रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 115

पीएम जनमन व धरती आबा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके

जिल्ह्यात एकही पात्र आदिवासी कुटुंब वंचित राहू नये; प्रलंबित विहीर अधिग्रहनाचे पैसे सातडीने द्या

यवतमाळ, दि. 16 (जिमाका) : आदिवासी व आदिम जमातींमधील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने पीएम जनमन व धरती आबा या योजना सुरु केल्या आहे. या दोन्ही अतिशय चांगल्या योजना असून जिल्ह्यात या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करा. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे डॉ.वुईके यांनी प्रधानमंत्री जनमन, धरती आबा, शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती मागील वर्षाचा खर्च, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, पाणी टंचाई व आगामी 150 दिवसांचा सुधारणा कार्यक्रम आदी विविध विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

बैठकीला आ.राजू तोडसाम, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पीएम जनमन या योजनेत 13 विभागांचा सहभाग आहे. या विभागांच्या योजना प्राथम्याने आदिवासी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहे. धरती आबा योजनेंतर्गत देखील आदिवासी लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवायच्या आहे. जिल्ह्यात या दोनही योजनेचे उत्तम काम झाले पाहिजे. मी स्वत: आदिवासी विकास विभागाचा मंत्री असल्याने या योजनांचे जिल्ह्यात अधिक जास्त काम होणे आवश्यक आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, समित्यांना तेंदुपत्ता संकलन निधी, एकत्र असलेली आदिवासी गावे वेगळी करून स्वतंत्र ग्रामपंचायती निर्माण करणे आदींबाबत डॉ.वुईके यांनी निर्देश दिले.

शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमात जिल्ह्याने चांगले काम केले परंतू अधिक चांगले काम होऊन राज्यस्तरावर जिल्ह्याचा गौरव झाला पाहिजे. येत्या काही दिवसात शासन 150 दिवस सुधारणा कार्यक्रम राबवित आहे. त्यात चांगली कामगिरी होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जिल्हा वार्षिक योजना व खनिज प्रतिष्ठानची कामे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करा, कामांची त्यांना माहिती द्या, विभागांनी लोकप्रतिनिधींच्या संपर्कात रहावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा घेतांना त्यांनी सद्या सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. जिल्ह्यात 4 कोटी 31 लक्ष रुपयांचा आराखडा राबविण्यात येत असून 468 गावांमध्ये 539 टंचाईची कामे प्रस्तावित आहे. सद्या जिल्ह्यात 34 टॅंकरने पाणी पुरवठा सुरु आहे. 189 विहीरी तर 31 बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. विहीर अधिग्रहणाचे प्रलंबित पैसे तातडीने वितरीत करण्याचे निर्देश डॉ.वुईके यांनी दिले.

यावेळी आ.राजू तोडसाम व आ.किसन वानखेडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना डॉ.वुईके यांनी केल्या. संबंधित विभाग प्रमुखांनी आपआपल्या विभागाची माहिती सादर केली.

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि.16 (जिमाका)- पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज कोसळून जीवित आणि वित्तहानी होते, ही हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा, असे निर्देश  विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज जिल्हा प्रशासनास दिले.

सुभेदारी विश्रामगृह येथे आज डॉ. श्रीमती गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीत  अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, आरोग्य, ऊसतोड कामगार या विषयांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपोवळे, कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत, महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चीमंद्रे, शिक्षणाधिकारी प्राथमिक  जयश्री चव्हाण,महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव आदी बैठकीस उपस्थित होते.

वीज कोसळून होणारी जीवित व वित्तहानी  टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करावी. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची विशेष तरतूद करावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये लाडक्या बहिणी व त्यांच्या किमान पाच सहकाऱ्यांची  आरोग्य तपासणी करावी. महिलांना होणारे गर्भाशयाचे कर्करोग, स्तनाचे कर्करोग, रक्तक्षय व इतर आजारासंदर्भातची तपासणी होऊन त्यावर उपचार करणे शक्य होईल. त्याद्वारे जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यास मदत होईल. प्रत्येक शासकीय आरोग्य केंद्रातआरोग्य सुविधा सह औषधे यांचा साठाही उपलब्ध करून देण्याबाबतही नियोजन करावे. शाळेमध्ये ‘गुड टच बॅड टच’ सारखे उपक्रम राबवून पोलीस यंत्रणेने शाळेमध्ये निर्भय वातावरण करण्यासाठी पोलीस दीदी आणि पोलीस काका यांच्या माध्यमातून वारंवार भेटी द्यावेत. विद्यार्थ्यांमध्ये निर्भय वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यामध्ये दशसूत्री उपक्रमा अंतर्गत शाळा महाविद्यालयमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य, तांत्रिक कौशल्य, निर्भय वातावरण, यासाठी उपक्रम राबविले जात असून या उपक्रमाची माहिती यावेळी दिली . विद्यार्थ्यांना समुपदेशन, तक्रारपेटी, शाळांमध्ये तक्रार करण्यासाठी संपर्क  क्रमांक यासाठीचे उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

जिल्ह्यामधील ऊसतोड कामगारांची नोंदणी एकूण 25813 असल्याचे पंचायत विभागामार्फत सांगितले. या ऊसतोड कामगारांसाठीच्या कामगार विभाग, सामाजिक न्याय विभाग व इतर विभागाने समन्वयाने ऊसतोड कामगारांच्या शैक्षणिक,आर्थिक  विकासासाठी योजनांचा लाभ द्यावा,असे निर्देश श्रीमती गोऱ्हे यांनी दिले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे राष्ट्रीय पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

नवी दिल्ली, दि. 16 : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांच्या उत्कृष्ट कामगिरीची आणि त्यांच्या योगदानाची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित करते. वर्ष 2024 साठी विविध श्रेणींमधील पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना विविध श्रेणींमध्ये 35 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. महिला उद्योजक, अनुसूचित जाती/जमातीतील उद्योजक तसेच ईशान्येकडील राज्यांमधील ‘एमएसएमई’ उद्योजकांना विशेष तरतुदीद्वारे पुरस्कार दिले जातात. या योजनेअंतर्गत, पुरस्कारप्राप्त ‘एमएसएमईं’ना 3 लाख रुपये (प्रथम पुरस्कार), 2 लाख रुपये (द्वितीय पुरस्कार) आणि 1 लाख रुपये (तृतीय पुरस्कार) पुरस्कार रक्कम स्वरूपात दिले जातात. त्याचबरोबर  चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाते.

राष्ट्रीय पुरस्कार 2024 च्या विविध श्रेणीसाठी ‘एमएसएमई’कडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दि. 20 मे 2025 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे  (https://dashboard.msme.gov.in/na/Ent_NA_Admin/Ent_index.aspx) हे अर्ज सादर केले जाऊ शकतात. इच्छुक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारेदेखील (https://awards.gov.in/)  त्यांचे अर्ज सादर करू शकतात. याबाबतचा तपशील www.dcmsme.gov.in वर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जकर्ते यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या एमएसएमई – विकास आणि सुविधा कार्यालय (MSME – DFO) किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23063342 वर संपर्क साधावा, असे आवाहन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे.

 

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून सक्षम अधिकारी व कर्मचारी तयार होतील – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.16 मे, (विमाका) :- मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून सक्षम अधिकारी व कर्मचारी तयार झाल्याचे चित्र राज्याला निश्चितपणे पहायला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज व्यक्त केला.  सर्वसामान्य जनतेला तत्परतेने सेवा देण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नाथनगर (उत्तर) पैठण येथील मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशिक्षण व निवासस्थान इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर विकास जैन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, प्रबोधिनीचे संचालक खालिद ब.अरब व निबंधक रतनसिंग साळोक, सहायक प्राध्यापक विवेक मंडलीक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. शिरसाट म्हणाले, नाथसागर लगतच्या परिसरात असलेली ही प्रशिक्षण प्रबोधिनी मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. या प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी-कर्मचारी नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासोबतच योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतील. त्यातुन मराठवाडा प्रगतीपथाकडे जाण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना शासकीय सेवेत येणारे नवीन बदल स्वीकारण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. शासकीय सेवेत असलेल्या विविध पदावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून संवाद निर्माण होईल. तसेच प्रशिक्षणातून कामकाजात बदल होण्यासही मदत होईल. त्यामुळे प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय सेवेतील बदल स्वीकारण्यासोबतच शासनाने निश्चित केलेले प्रशिक्षण आवडीने पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले.

शासकीय सेवेत कामकाज करताना अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर ते निश्चितपणे अधिक चांगली सेवा देतील. आपल्या कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले पाहिजे. असे सांगुन पालकमंत्री श्री.शिरसाट म्हणाले, पैठण येथे कार्यरत असलेले प्रशिक्षण केंद्र राज्यातील एक चांगले प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाईल, या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी संवाद वाढवावा, तसेच पुढील कालावधीत या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सक्षम अधिकारी कर्मचारी तयार झालेले राज्याला पहायला मिळतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा शुभेच्छा संदेश असलेली चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. शुभेच्छा संदेशात बोलतांना श्रीमती सौनिक म्हणाल्या, पैठण येथील ही प्रबोधिनी केवळ एक प्रशिक्षण केंद्र न राहता एक विचार केंद्र ठरेल, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल गव्हर्नंस, सायबर सुरक्षेची जाणीव, आणि डेटा आधारित निर्णय प्रक्रियेवर विशेष भर या ठिकाणी देण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, पैठण येथील प्रशिक्षण संस्थेला 2013 मध्ये विभागीय प्रशिक्षण संस्थेचा दर्जा मिळाला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी वर्ग-२ व वर्ग-३ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही प्रशिक्षण संस्था सातत्याने प्रशिक्षण देण्याचे काम करते. प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासकीय सेवेतील पहिले प्रशिक्षण, उजळणी प्रशिक्षण व पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण अशा पातळीवर वर्षभर प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. राज्यात सहा महसूली विभागात असलेल्या प्रशिक्षण संस्थेपैकी पैठण येथील प्रशिक्षण संस्थेचे राज्यात चांगले नाव आहे. या संस्थेने 28 वर्षात 20 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.

पैठण येथील या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेले अधिकारी तसेच कर्मचारी केंद्र व राज्य शासनाच्या योजना, सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करतील असा विश्वास व्यक्त करून या प्रशिक्षणाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी करावा, असे आवाहनही श्री.गावडे यांनी केले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, पैठण येथील प्रशिक्षण प्रबोधिनी ही मराठवाड्यासाठी नामांकित प्रबोधिनी आहे. राज्य शासनाने सद्य:स्थितीत अनेक उपक्रम हाती घेतले आहे. यामध्ये 100 दिवस, 150 दिवस या उपक्रमासह माहिती अधिकार, सेवाहक्क अधिनियम कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे. पैठण येथील प्रबोधिनीमध्ये जलदगतीने पारदर्शक व संवेदनशील पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या शुभेच्छा संदेश असलेली चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मागील पालखी सोहळ्याप्रमाणे सुरक्षित, अपघात मुक्त, स्वच्छ आणि हरित वारी संपन्न करण्यासाठी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आषाढीवारी पूर्वतयारी आढावा बैठकीत ते  बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (दूरदृश्य प्रणालीद्वारे),  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे,  निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपायुक्त विजय मुळीक उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, मानाच्या पालख्यांच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करावी. वारी कालावधीत अन्न शुद्धतेची खात्री करण्यासाठी आवश्यकतेनुसार अन्न व औषध प्रशासनाकडील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि येत्या काळात अन्न भेसळ करणाऱ्याविरोधात व्यापक मोहीम राबवावी. पालखी सोहळ्यासंदर्भातील राज्यस्तरीय बैठकीपूर्वी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण करावी. इतर जिल्ह्यात किंवा विभागात बदली झालेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची सेवा घेण्याबाबत संबंधितांना विनंती करावी. सर्व अधिकाऱ्यांनी पालखी मार्गाचा संयुक्त दौरा करून व्यवस्थेबाबत परस्पर समन्वय ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

विभागीय आयुक्त पुढे  म्हणाले, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी. पालखी सोहळ्यादरम्यान आणि नंतरही स्वच्छता रहावी यासाठी आवश्यकतेनुसार स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. चंद्रभागेचे पाणी स्वच्छ राहील यासाठी आवश्यक उपाय योजावेत. नीरा नदी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. पालखी पुढे गेल्यावर मागील गावात त्वरित स्वच्छता करावी. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतांना रुग्णवाहिकेत पुरेशा प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय अधिकारी असतील याची दक्षता घ्यावी.

पालखी मार्ग खड्डे मुक्त राहतील व उत्तम वाहतूक व्यवस्थापन राहील याची काळजी घ्यावी. पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. घाट परिसरात दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तिन्ही जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील व्यवस्थेबाबत एकत्र पुस्तिका तयार करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादरणीकरणाद्वारे पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची माहिती दिली. सोहळ्यासाठी घटना प्रतिसाद प्रणाली स्थापण्यात आली आहे २५ हजार ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सोहळ्यादरम्यान १ हजार ८६० स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. पालखी मार्गावर पाणी, विद्युत, आरोग्य, गॅस सिलेंडर, स्वच्छता आदी सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. महिलांसाठी विशेष सुविधा करण्यात येत आहेत. वारीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. गर्दी व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याबाबत चाचणी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील व सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी जिल्ह्यातील तयारीची माहिती दिली. बैठकीला पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय

मुंबई दि १६ – खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून अभुतपूर्व विजय मिळविला आहे. या ऐतिहासिक यशाचे मानकरी असलेल्या विजेत्यांचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अभिनंदन केले.

बिहार येथे ४ ते १५ मे दरम्यान पार पडलेल्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण १५८ पदकांसह ५८ सुवर्ण, ४७ रौप्य व ५३ कांस्य  पदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. तिरंदाजी, मल्लखांब, जलतरण, कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, अॅथलेटिक्स अशा २६ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल क्रीडा मंत्री भरणे यांनी खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

ही कामगिरी म्हणजे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संघटनांचे योगदान आणि पालकांचे प्रोत्साहन यांचे फलित आहे. राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून मी सर्व खेळाडूंना, प्रशिक्षकांना आणि पालकांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

००००००

 

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

मुंबई, दि. १६:- ‘भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदविणे अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

‘ग्रामीण भागांतून येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘खेलो इंडिया स्पर्धा’ 2018 पासून सुरू झाली. या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राने पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरणे ही बाब आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेची चुणूक दाखवणारी आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

00000

 

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १५: मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या खेळाचे साहित्य क्रीडापटूंना उपलब्ध करून त्यांना सुविधा पुरविल्या जाव्यात, अशा सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

तालुका क्रीडा संकुल, श्रीवर्धन मतदार संघातील प्रलंबित तलाठी कार्यालय, इंदापूर येथे प्रस्तावित एमआयडीसी, एसएनडीटी कॉलेज वाडघर यासंदर्भात मंत्रालयात नुकतेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, मौजे धाटव येथे जे खेळाडू मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना संबंधित खेळाचे साहित्य व सुविधा उपलब्ध करून द्या. खो –खो व कबड्डी मैदानावर गोलाकार पत्राशेड व इतर कामे, बसण्यासाठी स्टेप्स, चेंजिंग रूम, पाण्याचा निचरा होण्यासाठी सोय, भूमिगत पाण्याचा टँक बांधण्याची कामे जलगतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तालुका क्रीडा संकूल म्हसळा, रोहा, माणगाव येथील कामाचा आढावा घेतला.

श्रीवर्धन येथील तलाठी कार्यालयाच्या कामास मंजूरी असून, अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी मंत्री तटकरे यांनी दिले. तसेच इंदापूर येथे प्रस्तावित एमआयडीसी, एसएनडीटी कॉलेज वाडघर यासंदर्भातील कामाचा आढावाही यावेळी मंत्री तटकरे यांनी घेतला.

यावेळी माणगाव तहसीलदार दशरथ काळे, किशोर देशमुख, महेंद्र वाकलीकर यांचे औद्योगिक विकास महामंडळाचे सहकार्यकारी अधिकारी कुणाल खेमराज यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १५: माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी घेण्यात यावी. या परिसरात सुशोभीकरण व पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

माणगांव नगरपंचायत हद्दीत काळनदी परिसर पुनर्जीवन जिर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा नुकताच मंत्रालयात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी जलजीवन, खरीप हंगाम यासंदर्भातील कामांचा आढावा मंत्री आदिती तटकरे यांनी घेतला.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, माणगांव नगरपंचायत क्षेत्रातील रस्ते दुरूस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. दलित वस्तीत लागू योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. नगरपंचायत, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीचे बांधकाम, डागडुजीची कामे तात्काळ करण्यात यावी. या परिसरातील वनहक्क परिसरातील आदिवासींच्या मुलभूत गरजांसाठी स्वच्छतागृह, रस्ते, पाणी पुरवठा, पथदिवे, विद्युत वाहिनी, दूरसंचार शाखा, शाळा बांधण्यासाठी परवानगी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे नागरिकांच्या मुलभूत गरजांसाठीचे बांधकाम करण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जलजीवन आराखड्यासंदर्भात श्रीवर्धन येथे पूर्ण झालेल्या ३४ कामांचा अहवाल तातडीने सादर करावा, जिथे जलस्त्रोत नाही तिथे ही कामे यशस्वी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. याक्षेत्रात जलजीवनच्या पुढच्या टप्प्यात पाणी संवर्धनासाठी बंधाऱ्याची कामे प्रस्तावित करण्याच्या सूचना यावेळी मंत्री तटकरे यांनी यावेळी दिल्या.

खरीप हंगामातील माणगांव, रोहा, तळा, पाली येथील पिकांबाबत आढावा बैठक यावेळी घेण्यात आली. यावेळी जुन्या आंबा बागेमध्ये काळीमिरी आंतरपीक लागवड वाढवावी . तसेच महिलांचे क्लस्टर गट तयार करून कृषी पूरक उद्योग करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी यावेळी दिले.

यावेळी माणगाव नगरपंचायत संदर्भात उपनगराध्यक्ष हर्षदा काळे, नगरसेवक आनंद यादव, नितीन वाढवळ, रत्नाकर उभारे, लक्ष्मी जाधव, सागर मुंडे, सुमित काळे, मनोज पवार यांच्याबरोबर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.

जलजीवन योजनेसंदर्भात कार्यकारी अभियंता संजय वेणर्तेकर, उपअभियंता प्रशांत म्हात्रे, एकनाथ कोठेकर तर खरीप हंगामातील पिकांसंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खडकाळे, शुभम बोऱ्हाडे, कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंटसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १५ : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा. केळी संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या कल्स्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. केळी उत्पादक जमिनींची सुपिकता कायम रहावी, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात केळी संशोधन, तंत्रज्ञान प्रसार केंद्र व केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत मंत्रालय येथे बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आमदार अमोल जावळे, फलोत्पादन संचालक डॉ. के. पी. मोते, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, उद्यानवेत्ता केळी संशोधन केंद्राचे डॉ. अरुण भोसले उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी आयुक्तालयाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी नियोजन करावे. केळी पिकांवर येणाऱ्या रोगाबाबत शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, कोणती औषधे वापरावीत याची माहिती शेतकऱ्यांना पोहोचवावी. तसेच शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण संशोधन व त्याची माहिती प्रभावीपणे पोहाचवून केळी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. केळीची रोपे लावणे ते निर्यातीपर्यंत शेतकऱ्यांना माहिती पोहोचवावी. केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना व निधीची तरतूद वाढवावी, असे मंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

आमदार अमोल जावळे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि उपाययोजना विषयक चर्चा केली.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...