बुधवार, ऑगस्ट 13, 2025
Home Blog Page 1687

अल्पसंख्याकांच्या उन्नतीसाठी प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सय्यद शेहजादी

मुंबई, दि. 10 : अल्पसंख्याक विकास विभागाअंतर्गत शासन राबवित असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ सर्व अल्पसंख्याक समुदायापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रम आखला असून, या कार्यक्रमांतर्गत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी तसेच दर तीन महिन्याने आढावा घेण्यात यावा, अशा सूचना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या (भारत सरकार) सदस्य सय्यद शेहजादी यांनी दिल्या.

आज मंत्रालयात श्रीमती शेहजादी यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रम आणि केंद्र पुरस्कृत तसेच राज्य पुरस्कृत अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्य शासनाच्यावतीने त्यांचे स्वागत केले. अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, उपसचिव मोईन ताशिलदार, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, यांच्यासह गृह, उच्च व तंत्रशिक्षण, महिला व बालविकास, वक्फ बोर्ड अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व समुदायास शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. जास्तीत जास्त महिला तसेच अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांपर्यंत व्यावसायिक, तांत्रिक आणि उच्च शिक्षणासाठी असलेल्या योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी प्रयत्न करावेत. वक्फ बोर्डने  मदरसा रजिस्टर कराव्यात, जिल्हास्तरावर जिल्हा अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करण्यात यावी. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी कर्जाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र राज्य उर्दू अकॅडमी मार्फत २६ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे मुशायराचे आयोजन करावे, त्याची प्रसिद्धी करावी.

राज्यात मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख, पारसी, ज्यु जनसमुदाय अल्पसंख्याक समुदायाअंतर्गत येत असून, एकूण लोकसंख्येच्या 19.89 टक्के अल्पसंख्याकांची लोकसंख्या असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांनी दिली.  मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, राज्य अल्पसंख्यांक आयोग, राज्य हज कमिटी, राज्य उर्दू साहित्य अकादमी, वक्फ बोर्ड, राज्य वक्फ न्यायाधिकरण, माध्यमिक पूर्व आणि माध्यमिक नंतरची शिष्यवृत्ती, मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनमार्फत शैक्षणिक सुविधा पुरविणे, अल्पसंख्याक शाळांमार्फत, उच्च व तंत्रशिक्षण, आयआयटी मार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे आणि रोजगार उपलब्ध होण्यास सहकार्य करणे तसेच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती  सचिव डॉ. यादव यांनी यावेळी दिली.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 10 : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (PWL) मध्ये 94 हजार 251 व आवास प्लस (ड यादी) मध्ये 41 हजार 191 असे एकूण 1 लाख 35 हजार 442 भूमिहीन लाभार्थी असून आतापर्यंत 66 हजार भूमिहीन लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 69 हजार 442 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

कोणताही भूमिहीन लाभार्थी गृहनिर्माण योजनांपासून वंचित राहू नये याकरिता राज्य शासनाने विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यासाठी रक्कम रू 50,000 इतके अर्थसहाय्य पुरविण्यात येत असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत 3,308 इतक्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून देणे या योजनेंतर्गत 23,530 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. निवासी जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करणे या योजनेंतर्गत 12,142 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. इतर मार्ग जसे – बक्षीसपत्र, भाडेपट्टा इ. द्वारे 27,020 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. तसेच राज्यात ज्या ठिकाणी जागांची उपलब्धता कमी आहे वा किमती जास्त आहेत, अशा ठिकाणी भूमिहीन लाभार्थींच्या जागेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना एकत्रित करून त्यांच्या 1,782 बहुमजली इमारती व 1,010 हाऊसिंग कॉलनी उभारण्यात आल्या असून, 45 हाऊसिंग अपार्टमेंटची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. त्या बरोबरच ग्रामपंचायतस्तरावर 5,579 लँड बँकची निर्मिती करण्यात आली असून उर्वरित ग्रामपंचायतींमध्येही काम सुरू असून त्याद्वारे मोठ्या प्रमाणात जागेचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे मंत्री श्री.महाजन यांनी सांगितले.

त्याचबरोबर शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरावर व विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरावर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करतानाची मुद्रांक शुल्क एक हजार रुपये, मोजणी शुल्कामध्ये 50 टक्के सवलत, 500 चौरस फूट जागा खरेदी करताना तुकडे बंदी कायद्यातील अट शिथिल, महसूल विभागाव्यतिरिक्त इतर विभागांच्या जागांवरील अतिक्रमणे नियमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना, मागासवर्गीय लाभार्थींचे अतिक्रमण विनामूल्य नियमानुकूल करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात अमृत महाआवास अभियान 2022-23 मधून भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देण्याच्या कामात गतिमानता आणणेसाठी हा उपक्रम अग्रक्रमावर ठेवण्यात आला असून या अभियानात 100 टक्के भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास मंत्री श्री.महाजन यांनी दर्शविला आहे.

राज्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा, याकरिता राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व अटल बांधकाम कामगार आवास योजना इ. योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतर्गत राज्यास 20,20,243 इतके उद्दिष्ट प्राप्त असून 19,24,999 घरकुलांना मंजुरी देण्यात आली व 13,19,470 इतके घरकुले पूर्ण व 6,05,529 इतकी घरकुले प्रगतीपथावर आहेत. यापैकी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील 14,22,935 उद्दिष्टांपैकी 14,08,573 मंजूर असून त्यौपकी 9,51,600 घरकुले पूर्ण व उर्वरीत 4,56,973 प्रगतीपथावर आहेत. राज्य पुरस्कृत आवास योजनेतील 5,97,308 उद्दिष्टांपैकी 5,16,426 मंजूर असून त्यापैकी 3,67,870 घरकुले पूर्ण व उर्वरित 1,48,556 प्रगतीपथावर असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांनी दिली आहे.

0000

संजय ओरके/वि.स.अ/१०.१.२०२३

शासकीय पत्रांवर मुद्रित होणाऱ्या बोधचिन्ह, घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण

मुंबई, दि. १० : मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व मंत्री महोदयांच्या आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.

मंत्रालयीन प्रशासकीय सेवांचे बोधचिन्ह आणि ‘जनहिताय सर्वदा’ घोषवाक्य हे त्या सेवेतील सदस्यांना प्रेरणा देण्याचे आणि कार्याप्रति निष्ठा निर्माण करण्याचे कार्य करीत असते म्हणून आता मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागाकडून निर्गमित होणाऱ्या पत्रांवर महाराष्ट्र प्रशासनाच्या परंपरेस साजेसे, असे बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार आहे.

00000

राजू धोत्रे/विसंअ/

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १० :- ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल. या लोकोत्सवाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही. यात शासनाचे विविध विभाग सहभागी होतील. लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य राहील,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीमठ येथे होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तव, आमदार महेश शिंदे, विविध विभागांचे सचिव, या लोकोत्सवाचे संकल्पक कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह, संयोजन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

कणेरीमठ (ता. करवीर) येथे २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान लोकोत्सव आयोजित कऱण्यात आला आहे. यामध्ये विविध परिषदा, प्रदर्शने आणि चर्चासत्र-परिसंवाद यांचे आयोजन करण्यात येणार आहेत.

पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनासाठी पर्यावरण विभाग समन्वयक काम करेल. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे नोडल अधिकारी म्हणून काम करतील. त्यांना सर्व विभाग सहकार्य करतील, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पर्यावरणीय समतोल विषयी जनजागृती ही काळाची गरज आहे. समाजाची गरज आहे. अतिवृष्टी, बर्फ वितळणे या गोष्टीं आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी ही गरज ओळखून या लोकोत्सवाचे नियोजन केले आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यावरण रक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारतात जी-२० परिषद होत आहे. या परिषदेचे बोधवाक्यही वसुधैव कुटुम्बकम् असे आहे. भगवान श्रीकृष्ण यांनीही आपल्याला हीच शिकवण दिली आहे. त्यामुळे पंचमहाभूत लोकोत्सव आणि जी-२०चे आयोजन हा योगही जुळून आला आहे. स्वामीजींच्या नियोजनाची, तयारीची चुणूक बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी अनुभवली आहे.

कणेरी मठाच्या माध्यमातून स्वामीजीं अनेक लोकाभिमुख कामे अविरतपणे करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या लोकोत्सवाच देशभरातून मान्यवर, स्वयंसेवक येणार आहेत. हा लोकोत्सव यशस्वी करण्याची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे. हे समाजासाठी अपेक्षित असलेले, भविष्यातील धोके ओळखून हाती घेतलेले काम आहे. त्यामुळे मनुष्यबळ, लोकोत्सवासाठी पायाभूत सुविधा यापासून ते सर्व बाबींमध्ये शासनाच्या विविध विभागांचा सहभाग राहील. शासन म्हणून सुरवातीपासूनच लोकांसाठी आणि त्यांच्या मनातील आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न राहीले आहेत. या लोकोत्सवातून शासनाचे निर्णयही लोकांपर्यंत पोहचविता येणार आहे. या लोकोत्सवात सर्वांचा सहभाग राहील, असे प्रयत्न व्हावेत. आपल्या गतीमान प्रशासनाचाही यात महत्वाचा सहभाग राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या पंचमहाभूत लोकोत्सवासाठी जिल्हा नियोजन निधीतून पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्धता, विविध विभागांनी आपली दालने उभी करून सहभाग नोंदवणे याबाबतही सूचना केल्या.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, आज या विषयाचे गांभीर्य आपण पाहिले तर संपूर्ण जग ज्या विषयावर विचार करते अशा पर्यावरण संतुलनाच्या विषयावर हा लोकोत्सव होत आहे. हा विषय सर्वसामान्यांपर्यंत या उत्सवाच्या माध्यमातून पोहोचेल, महाराष्ट्र शासनाने या लोकोत्सवासाठी विविध विभागांच्या माध्यमातून तयारी केली आहे. कणेरी मठाच्या वतीने आयोजित ‘लोकोत्सव’ नक्कीच यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे. हा लोकोत्सव असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा या उत्सवात सहभाग आहेच, या लोकोत्सवासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन, आरोग्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, ऊर्जा विभाग यांच्या सहभागाबाबत बैठकीत माहिती देण्यात आली.
सुरवातीला अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रास्ताविक केले. प्रधान सचिव श्री. दराडे यांनी पुर्वतयारीबाबत सादरीकरण केले.

पंचमहाभूत लोकोत्सवाची व्यापकता…

सात दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवात एकूण सात विषय ,२५ पेक्षा जास्त राज्यातील लोकांचा सहभाग, ५० पेक्षा जास्त देशातील प्रमुख पाहुणे ,विविध जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त संस्थांचा सहभाग,५०० हून अधिक कुलगुरुंची उपस्थिती, हजारहून अधिक साधू संतांचा सहवास , १५०० शेती अवजारे व इतर वस्तूंची दालने, दहा हजार व्यावसायिकांचा सहभाग , ६५० एकर विस्तीर्ण परिसरात लोकोत्सव होणार आहे. त्यामध्ये २ लाख चौरस फूट जागेत मनोरंजन जत्रा, ३ लाख चौरस फूट जागेवर थ्री डी मॉडेल्स ची मांडणी केली जाईल. सुमारे ४० लाख लोक या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होतील, असे नियोजन असल्याची माहितीही संयोजकांनी दिली.

००००

युवा आयुर्वेद डॉक्टरांनी आधुनिक आजारांवर ‘रामबाण’ उपाय शोधावे’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. १० : पूर्वीच्या काळात भारतातील आयुर्वेद वैद्यांचे नाडीज्ञान खूप प्रगत होते. आयुर्वेद डॉक्टरांच्या नव्या पिढीने देखील प्राचीन नाडी ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. अशा औषधी वनस्पतींवर संशोधन करून संशोधकांनी नवीन मापदंडांच्या आधारे आधुनिक आजारांवर आयुर्वेदातून ‘रामबाण’ उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी येथे केले.

राजभवन येथे ‘आयुर्वेद शिरोमणी’ सन्मान प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली येथील पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, अध्यक्ष राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ तसेच प्राध्यापक वैद्य राकेश शर्मा, अध्यक्ष, नितिमत्ता व नोंदणी समिती, भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग यांना सोमवारी राज्यपालांच्या हस्ते. उभय नामवंत आयुर्वेदाचार्यांना आयुर्वेदाच्या उल्लेखनीय सेवेसाठी वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात आले.

आज आधुनिक चिकित्सा पद्धतीला  पर्याय नाही. परंतु अनेक ॲलोपॅथी औषधांचे साईड इफेक्ट देखील असतात. या दृष्टीने भारतातील आयुर्वेदिक ज्ञानाचा वारसा अधिक समृद्ध कसा करता येईल व आयुर्वेदाच्या माध्यमातून जगाला निरामय जीवन जगण्याचा मार्ग कसा दाखवता येईल या दृष्टीने विचार झाला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

आज राजस्थान, उत्तराखंड, पंजाब तसेच गुजरात येथे स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठे कार्यरत आहेत. महाराष्ट्रात देखील ८० आयुर्वेद महाविद्यालयाने कार्यरत आहेत. राज्यातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयांच्या विकास व नियंत्रणासाठी राज्याने एक स्वतंत्र आयुर्वेद विद्यापीठ तयार करावे, अशी सूचना आयुर्वेदाचार्य वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांनी यावेळी केली.

राष्ट्रपती भवनाप्रमाणे राजभवन येथे देखील राज्यपालांनी एक आयुर्वेद क्लीनिक सुरु करावे, अशी सूचना त्रिगुणा यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाला वैद्य सुरेशचंद्र चतुर्वेदी हेल्थ फाउंडेशनचे विश्वस्त वैद्य महेंद्र चतुर्वेदी, महाराष्ट्र आयुष संचालनालयाचे संचालक डॉ राजेश्वर रेड्डी, डॉ गोविंद रेड्डी, अनेक वरिष्ठ आयुर्वेद चिकित्सक, प्राध्यापक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.

००००

 

Maharashtra Governor presents ‘Ayurved Shiromani’  

Awards to Vaidya Devendra Triguna,Vaidya Rakesh Sharma

Mumbai 10: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari presented the ‘Ayurved Shiromani’ Samman’ to   Padma Bhushan Vaidya Devendra Triguna, President, Rashtriya Ayurveda Vidyapeeth, New Delhi and Prof Vaidya Rakesh Sharma, President, Ethics & Registration Committee, National Commission for Indian Systems of Medicines, New Delhi at Raj Bhavan Mumbai on Mon (9 Jan).

The awards instituted by the Vaidya Sureshchandra Chaturvedi Health Foundation were presented to the two Ayurvedacharyas in recognition of their exemplary services in the field of Ayurveda.

Speaking on the occasion, Governor Koshyari called upon young Ayurveda Vaidyas to find out sureshot medicines for various ailments through modern research. Vaidya Devendra Triguna urged the Governor to create a separate Ayurveda University in Maharashtra on the lines of similar Universities in Rajasthan, Uttarakhand, Punjab, Gujarat and other states.

Managing Trustee of the Foundation Vaidya Mahendra Chaturvedi, Director, AYUSH, Maharashtra Dr Rajeshwar Reddy, Vaidyas and Professors from Mumbai region and students were present.

लोकगीतांतून लोकशाहीचा जागर २०२२ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई, दि. 10 : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर – 2022’ या  स्पर्धेचा निकाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घोषित केला आहे.

लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे  दिनांक 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत -एकल गटांतर्गत स्नेहा मेश्राम (पुणे) यांना प्रथम प्रिया माकोडे (यवतमाळ) यांना द्वितीय पारितोषिक, बाळू बनसोडे (सोलापूर) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच, समूहांतर्गत ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित शाहीर नानाभाऊ परिहार आणि संच (जालना) यांना प्रथम  शाहीर शिवाजीराव धर्मा पाटील, खानदेश लोकरंग फाऊंडेशन, नगरदेवळा (जळगाव) यांना द्वितीय, तर शाहीर विनोद दिगंबर ढगे, दिशा समाज प्रबोधन बहुउद्देशीय संस्था (जळगाव) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकल आणि समूह या दोन गटांतर्गत एकूण 68 प्रवेशिका आल्या होत्या. त्यांपैकी एकल गटात 34, तर समूहामध्ये 34 प्रवेशिका आल्या होत्या.

त्याचप्रमाणे, एकल आणि समूह या दोन्ही गटांतर्गंत एकूण 20 उत्तेजनार्थ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

. एकल  गट  उत्तेजनार्थ  : 1. श्रीकांत देवगोंडा मेडशिंगे (कोल्हापूर), 2. बालाजी महादेव जाधव (रायगड), 3. विनोद विद्यागर (मुंबई उपनगर), 4. अनंता अर्जुन मिसाळ (बुलढाणा), 5. शंकर नागनाथ कांबळे (सोलापूर), 6. महादेव तुकाराम भालेराव (बीड), 7. शहाजान सरदार मुकेरी (नाशिक), 8. धनश्री दिनेश जोशी (जळगाव), 9. जयश्री उदय पेंडसे (सांगली), 10. शिल्पा निनाद नातू (ठाणे).

. समूह गट  उत्तेजनार्थ :  1. शाहीर बजरंग शंकर आंबी (सांगली), 2. कविता विद्यागर (मुंबई), 3. अविष्कार विकास एडके (उस्मानाबाद), 4.  अनुराधा गोपीनाथ कुलकर्णी, स्वरनिनाद ग्रूप, कोयना वसाहत कराड (सातारा), 5. सुरेश शंकर पाटील, आझाद हिंद शाहिरी पार्टी दिंडनेर्ली (कोल्हापूर), 6. प्रकाश गणपती लोहार, लोककला, कला, क्रीडा, सांस्कृतिक बहुउद्देशिय मंडळ (कोल्हापूर), 7. उषा कमलाकर शेजुळे, शाहीर कमलाकर विठ्ठल शेजुळे आणि पार्टी , नवी मुंबई (ठाणे), 8. गणपत ना. तारवे, क्रांती कला मंच ,हातखांबा (रत्नागिरी), 9. शाहीर सुधाकर आरवेल, लोक कला पार्टी (मुंबई),  10. शंकर महादेव दवले (कोल्हापूर).

एकल गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे  7 हजार , 5 हजार  आणि 3 हजार रुपये ; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त 10 विजेत्यांना प्रत्येकी 500 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

समूह गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे  21 हजार रुपये, 11 हजार रुपये आणि 5 हजार रुपये; तसेच मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त दहा विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

या स्पर्धेच्या परीक्षणाचे काम संगीत विशारद पुंडलिक कोल्हटकर आणि नृत्य कलावंत डॉ.सान्वी जेठवाणी यांनी पाहिले.

000

मुंबईत १० जानेवारीपासून कला प्रदर्शन

मुंबई, दि. 10 : कला संचालनालयामार्फत 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग) 2022-23 आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंगळवार 10 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणार आहे. हे प्रदर्शन 10 ते 16 जानेवारी, 2023 या कालावधीत होणार आहे. प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे, असे प्र. कला संचालक राजीव मिश्रा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रदर्शनाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी उपस्थित राहणार आहेत. सन 2020-21 यावर्षीचा “कै. वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार”  शिल्पकार राम सुतार तसेच ज्येष्ठ कलाकार प्रमोद रामटेके यांचा व 62 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील पारितोषिक प्राप्त कलाकारांचा शासनाच्या वतीने सत्कार समारंभ होणार आहे.

      पारितोषिक प्राप्त कलाकार  : सुरभी कांचन गुळवेलकर (रेखा व रंगकला), प्रतिक बळीराम राऊत (रेखा व रंगकला), प्रसाद सुनील निकुंभ (रेखा व रंगकला), विवेक वसंत निंबोळकर (रेखा व रंगकला), अभिजित सुनील पाटोळे (रेखा व रंगकला),  वैभव चंद्रकांत नाईक (रेखा व रंगकला), रोहन सुरेश पवार (शिल्पकला), अजित महादेव शिर्के (शिल्पकला) राहुल मच्छिंद्र गोडसे (उपयोजित कला), श्वेता श्याम दोडतले (उपयोजित कला), अनूज संजय बडवे (उपयोजित कला), दीक्षा संदेश कांबळे (उपयोजित कला), विजय रामभाऊ जैन (उपयोजित कला), किन्नरी जितेंद्र तोंडलेकर (मुद्राचित्रण), राकेश रमेश देवरुखकर (दिव्यांग विभाग) या कलाकारांचा पारितोषिक व रक्कम 50 हजार रुपये देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन

मुंबई, दि.9: राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने दि. 11 आणि 12 जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे दोन दिवसीय विभागीय खंडपीठाच्या शिबीर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीर बैठकीत आयोगाकडे आलेल्या विविध विषयांवरील तक्रारींची सुनावणी होणार आहे. उद्घाटन सत्रात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार असून, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मार्गदर्शन करणार आहेत.

मानवाधिकारांचे अधिक चांगले संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने तक्रारकर्त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण व्हावे, या उद्देशाने अशा शिबीर बैठका आणि खुली सुनावणी आयोगाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. 11 आणि 12 रोजी तक्रारींची सुनावणी होणार असल्याची माहिती गृह विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

0000

दिपक चव्हाण/ वि.स.अ/९.१.२०२३

भारतीय विज्ञान काँग्रेस: विज्ञाननिष्ठांच्या मांदियाळीचा आठवडा

नागपूर शहर. भारतातील संत्रा नगरी. देशाचे टायगर कॅपिटल. कधी काळी गोंड राजांच्या राजधानीचे शहर. विविध सामाजिक चळवळींचे शहर. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक पासून तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेल्या दीक्षाभूमीचे शहर. हे शहर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जगभर गाजले ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्याने…

भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन ३ ते ७ जानेवारी या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या परिसरात  करण्यात आले. नागपूर विद्यापीठाचे हे शतकमहोत्सवी वर्ष. या वर्षात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी झाल्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे.यापूर्वी १९७४ मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी वर्षात हे आयोजन नागपुरातच व्हावे, यासाठी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रदर्शनातून ‘होस्ट स्टेट’च्या माध्यमातून राज्याची विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती जगापुढे आणली. या तीनही नेत्यांनी उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावून महाराष्ट्रासारख्या विशाल प्रदेशात हा ज्ञान आणि विज्ञानाचा कुंभ होत असल्याचा आनंद व्यक्त केला. उद्घाटन कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे संबोधन प्रेरणादायी होते. शेती, मातीपासून अवकाशापर्यंत विज्ञान – तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगाचे नेतृत्व भारताला करायचे आहे त्यासाठी या महत्त्वपूर्ण आयोजनातून प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

विज्ञान काँग्रेसमध्ये विविध विज्ञान आधारित कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा योनाथ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यात २७ परिसंवाद, बाल, महिला, शेतकरी व आदिवासी विज्ञान काँग्रेसचा समावेश होता. यंदा प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस चाललेल्या या विज्ञान परिषदेला एक लाखावर विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत सर्वच विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक दिग्गजांचा यात सहभाग होता. विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन  करण्यात आले होते.  देश -विदेशातील अनेक संशोधक,  वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते. प्रश्न उत्तरे, जिज्ञासा, आविष्कार, संशोधन अशा उपक्रमाने पाच दिवस हा परिसर भारावला होता.

बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’ चे माजी संचालक डॉ. सतीश वाटे यांच्या हस्ते झाले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले. १० ते १७ वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले. देशभरातील सर्वच भागातून आलेल्या बालकांनी या प्रदर्शनाला उपस्थिती लावली. हे प्रदर्शन बघून पुढील शतकात विज्ञान तंत्रज्ञानावर भारताचा प्रभाव असेल याचा विश्वास वाटत होता. किशोरांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिमानांचे सादरीकरण केले. मोठ्या संख्येने शाळकरी मुलांनी या विज्ञानप्रदर्शनाचा लाभ घेतला.

यावर्षीच्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे ब्रीदवाक्य होते, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानासह महिलांचे सक्षमीकरण’. त्यामुळे या काँग्रेसवर महिलांचा पहिल्या दिवसापासूनच प्रभाव होता. हे देशव्यापी आयोजन श्रीमती विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरीत्या पूर्ण झाले. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन  महिला काँग्रेसमध्ये करण्यात आले.   बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. असंख्य अडचणींवर मात करीत  केलेली वाटचाल राहीबाईंनी यावेळी कथन केली. या काँग्रेसचा समारोप रसायनशास्त्रांमध्ये नोबेल पुरस्कार विजेत्या प्रा.ॲडा योनाथ यांनी केला.

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहाचे नाव होते शहीद बिरसा मुंडा सभागृह. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा आदिवासी विज्ञान काँग्रेसमधील सूर होता. आदिवासी बहुल भागामध्ये प्रथमच आदिवासी आणि विज्ञान यांची सांगड घातली जात होती. ही एक स्तुत्य सुरुवात ठरली.

देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक असल्याचा शेतकरी विज्ञान काँग्रेस परिषदेतील सूर होता.

प्राईड इंडिया एक्सपो हे विशेष आकर्षण ठरले. या एक्सपो मध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पहायला मिळाली. दररोज सायं. सहा ते आठ या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले.

समारोपाला कानपुरवरून नागपूर येथे दाखल झालेल्या विज्ञान ज्योतीला विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी डॅा. अरविंद सक्सेना यांना विज्ञानज्योत सोपवून अधिकृत समारोप जाहीर केला. खऱ्या अर्थाने विज्ञानाचा हा महाकुंभ विज्ञानप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी ठरला. या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. सुभाष चौधरी व त्यांच्या चमूने केलेल्या मेहनतीचे विजयलक्ष्मी सक्सेना यांनी समारोपीय सोहळ्यात कौतुक केले. नागपूरच्या शिरपेचातील महत्त्वपूर्ण बाब म्हणून या कार्यक्रमाची नोंद असेल.

०००

-अतुल पांडे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नागपूर.

पालकमंत्र्यांनी दखल घेतल्याने मिळाली वीजजोडणी

सोलापूर, दि. ९ (जि. मा. का.) : नागुर (ता. अक्कलकोट) येथील नागोरे वस्तीमध्ये गावठाण वीजवाहिनी नसल्याने बसवराज प्रभू नागोरे यांच्या अडीच वर्षांपासून प्रलंबित घरगुती वीजजोडणीच्या मागणीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांच्यामुळे न्याय मिळाला. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर नुकताच डीपी बसविण्यात आल्याने श्री. नागोरे यांना वीजजोडणी मिळाली.

श्री. नागोरे पूर्वी नागुर गावात राहायचे. साधारणतः अडीच ते तीन वर्षांपूर्वी ते नागोरे वस्तीवर राहायला आले. त्यामुळे घरगुती वीज जोडणी मिळावी म्हणून त्यांनी ७ जुलै २०२० रोजी महावितरणकडे अर्ज केला. गेली अडीच वर्षे ते पाठपुरावा करत होते. त्यांचे शेजारी बसवराज दनुरे यांच्यासोबत त्यांनी जिल्हा स्तरावर कार्यान्वित करण्यात आलेल्या पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली. तसेच, निवेदनाची प्रत पालकमंत्री यांना वैयक्तिकरीत्या पाठवली गेली. खुद्द पालकमंत्री श्री. विखे – पाटील यांनीच दखल घेतल्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.

याबाबत श्री. नागोरे यांचे पुत्र पंकजकुमार नागोरे म्हणाले, पूर्वी आम्ही गावात राहायचे. साधारणतः तीन वर्षांपूर्वी नागोरे वस्तीत राहायला आले. तिथे घरगुती वीज नव्हती. विजेविना आमचे खूप हाल व्हायचे. त्यामुळे आम्ही घरगुती वीजजोडणी मिळावी, यासाठी पालकमंत्री संपर्क कार्यालयाशी संपर्क साधला. पालकमंत्र्यांनी आमच्या विनंतीची तात्काळ दखल घेत हा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश महावितरणला दिले. गेल्याच आठवड्यात आमच्या वस्तीवर डीपी बसविला गेला आणि आम्हाला घरगुती वीजजोडणीही मिळाली. घरात वीज आल्यामुळे आमचे हाल आता संपलेत.

महावितरणचे उपअभियंता संजीवकुमार मेहेत्रे म्हणाले, श्री. नागोरे यांनी घरगुती वीजजोडणी मिळावी, अशा अर्ज केला होता. मात्र, नागोरे वस्तीमध्ये शेतीपंपाची लाईन होती. गावठाण वीजवाहिनी नसल्याने डीपी बसविणे आवश्यक होते. त्यासाठी विशेष घटक योजनेतून ४ लाख ६७ हजार रुपये शासकीय अनुदान मंजूर झाले. आता नागोरे वस्तीमध्ये गेल्या आठवड्यात १६ केव्हीएचा डीपी बसविला असून श्री. नागोरे यांना घरगुती वीज देण्यात आली आहे. नागोरे वस्तीवरील ग्राहकांना आता मागणीनंतर घरगुती वीज देता येऊ शकेल.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळावेत हा ‘मेडिसिटी’ चा उद्देश – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
महाराष्ट्रात १९ हजार २०० कोटींच्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात डेटा सेंटर आणि औद्योगिक पार्कसाठी मोठी गुंतवणूक; रोजगाराच्या थेट ६० हजार संधी उपलब्ध होणार  ठाणे,दि.१२...

पदविका प्रवेशाला विक्रमी प्रतिसाद; १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

0
मुंबई, दि. १२ : राज्यातील पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आतापर्यंत १ लाख ३ हजार ११५...

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी तालुकास्तरावर समिती नेमावी – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १२ : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या पात्रतेस मान्यता देणारी सध्याची जिल्हास्तरीय समिती ऐवजी तालुकास्तरावर समिती स्थापन करावी. जेणेकरून या...

ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १२ : आजच्या डिजिटल युगात ग्रंथालय चळवळ टिकेल का असा प्रश्न पडतो पण आजची तरुण मंडळी अधिक ग्रंथालयाकडे वळली आहे. विविध वाचन...

जास्तीत जास्त शाळांमध्ये स्काऊट गाईडची अंमलबजावणी करावी- मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १२: विद्यार्थ्यांना बालवयापासूनच मूल्य शिक्षण, स्वावलंबन, शिस्त, संस्कारांच्या माध्यमातून उत्तम भावी नागरिक घडविण्यात स्काऊट, गाईडची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. इच्छुक शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी होता यावे यासाठी जास्तीत...