शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 1330

सुलोचना दिदी यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

मुंबई, दि. ४ : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सुलोचना दिदी प्रेमळ आईचे प्रतिरुप होत्या. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. पडद्यावर आणि पडद्याबाहेर देखील त्या सुहृद व्यक्ती होत्या. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या आप्तेष्टांना कळवतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000000

Governor Ramesh Bais condoles demise of Sulochana Didi

Maharashtra Governor Ramesh Bais has expressed condolences on the demise of veteran actress Sulochana Didi. In a condolence message the Governor wrote:

“Smt Sulochana Didi epitomised a kind and loving mother. She immortalized many characters through her stellar performances. She was a noble soul both on and off the screen. Convey my deepest condolences on her demise.”

000

चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांना श्रद्धांजली

मुंबई, दि‌. ४:- “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः ‘आई’च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसत, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी “आई’ गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

0000

महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि. 4 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महारेल’तर्फे महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या 440 कोटी रुपयांच्या 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि नियोजित 700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल तसेच भुयारी मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. महाराष्ट्र फाटकमुक्त करण्यासाठी राज्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून गतीने ही कामे पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे  यांनी दिली.

शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री श्री. गडकरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल कांबळे, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जायसवाल, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्य आणि केंद्र एकत्र आल्याने चांगली कामे उभी रहात आहेत. रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या ठिकाणी फाटक नसले की नागरिकांच्या जीवाला धोका असतो. म्हणून असे प्रकल्प लवकर पूर्ण करून जनतेचा त्रास दूर करण्याचे प्रयत्न आहे. राज्यात रेल्वेसंबंधी प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावेत म्हणून राज्य शासनाने महारेलची स्थापना केली. महारेलतर्फे वेगाने कामे करण्यात येत आहेत. राज्यात 9 उड्डाणपूलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूलांचे भूमिपूजन प्रथमच होत आहे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामांमुळे जनतेचा वेळ वाचणार आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

नागरिकांचा वेळ वाचावा आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. देशात पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ क्षमता आहे, दळवळण सुविधा आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यातील प्रकल्प उभारणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वेगाने निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात राज्यात गुंतवणूक करीत आहेत. समृद्धी महामार्ग खऱ्या अर्थाने  विकासाचा महामार्ग होणार आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्यातील रस्त्यांच्या कामाला चालना

राज्यात केंद्र सरकारच्या सहकार्याने अनेक विकासकामे होत आहे. मडगाव-मुंबईच्या रुपाने चौथी ‘वंदे भारत’ रेल्वे महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई-पुणे महामार्गाच्या माध्यमातून पुण्याच्या प्रगतीला गती मिळाली आहे. या महामार्गावर प्रवास करताना वेळ वाचावा यासाठी खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट असा जगातला सर्वाधिक रुंदीचा बोगदा मिसिंग लिंक अंतर्गत तयार करण्यात येत आहे. पुणे मेट्रो, पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक कामे करण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाद्वारे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध सेवा आणि योजनांचा लाभ देण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कात्रज चौक ते खडीमशीन मोठा पूल तयार केल्यास त्याचाही लाभ नागरिकांना होईल. महाबळेश्वर येथील वाई-सुरूर-महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग केंद्राने केल्यास पर्यटन वाढीसाठी त्याचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी 11 उड्डाणपूल याप्रमाणे 16 हजार कोटींची कामे करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

यावेळी श्री.गडकरी म्हणाले, सेतू बंधन योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 11 उड्डाणपूलांसाठी 100 टक्के निधी भारत सरकारने मंजूर केला आहे. महाराष्ट्र प्रगतीशील आणि संपन्न राज्य आहे. राज्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे फाटकांचे रुपांतर उड्डाणपुलात करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन आणि रेल्वेने मिळून 9 उ्डाणपूल पूर्ण केले आणि 11 पूलांचे भूमिपूजन होत आहे. दरवर्षी 11 पूल याप्रमाणे 16 हजार कोटींची ही कामे करण्यात येणार आहेत. येत्या  काळात फाटकमुक्तीसाठी उ्डाणपूल बांधून जनतेला चांगली सुरक्षा देण्यात येईल.

पालखी मार्गाचे काम राज्याच्या वैभवात भर घालणारे होईल

महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात चांगली  प्रगती होत आहे. महामार्ग आणि रस्त्यांची कामे वेगाने होत आहे. पुण्यात पालखी मार्गाचे काम वेगाने होत आहे. पालखी तळाच्या विकासाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चांगला आराखडा करून ही कामे पूर्ण करण्यात येतील. पालखी मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल आणि महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे हे काम होईल.

महारेलगुणवत्तापूर्ण काम करेल

‘महारेल’ने रेल्वेचे नियम लक्षात घेऊन चांगले काम केले आहे.  योजनेअंतर्गत एकूण 91 पूल उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 25 आणि दुसऱ्या टप्प्यात 66 पूल प्रस्तावित आहेत. यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना महारेलला देण्यात आल्या असून त्यांच्याकडेच ही जबाबदारी  देण्यात येणार आहे. महारेल गुणवत्तापूर्ण कामे करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने रेल्वेसह स्थापन केलेल्या महारेलने चांगले काम केले आहे. या सर्व प्रकल्पात रेल्वेच्या नियमांचे पालन करतानाच वेळेत काम पूर्ण करण्यात आले आहे, असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

440 कोटी रुपयांच्या 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे उभारण्यात आलेल्या 440 कोटी रुपयांच्या राज्यातील 9 उड्डाणपुलांचे लोकार्पण करण्यात आले. यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे मंत्रालयाच्या यांच्या भागीतदारीतून उभारण्यात आलेल्या 8 पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर केंद्रीय रस्ते निधीतून सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या एका पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. यात मध्य रेल्वेच्या पाटण-पंढरपूर राज्य महामार्गावरील मसूर ते शिरवडे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक क्र. 92 येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या अतिग्रे-इचलकरंजी राज्य महामार्गावरील रुकडी ते हातकणंगले रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 20 येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या रहिमतपूर-सातारा रोडवरील रहिमतपूर ते तारगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.81 येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या अमळनेर-चोपडा राज्य महामार्गावरील अमळनेर ते टाकरखेडे रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 136 येथील दोन पदरी उड्डाणपूल, पश्चिम रेल्वेच्या सिंदखेडा-चिमठाणा राज्य महामार्गावरील सोनशेलू ते शिंदखेडा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 112-ए येथील दोन पदरी उड्डाणपूल, दक्षिण मध्य रेल्वेच्या हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावरील हिंगोली ते धामणी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 144 बी येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या डोंगरगाव-गुमगाव रोडवरील बुटीबोरी ते अजनी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 116 येथील दोन पदरी उड्डाणपूल, मध्य रेल्वेच्या उमरेड- बुटीबोरी रोडवरील बुटीबोरी ते सिदी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 111 येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा आणि सेतूबंधन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उमरेड बस स्टॅन्ड जवळील उमरेड ते भिवापूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र.34 येथील दोन पदरी उड्डाणपूलाचा समावेश आहे.

700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजन

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते यावेळी सेतू बंधन योजनेअंतर्गत महारेलतर्फे उभारण्यात येणाऱ्या 700 कोटी रुपयांच्या 11 उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांचे भूमिपूजनदेखील करण्यात आले. यात पालघर जिल्ह्यातील तेवडीरोडवरील दिवा ते वसई रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 10 येथील दोन पदरी उड्डाणपूल, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा-वडगाव रोडवरील श्रीगोंदा रोड ते बेलवंडी रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 8 येथील दोन पदरी उड्डाणपूल, सांगली जिल्ह्यातील बुधगाव-सांगली रोडवरील सांगली ते माधवनगर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 129 येथील दोन पदरी उड्डाणपूल, सातारा जिल्ह्यातील कोळवडी रेवडी रोडवरील पळशी ते जरंडेश्वर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 52 येथील दोन पदरी उड्डाणपूल, सोलापूर जिल्ह्यातील आसरा चौक पुलाजवळील सोलापूर ते वाडी रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच 458/5 येथील दोन पदरी उड्डाणपूल, धाराशिव जिल्ह्यातील ढोकी ते धाराशिव रोडवरील पालसप ते कळंबरोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 34 येथील दोन पदरी उड्डाणपूल, लातूर जिल्ह्यातील लातूर शहर रस्त्यावरील कुर्डुवाडी ते लातूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 2 येथील दोन पदरी उड्डाणपूल, जळगाव जिल्ह्यातील शिरसोली ते जळगाव रेल्वे स्थानकांदरम्यान जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील दोन पदरी उड्डाणपूल आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-सांगोला रोडवरील कुर्डुवाडी ते मिरज रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 24 येथील दोन पदरी उड्डाणपूलांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव टाऊन रोडवरील जळंब ते खामगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे फाटक क्र. 6 येथील भुयारी मार्ग, ठाणे जिल्ह्यातील कळमगाव जवळील आटगाव ते तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान सीएच 98 /2 येथील भुयारी मार्गाच्या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

00000000

पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार ‘वनवार्ता’ कार्यक्रमातून संवाद

मुंबई, दि. 04 – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार “वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८.४० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सध्याच्या काळाची गरज बघता पर्यावरण रक्षणाचे गांभीर्य, त्यासाठी करावयाची उपाययोजना व संविधानात नमूद प्रत्येक नागरिकांच्या या पर्यावरणीय कर्तव्यांविषयी जनसामान्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत व स्वत:ला त्या गोष्टी कृतीत उतरवता येतील अशा पद्धतीने पर्यावरणविषयक बाबींची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार देणार आहेत.

एकविसाव्या शतकात जागतिक तापमान वाढ, प्रदूषण, अवकाळी होणारा पाऊस, दुष्काळ यासारख्या मोठ्या समस्यांना आपण सामोरे जात आहोत. पर्यावरणाच्या या समस्या सोडविणे हे काम कुठल्याही एका विभागाचे अथवा समूहाचे नसून त्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनसामान्यांना पर्यावरण विषयक असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित करणे यासाठी हा कार्यक्रम असणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग यांनी दिली.

वननिती नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% वनाच्छादन असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वनक्षेत्र वाढावे यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला.  वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केला. सन 2016 ते सन 2019 मध्ये झालेल्या 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये लोकसहभाग घेतला. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील वनाच्छादन, मॅन्युव्ह इत्यादींच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.

“वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून वनांविषयी कुतूहल, गंमतीजमती, रंजक गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्त्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब), वृक्ष लागवडी संदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार माहिती देणार आहेत.

05 जून 2023 रोजी सकाळी 8.40 वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वनवार्ता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.  हा कार्यक्रम 15 मिनिटांचा असून पुढील सत्रांचे नियोजन ४ महिन्यांकरिता दर 15 दिवसांनी रविवारी (दि. 18/06/2023 पासून पुढे) सकाळी 7.25 वाजता आकाशवाणी वरुन प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमाद्वारे वने व सामान्य नागरिक यांचे नाते सुदृढ होण्यास मदत होणार आहे.

000

राज्यपालांच्या उपस्थितीत अश्वमेध महायज्ञासाठी भूमिपूजन संपन्न

मुंबई, दि. 4 :  खारघर येथे २३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत होणाऱ्या ४८ व्या अश्वमेध महायज्ञानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती मैदान, खारघर येथे संपन्न झाला. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक व अध्यात्मिक महत्त्व आहे.  सर्व समाजाला एकत्र घेऊन यज्ञ करीत असल्यामुळे त्यातून मतभेद मिटून एकात्मतेची भावना वाढते, असे राज्यपालांनी सांगितले.

आज पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत आहेत.  अश्यावेळी अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समष्टी, सद्भावना व मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

जागतिक हवामान बदलांचे परिणाम तीव्र होत असून अलिकडच्या काळात राज्याने वारंवार दुष्काळ व पूरस्थिती अनुभवली आहे असे सांगून  पर्यावरण व विकास यामध्ये यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

विश्वकल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे अभिनंदन केले.

यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Governor Bais performs Bhumi Pujan for Ashwamedh

Maha Yagya in Mumbai

 

Maharashtra Governor Ramesh Bais attended the Bhumi Pujan ceremony for the hosting of the 48th Ashwamedh Mahayagya at Central ground, Kharghar, Navi Mumbai on Sunday (4 June).

The Maha Yagya is being organised by the Gayatri Parivar, Shanti Kunj Haridwar from 23 to 28 January 2024.

Minister of Culture Sudhir Mungantiwar, Pro Vice Chancellor of Dev Sanskti Vishwa Vidyalaya Chinmay Pandya, Director of the Akhil Vishwa Gayatri Parivar Manubhai Patel, business leader Dr Niranjan Hiranandani, Radhika Marchant and others were present.

000

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी

सातारा,  दि. ४ –  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

      सध्या सातारा जिल्ह्यातील तासवडे आणि आनेवाडी या दोन्ही टोल नाक्यांवर  MH11 आणि MH50 या दोन्ही क्रमांकाच्या वाहनांना राज्य उत्पादन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे टोल मुक्ती दिल्याची पोस्ट फिरत आहे.

   तथापि, अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही.  तसेच सदर पोस्ट चुकीची व खोटी असून कोणीतरी खोडसाळपणे टाकली आहे. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असेही खुलाश्यात म्हटले आहे.

‘ग्लोबल वॉर्मिंग’ विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धन व्हावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई, दि. 4 : भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेह देखील घट्ट व्हावा, अशी अपेक्षा वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

“द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडिया” च्या वतीने मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित “युरोपियन डे” समारंभात ते बोलत होते. मंचावर मध्य प्रदेशचे सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग तथा विज्ञान व तंत्र विज्ञान मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा, स्वीडन च्या कौन्सिल जनरल ॲना लेकवॉल, द कौन्सिल ऑफ युरोपीयन चेंबर इन इंडियाच्या डायरेक्टर डॉ. रेणू शोम, अध्यक्ष पियुष कौशिक, उपाध्यक्ष राजीव शर्मा उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, भारत आणि युरोपीय देशांचे संबंध व्यापारिक आणि आर्थिक क्षेत्रात अधिक दृढ व्हायला हवे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जागतिक स्तरावर प्रगती करीत आहे. “वसुधैव कुटुंबकम” ही भावना आणि हे विचार जगात पोहोचावे यासाठी मोदीजींनी पुढाकार घेतला आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान च्या पुढे “जय अनुसंधान” चा नारा देत नवीनतम आणि संशोधन (इनोवेशन आणि इन्वेन्शन) याकडे आता भारत लक्ष देत आहे. आपणही यासाठी पुढे यावे; फक्त संशोधन करताना नव्या समस्या निर्माण होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

जागतिक पर्यावरण बदलाचा प्रश्न संपूर्ण जगाला सतावत असून पर्यावरण व वन  संरक्षण ही आपण आपली जबाबदारी समजून “ग्लोबल वॉर्मिंग” नावाच्या दानवाचा संहार करु, अशी भावना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन उपस्थितांना करुन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, तुम्ही विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास पुढे या. महाराष्ट्र स्वागताला तयार आहे, यावेळी त्यांनी उपस्थित सर्व देशांच्या अधिकाऱ्यांना व उद्योगपतींना  ताडोबा व्याघ्र सफारीला येण्याचे निमंत्रण देखील दिले.

मध्य प्रदेशचे मंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा यांनी भारत आणि युरोपीय देशांनी आपल्या गरजा ओळखून शैक्षणिक, औद्योगिक आणि विशेष करुन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देवाण घेवाण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

000

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून अकरा महिन्यांत ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित

मुंबई, दि.३ जून– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या ११ महिन्यांत कक्षाकडून ९६९९ रुग्णांना एकूण ७१ कोटी ६८ लाख रुपयांची मदत दिली आहे.

जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख,डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०६० रुग्णांना ८ कोटी ८९ लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२३७  रुग्णांना १० कोटी २७ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९५ लाख एप्रिल २०२३ मध्ये १९८४ रुग्णांना ९ कोटी ९३ लाख तर मे २०२३ मध्ये विक्रमी १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विकासकामांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 3 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मुलींचे वसतिगृह, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभागाच्या इमारत विकासकामांचे लोकार्पण आज झाले.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार किरण सरनाईक, प्र-कुलगुरू प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव तुषार देशमुख यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील संत गाडगेबाबा संदेश शिल्प येथे भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय उच्चतर अभियानांतर्गत आदिवासी विकास केंद्राकरिता मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमीपूजन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. सूक्ष्मजीवशास्त्र, भूगर्भशास्त्र  विभागाच्या विविध स्थापत्य कामांचे भूमीपूजन व लोकार्पण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी त्यांनी केली.

000

विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेत वसतिगृहे व इतर सुविधांसाठी संपूर्ण सहकार्य – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

अमरावती, दि. 3 :  राज्यातील मोजक्या शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयांत विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा समावेश आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेनुसार संस्थेत आवश्यक दोन वसतिगृहांसाठी, तसेच इतर आवश्यक सुविधांसाठी निधी मिळवून देण्यात येईल. याबाबत संस्थेच्या अधिका-यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे केले.

मंत्री श्री. पाटील यांनी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, तसेच परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रवीण पोटे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, संचालक डॉ. अंजली देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची शैक्षणिक परंपरा मोठी आहे. संस्थेत आवश्यक त्या सर्व सुविधा उभारल्या जातील. भारतीय प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील युवकांचा टक्का वाढावा यासाठी राज्य शासनाव्दारे सहा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन केले जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. युपीएससी परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना चांगले यश मिळावे यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रकारचे प्रयत्न होत आहेत. त्यात दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या जुन्या इमारतीत मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, तेथे मार्गदर्शन वर्गही सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या वर्गाला दिल्ली येथील अनुभवी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल व त्याचा फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, राज्य शानाच्या सारथी, बार्टी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाज्योती या संस्थांद्वारा विविध प्रवर्गांतील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थांतून स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या वाढलेली असून त्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिक सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येत आहेत

विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या राज्यातील सुमारे 200 मुलांना विविध शिष्यवृत्ती योजनांत पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. याचा सर्व समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. पाटील यांनी केले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या येथील प्रशिक्षण केंद्राच्या गुणवंत विद्यार्थी शिवम बुरघाटे, वैशाली धांडे,  केतकी बोरकर आदींचा गौरव यावेळी झाला.

000

ताज्या बातम्या

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे...

0
पुणे, दि.२८: क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी...

कोकण किनारपट्टीला ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा

0
मुंबई, दि. २८: भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30 पर्यंत 3.4 ते...

बिहारमध्ये ‘विशेष व्यापक पुनरिक्षण मोहीमे’ला उत्साहात सुरुवात

0
मुंबई, दि.२८: भारतात संविधान हा सर्वोच्च कायदा आहे. सर्व नागरिक, राजकीय पक्ष आणि भारत निवडणूक आयोग संविधानाचे पालन करतात. भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२६ नुसार,...

एकल महिलांची सुरक्षा, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी धोरणात्मक उपाययोजना आवश्यक – उपसभापती डॉ. निलम...

0
मुंबई दि. २८: राज्यातील एकल महिलांसाठी सुरक्षा, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत धोरणात्मक उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे. यासाठी महसूल, अन्न व नागरी पुरवठा, महिला...