गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
Home Blog Page 1658

मच्छीमार बांधवांना सक्षम करणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १०: सागरी व भूजल क्षेत्रातील मच्छिमारांना व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या बळ देण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करेल; यासाठी लहान मच्छिमारांना व रापणकारांना अत्यंत सुलभ पद्धतीने अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

तयार जाळी खरेदी व बिगर यांत्रिकी नौका बांधणीच्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, राज्यातील सागरी क्षेत्रामध्ये परंपरागत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लहान मच्छिमारांना व रापणकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात मच्छीमार संघटनांनी केलेल्या मागणीचा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विचार करुन हा निर्णय घेतला आहे.

१३ वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या बांधवांना दिलासा मिळाला आहे. आता, सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांवर वापरण्यात येणाऱ्या नॉयलॉन व मोनोफिलामेंट जाळी खरेदीवर ५० टक्के पर्यंत व रापण संघाच्या प्रत्येक सभासदाला रापणीच्या तयार जाळ्यांवर तयार जाळ्याच्या किंमतीच्या ५० टक्के पर्यंत अनुदान देण्यात येईल.

बिगर यांत्रिकी नौकांच्या बाबतीत शासनाने लहान मच्छिमारांना अथवा रापणकारांना १० टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी /तयार नौका खरेदी करण्यासाठी सध्याच्या प्रचिलत दराने रु. १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) पर्यंतच्या देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा वाढवून रुपये २,५०,०००/- ( रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) पर्यंत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लहान मच्छिमारांना किंवा रापणकाराना १० टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी /तयार नौका खरेदी करण्यासाठी प्रकल्प किंमत रु. ५ लक्ष पर्यंत खर्चाच्या ५० टक्के अथवा रु.२,५०,०००/- (रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळेल.

भूजल मत्स्यव्यवसायाच्या बाबतीत निर्णय घेताना शासनाने भूजलाशयीन मस्यव्यवसायांतर्गत नायलॉन/मोनोफिलॅमेंट तयार जाळी खरेदीवर प्रती सभासद/ वैयक्तिक मच्छीमारास २० किलो ग्रॅमपर्यंत  ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

भूजल क्षेत्रात लहान आकाराच्या होड्या वापरल्या जातात. बिगर यांत्रिकी नौकेसाठी अनुदान देताना देखील शासनाने मच्छीमार बांधवांचा अतिशय संवेदनशीलपणे विचार केला असून यामध्ये लाकडी, पत्रा व फायबर नौकेला प्रकल्प किमतीच्या ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.

मासेमारी व्यवसायामध्ये मच्छिमारांना विविध साधनसामुग्रीचा उपयोग सुलभतेने करता यावा, त्यांचे जीवन सुलभ सुखकारक व्हावे, यासाठी शासनाने हे हितकारक निर्णय घेतले असून शासन मच्छीमारांना वेळोवेळी सहकार्य करेल, अशी ग्वाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

‘वंदे भारत’ एक्सप्रेस भारताच्या विकासाचे प्रतीक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, दि. १० : रेल्वे वाहतूक ही भारताच्या गतिमान विकास आणि सुखकर प्रवास यांचे प्रतिबिंब आहे. आपल्या देशाला जोडण्यात भारतीय रेल्वेची मध्यवर्ती भूमिका राहिली असून ‘वंदे भारत’ एक्सप्रेस ही भारताच्या विकासाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

तसेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. याअंतर्गत सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला ते कुर्ला व एमटीएनएल ते एलबीएस उड्डाणपूल उन्नत मार्गाचे आणि मालाडमधील कुरार गांव भुयारी मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलार, आमदार राम कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी, संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात करत प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, भारतातील रेल्वे वाहतूक ही आपल्या प्रगतीची जीवनरेखा आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. आजपासून सुरु करण्यात आलेल्या दोन ‘वंदे भारत’ एक्सप्रेसमुळे महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. आजचा दिवस भारतीय रेल्वेसाठी, विशेष करुन मुंबई आणि महाराष्ट्राच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आतापर्यंत देशात एकूण १० वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. देशाला आज नववी आणि दहावी ‘वंदे भारत’ ट्रेन समर्पित करण्यात आली आहे.

नाशिक आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांना जाण्यासाठी तसेच पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तुळजाभवानी मंदिर, सिध्देश्वर मंदिर, श्री स्वामी समर्थ येथे भाविकांना जाता येणार आहे. शिर्डी, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी भाविकांचा प्रवास जलद होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे नव्या भारताच्या विश्वासाचा संकल्प असून आधुनिक भारताची प्रतिमा निर्माण करत आहे. देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या १० ट्रेन सुरू झाल्या असून त्यामुळे १७ राज्यात १०८ जिल्हे जोडले गेले असल्याचेही श्री. मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

मुंबई मध्ये पूर्व – पश्चिम उपनगरांना जोडणारे प्रकल्प सुरू केल्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनशैलीत बदल होणार आहे. रेल्वे, नवीन विमानतळ आणि बंदरे विकसित करण्याबरोबरच नवीन राष्ट्रीय महामार्ग बनवले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तर रेल्वे साठी अडीच लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय जनतेसाठी विशेष लाभ देण्यात आला आहे. आयकर मर्यादा ५ लाख रुपयांवरुन ७ लाख रुपयांपर्यंत वाढविली असल्याचेही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अर्थसंकल्पात भरीव निधी मिळाल्याने महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखो प्रवाशांना फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले की, सिंचन, रस्ते प्रकल्प, कृषी, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, स्टार्टअप, या सर्व क्षेत्रात महाराष्ट्रासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून  भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार प्रधानमंत्र्यांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी प्रयत्न करेल.

नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्वेक्षणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झाले आहे, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्र्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना निमंत्रित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव निधी – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

रेल्वेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे राज्य आहे. यावर्षी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५०० कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली गेली आहे. ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे आवश्यक मंजुरीचे काम पूर्णत्वास आले आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आणि सुविधापूर्ण असणाऱ्या मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी या दोन ‘वंदे भारत’ रेल्वेची सुरूवात झालेली आहे. येत्या काळात अधिक संख्येने ‘वंदे भारत’ रेल्वे गाड्या धावतील.

रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री यांचे योगदान महत्त्वपूर्ण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद केली आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी १३ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये राज्यातील १२४ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. नाना शंकरशेठ यांनी पहिली रेल्वे सुरू केली होती आणि त्याची नोंद इतिहासात घेतली गेली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते साईनगर शिर्डी शहरांदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस गतीने धावेल आणि महाराष्ट्रातील जनतेला आणि भाविकांना आनंद मिळेल. मुंबई आणि पुणे यासह अनेक शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्याने याचा लाभ व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, सामान्य नागरिकांना होणार आहे. ‘वंदे भारत’ एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थिनीने वंदे भारत वर रचलेल्या संस्कृत कवितेचे प्रधानमंत्र्यांनी कौतुक केले.

वंदे भारत एक्सप्रेस गाडीविषयी

  • आरामदायी आणि आनंददायी रेल्वे प्रवास हे वंदे भारत एक्स्प्रेसचे वैशिष्ट्य
  • वंदे भारत एक्सप्रेमसमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, झोपण्यायोग्य आसने, टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, एलईडी प्रकाश योजना, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक स्पर्श आधारित रीडिंग लाइट आणि कनसिंल्ड रोलर पडदे, ‘आधुनिक मिनी-पॅन्ट्री’ आणि चालक दलाशी संवाद साधण्याकरिता प्रवाशांसाठी ‘इमरजन्सी टॉक-बॅक’ युनिट कार्यान्वित
  • उत्तम उष्णता वायुविजन आणि जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यांसह वातानूकुलित प्रणाली सारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा
  • इंटेलिजेंट वातानूकुलित प्रणाली हवामान परिस्थितीनुसार कूलिंग समायोजन
  • स्वदेशात तयार झालेली सेमी-हाय स्पीड सेल्फ प्रोपेल्ड ट्रेन सेट,१६० किमी प्रति तास वेग गाठण्याची वेळ १२९ सेकंद
  • प्रवाशांसाठी ३.३ (राइडिंग इंडेक्स) सह उत्तम आरामशीर प्रवास
  • स्वयंचलित प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे
  • एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्विहंग सीट्स
  • GSM/GPRS द्वारे नियंत्रण केंद्र / देखभाल कर्मचाऱ्यांना एअर कंडिशनिंग, कम्युनिकेशन आणि फीडबॅकचे निरीक्षण करण्यासाठी कोच नियंत्रण व्यवस्थापन प्रणाली
  • जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी अतिनील दिव्यासह उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्रेसरचा वापर करून उत्तम उष्णता वेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग नियंत्रण
  • वातानुकूलित हवेच्या ध्वनीरहित आणि समान वितरणासाठी विशेष वातानुकूलित डक्ट
  • दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय
  • टच फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट
  • ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल
  • प्रत्येक कोचमध्ये ३२ प्रवासी माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम
  • उत्तम ट्रेन नियंत्रण व्यवस्थापनासाठी स्तर –।। संरक्षा एकीकृत प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रासह कवच प्रणाली (ट्रेन कोलिजन अवॉयडन्स सिस्टीम) सुरू
  • प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था,अग्निशमन सुरक्षा उपाय
  • ४ प्लॅटफॉर्म साइड कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य कॅमेरे
  • सर्व डब्यांमध्ये फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम व इलेक्ट्रिकल क्यूबिकल्स आणि टॉयलेटमध्ये एरोसोल आधारित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टीम यांसारखे उत्तम
  • प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या
  • इमर्जन्सी टॉक ‌‌बॅक युनिट्स
  • व्हॉइस रेकॉर्डिंग सुविधेसह ड्रायव्हर-गार्ड संवाद
  • अंडर- स्लंग इलेक्ट्रिकल उपकरणांसाठी उत्तम फ्लड प्रूफिंग ज्यात ६५० मिमी पूर पाण्यामध्ये काही होणार नाही

मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ठळक वैशिष्ट्ये

  • मुंबई ते सोलापूर अशी धावणारी ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन
  • आर्थिक राजधानीला महाराष्ट्रातील कापड आणि हुतात्मा शहराशी जोडणार
  • सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांशी जलद कनेक्टिव्हिटी
  • या मार्गावर सध्या कार्यान्वित असलेल्या सुपरफास्ट ट्रेनला ७ तास ५५ मिनिटे लागतात, तर वंदे भारतला ६ तास ३० मिनिटे लागणार, यामुळे प्रवाशांचा दीड तास वाचणार
  • जागतिक वारसाला तीर्थक्षेत्र,टेक्सटाईल हबशी जोडणार
  • पर्यटन स्थळे आणि शैक्षणिक हब पुणे यांना चालना मिळणार
  • भोर घाटातील खंडाळा लोणावळा घाट विभागात बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरला १ मीटर घाट चढणारी पहिली वंदे भारत ट्रेन

मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ठळक वैशिष्ट्ये

  • ही देशातील १० वी वंदे भारत ट्रेन
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि साईनगर शिर्डी दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी
  • आर्थिक राजधानीला महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांशी जसे की नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डीला जोडले जाणार
  • थळ घाट म्हणजे कसारा घाट विभागात बँकर इंजिनशिवाय ३७ मीटरला १ मीटर घाट चढणारी पहिली वंदे भारत ट्रेन

०००

वर्षा आंधळे/ शैलजा पाटील/ विसंअ/१० फेब्रुवारी २०२३

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार पूनम महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

०००

राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’ – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 10 : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिनी मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या विविध खात्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सर्व योजनांची प्रभावी व लोकाभिमुख अंमलबजावणी होण्यासाठी ग्राम राजस्व अभियानाचा उपयोग होणार आहे. या अभियानाचा शुभारंभ लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिली.

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यात दि. 26 जानेवारी 2023 पासून दि.25 जानेवारी 2024 पर्यंत हे ग्राम राजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीतील विविध विभाग ग्राम राजस्व अभियानात विविध उपक्रम राबविणार आहेत. अंत्योदय हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा उपयोग लाभार्थींना व्हावा, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.

याअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायती आता डिजिटल ग्रामपंचायती म्हणून विकसित करून यामार्फत नागरिकांना बीपीएल दाखला, जन्म नोंद दाखला, निराधार दाखला, नमुना 8 चा उतारा आदी दाखले देण्यात येतील. ग्रामपंचायत हद्दीमध्ये वारस नोंदी व मिळकत नोंदीसंदर्भात विशेष मोहीमा राबविण्यात येतील. ग्रामपंचायतीस मिळणाऱ्या हरकती आणि सूचनांवर सरपंच, सदस्य यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सर्व करांची 100 टक्के वसुली व्हावी, यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येतील, अशी माहिती श्री.महाजन यांनी दिली.

ग्राम राजस्व अभियानांतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी बालकांची 100 टक्के आरोग्य तपासणी करणे तसेच लसीकरण करण्यात येईल. गावातील बालकांची श्रेणीवर्धन करून गाव कुपोषण मुक्त करण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येतील.

त्याचबरोबर आरोग्य विभागामार्फत नागरिकांना तातडीच्या सेवा उपलब्ध करून देणे, मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांच्यासाठी आरोग्यविषयक सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. प्राथमिक शिक्षक विभागामार्फत प्राथमिक शाळांची 100 टक्के पटनोंदणी बरोबर शाळाबाह्य मुलांची नोंदणी केली जाईल. सोबतच सर्व प्राथमिक मुलांचे लसीकरण करण्यात येईल. माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शालेय शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येईल, अशीही माहिती मंत्री श्री.महाजन यांनी दिली.

ग्राम राजस्व अभियानांतर्गत प्रत्येक गाव शिवारात पाण्याचा ताळेबंद करून पाणी वापराचे नियोजन केले जाणार आहे. घन कचरा, सांडपाणी, ओला-सुका कचरा, प्लास्टीक कचरा आदीच्या विलगिकरणासाठी मोहीम राबविल्या जातील. जनावरांचे आरोग्य व वैरणाच्या नियोजनासाठी शिबिरे आयोजित केले जातील. दिव्यांग व्यक्तींना विविध लाभ मिळण्यासाठी शिबीरे आयोजित केले जातील आणि एस.सी. व नवबौद्ध घटक वंचित राहू नये, यासाठी योजनांचे प्रस्ताव ग्रामस्तरावर तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच गावातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांवर रेन वॉटर हार्वेस्टींगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंधाऱ्याची क्षमता वाढविणे, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सर्व इमारतींची देखभाल दुरूस्ती करणे, असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

0000

संजय ओरके/विसंअ

सांस्कृतिक क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे, दि. 9: सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट, साहित्य या क्षेत्राला पुढे नेण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुकुंदनगर थिएटर अकॅडमी येथे आयोजित 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोप व पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मभुषण जानु बर्मा, अभिनेत्री पद्मश्री विद्या बालन, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.

 पुस्कारार्थीचे अभिनंदन करुन श्री. मुनगंटीवार म्हणाले, मुंबई व कोल्हापूर येथील चित्रनगरी अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न आहे. राज्याने वस्तु व सेवा कर कायदा आल्यानंतर नागरिकांना सहज, सुलभरित्या चित्रपट बघता यावा यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील करमणुक कर समाप्त करण्याचा सांस्कृतिक विभागाने निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकार ओटीटी प्लॅटफार्म, पोर्टल तयार करीत आहे.  चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.

देशातील चित्रपट क्षेत्रानेदेखील आज चांगली प्रगती केली आहे. विश्वात सर्वात जास्त चित्रपटाची निर्मिती भारतात केली जाते. आपल्या चित्रपटांचे अनुकरण इतरांनी केले पाहिजे. पर्यावरणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी दिग्दर्शकांनी काम करावे. येत्या काळात पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत शासन विचार करेल, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून मनाला शक्ती, ऊर्जा, उत्साह देण्याचे कार्य करायचे आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राने आपली विशेष ओळख जगभरात प्रस्थापित केली आहे असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. सगळ्या प्रकारच्या कलेचे अविष्कार येथे होतात. मुंबई ही हिंदी चित्रपटाची जन्मभूमी, कर्मभूमी मानली जाते त्याचप्रमाणे पुण्याला मराठी चित्रपटाची जन्मभूमी मानली जाते. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे पुण्यात उत्तम दर्जाचा चित्रनगरी निर्माण करण्याची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे मागणी केली आहे. या चित्रनगरीच्या माध्यमातून पुण्यात अनेक चांगले चित्रपट निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.

सलग 21 वर्ष पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे तसेच पुरस्कारार्थीचे श्री. पाटील यांनी अभिनंदन केले.

डॉ. पटेल म्हणाले, 21 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुमारे 1 लाख नागरिकांनी चित्रपट बघितले. चित्रपट दाखविण्याबरोबर जागतिक पातळीवरील विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

अभिनेत्री विद्या बालन यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमापूर्वी गायक राहुल देशपांडे आणि गायिका प्रियंका बर्वे यांच्या शास्त्रीय गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ज्युरी व निवड समितीतील सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार ‘मदार’ या चित्रपटाला तर  आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘टोरी अँड लोकिता’ (दिग्दर्शक जीन-पियरे डार्डेन, लुक डार्डेन) या चित्रपटाला देण्यात आला.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार – मंगेश बदार (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार – मिलिंद शिंदे (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार- अमृता अगरवाल (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी पुरस्कार – आकाश बनकर आणि अजय भालेराव (चित्रपट मदार)

सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार – राहुल आवटे (चित्रपट पंचक)

 विशेष नामनिर्देशित दिग्दर्शक पुरस्कार – कविता दातीर आणि अमित सोनवणे (चित्रपट गिरकी)

विशेष नामनिर्देशित कला दिग्दर्शक पुरस्कार – कुणाल वेदपाठक ( चित्रपट डायरी ऑफ विनायक पंडीत)

महाराष्ट्र शासनाचे आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट  आंतरराष्ट्रीय  दिग्दर्शक पुरस्कार – मारयाना एर गोर्बार्च ( चित्रपट क्लोंडिके)

एमआयटी-एसएफटी ह्युमन स्प्रिट पुरस्कार – चित्रपट क्लोंडिके

विशेष नामनिर्देशित चित्रपट पुरस्कार – बॉय फ्राम हेव्हन

विशेष नामनिर्देशित अभिनेत्री पुरस्कार -लुब्ना अझ्बल (द ब्लयू कॅफ्टन)

समतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणार –  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

            पुणे, दि. ९ : समाजातील विषमता दूर करून समतेसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

            महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने सामाजिक दायित्व निधीतून ९ सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, काही सामाजिक संस्था समाजातील विषमता दूर करण्यासाठी सेवाभावीवृत्तीने आणि चांगले संस्कार सोबत घेऊन कार्य करत आहेत याचे समाधान वाटते. अशा संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याचे चांगल्याप्रकारे सादरीकरण करून प्रस्ताव सादर करावेत. राज्य सरकारच्यावतीने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून या संस्थांना आर्थिक मदत उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

            आज महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने ९ संस्थांना आर्थिक मदत देण्यात आली याचा आनंद होत आहे, असे सांगून त्यांनी सामाजिक संस्थांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आर्थिक मदत देण्यात आलेल्या संस्था

            जनसेवा न्यास हडपसर, सेवा आरोग्य फाऊंडेशन, पुणे, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, सिंहगड रोड, पुणे, स्वरूप वर्धिनी, पुणे, विवेक व्यासपीठ,पुणे, वनांचल समृध्दी अभियान फाऊंडेशन, नवी मुंबई, हिंदुस्थान प्रकाशन संस्था,मुंबई व भोगावती सांस्कृतिक मंडळ, कोल्हापूर या संस्थांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आली.

            या संस्था समाजातील झोपडट्टीवासीय नागरिकांना आरोग्य सुविधा, मुलांसाठी अभ्यासिका, संस्कार वर्ग, किशोरी विकास प्रकल्प, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, साक्षरता, सामाजिक विकासासाठी शिक्षण, पर्यावरण व दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकास करण्यासाठी वसतिगृहे, इत्यादी माध्यमातून कार्य करत आहेत.

०००

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. ९ : राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात, असे एकूण पाचशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू केले जातील, असे त्यांनी सांगितले.

            राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याबाबत घोषणा कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील आपला दवाखानाचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.

            या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भरत गोगावले, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईपाठोपाठ राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येईल. मुंबईत सुरू केलेल्या दवाखान्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. घराजवळ असलेल्या दवाखान्यामुळे लगेच उपचार मिळायला सुरू झाले. त्यामुळे मुंबईतील ही संकल्पना राज्यातील तालुक्यात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

            केंद्र सरकारने राज्यातील रेल्वेचे प्रकल्प, नगर विकास विभागाच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुंबई शहराला आणखी विकसित करण्यावर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

            सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी प्रास्ताविक केले. आज झालेल्या ४५८ रक्तदान शिबीरात सुमारे ७ हजार २०० बॅगचे संकलन झाले. राज्यभरात १ हजार ८३५ आरोग्य शिबीरात २ लाख १२ हजार ५०५ रुग्णांना तपासण्यात आले. जागरुक पालक, सुदृढ बालक अभियानात सुमारे साडेतीन लाख बालकांची तपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

            यावेळी मंत्री श्री. पाटील, आमदार ॲड. आशिष शेलार यांचीही भाषणे झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार यामिनी जाधव, आमदार संजय शिरसाट आदी उपस्थित होते.

            यावेळी आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्नील लाळे, उपसंचालक डॉ.विजय कंदेवाड, उपसंचालक डॉ विजय बाविस्कर, कैलास बाविस्कर आदी उपस्थित होते. डॉ. कंदेवाड यांनी आभार मानले.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

आरोग्य, रक्तदान शिबिरे यांसह समाजोपयोगी उपक्रमांवर भर

मुंबई, दि. ९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्यभर त्यानिमित्त आरोग्य, रक्तदान शिबीरे, आपला दवाखान्याचे विस्तारीकरण, दिव्यांगांना सायकल वाटप यांसारख्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभिष्टचिंतन केले.

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, अबाल-ज्येष्ठांपासून अनेकांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून, दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यात राजकीय, सामाजिक संस्था तसेच विविध संघटना आणि कला, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी आदींचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सकाळपासूनच परिसरातील शालेय मुला-मुलींचीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपासूनच ओघ सुरु झाला होता. देशात तसेच विदेशातही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती विविध समाजमाध्यमांवरही झळकली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे येथील निवासस्थानी, आनंदाश्रम, टेंभी नाका, वर्षा शासकीय निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारल्या.

वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून राज्यात विविध ठिकाणी आरोग्य आणि रक्तदान शिबीर, वृक्षारोपणासह, स्वच्छता आणि अशा अनेकविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले.

०००

मातृभाषा, संस्कार, नितीमूल्यांच्या आधारे देशाची प्रगती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि. ९: मातृभाषा, संस्कार आणि नितीमूल्यांच्या आधारे उद्दिष्ट निश्चित करीत दूरदृष्टीने कार्य केल्यास देश प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सिम्बायोसिस विश्वभवन येथे क्यूएस रेटिंग सिस्टमचे सीईओ डॉ. अश्विन फर्नांडिस लिखित ‘इंडियाज नॉलेज सुप्रीमसी : द न्यू डॉऊन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र. कुलगुरु डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी उपस्थित होते.

आपले ज्ञान विश्वात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, आपल्याला स्थिती, काळाप्रमाणे बदलले पाहिजे. फक्त आपल्या पूर्व वैभवाचा गौरव करून चालणार नाही. भूतकाळापासून शिकावे, वर्तमानात जगावे आणि भविष्याकडे पहावे या पद्धतीने पुढे जायला हवे.

जागतिक क्रमवारीमध्ये (रँकिंग) भारतीय विद्यापीठांचे स्थान कसे सुधारावे यासाठी प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी सिम्बायोसिसचे अभिनंदन केले. या पुस्तकामध्ये आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील पूर्ववैभवाचा, महान बुद्धीवंतांच्या विचारांचा दाखला देऊन उज्ज्वल भविष्यासाठी उपाययोजनांची माहिती चांगल्याप्रकारे दिल्याचे श्री. कोश्यारी म्हणाले.

भारतातील बुद्धीवंत विदेशात जाऊन मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदे भूषवतात. त्याप्रमाणे आपल्या विद्यापीठांनाही विश्वस्तरावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पूर्वीच्या काळात आपला देश ज्ञानाच्या बाबतीत उत्कृष्ट होता. हे वैभव पुन्हा मिळवण्यासाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरेल, असेही ते म्हणाले.

बुद्धिमान लोकांनी आपल्या मुलांना संस्कार द्यावेत, देशाविषयी, मातृभाषेविषयी गौरव भावना निर्माण करावी.  शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याकडे समर्पित भावनेने पाहिले पाहिजे, असेही श्री. राज्यपाल म्हणाले.

पुस्तकाचे लेखक आणि मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियातील क्यूएस क्वाक्वेरेली सायमंड्सचे प्रादेशिक संचालक व क्यूएस रेटिंग सिस्टमचे सीईओ डॉ. फर्नांडिस म्हणाले, भारताच्या  शैक्षणिक पूर्व वैभवाकडे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या एकही भारतीय विश्वविद्यापीठ जगात पहिल्या १०० क्रमांकामध्ये नाही. मात्र, ऐतिहासिक काळातील विद्यापीठांचा दाखला घेत शिक्षण संस्थांना नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतील.

कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

000

पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचे काम यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठवाड्याचा दुष्काळ दूर झाल्याशिवाय राज्याचा विकास होऊ शकत नाही

 लातूर येथील कारखान्यात ‘वंदे भारत रेल्वेच्या बोगींची निर्मिती होणार

 मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया

लातूर, दि. ९ (जिमाका) : कृष्णा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाड्यात आणले जाणार आहे. यासाठीच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून २०२३ मध्येच या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निलंगा (जि. लातूर) येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते स्मारकाचे अनावरण झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, श्रीमती सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार विक्रम काळे, आमदार संजय बनसोडे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी खासदार रूपाताई निलंगेकर, जिल्हाधिकरी पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह माजी खासदार, माजी आमदार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सतत समाजाच्या भल्याचा विचार केला. मराठवाड्याच्या विकासासाठी ते आग्रही होते. जिल्ह्यातील लोअर तेरणा, मांजरा प्रकल्पासह राज्यात अनेक सिंचन प्रकल्प आकारास येण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. औरंगाबाद येथे उच्च न्यायालायचे खंडपीठ होण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत यशस्वी लढा दिला. त्यामुळे आज मराठवाड्यातील लोकांना जलद न्याय मिळण्यास मदत होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी योजना आखल्या. चाळीस कलमी कार्यक्रम राबवून मराठवाडा, विदर्भ आणि कोकणच्या विकासाला गती दिली. यासारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेवून राज्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. मराठवाड्याचा विकास हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मराठवड्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांमधून समुद्राला वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणले जाणार आहे. त्याशिवाय मराठवाड्याचा दुष्काळ दूर होणार नाही आणि पर्यायाने महाराष्ट्राचा विकास पूर्ण होणार नाही. त्यामुळे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली

लातूर येथे रेल्वे बोगी निर्मितीचा कारखाना मंजूर झाल्यानंतर डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आनंद व्यक्त केला होता. या बोगी निर्मिती कारखान्यात लवकरच ‘वंदे भारत’रेल्वेच्या बोगींची र्निमिती सुरु होणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. सध्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनीही या लढ्यात सहभाग घेतला होता. या अनुषंगाने त्यांच्या जीवनातील एक प्रसंग उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या मनोगतात डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासोबत काम करताना घडलेल्या प्रसंगांना उजाळा दिला. कोणताही भेदभाव न करता सर्व समाज घटकांच्या विकासासाठी डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांनी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेवून समाजाच्या, देशाच्या विकासासाठी काम करावे, असे आवाहन केले.

डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांनी राज्यातील कष्टकरी जनतेच्या हिताची कामे केली. त्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या स्मारकामुळे समाजातील सर्व घटकांसाठी काम करण्याची प्रेरणा पुढील पिढीला मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.

समाज हिताचे कोणतेही काम करताना डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर यांच्याकडे विचार स्पष्टता होती. त्यांच्या कार्यकाळात मांजरा, तेरणा खोऱ्यात अनेक विकासकामे झाली, असे माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

विविध पदांची जबाबदारी पार पडताना डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्या पदांमुळे मिळालेल्या अधिकारांचा वापर लोकांच्या हितासाठी केला. त्यांच्या काळात मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली, असे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले. तसेच त्यांचे नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या कार्यकाळात हजारो लोकांची घरे उभी केली. त्यांच्या विषयीचा जिव्हाळा आजही अनुभवायला मिळतो. उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ ते विधानभवनाच्या इमारतीच्या उभारणीसह अनेक विकासकामांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. मराठवाड्याच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणे आवश्यक असल्याचे माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविषयीच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच डॉ. शिवाजीराव पाटील – निलंगेकर स्मारक अनावरणनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा संदेश यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.

महाराष्ट्र शिक्षण समितीच्या वतीने विजय पाटील निलंगेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. तसेच यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा जीवनपट मांडण्यात आला. अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी प्रास्ताविक केले. शैलेश गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले.

000

ताज्या बातम्या

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२० (विमाका): राज्यातील प्रत्येक पायाभूत प्रकल्पासाठी युनिक पायाभूत सुविधा आयडी (Infra ID Portal) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या...

यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत गुणवंतांचा गौरव

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २० :“प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि कार्यतत्परतेने काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,” असे प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. यशवंतराव...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – पालकमंत्री संजय राठोड

0
 पंचनाम्यातून नुकसानग्रस्त सुटणार नाही याची दक्षता घ्या संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यवतमाळ, दि. २० (जिमाका): गेले दोन दिवस जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – प्रभावी सामाजिक कल्याण योजना

0
मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या...

रुग्णांना उपचारासाठी मिळतोय मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्कम आधार !

0
३० रुग्णांना उपचारासाठी २३ लक्ष रुपयांचा निधी वितरीत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवन जगता यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागर्दशनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...