अर्थसंकल्पावरही बैठकीत चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 417.78 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 102 कोटी रुपये, तर आदिवासी उपयोजना घटक कार्यक्रमासाठी 117.38 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाची पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.

महानगरपालिका स्थानिक स्वराज्य केंद्र व राज्य शासनाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वपूर्ण आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात सर्वत्र लवकरच सीसीटीव्ही लावण्यात येतील. चिखलदरा स्कायवॉकच्या काम गतीने पूर्ण करण्यात येईल. मंजूर कामांवरील निधी 31 मार्च 2025 च्या आत खर्च करावा. जिल्हा शल्य चिकित्सा तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अचलपूर येथील आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी अहवाल सादर करावा. मेळघाटातील दुर्गम 22 गावांमध्ये वीज प्रश्न असल्याने याठिकाणी वीज पुरवठा सुरूळीत सुरू रहावा, यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

महापालिकेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी मनपा आयुक्त यांनी इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करुन कार्यवाही करावी. तसेच महानगरपालिकेच्या शाळा अत्याधुनिक करण्यावर भर द्यावा. मनपा शाळा डिजिटल तसेच आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त व्हाव्यात यासाठी 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात अला. शाळा, तसेच आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष द्यावे, असे पालकमंत्री म्हणाले.

आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत जिल्ह्यातील नदी, उपनद्या, नाले खोलीकरण करून पाणी जिरवण्यावर भर द्यावा. उपसा करताना निघालेली वाळू शासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरावी. गाव तेथे स्मशानभूमी ही योजना प्रत्येक गावात असणे आवश्यक आहे. तसेच मोर्शी मतदारसंघातील वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी अंबादेवी आणि एकवीरा देवीचे आज सकाळी दर्शन घेतले. यावेळी मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. वैद्य यांनी श्री. बावनकुळे यांचा हनुमानाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. श्री बावनकुळे यांनी क्रीडापटूंची माहिती घेऊन कौतुक केले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक एकनाथ हिरुळकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी श्री. बावनकुळे यांनी महात्मा गांधी आणि स्व. एकनाथ हिरुळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कंवर नगर येथील महानुभव आश्रमाला भेट दिली. आश्रमाच्या वतीने त्यांचा  यावेळी सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी आज सकाळी भेट दिली. समाधीस्थळी त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच समाधीस्थळाचा विकास ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनीसांगितले. यावेळी आश्रमाच्यावतीने श्री. बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...