शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 629

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरु राहणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

पात्र महिलांची नाव नोंदणी केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव; अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगटातील महिलांचा सन्मान

लातूर, दि. 16 : राज्य शासनाने गरजू महिला-भगिनींना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी अशीच सुरु राहणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आज सांगितले. तसेच योजनेबाबत पसरविण्यात येणाऱ्या गैरसमजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची नावनोंदणी करणारे अधिकारी, यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या उदगीर, जळकोट तालुक्यातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बचतगटातील महिला आदी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्यानिमित्त उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील शिवम फंक्शन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात ना. बनसोडे बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उदगीरचे गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जळकोटचे गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका, आशा कार्यकर्ती, महिला बचतगटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि सदस्य महिलांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील पात्र महिलांची मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी झाली आहे. त्यामुळे नाव नोंदणीसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाची दखल घेवून त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले.

पात्र महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यावरही लवकरच लाभाची रक्कम जमा होणार आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या काही महिलांच्या अर्जात त्रुटी असल्याने ते अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले आहेत. तसेच काही महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडले नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा महिलांनी लवकरात लवकर आपल्या अर्जातील त्रुटींची दुरुस्ती करावी. ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार जोडलेले नाही, अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा, असे आवाहन ना. बनसोडे यांनी केले.

उदगीर येथे एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून याठिकाणी मोठे उद्योग सुरु होवून युवकांसाठी रोजगार उपलब्ध होतील. तसेच तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाचे काम गेल्या पाच वर्षात करण्यात आले आहे. रस्त्याच्या विकासामुळे दळणवळण सुविधा गतिमान झाल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी ना. बनसोडे यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रकम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याबद्दल आभार मानले. ना. बनसोडे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचतगटाच्या सीआरपी, अध्यक्ष आणि सदस्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी, अधिकारी आणि महिलांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

चिखलदरा पर्यटनस्थळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार  -पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील

आमझरी पर्यटन संकुलला भेट व साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी संवाद

अमरावती, दि. 16 : महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदरा या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणाचे पर्यटनाच्या दृष्टीने देशभरात नावलौकिक व्हावा तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा नियोजन योजना व सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन देणार, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील ‘आमझरी निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’ला पालकमंत्र्यांनी आज भेट ‍देऊन साहसी खेळ चालविणाऱ्या युवक व युवतींशी रोजगार, कामकाज व साहसी खेळ प्रशिक्षणाबाबत चर्चा केली.‍ त्याप्रसंगी ते बोलत होते.

माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) श्री. लुनावत, वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील ‍म्हणाले की, आमझरी येथील निसर्ग  पर्यटन संकुलात स्थानिक 20 युवक-युवतीव्दारे साहसी खेळ चालविण्यात येत असून त्यांना साधारणतः 10 हजार रुपये मानधन दिल्या जाते. अशाच पध्दतीने स्थानिकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. त्यासाठी नैसर्गिक संसाधनाच्या माध्यमातून येथे उत्पादीत होणारे विशेष उत्पादन, तृणधान्य, खपली गहू, मध, खवा, मोहफुलावर प्रक्रीया करुन उत्पादन निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात यावे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ‍ निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आमझरी हे गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मधापासून निर्माण होणारे विविध उत्पादन तयार करुन विपणन केंद्र निर्माण करण्यात यावे. या अशा अनेक उपक्रमांमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन मेळघाटातील ग्रामीण क्षेत्राचा विकास साधला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खटकाली येथील प्रकाश जाम्भेकर यांच्या  ‘प्रकाश होम स्टे’ ला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. होम स्टे ला येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास, भोजन व्यवस्था आदी संदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली. तेथील कॉफी प्रकल्प व उत्पादनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी शहापूर येथील खादी व ग्रामोद्योग आयोगाव्दारे पुरस्कृत शिवस्फुर्ती प्रक्रीया फाउंडेशनला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली.

पालकमंत्र्यांची चिखलदरा ग्रामीण रुग्णालयास भेट

दरम्यान यावेळी पालकमत्र्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देवून वैद्यकीय सोयी- सुविधांचा आढावा घेतला. हतरु गावात आलेल्या कॉलरा साथीच्या रुग्णांच्या प्रकृती विषयी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

चिखलदरा तालुक्यातील हतरु येथे काही दिवसापूर्वी कॉलराची साथ पसरली होती. त्यावर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत, गावातील रुग्णांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात भरती करुन उपचार सुरु केले होते. भरती झालेल्या रुग्णांपैकी दहा रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित रुग्णांची प्रकृती  स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यांनी यावेळी दिली.

तालुकास्तरीय क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

जिल्हा क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

अमरावती, दि. 16 (जिमाका): अमरावती जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीचा जुना वारसा आहे. येथील जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील शंभर वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करीत आहे. हजारो क्रीडा शिक्षक व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू या भूमीत निर्माण झाले आहे. येथील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले आहे. जिल्हास्तराप्रमाणे ग्रामीण भागातील मुला-मुलींनाही तालुकास्तरावरच क्रीडा सुविधा मिळाल्यास विद्यार्थी लहान वयापासूनच या क्षेत्राकडे वळतील. व आपसुकच युवा पिढीचे आरोग्यही सुधारेल. तालुकास्तरीय क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरविणार असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासमोरील नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलाचे लोकार्पण व विविध क्रीडा सुविधांचे भुमीपूजन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुलभा खोडके, आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष जिल्हा क्रीडा संकुल समिती सौरभ कटियार, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाचे विजय संतान, राज्य धर्नुविद्या संघटनेचे अध्यक्ष ॲङ प्रशांत देशपांडे, सचिव अमर राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आज जिल्हा क्रीडा संकुल लोकार्पण होत असतांना आनंद होतो की, संकुलाच्या 28 हजार चौ. मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्चरी रेंज, स्क्वॅश कोर्ट, आधुनिक जीम, कब्बड्डी, ज्युदो, कुस्ती, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा सुविधा 11 कोटी निधीमधून निर्माण झालेले आहे. त्या लवकरच खेळाडूंसाठी खुल्या करण्यात येतील. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुलाचे अनुदान मर्यादा 1 कोटीवरुन 5 कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी 8 कोटीवरुन 25 कोटी तर विभागीय क्रीडा संकुलासाठी 24 कोटीवरुन 50 कोटी वाढविण्यात आलेली आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. अमरावती जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संकुलातून निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका, जिल्हा व विभागाच्या ठिकाणी महाराष्ट्र स्पोर्ट्स, महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अमरावती येथे जिल्हा क्रीडा संकुलासाठी 9 एकर शासकीय जागेत 14.32 कोटी रुपये प्राप्त निधीमधून जिल्हा क्रीडा संकुलामध्ये प्रशासकीय इमारत, इनडोअर हॉल, धनुर्विद्या रेंज, प्रेक्षक गॅलरी, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, विद्युतीकरण व जनरेटर इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे. ही सर्व कामे कमी वेळेमध्ये करण्यात आली असून उच्चदर्जाची व सुबक आखणी करुन या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा क्रीडा संकुलामध्ये विविध क्रीडा सुविधांचा विद्युत वापर कमी करण्यासाठी संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलात सोलर सिस्टम बसविणे व हायमास फ्लड लाईट लावणे या कामास 50 लक्ष खर्च अपेक्षित आहे. ही कामे महाउर्जा विकास अधिकारण या यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या धर्तीवर तालुका पातळीवर सर्व क्रीडा सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करुन देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

क्रीडा प्रोत्साहपर निधीचे वितरण

राज्य शासनाच्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अमरावती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावतीमार्फत तालुका, जिल्हा , विभाग, राज्य, राष्ट्रीयस्तर या क्रमाने विविध 93 खेळांच्या 14, 17, 19 या वयोगटातील मुले, मुली यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यादृष्टीने प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येते. अनुदानाचे स्वरूप म्हणून प्रमाणपत्र व तीनही वयोगटात प्रथम, व्दितीय, तृतीय  प्राविण्यानुसार अनुक्रमे एकूण 9 शाळांना, संस्थांना रू. 1 लाख, 75 हजार, 50 हजार रूपये देण्यात येते.

यानुसार 14 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत ज्ञानमाता हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तोमई प्रायमरी इंग्लिश स्कुलचा व्दितीय क्रमांक असून त्यांना 75 हजार रुपयांचे पारितोषिक तर स्कुल ऑॅफ स्कॉलर्स शाळेला तृतीय क्रमांक‍ मिळाला असून त्यांना 50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तसेच 17 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत ज्ञानमाता हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गणेशदास राठी विद्यालयाचा व्दितीय क्रमांक असून त्यांना 75 हजार रुपयांचे पारितोषिक तर स्कुल ऑॅफ स्कॉलर्स शाळेला तृतीय क्रमांक‍ मिळाला असून त्यांना 50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे 19 वर्षीय मुले व मुली या वयोगटांतर्गत विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला असून 1 लक्ष रुपयांचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. गणेशदास राठी विद्यालयाला व्दितीय क्रमांक असून त्यांना 75 हजार रुपयांचे पारितोषिक तर रामकृष्ण क्रीडा विद्यालयाला तृतीय क्रमांक‍ मिळाला असून त्यांना 50 हजार रुपये निधीचे अनुदान स्वरुप रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आर्चेरी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध मोहोड (क्रीडा प्रबोधिनी खेळाडू) ज्युनि.वर्ल्ड चॉम्पियनशिप व एशियन कप यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सन 2024-25 मध्ये नाविण्यपूर्ण योजनेतून इनडोअर हॉलला ॲक्वास्टिक ट्रिटमेंट करणे सिंथेटिक्स फ्लोअर असलेली स्केटिंग रिंग, बास्केटबॉल कोर्ट, बॉक्स क्रीकेट या क्रीडा सुविधा विकसित करुन खेळाडूंना उपलब्ध होण्यासाठी 1 लक्ष रुपयाचे नियोजन प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी प्रास्ताविकेमध्ये दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर आणि डॉ. नितीन चवाळ यांनी केले.

चिखलदरा पर्यटनस्थळासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अमरावती, दि. 16 (जिमाका): विदर्भाचे नंदनवन असलेले अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण चिखलदरा येथे वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग, सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने येतात. त्‍यामुळे चिखलदऱ्यामध्ये पर्यटकाला अधिक आकर्षक करण्यासाठी पायाभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील स्थानिक तरुणांना रोजगारांच्या संधी निर्माण करुन देऊ, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

चिखलदरा तालुक्यातील भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी, प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, तहसिलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसिलदार सुधीर धावडे, सुधीर शेटे तसेच वन विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, चिखदऱ्यातील पर्यटकांना व निसर्गप्रेमींना आकर्षित करण्यासाठी वनविभाग व स्थानिक प्रशासनाव्दारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आमझरी येथे ‘निसर्ग पर्यटन संकुल’ व खटकाली येथील ‘प्रकाश होम स्टे’, गावीलगड वन्यजीव परिक्षेत्रातील ‘निसर्गानुभव मचाण’ व  भीमकुंड येथील ‘साहसी खेळ’ अशा उपक्रमामुळे येथे निश्चितच पर्यटकाच्या संख्येत वाढ होऊन स्थानिकांना रोजगाराच्या नवीनतम संधी उपलब्ध होईल. यामुळे स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन राज्याच्या महसुल वाढण्यास निश्चितच मदत होईल. पर्यटन स्थळावर मुलभूत सुविधा निर्माण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना व सी.एस.आर. फंडच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करुन देणाचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मेळघाटाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून या भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीला प्राध्यान्य द्यावे. या भागात जास्त उत्पादन होणाऱ्या पिकांचे राष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग व ब्रॅन्डिग करुन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आराखडा तयार करावा. यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी शेती पिकावरच अवलंबून न राहता जोडधंदाचा पर्याय स्वीकारावा. चिखलदरा क्षेत्रामध्ये पर्यटनाला मोठी संधी असून त्याचा लाभ आदिवासी युवक-युवती व शेतकऱ्यांनी घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

होमगार्ड पदाकरिता कागदपत्रे पडताळणी व मैदानी चाचणीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार

मुबंई, दि. 16 : होमगार्ड बृहन्मुंबई येथील रिक्त असलेल्या 2 हजार 549 पुरुष व महिला होमगार्डच्या जागा भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आलेले होते. या होमगार्ड नोंदणीकरिता 2 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

होमगाई बृहन्मुंबईकरिता पुरुष व महिलांनी एकूण 2 हजार 247 अर्ज केले आहे. याकरिता उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2024 पर्यंत आयोजन करण्यात आले होते. काही  तांत्रिक  अडचणीमुळे  उमेदवारांची  कागदपत्रे पडताळणी तसेच  मैदानी चाचणी घेणे शक्य होत नसल्याने याबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

000

संजय ओरके/वि.सं.अ.

मराठीसाठी ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट तर ‘’मर्मर्स ऑफ द जंगल’ ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार जाहीर

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्राला पाच पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 16 : ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा, ‘मर्मर्स ऑफ द जंगल या माहितीपटाला नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार, “आणखी एक मोहेंजो दारो”  या माहितीपटाला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण, संकलन चित्रपटाचा, ‘वारसा’(लेगसी)’ या माहितीपटाला सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा तर सर्वोत्तम निवेदन आणि  आवाजासाठी सुमंत शिंदे यांना आज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2022 साठीच्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी  ज्यूरीमध्ये फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष राहुल रवैल, नॉन-फीचर फिल्म ज्यूरीचे अध्यक्ष निला मधब पांडा, आणि बेस्ट राइटिंग ऑन सिनेमा ज्यूरीचे अध्यक्ष गंगाधर मुढालैर हे उपस्थित होते.

फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध श्रेणीमध्ये 18 पुरस्कार जाहीर झाले.

‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

फिचर फिल्म श्रेणीत वर्ष 2022 साठी मराठी भाषेमधून ‘वाळवी’ हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वाळवी हा परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केला आहे . तर झी स्टुडिओजनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. डार्क कॉमेडी प्रकारातला हा रहस्यपट आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, अनिता दाते केळकर, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या  लघुपटाला  जाहीर झाला आहे. “मर्मर्स ऑफ द जंगल” हा एक लघुपट आहे, जो भारताच्या नैसर्गिक वारशाच्या, विशेषतः जंगलांच्या आणि वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या आव्हानांवर प्रकाश टाकतो. हा लघुपट भारतीय जंगलांचे महत्त्व, त्यांच्यातील विविधता, आणि मानवाच्या हस्तक्षेपामुळे होणारा -हास यावर आधारित आहे. लघुपटाच्या माध्यमातून जंगलांचे संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाची आवश्यकता अधोरेखित केले आहे.

या लघुपटात भारतीय जंगलातील विविध वन्यजीव, वनस्पती, आणि त्यांच्याशी संबंधित समुदायांचे जीवन दर्शविण्यात आले आहे. प्रेक्षकांना जंगलाच्या संरक्षणाची जाणीव करून देणे आणि त्यांच्यामध्ये या मुद्द्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे,  या माहितीपटाव्दारे संदेश देण्यात आला आहे.

आणखी एक मोहेन्जो दडो” यास सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक

ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार “आणखी एक मोहेन्जो दडो” या चित्रपटाला जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे उद्दिष्ट म्हणजे प्राचीन मोहेन्जो दडो संस्कृतीच्या गूढतेला आणि इतिहासातील या महान संस्कृतीच्या पुनर्निर्माणाला उजाळा देण्याचा महत्व देणारा चित्रपट आहे.

चित्रपटात मोहेन्जो दडोच्या उत्खननांमध्ये आढळलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करून त्या काळातील समाजजीवन, संस्कृती, वास्तुकला आणि तंत्रज्ञानाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी संशोधनाच्या आधारे मोहेन्जो दडोची समृद्ध परंपरा, त्यातील रहस्य आणि हडप्पा संस्कृतीचा विकास कसा झाला याचे बारकाईने चित्रण केले आहे.

या चित्रपटाने इतिहासातील प्राचीन सभ्यतेच्या महत्वाच्या पैलूंना प्रकाशात आणले असून प्रेक्षकांना त्या काळाच्या जीवनशैलीची सजीव अनुभूती प्रेक्षकांना दिली आहे. चित्रपटाचे चित्रण, निर्देशन आणि ऐतिहासिक सत्यता यामुळेच याला सर्वोत्तम जीवनचरित्रात्मक ऐतिहासिक पुनर्निर्माण संकलन चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार ‘वारसा (लेगसी)’

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार “वारसा” (लेगसी)  या माहितीपटाला जाहीर झाला.  यामध्ये शिवकालीन युद्ध कलेवर आधारित माहितीपटाला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. ‘वारसा’ या माहितीपटाची निर्मिती कोल्हापुरातील सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केली आहे तर या माहितीपटाला बेस्ट फिल्म नॉन फिक्शन गटातून फिल्मफेअर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धतंत्र निर्माण केले होते. त्याचा वारसा आजही कोल्हापुरातील लोक जपत असून याला शिवकालीन युद्ध कला या नावानेही ओळखले जाते.या माहितीपटातून याच युद्ध कलेचा वारसा कोल्हापुरातील स्थानिक कसे जपतात यासाठी सतत प्रयत्नरत असल्याचे चित्रण केले आहे.

सर्वोत्तम निवेदन आणि आवाजासाठी सुमंत शिंदे यांना पुरस्कार जाहिर

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा ‘मर्मर्स ऑफ द जंगल’या माहितीपटासाठी सुमंत शिंदे  यांना सर्वोत्तम निवेदन आणि आवाजाचा  पुरस्कार जाहीर झाला आहे.

सोबतच सर्वोत्तम बॉलिवूड दिग्दर्शक म्हणून सूरज बडजात्या यांना ‘ऊंचाई’ चित्रपटासाठी,  केजीएफ 1: चॅप्टर 2′ सर्वोत्तम कन्नड चित्रपट आणि सर्वोत्तम स्टंट कोरियोग्राफीचा पुरस्कार, ‘काबेरी अंतरधान’ सर्वोत्तम बंगाली चित्रपट, ‘ब्रह्मास्त्र’ या हिंदी चित्रपटासाठी बॉलिवुड संगीतकार प्रीतमला सर्वोत्तम संगीतकाराचा पुरस्कार, ‘फौजा’ साठी नऊशाद सदार खान यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार, ‘अपराजितो’ ला सर्वोत्तम निर्मिती रचनाचा पुरस्कार, ‘कांतारा’साठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्तम अभिनेता, ‘थिरुचित्राम्बलम’साठी नित्या मेनन तर ‘कच्छ एक्सप्रेस’साठी मानसी पारिख यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा  राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहे.

0000

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेचे आयोजन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम

मुंबई दि. १६ : महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र आणि दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि सरकारच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयामार्फत ही स्पर्धा जाहीर केली आहे.

‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे कृषी, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जलसंधारण, जलसंपदा, पायाभूत सुविधा, आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण, वने आदी योजनांशी संबंधित छायाचित्र, रिल्स आणि लघुपट स्पर्धेसाठी पाठवता येतील.

प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्र, रिल्स आणि लघुपटांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान केले जाणार असून, तीन हजार रुपयांची पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्राप्त झालेल्या छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे, मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात तसेच राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच रिल्स आणि लघुपटांना शासनाच्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्धी देण्यात येईल. राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची, प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे.

स्पर्धेची नियमावली

१. छायाचित्रण स्पर्धा.

* छायाचित्रे १८x३० इंच HD च्या मानक आकाराची असावीत.

* छायाचित्राची थीम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सुचविलेल्या थीमशी सुसंगत असावी.

* छायाचित्र ही स्वतःची सर्जनशीलता असावी.

* छायाचित्रांमध्ये कोणतेही अनुचित व्हिज्युअल नसावेत.

* कोणतीही कॉपीराईट सामग्री वापरली जाऊ नये.

* छायाचित्राचे तपशीलवार वर्णन अपेक्षित आहे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे छायाचित्रांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.

२. रिल्स स्पर्धा.

* रील्ससाठी वेळ मर्यादा कमाल १ मिनिटांपर्यंत असावी.

* असभ्य भाषा, आक्षेपार्ह शब्द याचा वापर यामध्ये करता येणार नाही

* कोणतेही कॉपीराईटचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* स्पर्धा १८ वर्षे आणि त्यावरील सर्वांसाठी खुली असेल

* मानक रील्स स्वरूप अपेक्षित आहे.

* रील्स नवीन असणे आवश्यक आहे आणि विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केले पाहिजे.

* स्पर्धेत भाग घेतलेल्यांचे रील्सचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्ककडे असतील.

 ३. लघुपट स्पर्धा.

* लघुपटाचा अवधी किमान ३ मिनिटे ते कमाल ५ मिनिटे इतका असावा.

* या स्पर्धेत १८ वर्षावरील कोणीही… भाग घेऊ शकतात.

* लघुपट नवीन असणे आवश्यक आहे. लघुपट विशेषतः या स्पर्धेसाठीच तयार केलेला असावा.

* अभद्र भाषा, हिंसा, आक्षेपार्ह अपशब्द वापरला जाणार नाही याची काळजी घेण्यात यावी.

* स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी महाराष्ट्र शासनाने नमूद केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे लघुपट सादर करणे आवश्यक आहे.

* कोणतेही कॉपीराईट उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.

* एकाधिक नोंदींना परवानगी नाही.

* मानक व्हिडिओ स्वरूप MP४ HD १९२० * १०८० अपेक्षित आहे. स्वतंत्र YouTube स्वरूप / X स्वरूप असावे.

* लघुपट मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत बनवला आहे याची खात्री करावी.

* लघुपट HD format मध्ये सबमिट करावा.

भाग घेतलेल्यांचे लघुपटांचे स्वामित्व अधिकार माहिती व जनसंपर्क कडे असतील.

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठवावीत. सोबत आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाइल नंबर आणि छायाचित्र कोणत्या ठिकाणचे आहे याची माहिती देणे आवश्यक आहे.

०००००

भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा -राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाची कामे महिन्याभरात पूर्ण करा

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा. ही कामे जलद गतीने करताना कामांचा दर्जा चांगला राहिल याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

श्री क्षेत्र जोतिबा विकास आराखडा व लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामांबाबत मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पुणे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, जोतिबा विकास आराखड्याची कामे करताना आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विचार करा. हा परिसर जैवविविधतेने नटलेला परिसर आहे. या परिसरात वृक्ष लागवड करा. मंदिर परिसरातून पाण्याचा निचरा व्यव‍स्थित होईल, याची दक्षता घ्या. तांत्रिक सल्ला घेवूनच सांडपाणी व्यवस्थापन करा. मंदिराचे कामकाज व दैनंदिन धार्मिक विधीला व्यत्यय न येता तातडीने कामे सुरु करा. मंदिर परिसरातील विद्युत व्यवस्था, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विषयांचा आढावा घेवून स्वच्छतेच्या कामांसाठी दोन शिफ्टमध्ये काम करणारी यंत्रणा नेमा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या कामाचा आढावा घेताना मंत्री श्री. देसाई म्हणाले, या स्मारकाच्या सुशोभीकरणाची कामे महिन्याभरात पूर्ण करा. या कामासाठी 99 लाखांचा निधी मंजूर झाला असून यापैकी 75 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे उर्वरित निधी तात्काळ वितरित करुन नियोजित  कामे जलद गतीने पूर्ण करुन लवकरात लवकर लोकार्पण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, श्री क्षेत्र जोतिबा परिसर संवर्धन प्राधिकरण विकास आराखड्याचा 1 हजार 816 कोटी रुपयांचा कमीत कमी बांधकाम व पर्यावरण पूरक बांधकामाचा समावेश असलेला सुधारित प्रस्ताव सादर केला आहे.

हा आराखडा करतेवेळी जैवविविधता जपणूक, वनीकरण, डोंगर माथ्याचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक जलस्रोत्र इ. गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. या ठिकाणी असणाऱ्या नैसर्गिक जलसाठ्यांचा विकास करुन त्यांना पुनर्ज‍िवीत करण्यात येणार आहे. डोंगरमाथ्याचा नैसर्ग‍िक उत्तार, पाण्याचे स्त्रोत विचारात घेण्यात आले  आहेत. येथील बांधकामामध्ये कमीतकमी आरसीसी साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करताना यामध्ये जैवविविधता बगीचा, फुलपाखरु बगीचा, पक्षीतीर्थ, केदार विजय गार्डन, हत्ती कुरणे, प्राणी व पक्षी संग्रहालय, अपारंपरीक उर्जा स्रोतांचे माहिती केंद्र व संग्रहालय इ. पर्यावरण पूरक बाबींचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी यावेळी दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते टिपेश्वर अभयारण्याच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

यवतमाळ, दि.१६ (जिमाका) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या बहुभाषिक संकेतस्थळाचे महसूल भवन येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासोबतच टिपेश्वर अभयारण्याची माहिती जाणून घेण्यासाठी हे संकेतस्थळ अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले.

टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याने संकेतस्थळ https://tipeshwarwildlife.com असे आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वन्यजीवचे विभागीय वन अधिकारी उत्तम फड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राजेश देवते आदी उपस्थित होते. अभयारण्याचे स्वतंत्र संकेतस्थळ करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार भुषण नस्करी आणि यशेष उत्तरवार यांनी हे संकेतस्थळ तयार केले. सदर संकेतस्थळ वन्यजीव प्रेमी, पर्यटक आणि संरक्षणवादी यांच्यासाठी एक अनमोल साधन ठरणार आहे.

या नवीन संकेतस्थळाने टिपेश्वरच्या समृद्ध जैवविविधतेचा सखोल अभ्यास करणे सहज केले आहे. यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांची तपशीलवार माहिती, एक संवादात्मक चॅटबॉट आणि एक आकर्षक इमेज आणि व्हिडिओ गॅलरी उपलब्ध आहे. इमेज गॅलरीत अभयारण्याच्या सुंदर लँडस्केप्स आणि विविध वन्यजीवांचे चित्रण आहे तर व्हिडिओ गॅलरीत अभयारण्याच्या सुरम्य दृश्यांचे दृश्य दाखवले जाते.

पर्यटकांसाठी संकेतस्थळाने कसे पोहोचावे, फ्लोरा आणि फॉना, आगामी भेटीचा सर्वोत्तम काळ आणि आसपासच्या पर्यटनस्थळांची माहिती यासारख्या महत्वपूर्ण विभागांची माहिती दिली आहे. संकेतस्थळावर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे वापरकर्ते टिपेश्वरसंबंधी आपले अनुभव आणि छायाचित्रे सहज शेअर करू शकतात.

संकेतस्थळ अत्यंत वापरकर्ता अनुकूल आणि सर्व उपकरणांवर सुलभ आहे, तसेच इंग्रजी, मराठी आणि तेलुगू भाषांमध्ये उपलब्ध आहे. सोशल मीडिया आणि न्यूजलेटरच्या एकत्रीकरणामुळे समुदायाच्या सहभागास प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या अनुभवांचे शेअर करू शकतात आणि अभयारण्याच्या मिशनशी जोडलेले राहू शकतात.

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी अखर्चित राहता कामा नये – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

यवतमाळ, दि.16 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला जातो. बरेच लोकप्रतिनिधी विविध लेखाशीर्षाखाली निधी मंजूर करून आणतात. त्यामुळे या योजनेतून मंजूर निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चित राहता कामा नये. विशेषत: जिल्हा परिषदेंतर्गत यंत्रणांनी निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला खा.संजय देशमुख, खा.प्रतिभा धानोरकर, आ.मदन येरावार, आ.प्रा.डॅा.अशोक उईके, आ.डॅा.संदीप धुर्वे, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.इंद्रनिल नाईक, आ.नामदेव ससाने, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी सुहास गाडे, लघिमा तिवारी, नियोजन उपायुक्त सुशील आगरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीस मागील वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. चालू वर्षातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेचा पालकमंत्र्यांनी यंत्रणानिहाय आढावा घेतला. निधी वितरित होऊनही कामे वेळेत पूर्ण न झाल्याने काही विभागांकडे पडून राहतो. जिल्हा परिषदेकडे दोन वर्षापूर्वींचे 21 कोटी रुपये प्रलंबित आहे. त्याप्रकरणी संबंधितांकडून खुलासा घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

मागील वर्षी विकविमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना देऊनही विमा कंपनीने त्यांना भरपाई देण्याचे नाकारले. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या सुनावणीत भरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले. तेच आदेश मंत्रालयात सचिवांनी काय ठेऊन भरपाई देण्याच्या सूचना केल्या. तरीही कंपनी भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याचे यावेळी लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणले. कंपनीला आठ दिवसात नुकसाई भरपाई देण्याची नोटीस द्या. त्यानंतरही भरपाई न दिल्यास कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मंजूर पाणीपुरवठ्याची कामे तातडीने पुर्ण केली जावी. ज्या ठिकाणी सुधारीत मान्यता पाहिजे आहे, अशा प्रस्तावास मंजूरी मिळण्यासाठी पाठपुरावा करू. सद्या सोयाबिनवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कृषि शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना सुरक्षात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन करावे. खनिज विकास निधीतून सोलर झटका मशीन आपण देतो आहे. अभयारण्यालगतच्या शेतकऱ्यांचा देखील यासाठी समावेश करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

गेले काही दिवस सतत पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास पाठविण्यात आला आहे. लवकरच वाढीव दराने मदतनिधी जिल्ह्याला प्राप्त होईल. त्याचे वितरण लवकर केले जावे. पेसा गावांना विकासकामासाठी देण्यात येत असलेला निधी, लम्पी आजारामुळे जनावरे मृत झालेल्यांप्रकरणी अनुदान वाटप आदींचा पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला.

या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर निधी विभागांनी लवकरात लवकर खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी खासदार, आमदार व निमंत्रित सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. बैठकीला विशेष निमंत्रित सदस्य क्रांती राऊत, सदबाराव मोहटे, सिताराम ठाकरे, अब्दूल वहाब अब्दूल हलिम उपस्थित होते.

लाडकी बहीणच्या कामासाठी प्रशासनाचे कौत

शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेचे कमी कालावधीत जिल्हा प्रशासनाने उत्तम काम केले. जिल्ह्यात 4 लाख 68 हजार महिलांची नोंदणी करण्यात आली. प्राप्त अर्जांची युद्धस्तरावर छाननी करून 4 लाख 60 हजार अर्ज निधी वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले. येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात रक्कम वितरित केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने योजनेसाठी केलेल्या कामाचे पालकमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

ताज्या बातम्या

विधानसभा लक्षवेधी

0
अहिल्यानगर जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  मुंबई, दि. १८ : राज्यातील पोलीस व्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकसंख्येनुसार सुसंगत बनवण्यासाठी राज्य...

विधानसभा निवेदन

0
विदर्भातील नझूल जमीनींबाबत विशेष अभय योजनेला एक वर्षाची मुदतवाढ देणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. १८ : विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागात निवासी...

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आमचा श्वास मराठी; मुंबईला जगाशी जोडतो...

0
मुंबई दि. १८: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ...

विधानसभा लक्षवेधी

0
सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणार-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मुंबई, दि. १८ :- सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पास राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेऊन या...

राज्यात यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण -क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

0
शासनाच्या निर्णयामुळे गोविंदांमध्ये उत्साह मुंबई, दि. १८ : दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचण्याच्या पारंपरिक प्रथेस साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून...