शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 270

निवडणूक प्रक्रियेच्या बळकटीकरणासाठी भारत निवडणूक आयोगाची ठोस पावले

  • 1 कोटी निवडणूक अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी डिजिटल प्रशिक्षण योजना.
  • ईआरओ, डीईओ आणि सीईओ स्तरावर निवडणूक अधिकाऱ्यांसोबत 5000 सर्वपक्षीय बैठकींमध्ये राजकीय पक्षांचा सहभाग.
  • निवडणूक यादीत नावांचा समावेश आणि दुरुस्ती मार्गदर्शक तत्त्वे याबाबत कायदेशीर चौकट.
  • 89 पहिल्या अपील्स आणि एकच दुसरे अपील दाखल.

मुंबई, दि. 20 : भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून श्री ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका महिन्याच्या आत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासोबत संपूर्ण निवडणूक यंत्रणेला बीएलओ स्तरापर्यंत सर्व मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि मतदान केंद्रांवर त्यांना सुखद अनुभव देण्यासंदर्भात ठोस पावले उचलली आहेत. मुख्य भागधारक असलेल्या राजकीय पक्षांना या बळकटीकरण प्रक्रियेत सामील करुन घेतले जात आहे, अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे.

मतदारयादीचे नियमित अद्यतन

आयोगाने स्पष्ट केले आहे की, 100 कोटी मतदार लोकशाहीचा आधारस्तंभ आहेत. ‘यूआयडीएआय’ आणि ‘ईसीआय’च्या तज्ञांमध्ये तांत्रिक सल्लामसलत लवकरच सुरू होणार आहे. एक मतदार जरी त्याच्या नियुक्त मतदान केंद्रात मतदान करू शकत असेल, तरी आयोगाने देशभरात ईपीआयसी क्रमांकांमध्ये डुप्लिकेट्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आणि अनेक दशकांपासून चालत आलेली समस्या संपविण्याचे ठरवले आहे. मतदारयादीचे नियमित अद्यतन जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिकाऱ्यांबरोबर समन्वयाने मजबूत करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधत्व कायद्यानुसार आयोगाच्या राजकीय पक्षांबरोबरच्या संवादात स्पष्ट करण्यात आले की मसुदा मतदार यादीत कोणताही समावेश किंवा वगळण्यासंदर्भातील बाब संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार अपील प्रक्रियेने नियंत्रित केली जाते. अशा अपीलच्या अभावात, ईआरओने तयार केलेली यादी लागू राहील. 7 मार्च 2025 रोजी ईसीआयने स्पष्ट केले होते की विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (एसएसआर) प्रक्रियेनंतर फक्त 89 पहिल्या अपील्स आणि एकच दुसरे अपील दाखल करण्यात आले.

ग्रामीण मतदान केंद्रावरही मूलभूत सुविधा (एएमएफ) सुनिश्चित

सर्व पात्र नागरिकांची 100% नोंदणी सुनिश्चित करणे, मतदानाची सोय करणे आणि सुखद मतदान अनुभव देणे हे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदार नसतील याची खात्री करण्यासाठी पावले उचलली जातील आणि ती 2 किमीच्या आत असतील. अगदी दूरच्या ग्रामीण मतदान केंद्रावरही मूलभूत सुविधा (एएमएफ) सुनिश्चित केल्या जातील. शहरी भागातील उदासीनता दूर करण्यासाठी आणि अधिक सहभाग प्रोत्साहित करण्यासाठी, उच्च इमारतींचे क्लस्टर आणि वसाहतींमध्ये देखील मतदान केंद्रे असतील.

प्रशिक्षणावर भर

1 कोटी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या व्यापक आणि क्षमतेच्या विकासासाठी एक मोठे पाऊल म्हणून, 4 आणि 5 मार्च रोजी नवी दिल्लीतील ‘आयआयआयडीइएम’ येथे सर्व राज्य/संघराज्य क्षेत्रांच्या सीईओंचा दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येक राज्य/संघराज्य क्षेत्राच्या डीईओ आणि ईआरओंचा सहभाग होता. या परिषदेत संपूर्ण निवडणूक यंत्रणेला ऊर्जा देण्यासाठी 28 भागधारकांचा आराखडा तयार करण्यात आले, त्यांच्या जबाबदाऱ्या संविधान, निवडणूक कायदे आणि ईसीआयने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित करण्यात आल्या. निवडणूक हँडबुक आणि सूचना मॅन्युअल्स नवीन बदलांनुसार समन्वयित केले जातील. अनेक भारतीय भाषांमध्ये डिजिटल प्रशिक्षण किट तयार करण्यात येत असून, जेणेकरून कार्यकर्त्यांचे प्रभावी प्रशिक्षण होईल. अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि एकत्रित डॅशबोर्ड प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. भविष्यात बीएलओंना प्रशिक्षण देण्यासाठी एक प्रशिक्षण मॉड्यूल तयार केले जात आहे.

सर्वपक्षीय बैठकांच्या नियमित आयोजनाचे निर्देश

निवडणूक प्रक्रियेच्या सर्व पैलूंमध्ये राजकीय पक्षांचा पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, मुख्य निवडणूक आयुक्त  ज्ञानेश कुमार यांनी 4 मार्च रोजी सीईओ परिषदेत सर्व 36 सीईओ, 788 डीईओ, 4123 ईआरओंनी सर्वपक्षीय बैठकांचे नियमित आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरातील अशा बैठका राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रलंबित आणि उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करतील. ही प्रक्रिया 31 मार्च 2025 पर्यंत संपूर्ण भारतात पूर्ण केली जाईल. निवडणूक कायद्यानुसार मतदार यादीतील दावे आणि हरकतीबाबत योग्य प्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आणि त्यांच्या नियुक्त बीएलओ यांना प्रशिक्षण देण्याची संधी दिली आहे, ज्याचे राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. ‘ईसीआय’ने निवडणुकांच्या आयोजनाशी संबंधित इतर सर्व बाबींवर सर्व राजकीय पक्षांकडून 30 एप्रिल 2025 पर्यंत सूचना मागविल्या आहेत. राजकीय पक्षांना आयोगाशी दिल्लीत एकत्रित वेळेत भेटण्याचे आमंत्रण देखील देण्यात आले आहे.

या ठोस आणि दूरगामी उपक्रमांव्दारे निवडणूक प्रक्रिया अधिक बळकट करण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेतील सर्व संबंधीत घटकांशी समन्वय साधला जात आहे. असेही भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

 

इंदरदेव धनगरवाडा येथे वणवा बाधित घरांची पुर्नबांधणी होणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई,दि. २१: रायगड जिल्ह्यातील इंदरदेव धनगरवाडा येथे नुकतेच वणव्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त गावकऱ्यांच्या घरांची पुनर्बांधणी त्याच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

रोहा तालुक्यातील मौजे धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडा येथील जंगलातील वणव्याची आग पसरुन बाधित झालेल्या ठिकाणी सोई सुविधाकामी निधी उपलब्ध होण्याबाबत विधिमंडळात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, धनगरवाडा येथे 6 मार्च 2025 रोजी जंगलातील वणव्याची आग पसरुन 39 घरे आणि 12 जानावरांचे गोठे बांधित झाले होते. या बाधित घराचे व गोठ्यांचे झालेल्या नुकसान झाले असून, ज्या ठिकाणी नुकसान झाले त्याच ठिकाणी त्यांच्या घरांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे.   इंदरदेव धनगरवाडीला जाणेसाठी रस्ता नसल्याने लागलेल्या आगीवर नियंत्रण करता आले नाही. इंदरदेव धनगरवाडा येथे जाण्यासाठी अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता होण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत धामणसई यांनी ठराव करुन प्रस्ताव सादर करावा, असेही  त्यांनी सांगितले.

यावेळी रोहा येथील उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तालुक्याचे तहसीलदार किशोर देशमुख, रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील, रोहा वन परिक्षेत्रचे वन अधिकारी मनोज वाघमारे, सहाय्यक वनरक्षक रोहित चोबे, ग्रामविकास अधिकारी निता श्रीवर्धनकर, तानाजी देशमुख, अनंता देशमुख तसेच इंदरदेवचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

***

गजानन पाटील/विसंअ

०००

विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

मुंबई, दि.२१: विधानपरिषदेसाठी नवनिर्वाचित झालेले सदस्य सर्वश्री चंद्रकांत रघुवंशी, दादाराव केचे, संजय केणेकर, संजय खोडके आणि संदीप जोशी यांना सभापती प्रा. राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांच्यासह सभागृहातील उपस्थित सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

***

ब्रिजकिशोर झंवर/विसंअ

०००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल व ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.

अनुदानाची माहिती

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानांची सुविधा उपलब्ध आहे

  • नवीन विहीर: 2 लाख 50 हजार
  • जुनी विहीर दुरुस्ती: 50 हजार
  • इनवेल बोअरिंग: 20 हजार
  • पंप संच: 20 हजार (10 अश्वशक्ती क्षमतेच्या विद्युत पंप संचासाठी 100% अनुदान)
  • वीजजोडणी आकार: 10 हजार
  • शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण: 1 लाख
  • सूक्ष्म सिंचन संच:
  • ठिबक सिंचन संच: 50 हजार
  • तुषार सिंचन संच: 25 हजार

पॅकेजेस

योजनेअंतर्गत विविध पॅकेजेस उपलब्ध आहेत:

  1. नवीन विहीर पॅकेज

या पॅकेजमध्ये नवीन विहीर, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग यांचा समावेश आहे.

  1. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज

यामध्ये जुनी विहीर दुरुस्ती, पंप संच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, आणि आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग यांचा समावेश आहे.

  1. शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण

या पॅकेज अंतर्गत शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.

पात्रतेच्या अटी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात:

  1. लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असावा.
  2. जात प्रमाणपत्र असावे.
  3. नवीन विहीरचा लाभ घेण्यासाठी किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  4. सामुहिक शेतजमीन किमान 0.40 हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब लाभ घेऊ शकते.
  5. इतर घटकांसाठी किमान 0.20 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  6. कमाल शेतजमीन 6.00 हेक्टरआहे.
  7. 7/12 दाखला आणि 8 अ उतारा आवश्यक आहे.
  8. आधार कार्ड आवश्यक आहे.
  9. बँक खाते आधार कार्डाशी संलग्न असावे.
  10. स्व. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य.
  11. वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पेक्षा कमी असावे.
  12. उत्पन्नाचा दाखला तहसीलदारांकडून मिळवावा लागेल.
  13. ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागतो. अर्ज भरण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. वेबसाईट: www.mahadbt.maharashtra.gov.in http://www.mahadbt.maharashtra.gov.in
  2. ऑनलाईन अर्ज भरण्यावर लाभार्थीची निवड लॉटरी पद्धतीने होते.
  3. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
  4. जिल्हास्तरीय समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना अनुदान मिळेल.

आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालील कागदपत्रे सादर करावी लागतात:

  1. 7/12 दाखला आणि 8 अ उतारा
  2. 6 ड उतारा (फेरफार)
  3. जात प्रमाणपत्र
  4. तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला
  5. आधार कार्डाची छायांकित प्रत
  6. बँक पासबुकाची छायांकित प्रत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी आहे, ज्यामुळे त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढण्यास मदत होईल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक साधन-संपत्ती उपलब्ध करून देण्यात येते, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. तरी सोलापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित पद्धतीने अर्ज करावेत. प्रशासनाच्या या योजनेतून आपल्या शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावेत.

०००

 

  • सुनील सोनटक्के, जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात ‘प्रत्यय’ ऑनलाईन प्रणालीची अंमलबजावणी

श्रम आणि पैशांची होणार मोठी बचत

मुंबई, दि. 21 : राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू महसूल विभागाने आज महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीचा शुभारंभ आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘प्रत्यय’ प्रणाली ही शासकीय कामांची सुंदर अनुभूती आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्राला पारदर्शी आणि गतिमान शासन देण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महसूल खात्याने १०० दिवसांत ‘प्रत्यय’ प्रणाली विकसित करण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे. या प्रणालीमुळे राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होतील, परिणामी नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. राज्यात सध्या महसूल खात्यात अकरा हजार प्रलंबित प्रकरणे आहेत. या प्रकरणांचे त्वरित आणि न्याय्य निवारण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने निर्णय प्रक्रीया जलद आणि सुटसुटीत करण्याचा विचार शासन करत आहे. आगामी काळात महसूल विभागाच्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. सरकारची नाममात्र फी भरुन सर्व निर्णय डाऊनलोड करता येणार आहेत.

नागरिकांची गैरसोय दूर

सध्या राज्यामध्ये महसूल विभागात साधारणपणे  दीड लाख अर्ध न्यायिक तर भूमि अभिलेख विभागात सुमारे १५ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. वैचारिक मतभेद यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतात परिणामी अपिलाची प्रकरणे निर्माण होतात. प्रत्ययमुळे नागरिकांची पायपीट वाचणार असून वेळ, पैशाची बचत होणार आहे.

राज्यातील महसूल विभागाला देशातील पहिल्या क्रमांकावर नेण्याचा मानस आहे. इतर राज्यांसाठी महाराष्ट्राचे महसूल खाते एक आदर्श ठरेल. आगामी काळात व्हिडिओद्वारे महसुली सुनावणी घेण्यासाठी प्रयत्न आहे. संपूर्ण कार्यप्रणाली पेपरलेस होईल यासाठी काम सुरू असून महसूल विभागाचे डेटा सेंटर सुरू करण्याचा मानस आहे.

चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, महाराष्ट्र काय आहे ‘प्रत्यय ‘ प्रणाली

  • ‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीमुळे नागरिकांना फेरफार,तक्रारी,अपील,पुनर्विलोकन अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहे.
  • अर्जाची सद्यस्थिती, सुनावणीचा दिनांक वेळ, विरुद्ध पक्षाचे म्हणणे सर्व काही ऑनलाईन पाहता येणार आहे.
  • दिवाणी न्यायालयाप्रमाणे ऑनलाईन सुनावणीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
  • घरबसल्या अपिलदार, जबादार आणि वकील आपले म्हणणे मांडून वेळ, श्रम आणि पैसा वाचवू शकतील.
  • ‘प्रत्यय’ प्रणालीचे पहिल्या टप्प्यात जिल्हा अधीक्षक ते टीएलआर स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि अन्य महसूल अधिकाऱ्यांसाठी कार्यान्वित होणार आहे.

0000

 

मोहिनी राणे/विसंअ

वाघूर प्रकल्पाअंतर्गत शेततळे: शाश्वत सिंचनाचा राज्यातला नवा अध्याय

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून राज्यातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वाघूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत २७ गावांमध्ये २०२० शेततळी बांधण्यात येणार असून, त्यात वाघूर धरणाचे पाणी साठवले जाणार आहे. हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून, शाश्वत सिंचन सुविधेसोबत भू-जल पातळी सुधारण्यास देखील मदत करेल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि फायदे

  1. शाश्वत सिंचन व्यवस्था

शेततळ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना बारमाही पाणी पुरवठा उपलब्ध होईल. यामुळे पारंपरिक तसेच आधुनिक सिंचन पद्धती (ठिबक आणि तुषार सिंचन) वापरणे शक्य होईल.

  1. जलसंधारण आणि पाणीबचत

शेततळ्यातील पाणी ठिबक आणि तुषार सिंचनासाठी वापरल्यास पाण्याचा कार्यक्षम उपयोग होईल आणि जलसंधारणास चालना मिळेल.

  1. शेती उत्पादनात वाढ

नियोजनबद्ध सिंचनामुळे शेतकरी वर्षभर विविध पिके घेऊ शकतील. परिणामी, उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढेल.

  1. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
  2. शेततळ्या मध्ये मत्स्य पालन केल्यास , शेतीपूरक जोडधंदा ऊपलब्धहोईल.व्यवसाय बळकट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल.

वाघूर उपसा जलसिंचन योजनेचा विस्तार

वाघूर उपसा जलसिंचन योजना क्र. १ आणि २ सध्या कार्यान्वित असून, या योजनेतून १९,१३२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

योजनेअंतर्गत गाडेगाव, जामनेर आणि गारखेडा या तीन शाखांमधून १०,१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. २७ गावांमध्ये २,०२० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी २१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. गाडेगाव शाखेतील गाडेगाव, नेरी बुद्रुक, नेरी दिगर, चिंचखेडा, करमाड व पळासखेडा येथे ७० शेततळ्यांमध्ये पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या ९०% पाइपलाईनचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. आतापर्यंत १,१८९ शेततळ्यांचे करारनामे पूर्ण झाले आहेत.त्यातील २१० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

सिंचन सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी शासन देखील कटीबद्ध आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. या प्रकल्पाची गती वाढवण्यावर भर दिला जात आहे.

वाघूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकरी संवाद बैठका विविध गावांमध्ये घेण्यात आल्या.प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. शेततळ्यांबाबत शंका-निरसन बैठक आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उर्वरित करारनामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

जलसंधारणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल

गोंडखेल येथील शेततळे हा केवळ जलसंधारण प्रकल्प नसून, तो ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या भविष्याला दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे शेतीसाठी आवश्यक जलसाठवण क्षमता वाढेल. भू-जल पातळी सुधारेल, आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. जलसंधारण आणि आधुनिक सिंचनाच्या मदतीने जळगाव जिल्ह्यातील शेती अधिक समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

०००

  – जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव

तुती लागवड एक शेतीपूरक व्यवसाय

शेतकरी पिढ्यानपिढ्या पारंपरिक शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, काही शेतकरी नव्या वाटा शोधून शेतीमधून भरपूर उत्पन्न कमावत असतात. रेशीम शेती म्हणजेच तुती लागवड ही अशा शेतकऱ्यांसाठी एक चांगला मार्ग आहे. थोडे कष्ट, व्यवस्थितपणा व शिस्त यांचा अवलंब केला तर कमी खर्चात रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न घेता येते व आपल्या कुटुंबातील सर्वांना रोजगारही पुरवता येतो. जाणून घेऊया तुती रेशीम शेती विषयी…

रेशीम शेतीचे महत्त्व

रेशीम शेती हा शेतीपूरक उत्कृष्ट जोडधंदा आहे. वर्षातून ४ ते ५ पिके घेता येतात. एकदा केलेली तुती लागवड १० ते १५ वर्षे टिकते. पर्यावरणपूरक व्यवसाय, कमीत कमी रासायनिक खतांचा वापर, घरातील प्रत्येक व्यक्तीला घरातच रोजगार मिळतो. त्यामुळे मजुरीचाही प्रश्न मिटतो. इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी व खते लागतात. उत्पादित कोषांना बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. शासनातर्फे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना

नवीन शेतकऱ्यांना एकरी ५०० रू. भरून लागवडीसाठी नोंदणी करून सभासद होता येते. अशा शेतकऱ्यांना अंडीपुंज अनुदान योजना, प्रशिक्षण, सिल्कसमग्र योजना अंतर्गत लाभ, म. न. रे. गा., या अनुदान योजनांचा त्या शेतकऱ्यांनी शासनाचे आवश्यक ते निकष पूर्ण केल्यानंतर लाभ घेता येतो.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवड योजना

स्वतःच्या शेतीवर काम करून शासनामार्फत मजुरी मिळणारी ही एकमेव योजना आहे. शासनमान्य समूहात तुती लागवड (एका गावात किमान 10 शेतकरी, 10 एकर आवश्यक). रेशीम शेती योजनेंतर्गत पूर्वी लाभ घेतलेले शेतकरी नसावेत. कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल. प्रति लाभार्थी फक्त एक एकर तुती लागवड मर्यादा. लाभार्थी निवडीमध्ये नियमाप्रमाणे सामाजिक आरक्षण. ग्रामसभेच्या ठरावाद्वारे लाभार्थी निवड. मनरेगा अंतर्गत 3 वर्षांमध्ये अकुशल मजुरी म्हणून एकूण 2 लाख 65 हजार 815 रूपये व कुशल मजुरी रक्कम 1 लाख 53 हजार रूपये अशी एकूण 4 लाख 18 हजार 815 रूपये इतकी रक्कम मिळते.

सिल्कसमग्र योजनेंतर्गत तुती लागवड, सिंचन संच, कीटक संगोपन गृह, कीटक संगोपन साहित्य, निर्जंतुकीकरण साहित्य यासाठी एक एकर तुती लागवडीकरिता सर्वसाधारण गटासाठी 3 लाख 75 हजार रूपये तर अनुसूचित जातीसाठी 4 लाख 50 हजार रूपये व 2 एकर तुती लागवडीकरिता सर्वसाधारण गटासाठी 4 लाख 68 हजार 750 रूपये तर अनुसूचित जातीसाठी 5 लाख 62 हजार 500 रूपये इतके अनुदान आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,  विजयनगर, सांगली येथे संपर्क साधावा.

०००

संकलन     जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

 

 

 

कौशल्य विभागाच्या माध्यमातून जर्मनीतल्या उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रातले तरुण ठसा उमटवणार –  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई  दि. २१ : जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्याच्या आर्थिक आणि राजकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत रोजगाराच्या संधी बाबत सकारात्मक चर्चा झाली असून महाराष्ट्रातील तरुण लवकरच जर्मनीत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणार असा विश्वास कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे.

जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्यातील आर्थिक आणि राजकीय विभागाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आणि कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जर्मनीतले उद्योग आणि आवश्यक कुशल मनुष्यबळ या विषयावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार,कौशल्य विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख आणि महाराष्ट्र रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यावेळी उपस्थित होत्या.

राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार या करारान्वये आवश्यक बाबींची पूर्तता सध्या केली जात आहे. या अनुषंगाने बाडेन वुटेनबर्ग राज्यातील उद्योग क्षेत्रातील तज्ञ 16 ते 22 मार्च दरम्यान हे शिष्टमंडळ विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. त्याचबरोबर बाडेन वुटेनबर्गचे आर्थिक आणि राजकीय संचालक ही कराराला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत.  बाडेन वुटेनबर्ग राज्याचे आर्थिक आणि राज शिष्टाचार विभागाचे संचालक मार्क शुवेकर, कुशल कामगार विभागाचे वरिष्ठ सल्लागार शेमजा एसेल, भारतातील जर्मनीचे उच्चाधिकारी अचीम फॅबिग आणि क्रिस्तोफ रँडरोफ तसेच आर्थिक आणि राजकीय सल्लागार अशुमी श्रॉफ यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

महाराष्ट्रातल्या तरुणांना जर्मनीत रोजगारासाठी कोणतीही अडचण येणार नाही : मनिषा वर्मा

जर्मनीच्या शिष्टमंडळासोबत बैठकीबाबत कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा म्हणाल्या की, आम्ही सातत्याने बाडेन वुटेनबर्ग इथल्या विविध अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना आवश्यक असलेली माहिती पूर्तता करत आहोत. जर्मनीच्या शिष्टमंडळासोबत आमची सविस्तर चर्चा झाली असून महाराष्ट्रातल्या तरुणांना जर्मनीत रोजगारासाठी कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी विभागामार्फत घेत आहोत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात बाडेन वुटेनबर्ग राज्यात कौशल्य विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांना  या परिषदेचे निमंत्रणही या शिष्टमंडळाने दिल्याची माहिती सचिव मनीषा वर्मा यांनी दिली.

महाराष्ट्रातील 880 तरुणांना जर्मन भाषेचे शिक्षण

कौशल्य विभागाच्या  माध्यमाने  महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी देण्यात येत असून 880 विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे देण्यात येत आहे.  शालेय शिक्षण विभागाकडून 80 तर रतन टाटा व्यावसायिक प्रशिक्षण विभागाच्या माध्यमाने 800 विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी भाषा शिकवली जात आहे. बाडेन वुटेनबर्ग राज्याला आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळानुसार अभ्यासक्रमात ही बदल अपेक्षित असून याबाबत शिष्टमंडळाच्या बैठकीत विचार करण्यात आला आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे; तज्ज्ञांची समिती स्थापन होणार

मुंबई, दि. २१ : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे.

स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

आग्रा येथील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहीत करणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य असते. आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते. त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात, मात्र या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहचत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. अशा स्थळासाठी आणि त्या देदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम रहावा, त्या स्थळांची, त्या वारशांचे जतन, सवंर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.

००००

 

 

इचलकरंजी शहर पाणीपुरवठ्यासाठी तिसऱ्या योजनेसाठी पर्यायांचा अभ्यास करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २१ : इचलकरंजी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी पंचगंगा नदी स्त्रोत, कृष्णानदीवरील मजरेवाडी उद्वभव या अस्तित्वातील योजनांचे बळकटीकरण करावे. त्याबरोबरच तिसरी योजना तयार करण्यासाठी पर्यायांचा अभ्यास करावा. पूरस्थितीतील पाणी साठवून त्याचा वापर करण्यासंदर्भातही विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात विधानभवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते.

इचलकरंजी शहराला सध्या पंचगगा नदी तसेच मजरेवाडी उद्भव योजनेतून ४५ दललि पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची वाढ तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यासाठी तिसऱ्या योजनेची आवश्यकता आहे. त्यासाठी म्हैसाळ बंधारातून पाणीपुरवठा, दूधगंगा कॅनालमधून रेंदाळ येथील खाणीमध्ये पाणी साठवण करणे तसेच दूधगंगा कॅनॉलवरील पाझर तलावांचा स्त्रोत म्हणून उपयोग करणे या पर्यायांचा विचार करून अभ्यास अहवाल सादर करावा. त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी स्ट्रक्चर उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. इचलकरंजीसाठीही असा प्रकल्प उभारता येईल का याचाही विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. दूधगंगामधून कॅनॉलद्वारे येणारे पाणी बंद पाईपलाईनमधून आणता येईल का याचाही अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री दिले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी इचलकरंजी शहराला म्हैसाळ बंधाऱ्यातून किंवा शिरटी योजनेतून शाश्वत व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची सूचना केली.

यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सध्या अस्तित्वातील योजना सुरू ठेवून दूधगंगा कॅनालमधून येणारे पाणी रेंदाळ गावजवळील खाणींमध्ये साठवून वापर करता येईल, असे सांगितले. दूधगंगा कॅनॉलची दुरुस्ती व अस्तरीकरण करून तसेच कॅनॉल ऐवजी बंद पाईपलाईन करण्यासंबंधीचा पर्याय असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार धैर्यशील माने दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले होते. इचलकरंजी शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही, अशा योजना राबविण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आवटी, अधीक्षक अभियंता प्रवीण पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आदी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

0
मुंबई, दि. १८ : बेकायदेशीररित्या चालविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सींविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांतील २० वायुवेग पथकांमार्फत एकाचवेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल...