शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 295

‘जीबीएस’साठी आरोग्य यंत्रणा सज्ज – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ०२ (जिमाका) : गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या रूग्णांवर यापूर्वीही उपचार करण्यात आले आहेत. या आजाराचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गुइलेन-बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ आजाराचा जिल्ह्यातील आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज  आरोग्य विभागाकडून घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ आदि उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले की, या आजाराबाबत नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. सांगली जिल्ह्यात जीबीएसचे आतापर्यंत 9 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 3 व शहरी भागातील 3 रुग्ण असून जिल्ह्याबाहेरील 2 व राज्याबाहेरील 1 रुग्ण आहे. त्यापैकी 4 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकी सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गत तीन वर्षात या आजाराचे निदान झालेल्या पैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या असून त्याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

दररोजच्या रुग्णांची संख्या आणि बरे होणाऱ्या रुग्णांची आकडेवारी दररोज न चुकता सायंकाळी अद्ययावत करावी. त्यासाठी रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयांशी संपर्क साधण्यासाठी आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेने संपर्क अधिकारी नेमावेत, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्यात आवश्यक विकासात्मक कामे करण्यासाठी शासन व सीएसआरमधून आवश्यक निधी उपलब्ध करून घेऊ. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पूर्ण केलेल्या कामांची प्रातिनिधीक पाहणी करणार, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनु. जाती उपयोजना) संबंधी जिल्हा परिषदस्तर व राज्यस्तर कार्यान्वयन यंत्रणांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यन्वयीन यंत्रणांचा तपशीलवार आढावा घेताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, सन 2023-24 ची संपूर्ण विकास कामे मार्च 2025 पूर्वी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. त्याचवेळी चालू सन 2024-25 या वर्षातील राज्य व स्थानिक स्तरीय यंत्रणांनी उर्वरित सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात पूर्ण करतानाच राज्य यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी, अनुसूचित जाती उपयोजना 2024-25 च्या प्रशासकीय मान्यता अत्यल्प असून सर्व प्रशासकीय मान्यता 15 दिवसात होतील यासाठी गांभीर्याने कार्यवाही करावी, असे त्यांनी निर्देशित केले.

लोकप्रतिनिधींच्या सूचना व स्थानिक गरज विचारात घेऊन जिल्ह्यातील विकासाचे नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय व आर्थिक शिस्त पाळावी. कामे विहित मुदतीत पूर्ण होतील व कोणताही निधी समर्पित करावा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विकासात्मक कामे करताना चांगले प्रयोग करा. मूलभूत कामे करताना निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक महिन्याला ‍विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालक सचिव विनिता वेद सिंगल म्हणाल्या की, बदलापूरसारख्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक शाळेत मुलामुलींचे प्रबोधन करावे. यासाठी स्वतंत्र तक्रार पेटी ठेवावी, महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनीच ती उघडावी. तसेच, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांचे करियर कौन्सिंलिंग करावे, करार तत्त्वाने सेवा घेतलेल्या नॉन टिचिंग स्टाफची चारित्र पडताळणी करून घ्यावी.

हार, पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन

जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरे, बैठका, कार्यक्रमावेळी हार, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो. पण आपण हार, पुष्पगुच्छ स्वीकारणार नसल्याने ते कोणीही सत्कारासाठी आणू नयेत. तसेच कार्यक्रमस्थळी फटाके फोडून प्रदूषण करू नये, असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले.

०००

पाणी फवारणी व धूलीकण कमी करणाऱ्या वाहनाचे लोकार्पण

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन वाहनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार पडलेल्या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहु महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, राहूल आवाडे, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे  आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीमधून वाहन खरेदी करण्यात आले असून यासाठी 1 कोटी 32 लाख  इतका खर्च आला आहे. वॉटर मिस्ट सिस्टम वापरुन वातावरणातील धूलीकण सेप्रेशन करणे, रस्ते स्वच्छ करण्यासाठी पाणी मारणे, रोड डिव्हायडर क्लिनिंग करणे, रोडवर पाणी स्प्रिकिंग करणे, रोड डिव्हायडर क्लिनिंग करणे, ग्रीन बेल्ट शॉवर सिस्टिम, डिव्हायडर मधील झाडांना पाणी मारणे यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे हाय ट्री वॉटर सिस्टिम आणि तातडीच्या कालावधीमध्ये फायर फायटरसाठी वाहनाचा वापर केला जाणार आहे.

०००

सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यानंतर कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पण केले. यावेळी आमदार शिवाजी पाटील, कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, समाज कल्याण सहायक आयुक्त सचिन साळे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

 

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ०२ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची कमतरता पडू देणार नाही. कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन विकास, वीजपुरवठा अशा सर्वच क्षेत्रांसाठी वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी व सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीत सन 2025-26 साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तसेच आदिवासी घटक कार्यक्रम मिळून 226 कोटी 50 लाख रुपयांच्या अतिरिक्त मागणीसह एकूण 744 कोटी 75 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. हा आराखडा मान्यतेसाठी दि. 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री अरुण लाड, इद्रिस नायकवडी, सदाभाऊ खोत, सुधीर गाडगीळ, विश्वजीत कदम, गोपीचंद पडळकर, सत्यजीत देशमुख, सुहास बाबर, रोहित पाटील, जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यासाठी अतिरीक्त मागणीसह सन 2025-26 च्या 744 कोटी 75 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी 648 कोटी 97 लाख, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 94 कोटी 50 लाख व आदिवासी घटक कार्यक्रमसाठी 1 कोटी 28 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, सन 2024-25 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करिता रू. 486 कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम करिता रू. 86 कोटी व आदिवासी घटक कार्यक्रम करिता रू. 1.012 कोटी असे एकूण रू. 573.012 कोटी नियतव्यय मंजूर होता. माहे जानेवारी 2025 अखेर शासनाकडून एकूण रू. 240.58 कोटी इतका निधी प्राप्त झाला असून जानेवारी 2025 अखेर रू. 190.84 कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, सर्वच विभागांनी काटेकोर नियोजन करून जिल्हा नियोजन समितीमधून प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च होईल, यासाठी दक्ष राहावे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीतून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करावीत. जिल्ह्यातील विकासकामे गतीने पूर्ण करुन सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, असे त्यांनी सूचित केले.

आरोग्य विभागांतर्गत कामांना मान्यता

शिराळा व कासेगाव येथे नवीन ट्रामा केअर सेंटर बांधणे, कासेगाव व कुरळप येथील 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करणे, तसेच मौजे सुखवाडी (ता. पलूस), मौजे हिवरे (ता. जत) व मौजे पाडळी (ता. तासगांव) येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करणे या कामांना शासन मंजूरी मिळण्याकामी शासनस्तरावर प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 अंतर्गत ठळक कामे

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024-25 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजसाठी एमआरआय मशीन व सीटी स्कॅन मशीन कामांचे लोकार्पण करण्यात आले आहे. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतून जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत एकूण 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता छतावरील पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प आस्थापित करण्याकरिता रु.4.13 कोटीच्या कामास व पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे छतावरील पारेषण संलग्न सौर विद्युत प्रकल्प आस्थापित करण्याकरिता रु. 1.85 कोटीच्या कामास मान्यता देण्यात आल्याचे यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

अमली पदार्थ प्रतिबंधासाठी टास्क फोर्स

अमली पदार्थ विक्री, वाहतूक, साठवणूक आदिंना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख यांचा टास्क फोर्स करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. दर आठवड्याला या टास्क फोर्सने केलेल्या कामकामाचा आढावा घेतला जाईल. तरूण पिढी वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करून मंत्री श्री. पाटील यांनी याची पाळेमुळे खणून संबंधीतांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतही आदेश दिले. शाळा-महाविद्यालयांची व विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी, तालमींची तपासणी वेळोवेळी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्याला अमली पदार्थाच्या विळख्याबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची गरज उपस्थित लोकप्रतिनिधींनी एकमुखाने व्यक्त केली. त्यावर पालकमंत्री श्री. पाटील यांनी आपण स्वतःच्या वेतनातून वैयक्तिकरीत्या खबऱ्यास रक्कम रूपये 10 हजाराचे बक्षीस जाहीर केले असल्याचे सांगून अमली पदार्थांची माहिती दिल्यास संबंधितांच्या नावाबाबत गुप्तता राखली जाईल, असे सांगितले. तसेच, याबाबत पथनाट्य, लघुचित्रफीत, पालकसभा, दप्तरतपासणी आदिंच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन केले.

एलसीबी पथकास बक्षीस

एमआयडीसी विटा येथे अमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईबद्दल प्रजासत्ताक दिनी जाहीर केल्यानुसार पालकमंत्री श्री. पाटील यांनी स्वतःच्या वेतनातून वैयक्तिकरीत्या प्रत्येकी रक्कम रूपये 10 हजाराचे बक्षीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.

जिल्हा नियोजन समितीतून केलेल्या कामांचा दर महिन्याला बैठक आयोजित करून आढावा घेऊन, असे स्पष्ट करून पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी वन विभागाने संबंधित विभागांच्या समन्वयाने प्रस्ताव तयार करावा. तसेच, वन विभागाच्या परवानगीसाठी प्रलंबित विकासकामांसाठी स्वतंत्र बैठक घेऊ, असे सूचित केले.

नगरविकासामध्ये सांडपाणी व्यवस्थापन, ई – कचरा, जैविक कचरा, वीज विकास, पर्यटन तसेच, महावितरण व वनविभागांतर्गत विकासकामांसाठी वाढीव निधीची गरज असून, राज्यस्तरीय बैठकीत यासाठी सर्व लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न व्हावेत, असे आवाहन पालक सचिव विनिता वेद सिंगल यांनी केले.

जिल्हा नियोजन समितीतून आरोग्य विभागास देण्यात आलेल्या निधीतून सुरू करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांसाठी पालकमंत्री श्री. पाटील यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या. यामध्ये आलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, सांगली मिरजमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), शिक्षण, स्वच्छतागृहे, अखंडित वीजपुरवठा, वन्य जीव हल्ल्यापासून बचाव आदींसह अन्य महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

०००

महाराष्ट्रातील महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हदगाव (नांदेड) दि. २ : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

नांदेड जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव येथील श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराच्या नवपर्व व कलशारोहण सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते उपस्थित होते. मराठवाडा, विदर्भ व महाराष्ट्रातील ठीक ठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोच्या संख्येने महानुभवपंथीय या सोहळ्याला उपस्थित होते.

वैराग्यमूर्ती मठाधिपती महंत श्री योगी बापू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर माहूर पिठाधीश कवीश्वराचार्य माहुरकर बाबा यांच्यासह परिसरातील मठाधिपती धर्मपीठावर विराजमान होते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या या मठाधिपतींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महानुभाव पंथीयांसाठी केलेल्या कार्यकर्तृत्वाला लक्षात घेऊन स्तुती सुमनांनी साकारलेले सन्मानपत्र बहाल केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम चक्रधर स्वामींना दंडवत घातला. त्यानंतर धर्मपीठावरून बोलताना सर्वज्ञ चक्रधर स्वामी व त्यांच्या अनुयायांनी अतिशय विपरित परिस्थितीत धर्म रक्षणाचे कार्य केल्याचे स्मरण केले. महानुभव पंथीयांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांनी गौरव केला. परकीय आक्रमणामुळे कृष्णदेवाची पूजा करून घेणे, हिंदू म्हणवून घेणे कठीण होते. त्या काळात चक्रधर स्वामीनी जातीपाती, पंथाचा विचार न करता महानुभव दाखवला, समरसता व समतायुक्त समाज त्याकाळी देशात निर्माण केला.

महाराष्ट्र शासनाने राज्यभरात आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी महानुभाव पंथीयांचे मंदिर आहेत त्या मंदिरांचा विकास करण्याचे काम केल्याचे सांगितले. रिद्धपुरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंदप्रभू देवस्थान अशा अनेक ठिकाणी संवर्धनाचे काम सुरु आहे, यापुढेही हे कार्य सुरू राहील,असे आश्वस्त केले.

तसेच या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून येथील विकास कामे केली जातील. चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीने पाठिशी उभे राहील, असे सांगितले.

यावेळी त्यांनी महानुभावपंथीयांच्या ग्रंथ प्रेमाची, धर्म साहित्य निर्मितीच्या चिकाटीचे  कौतुक केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, राजमान्यता मिळाली. यामध्ये महानुभाव साहित्याचा मोठा वाटा आहे. आपण जे पुरावे दिले आणि जे स्वीकारले गेले. यातील एक महत्वाचा पुरावा लीळाचरित्र होते.

मराठी भाषा किती प्राचीन याचा पुरावा यानिमित्ताने देता आला. लीळाचरित्र ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला, त्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. या विद्यापीठाचा विकास पुढील टप्यात करण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या माध्यमातून मराठी भाषा विद्यापीठाचा उपयोग करून आपले साहित्य, विचार,अध्यात्म जगभरामध्ये पोहोचवण्याचे काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देशाच्या कानाकोपऱ्यात नाही तर अफगाणिस्तानपर्यंत महानुभव पंथ पोहोचला आहे. आज इतका मोठा संप्रदाय आपल्याला समतेच्या अधिष्ठानावर काम करताना दिसतो. आज या धर्मपीठावर या स्थानावर इतकी मोठी महंत मंडळी येऊन गेली. ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे, असे त्यांनी धर्मपीठावरील सर्व मान्यवरांना अभिवादन करताना स्पष्ट केले.

तत्पूर्वी, त्यांनी आगमन झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यात आलेल्या उखळाई माय मंदिरात जाऊन मायचे विडाअवसर (दर्शन घेतले) केले. आजच या ठिकाणी संत महात्म्यांच्या उपस्थितीत कलशारोहण झाले. हे मंदिर पाचशे वर्षापूर्वीचे असल्याची मान्यता आहे. यावेळी त्यांनी श्रीकृष्ण मूर्तीचे भक्तार्पण केले.

कार्यक्रमाचे आयोजक वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचा त्यांनी सत्कार केला. भक्तांना प्रातिनिधिक सेवा पुरस्कार बहाल केला.

या कार्यक्रमाला हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, बाळासाहेब ठाकरे हरीद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार भीमराव केराम, आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर,आमदार बालाजी कल्याणकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार सुरेखा नांदे, आदीसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या महानुभव पंथाचे पिठाधीश व अन्य मान्यवर उपस्थित होते.

०००

राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध

मुंबई, दि. ०२: प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल (असर) प्रकाशित केलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. संस्थेने २०.४ टक्के विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, एकूण १,०८,१४४ शाळांचा विचार करता संगणकाचा वापर करण्याचे प्रमाण ७२.९५ टक्के इतके आहे. सदर संस्थेने ४८.३ टक्के शाळांमध्ये संगणक नसल्याचे नमूद केले आहे. वास्तविकतः एकूण शाळांपैकी ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध आहे. मुलींकरिता साधारणतः ९६.८ टक्के इतक्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उपलब्धता असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

प्रथम या संस्थेने ४०९ प्राथमिक व ४६३ उच्च प्राथमिक व त्यावरील अशा ग्रामीण भागातील एकूण ८७२ शाळांचे सर्वेक्षण केले आहे. युडायस (UDISE) डाटा सन २०२३-२४ अनुसार राज्यामध्ये एकूण १,०८,१४४ शाळा आहेत. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने एकूण शाळांच्या केवळ ०.८१ टक्के इतक्या शाळांचेच सर्वेक्षण केलेले आहे. तसेच राज्यातील एकूण २,०९,६१,८०० शालेय विद्यार्थ्यांपैकी केवळ ३३,७४६ मुलांचे सर्वेक्षण संस्थेने केले आहे जे की एकूण विद्यार्थ्यांच्या केवळ ०.१६ टक्के इतके आहे. या आधारांवर अहवाल प्रकाशित केलेला आहे.

या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये बरेच सकारात्मक मुद्दे देखील आहेत.

यातील काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :

वय वर्ष ६ ते १४ मधील ६०.९ टक्के बालके ही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत तर ३८.५ टक्के बालके ही खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली व दुसरी मधील वाचन व गणितीय क्रिया यामध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक व अध्ययन स्तर हा वाढल्याचे दिसून येते. इयत्ता तिसरी मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कोरोना मध्ये झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे असे दिसून येते. शासकीय शाळांमध्ये सन २०२२ च्या तुलनेमध्ये सन २०२४ मध्ये वाचनामध्ये १०.९ टक्के प्रगती दिसून येते. तर खाजगी शाळांमध्ये वाचनामध्ये ८.१ टक्के प्रगती दिसून येते. गणितीय क्रियांमध्ये शासकीय शाळांमध्ये १३.१ टक्के प्रगती दिसून येते व खाजगी शाळांमध्ये ११.५ टक्के प्रगती दिसून येते.

इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा १० टक्क्यांनी जास्त आहे. इयत्ता तिसरी मध्ये गणितीय क्रियांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र हा देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे. २०२२ च्या तुलनेमध्ये २०२४ मध्ये यात १३ टक्क्यांची वाढ दिसून येते. इयत्ता पाचवीच्या मुलांमध्ये सन २०२२ च्या तुलनेमध्ये सन २०२४ मध्ये वाचनामध्ये २.२ टक्के अधिकची प्रगती झाल्याचे दिसून येते.

वय वर्ष १५ ते १६ याच्यामध्ये ९८ टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. वय वर्ष १४ ते १६ मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धता मध्ये राज्यातील ९४.२ टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील ८४.१ टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यामधील १९.२ टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्मार्टफोन असल्याचे नमूद केले आहे. यातील ६३.३ टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात, तर विविध सामाजिक माध्यमांसाठी ७२.७ टक्के विद्यार्थी स्मार्टफोनचा वापर करतात.

सन २०२४ मध्ये तीन वर्षाच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असणाऱ्या मुलांचे प्रमाण ९५ टक्के आहे, २०२२ मध्ये हे प्रमाण ९३.९ टक्के होते. महाराष्ट्रात ६ ते १४ वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या ८ वर्षांपासून ९९ टक्के पेक्षा जास्त आहे. महामारीच्या काळात शाळा बंद असूनही, २०१८ मधील ९९.२ टक्के वरून एकूण पटनोंदणीचे आकडे २०२२ मध्ये ९९.६ टक्के पर्यंत वाढले आहेत आणि २०२४ मध्ये सुध्दा स्थिर असल्याचे दिसून आले. म्हणजेच या वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण ०.४ टक्के आहे, जे की देशभरात १.९ टक्के आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

०००

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिन उत्साहात

मुंबई, दि. ०२:  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तटरक्षक दलाचा ४९ वा स्थापना दिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी तटरक्षक दलाच्या विस्तार योजनेचे कौतुक करताना १५१ हून अधिक जहाजे, ७८  विमान आणि ४६ प्रगत रडार स्थानकांसह, भारतीय तटरक्षक दल जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांनी भारतीय तटरक्षक दलाचे देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (EEZ) विस्तीर्ण भागावर चोवीस तास निगराणी ठेवण्यासाठी कौतुक केले. गुजरात आणि केरळमधील विनाशकारी पुरस्थितीनंतर मदत व बचावकार्याच्या वेळी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज्यपालांनी तटरक्षक दलाचे अभिनंदन केले. राज्यपालांनी किनारपट्टी स्वच्छता मोहिमा आणि वृक्षारोपण यांसारख्या पर्यावरणीय उपक्रमांसाठी तटरक्षक दलाचे विशेष कौतुक केले.

यावेळी नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय जे सिंह, भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम सागरी प्रदेशाचे महासंचालक ए. के. हरबोला, तटरक्षक दलाच्या पश्चिम तट विभागाचे कमांडर महानिरीक्षक भिषम शर्मा  तसेच भारतीय तटरक्षक दलाचे वरिष्ठ अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना राज्यपालांनी तटरक्षक दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व तटरक्षक दलाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी पंडित राहुल शर्मा यांनी संतूरवादन सादर केले. पंडित आदित्य कल्याणपूर यांनी त्यांना तबला साथ दिली.

०००

निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम आवश्यक -पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. ०२ (जिमाका) : तरुणांचा देश असलेल्या भारतातील युवा-युवती सुदृढ राहिल्या तर देश बलवान होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया, फिट इंडियाचा नारा दिला. याला अनुसरुन प्रत्येक तरुणाने आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. धुळे पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन, महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा 2025 सिझन-3 चा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

धुळे जिल्हा पोलीस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉन स्पर्धा-2025 च्या सिझन -3 ‘फिट धुळे, हिट धुळे’ तसेच ‘ग्रीन धुळे, क्लीन धुळे’ या घोषवाक्यासह ही स्पर्धा शहरात तिसऱ्यांदा पार पडली. शहरातील पोलीस कवायत मैदान येथून स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडू, कलाकारांसह 31 हजाराहून अधिक स्पर्धंकांनी सहभाग घेतला. सकाळी धुळे मॅरेथॉनचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून झाले. याप्रसंगी यावेळी मंत्री श्री. रावल, पद्मश्री चैत्राम पवार, आमदार अनुप अग्रवाल,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम, अभिनेता अजय पुरकर, विनोदी हास्य कलाकार चेतना भट, श्याम राजपूत, युवा प्रेरणास्त्रोत व फिटनेस तज्ञ वैभव शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, नागरिकांसह खेळाडू उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल पुढे म्हणाले, रोजच्या जीवनात व्यायामाला महत्त्व असून नियमित व्यायामाने शरीर सुदृढ तर होतेच शिवाय आरोग्य देखील सुदृढ राहते. आपल्याला नवीन पिढी घडवायची असून यासाठी तरुणांनी फिट इंडियाचा नारा दिला पाहिजे असे आवाहन केले. धुळे मॅरेथॉनला नागरीकांचा प्रतिसाद पाहता ही स्पर्धा लवकरच देशपातळीवर पोहोचेल. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करतांना यापुढील स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक ती मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छता व पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. यावेळी विश्वविजेती बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोम यांनीही उपस्थितांना आपण फिट राहिलात तर आपला धुळे जिल्हा, महाराष्ट्र राज्य व देश फिट राहील असा संदेश देत तरुणांनी खेळाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

पद्मश्री चैत्राम पवार यांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार

यावेळी केंद्र सरकारने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक चैत्राम पवार यांच्या जल, जंगल, जमीन व सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते मॅरेथॉनचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

ही स्पर्धा 21, 10, 5, 3 किलोमीटर अशा हाफ मॅरेथॉन, टायमिंग रन, ड्रीम रन, फॅमिली रन विभागात पार पडली. मॅरेथॉन बारापत्थर मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून जुना आग्रा रोड वरुन मोठ्यापुलामार्गे दत्त मंदिर चौक, जिल्हा क्रीडा संकुल, गोंदुर रोड, स्टेडीयम येथून त्याच मार्गाने पुन्हा पोलीस कवायत मैदान अशी झाली. धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील स्पर्धकही मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र व रोख बक्षिस मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

 

०००

मराठी भाषा विभागाने भाषांतर करणारी अधिकृत यंत्रणा मजबूत करावी – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. १: न्यायालयांकडून दिल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेतील निकालपत्राचे मराठीतील भाषांतर त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी नियमात तरतूद आहे. त्यासाठी मराठी भाषा विभागाने अधिकृत भाषांतर करणारी यंत्रणा मजबूत करावी, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विश्व मराठी संमेलनानिमित्त आचार्य प्र. के. अत्रे रंगमंचावर आयोजित ‘महिला कायदा आणि महिलांना न्याय’ या विषयावर आयोजित परिसंवादात त्या बोलत होत्या. परिसंवादात सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम हे देखील सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे निवेदन ॲड. अनुराधा परदेशी यांनी केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर कसा वाढेल याबाबत शिफारशी करण्यासाठी मराठी भाषा विभागाने ११ ऑगस्ट २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार अभ्यासगट गठीत केला होता. त्या गटाने, निकालपत्र मराठी भाषेमध्ये देताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मराठी भाषा विभागाने अधिकृत भाषांतर करणारी यंत्रणा तयार करावी आदी शिफारशी केल्या होत्या. त्या अनुषंगाने काम होण्याची गरज आहे.

त्या पुढे म्हणाल्या, देशाच्या राज्यघटनेत राज्यपालांनी परवानगी दिल्यास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना न्यायालयीन कामकाजात इंग्रजीसोबत हिंदी किंवा स्थानिक भाषा वापरता येईल, अशी तरतूद आहे. महाराष्ट्र राज्याने १ मे १९६६ रोजी मुंबई उच्च न्यायालय वगळता तालुका व जिल्हास्तरावर सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालयामध्ये मराठी भाषा वापरली जाईल, असा कायदा केला. याशिवाय उच्च न्यायालयाच्या ९ डिसेंबर २००५ रोजीच्या परिपत्रकानुसार ५० टक्के निकालपत्रे मराठीत देण्याचा सूचना आहेत. त्यासाठी न्यायालयातील अनुवादकांची संख्या वाढविणे व निधीची तरतूद आदी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

जुलै २०२४ पासून न्यायसंहिता बदलली आहे. त्यामध्ये साक्षीदार संरक्षण कायद्याचा आग्रह धरला आहे. अत्याचाराची घटना घडल्यापासून त्या प्रकरणातील न्यायालयीन निकालाची कार्यवाही संपेपर्यंत प्रत्येक पायरीवर पिडीतेला संरक्षण मिळणे आवश्यक आहे. विशेषतः बाल अत्याचार प्रकरणी फिर्याद नोंदवून घेताना अडचणी येतात. पोलिसांनी अशा चौकशी प्रकरणी साध्या वेशात, साध्या गाड्यांमध्ये जावे. न्यायालयात महिलांची नावे पुन्हा-पुन्हा उच्चारण्याऐवजी केस क्रमांकानुसार बोलवावे. पीडीतेच्या बाजूने निकाल मिळाला आहे अशा प्रकरणांबाबत प्रसिद्धी माध्यमांनी अधिकाधिक प्रसिद्धी दिली पाहिजे. त्यामुळे इतर पीडितांचा धीर वाढेल आणि न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास वाटेल.

ॲड. निकम म्हणाले, पोलिसांकडे तक्रार करायला पीडिता घाबरतात. झालेल्या अत्याचाराचे मराठीमध्ये वर्णन कसे करायचे हा भेडसावणारा प्रश्न असतो. पोलीस ठाण्यामध्ये कायद्याच्या भाषेत तक्रार नोंदवली जाते, त्यामुळे कायद्याची भाषा ही सर्वसामान्यांना समजणारी असावी. स्त्रियांच्या संकोचामुळे फिर्याद देताना त्रोटक माहिती दिली जाते. मराठी ही मातृभाषा असल्यामुळे मराठीमध्ये बोलले पाहिजे. मराठी माणसांनी आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. आपण दिलेली माहिती तक्रारीत व्यवस्थितपणे लिहिली जाते का हे पाहिले पाहिजे. कायद्यामध्ये मराठी शब्द समजायला कठीण आहेत, त्यासाठी पर्यायी शब्द शोधले पाहिजेत.

ते म्हणाले, बालकांवरील अत्याचार प्रकरणी पालकांची जबाबदारी खूप मोठी असते. बालकांना ‘गुड टच, बॅड टच’ बाबत शिक्षण देणे गरजेचे आहे. मुलांना प्रत्येक गोष्ट शाळेतून शिकवली जात नाही. संस्कृती ही घरातून वाढीस लागली पाहिजे. केवळ शाळा महाविद्यालयांना दोष देऊन चालणार नाही, असेही ते म्हणाले.

महिलांना कायदे व हक्क समजण्यासाठी मातृभाषेला पर्याय नाही. सध्याच्या परिस्थितीत मराठी भाषिकांना कायद्याविषयी कितपत ज्ञान, जान आहे, होणाऱ्या अन्यायाला कशा रीतीने वाचा फोडू शकतात याविषयी साक्षर करणे हे महत्त्वाचे काम आहे. त्यासाठी अत्यंत सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये कायद्याच्या पुस्तिका तयार करणे हे शासनापुढील महत्त्वाचे कार्य आहे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी मराठी भाषा विभागाच्या संचालक विजया डोणीकर आणि अवर सचिव उर्मिला धादवड यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
0000

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित भारताच्या घोडदौडीत महाराष्ट्रही अग्रेसर राहील

नागपूर, दि. १ : गरीब, युवक, शेतकरी, महिला या चार घटकांना समर्पित आणि शेती विकास आणि उत्पादकता, ग्रामीण समृद्धी आणि शाश्वतता, रोजगार आधारित विकास, मनुष्यबळ तयार करणे, नाविन्यपूर्ण गुंतवणूक, ऊर्जेची उपलब्धता आदी १० क्षेत्रांना व्यापत अमृतकाळात भारताला सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम तयार करणारा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. राज्यांसाठीही यात महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून याचा लाभ घेत महाराष्ट्रही विकसित भारत देशाच्या घोडदौडीत अग्रेसर होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मनी बी इन्स्टिट्यूटच्यावतीने येथील लक्ष्मीनगर परिसरातील सायंटिफिक सोसायटीच्या लॉनवर आयोजित ‘अमृतकाळ विकसित भारत -२०४७  परिषदे’ चे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. संसदेत आज सादर झालेल्या वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करतांना ते बोलत होते. केडिया सिक्युरिटीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विजय केडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवसाय विकास व्यवस्थापक श्रीराम कृष्णन आणि मनी बी संस्थेच्या संचालक शिवानी दाणी- वखरे यावेळी उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने बियाणे, सिंचनाच्या सोयी, वीजेची उपलब्धता आदी एकात्मिक कार्यक्रम देशातील १०० जिल्ह्यांमध्ये राबविण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून याद्वारे १ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. डाळी, तेलबियांचे उत्पादन वाढवून देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सहा वर्षांचा विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. देशातील कापसाचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने येत्या पाच वर्षासाठी कापूस मिशन हाती घेण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील कपाशी पिकाखालील ५० लाख हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येणाऱ्या कपाशी पिकाच्या उत्पादन वाढीसाठी याचा लाभ होईल. किसान केड्रीट कार्डची मर्यादा ३ लाखांवरुन ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणे आदी महत्वाच्या तरतूदी अर्थसंकल्पात असल्याचे त्यांनी सांगितले.

सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्राचा भारताच्या एकूण उत्पादन क्षेत्रात ३६ टक्के वाटा आहे. यावर लक्ष केंद्रीत करुन अर्थसंकल्पात या क्षेत्रात उत्पादन वाढ व रोजगार निर्मितीसाठी १.५लाख कोटींच्या योजना आणल्या आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) विद्यार्थी क्षमता वाढविण्यासह वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात (एमबीबीएस) १० हजार जागा वाढविण्यात येणार आहे. देशात सरकारी रुग्णालयांमध्ये २०० कर्करोग केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. भगवान गौतम बुद्धांशी संबंधित स्थळांच्या विकासासह देशात ५० आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्यांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.

मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेवून देशाच्या अर्थसंकल्पाच्या इतिहासात प्रथमच आयकर मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे मध्यम वर्गीयांची क्रयशक्ती वाढेल व त्याने रोजगार निर्मिती, उत्पादनालाही चालना‍ मिळेल. देशातील आयकर व्यवस्था अधिक सुटसुटीत करण्यासाठी नवीन आयकर कायदा आणण्याची घोषणाही आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. यातून देशात सकारात्मक परिवर्तन घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्मितीसाठीही अर्थसंकल्पात तरतूदी करण्यात आल्या आहेत. राज्यांना ५० वर्षांसाठी १.५ लाख कोटी बिनव्याजी कर्ज देण्याची महत्त्वपूर्ण बाब या अर्थसंकल्पात आहे. पीपीपीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये गुंतवणूक वाढविण्यास प्रोत्साहन देण्याची बाबही अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे. राज्यांच्या विकासासाठी मोठ्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या असून मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो, एमयुटीपी, एमएमआर करिता एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा आदी प्रथमदर्शनी महाराष्ट्रासाठी ११ हजार कोटी रुपयांची तरतूद दिसून येते. या सर्व संधींचा उपयोग करुन विकसित भारताच्या घोडदौडीत महाराष्ट्र महत्वाचे योगदान देत अग्रेसर होईल, असेही त्यांनी सांगितले.

 

प्रास्ताविक शिवानी दाणी-अखरे यांनी केले तर विजय केडिया आणि श्रीराम कृष्णन यांनीही अर्थसंकल्पाबाबत आपली मत मांडली.

0000

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...