शुक्रवार, जून 27, 2025
Home Blog Page 1610

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-३; दिंडोरी लोकसभासाठी १२९ किमी लांबीच्या रस्त्यांना तत्वत: मंजुरी – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक 24 डिसेंबर, 2022 (जिमाका वृत्तसेवा): प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 3 अंतर्गत 2024-2025 वर्षासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आहे. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने दिंडोरी, पेठ, चांदवड, देवळा, सुरगाणा, नांदगांव, मालेगाव, येवला, निफाड या तालुक्यातील 128.47 किमी लांबीच्या रस्त्यांना तत्वत: मंजूरी दिली असून त्यासाठी 97.46 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

ग्रामीण भागात दळणवळण सहज सोपे व्हावे यासाठी रस्त्यांचा विकास आणि रस्त्याच्या मजबूतीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 3 मध्ये तत्‍वत: मंजुरी मिळालेल्या रस्त्यांमुळे दिंडोरी, पेठ, चांदवड, देवळा, सुरगाणा, नांदगांव, मालेगाव, येवला, निफाड या तालुक्यातील 22 महत्वाच्या रस्त्यांचा विकास आणि मजबुतीकरण होणार आहे. आदिवासी बहुल तसेच ग्रामीण भागातील खेड्यांचा विकास कराण्यासाठी रस्त्यांचा दर्जा आणि त्यांचे मजबुतीकरण होणे आवश्यक असल्याने केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांच्याकडे पाठपुरावा केल्यानुसार रस्ते विकासासाठी 97.46 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा फायदाच होणार आहे. वरील तालुक्यातील 22 रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

देशाच्या ग्रामीण भागामध्ये वाढलेली कनेक्टिव्हिटी ही देशाच्या सर्वांगीण आर्थिक वाढीसाठी आवश्यक आहे. ग्रामीण भागाच्या नियोजित विकासामध्ये तेथील रस्त्यांचा विकास हे केंद्र सरकारचे मुख्य लक्ष असल्याने देशातील ग्रामीण रस्ते विकासासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हा केंद्र सरकारचा प्रमुख कार्यक्रम आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील 1000 पेक्षा जास्त व आदिवासी भागातील

500 पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांद्वारे जोडणे हा आहे. या योजने अंतर्गत बिगर आदिवीसी भागात 500 पेक्षा जास्त व आदिवासी भागातील 250 पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्यांद्वारे जोडण्याबाबतच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या टप्पा क्रमांक 3 मध्ये राज्याला 6 हजार 550 किमी लांबीचे ग्रामीण रस्ते सुधारणा करण्याचे उद्दीष्ट दिले आहे.

केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्र. 3 अंतर्गत रस्ते विकास कामाबाबत नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय खासदार उपस्थितीत असल्याचेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

000

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली आमदार जयकुमार गोरे यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

सातारा, दि. 24  – पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमदार श्री गोरे यांचा काल फलटण येथे अपघात झाल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या विषयी माहिती मिळताच पालकमंत्री श्री. देसाई यांनी तातडीने नागपूर येथून पुणे येथे येत आमदार श्री. गोरे यांची भेट घेतली. या भेटीवेळी पालकमंत्री श्री देसाई यांनी आमदार श्री गोरे यांची दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्री महोदयांशी बोलणेही करून दिले.

पालकमंत्री श्री देसाई यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली व आमदार श्री गोरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. आमदार श्री गोरे यांची प्रकृती चांगली असून नागरिकांनी रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहनही पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.

तसेच सातारा व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व सबंधित अधिकारी यांच्याशी ही चर्चा केली.

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, धैर्यशील कदम, पुणे विभागीय आयुक्त सौरव राव, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, रुबी हॉलचे डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मुनोत यांच्यासह आमदार श्री. गोरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाताळनिमित्त शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, प्रभू येशू ख्रिस्तांनी जगाला शांती, प्रेमाचा संदेश दिला. यातून प्रेरणा घेऊन आपण एकमेकांचा आदर करूया, परस्परांची काळजी घेऊया. ख्रिस्त जन्मोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात सुख,समृद्धी आणि सौहार्दाचे क्षण घेऊन येवो यासाठी हार्दिक शुभेच्छा.

000

संशोधन व उत्तम मनुष्यबळ निर्मितीमध्ये एलआयटीचे अमुल्य योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 24 : रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रात लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेने (एलआयटी) बहुमोल कामगिरी केली आहे. तसेच संशोधन व उत्तम मनुष्यबळ निर्मितीमध्ये अमुल्य योगदान दिले आहे. येत्या काळात देशाला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी या संस्थेचा मोलाचा वाटा असेल, असा  विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

एलआयटी संस्थेच्या जागतिक माजी विद्यार्थी संमलेनात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर, एलआयटी संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अभय देशपांडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, 80 वर्षाच्या देदिप्यमान इतिहास असणाऱ्या एलआयटी संस्थेने महाराष्ट्र  व देशाला उत्तमोत्तम संशोधन व मनुष्यबळ दिले आहे. या संस्थेने काळानुरुप बदल करीत रासायनिक तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेतली आहे. स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याची या संस्थेची मागणी व योग्यता असून नियमानुरुप या संस्थेला हा दर्जा देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची योजना आहे. या शैक्षणिक धोरणात देशातील महत्वाच्या संस्थांना स्वायत्ततेचा व अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

एलआयटीच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा   

विद्यार्थी जीवनात आपण  मित्रांना भेटण्यासाठी एलआयटीच्या वसतीगृहात येत असू असे सांगून श्री फडणवीस यांनी या संस्थेशी असलेल्या ऋणानुबंधावर प्रकाश टाकला. भारत ही जगातील पाचवी मोठी आर्थिक सत्ता असून येत्या काळात देशाला या श्रेणीत तिसऱ्या स्थानावर घेऊन जायचे आहे. त्यासाठी संशोधन, कुशल मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी एलआयटी संस्था मोलाचे योगदान देऊ शकते, असे सांगून राज्य शासन आणि विद्यापीठ या संस्थेच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

एलआयटीच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

या कार्यक्रमात  श्री. फडणवीस यांच्या हस्ते विविध श्रेणीत माजी विद्यार्थ्यांना ज्वेल ऑफ एलआयटी आणि  युथ आयकॉन‘ पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. द्वारकानाथ काळेडॉ. अतुल वैद्यप्रशांत नसेरीसुब्रह्मण्यम सर्माऋतुराज गोविलकरविनोद  कालकोटवार, किशोर ढोकणेअनिल घुबे यांचा ज्वेल ऑफ एलआयटी पुरस्काराने गौरव करण्यात आला. योगेंद्र शास्त्री यांना युथ आयकॉन‘ पुरस्काराने गौरविण्यात आले.

तत्पूर्वी, श्री. फडणवीस यांनी एलआयटीचे संस्थापक राव बहादूर लक्ष्मीनारायण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. संस्थेच्या परिसरातील डॉ. पी.एस.मेने मेमोरियल पायलट प्लांटचे उद्घाटन त्यांनी केले. संस्थेच्या लिटा संवाद‘ या वार्षिकेचे उपमुख्यमंत्र्यांच्या  हस्ते विमोचन करण्यात आले.

 

000

शाश्वत विकासासाठी आदिवासींच्या क्षमता अभ्यासा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि.24 : आदिवासी घटकांमधे खुप क्षमता आहेत त्यांचा वापर करून शाश्वत विकास साधण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागपूर येथे कुलगुरूंना दिल्या. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय ‘आदिवासी विकास, पूर्वनिरीक्षण आणि पुढचा मार्ग’ या विषयावरील कुलगुरूंच्या संमेलनात राज्यपाल बोलत होते. उपस्थित महाराष्ट्र व छत्तीसगड मधील कुलगरूंना राज्यपाल म्हणाले की, आपण या ठिकाणी आदिवासींसाठी विचारमंथन करत आहात, ही आनंदाची बाब आहे. तुम्ही देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या ज्ञानाचा वापर करून शाश्वत विकासात योगदान द्यावे. आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण योगदान देत असताना,  आदिवासींची संस्कृती, परंपरा जपत त्यांना नव्या प्रवाहात येण्यासाठी तयार करणे गरजेचे आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठात सुरू असलेल्या कामांची प्रशंसा केली. आदिवासी आणि शिक्षणाचे महत्व सांगितले. व्यासपीठावर नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डॉ.गजानन डांगे उपस्थित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिवसभरातील विचारमंथनातून तयार केलेल्या श्वेतपत्रिकेचे अनावरण केले.

श्वेतपत्रिकेबाबत कुलगुरू बोकारे यांनी माहिती सादर केली. ते म्हणाले, आदिवासींचे हक्क आणि त्यांच्या शाश्वत विकासासाठी त्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या अर्थचक्रासाठी परंपरागत वनोपज गोळा करणे, प्रकिया करणे, उद्योग उभारणी करणे, तेथील झाडीपट्टी नाट्य व्यवसायाची नोंद घेणे. त्यांना आवश्यक ज्ञान देण्याची व प्रत्यक्ष माहिती गोळा करून संशोधन अहवाल व अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे. या श्वेतपत्रिकेत शाश्वत विकासासाठी अनेक मुद्दयांचा समावेश करण्यात आला आहे. या संमेलनात पुणे मुंबईसह मराठवाडा, नाशिक तसेच बिलासपूर येथील विद्यापीठ कुलगुरू व प्राध्यापकांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक डॉ.गजानन डांगे यांनी केले. संचलन डॉ.श्याम कोरेटी यांनी तर आभार प्रदर्शन प्र-कुलगरू डॉ.संजय दुधे यांनी केले.

000

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे लसीकरण आणि वैद्यकीय शिबीर संपन्न

मुंबई, दि.24 : महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डी वॉर्ड कार्यक्षेत्रात ताडदेव, महापालिका शाळा, बने कम्पाउंड, साने गुरूजी  येथे आज बालकांसाठी मोफत लसीकरण आणि वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये बालकांची दंत तपासणी आणि उपचार तसेच वैद्कीय तपासण्या करण्यात आल्या. या शिबीरासाठी मोठ्या प्रमाणत बालके उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा उपस्थित होत्या.

नाताळ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो.  हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

000

Governor Koshyari greets people on Christmas

 

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari has extended his Christmas and New Year greetings to the people.

In a message, the Governor has said

“The festival of Christmas reminds us of the noble life of Jesus Christ so full of love, courage, compassion and forgiveness. May the festival bring happiness, contentment, peace and prosperity to all. I extend my heartiest greetings and good wishes to the people on the occasion of Christmas and the New Year.”

 

सीमावर्ती भागातील प्रश्न सोडविण्यासाठी परस्पर समन्वय व्यापक व दृढ करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

अमरावती, दि. 24 : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा चांगला परस्पर समन्वय आहे. तो दृढ व व्यापक करण्यासाठी संघटित प्रयत्न करावेत, असे निर्देश महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठक डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे झाली. यावेळी दोन्ही राज्यांचे राज्यपाल व सीमावर्ती जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत आंतरराज्यीय सामायिक मुद्यांबाबत चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्रातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलडाणा व मध्यप्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा, सिवनी, बैतूल, बुऱ्हानपूर, खांडवा आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, दोन्ही राज्यांतील सीमावर्ती भागातील प्रश्न सौहार्दपूर्वक व सामंजस्याने सोडवावेत. त्यासाठी सातत्यपूर्ण परस्पर समन्वय ठेवावा. पूरस्थिती व सिंचन प्रकल्पासंबधीचे प्रश्न स्थानिक स्तरावर उपाययोजना आखून समन्वयाने सोडवावेत. स्थलांतरित मजूरांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या नोंदी विशेष ॲप तयार करून नियमित घ्याव्यात जेणेकरुन त्यांची माहिती दोन्ही राज्यातील प्रशासनाला मिळून त्यांना विविध योजनांचा लाभ देता येणे शक्य होईल. दोन्ही राज्यांनी सीमावर्ती जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

अवैध गोवंश वाहतूक, अवैध मानवी वाहतूक, बेकायदेशीर खनिज उत्खनन, अवैध शस्त्रे, गुटखा, दारुविक्री, मादक पदार्थ यांना पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यांच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा व्यवस्था पुरेसे मनुष्यबळ ठेवून सुसज्ज करावी. तसेच तिथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवून चोख निगराणी ठेवावी. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पोलीस विभागाने संयुक्त अभियान राबवावे, असे निर्देश राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी दिले.

मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री. पटेल म्हणाले की, सीमावर्ती जिल्ह्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन्हीकडच्या प्रशासनात परस्पर चर्चा आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून ज्या समस्या राज्य स्तरावरुन सोडविल्या जाणे आवश्यक आहे त्याबाबत राज्य शासनाला सूचित करण्यात येईल. ही समन्वय बैठक पुढील काळात निश्चित लाभदायक ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपत्तीच्या काळात तसेच पूरस्थिती आदींबाबत पूर्वसूचना संबंधित जिल्ह्यांना परस्परांकडून वेळेत मिळणे आवश्यक आहे. तशी समन्वय यंत्रणा प्रत्येक जिल्ह्याने कार्यान्वित करावी. सारस पक्षी संवर्धन उपक्रमासारखे काही महत्वपूर्ण प्रकल्प दोन्हीकडे राबविता येणार असल्याने तशी माहिती संबंधित जिल्ह्यांना कळवावी, अशीही सूचना त्यांनी केली.

मध्यप्रदेश येथील राज्यपालांचे प्रधान सचिव डी.बी. आहुजा, महाराष्ट्राच्या राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड, नागपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे अमरावती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या बैलगाडीची प्रतिकृती दोन्ही राज्यपालांना भेट देण्यात आली. प्रबोधिनीचे सहाय्यक प्राध्यापक पंकज शिरभाते यांनी सूत्रसंचालन केले.

000

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. चहांदे ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ

नागपूर, दि. 24 : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. संजय अंबादास चहांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय निवासस्थान देवगीरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री. चहांदे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अतिरिक्त मुख्य सचिव (जलसंपदा) दीपक कपूर, नितीन करीर, राजेश कुमार, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सदस्या श्वेताली ठाकरे, डॉ. साधना महाशब्दे, प्राधिकरणचे सचिव डॉ. रामनाथ सोनवणे, सचिव रंजनकुमार शहा, राजेंद्र मोहिते, उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष पाटील, गोसीखुर्दचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधिक्षक अभियंता राजेश सोनटक्के, पद्माकर पाटील, राजीवकुमार पराते, कन्नाजीराव वेमुलकोंडा उपस्थित होते.

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डॉ. चहांदे यांना शपथ दिली. तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. संजय चहांदे हे सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून 1988 च्या बॅचचे आयएएस आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून एम.एस्सी केले आहे. अमेरिकेतून त्यांनी लोकप्रशासन ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आपल्या 34 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी अनेक पदे भुषविली आहेत. नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेस प्रारंभ,  मुंबई शहर व उपनगर येथे जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक, नाशिकचे विभागीय आयुक्त, यशदा पुणे येथे महासंचालक, महिला व बालविकास विभागाचे सचिव, मुख्यमंत्री कार्यालयात सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव, पाणी पुरवठा विभागाचे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. तसेच केंद्रीय सेवेत असतांना आधारकार्ड प्रकल्पाचे उपमहासंचालक म्हणूनही त्यांनी कामकाज केले आहे.

000

जी२० बैठकीनिमित्त नागपूरचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 24 : जी – २० परिषदेनिमित्त दि.२१ व २२ मार्च २०२३ रोजी विविध देशातील मान्यवर नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामुळे येथील कला, संस्कृती, पायाभूत सुविधा, प्राचिन व  प्रेक्षणीय स्थळांचे ब्रँडींग जागतिक दर्जाचे करावे, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘देवगीरी’ येथे जी-20 परिषदेच्या आयोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर मेट्रोचे संचालक अनिल कोकाटे, महानगरपालिका,सुधारप्रन्यास व जिल्हा प्रशासनातील अन्य अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पूर्वतयारीचा आढावा सादर केला. विमानतळ ते प्रमुख महामार्गांचा कायापालट या काळात केला जाईल. मुंबईप्रमाणेच नागपूर येथे तयारी सुरु झाली असून प्रमुख रस्ते, बैठकीची स्थळे, ज्या ठिकाणी भेटी दिल्या जाणार आहेत त्या त्या ठिकाणी प्राधान्याने सजावट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगती पथावर असणारी कामे, प्रस्तावित कामे मार्चपूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करा. ऐतिहासिक स्थळे, ताडोबा, फुटाळा तलाव अशा प्रेक्षणीय  ठिकाणी पोहोचणाऱ्या रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा. मुंबई प्रमाणे उत्तम व दर्जेदार सुशोभीकरण करण्यात यावे. देशाच्या यजमान पदाला साजेशी उत्तम दर्जाची कामे करावी. स्थानिक कला, संस्कृती, खाद्य संस्कृती, पर्यटन, शासकीय विभागांची माहिती, जुन्या इमारती यांची भव्यता व आकर्षकता प्रतिबिंबीत झाली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

या बैठकीला उपस्थित प्रधान सचिव दीपक कपूर यांनीही मिहान व अन्य महत्वाच्या प्रकल्पांची माहिती बैठकांमध्ये अधिक चांगल्याप्रकारे सादर व्हावी, अशा सूचना केल्या. या निमित्ताने दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे.आयोजनाची प्रसिद्धीही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

000

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचे प्राधान्यक्रम ठरवा – आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक ऊईके

0
नागपूर, दि. २७ : आदिवासी विकास विभागाकडून विविध विभागांना आदिवासींच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, संबंधित विभागाने हा निधी खर्च करताना त्याचा...

शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न अमरावती, दि. २७ : राज्य शासन कृषी क्षेत्रातील विकासासंदर्भात विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पादन...

कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर….

0
कोल्हापूर म्हटले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे उमदे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे येते. श्री अंबाबाई, श्री जोतिबा, गड, किल्ले, जंगल, घाट, वने, धरणे, तांबडा-पांढरा आणि...

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २७ : श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरु करुन कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र...

भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासाला मिळणार गती; ठाणे- भिवंडी-कल्याण भूमीगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल निर्मितीचा स्वतंत्र...

0
मुंबई, दि. २७ : भिवंडी शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या परिवहन सेवेच्या गरजा भागविण्यासाठी कल्याण – भिवंडी मेट्रो लाईन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भिवंडी शहरात वाढती...