शुक्रवार, मे 9, 2025
Home Blog Page 1225

स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक, विद्यापीठे व उद्योगांसाठी ‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’ तयार करणार – राजदूत डॉ. राल्फ हेकनर

मुंबई, दि. 31 : भारतात किमान 330 स्विस कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी 150 एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे स्वित्झर्लंडसाठी सर्वात महत्त्वाचे राज्य असून भारताशी मुक्त व्यापार करार करुन हे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी स्वित्झर्लंड प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन स्वित्झर्लंडचे भारतातील राजदूत डॉ. राल्फ हेकनर यांनी केले आहे.

डॉ. राल्फ हेकनर यांनी मंगळवारी (दि. 30) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे येथे नुकतीच आपण सार्वजनिक व खासगी विद्यापीठांच्या प्रमुखांशी भेट घेतली. विद्यापीठांमध्ये होत असलेल्या संशोधनाचा व्यापाराला लाभ व्हावा, याकरिता स्वित्झर्लंडच्या पुढाकाराने उद्योग व विद्यापीठांसाठी एक सामायिक ‘नाविन्यता व्यासपीठ’ (‘इनोव्हेशन प्लॅटफॉर्म’) सुरु करण्याबाबत विचार सुरु असल्याचे राजदूतांनी सांगितले.

या व्यासपीठावर आयआयटी सारख्या संस्थांनादेखील घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रयोग यशस्वी झाला तर तो 22 देशांमध्ये राबविला जाईल, असेही ते म्हणाले.

“स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघाची व्यापार, आरोग्य विषयक कार्यालये आहेत. तसेच दावोस येथे दरवर्षी जागतिक आर्थिक परिषद होते. या दोन्ही ठिकाणी भारताचा सहभाग लक्षणीय आहे. त्यामुळे भारताच्या मताची  दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते”, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तोवर भारताला विकसित राष्ट्र करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे नमूद करून या उद्दिष्ट प्राप्तीसाठी भारत – स्वित्झर्लंड मुक्त व्यापार करार होणे आवश्यक असल्याचे हेकनर यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड – भारत मुक्त व्यापार करार झाल्यास कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध होतील, याची माहिती धोरणकर्त्यांना तसेच उद्योगजगताला देण्यासाठीच आपण मुंबई भेटीवर आलो असल्याचे डॉ. हेकनर यांनी सांगितले.

कोरोना संसर्गानंतर स्विस दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड मात्रा उपलब्ध करून दिल्याबद्दल हेकनर यांनी भारताचे आभार मानले. स्वित्झर्लंडला भारताकडून अधिक गुंतवणूक तसेच नाविन्यता व संशोधन सहकार्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यश चोप्रा यांनी स्वित्झर्लंड येथे आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण केल्यामुळे दरवर्षी अडीच ते तीन लाख भारतीय पर्यटक स्वित्झर्लंडला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वित्झर्लंड भारताचा 11 वा मोठा गुंतवणूकदार देश असून मुंबईतील वाणिज्य दूतावास 108 वर्षांपासून कार्यरत असल्याचे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. स्वित्झर्लंड सूक्ष्म तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान व औषधीनिर्माण या क्षेत्रातील कौशल्यप्रधान देश असून उभय देशांत कौशल्य आदान – प्रदान करार झाल्यास भारतातील युवकांच्या कौशल्याचा अनेक देशांना फायदा होईल,असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठांचा कुलपती या नात्याने उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी – तसेच अध्यापक – आदानप्रदान वाढावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. बैठकीला स्वित्झर्लंडचे मुंबईतील वाणिज्यदूत मार्टिन माईर हे देखील उपस्थित होते.

००००

Swiss Ambassador Dr Ralf Heckner meets Maharashtra Governor

Says Switzerland will create Innovation Platform for businesses, universities

 

Mumbai Dated 31 : Stating that 330 Swiss companies are working in India, with half the companies operating in Maharashtra, the Ambassador of Switzerland to India Dr Ralf Heckner said that country is contemplating on creating an ‘Innovation Platform’ where businesses and universities will work together.

He said such platform will have premier institutions like IITs on board. He said that if the experiment succeeds, it will be replicated in 22 other countries.

The Ambassador was speaking to Maharashtra Governor Ramesh Bais during a courtesy call at Raj Bhavan Mumbai on Tuesday (30th May).

The Ambassador told the Governor that he had met the heads of public and private universities in Pune. He added that Switzerland is looking forward to investment and innovation from India.

The Ambassador told the Governor that Switzerland is working closely with India to ink a Free Trade Agreement (FTA). He said FTA will help India realize Prime Minister Narendra Modi’s dream of making India a developed nation by 2047.

Welcoming the Ambassador to Maharashtra, Governor Ramesh Bais spoke of promoting university level collaboration between Maharashtra and Switzerland and stressed the need to promote student- exchange, faculty -exchange and cultural exchange. The Consul General of Switzerland in Mumbai Martin Maier was also present.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि.31 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सहकारमंत्री अतुल सावे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार राजू नवघरे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

सहकारमंत्री श्री. सावे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. अहिल्यादेवींनी घाट बांधणे, विहिरी, तलाव, मंदिरे यांचे बांधकाम करून चांगले उपक्रम राबवून समाजकार्य केले. बांधलेली मंदिरे सुरक्षित ठेवण्यासह समाजोन्नतीसाठी प्रयत्न केले असून त्यांचा आदर्श ठेवायला हवा, असे श्री. सावे म्हणाले.

००००

धोंडिराम अर्जुन/स.स

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

आक्षेपार्ह मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश

मुंबई, दि. ३१ – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेबसाईटवरील मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरुषांच्या बाबतीत लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे, तसेच त्यामधून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थांनी घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच  ‘इंडिक टेल्स’ वरील लेखात आक्षेपार्ह बाबी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

०००

प्रत्येक शहरात वंडर्स पार्क, सेंट्रल पार्कसारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 30 (जिमाका) –  फक्त मोठमोठ्या इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर त्याबरोबरच उद्याने, ग्रंथालये उभारणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वंडर्स पार्क, सेंट्रल पार्कसारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक आहे. या सुविधांचा लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यत सर्वांना आनंद घेता येईल व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आपल्याला पाहता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

नवी मुंबर्ई महानगरपालिकेच्या वंडर्स पार्कचे नूतनीकरणानंतर लोकार्पण, कोपरखैरणे व ऐरोली येथील टर्शरी ट्रीटमेंट प्लांट, वाशीतील महात्मा फुले बहुद्देशीय इमारतीचे लोकार्पण तसेच सानपाडा येथील मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

वंडर्स पार्क येथील अँम्पी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, माजी महापौर जयवंत सुतार, स्थानिक माजी नगरसेवक रवींद्र इथापे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी वंडर्स पार्कमधील नवीन खेळण्यांची पाहणी केली. विकास कामे केलेल्या अभियंता व इतर संबंधितांचा यावेळी गौरव करण्यात आला. महापालिका आयुक्त श्री. नार्वेकर व शहर अभियंता संजय देसाई यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार्कमधील लेझर शो चे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मुंबई व महामुंबई क्षेत्रातील ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होऊन नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल आणि प्रदूषण कमी होईल. समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. देशातील सर्वात मोठा समुद्रातील महामार्ग असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडमुळे मुंबई ते नवी मुंबई, रायगड हा परिसर जवळ येणार आहे.

राज्य शासन लोकांसाठी काम करत असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. राज्यात एकाच वेळी ७०० ‘आपला दवाखाना’ सुरु करण्यात आले आहेत. आजच शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यासाठी नमो सन्मान योजना व एक रुपयात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत अनेक विकास प्रकल्प सुरू असून नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकाही चांगले काम करत आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी राज्य शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देत आहे. येथील प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्रालयात बैठक घेऊ, असेही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.

आमदार व माजी मंत्री श्री. नाईक म्हणाले की, सिडको व औद्योगिक विकास महामंडळाला जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या व इतर मागण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात यावी.

आमदार श्रीमती म्हात्रे म्हणाल्या की, नवी मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी मनापासून कामे केल्यामुळे येथील विकास कामे झाली आहेत. नवी मुंबईत स्वतःचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयासाठी राज्य शासनाने मदत करावी. तसेच प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीचा निर्णय घेण्यात यावा.

आयुक्त श्री. नार्वेकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रस्ताविक केले.

 

नूतनीकृत वंडर्स पार्कची वैशिष्ट्ये

  • प्रवेश तिकिटे व राईडची तिकिटे स्मार्ट कार्ड पद्धतीने देणार
  • पाच खेळण्यांच्या जागी 7 खेळण्यांचा समावेश
  • सीसीटीव्हीची सुविधा
  • एलईडी लाईटची व्यवस्था
  • खुल्या तळ्यातील मल्टिमीडिया लेझर शो प्रमुख आकर्षण

 

टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांट

  • अमृत मिशन प्रकल्पाअंतर्गत टर्शिअरी ट्रिटमेंट प्लांटची उभारणी
  • ऐरोली व कोपरखैरणे येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी 20 दललि क्षमतेचे प्लांट
  • केंद्र, राज्य व महापालिका यांच्यामार्फत एकत्रितपणे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे
  • या प्रकल्पामध्ये अल्ट्राफिल्ट्रेशन व अल्ट्रा व्हायोलेट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
  • पुनर्प्रक्रिया केलेले पाणी औद्योगिक संस्थाना देण्यात येणार
  • औद्योगिक संस्थांना देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये बचत

वाशी बहुद्देशीय इमारत

  • गरीब व गरजू लोकांसाठी वाशी सेक्टर 3 मध्ये बहुद्देशीय मंगल कार्यालयाची उभारणी
  • यामध्ये पार्किंग व्यवस्था, स्टोअर रुम, किचन रुम, तीन वातानुकुलित सभागृहे
  • स्पोर्ट क्लब, नगरवाचनालय, मुक्ती संघटना रुम, एनएममंडळ रुमची व्यवस्था

मध्यवर्ती ग्रंथालय

  • वाचन संस्कृती वाढविण्यासाठी मध्यवर्ती ग्रंथालयाची निर्मिती
  • तळमजला अधिक चार मजल्यांची पर्यावरण पूरक हरित इमारत
  • पुस्तकांचा प्रवास दर्शविणारे लक्षवेधी प्रदर्शन
  • ग्रंथविषयक उपक्रमांसाठी 130 आसन क्षमतेचे सभागृह
  • दृष्टिहीन वाचकांसाठी ब्रेल विभाग
  • भाषा प्रयोगशाळा
  • व्ह्युईंग गॅलरीची आकर्षक रचना
  • मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील साहित्यकृती उपलब्ध होतील.

खासदार सुरेश धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 30 : चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे, अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना करतो’, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्याप्रति श्रद्धांजली व्यक्त केली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

लोकसेवा हक्क आयोगाच्या सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक- आयुक्त दिलीप शिंदे

पुणे, दि. 30 :- राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा राज्यातील सामान्य माणसापर्यंत तत्परतेने, सहज व सुलभपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य हक्क अधिनियम 2015 अंमलात आहे. या कायद्यातील  तरतूदींचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून त्यासाठी विविध माध्यमांतून लोकजागृती करावी, असे आवाहन राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिलीप शिंदे यांनी केले.

राज्य हक्क अधिनियम 2015 मधील तरतूदी, कार्यपद्धती व अधिसूचित सेवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत आयुक्त श्री. शिंदे बोलत होते. यावेळी  आयोगाच्या उप सचिव अनुराधा खानविलकर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, पुणे मनपाचे उप आयुक्त सचिन इथापे, श्यामला देसाई, विक्रम महिते आदी उपस्थित होते.

या अधिनियमांतर्गत 511 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी 387 सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जात असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले अधिनियमामध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्याने पात्र व्यक्तींना कालबद्ध लोकसेवा देणे बंधनकारक असून सेवा देण्यासाठी निश्चित कालमर्यादा आहे. कालमर्यादेत माहिती देण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांपर्यंत दंड लावण्याची तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. शिंदे म्हणाले, आयोग स्थापन झाल्यापासून 13 कोटी 62 लाख इतके अर्ज प्राप्त झाले असून 12 कोटी 94 लाख अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तर पुणे विभागात एप्रिल 2023 पासून 7 लाख 27 हजार 471 अर्ज प्राप्त झाले असून 6 लाख 28 हजार 650 असे एकूण 86 टक्के अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.  आयोगांतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ आपले सरकार पोर्टलद्वारेही घेता येतो. सध्या पुणे शहरामध्ये 586 आपले सरकार सेवा केंद्रचालक असल्याचे सांगितले.

या कायद्यान्व्ये जिल्हाधिकारी यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लोकसेवा हक्क अधिनियमाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आठवडी बाजार, भित्तीपत्रके, शिबीरे, जाहिरात आदींच्या माध्यमातून प्रसिद्धी व लोकजागृती होणे आवश्यक आहे, असे श्री. शिंदे म्हणाले. पुणे जिल्ह्याने सेवा देण्यामध्ये चांगले काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी आयोगाची संरचना, अधिनियमाची उद्दिष्ट्ये, महत्त्वाच्या तरतूदी, आयोगाचे अधिकार, जिल्हाधिकारी यांची जबाबदारी,आपले सरकार पोर्टलमार्फत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध असलेल्या सेवा, दैनंदिन वापरासाठी देण्यात येणाऱ्या पदनिर्देशित अधिकारी, नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीला आयोगाचे अधिकारी- कर्मचारी, नागरिक, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

‘सारथी’मार्फत प्रशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन

मुंबई, दि. 30 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी)कडून प्रशिक्षण घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीकडून अभिनंदन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र पाटील,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सारथी संस्थेच्या १०३ गुणवंत विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड झाली.आणि  सारथी संस्थेच्या एकूण ३९ विद्यार्थ्यांपैकी १७ विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम यादीत निवड झाली आहे. ही अभिमानाची बाब आहे. या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सत्कार समारंभ आयोजित करावा, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे  प्रलंबित असणारी प्रकरणे  व्याज परतावा प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यक निधीची तरतूद करावी, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

मा. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका संदर्भातील प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.असेही या बैठकीत सांगितले. तसेच मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यासाठी यावर अभ्यास करून अहवाल देण्यासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

00000

काशीबाई थोरात/विसंअ/

शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी हस्तांतरित करुन त्याठिकाणी भविष्यात जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला जागा हस्तांतरण करण्याचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे ४७ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनी शिर्डी, साकुरी, निमगाव, कोऱ्हाळे, शिरसगाव या गावात उपलब्ध असून तसेच त्या विनावापर आहेत. शिर्डी आणि आसपासच्या परिसरात असलेल्या शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर व्हावा या स्थानिकांच्या मागणीचा आणि भविष्यातील नियोजनाचा धोरणात्मक विचार करून मंत्री विखे पाटील यांनी सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूल मंत्री श्री. विखे- पाटील यांनी आभार मानले आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिकस्थळ व सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी व परिसरात भविष्यकालीन दृष्टीने उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर  महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांचा भर असणार आहे. शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आणि इतर भाविकांच्या सोयी सुविधांसह अम्युझमेंट पार्क/लेझर तथा फाऊंटन शो/गार्डनची उभारणी करणे, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वापर करणे, बाजर समिती, ग्रामपंचायत साकुरी, नगरपरिषद राहाता, ग्रामपंचायत निमगाव कोऱ्हाळे, ग्रामपंचायत बेलापूर वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी, मध्यवर्ती प्रशासकीय संकुल तसेच विविध शासकीय कार्यालय, अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी सदर जागेचा सुयोग्य व सुनियोजित वापर करण्याचा सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याचे मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

०००००

वर्षा फडके- आंधळे

‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत एका दिवसात १ लाख ८१ हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ

पुणे, दि. 30: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकाचवेळी ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत शिबिरांचे  आयोजन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत एका दिवसात 1 लाख 81 हजार 376 नागरिकांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टापेक्षा दुप्पट  नागरिकांना अभियानांतर्गत लाभ देण्यात आल्याने अनेकांना समाधानाचे क्षण अनुभवता आले.

अभियानांतर्गत जिल्ह्याला 75 हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्यादृष्टीने महसूल तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवेचा लाभ देण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यादृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांनाकडून अर्जही भरुन घेतले.

आज तालुकास्तरावरील शिबिराच्या माध्यमातून  नागरिकांना शासकीय योजना व सेवेचा लाभ देण्यात आला. या  सकाळी 11 वाजता शिबिरांना लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. काही ठिकाणी सभागृह तर काही ठिकाणी मंडप उभारून विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आला होता. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आशेने आलेले नागरिक समाधानी होऊन परततांना दिसले. एकूण 1 लाख 81 हजार 376 नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला.

 पुणे शहरात 10 हजार 929, हवेली 27 हजार 419, मुळशी 3 हजार 950, भोर 28 हजार 442, मावळ 3 हजार 68, वेल्हे 8 हजार 390, जुन्नर 3 हजार 523, खेड 10 हजार 837, आंबेगाव 24 हजार 203 शिरुर 33 हजार 223, बारामती 21 हजार 431, पुरंदर 5 हजार 517 आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 442 लाभार्थ्यांना शिबिराचा लाभ झाला.

शिबिरात महसूल, कृषि, आरोग्य, जलसंपदा,  पशुसंवर्धन, पोस्ट, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एकात्मिक बालविकास विभाग, दुय्यम निबंधक सहकारी संस्था कार्यालय आदी विविध विभागांनी सहभाग घेतला. नागरिकांना शिधापत्रिका, दिव्यांग प्रमाणपत्र,  विविध दाखले, मतदार नोंदणी, नवीन वीज जोडणी, आधारकार्ड अद्ययावत करणे या सेवांसह संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना, मनरेगा, दिव्यांगांना आधार कार्ड,  निर्वाह भत्ता, आदी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.  यावेळी  नागरिकांना शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात आली.

सूक्ष्म नियोजनावर भर

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी शिबिराचे सूक्ष्म नियोजन केले होते. तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून त्यांच्याकडील योजना, सेवा व लाभार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात आली. तालुकास्तरावरील बैठकांमध्ये नियोजनाला अंतिम रूप देण्यात आले. उद्दीष्टापेक्षा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी गेला आठवडाभर परिश्रम घेतले.

जागेवरच सेवा मिळाल्याचा आनंद

‘शासन आपल्या दारी’ अभियांनाअंतर्गत भोर तालुक्यातील देगावच्या नाईलकर कुटुंबांना प्रथमच महादेव कोळी जातीचा दाखल्याचे वाटप करण्यात आले. याबद्दल नाईलकर कुटुंबानी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. हितेश खुटवळ यांच्या बाळाचे आधार कार्ड तात्काळ तयार झाल्याने त्यांना वेळ वाचल्याचे समाधान होतो. अशा अनेक समाधानाच्या प्रतिक्रीया शिबिरात ऐकायला मिळाल्या.  ‘शासन आपल्या दारी उपक्रमात सर्व योजना एकाच छताखाली मिळत हायती..’ ही मांगदरीच्या लक्ष्मण मांगडे प्रतिक्रीया आणि पत्नीला दिव्यांगाचे कार्ड तात्काळ मिळाल्याने ‘शासनाचा उपक्रम लय भारी’ ही संपत मोहिते यांची प्रतिक्रीया शिबिराचे यश सांगणारी आहे.

डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी- शिबिराच्या माध्यमातून अधिक संख्येने  नागरिकांना  लाभ देण्याच्या आनंदाएवढेच ज्यांना लाभ मिळाला त्या सामान्य  ग्रामीण भागातील नागरिकांचे कष्ट वाचले याचे समाधान जास्त आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी प्रयत्नपूर्वक चांगले नियोजन केले. यापुढेही असेच मोहिम स्तरावर सामान्य नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न असतील.

****

महामानवांच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी महाराष्ट्र घडविला. त्यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा दिली. अशा महामानवांच्या जयंतीचा संयुक्त उपक्रम कौतुकास्पद आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा आज दुपारी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत ढोके, सविता शिंदे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा,  आमदार भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, माजी आमदार शिरीष चौधरी आदींनी या सोहळ्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा हा उपक्रम आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे दरवर्षी प्रबोधनपर उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. यावेळी व्याख्याते रवींद्र शिवाजी केसकर यांनी ‘माणसाची एकच जात, दोन पाय- दोन हात’ याविषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर संगीतकार जॉली मोरे, शाहीर सीमा पाटील यांनी ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा’ या विषयावर प्रबोधनपर गीते सादर केली.

संघटनेतर्फे देण्यात येणारा सन २०२३ चा डॉ. बी. आर. आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार ५१ रुपये रोख, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

ताज्या बातम्या

पाकिस्तानमधील स्ट्रीमिंग सामग्रीबाबत केंद्र सरकारची कडक भूमिका

0
नवी दिल्ली, दि. ८ : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट होणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

0
नवी दिल्ली, 8 : हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात माहिती व्हावे, यासाठी...

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वच्छता व शिस्त रुजवावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. ८ : सिंगापूरच्‍या शिक्षण प्रणालीमध्‍ये देशप्रेमाला अनन्‍यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्‍यांना शिक्षण देताना ते देशाचे उत्‍कृष्‍ट नागरिक कसे घडतील याला त्‍यांनी प्राधान्‍य दिले...

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

0
मुंबई, दि. ८ - मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांची आज भारतीय जनता...

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

0
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे...