बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 180

वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्याहस्ते ‘यवतमाळ ग्रंथोत्सवा’चे उद्घाटन

यवतमाळ, दि.२० (जिमाका) : अलिकडे वाचनाबाबत उदासीनता दिसून येत आहे. नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या परिसरात आयोजित दोन दिवशीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा.गजानन कोटेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय सहायक संचालक डॉ.राजेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, जिवन पाटील, पराग पिंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता घावडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब, विनोद देशपांडे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी लागावी, चांगली पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रंथोत्सव घेतला जातो. वाचनामुळे जीवन समृद्ध होते. आपली कल्पना व विचारशक्ती प्रगल्भ होते, शब्दसंपत्ती वाढते आणि ज्ञानाचा विस्तार होतो. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते, असे पालकमंत्री म्हणाले.

ग्रंथोत्सवामुळे विविध विषयांवरील पुस्तके कमी किमतीत आणि सहज मिळतील. शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालये या उपक्रमाचा लाभ घेऊन वाचन संस्कृतीला बळ देतील, हा विश्वास आहे. आज घरोघरी मोबाईलमुळे वाचन कमी झाले आहे. यासाठी मुलांना दोष देवून पालक सुटका करून घेवू शकत नाही. आई-वडिलच तासंतास मोबाईलवर राहत असतील तर मुलांकडून आपण त्यांनी पुस्तके हातात घेऊन वाचन करावे, अशी अपेक्षा करू शकणार नाही. त्यामुळे पालकांनी देखील वाचन वाढवणे आवश्यक आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.कोटेवार यांनी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ही चळवळ कायम ठेवण्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रंथालयांचे अनुदान, कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य समस्या यावेळी श्री.कोटेवार यांनी मांडल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.

दोन दिवशीय ग्रंथोत्सवात आज उद्घाटनानंतर मी सावित्रीबाई बोलते हा एकपात्री प्रयोग अपुर्वा सोनार  व ऋतिका गाडगे यांनी सादर केला. नायब तहसिलदार रुपाली बेहरे यांनी अहिल्या हा एकपात्री प्रयोग सादर केला. दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवास भेट देऊन नागरिकांनी पुस्तके खरेदी व विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000

पोलीस हवालदार निलेश दयाळ व सागर गोगावले यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार

सातारा दि. २०: झारखंड राज्यातील रांची येथे झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सातारा पोलीस दलातील बीडीडीएस पथकातील श्वान सुर्या याने एक्सप्लोझीव्ह इव्हेंट या स्पर्धा प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस व सातारा जिल्हा पोलीस दलाची मान उंचावलेली आहे. त्याबद्दल श्वान सुर्या व प्रथम हँडलर पोलीस हवालदार निलेश दयाळ व दुय्यम हँडलकर सागर गोगावले यांचा सत्कार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते करण्यात आला.

पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले सुर्या श्वानाने अनेक गुन्हे उकल करण्यात मोठी मदत केली आहे. सुर्याने सुवर्ण पदक पटकवून सातारा पोलीस दलाची मान उंचावलेली आहे. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षकाने सुर्या श्वानाला चांगले प्रशिक्षण दिले आहे. पोलीस दलातील श्वानांसाठी राहण्यासाठी व्यवस्थेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पोलीस अधीक्षक श्री. शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल चांगले काम करीत आहे हे काम आणखीन चांगल्या पद्धतीने करावे. ज्या सुविधा पोलीस दलाला लागतील त्या उपलब्ध करुन दिल्या जातील ग्वाहीही देवून सुर्यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी एक लाखांचे बक्षीसही जाहीर केले.

६८ व्या आखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सुर्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आर्टीकलमधून ५५ आर्टीकल शोधून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. अशा प्रकारचे सुवर्णपदक सातारा जिल्हा पोलीस दलास प्रथम व महाराष्ट्रात पोलीस दलास २०१४ नंतर प्राप्त झाले आहे असे पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी सांगितले.

००००

साहित्य संमेलने : परंपरा आणि परिप्रेक्ष

साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकी वाटचाल करीत आहे. मात्र या परंपरेत अनेक परिप्रेक्ष या साहित्यसंमेलने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या साहित्य प्रवाह, संमेलनांचे स्वरुप, त्यातून व्यक्त होणारे विषय याबाबत अनेक परिप्रेक्ष तयार होतांना दिसतात. त्याचाच धांडोळा घेतलाय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यीक प्रशांत गौतम यांनी.

नवी दिल्ली येथे ७२ वर्षापूर्वी ऑक्टोंबर महिन्यात ५४ वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा, महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या ५४ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,आणि स्वागताध्यक्ष होते,काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्यसंमेलन होत आहे ते यंदाच. ९८ व्या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभले आहेत,अध्यक्षपदाचा बहुमान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे.तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या अनुषंगाने देशाच्या राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनास महत्व आहे.

साहित्य संमेलनाची परंपरा शतकाकडे

दोन मराठी माणसं एकत्र आली की साहित्य संस्था निर्माण होतात, असे म्हणतात ते खरेच आहे. आधीच्या काळात तेच होते, आणि आताच्या काळात ही तेच आहे. यात काहीही बदल झालेला नाही. संस्था व संमेलने वर्धिष्णू असतात. वर्षानुवर्ष हा साहित्याचा प्रवाह हा अखंड सुरुच असतात.  साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकाकडे जाते आहे. या प्रदिर्घ कालखंडात किती तरी बदल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्था आल्या. नंतर त्यांचा विस्तार झाला. पुढील काळात याच साहित्य संस्थांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात आले. संमेलने त्या आधीही ‘ग्रंथकार संमेलन, महाराष्ट्र साहित्य संमेलन’, या नावाने भरतच होती. तेव्हा निवडणूक नव्हती.

१९६४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि १९६५ साली महामंडळाचे पहिले संमेलन हैदराबादेत समीक्षक प्रा.वा.ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भरले. तेव्हा पासून ही परंपरा अखंडीत आहे.

नवी दिल्लीत तर यंदाचे संमेलन ७२ वर्षाने होत आहे. हे संमेलन झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीने भारावलेला होता. दिल्लीचे संमेलन १९५४ साली झाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि मराठी साहित्यात साठोत्तरी प्रवाह यायला सुरूवात झाली.

मराठवाड्याच्या संदर्भात सांगायचे तर आजपर्यंत मराठवाड्यात झालेल्या सात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्याबाहेरील लेखकांनी भूषवले. केवळ एका संमेलनाचे अध्यक्षपद भूमीपुत्र भारत सासणे यांनी भूषवले. अनंत काणेकर (छत्रपती संभाजीनगर), शंकर पाटील (नांदेड), व्यंकटेश माडगुळकर (अंबाजोगाई), नारायण सुर्वे (परभणी), प्रा.द.मा.मिरासदार (परळी), प्रा.रा.ग.जाधव (छत्रपती संभाजीनगर), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (धाराशीव), भारत सासणे (उदगीर) असे सांगता येईल. तर मराठवाड्यातील लेखक  डॉ.यू.म.पठाण (पुणे), डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (चिपळून), प्रा.फ.मु.शिंदे(सासवड), लक्ष्मीकांत देशमुख (बडोदा), डॉ.श्रीपाल सबनीस (पिंपरी-चिंचवड), नरेंद्र चपळगावकर(वर्धा) येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

मराठी साहित्य संस्कृती,कशी असते हे पाहयचे असेल तर साहित्य संमेलन चळवळीचा इतिहास आणि सद्याचे वर्तमान बघायला हवे. जगात मराठी ही अशी भाषा आहे की फक्त तिचाच साहित्य संमेलनाचा उत्सव उदंड उत्साहात होत असतो. आज सर्वाधिक साहित्य संमेलने ही मराठी भाषेचीच होतात. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर तर मोठ्या संख्येने संमेलने होतात. विश्व मराठी साहित्य संमेलन होतात; पण कायम लक्षात राहातात ती प्रतिवर्षी होणारी अ.भा.मराठी साहित्य संमेलने. ही संमेलने नव्या-जुन्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ देतात, वाचकांना आपल्या आवडीचा लेखक भेटतो आणि ग्रंथ प्रदर्शनातून  त्याचे आवडीचे पुस्तक मिळते. अशा ग्रंथ प्रदर्शनातून प्रकाशकांनाही फायदा होतो.

१९८९ साली पहिली जागतिक मराठी साहित्य परिषद मुंबईयेथे कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. नंतरच्या काळातही सातत्य राहिले. साहित्य महामंडळानेही अशा तीन चार जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यात गाजले ते सॅन होजे व (अमेरिका), दुबई येथील संमेलन, या निमित्ताने मराठीचा झेंडा साता समुद्रापार फडकला.  राज्य सरकारने प्रतिवर्षी जिल्हा व विभागीय स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा चांगला उपक्रम सुरू केला आहे. छोट्या व आटोपशीर संमेलनास प्रतिसादही उत्तम लाभतो. तसेच राज्य सरकारने तीन विश्व मराठी साहित्य संमेलनं आयोजित केली. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे. पुण्यात नुकत्याच झालेल्या विश्वसंमेलनात तर कोट्यावधीची आर्थिक उलाढाल झाली, विक्रमी पुस्तक विक्री झाली. म्हणून प्रत्येक रसिक,वाचकांना साहित्य संमेलनाची उत्सुकता असते,तशी देशाच्या  राजधानीत होणाऱ्या संमेलनाचीही आहे.

बृहन्महाराष्ट्रातील संमेलने

या मराठी साहित्य संमेलनास अनेक परंपरा आहेत. या ९८ वर्षातील २४ संमेलनं ही महाराष्ट्रा बाहेर झालेली आहेत. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, बेळगाव, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, नवी दिल्ली, भोपाळ, रायपूर(छत्तीस गड) पणजी, घुमान(पंजाब) यातील काही ठिकाणी दोन-तीन वेळा संमेलने भरली आहेत. बृहन्महाराष्ट्रात तर बडोदा येथील वाड.मय परिषद यांची संमेलन वाटचाल अमृत महोत्सवाकडे सुरू आहे. नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचीही तेवढीच अधिवेशनं झालीत. या शिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनंही एका काळात भरली होती.

परंपरेची रुजुवात

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली  १८७८ पासून सुरु असलेली ही परंपरा अखंडीत राहिली असती, त्यात सातत्य राहिले असते तर दिल्लीचे संमेलन हे ९८ ऐवजी १४७ वे ठरले असते. या प्रवाहात विविध कारणाने खंड पडला; हे मात्र खरे. स्वातंत्र्यपूर्व काळात संमेलनाचे आयोजन करणे ही साधी बाब नव्हती, त्यावर मात करीत संमेलन सातत्य राखण्याचा प्रयत्न तत्कालीन लेखक व कार्यकर्त्यांनी केला होता. तेव्हा पासूनचा आज पर्यंतचा साहित्य संमेलनाचा प्रवास फारच रंजक आहे,कसा तो आपण जाणून घेवू या!

साहित्यसंमेलनांची परंपरा

यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर या नियोजित आहेत. आयोजक पुण्यातील सरहद्द संस्था आहे. संजय नहार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. सरहद्दचे कश्मीर भागात उत्तम, शैक्षणिक, सामाजिक काम आहे. याच आयोजकांनी संत साहित्याचे अभ्यासक  डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली  घुमान येथील ८८ वे साहित्य संमेलन चांगले आयोजित केले होते. नंतरच्या वर्षी बहुभाषा संमेलनही डॉ.गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथेच घेतले होते. दिल्ली येथील साहित्य संमेलनाचेही तेच आयोजक आहेत.

पहिले मराठी साहित्य संमेलन ७ फेब्रुवारी १८७८ या दिवशी पुण्यात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या संदर्भात  “ज्ञानप्रकाश ” या नियतकालिकात रानडे आणि लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख)यांचे संयुक्त निवेदन प्रसिध्द झाले. ग्रंथकार संमेलन भरविण्याचा प्रस्ताव आला, त्यास ५० साहित्यिकांचा पाठिंबा होता. खरे तर रानडे यांचे एकही पुस्तक नसले तरी त्यांनीच संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे, असा लोकहितवादींसह अन्य प्रतिष्ठीत लेखकांचा आग्रह होता. २४ मे १८८५ या दिवशी पुण्यात दुसरे ग्रंथकार संमेलन झाले. कृष्णाशास्त्री राजवाडे हे अध्यक्ष होते. संमेलनासाठी न्या.रानडे यांनी पुढाकार घेतला होता.

तो काळ  होता संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा. साल होते १९५७. तत्कालीन औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजनगर येथे लघुनिबंधकार अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन सरस्वती भुवन प्रशालेत झाले. मराठी साहित्यातील ऐकापेक्षा एक दिग्गज लेखक-दत्तो वामन पोतदार, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशी ग्रेट मंडळी हजर होती. यात “, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे “, असा ठराव मंजूर झाला. पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी संमेलन झाले. कराडला जेव्हा १९७५ साली आणीबाणीच्या काळात जे अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्ष दुर्गाबाई भागवत तर स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण  होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नाने पुण्यातील पु.भा.भावे यांच्या अध्यक्षते खालचे व कथालेखक  वा.कृ.चोरघडे यांच्या अध्यक्षतेखालचे  चंद्रपुर येथील संमेलन फारच गाजले होते. १९८१ मध्ये ५६ वे संमेलन मध्यप्रदेशात रायपूर येथे झाले.अध्यक्ष होते गंगाधर गाडगीळ. नगर येथे झालेले संमेलन उंचीवर नेणारेच होते. ऐतिहासिक कादंबरीकार ना.स.इनामदार अध्यक्ष होते. गुलजार उद्घाटक तर गिरीष कर्नाड समारोपात होते. एप्रिल १९९८ मध्ये परळी वैजनाथ येथे साहित्यसंमेलन झाले. द.मा.मिरासदार हे संमेलनाचे अध्यक्ष होते. समारोपात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेतादेवी हजर होत्या.आशा भोसले यांच्या गाण्यांची मैफल रंगली होती, अशा प्रकारे सामाजिक प्रश्नांवरही साहित्यसंमेलनातून भुमिका मांडण्यात आली आहे.

महिला अध्यक्षांची परंपरा

शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून महिलांना मान मिळाला तो सहा महिला साहित्यिकांना. कुसुमावती देशपांडे(ग्वाल्हेर), दुर्गा भागवत(कराड), शांताबाई शेळके(आळंदी),  डॉ.विजया राजाध्यक्ष(इंदूर), डॉ.अरुणा ढेरे(वर्धा)आणि आत्ताच्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर(नवी दिल्ली).

संमेलन गाजतात लक्षात राहातात ती उत्तम नियोजन,भोजन व्यवस्थेमुळे. अशा संमेलनातून ग्रंथ विक्री उदंड होते,ती संमेलने यशस्वी होतात. संमेलन म्हटले की वाद-विवाद सोबतच येतात. असे असले तरी जगभरातील मराठी भाषक संमेलनावर फार प्रेम करतो,गर्दी करतो. संमेलन येण्याची उत्सुकता साहित्यप्रेमी वाचकांना असते आणि संमेलन संपले की रिकाम्या मांडवाकडे पाहून हुरहुर वाटते,आणि काही दिवसांनी पुन्हा संमेलनाचे दिवस आनंद घेवून येतात..

००००

लेखक – प्रशांत गौतम

(लेखक हे साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

 

 

सारे काही मराठीसाठी…

यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी नवी दिल्ली येथे ७२ वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात ५४ वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा, महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती, आणि अ. भा. मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या 54 व्या साहित्य संमेलनाचे उद्धाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आणि स्वागताध्यक्ष होते काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे ते यंदाच. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.

केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.

अशा या विशेष संमेलनानिमित्त ‘मराठी भाषेच्या समृध्दतता व संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थाविषयी’ माहिती देणारा लेख…

मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था अशी 4 कार्यालये कार्यरत आहेत. या चार कार्यालयांकडून मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या सर्व उपक्रमांना गती देण्यात आली आहे.

राज्य मराठी विकास संस्था

पुस्तकांचे गाव भिलार या प्रकल्पांतर्गत सुरुवातीस 25 घरांमधून प्रत्येकी 500 पुस्तके वाचक/पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. लोकसहभागातून सुरू केलेल्या या प्रकल्पास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने घरांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. सध्या येथे साहित्यिक व भाषिक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता वाचकांसाठी निवास व्यवस्था, रस्ते, वाहनतळ, सार्वजनिक प्रसाधनगृह तसेच खुले प्रेक्षागृह इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

राज्य मराठी विकास संस्थेकडून अमराठी भाषिकांसाठी अध्यापन साधने विकसित करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या पुढाकाराने ‘मायमराठी’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सन 2018 मध्ये 38 लाख रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आले होते. या अनुदानात सद्यस्थितीत भरीव वाढ करण्यात आली आहे.

मराठी बोलींचे प्रतिमांकन हा प्रकल्प डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या सहाय्याने हाती घेण्यात आला असून यामध्ये 60 बोली भाषेचा समावेश करण्यात आला आहे.

दासोपंतकृत गीतार्णव शब्दार्थ- संदर्भकोश : नाथपंचकातील एक महत्वाचे कवी दासोपंत यांनी लिहिलेली गीता टीका म्हणजेच ‘गीतावर्ण’ हा ग्रंथ होय. या साहित्यकृतीची माहिती मराठी वाचकांना व्हावी, याकरिता हा प्रकल्प हाती आला आहे.

भाषा संचालनालय

भाषा संचालनालयाने दैनंदिन प्रशासन व न्याय व्यवहारात सातत्याने उपयोगी होणाऱ्या अ) कार्यदर्शिका ब) प्रशासन वाक्यप्रयोग क) शासन व्यवहार कोश ड) न्याय व्यवहार कोश या भ्रमणध्वनी ॲपचे काम पूर्ण केले असून वरील चार कोषांमध्ये सुमारे 86 हजार मराठी/इंग्रजी शब्दांचा समावेश आहे.

परिभाषा कोश अद्यावतीकरण करण्याचे काम सातत्याने सुरू असते. शासन व्यवहार कोश, कृषिशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र तसेच शिक्षणशास्त्र परिभाषा कोश या कोषांच्या अद्यावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सुमारे 34 परिभाषा कोश/शब्दकोश तसेच शासन मार्गदर्शक पुस्तकांची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ –

नवीन लेखन प्रकल्प

मराठी भाषेत मौलिक व वैचारिक विषयांवर नाविन्यपूर्ण लिखाण करण्याकरिता मंडळाकडून 20 नवीन लेखन प्रकल्प हाती घेतले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. 1) नाट्य संज्ञाकोष, 2)मराठी नाटक आणि रंगभूमीचा समग्र इतिहास 3) महाराष्ट्राच्या सामाजिक- सांस्कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास 4) महाराष्ट्र दृश्यात्मक कलांच्या परंपरांचा आढावा- बृहद्ग्रंथ प्रकल्प 5) 19 व्या व 20 व्या शतकातील अध्यात्म मार्गदर्शकाचा बोध, 6) मराठी सारस्वतांचे चित्रचरित्र 7) सत्यशोधकांचे अंतरंग 8) गुरुवर्य कृ. अ. केळुसकर यांचे समग्र वाङमय, 9) सुफी तत्वज्ञान सखोल विश्लेषण- बृहद्ग्रंथ 10) भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची ऐतिहासिक वाटचाल- एक दृष्टिक्षेप 11) महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांच्या कामगिरीचा समग्र आणि सम्यक इतिहास, 12) अभंगसेतू- संत वचनांचे अनुवाद, 13) अक्षर बालवाङमय : संहिता शोध व बृहद् संदर्भग्रंथ, 14) नक्षत्र निलनभीचे – समग्र बालकवी, 15) महाराष्ट्राच्या प्रयोगात्मक लोककला : परंपरा आणि नवता (1850 ते  2016), 16) कविवर्य नामदेव ढसाळ यांचे समग्र वाङमय- बृहद्प्रकल्प, 17) नागेश विनायक बापट यांचे समग्र वाङमय, 18) मराठीतील बालसाहित्य : इतिहास लेखन आणि समीक्षा संपादन, 19) आधुनिक महाराष्ट्र : अन्वेषणात्मक कालपट, 20) महाराष्ट्रातील नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त, गाणपत्य, चैतन्य, लिंगायत, आनंद व अन्य संप्रदायांच्या मध्ययुगीन वाङमयातील अप्रकाशित व असंग्रहित स्फुट कवितांचे प्रकाशन. दरवर्षी 27 फेब्रुवारीला, मराठी भाषा गौरव दिन समारंभाच्या वेळी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येते.

अनुदानात वाढ :

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्यांच्या 4 घटक संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या 7 साहित्य संस्थांच्या साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याकरिता आतापर्यंत या संस्थांना दरवर्षी प्रत्येकी 5 लाख रुपये इतके अनुदान देण्यात येत होते.  या अनुदानात वाढ करण्यात आली असून आता प्रत्येकी 10 लाख रुपये इतके अनुदान दिले जाते.

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ

मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 या सर्व खंडाचे काम पूर्ण झाले असून यामध्ये सुमारे 18 हजार 57 इतक्या नोंदीचा समावेश आहे. हा विश्वकोश शासनाच्या संकेतस्थळावर तसेच कार्ड, पेन ड्राईव्हच्या स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विश्वकोशाच्या नोंदीचे अद्यावतीकरण करण्याकरिता महाराष्ट्रातील विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांची मदत घेण्यात येत असून विषयनिहाय विविध 47 ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या ज्ञामंडळांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने विश्वकोशांच्या नोंदींचे अद्यावतीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आधुनिक कार्य पद्धतीने विश्वकोशातील नोंदी अद्यावत करण्यासंबंधी सर्व संबंधितांना विश्वकोश मंडळाकडून मार्गदर्शन करण्यात येते त्याकरिता वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.

0000

संकलन : विजय राऊत

विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती

 

 

टंचाईपूर्वी जल जीवन मिशनची कामे पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि. २०:    पाणी टंचाईस एप्रिल महिन्यापासून सुरुवात होते. ग्रामीण भागातील नागरिकांना टंचाई भासू नये, यासाठी जल जीवन मिशन अंतर्गतची कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी जल जीवन मिशन अंतर्गतच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, यांच्यासह जिल्हा परिषदेमधील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिक पाण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे निर्देश देवून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, विद्युत जोडणीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच निधी कमी पडत असल्यास १५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करुन घ्यावा. नळ जोडण्यांचे काम प्राधान्याने हाती घ्यावा. जिल्हा परिषदेमधील संबंधित अधिकाऱ्यांनी गाव भेटी देवून वेळोवेळी कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
या बैठकीनंतर लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या विस्तारीत इमारतीचा आढवा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या पंचायत समितीचा आणखी एक मजला वाढवायचा आहे. यासाठी साडे पाच कोटींचा निधी लागणार असून या निधीसाठी पाठपुरावा केला जाईल असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.
0000

वर्धेकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारे साहित्य संमेलन

केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभुमीवर २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा “मराठी भाषेचा जागर’ केवळ महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादीत न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांसाठी एक अविस्मरणीय क्षण असणार आहे. या निमित्ताने वर्धा येथे झालेल्या ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा धांडोळा घेणे आवश्यक आहे.

१४ जानेवारी २०२३ ला विदर्भ साहित्य संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या शताब्दी वर्षाची सांगता म्हणून विदर्भ साहित्य संघातर्फे दि. ३, ४ व ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती श्री. नरेंद्र चपळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान वर्धा नगरीला दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे. यापूर्वी १९६९ साली वर्धा येथे ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. कविश्रेष्ठ पुरुषोत्तम शिवराम रेगे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर ५३ वर्षांनंतर हा योग पुन्हा आला.

वर्धा शहराचे नाव ज्या लोकमातेवरून पडले त्या लोकमातेचे म्हणजे नदीचे नाव वर्धा आहे. तिचे मूळ प्राचीन नाव ‘वरदा’ असे आहे. वरदा म्हणजे वर देणारी. विदर्भाच्या संपन्न प्रदेशाला उत्तर-दक्षिण विभागून आसपासचा प्रदेश सुजलाम् सुफलाम् करणारी वर्धा नदी, हिच्या पाण्यात सेवाभावाचा गुण आहे. म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांनी या नगरीला आपली कर्मभूमी मानले. केवळ या दोन विभूतीच नव्हे तर जमनालालजी बजाज, बाबा आमटे, सिधुताई सपकाळ, क्रांतिवीर पांडुरंग सदाशिव खानखोजे, बापूरावजी देशमुख, वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर अशी अनेक महान रत्ने याच मातीत निर्माण झाली.

वर्धा हे जसे समाजसेवकांचे प्रेरणास्थान आहे, तसेच कलावंतांचेही प्रेरणास्थान आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त ही वर्धा शहराचीच देणगी आहे. पांढरे सोने म्हणून ज्याला गौरविले जाते त्या कापसाची शेती हे वर्ध्याचे भूषण आहे. वर उल्लेखित केलेल्या महनीयांशिवाय अनेक कलावंत, साहित्यिक, राजकारणी, समाजसेवी, शिक्षणप्रेमी आणि अन्योन्न मंडळींनी तसेच संस्थांनी वर्धा शहराच्या आणि परिणामी महाराष्ट्राच्या कीर्तीत भर घातली आहे.

वर्धा ही महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासोबतच साहित्यिक, कलावंत व पत्रकारांची भूमी आहे. त्यामुळेच वर्धा येथे पार पडलेले ९६ वे साहित्य संमेलन विशेष महत्वाचे आहे. या संमेलनाच्या साहित्यप्रेमींच्या खूप आठवणी आहेत.

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, विदर्भातील बोली भाषा, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता, समाज माध्यमातील अभिव्यक्ती: एक उलट तपासणी, वैदर्भीय वाङ्मयीन परंपरा, भारतीय व जागतिक साहित्यविश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक, कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन, वाचन पर्यायांच्या पसाऱ्यात गोंधळलेले वाचक, गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून व वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण या विषयावरील परिसंवादामधून साहित्याची विविधांगी चर्चा घडवून आणली.

कथाकथन, संमेलनाध्यक्षांची भाषणे आणि त्यावर चर्चा, मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा, एकांक गावकथा, निमंत्रितांचे कविसंमेलन, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद व स्त्री-पुरुष तुलना अशा वैविध्यपूर्ण साहित्यिक उपक्रमाची मेजवानी ही या संमेलनाची खास वैशिष्ट्य होती.

यानिमित्ताने ‘वरदा’ अत्यंत सुरेख व माहितीपूर्ण स्मरणिका आयोजकांनी केली आहे. ही स्मरणिका साहित्यिक ठेवाच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी मध्ये लेखक, साहित्यिक, कलावंत, प्रसिद्ध व नामांकित साहित्यिकांना भेटण्याचा व अनुभवण्याचा योग वर्धेकरांना दीर्घकाळ स्मरणात राहील असाच आहे.

 

रवी गिते

जिल्हा माहिती अधिकारी

वर्धा

दिल्ली येथील ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

मराठी भाषेचा इतिहास – मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी भाषेला २४०० वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. नव्या संशोधनानुसार मराठी अन् प्राकृत ह्या एकच भाषा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे. इ.स.१११० मध्ये मुकुंदराजांनी ‘विवेकसिंधु’ या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी ‘लीळाचरित्र’ लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली.

संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि ‘एकनाथी भागवत’, ‘भावार्थ रामायण’ आदि ग्रंथांची भर घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा १४०० शब्दांचा ‘राजव्यवहारकोश’ तयार करून घेतला. आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत भाषेचे पद दिले. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंघ महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. प्रदिर्घकाळ केंद्रशासनात प्रलंबीत राहिलेला मराठी भाषेच्या अस्मितेचा निशान असलेल्या मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिर झाला.

दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलन – एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रंथ व्यवहाराशी संबंधित काही मंडळी पुण्यात एकत्र आली आणि १८७८ मध्ये त्यांनी पहिले ग्रंथकार संमेलन घडवून आणले. ७१ वर्षापूर्वी नवी दिल्ली येथे १९५४ साली ऑक्टोंबर महिन्यात ३७ वे मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. त्त्यानंतर आता जवळजवळ ७० वर्षांनी यंदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

यंदाच्या ९८ व्या संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी असून, अध्यक्षपदाचा मान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे. तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत. या साहित्य संमेलनाला साहित्यिक, कवि, विचारवंत, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार असून, मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

या संमेलनात वाचन मुलाखत परिसंवाद असे वेगवेगळे एकापेक्षा एक सरस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २१ फेब्रुवारीला उद्घाटनानंतर सायंकाळी ६.३० वाजता दुसरे सत्र सुरु होईल. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. पहिल्या दिवशी सायंकाळी अखेरच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच दिल्लीतील निवडक नामवंत कवी सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार आहे. या दिंडीत साहित्यिक साहित्यप्रेमी ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील.

गोवर्धन बिसेन, गोंदिया

कवी, लेखक व समीक्षक

अभिजात मराठी भाषा..जतन आणि संवर्धन

मराठी भाषेबाबत महाराष्ट्रात माता व बालक यांच्या मधील संवादाची जी बोलीभाषा असते तिलाच मराठी मातृभाषा संबोधले जाते. मराठी माणूस जेथे वस्ती करीत राहिले तेथे संवाद साधताना रोजच्या वापरात, व्यवहारात रूढ असलेली मराठी भाषा मातृभाषा प्रचलित झाली. अन त्याच भाषेत शालेय विद्यार्थी शिक्षण घेत, अभ्यास करीत, मराठी भाषेला समृद्ध करू लागले. प्रत्येक तालुका, जिल्हाच्या गावागावातून बोलीभाषा ऐकायला वेगळी वाटली, तरी बोललेली समजते, कळत असते. या भाषेत शब्दकोष भांडार विपुल आहे, हे मराठी वाड•मयाचा अभ्यास करताना आढळून येते. मराठी संत साहित्य याचा अभ्यास करताना भाषा विविध अलंकाराने नटलेली वाक्प्रचार, म्हणी यांच्या सौंदर्याने सजलेली समृद्ध अन आकर्षक अशी जाणवते.

अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मराठी सकल जणांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. शब्दांचे मतितार्थ अन् भाव, आशय समजून उच्चार करताना शब्द उच्चारले पाहिजे. व्याकरणाचा अभ्यास करून त्यातील बोलीतून येणारा भेसळपणा दूर केला पाहिजे. जनमानसात ती टिकून राहण्यासाठी चर्चा सत्रे, निबंध अन काव्य स्पर्धा, प्रश्न मंजुषा, शिबिरे, इत्यादी आयोजित करावयास पाहिजे, नुसतेच मराठी भाषा दिन साजरे करीत, पुढे गप्प राहून उपयुक्त नाही. अगदी शिशु वर्ग, पूर्व प्राथमिक, माध्यमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाविष्ट करून अभिजात मराठी भाषेचा प्रचार अन् प्रसार करायला पाहिजे. बक्षिसे, शिष्यवृत्ती अन् पुरस्कार, पारितोषिके आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. दानशूर प्रायोजक यांना सहभागी करून निरंतर कार्यक्रम राबविले पाहिजे. शासन दरबारी भाषेचे महत्व अधोरेखित करीत तिचा वापर व्यवहारात वाढविणे गरजेचे आहे.

राज्यातील इंग्रजी भाषा माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयांमधून मराठी भाषेला डावलून हद्दपार करू नये, म्हणून सर्वांनीच जागरूक राहायला पाहिजे. शासनाच्या सर्वच विभागातून अन् मंत्रालयीन कामकाज, तसेच न्यायालयीन स्तरावरील कामकाज काटेकोरपणे मराठी भाषेतून होते किंवा कसे हे दक्ष राहून पाहायला हवे. सर्वच स्तरावर भाषा विकासाचे, समृद्धीचे शर्थीचे प्रयत्न करताना आताच्या तरुण पिढीतील युवक-युवतींना मराठी ग्रंथालये, आध्यात्मिक साहित्य, संत साहित्य वाड•मय व इतर अवांतर वाचनाकडे वळविले पाहिजे तरच अभिजात मराठी भाषेला उत्कर्षांचे दिवस मिळाल्याचे आपणा सर्वांना पाहावयास मिळेल, असे जाणवते.

आपली अभिजात मराठी भाषा ही स्वतःच्या भाषिक सौंदर्यावर ठाम उभी आहे, तिला इतर कोणत्या भाषिकांनी नव्हे तर सुशिक्षित अन सुसंस्कृत मराठी माणसांनीच भक्कम आधार देणे गरजेचे आहे. स्वतंत्र लिपी, स्वर, व्यंजन, वर्ण, व्याकरणाच्या नियमांनी ती बद्ध आहे. विविध विषयावर साहित्य संपदा विपुल असून आपल्या महाराष्ट्र मधील लोकांची लोकभाषा आहे. प्राचीन काळातील शिलालेख यावर ही मराठी कोरीव अक्षरे, उत्खननाच्या वेळेस इतिहासकार तज्ञांना संशोधनात त्याबाबतचे पुरावे मिळालेले आहेत.

मराठी माणसांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या अपत्यांना, पाल्यांना वाचन संस्कृती चे महत्व विषद करून भाषेचे संस्कार रुजविले पाहिजे. ही सुरुवात प्रत्येक घराघरातून व्हायला हवी. त्यांची भाषेबाबतची गोडी वाढवायला हवी. जितकी मराठी अस्मिता आपण त्यांच्यामध्ये जागृत ठेवू, तितका अभिजात मराठी भाषेचा स्तर व अभिमान वाढतच राहील. उच्च अभिरुची अन् उच्च दर्जा असणारी अभिजात मराठी भाषा ही प्रत्येकास स्वतःच्या आईइतकीच प्राणप्रिय असायला हवी. मराठी भाषेच्या समृद्धीची आणि विकासाची जबाबदारी आपल्या सर्व मराठी समाज बांधवांची आहे, एवढेच नव्हे तर ते प्राधान्याने आद्य कर्तव्य समजून जाणीवपूर्वक सजगतेने आपापल्या परीने प्रयत्न करीत आपल्या या अभिजात मराठी भाषेला वैभवाचे दिवस येण्यासाठी सतर्क अन् जागरूकच राहायला पाहिजे, असे मला अभ्यासू प्रवृत्ती, वाचनाअंती मनापासून कळकळीने जाणवते !!!

मराठी भाषेमध्ये प्रभावी लेखन आपल्या पूर्वसूरींनी अजरामर करून साहित्यात पूर्वापार त्यात पिढीगणिक लेखकांनी भर घालून वाचकांसाठी अमोल नजराणाच ठेवलेला आहे, अन् प्रत्येक मराठी ग्रंथालये यामध्ये विपुल ग्रंथसंपदा आजवर तेथील व्यवस्थापक यांनी अमूल्य ठेवा आपला सर्व प्रयत्नांनी जतन करून ठेवलेला आहे, वाचकप्रिय वाचकांसाठी कायम उपलब्ध करून दिला आहे. तिथे स्वतः जाऊन वाचकांनी वाचण्याचा आस्वाद घ्यायला हवा, अन् आपल्या पाल्यांना तेथे त्यांच्यासोबत जाऊन भेटी द्यायला पाहिजे. त्यांनाही त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन गोडी लागेल अन ज्ञान समृद्ध होतील, अशी आशा जाणवते.

निरनिराळी विषयांवरील पुस्तकांच्या वाचनाने बुद्धीची भूक शमवली जाते अन् व्यक्ती सकारात्मकतेने विचार करण्यास प्रवृत्त होतो. विचारांना आखीव रेखीव दिशा मिळून खंबीरता प्राप्त होते. अन् निर्णयक्षम होऊन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज होतो. यासाठीच पालकांनी न कंटाळता अपत्यांकडून पुस्तकाचे वाचन करून घेतले पाहिजे. पुस्तकाने मानवाचे मस्तक हे सशक्त होत असते. सशक्त झालेले मस्तक कधीच कुणाचे हस्तक होत नसते. अन् हस्तक न झालेले मस्तक कुणापुढे नतमस्तकही होत नसते. लोक स्वतःहून वाचन संस्कृती जपत वाचनालयाकडे वळतील, तेथील पुस्तके वाचतील तरच स्वबुद्धीच्या बळावर स्वतःचे प्रश्न सोडवू शकतील. देशाचे भवितव्य, नाव उज्ज्वल तर होईलच, प्रगतीही कोणी रोखू शकणार नाही. यासाठी तरी भाषेचे संस्कार मनस्वी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांच्या मनावर रुजविले पाहिजे, असे मला अनुभवांती सांगावेसे वाटते.

लेखन:-

सौ.मीना घोडविंदे (वनगे),

साहित्यिका, ठाणे

(8451997915)

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची स्थापना करणार – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार

मुंबईदि. 20 : मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चेअरची (अध्यासन) स्थापना केली जाणार असून या अध्यासन केंद्रात प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी दोन स्वतंत्र वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मुंबई विद्यापीठात केली.

मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रलोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकेंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादवमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णीप्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरेकुलसचिव डॉ. प्रसाद कारंडेप्रा. मनिषा करणेअनिल कुमार पाटीलप्रभात कुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. वीरेंद्र कुमार म्हणालेसंविधान अमृत महोत्सव हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संविधान  जगण्याची चौकट आणि समानतेचं प्रतीक – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्याचे मोठे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. संविधान ही जीवन जगण्याची चौकट आहे. भारतीय संविधान बदलले जात असल्याचा चुकीचा प्रचार केला जात आहे. महिलांना विधानसभा व लोकसभेत ३३ टक्के आरक्षणसर्वाना मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना आर्थिक निकषांवर नोकरीत आरक्षण अशा तरतुदी करण्यात आल्या. भारतीय संविधान हा एक जिवंत दस्तऐवज असून तो वाचून समजून घेणे महत्वाचे आहे. आपल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणीव संविधानामुळे होत असून सामाजिकआर्थिक जीवन जगण्याचा मार्ग संविधानामुळे मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला त्याबद्दल आपण सदैव त्यांच्या ऋणात राहू, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअरदोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जाहीर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांचे आभार मानले. विद्यापीठामार्फत लवकरच या अनुषंगाने प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे सांगून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनी आपल्या उदबोधनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

अभिजात मराठी भाषा संवर्धनासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न व्हावेत – ९८ व्या अ.भा.म.सा.सं.अध्यक्ष प्रा. डॉ. तारा भवाळकर

नवी दिल्ली येथे दि. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत अखिल भारतीय साहित्य संमेलन होत असून सांगलीच्या प्रा. डॉ. तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्ष असल्याने सांगलीकरांना याचा वेगळाच आनंद आहे. यानिमित्त त्यांची घेतलेली मुलाखत—-

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे हे संमेलन होणार आहे. प्रा. डॉ. तारा भवाळकर हे नाव मराठी साहित्य लोक साहित्य आणि रंगभूमीच्या अभ्यासात प्रसिद्ध आहे. ताराबाई सुरुवातीपासून शिक्षिका आहेत तशाच लोकशिक्षिका म्हणूनसुद्धा त्यांची ख्याती आहे. त्यांच्या व्याख्यानात नेहमीच प्रबोधनाची दिशा आणि नवी माहिती असते. या निमित्त डॉ. भवाळकर यांच्याशी साधलेला संवाद…

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपण अध्यक्ष आहात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना मराठी साहित्य व मराठी साहित्य संमेलनाबद्दल आपल्याला काय वाटते?

साहित्यिकदृष्ट्या ग्रामीण भागातील सामान्य माणूस जागा होत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नवीन माणसं लिहायला  लागली आहेत. ज्यांच्या घरात पूर्वी लेखन, वाचन नव्हते, अशी मुलं, मुली लिहायला लागली आहेत. ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते सर्वजण अभिव्यक्त होताना दिसतात. व्हॉट्सअप, फेसबुकसारख्या आधुनिक साधनांच्या माध्यमातून लेखक, कवी अभिव्यक्त होत असतात. त्यांची साहित्य संमेलने छोट्या स्वरूपात का होईना, पण होत असतात. वेळेच्या मर्यादेमुळे राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संमेलनात साहित्यिकांना कमी वाव मिळणे स्वाभाविक आहे. अशा वेळी माझ्या सांगलीसारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये वर्षाला दहा ते पंधरा संमेलने होतात. त्यामुळे मराठी साहित्याचा मंच अनेक लोकांना उपलब्ध होत आहे आणि स्थानिक लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. लिहिणाऱ्यांना त्यातून प्रोत्साहन मिळत असते आणि त्यातूनच लेखक पुढे येत असतात. लोकल टू ग्लोबल म्हणजेच स्थानिक ते जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठीच्या प्रवासाची ही सुरवात आहे, असे माझे निरीक्षण आहे.

 अभिजीत भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला नवीन ऊर्जा मिळाली का?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा म्हणून शासकीय मान्यता मिळाल्यानंतर एक मराठी व्यक्ती म्हणून समाधान वाटले. केवळ सरकारी शिक्कामोर्तब झाले म्हणून भाषेचा दर्जा एकदम वाढत नाही. त्यातून आर्थिक फायदे मिळण्याची शक्यता आहे. शासनाकडून मराठी भाषक, संस्था, विद्यापीठ, नवलेखक आणि संशोधकांना आर्थिक सहाय्य होऊ शकेल. त्यातून प्रकाशन संस्था निघू शकतील आणि त्या निघाव्यात, त्यासाठी मराठी जाणकार भाषकांनी अधिक प्रयत्न करायला हवेत. केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून स्वस्थ बसून चालणार नाही तर तो वाढवणं आणि टिकवणं हे मराठी भाषकांच्या हातात आहे. एकीकडे मराठी भाषेचा अभिमान बाळगत असतानाच त्या अभिमानाच्या अंमलबजावणीसाठी मराठी भाषक, मराठी माणसे काय करतात, याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी लोकांना तिच्याबद्दल आपुलकी असणे गरजेचे आहे. मराठी भाषक आणि मराठी लोकांनी त्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा आता ज्ञानभाषा कशी करता येईल?

यासाठी सर्व समाजानेच प्रयत्न करायला हवेत. शिक्षण संस्थांनीसुद्धा त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मुख्य म्हणजे मराठी बोलणाऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. मराठीचा अभिमान बाळगायला हवा. मनातील स्वभाषेविषयीच्या न्यूनगंडातून सर्वप्रथम बाहेर यायला पाहिजे. त्यानंतरच ती ज्ञानभाषा करण्यासाठी प्रयत्न होतील. ज्ञान याचा अर्थ नव्याने एखाद्या गोष्टीचे भान येणे आणि ते आपल्या भाषेतून व्यक्त करणे. हिंदी किंवा इंग्रजीमधून सांगितले की जगाच्या पाठीवर ते पसरेल, असा समज आहे. ज्ञान तुमच्याजवळ असेल तर ते घेण्यासाठी तुमची भाषा आपणहून शिकण्यासाठी इतर ठिकाणहून लोक यायला पाहिजेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान, जर्मनी सारख्या अन्य देशांची उदाहरणे पाहता त्यांच्याकडील अद्ययावत तंत्रज्ञान, यंत्रज्ञान त्यांनी त्यांच्या भाषेतच उपलब्ध करून दिले. त्यामुळे ते तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी आधी त्यांची भाषा अवगत करणे अपरिहार्य असते. त्याचप्रमाणे मराठीमध्येही तसे ज्ञान, तंत्रज्ञान, यंत्रज्ञान, अभियांत्रिकी, तत्त्वज्ञान, वैद्यकशास्त्र असेल तर मराठी भाषा अन्य लोक स्वतःहून शिकतील. त्या दर्जाचे संशोधन, लेखन करणारी मराठीतील शहाणी आणि आत्माभिमानी माणसं निर्माण व्हायला पाहिजेत.

भाषा आणि लिपी यांच्यातील अनुबंधाकडे आपण कसे पाहता?

भाषा आणि लिपी यांच्यात अनुबंध आहे, तो शिक्षितांनाही माहिती नसतो. मी तंजावरला व्यंकोजीराजे भोसलेराजे यांनी केलेल्या कार्याचा आणि साहित्य संग्रहाचा अभ्यास केला. त्याठिकाणी अनेक नाटकांची हस्तलिखिते सापडली आहेत. त्यातील गंमत अशी की त्या नाटकांची भाषा मराठी पण लिपी तमिळ, तेलगु किंवा कन्नड आहे. भाषा कन्नड पण लिपी देवनागरी आहे. गुजराती लोकसंस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या माझ्या परिचयातील एका व्यक्तिने गुजराती भाषेत पुस्तक लिहिले आहे, पण ते देवनागरी लिपीत छापले. त्याचा परिणाम असा झाला ज्यांना गुजराती येत नाही, पण देवनागरी येते त्यांनी ते वाचले तर त्यांना त्यातील 70 ते 80 टक्के आशय सहज समजतो. गोव्यामध्ये कोकणी तसेच मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिणारे, वाचणारे, काम करणारे आहेत. त्यातील एक लेखिका कोकणी भाषेत लिहिते, मात्र ती लेखनासाठी देवनागरी लिपी वापरते. त्यामुळे तिने लिहिलेलं साहित्य आपल्याला 80 ते 90 टक्के समजते. त्या भाषांमध्ये उच्चारांचा थोडासा फरक वगळला तर बऱ्याच गोष्टी समान असतात आणि लिपीमुळे आपल्याला त्या उलघडतात.

भाषा किंवा कोणत्याही भाषेतील साहित्याच्या वाढीला राज्यांच्या सीमांची बंधने आहेत, असे वाटते का?

माझ्या मते कोणत्याही सीमाप्रदेशातील सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सीमा नाहीत. असल्या तर त्या फार पुसट आहेत. भौगोलिक सीमा प्रदेशांमध्ये राहणारी मंडळी उभयभाषक आहेत. आपण एकीकडे बहुभाषक असतो किंवा शाळांमध्येही जागतिक भाषा शिकण्यासाठी आग्रही राहतो. त्यामुळे आपल्या लगतच्या राज्यातील भाषांचे, भाषाभगिनींचे शिक्षणही या माध्यमातून अंगिकारले जाते. माझ्या मते सीमा प्रदेशातील लोक विशेषतः शाळा, महाविद्यालयात शिकणारी मुलं ही भाषेच्या समृद्धीमुळे जास्त श्रीमंत आहेत. कारण ते उभय भाषांमध्ये व्यवहार करतात. तसेच सीमाभागात मोठ्या प्रमाणावर साहित्य संमेलन होत असतात. सीमा भागांमध्ये दोन्ही भाषांमध्ये आदान प्रदान करणाऱ्या संस्था आहेत. तिथे अनुवादकांचा सत्कार केला जातो. साहित्यानं तो ऋणानुबंध टिकवून ठेवला आहे. भाषिक सीमा राजकारणामुळे दुभंगल्या असल्या तरी चाली, रीती, रूढी, लोकसंस्कृती, श्रद्धा, खाद्यपदार्थ यांचं आदानप्रदान सीमाप्रदेशात झालं आहे आणि आजही ते सुरू आहे.

मराठी भाषा संवर्धनात अन्य भाषक किंवा ब्रिटिश राज्यकर्त्यांची भूमिका कोणती होती?

आपल्याकडे जेव्हा इंग्रज प्रथम आले, त्यावेळी त्यांना आपल्या गोष्टींबद्दल उत्सुकता निर्माण झाली. संस्कृतमधील नाटकं, वेद उपनिषदे यासारखे ग्रंथ यामध्ये काय आहे, हे समजण्यासाठी इथं आलेले ब्रिटिश लोक प्रथम संस्कृत शिकले. त्यांनी संस्कृतची अक्षरशः संथा घेतली. मॅक्समुल्लरसारख्या विद्वानांना ज्ञानाची ओढ होती. युरोपमधून व्यापारासाठी लोक आले, राज्य करण्यासाठी आले. त्यांनी ज्या प्रांतामध्ये धर्म, व्यापाराचा प्रसार करायचा असेल, त्या त्या प्रांतातील भाषांचे प्रथम शिक्षण घेतले. पोर्तुगालमधील लोक गोव्यात आल्यानंतर मराठी, कोकणी भाषा शिकले. मराठीतील पहिलं व्याकरण युरोपियन माणसाने लिहिलं. विरामचिन्हं इंग्रजांनी दिली. मराठीतील पहिले पुस्तक छापलं ते कोलकात्याजवळील मिशनच्या एका छापखान्यात. हे मराठी माणसाने केलं नाही. हे भारतीय माणसानं केलं नाही. त्यांच्या हेतूसाठी का होईना इंग्रज आपली भाषा शिकले. आम्ही त्यांची भाषा शिकायला लागलो. आमच्या सांगलीसारख्या छोट्या संस्थानात इंग्रजी बुक वाचणारा कोणी आला तर त्याचे कौतुक वाटे. पण मराठी शिकणारा कोणी आला तर त्याचे फारसे कौतुक वाटले नाही. ते काम ख्रिश्चन धर्मगुरू फादर स्टिफनसनने गोव्यामध्ये केलं. मराठीचं कौतुक जसं ज्ञानेश्वरांनी केलं तसं सातासमुद्रापारहून आलेल्या फादर स्टीफनसनने मराठी भाषा शिकून मराठी भाषेची स्तुती केली.’ जैसी पुष्पामाजी पुष्प मोगरी, परिमळामाजी कस्तुरी, तैशी भाषा माझी साजरी, भाषा मराठी’ या शब्दात फादर स्टीफनसनने मराठी भाषेचं कौतुक केलं. या पार्श्वभूमिवर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ७५ वर्षांनंतर आम्ही मराठी लोक काय करतो, याचं आत्मपरीक्षण करावं लागेल.

मराठी माध्यमातून शिकलेली मुलं स्पर्धेच्या सर्व क्षेत्रात कमी पडतात असे वाटते का?

अलीकडच्या काळात इंग्रजी भाषेत शिकलं तर त्याला प्रतिष्ठा. जुन्या काळात जसं संस्कृतमधून बोललं कि पांडित्य होतं, तसं सध्याचं पांडित्य इंग्रजीत आहे. अगदी ग्रामीण भागातील पालकांचाही आपल्या मुलांनी इंग्रजीत शिकावं, असा आग्रह असतो. इंग्रजीला प्रतिष्ठा आहे, हा शहरी लोकांचा अपसमज आहे आणि तो ग्रामीण भागापर्यंत रूजवला जातोय. पण, माझ्या मते मराठी माध्यमातून शिकलेली मुलं कुठेही कमी पडत नाहीत. याची अनेक यशस्वी उदाहरणे देता येतील.

मराठी भाषकांमधील हा न्यूनगंड दूर करण्यासाठी काय उपाय आहे?

वास्तविक आमच्या देशाची संस्कृती प्राचीन आहे, तत्त्वज्ञान मोठं आहे. मग आमच्या देशातील उच्चवर्णीय, उच्चशिक्षित पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना का असावी? माझा मुलगा परदेशात नाही गेला तर दुसरा मार्गच मिळणार नाही, असे त्यांना का वाटते, असा मला प्रश्न पडतो. एकीकडे आम्ही अभिजात दर्जा मिळाला म्हणतो, त्यावेळी मुंबईसारख्या महानगरात मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत, हे खेदजनक आहे. जपानसारखा दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला देश राखेतून ताठ मानाने उभा राहिला. आमची भाषा शिकल्याशिवाय तुम्हाला आमचे तंत्रज्ञान मिळणार नाही, असे म्हणतो. तेव्हा मराठी जनांनी आपल्या मुलांना आग्रहाने मराठी शिकवलं पाहिजे आणि त्यांना प्रवृत्त केले पाहिजे कि तुम्ही संशोधन करा व मराठी भाषेमध्ये मांडा कि ते तंत्रज्ञान शिकण्यासाठी लोक तुमच्याकडे आले पाहिजेत. अशा शिक्षणासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न सर्वच स्तरातून केले गेले पाहिजेत.

लोकसाहित्यावर आपण खूप संशोधन, संकलन केले आहे. त्याबद्दल थोडेसे….?

लोकसाहित्याबद्दल म्हणाल तर काही अपसमज आहेत. लोकसाहित्य ग्रामीण असते, अशिक्षित लोकांचे असते, भूतकाळातील असते असे काही समज आहेत. खेडेगावातील महिलांनी जात्यावर दळण दळत असताना ओव्या लिहिल्या. या सर्वांशी आमचा संबंध नाही असे शहरी लोकांना वाटते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये करमणुकीचे साधन व पैसे देणारे साधन म्हणून गोंधळ, जागरण, पोवाडा, लावण्या काही अंशी टिकले आहे. कारण त्यामध्ये गीत, नृत्य, नाट्य, वाद्य आहे. त्या सगळ्याचा संगम म्हणून ते नृत्यनाट्य सादर होत आहे. मात्र त्यातील धार्मिक भावना, संस्कृतीची गुंफण होती, ते श्रद्धाविश्व गळून पडले आहे. त्यामध्ये नकळत धर्मश्रद्धेचा धागा असतो, तो क्षीण झाला आहे, त्याचे स्वरूप बदलले आहे. त्या पार्श्वभूमिवर त्यातील कलात्मक घटकांचा विकास होण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्याचा इथून पुढे आपण कसा वापर करणार, यावर विचार व्हायला पाहिजे.

स्त्रीवादी किंवा स्त्रियांनी लिहिलेलं साहित्य तसंच लोकसाहित्याबद्दल काय सांगाल?

एकूणच साहित्यामध्ये निरनिराळ्या क्षेत्रातील, निरनिराळ्या सामाजिक स्तरातील महिला लिहित आहेत. व्यक्त होत आहेत. आदिवासी महिला, ग्रामीण भागातील महिला लिहित आहेत. केवळ शिक्षण घेतल्यानंतर महिला शहाण्या झाल्या, हा माझ्या दृष्टीने अपसमज आहे.

लोकसाहित्यातील महिलांचा विचार करता, त्यांच्या लेखनातून महिला पहिल्यापासून खूप शहाण्या आहेत, असे मला वाटते. आमच्याकडे स्त्रियांबद्दल पुरुष काय म्हणतात त्याचा विचार झालेला आहे. मात्र महिला, घरातील स्त्री स्वतःबद्दल काय म्हणते हे कोणी नीट पाहिलं नाही. तथाकथित स्त्रीमुक्ती वादी महिला म्हणते त्याच्यापेक्षा जात्यावर दळण दळणारी बाई जास्त क्रांतिकारी बोललेली आहे हे मी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ती बोलून दाखवत होती फक्त ते ऐकायला कोणी नव्हतं. बहिणाबाईंनी अशिक्षित असूनही अनेक शब्दांच्या व्युत्पत्ती सांगितल्या. संत स्रिया आधुनिक कवियित्रींच्या खूप पुढे होत्या.

वाचनसंस्कृती वाढण्यासाठी काय करायला पाहिजे?

पुस्तकांचे ढीग आणून टाकले म्हणजे वाचन संस्कृती वाढत नाही. माणसांना आतून वाटल्याशिवाय, पोटातून वाटल्याशिवाय ते ओठात येणार नाही. माणसांना ज्ञान संपादनाची निकड वाटली पाहिजे आणि ते ज्ञान संपादन ज्या मार्गाने होत असेल त्या मार्गाने केले पाहिजे. ऐकून, वाचून किंवा अन्य भाषा शिकून ज्ञानसंपादन केले पाहिजे. मला नवीन काहीतरी शिकायचं आहे आणि मी ते वाचनातून संपादन करेन असे माणसाला वाटले पाहिजे. कविता, कथा किंवा कादंबरी असे सर्व साहित्यप्रकार शिकवतात. आपल्याला फक्त ते नीट वाचता आलं पाहिजे.

साहित्य क्षेत्रात नव्या पिढीकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?

ग्रामीण भागातील मुलं, मुली नव्याने लिहायला लागली आहेत. पुस्तकं मोठ्या संख्येने प्रकाशित होत आहेत. छोट्या छोट्या गावांमध्ये प्रकाशक पुढे येत आहेत. सुदैवाने काही जणांना स्वखर्चाने पुस्तक प्रकाशित करण्याची आता ऐपत निर्माण झाली आहे. एकूणच खर्च करण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. साहित्याच्या दृष्टीने पुस्तके विकत घ्यावीत, स्वखर्चाने पुस्तके प्रकाशित करावीत असे नव साहित्यिकांना तसेच लोकांना वाटते आहे. यातून पुस्तकाबद्दलची आस्थाच प्रगट होत आहे. ही गोष्ट माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

 (शब्दांकन – संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)

प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ग्रंथसंपदा

 राणीसाहेब रूसल्या (एकांकिका), मधुशाला (बच्चनकृत काव्य अनुवाद), यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा आ. 1, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा आ. 2, प्रियतमा (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा), लोकनागर रंगभूमी, महामाया (डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या सहयोगाने), मिथक आणि नाटक, लोकसंचित, लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा, स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, माझिये जातीच्या, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, आचार्य जावडेकर : पत्रे आणि संस्मरणे, लोकसाहित्य, वाडमय प्रवाह, कुमारभारती, बारावी संपादन, मराठी लोकसाहित्य एम.ए. भाग 1 व 2 साठी, मराठी नाटक : नव्या दिशा नवी वळणे, मायवाटेचा मागोवा (स्त्रीवादी दृष्टिकोनातून लोकसाहित्याचे पुनराकलन), तिसऱ्या बिंदूच्या शोधात, लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा, बोरीबाभळी (रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्री विषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना, पायवाटेची रंगरूपे (आत्मकथनपर लेखसंग्रह) आकलन आणि आस्वाद, लोकसंस्कृतीची शोधयात्रा (डॉ. रा. चिं. ढेरे व्यक्ती आणि वाड्मय), माझिये जातीच्या (दुसरी आवृत्ती), लोकांगण (लोकसंस्कृती विषयक), लोकसाहित्याच्या अभ्यास दिशा, मनातले जनात (ललित लेखसंग्रह), निरगाठ सुरगाठ (ललित लेखसंग्रह), मातीची रूपे (लोकसंस्कृती विषयक), मरणात खरोखर जग जगते (कथा संग्रह), नाट्याचार्य खाडिलकर चरित्र, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (दुसरी आवृत्ती), स्नेहरंग (साहित्यातील व्यक्तीचित्रे), लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा, प्रातिभ संवाद : संपादन मुकुंद कुळे, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद, सीतायन, कथा जुनी तरी नवी, मुक्तिमार्गाच्या प्रवासिनी.

00000

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

0
मुंबई, दि.१४ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, अमरावतीचे...

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...