शुक्रवार, जून 20, 2025
Home Blog Page 1472

महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे, दि.८: आंतराष्ट्रीय महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनी व  महिलांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्य कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये प्रवेशद्वारात सर्व महिला अधिकारी / कर्मचारी यांचा सन्मान स्वागत सोहळा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला मुख्य अभियंता, अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे,  कृषिविस्तार  प्रशिक्षण संचालक विकास पाटील, कृषि संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण दिलीप झेंडे, माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदी उपस्थित होते.

कृषि आयुक्त श्री. चव्हाण यांनी प्रारंभी महिला दिनानिमित्त मध्यवर्ती इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला अधिकारी -कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले. ते म्हणाले, संयुक्त राष्ट्रसंघाने यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन ‘डिजिटऑल-लिंग समानतेसाठी नाविन्यता आणि तंत्रज्ञान’ (डिजिटऑल- इनोव्हेशन ॲण्ड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी) या संकल्पनेवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सर्व महिलांना डिजिटल साक्षर करण्यासह त्यांच्या सर्वसमावेशक विकासाचे काम करणे अपेक्षित आहे.

भारताच्या प्रयत्नामुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येत आहे. महिलावर्ग आरोग्याप्रती जागृत असतात. भरडधान्य हे पौष्टिक असल्याने महिलांनी आपल्या आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी त्यांचा पुरेपूर वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर म्हणाले, महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीशक्ती प्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. स्त्री ही कुटुंबाचे आर्थिक, मानसिक स्थैर्य तसेच आरोग्यासाठी नेहमी झटत असते. त्यामुळे महिलांप्रती आपल्याकडे नेहमीच आदरभाव असला पाहिले. या उपक्रमाच्या माध्यमातून तृणधान्याचे महत्त्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे, असेही डॉ. पाटोदकर म्हणाले.

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष व महिला दिनानिमित्त अतिशय चांगला उपक्रम राबविल्याबद्दल मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालयाचे कौतुक केले. त्यांनी महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या प्रवेशद्वारातच रेड कारपेटद्वारे महिला वर्गाचे स्वागत करण्यात आले. त्यांचे गुलाबपुष्प, तुळशीचे रोप, पेढा तसेच तृणधान्यापासून बनविण्यात आलेले पौष्टिक पदार्थांचे पाकिटं देऊन स्वागत करण्यात आले.

नाविन्यपूर्ण उपक्रम – स्वागताने महिलावर्ग आनंदी

आंतरराष्ट्रीय महिला दिनी शासकीय मध्यवर्ती इमारतीत अशा प्रकारचा आगळावेगळा स्वागत सोहळा प्रथमच होत आहे. या स्वागत सोहळ्यामुळे  मनस्वी आनंद झाला. कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी कृषि आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालयाचे आभारही मानले.

00000

महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकात महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ८:- आज सगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. अनेक आव्हानांचा सामना करत महिला पोलीस कर्मचारी कामाच्या ठिकाणी चोख कर्तव्य बजावत असतात. पोलीस महिला कर्मचाऱ्यांसाठी ज्या आवश्यक सोयीसुविधा आहेत त्या प्राधान्याने पूर्ण केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जागतिक महिला दिनानिमित्त विधिमंडळ प्रांगणात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आगामी अर्थसंकल्पातदेखील राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार असून महिला पोलिसांच्या सोयीसाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व पोलीस स्थानकात हिरकणी कक्ष सुरू करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री. फडणवीस यांनीही महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या कर्तृत्वाबाबत गौरवोद्गार काढले.

यावेळी उपस्थित महिला पोलीस अधिकारी यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार राम सातपुते, मुंबईचे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी आदी उपस्थित होते.

विधानसभा लक्षवेधी

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक  उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई दि. 8 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी करार व कंत्राटी पद्धतीवर आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक असून अधिवेशन काळात याबाबत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष बाब म्हणून कायम करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेतील करार व कंत्राटी पद्धतीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात पाच वर्षांपूर्वी वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे शक्य नसल्याने सध्या कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मानधन वाढीबाबत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना आढावा घेण्याच्या सूचना देण्यात येतील.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर निवडणुकीनंतर सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री उदय सामंत

 

मुंबई, दि. 8 : कोल्हापूर महानगरपालिकेच्या लगतच्या 42 गावांचा समावेश कोल्हापूर महानगरपालिकेत करून हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सूचना विधानसभा सदस्य जयश्री जाधव यांनी मांडली होती.

उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत ज्या महिन्यात संपत असेल त्याच्या सहा महिने अगोदरच्या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात आणि हद्दीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदल करता येत नाही असा नियम असल्याने याबाबत निवडणूक झाल्यानंतर या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

नाशिक महानगरपालिकेच्या भूमापन प्रक्रियेत मातंग समाजाच्या जागेसंदर्भातील बदलाबाबत लवकरच निर्णय – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील सर्व्हे नंबर 491 (फायनल भूमापन क्रमांक 251) नगर रचना योजना भाग – एक ही जागा अनेक वर्षापासून मातंग समाजाची होती. या जागेचा सातबारा देखील या समाजबांधवांच्या नावावर होता. परंतु भूमापन प्रक्रियेत बदल झाल्याचे निदर्शनास आल्याने यात अंशत: बदल करून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

याबाबत विधानसभा सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

श्री. सामंत म्हणाले, या जागेच्या आरक्षणात झालेला बदलाबाबत लवकरच निर्णय घेऊन ही जागा मातंग समाजाच्या  नावावर देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ/

खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 8 : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते जालना हा महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प असून या प्रकल्पामुळे त्या भागातील विकासाला चालना मिळेल. या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य संजय कुटे, संजय गायकवाड यांनी सहभाग घेतला.

या प्रकल्पाबाबतचा विकास आराखडा 31 मार्चपर्यंत रेल्वे बोर्डास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र शासनाने या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिल्यानंतर राज्याच्या हिस्स्यासंदर्भात शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

00000

शैलजा पाटील/विसंअ/

महिला दिनानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजूषा

मुंबई, दिनांक ८ : महिला दिनाचे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सर्व नागरिकांसाठी प्रश्नमंजूषा आयोजित केली आहे. ही प्रश्नमंजूषा स्त्री, पुरुष आणि पारलिंगी व्यक्ती यांच्यासाठी आहे. तरी या प्रश्नमंजूषेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.

या प्रश्नमंजूषेत स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांनी विवाहानंतर नाव बदलावे की नाही, पारलिंगी महिला (Transwoman), पारलिंगी पुरुष (Transman) या घटकासंबंधी प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांच्या उत्तरांसाठी केवळ हो/नाही पर्याय आहे.

या प्रश्नमंजूषेत १४ मार्च २०२३ पर्यंत https://forms.gle/SsnJYKACXzNkmQr67 या लिंकद्वारे सहभागी होता येणार आहे. या प्रश्न मंजुषेत सर्व सहभागींना ई-मेलद्वारे प्रमाणपत्र देण्यात येईल. याबाबत काही अडचण आल्यास प्रणव सलगरकर यांच्या ८६६९०५८३२५ या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री.देशपांडे यांनी कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत राज्यातील तिघांना अनुदान मंजूर

मुंबई, दि. ८ :  सैन्यातील १६ प्रकारच्या शौर्य पदक/सेवा पदक धारकांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील तिघा जणांना हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

नायक नीलेश मल्हारराव देशमुख  (जळगाव) यांना विशिष्ट सेवा पदक (सेना मेडल) प्रदान करण्यात आले आहे. त्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने त्यांना रुपये 12 लाख  रुपये या योजने अंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. दफादार नवल भाऊसाहेब भाऊराव यांना मेन्शन इन डिस्पॅच (शौर्य पदक) प्रदान करण्यात आले आहे. त्याबद्ल रुपये 6 लाख आणि कमांडर योगेश वसंत आठवले (सातारा) यांना विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. त्याबद्दल रुपये एक लाख या योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केला आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

सामान्यांच्या आरोग्यावरील खर्चात जन औषधी केंद्रांमुळे मोठी बचत -राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

मुंबई दि. 8 : “जन औषधी केंद्रांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. यामुळे गरीब नागरिकालाही औषधोपचार करुन घेणे शक्य होत आहे”, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

भारतीय जन औषधी दिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, देशातील ७६४ पैकी ७४३ जिल्ह्यांत जन औषधी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांत स्वस्तात उपलब्ध असलेल्या औषधांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरील खर्चात मोठी बचत होत आहे. या केंद्रात १ हजार ७५९ औषधे आणि २८० सर्जिकल उपकरणे उपलब्ध आहेत. येत्या वर्ष अखेरपर्यंत देशभरात सुमारे दहा हजार जन औषधी केंद्र सुरू करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांना स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण औषधांचा लाभ मिळेल.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, जन औषधी केंद्रामधून दिल्या जाणाऱ्या औषधांमुळे अनेक रुग्णांची पैशांची बचत होत आहे. औषधांच्या किंमती कमी झाल्यामुळे अनेक औषधे सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आली आहेत. जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी युवकांनी पुढे यावे. जन औषधी केंद्रांप्रमाणेच आरोग्यासाठी हेल्थ ॲण्ड वेलनेस केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना कालावधीत आशा सेविकांनी चांगले काम केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना औषधोपचार मिळावेत यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्याचा विचार व्हावा.

यावेळी जन औषधी सर्वश्रेष्ठ म्हणून सिम्बॉयसिसचे अधिष्ठाता डॉ. विजय सागर, जन औषधी मित्र म्हणून डॉ. तुषार पालवे यांना गौरविण्यात आले.

यावेळी आशा कार्यकर्ती सुशीला भंडारे, नेत्रतज्ज्ञ डॉ. नम्रता सोनवणे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. पूजा भुतडा यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल महिलादिनी सत्कार करण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील जन औषधी केंद्राचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन श्री. नीलकंठ खुणे, डॉ. सोनिया बागडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांच्या उपस्थ‍ितीत करण्यात आले.

सचिव नवीन सोना यांनी प्रास्ताविक केले, तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त भूषण पाटील यांनी आभार मानले.

यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, आयुक्त धीरज कुमार, आयुक्त अभिमन्यू काळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. स्वप्नील लाळे, जयगोपाल मेनन, सहसंचालक डॉ. गौरी राठोड, उपसंचालक डॉ. विजय बाविस्कर, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. कैलास बाविस्कर डॉ. एकनाथ माले आदी उपस्थित होते.

***

रवींद्र राऊत/विसंअ/

देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाण्याच्या वाटचालीत महिलांचे योगदान अत्यंत आवश्यक, उपयुक्त – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 8 : भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपला देश आता ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांचे योगदान आणि त्यांची सक्रिय भूमिका अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात स्त्रियांची गाथा नेहमीच महान राहिली आहे. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आनंदी गोपाळ जोशी, लता मंगेशकर अशा अनेक महिलांचे कार्य फार मोठे आहे. राज्याने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील, पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन दिल्या आहेत. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आपले प्रधानमंत्री कौशल्य विकासाला राष्ट्रीय गरज मानतात. यासाठी त्यांनी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु केला, राज्यातही हा विभाग सुरु करण्यात आला. या विभागाचे काम आणि यश आता अधोरेखित होत आहे. आज महिला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करत आहेत. परिणामी, लहान आणि मोठ्या अशा दोन्ही स्तरांवर आर्थिक सुधारणा दिसत आहेत. स्त्रिया जेव्हा आघाडीवर असतात तेव्हा नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळते, उत्पादकतेला चालना मिळते, त्यामुळे अर्थव्यवस्थेतही निश्चितच वाढ होते, असे ते म्हणाले.

महिला उद्योजकांचा सातत्याने विकास होत राहिल्यास देशात समतोल विकासाला नक्कीच चालना मिळेल. भारतातील महिलांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करता यावी यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे महिलांचे हक्क आणि कल्याण यावर अधिक जोर दिला जाईल, असे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

ग्रामीण, कृषी संबंधीत स्टार्टअप्सना चालना मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी 200  कोटी रुपयांची बीज भांडवल योजना आज सुरु करण्यात आली असून यातील किमान 30 ते 40 टक्के निधी ग्रामीण भागासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. ग्रामीण तसेच कृषी संबंधित स्टार्टअप्सना यातून चालना मिळेल. राज्यात आज 28 हजारांहून अधिक ग्रामपंचायती आहेत. या गावांमध्ये कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल. महिलांसाठी विविध प्रकारची कौशल्य प्रशिक्षणे, तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यावर कौशल्य विकास विभाग भर देईल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकासमार्फत महिला उद्योजकतेला चालना प्रधान सचिव मनिषा वर्मा

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की, कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील साडेपाच लाखांहून अधिक युवकांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येते. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यात स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अभियांत्रिकीमध्ये मुलींच्या प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबवीत आहोत. संयुक्त राष्ट्र संघटनेसमवेत फ्लाइट प्रोग्राम राबविण्यात येत आहे. अमरावती, नागपूर विभागातील दुर्गम क्षेत्रातील 215 विद्यार्थिंनींसाठी ॲडव्हान्स्ड आयटी प्रोग्रामिंग डिप्लोमा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र हे नेहमीच प्रगतीशील आणि सामाजिक सुधारणांना चालना देणारे राज्य राहिले आहे. हीच परंपरा कायम ठेवत कौशल्य विकास विभाग महिला उद्योजकतेला चालना देत आहे, असे त्यांनी सांगितले.

व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटर, बीजभांडवल योजनेचा शुभारंभ

याप्रसंगी राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटर तसेच महाराष्ट्र इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातील स्टार्टअप्सना विविध प्रकराचे सहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी या स्टार्टअप्सनी https://www.msins.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटरसाठी नोंदणी करावयाची आहे. महाराष्ट्र इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड ही योजना आयडीबीआय कॅपिटल यांच्या सहयोगाने राबविण्यात येणार असून याद्वारे 200 कोटी रुपयांचे बीजभांडवल उपलब्ध करुन देण्यात येईल. राज्यातील स्टार्टअप्समध्ये याद्वारे गुंतवणूक करुन त्यांना चालना देण्यात येईल.

याप्रसंगी उद्योजकता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गीतांजली सूर्यवंशी (जिल्हा सांगली), कल्याणी शिंदे (जिल्हा नाशिक), मंजुळा दहिभाते (जिल्हा यवतमाळ), मंजरी शर्मा (जिल्हा पुणे), नमिता शाह (जिल्हा मुंबई), पल्लवी उटगी (जिल्हा मुंबई), प्रेरणा भोपाळकर (जिल्हा रत्नागिरी), रीना गडेकर (जिल्हा वर्धा), संगीता सवालाखे (जिल्हा यवतमाळ), स्वाती धोटकर (जिल्हा चंद्रपूर), वीणा मोकतळी (जिल्हा पुणे), योगिता पटले (जिल्हा रत्नागिरी) यांचा राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याबरोबरच उत्कृष्ट कामगिरी करणारे महिला बचतगट, उत्कृष्ट कार्य करणारे व्यावसायिक प्रशिक्षण भागीदार, कौशल्य स्पर्धेतील महिला विजेत्या यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आभार मानले. कौशल्य विकास विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र धुर्जड, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, कौशल्य विकास विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

दर्जेदार, आशयघन मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 08  : समाजाला विषारी विचारांपासून वाचविण्याची जबाबदारी चित्रपटसृष्टीची आहे, दर्जेदार आणि आशयघन चित्रपट निर्मितीतून चित्रपटसृष्टीने ती पूर्ण करावी. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आज मंत्रालयात दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेंतर्गत 41 मराठी चित्रपटांना 12 कोटी 71 लाख रुपये अनुदान वाटपाचा कार्यक्रम मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह प्रसिद्ध चित्रपट कलावंत जॅकी श्रॉफ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

याप्रसंगी श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले कि, मराठी चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी पूरक आणि पोषण निर्णय घेतले जात असून दर्जेदार आणि आशयघन मराठी चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. राज्य सरकार चित्रपटांच्या निर्मितीला बळ देण्यासाठी पाठीशी उभे आहे. राज्यात जास्तीत जास्त चित्रपट तयार व्हावेत आणि ते चित्रपटगृहांमध्ये उत्तम चालावेत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यादृष्टीने राज्यातील नाट्यगृहे ही नाट्यचित्र मंदिर करता येतील का आणि तेथे दिवसभराच्या वेळेत चित्रपट प्रसारित करता येतील का, याचा विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या आपण राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे अनुदान दुप्पट करण्याचा निर्णय घेत आहोत. चित्रपटासाठी देण्यात येणारे अनुदान ३ महिन्याच्या आत देण्याची सूचना विभागाला केली आहे. अधिकाधिक आशयसंपन्न चित्रपट निर्मिती मराठीमधून व्हावी, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर येथील चित्रनगरीचा विकास त्यादृष्टीने आपण करत आहोत, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. मागील दोन महिन्यापूर्वी 15 सदस्यांची चित्रपट परीक्षण समिती राज्य शासनाने गठीत केली. चित्रपट क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञ मंडळींचा त्यामध्ये समावेश केला आहे. त्यामुळे पारदर्शी पद्धतीने जलदगतीने चित्रपटांचे परीक्षण होऊन अनुदान पात्र चित्रपटांना अनुदानाची कार्यवाही पूर्ण होईल, असे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्री.श्रॉफ यांनी मराठीमध्ये अनेक गुणी कलाकार असून मराठी मध्ये दर्जेदार चित्रपटनिर्मिती होत असल्याचे सांगितले.

प्रधान सचिव श्री. खारगे यांनी मराठी भाषेत अधिकाधिक अ वर्ग दर्जाचे चित्रपट तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आव्हानांना संधीत रुपांतरीत करण्याचे काम चित्रपट निर्मात्यांसोबतच राज्य शासन करणार असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ढाकणे यांनी प्रास्ताविक केले तर यावेळी चित्रपट निर्मात्यांच्या वतीने श्रीरंग गोडबोले, प्रमोद पवार आणि संतोष पोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वच निर्मात्यांनी त्यांच्या मनोगतातून अनुदान वाटपाच्या केलेल्या कार्यवाहीबाबत राज्य शासनाचे आभार मानले.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते चित्रपट निर्मात्यांना अनुदान वाटप करण्यात आले. यामध्ये ०४ चित्रपटांना “अ” दर्जा तर “३३” चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे. तर ०४ (मुरंबा, बंदीशाळा,पितृऋण,भोंगा) चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार अ दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. खैरे यांनी आभार मानले.

 

शिवराज्याभिषेकाच्या अर्धत्रिशतसांवत्सरिक महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनीही आपल्या सूचना द्याव्या असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

 

0000

 

वर्षा आंधळे/विसंअ/

राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

नवी दिल्लीदि. 8 मार्च : उत्कृष्ट छायाचित्रणासाठी राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

            येथील राष्ट्रीय माध्यम केंद्रात मंगळवारी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्यावतीने आठव्या राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगनमाहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रपरीक्षक मंडळाचे अध्यक्ष विजय क्रांती उपस्थित होते. कार्यक्रमात वेगवेगळ्या श्रेणीतील उत्कृष्ट छायाचित्रणांसाठी 13 छायाचित्रकांराना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांचा समावेश आहे. कार्यक्रमस्थळी केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या हस्ते  छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

            व्यावसायिक छायाचित्रकार श्रेणीतील विशेष उल्लेख’ हा पुरस्कार मुंबईतील दीपज्योती बनिक आणि पुण्याचे उमेश निकम यांना प्रदान करण्यात आला. तरसर्वोत्कृष्ट हौशी (ॲम्युचर) छायाचित्रकार या श्रेणीतील वार्षिक पुरस्कार पुण्याचे अरुण साहा यांना प्रदान करण्यात आला.

            ख्यातनाम छायाचित्रकार सीप्रा दास यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.   सर्वोत्कृष्ट  व्यावसायिक छायाचित्रकार श्रेणीतील  पुरस्कार   ससी कुमार रामचंद्रन यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यात   व्यावसायिक आणि हौशी (ॲम्युचर) श्रेणीतील प्रत्येकी सहा पुरस्कारांसह एकूण 13 पुरस्कार प्रदान करण्यात आले. व्यावसायिक श्रेणीसाठी   जीवन आणि पाणी हा विषय होता,  तर भारताचा सांस्कृतिक वारसा हा विषय हौशी श्रेणीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            जीवनगौरव पुरस्कारासाठी एकूण 9 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. व्यावसायिक छायाचित्रकार   श्रेणीसाठी एकूण 4,535 छायाचित्रांचा समावेश असलेल्या 462 प्रवेशिका प्राप्त झाल्या. या प्रवेशिका  21 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधून प्राप्त झाल्या होत्या. हौशी छायाचित्रकार  श्रेणीमध्ये 24 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमधून 6,838 छायाचित्रांचा समावेश असलेल्या 874 प्रवेशिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती परीक्षक मंडळाचे  अध्यक्ष श्री. क्रांती  यांनी कार्यक्रमात दिली.

            जीवनगौरव पारितोषिकांचे स्वरूप 3,00,000 रूपये रोख आणि मानचिन्ह असे आहे.    व्यावसायिक आणि हौशी या दोन्ही श्रेणींमध्ये अनुक्रमे. 50,000/- आणि 30,000/- रुपयांच्या रोख पुरस्कार आणि मानचिन्ह असे प्रदान करण्यात आले.

00000

अंजु निमसरकर वि.वृ.क्र. 51/ दि.08.03.2023

विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठिशी राज्य शासन उभे राहील. अधिकृत फेरीवाल्यांना सोयीसुविधा पुरविण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

चेंबूर येथे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांनी घेतलेल्या अनधिकृत वीज जोडणी संदर्भात सदस्य प्रकाश फातर्पेकर, संजय केळकर, कालिदास कोळंबकर, प्रताप सरनाईक, सुनील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना केंद्र सरकारच्या स्वनिधी योजनेतूनही लाभ देण्यात येत आहेत. राज्य शासनामार्फत अनधिकृत फेरीवाल्यांच्या अडचणी आणि त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

000

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि.  : मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या  डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी  प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये  इतका खर्च येतो.  या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते.  मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये  वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत आहे. आता पुन्हा  त्यात बदल करून पूर्वीप्रमाणेच २५०  रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

मुंबईतील म्हाडाच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना म्हाडाने थकीत घरभाडे दंडासहित भरण्याच्या दिलेल्या नोटिसाबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री अमीन पटेल, कालिदास कोळंबकर, योगेश सागर, अबू आजमी,आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “सुधारित सेवा शुल्क दर कमी करावा, याबाबत निवेदने प्राप्त झाली होती. सध्या सुधारित सेवा शुल्क दराच्या आकारणीबाबत आणि नोटीस बजावण्याबाबत तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. उपकरप्राप्त इमारतीच्या अडचणी लक्षात घेऊन या इमारतीच्या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, तसेच याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

0000

संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार –  आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

मुंबई दि ८ : राज्यातील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ३१ मार्चपर्यंत अर्ज मागविले जातात. संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या १०० पेक्षा अधिक प्राप्त झाली, तर विद्यार्थी संख्येवाढ करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले.

आदिवासी समाजातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या राखीव निधीतून देण्यात येणारे अनुदान बंद केल्याबाबतचा प्रश्न सदस्य राजेश एकडे,धनंजय मुंडे,दिलीप वळसे -पाटील यांनी उपस्थित केला होता.

आदिवासी  मंत्री डॉ. गावित म्हणाले की, सद्यस्थितीत सुरू असलेल्या संशोधन अधिछात्रवृत्तीमध्ये अन्य विद्या शाखांचा समावेश केला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना दरमहा ३१ हजार रुपये अधिछात्रवृत्ती दिली जाते. दिव्यांगांना अतिरिक्त दोन हजार रुपये सहाय्य अनुदान दिले जाते.

000

काशीबाई थोरात/विसंअ

ताज्या बातम्या

‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार...

0
स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजन जळगाव, दि. २० जून (जिमाका):...

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २० : रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांची संघटना आहे हा हेतूपुरस्सर पसरवलेला गैरसमज आपल्या पुस्तकातून दूर करताना संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती रमेश...

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; पुणे घाट परिसरात पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. 20 : कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांची मुलाखत

0
मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'आषाढी वारी’ निमित्त  शासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधा' या विषयासंदर्भात ग्रामविकास व...

मंत्रालयात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0
मुंबई, दि. 20 : मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. ‘इन्स्टिट्युट ऑफ योगा’ यांच्या सहयोगाने आयोजित...