शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 1324

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई,दि. ०७: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत  विमानतळ सुरु व्हावे, यासाठी आजची पाहणी आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज उलवे येथे प्रत्यक्ष विमानतळाची हेलिकॅप्टरद्वारे पाहणी केल्यानंतर अदानी समुहाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. श्रीरंग बरणे, खा. श्रीकांत शिंदे, आ. महेश  बालदी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, एमएआरडीएचे संचालक डॉ. संजय  मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते विमानतळाचे भूमीपूजन झाले होते. आणि उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीत चांगले आणि वेगाने काम सुरु आहे यांचा आनंद आहे. हा प्रकल्प  लवकरच लोकांसाठी खुला होईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत असेही  शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरु असून हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ असेल अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०२४ पर्यंत हे विमानतळ सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यादृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी हा आजच्या पाहणीचा उद्देश असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने हे विमानतळ देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. मुंबईला विमानतळाच्या माध्यमातून एक चांगली भेट देणार असल्याचे ही श्री. फडणवीस म्हणाले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ किलोमीटरचा सी-लिंक महत्त्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहारासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी परवानगीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२ विमाने उभी राहतील. ५५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.०४ किलोमिटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्या असतील.

विमानतळाच्या उभारणीबाबत अडचणी तत्काळ दूर कराव्यात आणि २०२४ मध्ये प्रवासी वाहतूक सुरु करावी, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिल्या.

०००

नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अलिबाग,दि.७ (जिमाका):-नवी मुंबईतील उलवे येथे साकारण्यात येत असलेले बालाजी मंदिर हे राज्यातील भाविकांचे नवे तीर्थस्थळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            उलवेसेक्टर १२, नोडे उलवेनवी मुंबई या ठिकाणी एकूण दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री.शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेत्यावेळी ते बोलत होते.

              यावेळी पालकमंत्री उदय सामंतखासदार श्रीरंग बारणेडॉ.श्रीकांत शिंदेसर्वश्री आमदार भरत गोगावलेमहेंद्र थोरवेमहेश बालदीरेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानियातिरूमला देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीतिरुमला ट्रस्टचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

                भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा देत म्हटले कीसर्वांना आनंद देणारा हा भूमीपूजन सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकाला आंध्रप्रदेश राज्यात जावून तिरुपती बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जाऊ न शकणाऱ्या भाविकांना राज्यात याठिकाणी तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येईल. हे मंदीर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी योवेळी सांगितले.

               यावेळी तिरूमला ट्रस्टचे अध्यक्ष श्री.रेड्डी यांनी या मंदिराच्या उभारणी विषयीची थोडक्यात माहिती दिली.

०००

चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…

कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रामविकास आराखडा तयार करणं गरेजचं असतं. गावातील लोकप्रतिनिधी तसंच ग्रामस्थांनी मिळून ग्रामविकास आराखडा तयार केल्यास तो अधिक सर्वसमावेशक होतो. ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाने काही निकषही  घालून दिले आहेत. हे निकष कोणते आहेत आणि एकंदरीतच एखाद्या गावाचा विकास आराखडा कसा तयार करतात, या प्रक्रियेत कोणकोणते टप्पे असतात, हे जाणून घेवू या….

ग्राममविकास आराखडा संकल्पना

गावाचा विकास आराखडा तयार करताना तो शाश्वत ग्रामविकास आराखडा असणं गरेजचं आहे. भावी पिढ्यांच्या गरजा भागवता याव्यात यासाठी आताच्या आपल्या गरजा सीमित ठेवून विकास करणं, पर्यावरण लक्षात ठेवून विकास करणं याला शाश्वत विकास आराखडा असं म्हणतात.

निधीचे स्रोत

ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी एकूण ७ प्रकारचे निधी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहेत.

✅ ग्रामपंचायतीचा स्वनिधी विकास आराखड्यासाठी वापरता येतो. यात मालमत्ता कर, पाणी कर यांचा समावेश होतो.

✅ दुसरा स्रोत म्हणजे राज्य शासनाकडून प्राप्त होणारा महसुली हिस्सा. यात जमीन महसूल उपकर, मुद्रांक शुल्क अनुदान या राज्य शासनाच्या निधीचा समावेश होतो.

✅ मनरेगा योजनेअंतर्गत जी विकासकामं गावात घेतली जातात, त्याच्यासाठी मिळणारा जो निधी आहे, तो तिसरा प्रकार आहे.

✅ वित्त आयोगाचा निधी ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठीचा महत्त्वाचा निधी आहे. चालू स्थितीत पंधराव्या वित्त आयोगाचा विचार करता येईल.

✅ स्वच्छ भारत अभियान आणि त्याअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर होणारी कामं, त्याला प्राप्त होणारा निधीही यामध्ये येतो.

✅ ग्रामपंचायतीला मिळणारी बक्षीसं आणि त्यातून येणारा निधी ग्रामविकास आराखड्यात वापरता येतो.

✅ लोकसहभागातून मिळणाऱ्या वर्गणीचाही वापर करता येतो.

या ७ प्रकारच्या निधींचा उपयोग करून ग्रामविकास आराखडा तयार करावा लागतो.

वित्त आयोगाचा निधी

वित्त आयोगाच्या निधीचं वितरण १०% जिल्हापरिषद, १०% पंचायत समिती, ८०% हा ग्रामपंचायतीला उपलब्ध होतो. २०१४ पासून पुढे अशाप्रकारे ग्रामविकास आराखडे तयार करण्यात यावेत, असे निर्देश शासनाने दिले आहेत. वित्त आयोगाचा जो निधी ग्रामपंचायतीला येतो त्याचे साधारणपणे २ प्रकार पडतात. बंधित आणि अबंधित निधी. यात ६०% बंधित, ४०% अबंधित अशाप्रकारे पहिलं विभाजन होतं. शासनाने दिलेला निधी वेगवेगळ्या घटकांसाठी वापरायचा असतो. ग्रामविकास आराखड्यात या निधीची उपलब्धता वेगवेगळ्या घटकांसाठी करून द्यायची असते.

यात शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका यासाठी २५%, महिलांच्या विकासासाठी १० % निधी, तर वंचित घटकासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यायचा असतो.

ग्रामसभेचे महत्त्व

ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी गावपातळीवर संसाधन गट असला पाहिजे. यात गावातील शिक्षक, वकील, आरोग्याचे जाणकार, ज्येष्ठ नागरिक, अर्थशास्त्राचे प्राध्यापक, एनजीओचे प्रतिनिधी म्हणजे गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकारांना एकत्र करणं म्हणजे संसाधन गट होय. संसाधन गट आणि शासकीय कर्मचारी यांनी विचारमंथन करणं अपेक्षित असतं.  ज्या ग्रामसभेमध्ये अंतिम ग्रामविकास आराखडा मंजूर केला जातो त्याच्याआधी वेगवेगळ्या ग्रामसभा घ्याव्यात, असं शासनानं नमूद केलंय.

महिलांची ग्रामसभा ज्यात महिलांच्या समस्या घेतल्या जातील. बाल ग्रामसभा घ्यावी. यात प्राथमिक, माध्यमिक असे १८ वर्षांच्या खालील विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या समजतील. वंचित घटकांची ग्रामसभा घ्यावी. त्यांचे प्रश्न, समस्या, निधी कसा उपलब्ध करून द्यायचा, हे समजतं. वॉर्डनिहाय ग्रामसभा घ्यावी म्हणजे यातून वॉर्डनिहाय प्रश्न समजून घेता येतात.

पारदर्शक आराखडा

संसाधन गट तयार केल्यास वेगवेगळ्या लोकांपर्यंत ग्रामविकास आराखडा पोहोचतो. संसाधन गट लोकांना माहिती झाला पाहिजे. सदस्यांची माहिती नोटीस बोर्डावर ऑईल पेंटने लिहायची असते. तो नोटीस बोर्ड ग्रामपंचातीच्या भींतीवर दर्शनी भागावर लावावा, असे शासनाचे निर्देश आहेत. मंजूर ग्रामविकास आराखडा ग्रामपंचायतीनं ऑईल पेंटने रंगवून ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावावा, असे शासनाने निर्देश दिले आहेत. यामुळे गावातील लोकांना गावातील विकास कामांविषयी माहिती मिळते.

सामाजिक लेखापरीक्षण समिती गावात स्थापन करावी. यात गावातील सीए, तज्ज्ञ अशा लोकांची समिती करावी. गावात केलेलं काम योग्यप्रकारे केलं आहे की नाही, त्याचं मूल्यमापनं या समितीनं करायचं आहे. त्यांचा रिपोर्ट दर तीन महिन्याला ग्रामपंचायतीला सादर केला पाहिजे. विकास आराखड्यातील कामाची गुणवत्ता आणि प्रगती हे पाहण्यासाठी गावपातळीवर कार्यगट स्थापन करावा.

वार्षिक,पंचवार्षिक आराखडा

सरकाने २०१९ मध्ये सांगितलं होतं की, २०२०-२१ चा ग्रामविकास आराखडा तयार करावा आणि त्याचबरोबरीनं २०२०-२१ ते २०२४-२५ हा पंचवार्षिक विकास आराखडासुद्धा तयार करावा. म्हणजे आज १४ व्या वित्त आयोगाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार आहे. आता या प्रत्येक ग्रामपंचातीचं काम काय आहे, की वार्षिक विकास आराखडा तयार करताना त्यांनी पंचवार्षिक विकास आराखडा तयार करताना त्यामध्ये काय प्रयोजन केलेलं आहे, मिळणारा निधी किती आहे, कामाची निकड किती आहे, ते पडताळून बघायचं आहे. त्यानुसार त्या वर्षीच्या विकास आराखड्यात बदल करायचे आहेत.

असलेली आव्हानं

गावात तज्ज्ञ व्यक्तीची उपलब्धता, लोकसहभाग ग्रामसभेला उपस्थिती, सरपंचांसह सदस्यांना  अनेक गोष्टी माहितीसाठी संपूर्णपणे ग्रामसेवकावर अवलंबून रहाणं आणि प्रशिक्षण ही काही ग्राम विकासातील आव्हानं आहेत. या आव्हानांवर महाराष्ट्र शासनाची  प्रशिक्षण संस्था ‘यशदा’ ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणांचे आयोजन करून मात करण्याचा प्रयत्न करत असते.

०००

  • रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे  साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ४०० कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी इस्पितळ आणि क्रीडा संकुलाचा पायाभरणी व भूमिपूजन सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप लांडे, आमदार भरत गोगावले उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईत परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यानुसार मुंबई शहराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्याबरोबर मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर पडली आहे. महाराष्ट्रात पायाभूत सोयी सुविधांचे सर्वाधिक प्रकल्प सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक होत आहे. त्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. संघर्ष नगर परिसरात मूलभूत सोयीसुविधा पुरवून ते सुंदर नगर करण्यात येईल. राज्य सरकार सर्व सामान्य जनतेचे हे सरकार असून त्यांच्यासाठी आतापर्यंत विविध निर्णय घेतले आहेत. असाल्फा व्हीलेज येथील ४८ कुटुंबांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आमदार श्री. लांडे म्हणाले की, चांदिवली परिसराचा विकास घडवून आणणार आहे. शिधा वितरण कार्यालय लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील रस्त्यांचा विकास केला आहे. नागरी सेवा- सुविधा पुरविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. गरिबांच्या घरांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हिंदी भाषिकांसाठी शाळा सुरू केली. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी इस्पितळासाठी केंद्र सरकारची परवानगी आणून दिली, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नंदेश उमप व सहकाऱ्यांनी नंदेश रजनी हा कार्यक्रम सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

मुंबई, दि. ६ : दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजना थेट दिव्यांगांच्या दारी पोहचविण्यासाठी शासन स्तरावरून दिव्यांग कल्याण विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाचा उद्या बुधवार दिनांक ७ जून २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे.

या कार्यक्रमास सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक (मंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार श्रीमती विद्या ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

दिव्यागांचे शिबीर दिनांक ७ जून २०२३ बुधवार रोजी, वेळ सकाळी १०:०० ते ०३:०० स्थळ:- हॉल क्र. ५, नेस्को एक्झीबीशन अॅण्ड ट्रेड सेंटर, गोरेगांव (पूर्व) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालये, विविध महामंडळे व इतर संस्था यांच्याकडून दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, रोजगार नोंदणी तसेच त्यांचे प्रश्न सोडविण्याकरीता त्यांच्या मागण्या घेऊन त्यांच्या सोयीकरिता उपकरणे व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत व त्या मागण्यांची नोंद करुन घेण्यात येणार आहे. दिव्यांगांनी सोबत येताना दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी (UDID) कार्ड व आधार कार्ड घेऊन यावे, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ६७ शैक्षणिक संस्थांचा समावेश

नवी दिल्ली, 6 : भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन 2023 चा अहवाल केंद्रीय शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ.राजकुमार रंजन सिंग यांनी सोमवारी  जाहीर केला.

शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये  सर्वोत्कृष्ट 850 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली  आहे. यात राष्ट्रीय संस्थात्मक रॅकिंगमध्ये महाराष्ट्रातील 67 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या  11  संस्था

संस्थात्मक रँकिंगच्या यादीत देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था,मुंबई  30 व्या स्थानावर आहे. पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन या संस्थेस 34 वे  स्थान मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (35), रासायनिक तंत्रज्ञान संस्था-मुंबई(41), सिम्बायोसिस इंटरनॅशनल – पुणे (59), डॉ.दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था- वर्धा  (75), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठ – पुणे (81), विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- नागपूर  (82), नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (88),  मुंबई विद्यापीठ – मुंबई  (96)

 विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 10 विद्यापीठे

देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. होमी भाभा राष्ट्रीय संस्था- मुंबई  हे विद्यापीठ रँकिंगमध्ये 17 व्या स्थानावर आहे. पुणे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  या विद्यापीठास 19 वे स्थान मिळाले आहे, तर रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई ला 23 वी रँकिंग देण्यात आली आहे.  सिम्बायोसिस इंटरनॅशनल –पुणे  (32), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था –वर्धा (39), डॉ .डी.वाय.पाटील विद्यापीठातील–पुणे (46), एस.व्ही.के.एम नरसी मॉन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई  (47), मुंबई विद्यापीठ –मुंबई (56),  भारती विद्यापीठ – पुणे (91),  आणि मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस  98 व्या क्रमांकावर  आहे.

संशोधन संस्थांच्या रॅकिंग मध्ये राज्यातील 5 संस्था

संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील 50 संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. मुंबई इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे 4  व्या स्थानावर आहे . तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – मुंबई 10  व्या स्थानावर असून होमी भाभा राष्ट्रीय संस्था – मुंबई 15 व्या , भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे  27व्या आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- मुंबई  37 व्या स्थानावर आहे.

अभियांत्रिकी संस्थांच्या रँकिंगमध्ये राज्यातील 8 संस्था

अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील  8 संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था तिसऱ्या क्रमांकावर तर मुंबई स्थित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेला 37 वे स्थान मिळाले आहे. नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 41 वी रँकिंग प्राप्त झाली आहे. डिफेंस इन्स्टिटयूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी-पुणे (57), तर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग- पुणे (73) क्रमांकावर आहे.

महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये राज्यातील तीन महाविद्यालये

महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई येथील कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन 57 व्या स्थानावर आहे . तर पुण्यातील  फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) 79 व्या आणि नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्था 83 व्या स्थानावर आहे.

उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये राज्यातील 9 व्यवस्थापन संस्था

देशातील 100 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 9  संस्थांचा समावेश आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई ही संस्था 7 व्या स्थानावर तर मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 10 व्या स्थानावर आहे. सिंबायोसीस इस्टिटयूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट-पुणे (17),  आणि एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज –मुंबई (20) ,  SVKM  नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज- मुंबई (21) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट – नागपूर (43), के.जे.सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च –मुंबई(45), प्राचार्य एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च –मुंबई (73)  आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट –पुणे (76)

औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 18 संस्था

देशातल्या उत्कृष्ट 100 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 16  संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पाचव्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज-मुंबई  11 व्या स्थानावर तर पुना कॉलेज ऑफ फार्मसी 29 व्या स्थानावर आहे. एसव्हीकेएम डॉ. भानुबेन नानावटी एज्युकेशन ऑफ फार्मसी –मुंबई(38), डॉ. डी.वाय. पाटील   इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासीट्युकल सायन्स अँड रिसर्च –पुणे  (45, आर.सी.पटेल इन्स्टिटयूट ऑफ फार्मासीटयुकल एज्युकेशन अँड रिसर्च –शिरपूर  (50), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -नागपूर(51), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी –मुंबई (55), श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी –नागपूर (68), भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फार्मसी –नवी मुंबई  (79), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी –औरंगाबाद  (80), प्रिन्सिपल के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (91), ए.आय.एस.एस.एम.एस. कॉलेज ऑफ फार्मसी-पुणे (93), डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी -पुणे (94), सी.यू.शाह कॉलेज ऑफ फार्मसी-मुंबई (95), आणि मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी- पुणे 96 व्या स्थानावर आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 2 महाविद्यालय

वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ 15व्या स्थानावर आहेत तर दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा 25व्या स्थानावर आहे.

दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये 7 महाविद्यालय

दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सात महाविद्यालयांचा समावेश आहे. पुणे येथील डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठ तिस-या स्थानावर आहे. शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर 15व्या स्थानावर आहे.   दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था-वर्धा (17), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज-मुंबई (19), शासकीय दंत महाविद्यालय-मुंबई (29), पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ –मुंबई (38) आणि भारती विद्यापीठ (डिम्ड युनिव्हर्सिटी) डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल-पुणे  39 व्या स्थानावर आहे.

देशातील 30 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिम्बायोसिस विधी माहाविद्यालयाला 6 वे रँकिंग प्राप्त झाले आहे. देशातील 30 सर्वोत्कृष्ट वास्तुकला आणि नियोजन महाविद्यालयांमध्ये विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर 12 वा क्रमांक पटकाविला आहे.  कृषी आणि संबंधित क्षेत्रे या श्रेणीमध्ये सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, फिशरीज युनिव्हर्सिटी-मुंबई 7 व्या क्रमांकावर तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 36व्या क्रमांकावर आहे. तसेच नाविन्य श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई 7 व्या क्रमांकावर आहे.

0000

अमरज्योत कौर अरोरा/वृत्त क्र.99 /6.6.2023

शिवराज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

मुंबई, दि. ६ : लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचे महानायक होते. महाराजांच्या राज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त सुवर्ण आणि रौप्य मुद्रा काढण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि राजभवन, महाराष्ट्र यांच्यावतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर,सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे,  राज्यपाल महोदयांचे प्रधान सचिव संतोषकुमार, मुंबई परिक्षेत्राच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचा दूरदर्शीपणा,  न्यायप्रियता, सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि त्यांच्यात नवचेतना जागवणारे राजे होते.  स्वतःचे आरमार तयार करून त्यांनी  स्वराज्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांचाच आदर्श घेऊन महाराष्ट्रातून विविध नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले.  त्यांच्या काळातील गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न व्हावेत तसेच  १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळी विशेष सुवर्ण आणि रौप्य पदक काढण्यात आले होते. आता राज्याभिषेक  दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त  तसे प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले.

विशेष टपाल तिकीट हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन वर्षानिमित्त विशेष टपाल तिकिट अनावरण हे महाराजांच्या कर्तृत्वाला वंदन आहे.  महाराजांनी रयतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी राज्याभिषेक केला. लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचा त्यांनी घालून दिलेल्या आदर्श समोर ठेवून राज्य शासन काम करत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध लाभ देत आहोत. रायगडाचे जतन, संवर्धन करतोय. त्यासोबत शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील गड किल्ल्याच्या जतनासाठी प्राधान्य देत आहे. त्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व करणार असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिन सोहळ्याला किल्ले रायगडावर उपस्थित राहता आले हे भाग्य आहे.  छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, कुशल संघटक, कुशल प्रशासक होते. ते असामान्य युगपुरुष होते.  त्यांच्याबरोबर जीवाला जीव देणारे मावळे होते. त्यामुळे त्यांनी इतिहास घडवला, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

राज्य शासन सातासमुद्रपार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पोहोचवण्याचे काम करीत आहे. येत्या वर्षभरात त्यासाठी विविध कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.  राज्य शासनाने सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजी नगर असे केले. कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. कष्टकरी, शेतकरी, महिला या घटकांना मदतीची भूमिका राज्य शासनाने  घेतली आहे. राज्यातील २९ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली त्यामुळे सहा लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे काम राज्य शासन करत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्याची वाटचाल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आजच्या दिवशी विशेष टपाल तिकिट निघतेय ही आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. अनेक जण मुघलांचे मांडलिकत्व पत्करून काम करीत असताना त्याकाळी छत्रपतींनी स्वकियांसाठी  स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणले.

ते म्हणाले की, साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यानंतर मराठी माणूस थांबलाच नाही. मराठी साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकवत ठेवण्याचे काम त्याकाळी झाले. छत्रपतींनी बीजारोपण केलेल्या विचारांमुळे आज देशात महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. आपल्याला शक्ती, ऊर्जा देणारे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘टॉकिंग बुक’  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जगातील १९३ देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवण्याचा संकल्प दिन  या राज्याभिषेक सोहळा वर्षाच्या निमित्ताने आपण केला आहे. आमच्या विभागाने वर्षभरात विविध कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘टॉकिंग बुक ‘ (Talking book) आपण करत आहोत. देशासह जगाच्या विविध भागात आज राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे, जगदंब तलवार भारतात परत आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, शिवकालीन नाणी संग्राहक प्रवीण मोहिते, इतिहास अभ्यासक सुनील कदम यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. यावेळी श्रीमती पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आज प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाची किंमत पाच रुपये इतकी असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेका वेळी असलेले सुवर्ण चलन होन हे या टपाल तिकिटावर घेण्यात आले आहे.  विशेष म्हणजे केवळ सहा दिवसात ही टपाल तिकिट प्रकाशित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या विशेष टपाल तिकिट अनावरण कार्यक्रमानंतर शिववंदना हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

000

दीपक चव्हाण/पवन राठोड/विसंअ

Governor releases postage stamp on 350th year of Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj

 

Maharashtra Governor Ramesh Bais released a special postage stamp on the occasion of the 350th Year of the Coronation of Chhatrapati Shivaji Maharaj at Raj Bhavan, Mumbai on Tue (6 June).

Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Speaker Rahul Narwekar, Minister of Culture Sudhir Mungantiwar, Ministers Mangal Prabhat Lodha, Deepak Kesarkar and Dadaji Bhuse, Principal Secretary, Culture Vikas Kharge, Postmaster General, Mumbai Region Swati Pandey  and senior officers were present.

A cultural programme ‘Shiv Vandana’ depicting the life and work of Chhatrapati Shivaji Maharaj and his Coronation Ceremony was presented on the occasion.

००००

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमात अमित वाडेकर यांचे व्याख्यान

मुंबई, दि. 6 : राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ‘दिलखुलास’ कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती, सिंचन विषयक धोरण या विषयावरील वनराई मासिकचे कार्यकारी संपादक अमित वाडेकर  यांचे व्याख्यान  प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून हे व्याख्यान बुधवार दि.7, गुरुवार दि. 8 आणि शुक्रवार दि. 9 जून 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.

0000

 

त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मंगेश पाटील यांची गगन भरारी

स्पर्धेच्या युगात कल्पकतेला विशेष महत्व आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्टीत नाविण्य शोधणे हा मानवी स्वभाव आहे. हिंगोली येथील एम.ए, बीएड उच्च शिक्षण घेतलेल्या मंगेश प्रकाश पाटील या तरुण युवकांनी कल्पतेचे रुपांतर व्यवसायामध्ये केले आहे.

दोन वर्षापूर्वी  राज्यासह देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी त्यांना कोरोनाने ग्रासल्यामुळे त्यांचा स्कोअर जवळपास 17 झाला होता. या परिस्थितीत त्यांनी शासकीय रुग्णालयात दीड महिना कोरोनाशी झुंज दिली. कोरोनाच्या या आजारातून बरे झाल्यानंतर नव्या उमेदीने त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन 10 लोकाची त्रिलोकेश या नावाने फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापन केली. हिंगोली येथील प्रविणनगर मध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मंगेश प्रकाश पाटील या तरुण युवकाने दोन वर्षापूर्वी भुसार माल खरेदी-विक्री करण्याच्या अनुषंगाने 10 जणाची सदस्य संख्या असलेली  त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीची  स्थापना केली  होती. सहा ते सात महिन्यापूर्वी कृषि विभागातील आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांच्याकडून माहिती मिळताच त्यांनी नानाजी देशमुख कृषि संजीवनी  योजना (पोखरा) अंतर्गत धान्य प्रक्रिया युनिट (स्वच्छता व प्रतवारी युनिट) स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. तसेच धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट कोठे उपलब्ध होते. याची ऑनलाईन माहिती घेतली. शेतकऱ्यांचा व आपला फायदा झाला पाहिजे यासाठी  धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कंपनीच्या एका सदस्याची 1200 स्क्वेअर फुटाची जागा भाड्याने घेतली. तसेच सर्व सदस्यांनी मिळून पैशाची जुळवाजुळव करुन राजकोट येथून धान्य स्वच्छता व प्रतवारी मशीन आणली. याचे उद्घाटन हिंगोली जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी  शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे उपस्थित होते.

धान्य स्वच्छता व प्रतवारी  मशीनद्वारे एका तासाला 15 क्विंटल धान्याची स्वच्छता व प्रतवारी करण्याची क्षमता आहे. संपूर्ण मशिनरी युनिट व बांधकामासाठी जवळपास 20 लाख रुपये खर्च करण्यात आला. यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी (पोखरा) योजनेतून 60 टक्के म्हणजेच 12 लाख रुपयाचे अनुदान मिळाले आहे.

पहिल्या वर्षी मनावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. हळूहळू सोयाबीन, हरभरा, गहू या बियाण्याची स्वच्छता करुन मोफत बीज प्रक्रिया करुन दिली.

लोकांना चांगल्या प्रतीचा गहू, ज्वारी उपलब्ध व्हावा यासाठी हिंगोली पासून जवळच असलेल्या जवळा बाजार येथून सहा ते सात हजार क्विंटल गव्हाची खरेदी केली. या गव्हाची स्वच्छता व प्रतवारी करुन पॅकींग करुन विक्री करण्यास सुरुवात केली.

सध्या त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या प्रत्येक सदस्यांनी आपापल्या शेतात प्रत्येकी पाच एकर गव्हाची लागवड केली. कंपनीच्या सर्व सदस्यांना फायदा व्हावा यासाठी सदस्याचे गहू बाजारभावापेक्षा 200 रुपये जास्तीचे दर देऊन खरेदी करण्यात येत आहे. तसेच काही सदस्यांनी सेंद्रीय पध्दतीने पिकविलेल्या गव्हाला पुणे येथे मागणी असून हा गहू 3500 रुपये क्विंटल दराने पाठविण्यात येणार आहे. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे.

या मशीनद्वारे दिवसाला 60 ते 80 क्विंटल धान्याची स्वच्छता व प्रतवारी करण्यात येत आहे. या मशीनवर काम करण्यासाठी चार कामगार आहेत. त्यांना सर्वांना प्रत्येकी 10 हजार याप्रमाणे दरमहा पगार दिला जातो. त्यामुळे सर्व खर्च वजा जाता दिवसाला सात ते आठ हजार रुपये निव्वळ नफा होत आहे.

धान्य ठेवण्यासाठी  जागा कमी पडत असल्याने  सध्या असलेल्या जागेला लागून परत 1200 स्क्वेअर फुटाची  जागा भाड्याने घेतली आहे. तसेच नरसी फाटा येथे 150 मेट्रिक टन क्षमतेचे एक गोडाऊन भाड्याने घेतले आहे.

तसेच सोयाबीन, हरभरा, गहू ब्रीडर शेडपासून बियाणे निर्मिती चालू आहे. सोयाबीन, हरभरा व इतर अधिक उत्पादन देणारे दोन हजार क्विंटल बियाणे तयार होणार आहे. धान्याची स्वच्छता व प्रतवारी करुन शिल्लक राहिलेल्या चुऱ्यापासून पीठ व कोंबड्यासाठी भरडधान्य तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच साखरेला पर्याय म्हणून गुळ पावडर तयार करण्याचे नियोजन असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

हिंगोली येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर वेगवेगळ्या जातीचे जसे लोकवण, काळा गहू, खपली गहू,अजित, 2189 व इतर विविध प्रकारचे गहू विक्रीसाठी  ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनात 200 ते 250 क्विंटल गव्हाची विक्री झाली आहे. भविष्यात नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील डीमार्ट, रिलायंस मॉल यांना गहू उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

अवघ्या सहा ते सात महिन्याच्या अल्प कालावधीत श्री. पाटील यांनी त्रिलोकेश फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या धान्य स्वच्छता व प्रतवारी यंत्राच्या माध्यमातून त्यांनी गगन भरारी घेत ते आज इतरांसमोर आदर्श ठरले आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी  प्रकल्प अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी, महिला, भूमीहीन व्यक्तींचे इच्छूक गट,  बचत गट यांच्या व्यवसायिक प्रस्तावांना अर्थसहाय्य दिले जाते. पोखरा अंतर्गत शेतकरी, उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गटांनी प्रकल्प उभारण्यासाठी  या अनुदान योजनेचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम होण्याची गरज असल्याचे ते सांगतात.

                                                                                                            — चंद्रकांत कारभारी

                                                                                                                 माहिती सहायक

                                                                                                     जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई, दि. ६ : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी व डॉ. सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तसेच डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.

डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

००००

 

Dr Ravindra Kulkarni to be new Vice Chancellor of University of Mumbai ; Dr Suresh Gosavi to be VC of SPPU

Dr Sanjay Bhave appointed as Vice Chancellor of Konkan Krishi Vidyapith

 

Dr Ravindra Dattatray Kulkarni has been appointed as the Vice-Chancellor of the University of Mumbai; while Dr. Suresh Wamangir Gosavi has been appointed as the Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University.

Maharashtra Governor and Chancellor of public universities in the State Ramesh Bais announced the appointment of Dr Ravindra Kulkarni and Dr Suresh Gosavi.

The Governor has also declared the appointment of Dr. Sanjay Ghanshyam Bhave as the new Vice-Chancellor of Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli.

Dr Ravindra Kulkarni is a Senior Professor at Institute of Chemical Technology while Dr Suresh Gosavi is a Senior Professor at the Department of Physics, Savitribai Phule Pune University.

Dr. Sanjay Bhave is the Head of Department of Agricultural Botany at Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth.

0000

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...