शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 1156

विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून बांधकाम कामगार, कुटुंबियांना आरोग्य सेवा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून गरीब, अशिक्षित, कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला.

विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या राज्यस्तरीय योजनेचा शुभारंभ व फिरत्या वैद्यकीय कक्षाचे लोकार्पण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, महापालिका आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, एचएलएल लाईफ केअर कंपनीचे डीजीएम रणजीत एम., सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर आदि मान्यवर व्यासपाठीवर उपस्थित होते.
विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या आरोग्य सेवेशी निगडित महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय योजनेचे आज सांगली जिल्ह्यातून उद्घाटन होत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यासाठी सर्व अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त एक फिरता वैद्यकीय कक्ष देण्यात येत आहे. त्याचे पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांसाठी आज प्रातिनिधीक स्वरूपात लोकार्पण करण्यात येत आहे. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची तपासणी ते उपचार होणार आहेत. त्याचा खर्च बांधकाम कामगार मंत्रालय उचलणार आहे.

बांधकाम कामगारांची नोंदणी मात्र एक रूपयामध्ये केल्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरात 13 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी होऊ शकली, असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार भवन उभारण्यात येणार असून, सांगली जिल्ह्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 100 खाटांचे ईएसआय रूग्णालय मंजूर करण्यात आले आहे. बांधकाम कामगारांना सेफ्टी किटस् देण्यात आली आहेत. बांधकाम कामगारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्याला सेतू केंद्र सुरू करणे, पाणी, बैठकव्यवस्थेसह नाका शेड उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, बांधकाम कामगारांनी नोंदणी करून त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात सुरू केलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या योजनेंतर्गत 18 पारंपरिक व्यवसायांच्या नोंदीत कारागिरांना प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे. टूल किट प्रोत्साहन, कौशल्य विकास प्रशिक्षण भत्ता, सवलतीचे व तारणमुक्त कर्ज देण्यात येणार आहे.

विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, बांधकाम कामगार प्रतिकूल, आव्हानात्मक परिस्थितीत काम करत असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमिवर बांधकाम कामगारांच्या आरोग्य सेवेसाठी ही योजना उपयुक्त आहे. फिरत्या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची तपासणी ते उपचार होणार आहेत. टोल फ्री क्रमांकावर बांधकाम कामगारांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. बांधकाम विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी करावी, या योजनांचा लाभ घ्यावा व इतर बांधकाम कामगारांपर्यंत या योजना पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांसाठी “विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा” योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या संगणकीय प्रणालीचे उदघाटन पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. योजनेचा निःशुल्क १८००-२-६६ ६६ ६६ ६६ टोल फ्री क्रमांकही कार्यान्वित करण्यात आला.
यावेळी पुणे विभागातील सांगलीसह, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यातील फिरत्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आणि वाहनचालकांना प्रातिनिधीक स्वरूपात चाव्या डॉ. खाडे यांच्या हस्ते प्रदान करून बांधकाम कामगारांसाठी फिरते वैद्यकीय कक्ष (मोबाईल मेडिकल युनिट) चे लोकार्पण करण्यात आले. पात्र नोंदित लाभार्थी बांधकाम कामगारांना, त्यांच्या वारसांना अर्थ सहायाचे धनादेशही त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत गायन करण्यात आले. विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेची माहिती देणारा पोवाडा शाहीर बजरंग आंबी व पथकाने सादर केला. विवेक कुंभार यांनी प्रास्ताविक केले. अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राणी यादव यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून आलेले बांधकाम कामगार उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ ३० लाख कारागिरांना होणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे दि. १७ : पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माध्यमातून ३० लाख कारागिरांना लाभ होणार आहे. ही योजना १३ हजार कोटींची असून योजनेमुळे देशातील कारागिराच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूकही होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे अण्णाभाऊ साठे सभागृहात थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, पीएम विश्वकर्मा योजना सर्वसामान्य कारागिरांसाठी आहे. देशातील कारागिरांचे कौशल्य टिकावे आणि त्यातून त्याच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळावी असा प्रयत्न आहे. त्यासाठी त्याला ५ टक्के व्याजदराने कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबत कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून दररोज ५०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे प्रमाणत्र देण्यात येणार आहे. उत्पादित वस्तूंना बाजार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवितांना सर्वसामान्य माणसाला सहभागी करून घेतले. ३२ कोटी नागरिकांचे जनधन खाते सुरू झाले आहेत. नागरिकांच्या सहभागातून देशात स्वच्छतेची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. कोविड काळात ८० कोटी गरिबांना मोफत धान्य देण्यात आले, असेही पालकमंत्री म्हणाले. पीएम विश्वकर्मा योजनेचा कारागिरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार मिसाळ म्हणाल्या, पीएम विश्वकर्मा योजना ही सामान्य कारागिरांसाठी योजना आहे. या योजनेअंतर्गत कारागिरांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांना आवश्यक साधने देण्यात येणार आहेत. कारागिरांसाठी पुरस्कारही देण्यात येणार आहेत. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार तापकीर म्हणाले, जनधन योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शेतकरी सन्मान निधी योजना अशा अनेक कल्याणकारी योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आल्या आहेत. देशात पायाभूत सुविधांचा विकासही मोठ्या प्रमाणात होत असून मोठे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण, व्यवसायासाठी १५ हजारापर्यंत साहित्य आणि कर्ज सुविधा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणार – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचा देशात शुभारंभ

  • केंद्रीय वित्त राज्यमंत्री कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती

  • छत्रपती संभाजी नगर येथील कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजी नगर, दिनांक १७ (विमाका) : भारताची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, बँकांकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते द्वारका (नवी दिल्ली) येथून झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण छत्रपती संभाजी नगर येथील संत एकनाथ रंग मंदिरामध्ये करण्यात आले. या योजनेच्या शुभारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार हरिभाऊ बागडे, विजया रहाटकर, संजय केणेकर, शिरिष बोराळकर, संजय खंबायते, बापू घडमोडे आदींची उपस्थिती होती.

डॉ. कराड म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत सुतार, नौका कारागीर, अस्त्रकार, लोहार, हॅमर आणि टूल किट कारागीर, कुलुप कारागीर, सोनार, कुंभार, शिल्पकार, चर्मकार, राजमिस्त्री, बास्केट, चटई, झाडू, कॉयर विणकर, बाहुली आणि खेळणी कारागीर, नाभिक, पुष्प कारागीर, धोबी, शिंपी, मत्स्य जाळे कारागीर या १८ व्यवसायांचा समावेश आहे. देशाच्या जडणघडणीत या कारागीरांचा समावेश होतो. अर्थव्यवस्थेला चालना मिळते. या पारंपरिक कलाकार आणि कारागीर यांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते. लोहार, सोनार, कुंभार, सुतार, शिल्पकार यांसारख्या व्यवसायात गुंतलेले हे कारागीर आपली कौशल्ये व व्यवसाय पिढ्यानपिढ्या पुढे चालवतात. या कुटुंबांमध्ये आजही पारंपरिक गुरू-शिष्य पंरपरा अस्तित्त्वात आहेत. या पारंपरिक व्यवसायांना पीएम विश्वकर्मा योजनेतून अधिक बळ मिळण्यास मदत होणार आहे, असे मतही त्यांनी मांडले.

पीएम विश्वकर्मा योजनेतील पात्र लाभधाकांना बँकांनी तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी केल्या. देशाच्या जडणघडणीत पारंपरिक व्यावसायिक ‘विश्वकर्मा’ यांचा विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिक व्यावसायिकांचा विकास झाल्यास देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे. म्हणून बँकांनी देशाच्या विकासाची भूमिका लक्षात घेऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. आमदार बागडे, केणेकर, श्रीमती रहाटकर यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमात ‘विश्वकर्मा’ ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. सूत्रसंचालन सानिका निर्मळ यांनी केले.

दिल्लीतून योजनेचा शुभारंभ

विश्वकर्मा जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवी दिल्लीत पीएम विश्वकर्मा योजनेचा देशभरात शुभारंभ झाला. देशातील इतर ७० ठिकाणी विविध मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे यशोभूमी कन्वहेंशन सेंटरचे लोकार्पण केले. त्यासह पीएम विश्वकर्मा योजनेचे प्रतिक चिन्ह, टॅगलाइन, ऑनलाइन पोर्टल, डाक तिकिटे, टूलकिट बुकलेटचे प्रकाशन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रे प्रधानमंत्री मोदी यांनी दिली. पीएम विश्वकर्मा योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री.मोदी यांनी भाषणातून केले.

नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासोबतच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

  • श्री तुळजाभवानी मंदिर विकासाचा १३२८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर
  • जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे डिजिटल आरोग्य अकाउंट काढणार
  • पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वाटप होणार
धाराशिव,दि.17(जिमाका) :- जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही  पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिली.
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या वर्धापन दिनानिमित्त आज 17 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपस्थितांना संबोधित करून शुभेच्छा देतांना ते बोलत होते.यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील,स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगांवकर,रामभाऊ  जाधव,कलावती उंबरे,जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, संतोष भोर,राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले,17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.रक्तदान व अवयवदान याबाबतीत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येईल.या मोहिमेअंतर्गत 13 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्व आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य मेळावे व  सर्व गावांतून आयुष्मान ग्रामसभा आयोजित करण्यात येत आहेत. सर्व नागरिकांचे डिजिटल आरोग्य अकाऊंट (“आभा” कार्ड) काढण्यात येतील. अंगणवाडी व शाळांमध्ये झिरो ते 18 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येईल.असे ते म्हणाले.
अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही सहभागी करुन घेण्यात आल्याचे सांगून डॉ. सावंत म्हणाले,या कालावधीत शाळांमध्ये निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन,प्रभात फेरी आणि इतर शैक्षणिक उपक्रमांच्या आयोजनाबरोबरच मुक्ती संग्रामाविषयी पुस्तक प्रदर्शने, मान्यवरांचे व्याख्यान, आकाशवाणीवर मराठवाडा मुक्तीसंग्राम गाथा,75 हजार महिलांची आरोग्य तपासणी, 75 हजार वृक्ष लागवड,ऑपरेशन पोलो सायक्लोथॉन,तुळजापूर येथील हुतात्म्यांना मानवंदना,वॉकेथॉन (वॉक फॉर नेशन),प्रभात फेरी, मराठवाड्याचे धारातीर्थ हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रत्येक गावात दिपोत्सव असे विविध कार्यक्रम आयोजित करुन नागरिकांना व नवयुवकांना या स्वातंत्र्य लढ्याबाबत अवगत करण्यात आल्याचे डॉ.सावंत यांनी यावेळी सांगितले.
काल छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेण्यात आले आहे असे सांगून प्रा.डॉ.सावंत पुढे म्हणाले,जिल्ह्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या अनुषंगानेही निर्णय घेण्यात आले.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरासाठी 1 हजार 328 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.माणकेश्वर येथील महादेव मंदिर,तेर येथील संत गोरोबा काका मंदिर या मंदिरांच्या विकासासाठीही भरीव निधी मंजूर करण्यात आला. तसेच तुळजापूर तालुक्यात शेळीसमूह योजना राबविण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.असेही पालकमंत्री डॉ.सावंत यावेळी म्हणाले.
मुख्य शासकीय ध्वजारोहणापूर्वी पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत आणि मान्यवरांनी मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामात हुतात्म्य प्राप्त झालेल्या शहिदांना जिल्हा पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.
पालकमंत्री डॉ.सावंत उपस्थितांना शुभेच्छा देण्यापूर्वी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रतिज्ञा दिली.
पालकमंत्र्यांचे हस्ते स्वतंत्र्य सैनिक भास्कर सांभराव नायगांवकर, रामभाऊ रघुनाथ जाधव आणि कलावती वसंत उंबरे यांना स्वातंत्र्य सैनिकाची नेमप्लेट तसेच संजय नायगावकर व शीला पेंढारकर यांना ओळखपत्र वाटप केले. यावेळी पालकमंत्र्यांचे हस्ते विविध स्पर्धेचे पुरस्कार तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व इतर कुटुंबीयांची भेट घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

लातूर, दि. 17 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या विकासाच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक झाली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात उपस्थितांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.

स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे कुटुंबिय, खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, नागरिक व पत्रकार यावेळी उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी सुमारे 59 हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. लातूर-टेंभूर्णी मार्ग, लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी यासह विविध कामांच्या प्रस्तावांना मान्यता मिळाली असल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात लातूरकरांचे योगदान खूप महत्वाचे आहे. या लढ्यात अनेकांनी बलिदान दिले. महाराष्ट्र परिषदेची महत्वाची दोन अधिवेशने लातूरमध्ये झाली. या भागात आर्य समाजाचा अधिक प्रभाव होता. औराद, निलंगा, होडोळी, बोटकुल, हत्तीबेट, रामघाट, अंबुलगा, तोंडचीर आणि घोणसी अशा अनेक ठिकाणी झालेल्या लढाईचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. मुक्तिसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांच्या निजाम व रझाकार यांच्याशी झालेल्या लढायांचे स्मरण व्हावे, यासाठी अशा लढाईच्या ठिकाणी स्मारक उभे करण्यात येत आहेत. तसेच रामघाटच्या प्रसिद्ध लढाईचे चीरस्मरण म्हणून त्याठिकाणी भव्य प्रवेशद्वार उभे केले जाणार आहे. यासाठी नुकतेच शासनाने सुमारे 98 लक्ष रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात आयोजित ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ व्याख्यानमाला, माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे आणि प्राचार्य प्रा. सोमनाथ रोडे यांची मराठवाडा मुक्तिलढ्यावर प्रकट मुलाखत, ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आदी उपक्रमांतून मुक्तिसंग्रामाचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पोलीस पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शस्त्र सलामी दिली. ना. बनसोडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच उपस्थितांना मराठवाडा भूमीला समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून ना. बनसोडे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन उद्धव फड यांनी केले.

ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शन, चित्ररथाला भेट

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत ग्रंथ व दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन हुतात्मा स्मारक येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास जागर माहितीपटाच्या माध्यमातून करण्यासाठी ‘क्रांतिशाली लातूर’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या प्रदर्शनाला आणि चित्ररथाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी भेट दिली. तसेच या प्रदर्शनातील ग्रंथ, दुर्मिळ छायाचित्रांची पाहणी केली. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास जाणून घेण्यासाठी या प्रदर्शनातील दुर्मिळ छायाचित्रे मौल्यवान ग्रंथांमुळे मदत होईल, असे मत ना. बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केले.

विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या प्रथम तीन स्पर्धकांचा क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

‘एक जन्म, एक वृक्ष’ मोहिमेस सुरुवात; ‘टीबी’मुक्तीसाठी सहाय्य करणाऱ्यांचा सन्मान

लातूर शहर महानगरपालिकेमार्फत वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘एक जन्म, एक वृक्ष’ मोहीम उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाला आज क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सुरुवात झाली. शहरातील गरोदर मतांची प्रसूती झाल्यानंतर या मोहिमेंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेमार्फत त्यांना वृक्ष भेट देण्यात येणार आहे. प्रातिनिधिक स्वरुपात पाच मातांना वृक्ष भेट देवून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानामध्ये सहभागी होत लातूर शहर टी बी युनिट अंतर्गत 200 क्षयरुग्ण दत्तक घेवून त्यांना 6 महिन्यांसाठी आवश्यक 1200 फूडबास्केटचा पुरवठा करणाऱ्या लातूर एमआयडीसी येथील एडीएम ऍग्रो अँड विझाग प्रा. लि. यांचा ना. बनसोडे यांच्या सन्मान करण्यात आला. तसेच लातूर शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात नव्याने सामील झालेल्या अग्निशमन वाहन, फिरते शौचालये आदीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई दिनांक १७ सप्टेंबर : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मंत्रालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

000

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई दिनांक १७ सप्टेंबर : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) विलास आठवले, उप सचिव  ऋतुराज कुडतरकर, विधानपरिषद उपसभापती, यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष उडतेवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

 

000

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.१७: महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलासंदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने सर्व जिल्ह्यांमध्ये दि. २ ऑक्टोबर, २०२३ ते दि. १ ऑक्टोबर, २०२४  या कालावधीत राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे,अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विभागाचे सचिव, यांच्या माध्यमातून संनियंत्रण होणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत समन्वय साधण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरती जिल्हाधिकारी तर शहरी भागाकरिता जिल्हा सहआयुक्त (नगर प्रशासन) या सर्व योजनेचे संनियंत्रण करतील.

या अभियानाचे संनियंत्रण व मासिक आढावा घेवून त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर करण्यात येईल, विभागाचे सचिव हे राज्याचे समन्वय नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्य स्तरावर एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल.

या अभियानात राज्यातील सर्व जिल्ह्यातील शक्ती गटांना आणि महिला बचत गटांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांची पात्रता तपासून प्रस्तावित लाभार्थी महिलांची यादी तयार करणे, योजनांचे लाभ घेण्यासाठी संबंधितांकडून अर्ज भरून घेणे, ही प्रक्रिया करुन प्रत्येक  जिल्ह्यामध्ये किमान अडीच लाख महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्यात येणार तालुकास्तरावर तीस हजार व प्रत्येक गावात २०० महिला अभियानात जोडल्या जातील असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर शहरी भागातील याच प्रकारे काम करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ, महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण, महिलांसाठी आरोग्य शिबिर, रोजगार मेळावा, विविध सरकारी विभाग व महामंडळाच्या योजनांचे स्टॉल, बचत गटांची नोंदणी, सखी किटचे वाटप, शक्ती गटांची महिला बचत गटांची जोडणी, सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून महिलांना वैयक्तिक लाभ देणे, उद्योग उभारणीस अर्थसहाय्य करणे, महिला उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे, प्रोत्साहन पर पारितोषिक वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी आणि माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांचे प्रशासकीय मान्यतेचे अधिकार यापूर्वी रु. ५० लाखापर्यंत होते ते २ कोटी रुपयांनी  वाढविण्यात आले आहेत.या धोरणामुळे आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत  मा.आमदार यांच्या स्वेच्छाधिकारात २० लाख रुपयांचा निधी महिला विकासाच्या योजनांसाठी उपलब्ध करुन  देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२३-२४ अंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणासाठी जिल्ह्याच्या नियतव्ययात १ टक्का निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच शासनाच्या सध्या कार्यरत असलेल्या योजना देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.महिला सक्षमीकरणासाठी केंद्र राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजना अधिक लोकाभिमुख करून महिलांना संघटित करून, प्रशिक्षण देऊन, आर्थिक सक्षमीकरण करणे,   महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना एकत्रितपणे एकाच छत्राखाली राबविण्यात यावेत यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. अशी माहिती  मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

०००

सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार

मुंबई, दि. 16 : राज्यात आजपासून 16 ऑक्टोबर 2023 पर्यंत सेवा महिना राबविण्यात येणार असून ’सेवा महिना’ अंतर्गत  विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

 राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे, नागरिकांना विविध योजनांचा  लाभ घेता यावा यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी महिनाभर सेवा महिना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.

यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

0000

वि.सं.अ/राजु धोत्रे

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2023/09/202309151813001007.pdf”]

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

जालना, दि. 17 (जिमाका)- मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. जिल्ह्यातील हजारो थोर  व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते, त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. या आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी काल पार पडलेले मंत्रिमंडळ बैठकीत विविध लोककल्याणकारी निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जालना जिल्हयासाठीही अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत, जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण श्री. सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.


प्रारंभी टाऊन हॉल परिसरात असणाऱ्या मान्यवरांनी  लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली. या कार्यक्रमानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देताना श्री. सत्तार म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद संस्थानातील या मराठवाडयात त्यावेळी पारतंत्र्य होते. त्या काळात मराठवाड्याच्या मुक्तीसाठी थोरामोठयांनी फार मोठी कामगिरी बजावली. मराठवाडयाने शौर्याची परंपरा कायम राखली. तळहातावर जीव घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा देणारी मंडळी आपले घरदार, संपत्ती यांचा तिळमात्र विचार न करता स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सहभागी झाली होती. सर्व स्तरावर निजामाशी मुकाबला करुन पारतंत्र्याचे जोखड झुगारुन मराठवाडयाला स्वातंत्र्य  मिळवून देण्यात त्यावेळच्या स्वातंत्र्यसैनिकांनी खंबीरपणे जबाबदारी पार पाडली, म्हणून आज तुम्ही-आम्ही ही स्वातंत्र्याची फळं चाखत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी  हैद्राबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले.  मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो थोर  व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी  झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्युलाही कवटाळले. जात, धर्म विरहित अनेक समूहांनी आपल्या प्राणांची त्यासाठी बाजी लावली.  अनेकांनी आपले प्राण अर्पण केले. या  शूरवीरांना विनम्र अभिवादन.


श्री. सत्तार पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह संपूर्ण जालना जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने काल  छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत  अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले. मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46  हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. जालना जिल्हयाच्या प्रगतीसाठीही अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  जालना जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई शेळके यांचे धोपटेश्वरे येथे स्मारक उभारण्यासाठी रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण या वर्षी करण्यात येणार आहे.  याशिवाय जालना आयटीआयमध्ये महत्त्वाचे इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाला असून यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सेंटरमुळे शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या नवसंकल्पनांना मूर्त रुप येण्यास मदत होणार आहे. अंबड येथील मत्स्योदरीदेवी संस्थानाच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.  जालना शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 35 एमएलडी क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र आणि 15 एमएलडी क्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्रासाठी रुपये 56 कोटीचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.  तर जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेकरीता 47 कोटी 98 लाख निधीची तरतुद करण्यात येणार आहे. अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्पासाठी  16 कोटी 56 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परतूर येथे शेतकरी एमआयडीसीसाठी 25 कोटी देण्यात येणार आहे. तर  जलसंपदासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे  जिल्हयाला  सिंचनाकरीता मोठा फायदा होणार आहे. अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसाठीही भरीव तरतूद करण्यात येणार आहे.  जालना जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.


कार्यक्रमाच्या शेवटी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह त्यांच्या वारसांची श्री. सत्तार यांनी भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांचा यथोचित सत्कार केला. यानंतर टाऊन हॉल परिसरात महानगरपालिकेच्यावतीने ‘मेरी माटी, मेरा देश’ अंतर्गत भव्य अमृत कलश यात्रा चित्ररथाचे श्री. सत्तार यांच्या  हस्ते उदघाटन करण्यात आले.

ताज्या बातम्या

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपखल वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...

विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या विकासाचे प्रतिबिंब दिसावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दि. १२ (जिमाका): पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सबलीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे...

बिहारमध्ये ८०.११ टक्के मतदारांनी भरले नावनोंदणी फॉर्म

0
मुंबई, दि  १२ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमधील जवळपास सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून, आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६ कोटी...

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
देशाच्या स्वावलंबन व सामरिक सज्जतेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे नागपूर, दि. १२ : भारत आज जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारा देश म्हणून पुढे...

शिवतीर्थावर शिवभक्त, शिवप्रेमींचा जल्लोष

0
सातारा दि. १२ (जिमाका):  छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील...