शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 147

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 5 :- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन करीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “श्रीराम नवमी हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या जन्माचा उत्सव असून, हा दिवस त्यांच्या आदर्श जीवनमूल्यांची आठवण करून देतो. श्रीरामांनी दाखवलेली प्रजाहितदक्षता, सत्यनिष्ठा आणि निःस्वार्थ सेवा ही आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जीवनातून आपण एकता, शांती आणि समरसतेची शिकवण घेणे आवश्यक आहे. श्रीरामनवमीचा उत्सव सर्वांनी शांततेत, उत्साहात, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सलोख्याने साजरा करावा,” असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार केले प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन केले आहे.

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 5: महसूल विभागातील विविध बाबी, रचना, कार्यपद्धती, महसूली कायदे आदींमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांच्या शिफारशींवर चर्चा करुन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले. जनतेचे सेवक आहोत अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महसूल विभागाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने येथील हॉटेल ऑर्चिड येथे आयोजित दोन दिवसीय महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, राज्याचे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख डॉ. सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

महसूल विभाग हा शासनाचा चेहरा आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागरिकांशी सर्वाधिक जोडलेला गेला असल्याने या विभागाच्या कार्यक्षमतेवर, पारदर्शकतेवर आणि उत्तरदायित्वावर शासनाचे मूल्यमापन केले जाते.

महसूल विभाग आपल्या अतिशय प्राचीन अशा राज्य पद्धतीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा मानलेला गेला आहे. पावणेदोन हजार वर्षापूर्वीच्या चाणक्याचे अर्थशास्त्रात या विभागाची रचना आणि महत्त्व पाहायला मिळते. छत्रपती शिवरायांनी देखील महसूलची चांगल्या प्रकारची रचना केली होती. आज्ञापत्राच्या माध्यमातून महसूल जमा करणे, त्याचे व्यवस्थापन, जमिनीचे अभिलेख जतन करणे या संदर्भात अतिशय सुंदर अशा आज्ञावली त्यांनी तयार केल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये राज्यकर्त्या इंग्रजांनी एक मोठी जमीन महसूलाची पद्धत उभी केली. ज्यातून आपली महसूल पद्धती निर्माण झालेली आहे. अर्थात आपली पारंपरिक पद्धतीतील अनेक बाबींचा समावेशही यात दिसून येतो.

शासनामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जमिनीवर काम करण्याचा अनुभव एकत्रितपणे मांडण्याचे काम केले तर अधिक चांगल्या प्रकारे काम होऊ शकते. कारण हे करताना आपल्याला समस्या आणि त्यावरील उत्तरे देखील माहिती असतात. या कार्यशाळेत विभागाकडून सादर करण्यात आलेल्या विविध नियमावली, स्मार्ट डॉक्युमेंट, डॅशबोर्ड, संकेतस्थळे, त्यावर नवीन प्रणालींवर हे दिसून येते. हे तयार केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या रुपाने व्यवसाय सुलभीकरण अर्थात ‘ईज ऑफ डूईंग बिझनेस’ आणि जीवनशैलीतील सुलभीकरण (ईज ऑफ लिव्हींग) या दोन्ही गोष्टींसाठी निश्चित काय कराचये यासाठीची प्रमाणीत अशी गीता तयार करण्याचे काम मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करुन विभागाने केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शंभर दिवसाचा कार्यक्रम सर्व विभागांनी चांगल्या प्रकारे मनावर घेतला. पुढील पाच वर्षे आपल्याला कुठल्या दिशेला काम करायचा आहे त्याचा वास्तुपाठ किंवा त्याची मुहूर्त वेळ करण्याकरता शंभर दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला होता. पण ज्या कार्यक्षमतेने आणि ज्या गांभीर्याने महसूल विभाग किंवा अन्य विभाग असेल यांनी ज्या प्रकारे तो हातामध्ये घेतला ते पाहता आपले लक्ष्यांक पूर्ण करण्यात हे सर्व विभाग यशस्वी ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

नागरिकांना माहितीसाठी अर्जच करण्याची गरज लागणार नाही अशी व्यवस्था करा

विभागाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केले आहे. ते नागरीक स्नेही तसेच त्याच्यावर स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटीकरण असले पाहिजे. माहितीच्या अधिकारात नागरिेकांना माहिती मागण्याची गरजच पडू नये यासाठी पुढील चार सहा महिन्यात जेवढी माहिती मागितली जाते ती सर्व या संकेतस्थळावर असेल असा प्रयत्न स्वयंस्फूर्तीने करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. नव्याने तयार केलेल्या संकेतस्थळाच्या सुरक्षेवर भर दिला असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यालयातील स्वच्छतेच्या दृष्टीनेही काम होत आहे. जुने अभिलेख निंदणीकरण करुन त्यापैकी अनावश्यक असलेले नष्टीकरण करणे तर आवश्यक अभिलेख चांगल्या प्रकारे जतन करायचे होते. जुने फर्निचर, जुनी वाहने, जुन्या पडलेल्या वस्तू यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लाऊन कार्यालये चांगली दिसतील अशी कामे व्हावीत. याबाबत ज्यांचे काम राहिले असेल त्यांनी ते पूर्ण करावे, अशा सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.

येणाऱ्या लोकांना पिण्याचे पाणी, शौचालये, महिलांसाठी शौचालये, प्रतिक्षालय, सूचना फलक आदी सुविधांसाठी काम सुरू झाले आहे. काही कार्यालयात अतिशय चांगले काम होत असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयातील वातावरण व सुविधा चांगल्या असतील तर आपल्या कामाच्या आशा, अपेक्षा तसेच चिंतांसह येणाऱ्या नागरिकांना योग्य ठिकाणी आल्यासारखे वाटते. तक्रार निवारण व्यवस्था असली पाहिजे. भेटीच्या वेळा निश्चित केलेल्या असल्या पाहिजेत व त्यावेळी उपलब्ध असले पाहिजे. आपले सरकार पोर्टलवर आलेल्या प्रलंबित प्रकरणांवरील सूचनांवर, लोकशाही दिनाबाबत योग्य काम व्हावे, असेही ते म्हणाले.

समस्यांवरील उपाययोजना समजण्यासाठी क्षेत्रीय भेटी द्याव्यात

प्रत्यक्ष जमिनीवर लोकांमध्ये गेल्याशिवाय, समस्येचा थेट सामना केल्याशिवाय, त्याची उपाययोजना समजत नाही, जाणीव होत नाही तसेच आपल्या कर्तव्याचा बोध होत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन वेळा क्षेत्रीय भेटी द्याव्यात. वरिष्ठ अधिकारी जेव्हा प्रत्यक्ष भेटी देतात तेव्हा कामांमध्ये काही अपारदर्शकता असल्यास ती दूर होण्यासह उत्तरदायित्व निर्माण होते.

गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष तयार केला आहे. त्यातून गुंतवणूकदारांना जमिनीची माहिती चांगल्या प्रकारे मिळते. या व्यवस्थेच्या आणि संकेतस्थळांच्या फायद्याचे उदाहरण म्हणजे कृषी उपकेंद्रांच्या जवळची 90 टक्के शासनाची जमीन केवळ 9 महिन्यात जमीन ताब्यात घेतली. केंद्र शासनाच्या कुसुम योजनेंतर्गत या जमिनीवर सौर प्रकल्प स्थापन करुन 16 हजार मेगावॅट वीज सौर कृषी वाहिनीद्वारे शेतीपंपाला मिळण्याची व्यवस्था केली आहे. आतापर्यंत केवळ महाराष्ट्राने हे साध्य केले असून या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडे 4 हजार कोटी रुपयांची मागणी सादर केली आहे. यामुळे पुढील पाच वर्षात अजून विजेचे दर कमी करत आहोत. दोन हजार पेक्षा जास्त ठिकाणी नऊ महिन्यात जागा मिळवणे हे नवीन तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे.

उद्योगांशी समन्वय साधण्यासाठी समन्व्य अधिकारी नेमावा

मोठ्या उद्योगातील रिलेशनशीप मॅनेजरप्रमाणे काम करणारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक समन्वय अधिकारी असावा. जेणेकरुन आपल्या जिल्ह्यात उद्योग विभाग आणि उद्योगांमध्ये झालेल्या सामंजस्य करारांविषयी माहिती हा समन्वय अधिकारी घेईल आणि त्यातील अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेल. त्याचा फायदा सामंजस्य कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी होऊ शकेल. गुंतवणुकीला चालना देण्यासाठी एक समर्पित व्यवस्था करावी लागेल, असेही ते म्हणाले.

राज्यातील 12 हजार 436 कार्यालयात हा 100 दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात कोकण विभागातील 2 हजार 427 कार्यालये, छत्रपती संभाजीनगर 2 हजार 379, पुणे 1 हजार 984, नागपूर 1 हजार 945, नाशिक 1 हजार 925 तर अमरावती विभागातील 1 हजार 776 कार्यालयांचा 100 दिवसात चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे काम बाकी राहिल त्यांना सुधारणा करण्यासाठी संधी दिली जाईल. 1 मे पर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर या कार्यालयांचे क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियामार्फत त्रयस्त मूल्यमापन होणार आहे. त्यानुसार सर्वोत्तम कामगिरी करणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विभागातील कनिष्ट स्तरावरील चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व कार्यालयांचे सौर ऊर्जीकरण करण्यात यावे, असे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार आपली सर्व कार्यालये सौर ऊर्जीकरण करावयाची आहेत. त्यासाठी आवश्यक तेथे जिल्हा नियोजन समितीकडील निधी, विविध विभागांना यासाठी राखून ठेवलेला निधी वापरण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्यात किमान २ पर्यटन स्थळे तेथे येणाऱ्यांची संख्या, महत्त्व लक्षात घेत निवडून त्या ठिकाणी विविध सुविधा निर्माण करणे, त्या माध्यमातून पुढील काळात पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. याबाबतही सर्वोत्तम काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात करण्यात येईल, असेही ते म्हणाले. त्यामुळे पर्यटनवृद्धीसाठी अशा प्रकारचा कार्यक्रम पुढील काळात मोठ्या प्रमाणात राबविता येईल.

आताच्या विकासाच्या प्रक्रियेत भूसंपादन ही महत्त्वाची बाब असून ही प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. भूसंपादनात जमिनीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी तंत्रज्ञान, उपग्रह, ड्रोन, उपग्रहीय छायाचित्रांचा वापर करावा. हे करत असताना केंद्र शासनाच्या पीएम गतीशक्ती पोर्टलचा प्रभावी वापर करावा. भूसंपादन प्रकरणांचा आढावा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दरमहा घेतला पाहिजे. यामुळे मोबदला निश्चित करताना अकारण चुकीच्या बाबी होणार नाहीत आणि भूसंपादन प्रकारांतील गैरप्रकार रोखले जातील.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येणार

महसूल विभागाशी निगडित विविध बाबींचा अभ्यास आणि शिफारशी करण्यासाठी सहा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा अभ्यासगट स्थापन करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगट जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांच्या संदर्भात सुधारणा सुचवेल. अमरावती विभागीय आयुक्तांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रमुख कामगिरी निर्देशांक (केपीआय) तयार करावेत. विभागीय आयुक्त नागपूर यांनी विभागातील उत्कृष्ट कामगिरींचे (बेस्ट प्रॅक्टिसेस) संकलन करून त्यांचे मूल्यमापन करावे व त्यांचे प्रमाणीकरण करावे. जेणेकरुन त्यातील चांगल्या गोष्टी संपूर्ण राज्यभरात राबविता येतील.

इज ऑफ लिव्हिंग बाबत शिफारशीसाठी विभागीय आयुक्त पुणे यांचा गट करण्यात येईल. ज्यामध्ये नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील. महसूली कायदे, नियम आणि प्रक्रियेत आवश्यक बदल सुचविण्याचे काम या गटाने करावे. विभागीय आयुक्त कोकण यांनी जिल्हा नियोजन समितीला अधिक परिणामकारक कसे करता येईल. त्याबाबतच्या आदर्श कार्यपद्धती आदी शिफारसी कराव्यात. नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने जिल्हाधिकारी कार्यालयाची रचनेचा अभ्यास करावा तसेच संस्था बांधणी आणिय क्षमता वृद्धी, भरती प्रक्रिया सुटसुटीत करणे, अधिकारांचे विकेंद्रीकारण आदी बाबत अभ्यासक्रम कराव्यात. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच नागरिक केंद्रित २ सेवांमध्ये सुलभता कशी आणता येईल असे काम प्रत्येक विभागीय आयुक्तांनी करायचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून

नागरिकांकडून मागवायची कागदपत्रे कमीत कमी करणे, सर्वत्र कार्यपद्धती समान असली पाहिजे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटाईज्ड तसेच अर्ज केल्यापासूनची उत्तर मिळेपर्यंत सर्व प्रकिया स्वयंचलित अर्थात ऑटोमेटेड करून हे काम पूर्ण करायचे आहे. या संदर्भातील सर्व अभ्यासगटांनी आपला अहवाल 30 जूनपर्यंत सादर करावा. जेणेकरुन त्यावर चर्चा करून त्यातील आवश्यक शिफारशी 15 ऑगस्टपासून लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

काम करताना सद्हेतूने चुका झाल्या तरी निश्चितपणे पाठिशी उभे राहू. परंतु, जाणीवपूर्वक चुकीचे काम करणाऱ्यांना पाठिशी घातले जाणार नाही. सामान्य माणसाला सोप्या शब्दात जमिनीबाबत शिक्षित करण्यासाठी महसूल विभागाने आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर एक चॅनेल काढले पाहिजे. त्यावर आठ अ, सात बारा, फेरफार आदींबाबत माहिती मिळण्यासाठी छोटे छोटे व्हिडीओ, शॉर्ट्स टाकावेत. अधिकाधिक तंत्रज्ञान स्वीकारून त्यावर आधारित बेस्ट प्रॅक्टिसेसचा अवलंब करावा. महसूल विभागाने एखादी हॅकेथॉन करावी. ज्यातून चांगल्या उपाययोजना मिळतात. जनतेचे सेवक म्हणून अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करावे, असेही ते म्हणाले.

महसूल राज्यमंत्री म्हणाले, महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या पाठीचा कणा आहे. सर्वाधिक ताण तसेच जबाबदारी असलेला हा विभाग आहे. महसूल विभागाचे अधिकारी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. प्रशासन आणि शासन एकत्र आल्यावर आपण आपल्या विभागाचा विकास करू शकतो. आपल्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी वरीष्ठ ते कनिष्ट स्तरापर्यंत तंत्रज्ञानाचा, कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा, असेही ते म्हणाले.

राजेश कुमार म्हणाले, या कार्यशाळेत 114 अधिकारी सहभागी झाले. त्यापैकी अनेकांनी त्यांच्या स्तरावर राबविलेल्या उपक्रमांचे, प्रणालींचे सादरीकरण केले. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून विभागाची नियम पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यात आवश्यक ती सुधारणा करण्यात येणार आहे. राज्यात 4 हजार 500 च्या वर तलाठी कार्यालयांचे बांधकाम सध्या सुरू आहे. पुढील पीक पाहणी संपूर्णत: उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आभार डॉ. पुलकुंडवार यांनी मानले.कार्यक्रमात महसूल विभागाच्या महसूल अधिकारी नियमपुस्तिकेचे प्रकाशन तसेच विभागाच्या विविध उपक्रमांचे, संगणक प्रणालींचे उद्घाटन करण्यात आले.कार्यशाळेस राज्यातील जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री संत बाळूमामांचे दर्शन

कोल्हापूर, दि. ५ (जिमाका): जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री संत बाळूमामांचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली आणि देवस्थानच्या विश्वस्त मंडळाशी संवाद साधला.

या वेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव, सरपंच विजयराव गुरव, प्रांताधिकारी हरेश सुळ, देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष रागिणी खडके यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री संत बाळू मामा देवालयाच्या वतीने विकास आराखडा संदर्भात निवेदन देण्यात आले. दर्शनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी संत बाळूमामांच्या कार्याचा गौरव करत या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कागल बिद्री श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना कॉलेज ग्राउंड येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिंचेकर, रवींद्र माने, वीरेंद्र मंडलिक, आजरा -भुदरगड उपविभागीय अधिकारी  हरेश सूळ, राधानगरी कागल उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, कागल तहसीलदार अमरदीप वाकडे उपस्थित होते.

ग्राम कृषिविकास समितीने प्रकल्पासाठी सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि. 5 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी गावपातळीवर ग्राम कृषिविकास समितीने सूक्ष्म नियोजनातून आराखडा तयार करावा,असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.

आज सिन्नर शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर येथे आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 कार्यशाळा व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी आमले] तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, नाशिक उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी जयंत गायकवाड, पाणी फाउंडेशनचे राजेश हिवरे यांच्यासह अधिकारी व पोकरा योजनेतील समाविष्ट असलेले गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे यावेळी म्हणाले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी जागतिक बँकेने निकषांनुसार विकासावर आधारीत गावांची निवड केली असून या सूवर्णसंधीचा गावांनी फायदा करून घेतला पाहिजे. ग्रामस्थांनी त्यांची शेती चांगल्या प्रकारे कशी विकसित कशी होईल यासाठी एकत्र येवून लोकसहभागातून हा प्रकल्प यशस्वी करावयाचा आहे. हवामान बदलास जुळवून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे व त्यासाठी आधुनिक तंत्राचा अवलंब करून  संसाधनाचा कार्यक्षम वापर करणे,  पाण्याचा कार्यक्षमतेने वापर  वाढविण्यासाठी उपायोजना करणे व कृषी मालाची मूल्यसाखळी वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे. शेतकरी सक्षमीकरणासह येणाऱ्या काळात शेतमालाची विक्री व्यवस्था सुद्धा मजबूत करण्यासाठी शासन प्रयन्तशील असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेले काम उल्लेखनीय असून लोकसहभागतून या प्रकल्पास निश्चितच गती मिळणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याठी डिजीटल फ्लेक्स व होर्डींगच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी  करण्यात यावी, अशा सूचनाही कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी कृषी अधिकारी श्री नाठे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत झालेले कामांचा आढावा यावेळी सादर केला. पाणी फाउंडेशन चे श्री. हिवरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. आमले व तालुका यांनीही मनोगत व्यक्त केले.

सिन्नर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी घेतला आढावा

सिन्नर तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा योजनांचा कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी अशोक भवारी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. बनसोडे, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग सिन्नर चे कार्यकारी अभियंता गंगाधर नवडंगे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) मुकेश धकाते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे  कार्यकारी अभियंता सचिन गोमासे, उप अभियंता अंकित जाधव उपस्थित होते.

उपअभियंता श्री. जाधव यांनी एकूण 80 पाणी पुरवठा  योजनांपैकी पूर्ण झालेल्या योजना, प्रगतीत असलेल्या योजना, सुरू असलेल्या व बंद असलेल्या योजनांचा आढावा सादर केला. कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी उपस्थित असलेले सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधून त्यांना पाणी पुरवठा योजनांबाबत असलेल्या अडचणी  जाणून घेतल्या व त्या सोडविण्याठी आवश्यक  कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

सातारा दि.4: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.

सातारा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात पर्यटन महोत्सव होत आहे. या महोत्सवात पर्यटकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये लेसर शो, स्वरोत्सव, साहसी उपक्रम, फुड फेस्ट आणि आनंदयात्रा, लहान मुलांसाठी विविध खेळ, कार्निवल परेड, उत्सव महाराष्ट्राचा समृध्द परंपरेचा, किल्ला प्रदर्शन,  शस्त्र प्रदर्शन, साहसी व मर्दानी खेळ, टेंटसिटी, ड्रोन शो, योग, वाद्यसंगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बोट प्रदर्शन आदी सर्व कायक्रमाच्या अनुषंगाने तयारीबाबत बैठकीत चर्चा झाली.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, महोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत  विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता विद्यूत विभागाने घ्यावी.  नगरपालीका प्रशासनाने स्वच्छतेबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.  कार्यक्रमांवेळी अग्नीशमन यंत्रणा तैनात ठेवावी.  तसेच कार्यक्रमांच्या ठिकाणी आवश्यक पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, आरोग्य विभागाने ॲम्ब्युलन्स उपलब्ध ठेवाव्यात.  पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत राहण्याबरोबरच गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवावा.  महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने सुरुर वाई रस्त्या बरोबर इतर रस्त्यांची सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.  महाबळेश्वर नगरपालीका हद्दीत सुरु असलेली विकास कामे, अवकाळी पावसाची शक्यता आदींबाबत चर्चा करण्यात आली.

टंचाई भागातील गावे पाण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि. 4: एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाळा कडक असल्याने जिल्ह्याच्या कोणत्याही भागात नागरिकांना पाणी प्यायला कमी पडणार नाही याची दक्षता घ्या, पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्या, ज्या ठिकाणी टँकरची मागणी येईल त्या भागाला टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा, कोणतीही वाडी वस्ती व गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही याची आवश्यक ती खबरदारी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठक झाली.   या बैठकीला आमदार अतुलबाबा भोसले, आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वन संरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, जयंत शिंदे,  सर्व प्रातांधिकारी,  सर्व तहसीलदारासह आदी कार्यान्वयन यंत्रणाची यांची प्रमुख उपस्थिती होती.

चालू वर्षामध्ये संभाव्य टंचाई भासणाऱ्या गावांची संख्या 149 असून यामध्ये माण तालुक्यातील 22 गावे, तर जावली 32, खंडाळा 27, वाई 33, फलटण 13, कराड 7, खटाव 8, सातारा 4 अशी गावे आहे. अशा गावांमध्ये टंचाई भासू शकते अशी माहिती या बैठकीत यंत्रणांनी दिली.  जिल्ह्यात सध्या  36 गावे  व 236 वाडी वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले,  टंचाई निवारणार्थ  टंचाई निवारणाचे अधिकार प्रांतांधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील कोणत्याही भागातील कोणत्याही वाडीवस्तीला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी,  यासाठी मिशन मोडवर काम करावे, आवश्यक तेथे कुपनलिकांची कामे हाती घेण्यात यावी.  ज्या विहिरींमध्ये गाळ साचला असेल तेथे गाळ काढण्याची कामे यध्दपातळीवर करावीत.  टंचाई काळात कामात हलगर्जी करणाऱ्या यंत्रणा, अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी.  ज्या ठिकाणी टँकरसाठी मागणी येईल त्याठिकाणी त्वरीत मंजूरी देऊन पाणी पुरवठा सुरु करावा, टँकरना जीपीएस टँगीग करावे.  नगरपालिकांच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरुन घ्याव्यात, आवश्यक तेथे विहीर अधिग्रहीत करण्यासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.  जनावरांसाठी चारा पुरेसा उपलब्ध राहील याची तजवीज करावी.  एकूणच पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले. यावेळी त्यांनी जल जीवन मिशन, प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनांची कामेही लवकरात लवकर पुर्ण करुन योजना कार्यान्वित कराव्यात, असेही निर्देशित केले.

अरल निवकणे प्रकल्पग्रस्तांबाबत शासन संवेदनशील पालकमंत्री शंभुराज देसाई

अरल निवकणे प्रकल्पग्रस्तांबाबत शासन अत्यंत संवेदनशील असून त्यांच्या जमीनीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

पाटण तालुक्यातील अरल, निवकणे येथील धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.   या बैठकीसाठी या बैठकीला आमदार अतुल भोसले, आमदार सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उप वन संरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, जयंत शिंदे, उपजिल्हाधिकारी पूनर्वसन मनोहर गव्हाड, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

अरल निवकणे येथील  खातेदार दुबार प्रकल्पग्रस्त आहेत.  ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करणे आवश्यक परंतू प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जमीन उपलब्ध नाही, अशा प्रकल्पग्रस्तांना शेतजमीन मिळावी यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करु असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई यांनी या प्रकल्पग्रस्तांना जागा दाखविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात यावा, जिल्ह्यातील जागा पसंत न पडल्यास सांगली जिल्ह्यातील जागा दाखवाव्यात यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी समन्वयकाची भूमिका घ्यावी, सदर प्रकल्पग्रस्तांचा उदरनिर्वाह भत्ता सुरु करावा, असे निर्देश दिले.

शासकीय शाळांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणार – कु. आदिती तटकरे

अलिबाग (जिमाका) दि.५: बीपीसीएलच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या हद्दीतील ९ शाळांमध्ये ११० संगणक ६० डिजिटल स्मार्ट बोर्ड्स लावण्यात आले आहेत.
ही केवळ सुरुवात असून, भविष्यात आणखी उपक्रम राबवून शासकीय शाळांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प आहे,असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक विद्यालय रोहा, येथे केले.
यावेळी कु.तटकरे यांनी सांगितले की, “ही संकल्पना खासदार  सुनील तटकरे यांची असून, आम्ही सदैव शैक्षणिक क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. जे पूर्वीच्या पिढीला मिळालं नाही, ते आजच्या पिढीला द्यावं, ही आमची मानसिकता आहे. आजच्या काळात खासगी शाळांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण हे मराठी व सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळांमधूनही मिळायला हवं, यासाठी हे पाऊल उचललं आहे. अशा उपक्रमांमुळे पालक व विद्यार्थी वर्ग यांचा विश्वास अधिक वाढेल.”
खासदार तटकरे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध समित्यांवर काम करत असताना, केवळ पेट्रोलियम क्षेत्रातील प्रकल्प व्यवस्थापन किंवा रोजगार निर्मिती नव्हे, तर कंपन्यांच्या समाजिक दायित्व निधी (CSR) चा वापर शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांसाठी कसा करता येईल, यावरही त्यांचा विशेष भर आहे.
या उपक्रमांतर्गत, जवळपास 1 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करून केवळ डिजिटल बोर्ड्सच नव्हे, तर सर्व शाळांमध्ये सुसज्ज कॉम्प्युटर लॅब्स सुद्धा उभारण्यात आल्या आहेत. यामुळे  नगरपरिषदेच्या ‘क वर्ग’ मधील शाळा एकाच वेळी डिजिटल शिक्षण प्रणालीसह सुसज्ज करणारी पहिली रोहा नगरपरिषद ठरली आहे.
यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी रोहा-अष्टमी नगरपरिषद,अजयकुमार एडके, शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,
रोहा अष्टमी नगरपरिषदचे सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद , विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेमध्ये सुधारणा करुन त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

नागपूर, दि 05 :  जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शासनाने कामगारांच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून अनेक विकास योजना हाती घेतल्या आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र कामगारांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने कामगारांच्या नोंदणीबाबत अनेक अडचणी असल्याच्या तक्रारी कामगारांकडून केलेल्या आहेत. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ज्या-ज्या कामगारांना नोंदणीबाबत अडचणी येत आहे त्याचे त्यांच्या गावपातळीवरच निराकरण झाले पाहिजे. यादृष्टीने कामगार विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन नोंदणी प्रक्रियेत तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

रविभवन येथील सभागृहात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, किशोर दहीफळकर व तालुका स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्य कामगार मोठ्या आशेने अर्ज करतात. त्यांच्या हक्काचा असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचल्या पाहिजे. ज्या दूरदृष्टीने सामाजिक सुरक्षिततेसाठी नोंदणी प्रक्रिया शासनाने निश्चित केली आहे ती प्रत्येक कामगाराला पूर्ण करता आली पाहिजे. असे झाले तरच त्यांना शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक सहाय्य योजना यांचा लाभ घेता येईल, असे राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी स्पष्ट करुन अधिकाऱ्यांना अधिक दक्षतेने काम करण्यास सांगितले.

नागपूर महानगरात ६ ठिकाणी होणार व्यापारी संकुल – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर दि.5 : विकासाच्या प्रतिक्षेत असलेले मोरभवन व गणेशपेठ येथील बसस्थानक आता प्रगत स्वरुपात प्रवाशांच्या भेटीला येणार असून हे दोन्ही स्थानके अद्ययावत सुविधांसह पंचतारांकित दर्जाप्रमाणे साकारावेत यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या दोन्ही प्रकल्पासह नागपूर महानगरातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या जागेवर सहा ठिकाणी विविध व्यावसायिकांना नव्या संधी देणारे व्यापक व्यापारी संकुल साकारणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत विकासकामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नियोजन भवन येथे आज आयोजित बैठकीत विविध विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला.  या बैठकीस महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी., उपायुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता लीना उपाध्याय, नगररचना विभागाचे ऋतुराज जाधव, नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोराडी नाका परिसरात साकारणार मध्यवर्ती कारागृह

कोराडी नाका परिसरात साकारणाऱ्या मध्यवर्ती कारागृहाच्या निर्मितीबाबत या बैठकीत व्यापक आढावा घेण्यात आला. सदर कारागृह हे मा. न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्देश व शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार परिपूर्ण झाले पाहिजे. बंदीजनांना कौशल्य प्रशिक्षणासह कारागृहातील सुविधा या निकषानुसार परिपूर्ण व्हाव्यात यादृष्टीने नामांकित वास्तुविद्या विशारदांकडून आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. याबाबत संबंधित विभागांनी आपले प्रस्ताव, व इतर तांत्रिक बाबी नियमानुसार वेळेत पूर्ण कराव्यात, असे  त्यांनी स्पष्ट केले.

सद्यास्थितीत नगर रचना विभाग, एनएमआरडीए, मध्यवर्ती कारागृह यांनी संयुक्तरित्या जागेची पाहणी करून तात्काळ त्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी जिल्हास्तरीय कारागृह समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीसमोर संबंधित आराखड्याबाबत सादरीकरण करण्यात येईल. या कारागृहाच्या निर्मितीसाठी एनएमआरडीएने कोराडी नाका मार्गावरील जागेचे अवलोकन केले असून  2000 कैद्यांची क्षमता असलेले कारागृह तेथे निर्माण करता येणे शक्य असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

लंडन स्ट्रीट येथे साकारणार परफॉर्मिंग आर्ट गॅलरी व कन्वेंशन सेंटर

ऑरेंज सिटी स्टेट प्रकल्पांतर्गत लंडन स्ट्रीटजवळील परफॉर्मिंग आर्ट गॅलरी व कन्वेंशन सेंटरच्या निर्मितीचा आराखडा तात्काळ तयार करण्यात यावा असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादरीकरण केल्यानंतर हा आराखडा अंतिम करण्यात येईल. मोकळ्या जागेचा उपयोग योग्य  व अधिक कलात्मक पद्धतीने करण्यात यावा, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगून निविदा प्रक्रियेला लागणारा कालावधी लक्षात घेता या कामाला गती द्यावी, असे सांगितले.

महानगरात सहा ठिकाणी साकारणार अद्ययावत मार्केट

नागपूर महानगराचा वाढणारा विस्तार लक्षात घेता प्रत्येक भागात व्यावसायिकांना नविन संधी मिळाव्यात यादृष्टीने शासनाने मोकळ्या जागेचा विकास करताना त्याठिकाणी आदर्श व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीने नागपूर येथील  संत्रा मार्केट, नेताजी मार्केट, दही बाजार, इतवारी मार्केट, फुल मार्केट, डीग डिस्पेंसरी धरमपेठ आदी ठिकाणी नूतनीकरणाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी आपसात समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नूतनीकरण करण्यात येणाऱ्या परिसरात नागरिकांसाठी परिपूर्ण सुविधांचा समावेश असावा, असे त्यांनी सांगितले.

मौजा अजनी, झिंगाबाई टाकळी आणि बडकस चौक

येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर होणार विकास प्रकल्प

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मौजा अजनी, झिंगाबाई टाकळी आणि बडकस चौक येथील जिल्हा परिषदेच्या जागेवर बचत गटातील महिलांसह इतर व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व जिल्हा परिषदेला उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत निर्माण व्हावे यादृष्टीने या तिनही ठिकाणी विकास प्रकल्प राबविले जाणार आहे. मौजा अजनी येथे 9,749 चौ.मी., झिंगाबाई टाकळी येथे 24,432 चौ.मी. आणि बडकस चौक महाल येथे 612 चौ.मी. जागेवर हे विकास संकुल उभारण्यात येणार आहेत. याबाबतचे नियोजन व प्राथमिक बाबी तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला दिल्या.

विधिसंघर्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क

मुंबई 5 –  मुलांचे हक्क व विधिसंघर्षित बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी, कायदेशीर, सामाजिक, समुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याचा प्रस्ताव दातृत्वशील उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी दिला होता. त्यांच्या या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हे हेल्प डेस्क सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणार आहेत.

न्यायप्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांच्या (Children in Conflict with Law – CCL) पुनर्वसनासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS),  किशोर न्याय संसाधन कक्ष (RCJJ) आणि महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यात ऐतिहासिक करार करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, हेल्प डेस्क’ स्थापन करणे CCL मुलांकडे सन्मानाने व सहवेदनेने पाहण्याचा प्रयत्न असून, त्यांच्या सामाजिक-कायदेशीर स्वरूपाच्या शंका, तक्रारी ऐकून त्यांना मदत करण्याचे एक साधन आहे. यामुळे लहान वयातच योग्य मार्गदर्शन देऊन, या मुलांना समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नागरिकांमध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे.

न्यायप्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांशी संबंधित प्रश्न हे केवळ मानवाधिकारांचेच नव्हे, तर शाश्वत मानवी विकासाचेही गंभीर मुद्दे आहेत. अशा मुलांचे पुनर्वसन करणे ही महाराष्ट्र शासनाची अत्यावश्यक व उदात्त जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या हेल्प डेस्कच्या स्थापनेनंतर कायदेशीर प्रक्रिया अधिक समजून घेतली जाईल, मुलांचे शोषण व गैरसमज कमी होतील, न्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता व मुलांचा आत्मविश्वास वाढेल, पुनर्वसन व समाजात पुनः एकत्रीकरणास चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.

गुन्हेगारीत अडकलेली अनेक मुले गरीब, दुर्बल घटकांतील असून त्यांना कायदेविषयक माहितीचा अभाव असतो. अनेकदा वकिलांकडून दिशाभूल, समाजातील कलंक व भावनिक आघात यामुळे न्याय प्रक्रियेत अडथळे येतात.  पालकही अनेकदा कायदेशीर प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असतात, तसेच मुलांनी अमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी या हेल्प डेस्क ची मदत होणार आहे.

तसेच CCL व त्यांच्या पालकांना त्यांच्या हक्कांची व कायदेशीर प्रक्रियेची माहिती देणे, बाल न्याय मंडळ, वकील, CWC व अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वय, प्रशिक्षणप्राप्त स्वयंसेवकांद्वारे सातत्यपूर्ण सेवा या हेल्प डेस्क द्वारे दिली जाणार आहे.

हा उपक्रम प्रथम टप्प्यात नागपूर, यवतमाळ, लातूर, पुणे आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत राबविण्यात येणार असून, दरवर्षी किमान ४००० मुलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट  आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम विविध स्वयंसेवी संस्थांच्या (NGOs) सहकार्याने राबविला जाईल.

हेल्प डेस्क अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रमुख सेवा:

– किशोर व पालकांना किशोर न्याय प्रणालीविषयी माहिती, मार्गदर्शन

– कायदेशीर सहाय्य व पुनर्वसनासाठी संदर्भ सेवा

– सामाजिक तपासणी अहवाल तयार करणे व सादर करणे

– शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, व्यसनमुक्ती व फॉलोअप सेवा

– २४ तास हेल्पलाईन सेवा

– बाल न्याय (बालकांची व संरक्षण)  व इतर घटकांशी समन्वय व प्रलंबित प्रकरणांचे निवारण

ताज्या बातम्या

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...

“पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जळगाव, दि. ६ – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या...

बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, ६ : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी,...

‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ०६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द...