सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 162

सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक –  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

नागपूर, दि. २९ – वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले.

मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी,  खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार श्यामकुमार बर्वे, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून पूर्वी केवळ दिल्लीत असलेले एम्स आता तामिळनाडू, झारखंड या राज्यात तसेच नागपूरसह अनेक शहरात स्थापन झाले आहे. दिल्लीच्या एम्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहेत. एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली पहिली तुकडी म्हणून आपली या संस्थेच्या इतिहासात नोंद केली जाईल. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कधीच थांबवू नये. त्यांनी या क्षेत्रातील नियतकालिकांचा अभ्यास करून यातील नव नवे संशोधन समजून घेत आपले ज्ञान अद्ययावत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर एम्समध्ये हृदय ,यकृत तसेच अवयव प्रत्यारोपणाबाबत आणि पूर्व विदर्भात प्रामुख्याने असणाऱ्या थॅलसेमिया, सिकलसेल या आजारावर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे सांगितले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सारख्या शस्त्रक्रियांना देखील राज्य शासनाच्या योजनेतून एम्समध्ये सवलत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षांत समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. 2018 मध्ये एम्स नागपूरला मिहान येथे सुमारे 200 एकर जमीन महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली.गेल्या 6 वर्षात एम्स नागपूरने आरोग्य क्षेत्रामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली आहे. येत्या काळातही ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांना पदवीप्रदान

दीक्षांत समारंभात 2018 च्या तुकडीची विद्यार्थीनी  डॉ. जिज्ञासा जिंदाल यांना अंतिम व्यावसायिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच कम्युनिटी मेडिसिन आणि बालरोग शास्त्र विषयात सर्वात जास्त गुण मिळवल्याबद्दल डॉ. संजय पैठणकर सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. डॉ. अभिजित यांना द्वितीय तर  डॉ . हिमांशू गजभिये यांना तृतीय  क्रमांक प्राप्त केल्याप्रसंगी तसेच वेगवेगळ्या विषयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुवर्णपदक आणि  रोख पारितोषिक दिले गेले. यासोबतच 121 एमबीबीएस पदवीधारकांना आणि 24 पदव्युत्तर पदवीधारकांना पदवीप्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला एम्सचे शिक्षक, अधिकारी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .

 

0000

रेडीओ क्लब जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय -विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई, दि.२९: गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात रेडीओ क्लब येथे जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे. या जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेवऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.

जेट्टी निर्माणामुळे येणाऱ्या अडचणी, शंका व होणारी गैरसोय, सूचना आदींबाबत विधान भवनातील कॅबिनेट कक्षात स्थानिकांसोबत बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थानिक नागरिकांशी चर्चेदरम्यान अध्यक्ष ॲड. नार्वेकर बोलत होते. बैठकीस बंदरे मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, बंदरे विभागाचे उपसचिव हेमंत महाजन आदी उपस्थित होते.

अध्यक्ष ॲड.नार्वेकर म्हणाले, जेट्टीचे काम पुढील १० दिवस थांबविण्यात यावे. याबाबत स्थानिकांच्या आणखी एका बैठकीचे आयोजनही करण्यात येईल. त्यानंतर यामधून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल. स्थानिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. जेट्टीसाठी पर्यायी जागेचा शोध घेऊन प्रकल्पाबाबत पडताळणी करावी. जेट्टीबाबत करण्यात आलेल्या विविध अभ्यासांचे अहवाल स्थानिक नागरिकांना देण्यात यावे. या अहवालांवरती त्यांच्या सूचना किंवा आक्षेप असल्यास त्याचीही पडताळणी करावी, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

चर्चेवेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, या प्रकल्पामुळे मुंबईहून अलिबाग, मांडवा, जेएनपीटी व एलिफंटा येथे जाण्यासाठी जलवाहतुकीची मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. गेटवे येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधांवर मर्यादा येत असल्यामुळे प्रवाशांसाठी  अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

एवढा मोठा प्रकल्प होत असल्यास स्थानिकांच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असते. शासन जेट्टीचा प्रकल्प हा स्थानिकांवर लादणार नाही. प्रकल्पामुळे स्थानिकांची गैरसोय होत असल्यास किंवा मुंबईच्या हेरीटेजला धक्का बसेल, असे कुठलेही कार्य शासन करणार नाही. या जेट्टीबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल. मच्छीमारांच्या समस्यांचाही शासन गांभीर्याने विचार करेल. या प्रकल्पाबाबत करण्यात आलेले विविध अभ्यास अहवाल स्थानिकांना त्यांच्या परीक्षणासाठी देण्यात येतील.  जबरदस्तीने हा प्रकल्प पुढे रेटला जाणार नाही याबाबत मंत्री श्री.राणे यांनी स्थानिकांना आश्वासित केले.

याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी वाहतूक, गर्दीचे व्यवस्थापन, येणाऱ्या अडचणी याबाबत, मच्छीमार बांधवांनी मासेमारीबाबत  आपले विचार मांडले.

000000

नीलेश तायडे/विसंअ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री तुळजाभवानी देवीचे घेतले दर्शन

धाराशिव दि. २९ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीची विधिवत पुजा करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कवड्याची माळ घालून स्वागत केले. श्री फडणवीस यांनी यावेळी भवानी शंकराचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार व ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचे अनावरण केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या समवेत मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते.

श्री.फडणवीस यांनी मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच मंदिराच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची पाहणी केली व उपस्थितांशी संवाद साधला.

00000

मुख्यमंत्री यांच्याकडून परिचारक कुटुंबियांची सांत्वन पर भेट

पंढरपूर दिनांक 29: – माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे वडील प्रभाकर परिचारक यांचे मागील दोन महिन्यापूर्वी वृद्धापकाळाने निधन झालेले होते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत परिचारक यांच्या पंढरपूर येथील निवासस्थानी त्यांची व कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक आदी उपस्थित होते.

000000

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर, दि. २९ :-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, अभिजीत पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कल्याणशेट्टी, बाबासाहेब देशमुख, माजी आमदार राम सातपुते, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,  मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसेच मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यामध्ये श्री विठ्ठल गर्भगृह, श्री रुक्मिणी गर्भगृह, श्री विठ्ठल चारखांबी व सोळखांबी, बाजीराव पडसाळी, महालक्ष्मी मंदिर आदी ठिकाणची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.

00000

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली

मुंबई, दि. २९ – पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसीत केली आहे.

नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS अँप गुगल प्ले स्टोअर, केंद्र शासनाच्या m- Seva portal, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळ  www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावरून मोबाईलवर डाउनलोड करावे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP चा वापर करावा आणि ॲप नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी रजिस्टर फीडबॅक येथे क्लिक करावे. मोबाईल स्क्रीनवर नकाशा दिसेल. त्यामध्ये आपले लोकेशन निश्चित करून खड्ड्यांचा फोटो अपलोड करण्यासाठी ‘Take Pothol Photo’ या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर खड्ड्यांचा फोटो घेऊन सदर तक्रारीबाबत अभिप्राय नोंदवावा आणि शेवटी तक्रार दाखल करावी.

या प्रणालीमध्ये तक्रारीची सद्यस्थिती दाखवण्याची व्यवस्था आहे. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीने संबंधित शाखा अभियंता आणि उपअभियंता यांच्याकडे पाठवण्यात येतील. या माध्यमातून खड्डेमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने सार्वजनिक बांधकाम विभागाने उचललेले महत्वाचे पाऊल आहे.

00000

 

हेमंतकुमार चव्हाण,

सहायक संचालक(मा),

येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

धाराशिव,दि.२९ : तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी,विभागीय आयुक्त दिलीप गावडे,छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

सादरीकरणादरम्यान जिल्हाधिकारी श्री. पूजार यांनी,विकास आराखडा राबवताना एकूण ७३ एकर भूसंपादनाची गरज असल्याचे तसेच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीत तुळजापूर विकास आराखड्यासाठी १८६६ कोटी रूपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली.त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूसंपादनाच्या कामाला वेग द्यावा अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली.यामुळे आराखड्यातील कामांनाही गती मिळणार असल्याचे ते म्हणाले.

आराखड्यातील महत्त्वाच्या बाबी

तुळजापूरला जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घेत शाश्वत विकास करण्यासाठी तुळजापूर विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.भाविकांचा त्रास कमी करून त्यांना श्री.तुळजाभवानी देवीजींचे सुलभ व जलद दर्शन मिळावे, सध्याच्या पायाभूत सुविधांचा दर्जात्मक विकास करून नवीन पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करण्याचे काम या आराखड्याच्या अंमलबजावणीतून होणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मंदिराचा इतिहास,संस्कृती,वारसा आणि आध्यात्मिक मांगल्याची जपणूक यात होणार आहे.गर्दीचे नियोजन करताना स्मार्ट क्यू सिस्टीम, ऑनलाईन दर्शन व्यवस्था, भाविकांच्या संख्येचे नियमन,रस्त्यांचे रुंदीकरण,वैकल्पिक मार्ग तयार करणे,नवीन पार्किंग व्यवस्था,वाहन पार्किंगपासून मंदिरापर्यंतची वाहतूक सेवा,शौचालयांची संख्या वाढवणे, कचरा वर्गीकरण,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,प्राथमिक आरोग्य सुविधांचा विस्तार,विश्रांती स्थळे,भाविक सुविधा केंद्राची उभारणी,वॉटर कुलर व आरामदायक शौचालयाची सुविधा,सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी डिजिटल पद्धती (ॲप) चा वापर अशा काही सुधारणा या आराखड्यात समाविष्ट आहेत.मंदिर परिसरात मंदिर परिसीमा वाढवणे,मंदिर शिखर संवर्धन,कुंड,तीर्थ सुधारणा व संवर्धन, इतर मंदिर संवर्धन,विद्युतीकरण, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, सुरक्षा व टेहाळणी व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा इत्यादीचा समावेश आराखड्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांना दिली.

तुळजापूर हेरिटेज टूर

आराखड्यात तुळजापूर हेरिटेज टूर विकसित करण्याचे प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.यामध्ये अष्टतीर्थ भेट व दर्शन,मुख्य मंदिर भेट व दर्शन, रामदरा तलावाच्या डोंगरावर श्री. तुळजाभवानी देवीजी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद रूपात भवानी तलवार देतानाचे १०८ फूट उंचीचे भव्य शिल्प व शिव उद्यान,उद्यानात लाइट अँड साऊंड शो,रामदरा तलावात बोटिंगची सुविधा आदी बाबींचा समावेश आहे.

मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी आराखड्यातील कामे दोन वर्षात पूर्ण करण्यात यावेत,अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले. त्यानुसार ही सर्व कामे दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगतांना त्यांनी मुख्यमंत्री यांचे आभारही मानले.

****

प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची सेवा घडावी- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि. २९  –:  प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, गुणवत्तापूर्व बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व योग्य कृषी विषयक मार्गदर्शनातून शेतकऱ्यांची सेवा घडावी, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.

आज प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था नाशिक रामेती येथे आयोजित राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज) हैदराबाद, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती, नागपूर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक पुरस्कृत कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र वितरण समारंभात कृषी मंत्री ॲड. कोकाटे बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, निवृत्त परिवहन अधिकारी प्रकाश बनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा रामेतीचे प्राचार्य शिवाजीराव आमले, स्मार्ट प्रकल्प नाशिकचे विभागीय नोडल अधिकारी सुनील वानखेडे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, साहेबराव क्षीरसागर, अरूण आहेर यांच्यासह अधिकारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, 48 आठवडे कालवाधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 80 प्रशिक्षणार्थीना कृषी निविष्ठा विक्री व्यवसायातील तांत्रिक कौशल्ये आणि व्यवस्थापन क्षमता आत्मसात झाली आहे. या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा पुरविण्यासह शेतीत येणाऱ्या विविध समस्या सोडविण्यास होणार आहे. यामुळे कमी खर्चात शेतकऱ्यांची शेतीतील उत्पादनक्षमता वाढीस चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास मदत होईल.

उत्पादन वाढीसाठी शेतीत प्रयोग करून नवीन वाण निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये हॅकेथॉन स्पर्धा घेण्याचे नियोजन शासनस्तरावर सुरू आहे. येणाऱ्या काळात उत्कृष्ट कृषी सेवा देणाऱ्या कृषी सेवा केंद्रांची स्पर्धेतून निवड केली जाणार असून त्यांचाही शासनस्तरावर सन्मान केला जाणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकासासाठी नवीन प्रयोग व योजना कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन  प्रयत्नशील असल्याचेही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

कृषी निविष्ठा विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहचावे तसेच शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरवठा व्हावा, याउद्देशाने कृषी विषयांतील पदवीधर नसलेल्या कृषी निविष्ठा विक्री परवानाधारक विक्रेत्यांसाठी डिप्लोमा इन ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन सर्विसेस फॉर इनपूट डिलर्स (DAESI)अभ्यासक्रम देश पातळीवर हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, (मॅनेज) या संस्थेने तयार केलेला आहे. सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्यात वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन आणि विस्तार प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर या संस्थेमार्फत राबविला जात आहे. आठवड्यातील एक दिवस या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येतात. त्यानंतर परीक्षा घेतली जाते. एकूण ४८ आठवडे कालावधी असलेल्या या पदविका अभ्यासक्रमामध्ये थेअरी क्लास, प्रात्यक्षिक तसेच क्षेत्रीय भेटी याचा समावेश आहे. किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना असलेल्या कृषी निविष्ठा .विक्रेत्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. प्रादेशिक कृषी विस्तार प्रशिक्षण संस्था रामेती नाशिक येथून एकूण 127 कृषी सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षित करण्यात आले असल्याची माहिती  प्राचार्य श्री.आमले यांनी दिली.

यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष श्री. भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थित तुकडी 3 व 4 च्या एकूण 80 प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

000000

लोकराज्य डिसेंबर २०२४

लोकराज्य डिसेंबर २०२४ (भाग-१)

 

लोकराज्य डिसेंबर २०२४ (भाग-२)

दुय्यम सहनिबंधक कार्यालयाला महसूल मंत्र्यांची अचानक भेट

अमरावती, दि. 28(जिमाका) : विभागीय आयुक्त कार्यालयातून निघालेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला ताफा अचानक जुन्या तहसील कार्यालयातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वळविला. थेट खरेदी-विक्रीच्या टेबलवर बसून आलेल्या नागरिकांना खरेदीसाठी किती अतिरिक्त पैसे दिले याची विचारणा केली. यावेळी त्यांनी खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजू नये, असे आवाहन केले.

अमरावती येथील सह दुय्यम निबंधक वर्ग दोन अमरावती ग्रामीण कार्यालयात शेती, जमीन, घरे खरेदी-विक्री करण्यासाठी शासकीय नियमानुसार असलेल्या 2 टक्के शुल्काशिवाय अतिरिक्त पैसे घेतात, तसेच दलाल सक्रीय असल्याची तक्रार पालकमंत्री यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी स्वत: कार्यालयात जाऊन खरेदी-विक्रीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून खरेदीसाठी नोंदणी आणि मुद्रांकाशिवाय किती रक्कमेची मागणी करण्यात आल्याची विचारणा केली.

नागरिकांनीही पाच हजार रूपये देण्यात आल्याचे सांगितले. यावरून पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यालयातील अतिरिक्त शुल्क आकारण्यावर नियंत्रण करण्याच्या सूचना दिल्या. कर्मचाऱ्यांनी विहित शुल्कापेक्षा अतिरिक्त पैसे स्वीकारल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा दिला. नागरिकांच्या तक्रारी पाहता येत्या काळात सर्व नोंदणी कार्यालयात आकस्मात भेटी देण्यात येतील. गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करण्यात येईल. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...