सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 1164

खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत सद्य:स्थितीसह भविष्यातील नियोजनाबाबत पारदर्शकता राखावी – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १५ : खुल्या भूखंडाच्या दत्तक धोरणाबाबत (ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी) मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन आणि नागरिकांची संयुक्त बैठक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाली.

आपल्या प्रशासनात पारदर्शकता असावी यासाठी पालकमंत्री लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत किती मोकळे भूखंड आहेत, त्या पैकी किती भूखंडावर उद्याने आहेत, मैदाने किती आहेत, किती जागा दत्तक धोरणात येऊ शकतात या बद्दलची सर्व माहिती ३० दिवसांत महानगरपालिकेच्या संकेस्थळावर प्रकाशित करावी, असे सांगितले. भूखंडाची सद्य:स्थिती तसेच त्याबद्दलचे भविष्यातील नियोजन नागरिकांपर्यंत पोहोचावे जेणेकरून पारदर्शकता टिकवता येईल आणि नागरिकांचा विश्वास अधिक वृध्दिंगत होईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विविध सिटीझन फोरमचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.  या बैठकीमध्ये ओपन स्पेस ॲडाप्शन पॉलिसी म्हणजे नक्की काय, या मधील तरतुदी काय आहेत, यामध्ये काय बदल आवश्यक आहेत, तसेच ह्या धोरणात्मक निर्णयाची गरज आहे का यासारख्या विविध विषयांवर नागरिकांनी आपली मते मांडली. पालकमंत्री श्री. लोढा यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या सर्व सूचना लक्षात घेऊन त्या अनुषंगाने पाऊले उचलण्याचे सूचवले. त्याचप्रमाणे ओपन स्पेस पॉलिसीचा मसुदा संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरिकांनी तो व्यवस्थित वाचून आपल्या सूचना द्याव्यात, असेही आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.

000

संध्या गरवारे/विसंअ/

महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा परराष्ट्र धोरणात समावेश करण्याची परिसंवादात मागणी

मुंबई दि.१५ : सर्व क्षेत्रांशी निगडित स्त्रीवादी धोरण तयार करणे आवश्यक असून त्यामुळे स्त्रियांना संरक्षण मिळेल. समाजातील पुरुष मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमातील मुद्द्यांची राज्य सरकार दखल घेणार असून त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. परदेशातील भारतीय महिलांची फसवणूक होते त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्था आणि शासनाच्या माध्यमातून त्यांना मदत करणे आवश्यक आहे त्याकरिता धोरण बनवण्याची गरज असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या पुढाकाराने आज दुपारी  विधानभवनात “स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण” या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.  यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, आजच्या परिसंवादातून नक्कीच नवीन विचारांची देवाण- घेवाण होण्यास मदत होईल. लिंग समानता, स्त्रियांवरील अत्याचार,  हिंसाचार यावर चर्चा होऊन त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी या परिसंवादाचे आयोजन केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांचे त्यांनी आभार मानले.

मेक्सिकोचे महावाणिज्यदूत अडोल्फो गार्सिया एस्ट्राडा म्हणाले की, स्त्रियांवरील हिंसाचार रोखण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये स्थानिक लोकांच्या सहभागाची आणि त्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. ज्या स्त्रियांना हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे, त्यांना मानसिकदृष्ट्या, विधी व न्याय विभागाद्वारे मदत करणे आवश्यक आहे. मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढत असून ते रोखण्यासाठी काम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जर्मनीचे महावाणिज्यदूत एचिम फॅबिग म्हणाले की, जर्मनीतील स्त्रियांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी महिला मंत्र्याच्या अंतर्गत स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. याविषयावर एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. लोकांना समजण्यासाठी स्थानिक भाषेत कायदे तयार करण्यात आले आहेत. घरगुती हिंसाचारासाठी विशिष्ट क्रमांकाची  हेल्पलाईन तयार करण्यात आलेली आहे.

ऑस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत मॅजेल हाइंड म्हणाले की, सर्वच क्षेत्रात लिंग समानता असायला पाहिजे. महिलांच्या सशक्तीकरण होणे महत्वाचे आहे. कॅनडाच्या महावाणिज्यदूत दिदराह केली म्हणाल्या की, जेंडर बेस गुन्ह्यांसंदर्भात डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर कॅनडाने केला आहे. जपानच्या महावाणिज्यदूत डॉ. यासुकाता फुकाहोरी म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार हा  सामाजिकतेसोबत सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा विषय आहे. जपानमध्ये स्त्री- पुरुष असा भेदभाव न करता समान कायदा अवलंबला जात असल्याचे सांगितले.

नेदरलॅण्डच्या महावाणिज्यदूत बार्ट डी जोंग म्हणाल्या की, १ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय फेमिनिजम कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले.  भारतातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांच्या कौशल्य विकासावर भर देणे गरजेचे आहे. नेदरलॅण्डमध्ये अत्याचारित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी एकच मध्यवर्ती केंद्र आहे. त्याद्वारे महिलांना मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. रशियाच्या उपमहावाणिज्यदूत एलेना रेमेझोवा म्हणाल्या की, पीडित महिलांना मानसिकदृष्ट्या आणि कायदेशीर मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर म्हणाले की,  स्त्रिया आजही आर्थिक निर्णय घेऊ शकत नाहीत. पोलिसांच्यावतीने महिलांच्या सशक्तीकरणासाठी योजना राबविण्यात येत आहेत. लहानपणापासून मुलांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव केला जातो. या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मुलींचे संरक्षण मुंबई पोलिसांकरिता प्राथमिकता असल्याचे श्री. फणसाळकर यांनी सांगितले.

महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, काही देशांसोबत महिलांच्या प्रश्नांवर विचारांची देवाण- घेवाण होणे आवश्यक आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. स्त्री आधार केंद्र विश्वस्त जेहलम जोशी म्हणाल्या की, कोविड काळात ज्या स्त्रिया विधवा झाल्या आहेत, त्यांना संस्थेच्या वतीने स्त्रियांना मानसिकदृष्ट्या आधार देण्याचे काम करण्यात आले. गणेशोत्सव, नवरात्र यादरम्यान लहान मुलींचे अपहरण होऊ नये याकरिता स्त्री आधार केंद्रातील महिला पोलिसांसोबत स्वयंसेवक म्हणून काम करत असतात. पीडित स्त्रियांना स्थानिक पातळीवर मदत मिळणे आवश्यक आहे. त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. महिलांच्या जागृतीसाठी सरकारच्या महिलांकरिता असलेल्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जावी.    यावेळी जर्मनीचे अचिम फॅबिग, फ्रान्सच्या जो-मार्क सेरे शार्ले, झेलम जोशी यांच्यासह  सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन मीनल जोगळेकर यांनी केले.

000

संध्या गरवारे/विसंअ/

मराठवाडा मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सेनानींनी दिलेल्या प्रेरणादायी व स्फूर्तिदायी लढ्यापासून बोध घेत कार्य करण्याची गरज

औरंगाबाद, दि. १५ (विमाका): मराठवाडा मुक्तिसंग्रामात निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य सेनानींनी दिलेला लढा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी व स्फूर्तीदायी असून यापासून सर्वांनी बोध घेत कार्य करण्याची गरज असल्याचा सूर मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेत उमटला.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामा’च्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभाच्या निमित्ताने वंदे मातरम सभागृह येथे मुक्तिसंग्रामात धगधगता मराठवाडा’ आणि ‘लढ्यातील महिला क्रांतिकारक’ या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महनगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, उपायुक्त अपर्णा थेटे, नंदा गायकवाड, राहुल सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी भारत तीनगोटे, व्याख्याते सारंग टाकळकर, डॉ. रश्मी बोरीकर, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठवाडा मुक्तिसंग्राम मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान
-व्याख्याते सारंग टाकळकर
‘मुक्तिसंग्रामात धगधगता मराठवाडा’ या विषयावर व्याख्यान देतांना श्री टाकळकर म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्रामात निजामाविरुद्धच्या लढाईत सर्व जाती, धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, गोविंद पानसरे, दगडाबाई शेळके, अनंत कान्हेरे, माणिकचंद पहाडे, नारायण पवार अशा विविध स्वातंत्र्य सेनानींचे मुक्ती संग्रामात मोठे योगदान होते. भारतीय सैनिकानी निझामाविरुद्ध ‘ऑपरेशन पोलो’ ही मोहीम राबवून निजामाच्या अधिपत्याखालील सर्व भाग काबीज करत हैद्राबाद संस्थान निजाम मुक्त केले. त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्राम हा मराठवाड्याच्या इतिहासातील सोनेरी पान असून हा लढा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन अत्यंत तळमळीने मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विलक्षण असा लढा लढला गेला. यामध्ये सुमारे ६० हजारापेक्षा अधिक सत्याग्रहींनी सहभाग घेतला, २५ सत्याग्रहींनी
तुरुंगवास भोगला तर 102 वीरांनी या लढ्यात हौतात्म्य पत्करले असल्याचेही श्री. टाकळकर यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी रणरागिनींची साथ – डॉ. रश्मी बोरीकर
‘लढ्यातील महिला क्रांतिकारक’ या विषयावर व्याख्यान देतांना डॉ. बोरीकर म्हणाल्या, मराठवाडा मुक्ती संग्रामात पुरुषांच्या खांद्याला खांदा अनेक महिला स्वातंत्र्य सैनिक मुक्ती लढ्यात सहभागी झाल्या होत्या. स्वतःच्या जीवाची, अब्रूची पर्वा न करता या महिला स्वातंत्र्य सैनिकांनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांपर्यंत शस्त्रास्त्रे पुरविण्याचे काम केले. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी रणरागिनींनी खंबीरपणे साथ दिली. मुक्तीसंग्रामानंतर महिलांनी समाजकारण आणि राजकारणात सहभागी होऊन कार्य केले असल्याचेही त्या म्हणाल्या.

यावेळी ‘हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील बालवीर’ या नाटकांचे सादरीकरण करण्यात आले.

नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. १५ : राज्यात काही दिवसातच गणरायाचे आगमन होणार असून नागरिकांनी जातीय सलोखा ठेवून गणेशोत्सव साजरा करावा, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठी मोफत अन्नदान कक्षाचे उद्धाटन, शारदा गजानन पुरस्कार व जिल्हा स्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा बक्षिस वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक गणेश घुले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, गणेश मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आणि शेतकरी बांधवांसाठी मोफत भोजनाचा उपक्रम चांगला आहे. शेतकरी कष्टकरी आहे, लाखाचा पोशिंदा आहे. शेतमालातील चढउतार लक्षात घेऊन बाजारभाव शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना परवडण्याच्यादृष्टीने शासनाकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो.

राज्यातील काही भागात सध्या अवर्षणाची परिस्थिती आहे. गेल्या चार-पाच दिवसात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो पुरेसा नाही. शेतकऱ्यांसमोर बिकट संकट उभे राहिले असून पिकांचे नुकसान होत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून  देण्यासाठी, शेतकऱ्यांपुढील संकटावर मात करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या सोडविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. पणन मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. स्वच्छतेबाबत मार्केट यार्ड आणि पुणे महानगरपालिकेने समन्वय ठेवावा. पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वच बाबतीत पुढे राहील, तिचा नावलौकीक वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

बालेवाडी येथे ऑलिंपिक भवनाच्या उभारण्यासाठी  ७५ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला मूर्तस्वरूप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रिडा संकुलासाठी निधी देण्यात येत आहे. देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवूण देणाऱ्या स्व. खशाबा जाधव यांचा जन्म दिन आपण राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून आता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण असे ३ संघ क्रीडा स्पर्धेत सहभागी होतात. यापूर्वी पुणे जिल्ह्यातून एकच संघ भाग घेत असे. एकंदरीतच राज्यात तरुण तरुणींमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

000

आयुष्यमान भव: योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : आयुष्यमान भव: योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तूर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कागलमध्ये आयुष्यमान भव: योजनेचा प्रारंभ मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांना वितरण झाले. टी.बी. निक्षयमित्र म्हणून क्षयरोग झालेल्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषणयुक्त मासिक आहाराचे पॅकेज देणाऱ्या डॉ. मंगल ऐनापुरे व पेठवडगाव येथील राहोबत सेवाभावी संस्था यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम कागल, गडहिंग्लज व उत्तुर मध्ये महाराष्ट्रात उच्चांकी झाले आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले.

श्री. मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भव: योजनेअंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान भारत योजना कार्डची नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्मान सभा, रक्तदान मोहीम, अवयव दान जनजागृती मोहीम, १८ वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी आदी उपक्रम विशेष मोहीम म्हणून प्रभावीपणे  राबवा.

व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी नगराध्यक्ष नवल बोते, आरोग्य सेवा संचालक डॉ. प्रेमानंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, डॉ. उमेश डॉ. सावंत, डॉ. बामणीकर, डॉ. गांधी आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक आरोग्यसेवा संचालक डॉ  प्रेमानंद कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. नासिर नाईक यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी मानले.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ‘सारथी’चे बळ

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), उपकेंद्र कोल्हापूरमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत. याबद्दल थोडक्यात माहिती. 

महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग

      केंद्रीय लोकसेवा आयोगया उपक्रमांतर्गत सारथी मार्फत UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीनही टप्प्यावर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत UPSC च्या पूर्व परीक्षेसाठी 500 विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रूपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. तसेच  प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी मार्फत भरण्यात येते.

      केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा : आतापर्यंत मागील तीन वर्षात 2020, 2021, 2022 मध्ये एकूण 1 हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी रुपये 21 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे  देण्यात आलेला आहे.

      केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा : आतापर्यंत UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 50 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 650 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3 कोटी 25 लाख रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

      केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत: मुलाखतीच्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 25 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाख रूपये इतका निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

सारथी अंतर्गत UPSC परीक्षेमध्ये मागील तीन वर्षात IAS  परीक्षेमध्ये 12, IPS परीक्षेमध्ये 18, IRS परीक्षेमध्ये 8  विद्यार्थी उतीर्ण झाले असून इतर केंद्रीय सेवांमध्ये एकूण 12 अशा एकूण 51 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच UPSC CAPF सेवेसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये  सांगली  जिल्ह्यातील अजिंक्य बाबुराव माने या विद्यार्थ्याची UPSC मधील नागरी सेवेमध्ये निवड झालेली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सन 2022-23 मध्ये सांगली जिल्ह्यातील 3  विद्यार्थ्यांना एकूण 75 हजार रूपये  अर्थसहाय्य केले आहे. तर केंद्रीय  लोकसेवा आयोग(मुख्य परीक्षा) टप्प्यावर  6 विद्यार्थ्यांना एकूण 3 लाख रूपये अर्थसहाय्य केले आहे.

      महाराष्ट्र राज्यसेवा आयोग UPSC प्रमाणेच राज्यसेवा परीक्षा MPSC मध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कोंचिंग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC साठी 750 विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथे विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.

MPSC पूर्व परीक्षा – आतापर्यंत मागील तीन वर्षात 1 हजार 125 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 8 कोटी 26 लाख रूपये  निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

MPSC मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 7 हजार 367 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 11 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

MPSC मुलाखत मुलाखतीच्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 10 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 56 लाख 60 हजार रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे.

      सन 2021-22 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, यांत्रिकी सेवा, न्यायालयीन सेवा –दिवाणी न्यायाधीश परीक्षा (CJJD –JMFC) इत्यादी परीक्षांच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी दहा हजार रुपये इतकी रक्कम एकवेळचे अर्थ सहाय्य म्हणून देण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सांगली जिल्ह्यातील 44 विद्यार्थ्यांना 4 लाख 40 हजार रूपये तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा टप्प्यावरील 368 विद्यार्थ्यांना 55 लाख 20 हजार रूपये अर्थसहाय्य करण्यात आले.

MPSC राज्य सेवा 2020 मध्ये  निवड झालेले सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी तन्वीर संपतराव पाटील ता. शिराळा, निखिल सुरेश पाटील ता. वाळवा, अर्जुन संजय कदम ता. खानापूर, सतीश रामहरी चव्हाण ता. आटपाडी, संग्राम अरुण पाटील ता. तासगाव, शुभम सुधीर जाधव ता. खानापूर, ऋतुजा हिम्मतराव शिंदे ता. कडेगाव.

      छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (CSMNRF) – या योजनेंतर्गत सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे/विकसित करण्यासाठी संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतू कमाल 5 वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे JRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 31 हजार रूपये अधिछात्रवृती व SRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 35 हजार रूपये अधिछात्रवृती देण्यात येते. तसेच UGC नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो. सन 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांचा सहभाग आहे. तर 2 हजार 109 विद्यार्थांना फेलोशिपसाठी एकूण 42 कोटी 33 लाख 36 हजार, घरभाडे भत्त्यासाठी 2 कोटी 36 लाख 50 हजार व आकस्मिक खर्चासाठी 40 लाख 7 हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2019 मध्ये मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 14 विद्यार्थ्यांना तर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सन 2019 ते 2022 पर्यंत एकूण 58 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. 

संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १८ आणि १९ सप्टेंबरला मुलाखत

मुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण क्षेत्रातील गरजू लोकांना रोजगार, कारागीर व बलुतेदार यांच्या उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृध्दी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये आमूलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे मुख्य ध्येय असून ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे करीता मंडळ प्रभावी योजना राबवत आहे. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांबाबत मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी  दिलखुलास कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि.18 आणि मंगळवार दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं

हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा! माहितीपटाचे १७ सप्टेंबरला समाजमाध्यमांवरून प्रसारण

मुंबई, दि. १५ : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने ‘हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!’ या माहितीपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.

या माहितीपटाचे थेट प्रसारण पुढील लिंकवरुन पाहता येणार आहे.

यू ट्यूब – https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा अमृत महोत्सवी सांगता समारंभनिमित्ताने रविवार 17 सप्टेंबरला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे प्रसारण होणार आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी, लेखन अजित दळवी, विषयतज्ज्ञ प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे आणि निवेदन विनय आपटे यांचे आहे.

हा माहितीपट म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही एक वर्ष, एक महिना आणि 2 दिवसाने उशिराने मिळालेल्या स्वातंत्र्य लढ्यातील मराठवाड्याच्या सहभागाची तेजस्वी कहाणी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण दक्षिण भारतातल्या हैदराबाद संस्थानातील काळरात्र संपली नव्हती. हैद्राबादचा तत्कालिन निजाम मीर उस्मान अली याने भारतात सामील न होता आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याच्या इराद्याने येथील जनतेवर अत्याचार आणि मुस्कटदाबीचे षडयंत्र आरंभले होते. निजामाच्या या जुलूमशाहीचे तख्त उधळून लावण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या ऐतिहासिक लढ्याची माहिती चित्ररुपाने देण्यात आली आहे.

०००

हृदयविकारग्रस्त बालकांची मंत्री सुरेश खाडे यांनी घेतली भेट

मुंबई, दि. १५ : सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील ४६ बालकांना मुंबई येथील एसआरसीसी बाल रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची व पालकांची आज कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शस्त्रक्रिया झालेल्या बालकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. मुलांना रुग्णालयात योग्य उपचार मिळतील व बालके रोगमुक्त होऊन घरी जातील याबाबत पालकांनी निश्चिंत रहावे, असा धीर देत मंत्री श्री. खाडे यांनी पालकांना आश्वस्त केले.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इको तपासणी शिबिरामध्ये तपासणी केलेल्या २०५ बालकांपैकी ६० बालकांवर हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदर्शनास आले. ‘आयुष्मान भव:’ योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामधून ४६ बालकांना एसआरसीसी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर उर्वरित रुग्णांच्या शस्त्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होतील. रुग्णालयातील बालस्नेही वातावरण, डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि रुग्णालयाने पालकांना दिलेली सुविधा यामुळे बालक आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. यासाठी रुग्गालयातील सर्व डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री. खाडे यांनी आभार मानले.

पालकमंत्री श्री. खाडे, सांगली जिल्हा प्रशासन आणि एसआरसीसी रुग्णालयातील डॉक्टरांचे पालकांनीही आभार मानले. सांगलीपासून मुंबईपर्यंत बालकांची व आमची सर्व काळजी घेतली, असे पालक जगन्नाथ  पाटोळे यांनी सांगितले.

यावेळी एसआरसीसी बाल रुग्णालयाचे संचालक झुबिन परेरा, प्रशासकीय अधिकारी चेतन पाटील, अमित केरकर, सिराज शेजवलकर उपस्थित होते. डॉ. प्रिया प्रधान, डॉ. प्रदीपकुमार कौशिक, डॉ. गौरवकुमार, डॉ.सुप्रतिम सेन, डॉ. क्षीतिज सेठ यांनी बालकांवर शस्त्रक्रिया केल्या.

०००

मनिषा सावळे/विसंअ

नॉर्वेची कंपनी एफओडी आणि ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट

मुंबई, दि. 15 – नॉर्वेची कंपनी फ्लोटिंग ऑफशोर डिसॅलिनेशन (एफओडी) आणि भारतीय कंपनी ‘सत्व’ ग्रीन एनर्जीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी बनविण्यासाठी प्रकल्प उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

समुद्राच्या खारट पाण्यापासून शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारा ‘ऑफशोअर डिसॅलिनेशन शिप प्लांट’ बसवण्यास कंपनीच्या तेर्जे हलवॉरसेन, करण मेनन, जशेर कनियामपूरम यांनी स्वारस्य व्यक्त केले आहे. या जहाजामुळे जमिनीवरील गुंतवणुकीचा खर्च आणि त्याच्याशी संबंधित इतर भांडवली गुंतवणूक खर्च वाचू शकतो. तसेच हा प्रकल्प किनारपट्टीवरील भागात एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवता येणार आहे. अनियमित मान्सून आणि कमी होणाऱ्या भूजल पातळीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने ही नाविन्यपूर्ण उपाययोजना पुढे आणली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

000

बी.सी.झंवर/विसंअ

ताज्या बातम्या

विधानसभा लक्षवेधी

0
अमली पदार्थ विक्रेत्यांवर ‘मोक्का’ लावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १४ : राज्यात अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक होऊनही...

मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर व मोठ्या घराचे स्वप्न साकार होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडून आलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांची होणार अंमलबजावणी मुंबई, दि. १४: सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल मुदतीच्या आधीच सादर...

ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १४ : ठेवीदारांना न्याय देण्यासाठी बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच...

महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी दापचरी येथील जागेची पाहणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १४: महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील दापचरी येथील जागेची पाहणी करण्यात यावी. याचबरोबर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
मृद व जलसंधारण विभागासाठी ८६६७ पदांना मान्यता, भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार - मंत्री संजय राठोड मुंबई, दि. १४: मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता...