गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 762

दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये १३३३ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

मुंबई, दि. १५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी च्या पाचव्या टप्प्याच्या तयारीच्या अनुषंगाने निवडणूक विषयक अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली 153- दहिसर विधानसभा मतदारसंघात पार पडले. या दोन दिवसीय प्रशिक्षणात 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

येत्या 20 मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी चारही लोकसभा मतदार संघांतर्गत मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील दहिसर विधानसभा मतदारसंघात क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हे प्रशिक्षण या अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले. हे प्रशिक्षण दहिसर पश्चिम येथील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले.

प्रशिक्षण सत्राचा उद्देश मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना निवडणुकीसंबंधित आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करून निवडणुकांचे निर्विघ्न आणि विनाविलंब संचालन सुनिश्चित करणे हे होते. प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रिया, मतदार पडताळणी, मतदार व्यवस्थापन, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट  मशीनचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि संकट व्यवस्थापन इत्यादी विषय अंतर्भूत होते. दिनांक 14 आणि 15 मे या 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण 1333 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

अधिकाऱ्यांना प्रशिक्षणामार्फत प्रदान केलेल्या ज्ञानाचे कितपत आकलन झाले हे ऑनलाईन परीक्षेद्वारे पडताळण्यात आले. या प्रशिक्षणासाठी उपस्थितांनी सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना निवडणूक व्यवस्थापनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली.

 

मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५४३ ज्येष्ठ नागरिक व ९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले, टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते. ३०-मुंबई दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात अर्ज केलेल्या ३१० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेत टपाली मतपत्रिकेद्वारे घरून मतदान केले. ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात २३३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सुविधेचा लाभ घेत घरून मतदान केले आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवार (दि.१४ मे) पासून गृह मतदानास प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय २ टीमची नियुक्ती केली आहे. ही टीम मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहे.

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात ७७३ ज्येष्ठ नागरिक व ४८ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली असून ३०-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ६०४ ज्येष्ठ नागरिक व २९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती श्री. यादव यांनी दिली.

मुंबई शहरात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत १९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सोमवार, १४ मे पासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी १९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील १३७३ कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले.

तर ३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ६०१ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला. १६ मे, २०२४ पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.

टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित कर्मचारी यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे स्वागत

मुंबई, दि. १५ : त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकचे पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांचे आज भारताच्या दौऱ्यावर मुंबईत आगमन झाले.  पंतप्रधान डॉ. रॉली व त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांचे ओबेरॉय हॉटेल येथे राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव मिलींद हरदास यांनी स्वागत केले. यावेळी पारंपरिक वेशभूषेत सांस्कृतिक  पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासमवेत आलेल्या शिष्टमंडळात त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे परिवहन मंत्री रोहन सिनानन, क्रीडा व समुदाय विकास मंत्री शामफा कुडजो लेविस, भारतातील उच्चायुक्त डॉ. रॉजर गोपॉल आदींचा समावेश आहे.

००००

दिव्यांग मतदारांसाठी विनामूल्य वाहन व्यवस्था; मतदारसंघनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई, दि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय मोफत प्रवासासाठी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ८५ वयावरील असलेले ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघानिहाय दिव्यांग मतदार समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

समन्वयक अधिकाऱ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
१५२ बोरीवली- कृतिका गंधारे- ९८३३४४०४२३,
१५३ दहिसर- वंदना हरीनामे- ९८२०११८४५७
१५४ मागठाणे- दिलिप दुर्गे-८७७५७२२४६० / स्मिता परमार- ९८२०४५७३२७
१५५ मुलुंड- राजाराम शेळके-९६५३१५८०७८ / कैलास जाधव- ९५६१४५८७९४
१५६ विक्रोळी- सुनिल पावळे-७२७६००९१४७ / सुप्रिया मोरे- ९८९२६६९५३०
१५७ भांडुप- निखिल मराठे- ८८८८८२४९५० / नम्रता कुलकर्णी – ७७३८३७६५७३
१५८ जोगेश्वरी- नुतन वंजारा- ९१६७१६६४१२ / स्मिता परब- ९८१९३६८८२७
१५९ दिंडोशी- प्रमोद पाटील-९८६९७२८१०० / योगेंद्र वसंत भांड-८०८७५००८९७
१६० कांदिवली- राजेंद्र माळवे-९९७०२३४९०९ / बिपीन वडे – ९०४९३६५०१८
१६१ चारकोप- रेखा गांगुडे – ९८२०९११२९०
१६२ मालाड- अर्चना लाळगे- ९९६९७९५०७८
१६३ गोरेगाव-  मंजू वैश्य-८३६९३०६८६० / साक्षी लाड- ९८३३३१७२१२
१६४ वसोवा- बालाजी कांबळे- ९९६०२८३१३१ / राजेश्री सदावर्ते- ७०५८७०६७८७
१६५ अंधेरी प- सचिन कटके- ८६२३९५२२८६ / अर्चना जाधव- ९९३०९९०७८९
१६६ अंधेरी पूर्व- सुनिता चव्हाण- ७९७७७६३४८७
१६७ विलेपार्ले- गोविंद पेडेकर- ९३२१९८२८०६
१६८ चांदिवली- बालाजी जानते-९८६९५६१७५६, ९७०२९५३८१५ / उज्वला चव्हाण- ९९६९३५०७६७
१६९ घाटकोपर (पश्चिम)- माधवी सावरकर- ८८५००७६६८२ / अश्विनी पळशीकर- ९८१९९३७८३७
१७० घाटकोपर (पूर्व)- प्रफुल्ला पुरबिया-९९१९७४८४५५ / संजीवनी पाटील- ७२०८०१८०४६
१७१ मानखुर्द- बाळू खोमणे- ९८९००००९०५  / सुरेश चव्हाण- ९२२१७७६९६१
१७२ अणुशक्ती- रेखा भोजने- ९८२०५८९७६१ / सुनिल आडे- ९८३३०२४९७६
१७३ चेंबुर- रश्मी तावडे- ९६१९८९७८९८  / सुनिता चिंदरकर- ९८२१४३४४६८
१७४ कुर्ला- संजू सोनावणे- ८९७६२३१९९० /  प्रशांत गर्गे – ९५२७०७६५६३
१७५ कलिना- सोमनाथ मठपती- ९८७२६५९६१९, ८०८७१०२९३२ / दौलतसिंग चव्हाण- ९८६ ०८७१५४६
१७६ बांद्रा (पूर्व)- सुभाष गढरी- ९८६९९४४४०५ / निलेश वांळूज- ९८९०३४२७६०
१७७ बांद्रा (पश्चिम)- अनिता ताटे- ९९६९००६७२४/ मिलिंद पांजरी- ८८०५७६८९२४

०००

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

मुंबई  दि. १५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात २० मे  रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विक्रोळी येथील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी १४ मे पासून टपाली मतदान सुरू झाले आहे. दोन दिवसात ७७० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केले असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर यांनी दिली .

गुरुवार १६ मे  रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी टपाली मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दातकर यांनी केले आहे.

विक्रोळी पूर्व येथील फिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृहातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान प्रक्रिया सुरू आहे. यासाठी मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील जास्तीत जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी  मतदान करावे. त्यांच्या सुविधेसाठी विक्रोळी येथील कार्यालयात मतदान केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच ओळखपत्रांची तपासणी करण्यासाठी व आलेल्या मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी सांगितले .

०००

 

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १५: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार 20 मे 2024 रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व  तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभेचे 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण सात हजार 384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाची तयारी पूर्णत्वास आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदारसंघात एकूण 7384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 40 लाख 02 हजार 749 पुरुष, 34 लाख 44 हजार 819 महिला, तर 815 तृतीयपंथी असे एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यामध्ये 26- मुंबई उत्तर मतदारसंघात विधानसभेचे बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली (पूर्व), चारकोप, मालाड (पश्चिम) या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 1702 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 68 हजार 983 पुरुष, 8 लाख 42 हजार 546 महिला, तर 443 तृतीयपंथी असे एकूण 18 लाख 11 हजार 942 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात विधानसभेचे जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात  1753 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 38 हजार 365 पुरूष मतदार तसेच 7 लाख 96 हजार 663 महिला मतदार तर 60 तृतीयपंथी असे एकुण 17 लाख 35 हजार 088 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

28- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघात विधानसभेचे मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व तसेच मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1682 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 8 लाख 77 हजार 855 पुरूष मतदार तसेच 7 लाख 58 हजार 799 महिला मतदार तर 236 तृतीयपंथी असे एकूण 16 लाख 36 हजार 890 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात विधानसभेचे विलेपार्ले, चांदीवली, कुर्ला एससी, कलीना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1698 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 41 हजार 288 पूरूष मतदार तसेच 8 लाख 2 हजार 775 महिला मतदार तर 65 तृतीयपंथी असे एकूण 17 लाख 44 हजार 128 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

30 मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात अणुशक्ती नगर आणि चेंबुर या मतदारसंघात 549 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 2 लाख 76 हजार 258 पुरूष मतदार तसेच 2 लाख 44 हजार 036 महिला मतदार तर 41 तृतीयपंथी असे एकूण 5 लाख 20 हजार 335 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

०००

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा

 सांगली दि.१४ (जिमाका) : टंचाई परिस्थिती उद्भवलेल्या भागातील जनतेला पिण्याचे पाणी  उपलब्ध करून देण्यास  प्राधान्य द्यावे, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी  जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठकीत दिल्या.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपयुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले, जलसंपदा  विभागाने धरणातील पाणीसाठा  व उपसा सिंचन योजना मधील पाण्याचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून उपलब्ध पाण्याचे स्त्रोत निश्चित करावेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरणाद्वरे जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती माहिती दिली. जिल्ह्यात सद्यस्थितीत ९८ टँकर सुरू असून यामध्ये जत तालुक्यात 86,  आटपाडी 11 आणि एक टँकर शिराळा तालुक्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासन निकषानुसार दुष्काळ परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या आठ उपाय योजना लागू करण्यात आल्याची माहिती देवून जिल्ह्यात सद्यस्थितीत आवश्यक चारा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

०००

माझी वसुंधरा अभियानाचा  विभागीय आयुक्तांकडून आढावा

जिल्ह्यात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवा  – पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली दि. १४ (जिमाका) : गावे व शहरे स्वच्छ व्हावीत, लोकांना स्वच्छतेची सवय जडावी, नागरिकांनी स्वच्छतेची जीवन पध्दती अंगीकारावी यासाठी जिल्ह्यात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी माझी वसुंधरा अभियानातील कामांचा आढावा घेतला.  बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपयुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

डॉ.  पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना स्वच्छतेची सवय लागणे महत्वाचे आहे. स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षण व संवर्धन होते. माझी वसुंधरा अभियानात भूमि, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पाच घटकांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम होत आहे. यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेवून आपला भाग स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी शालेय विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावतो. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा संदेश पोहचवावा.         स्वच्छतेसाठी ग्रामस्तरापर्यंत मजबूत टीम असावी. तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी स्वच्छतेसंदर्भात नियमित बैठका घ्याव्यात. जिल्हास्तरावरून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी जिल्ह्यात त्यांच्या विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

०००

 

०००

 

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

Ø  जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा

Ø  मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. १४ : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. बाधित गावांत तसेच दुर्गम गावांत तात्काळ मदत पोहोचण्याच्यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी सर्व स्तरावरील संपर्क यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून महसूल व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाचे सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सून पूर्व तयारीबाबत आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख आदी बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे व पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटतो. त्यादृष्टीने बाधितांसाठी उंच ठिकाणी निवारा, भोजन व्यवस्था तसेच धान्य, औषधसाठा आदी सामुग्रींची तजवीज आधीच करून ठेवावी. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने प्रभावी नियोजन करावे. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष 24×7 नेहमी कार्यान्वित ठेवावीत. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात.

त्या पुढे म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. ब्रिटीशकालीन तलावांच्या नियंत्रणाबाबत जिल्हा परिषद प्रशासन व जलसंधारण विभागाने जाणीवपूर्वक कार्यवाही करावी. नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. धरणातील जलसाठ्यांच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे. तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोलरूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, विज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, जिल्ह्यातील मुख्य नद्या व नदीकाठावरील गावे, पूराचा धोका असणारी गावे, हवामानाचा अंदाज वर्तविणारी केंद्र, शोध व बचाव पथके, कुशल मनुष्यबळ, प्रथमोपचार किट, औषधींचा साठा, जिल्हा नियंत्रण कक्ष, पूर नियंत्रण यंत्रणा, प्रकल्पातून होणारा पाण्याचा विसर्ग, बांधितांसाठी अन्न, भोजन, निवारा, औषधींचा साठा आदी बाबींसंदर्भात डॉ. पाण्डेय यांनी सविस्तर आढावा घेतला. तसेच आगामी खरिप हंगामाबाबत व मान्सूनपूर्व तयारी संबंधी कृषी विभागाने केलेले नियोजन याबाबतही त्यांनी आढावा बैठकीत घेतला.

नैसर्गिक आपत्ती काळातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक

* राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक(NDRF), पुणे – 02114-231509

* आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई – 22-22025274/022-22837259

* नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई – 022-22027990/022-22026712

* राज्य राखीव पोलीस दल, नागपूर – 0712-2564973-2560543

* नियंत्रण कक्ष पोलीस विभाग – 100

* विभागीय आपत्ती व्यवस्थापन, अमरावती – 0721-2661364/मो. न.9860011324

* जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती  – 0721-2662025

* आपत्कालीन टोल फ्री क्रमांक – 1077

* अग्निशामक विभाग (मनपा) – 101, 0721-2576423

०००

ठाणे रेल्वे स्थानकावर राबविण्यात आलेल्या मतदार जनजागृतीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे,दि. १४ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग घ्यावा व मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे अशी जनजागृती आज ठाणे रेल्वेस्थानकावरील प्रवासी मतदारांमध्ये करण्यात आली.

२५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज (१४ मे) ठाणे  रेल्वे स्टेशन परिसरात मतदार साक्षरता अभियान राबविण्यात आले. यावेळी १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ स्वीप पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला. रेल्वे स्टेशनवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात युवावर्ग,स्त्री -पुरुष ,दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता.

ठाणे शहरात २० मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व पात्र मतदारांना मतदान करण्याचे आणि लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन स्वीप पथकाने केले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिक हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रावर कोणताही त्रास होवू नये यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे त्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही शंका, स्पष्टीकरण आणि तक्रारींसाठी नागरिक 1950 वर कॉल करून आपल्या शंकाचे निरसन करु शकतात असेही यावेळी सांगण्यात आले.

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन करीत उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ देण्यात आली.

०००

 

ठाणे शहरात झालेल्या गृह मतदानास ८५ वर्षावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे,दि. १४ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे 2024 रोजी  लोकसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही याची खबरदारी देखील प्रशासनाने घेतली आहे. 85 वर्षांवरील जे नागरिक व दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रापर्यत पोहचू शकत नाही अशांसाठी आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या गृहमतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 105 मतदारांपैकी 96 मतदारांनी मतदानाचा आज गृहमतदान केले.

25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या  सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गृहमतदानासाठी विविध भागातील नागरिकांकडे जाण्यासाठी एकूण 11 पथके तयार करण्यात आली होती. एका पथकात मतदान अधिकाऱी, मदतनीस कर्मचारी, पोलीस कर्मचारी व शिपाई  व राजकीय उमेदवारांचे प्रतिनिधीं यांचा समावेश करण्यात आला होता. 11 पथके 148 विधानसभा मतदारसंघातील विविध भागातून गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी रवाना करण्यात आली असल्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांनी नमूद केले.

148 ठाणे विधानसभा मतदारसंघातील विविध भागातील 85 वर्षावरील एकूण 103 तर 2 दिव्यांग अशा एकूण 105 मतदारांनी  गृहमतदानासाठी  निवडणूक विभागाकडे अर्ज भरुन दिले होते. या सर्व मतदारांच्या घरी आज प्रशासनाच्या वतीने पथके पाठविण्यात आली होती. नागरिकांनीही गृहमतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा असा संदेश नागरिकांना दिला. नोंदणी केलेल्या 105  मतदारांपैकी एकूण 96 जणांनी गृहमतदानाचा अधिकार बजावला. तसेच निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

०००

 

ताज्या बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी

0
ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा करणार - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १७ : मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई

0
मुंबई , दि. १७ : मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही...

ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
मुंबई, दि. १७ : ठाणे जिल्ह्यातील अंजूरगाव व आलीमघर खाडीमध्ये अवैध हातभट्टी केंद्र नष्ट करण्यासाठी हातभट्टी केंद्रावर धाडसत्र राबवून धडक कारवाई करण्यात आली. पावसाचा...

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

0
मुंबई, दि. १६:  भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...

नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे...