गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 259

ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. २४ : राज्य शासनाच्या पहिल्या शंभर दिवसात ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व महाऊर्जा या कंपन्यांनी केलेल्या कामगिरीच्या प्रगती अहवालाच्या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथे करण्यात आले.

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आगामी 25 वर्षांच्या राज्याच्या वाटचालीच्या अनुषंगाने ऊर्जा क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्याची योजना निश्चित केली आहे. त्यांच्या व्हिजनला अनुसरून पहिल्या शंभर दिवसात वीजविषयक सार्वजनिक कंपन्यांसाठी विविध उद्दिष्टे ठरविण्यात आली. त्या उद्दिष्टांची माहिती व त्याची पूर्तता याचा लेखाजोखा मांडणारे ‘हंड्रेड डेज फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स’  हे अहवालपर पुस्तक महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी आहे.

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री  मेघना साकोरे बोर्डीकर, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, उद्योग सचिव पी. अन्बलगन, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., मुख्यमंत्र्यांच्या  प्रधान सचिव अश्विनी भिडे,  एमएसईबी होल्डिंग कंपनीचे वित्त संचालक अनुदीप दिघे, स्वतंत्र संचालक आशिष चंदराणा आणि नीता केळकर उपस्थित होते.

अहवाल पुस्तकात नमद केल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिका दाखल करून वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला. आगामी काळातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये नवीकरणीय उर्जेवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे वीजखरेदी खर्चात मोठी कपात होणार असून या पार्श्वभूमीवर वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

ऊर्जा विभागाच्या अंतर्गत चारही कंपन्यांना देण्यात आलेली बहुतेक उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या हिताच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत पंप बाबतीत तसेच प्रधान मंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंतर्गत घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्याच्या बाबतीत उद्दिष्टापेक्षा जास्त कामगिरी झाली आहे.

विद्युत ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन देणे, अखंडित वीज पुरवठा करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे, वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, वीज वितरण जाळ्याची क्षमता वाढविणे, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करणे, सरकारी कार्यालये सौर ऊर्जेवर चालविण्याची योजना अशी अनेक उद्दिष्टे या कंपन्यांना देण्यात आली. शंभर दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल ठरला आहे. कामगिरीचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित करण्याची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कडे असलेल्या  ऊर्जा विभागापासून  केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली

0000

संध्या गरवारे/विसंअ/

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात परिसंवादांची भूमिका मोलाची – मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. 24 : आर्थिक साक्षरतेमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभाग तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सकारत्मक निर्णय घेण्यात आले आहेत. महिलांना आर्थिक गुंतवणूक कशी करावी अत्याधुनिक साधनांचा दैनंदिन व्यवहारात वापर कसा करावा, यासाठी सशक्ती परिसंवाद 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात अशा परिसंवादांची भूमिका नक्कीच मोलाची ठरणार आहे, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

लर्निग लिग फाऊंडेशन, मार्स्टर कार्ड आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सशक्ती परिसंवाद 2024-25 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या. या वेळी खासदार नारायण राणे, माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा लड्डा, लर्निंग लिग फाऊंडेशनच्या अध्यक्ष नुरीया अन्सारी, मार्स्टर कार्डचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक शरदचंद्रण संग्राम, पुनीत तळोजा यांच्यासह अनेक बचत गटांच्या महिला प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित होत्या.

या परिसंवादात महिलांशी संवाद साधतांना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांना शिक्षणाबरोबरच आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रोत्साहित करण्यात येत आहेत. यासाठी राज्यातील जास्तीत जास्त महिलांना आर्थिक साक्षर करणे हे महत्वाचे उद्दिष्ट विभागाने डोळ्यासमोर ठेवले आहे. बचतगटांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसायाबरोबरच मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासनस्तरावर महिलांना सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहेत. मोबाईलमुळे मोठी क्रांती झालेली आपल्याला पहावयास मिळते. मोबाईलसारख्या गॅझेटच्या माध्यमातून आर्थिक देवाण घेवाण करतांना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी महिलांना अशा परिसंवादाच्या माध्यमातून आर्थिक देवाण-घेवाण करतांना कशा प्रकारे आपण खबरदारी घेतली पाहिजे याविषयी परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळाला 50 वर्ष पूर्ण झाली असून सात राज्यात महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. या सुवर्णकाळात साधारणपणे 20 लाख महिला माविमसोबत जोडल्या गेल्या असून भविष्यात किमान 50 लाख महिलांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून अनेक महिला अर्थिक साक्षर होतांना दिसून येत आहे हेच या योजनेचे मोठे यश आहे. महिलांना आर्थिक देवाण घेवाण करण्याकरिता विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचा छायाचित्र असणारे रुपे क्रेडीट कार्ड देखील उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक सक्षम होण्याचा निर्धार करावा : खासदार नारायण राणे

देशात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महिलांनी छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिक सक्षम होण्याचा निर्धार. यामुळे कुंटुबाला आर्थिक हातभार तर लागेलच परंतू निर्णय घेण्याचे स्वातंत्र देखील मिळणार आहे. महिलांनी सूरू केलेल्या उद्योग व्यसायामुळे देशाचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन सदैव महिलांच्या पाठीशी उभे असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले.

सशक्ती परिसंवाद कार्यक्रमाचे प्रस्ताविक माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा लड्डा यांनी केले. यावेळी प्रातिनिधक स्वरूपात उपस्थित असणाऱ्या महिलांना धनादेश आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. परिसंवाद कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या बचतगटांच्या स्टॉलला मंत्री अदिती तटकरे, खासदार नारायण राणे यांनी भेट दिली.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अकृषि विद्यापीठे आणि सलग्न महाविद्यालयातील

मुंबई, दि. 24 : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषि विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी अकृषि विद्यापीठे आणि सलग्न महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार डॉ. मनीषा कायंदे , उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव संतोष खोरगडे, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक यांच्या पदोन्नतीचे लाभ देय दिनांकापासून पूर्ववत लागू करणे, नेट-सेटमधून सूट मिळवण्यासंदर्भात एम.फिल अर्हताधारक प्राध्यापकांचे  विद्यापीठ अनुदान आयोगाकडे  पाठवलेल्या प्रस्तावाबाबत उच्च शिक्षा मंत्रालय स्तरावरून पाठपुरावा करून एम.फिल धारक प्राध्यापकांचे प्रश्न निकाली काढणे, पदवी महाविद्यालयातील प्राचार्यांना अकॅडमी लेवल 14 ही  वेतनश्रेणी लागू करणे, नांदेड, अमरावती आणि कोल्हापूर विभागातील काही अध्यापकांचे ऑफलाइन असलेले वेतन ऑनलाईन करणे, निवृत्त होणाऱ्या व झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण मिळणे आदी विषयांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

गजानन पाटील/ससं/

 

‘एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २४ : एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत ते बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून ते इतर  कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात. याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर  होत आहे. त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी.

यावेळी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) बसस्थानक परिसरातील समस्यांसंदर्भात आमदार सत्यजित तांबे व अमोल खताळ यांच्या शिष्टमंडळासमवेत परिवहन मंत्री सरनाईक यांनी चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी विस्तारित जागा देणे, नाशिक- पुणे महामार्गावरुन जाणाऱ्या बसेसना संगमनेर बसस्थानकामध्ये थांबा देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

बाळापूर तालुक्यातील वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २४ : बाळापूर तालुक्यात अनेक परंपरागत वीटभट्ट्या कार्यरत असून, त्या अनेक दशकांपासून चालत आलेल्या आहेत. यामध्ये कुंभार समाज प्रमुख असून, ते पारंपरिक पद्धतीने वीटभट्टी व्यवसाय करत आहेत. या व्यवसायामध्ये जवळपास ८५ वीटभट्ट्या परंपरागत आहेत, तर ६४ वीटभट्ट्या खासगी जमिनींवर कार्यरत आहेत. या सर्व वीटभट्ट्यांची प्रदूषणाच्या दृष्टीने फेरतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे उत्तर देत होते.

शासनाने या वीटभट्ट्यांची तपासणी केली असल्याचे सांगून महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, यातील काही वीटभट्ट्या सरकारी जमिनींवर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये ११ वीटभट्ट्या सरकारी जमिनींवर असून, त्यांच्याकडून भाडे आणि महसूल वसूल करण्यात आले आहे. आतापर्यंत ३० लाख ४८ हजार रुपये महसूल स्वरूपात जमा करण्यात आला आहे. यातील बहुतांश वीटभट्ट्या छोट्या असून, त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिक आणि कुंभार समाजातील कुटुंबे यावर अवलंबून असल्याने कारवाई केल्यास ५०-६० कुटुंबांच्या रोजगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात फेरतपासणी करण्याची भूमिका घेतली आहे. यातील अनेक वीटभट्ट्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घेण्याची गरज नसते, कारण त्या लहान उद्योगांच्या श्रेणीत येतात. मात्र, काही ठिकाणी पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. जर कोणी नियमबाह्य मार्गाने व्यवसाय करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

प्रत्येक जिल्ह्यात आदर्श वसतिगृह उभारणार; वसतिगृहांसाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. २४ : राज्यातील  प्रत्येक जिल्ह्यात एक आदर्श वसतिगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री शिरसाट बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, सचिन आहिर, राजेश राठोड, अभिजीत वंजारी, अमोल मिटकरी, जगन्नाथ अभ्यंकर, संजय खोडके यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा दर्जा सुधारण्यात येत असल्याचे सांगून सामाजिक न्याय मंत्री शिरसाट म्हणाले की, याठिकाणी असलेल्या स्वयंपाकगृहांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे. त्यानुसार दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना वसतीगृहात वेळेवर प्रवेश मिळावा यासाठीही नियमावली तयार करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहासाठी पहिल्या टप्प्यात 4 कोटी 99 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. लवकरच दुसरा हप्ताही देण्यात येणार आहे. राज्यातील वसतिगृहांमध्ये 1 कोटी 25 लाख विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता निर्माण करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वसतिगृह इमारत ही 10 कोटी रुपयांची असावी असे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांचे ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश आहे त्या महाविद्यालयाच्या जवळच त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल असे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनामध्ये वाढ आणि मच्छिमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २४ : गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये वाढ होणे आणि मच्छिमारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी एक सर्वंकष धोरण तयार करण्यात  येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री राणे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये प्रवीण दरेकर, उमा खापरे, भाई जगताप, प्रसाद लाड, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

गोड्यापाण्यातील मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी या क्षेत्रामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता आणणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. राणे म्हणाले की, यासाठी एक सर्वंकष धोरण विभागामार्फत तयार करण्यात येत आहे. तसेच विभागाकडे असलेल्या सर्व तलावांची माहिती एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मत्स्योत्पादनात सध्या महाराष्ट्र १७ व्या स्थानावर आहे. राज्य मत्स्योत्पादनामध्ये ३ ऱ्या क्रमांकावर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मासेमारीला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात येणार आहे. तसेच मत्स्योत्पादन वाढीसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात येईल. याशिवाय तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील तलावांमध्ये अतिक्रमणही झाल्याचे निदर्शनास येत आहे. यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री राणे यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/ 

नागपूर येथील प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे  वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. २४ : नागपूर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालय (गोरेवाडा) येथील तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे झाला असल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नाईक बोलत होते.

गोरेवाडा येथील प्राणी संग्रहालयात विषाणुजन्य आजारामुळे प्राण्याचा मृत्यू होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून वनमंत्री नाईक म्हणाले की, बाधित प्राण्यांचे पिंजरे निर्जंतुक करण्यात आले आहेत. प्रचलित नियमांतील तरतुदीनुसार मृत प्राण्यांचे मृतदेह नष्ट करण्यात आले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अन्य क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कोंबडीच्या मांसाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी यांची पदे कमी असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री कार्यालयामध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून रुजू असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत माहिती घेवून निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही वनमंत्री नाईक यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

 

 

विधानपरिषद कामकाज

जिवंत सातबारा मोहीम १ एप्रिलपासून राज्यभर राबवणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २४ : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे जिवंत सातबारा मोहिम यशस्वीपणे राबविण्यात येत असून आता याची दखल घेऊन ही मोहीम संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री यांनी विधान परिषदेत दिली.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अभिलेखामध्ये (सातबारा) अद्ययावत केल्या जातील. यामुळे शेतीशी संबंधित वारसांच्या दैनंदिन कामांमध्ये येणाऱ्या अडचणींवर प्रभावी उपाययोजना होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात 1 मार्च 2025 पासून सुरू झालेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर 19 मार्च 2025 रोजी राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे ही मोहीम सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्याचा आदेश काढला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून सुरू होईल आणि साधारणतः दीड महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण राज्यातील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट आहे. महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी सर्व सदस्यांना आवाहन केले की, त्यांनी आपआपल्या भागात तहसीलदार व एसडीओंच्या बैठकीद्वारे या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.

000

संजय ओरके/विसंअ/

महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारणीस मान्यता

मुंबई, दि. २४ : मुंबई येथे महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार म्हणाले की, वांद्रे पूर्व येथे 6,691 चौरस मीटर जागेवर महाराष्ट्र पुराभिलेख भवन उभारण्यात येणार आहे. राज्यात जवळपास 17 कोटी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत, त्यापैकी साडेदहा कोटी मुंबईत आहेत. जगभरात अनेक ठिकाणी पुराभिलेख भवन (Archives Building) पर्यटक, अभ्यासक, आणि संशोधकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. अशा ठिकाणी असलेल्या दस्तऐवजांमुळे त्या शहराची, राज्याची आणि देशाची ऐतिहासिक ओळख जपली जाते. महाराष्ट्र राज्यात अद्यापपर्यंत स्वतंत्र असे महाराष्ट्र पुराभिलेख भवन नव्हते. मात्र, आता हे भवन उभारण्यासाठी वांद्रे पूर्व येथील प्लॉट मिळवण्याची प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. शासनाने तीन महिन्यांतच ही जागा ताब्यात घेतली असून, आता लवकरच या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्याचे काम सुरू होणार आहे. या 6,691 चौरस मीटर क्षेत्रफळात उभारल्या जाणाऱ्या पुराभिलेख भवनात महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचे जतन करण्यात येईल. याठिकाणी दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज, सरकारी राजपत्रे, शासकीय नोंदी, तसेच ऐतिहासिक कागदपत्रे जतन करून अभ्यासक व संशोधकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला मोठी चालना मिळणार असून, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हे भवन एक महत्वपूर्ण साधन ठरणार असल्याचेही ॲड. शेलार यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारणार – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. २४ : राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी मुंबईत भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेमध्ये याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांनी निवेदन केले. श्री. शेलार म्हणाले की, हे सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरेल. येथे भव्य ऑडिटोरियम, कला दालन, संशोधन केंद्र आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुविधा उपलब्ध असतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळावी यासाठी हे केंद्र महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. विदेशी आणि देशी पर्यटकांसाठी हे एक प्रमुख आकर्षण असेल. तसेच, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी एक भव्य व्यासपीठ म्हणूनही या केंद्राचा उपयोग होईल.

वस्तुसंग्रहालयामध्ये प्राचीन वारसा जतन

राज्य वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. येथे महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, उत्खननात सापडलेल्या प्राचीन वस्तू, शस्त्रास्त्रे, शिलालेख, ताम्रपट, मध्ययुगीन वस्त्रप्रकार, शिल्पे, चित्रकला आणि अन्य दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू प्रदर्शित केल्या जातील.

मुंबईत भव्य प्रकल्पाची उभारणी

राज्य सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालय उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मौजे वांद्रे, सर्वे नंबर 341, नगर भूखंड क्रमांक 629 या 14,418 चौरस मीटर भूखंडाची निवड करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून हा भूखंड सांस्कृतिक कार्य विभागाला विनामूल्य हस्तांतरित केला जाणार आहे. याठिकाणी राज्याच्या पहिल्या सांस्कृतिक केंद्र आणि वस्तुसंग्रहालयाची उभारणी करण्यात येईल. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

स्टँड-अप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या वक्तव्यांवर शासनाची कठोर भूमिका – गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई दि. २४ : स्टँड-अप कॉमेडीच्या नावाखाली सर्वोच्च न्यायालय, देशाचे प्रधानमंत्री आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान होणे, हे अत्यंत गंभीर आहे. यासंदर्भात कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता, श्री.कामरा याचे सी.डी.आर तसेच कॉल रेकॉर्ड तपासले जातील, तसेच त्याच्या बँक खात्यामधील व्यवहार तपासले जातील, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितले.

गृहराज्यमंत्री कदम यांनी निवेदनात स्पष्ट केले की, श्री.कामरा यांच्या संदर्भात १६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी उपाययोजना केल्या जातील.

000

संजय ओरके/विसंअ/

 

कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : कोराडी येथील २×६६० मेगावॅट क्षमतेचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रकल्पात सुपर क्रिटीकल टेक्नॉलॉजीचा वापर करावा. जास्तीत जास्त क्षमतेच्या हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

कोराडी विद्युत प्रकल्पासंदर्भात विधानभवनातील समिती सभागृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा. जास्तीत जास्त क्षमतेने हा प्रकल्प चालविताना कमीत कमी प्रदुषण होईल याकडे लक्ष द्यावे. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच या प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज कमीत कमी दरात मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. गारेपालमा येथील कोळशाच्या वापरासाठी त्याच्या जवळच आणखी एक विद्युत प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. १४३३७ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यात एफजीडी व एससीआर संयंत्र वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमिन उपलब्ध असून आणखी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा,  महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

0000

 

महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : राज्यात विविध क्षेत्रांसाठीच्या वीजेची मागणी लक्षात घेऊन आवश्यक वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महापारेषण प्रकल्पांबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे निर्देश दिले. बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, महापारेषण  अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमार, यांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच संबंधित जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व ठिकाणची कामे तातडीने विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पालघरमध्ये जास्त प्रमाणात कामे प्रलंबित असून त्या कामांची तातडीने पूर्तता करावी. वाढवणच्या दृष्टीने विचार करुन टीबीसीबी प्लॅनिंग अतंर्गत गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर त्याच्या नियोजनाचा विचार करावा. तसेच नवी मुंबई डेटा सेंटर हबला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे सूचित करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्थानिक राजकीय वा इतर कुठल्याही हस्तक्षेपाला न जुमानता सर्व संबंधित यंत्रणांनी ट्रान्समिशन टॉवरच्या उभारणीच्या कामांना गती द्यावी. यासाठी आवश्यक त्या जिल्ह्यांमध्ये पोलिस अधिक्षकांनी पोलिस संरक्षण उपलब्ध करुन द्यावे. सर्व यंत्रणांनी परस्पर सहकार्याने पारेषण प्रकल्पांचे काम  गतीने पुढे नेण्याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सूचित केले. राज्याच्या वाढीव वीजेची मागणी लक्षात घेता सर्व क्षेत्रांना आवश्यक वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प पूर्ण होणे महत्वाचे  आहे, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी कामांची अंमलबजावणी अधिक गतीमान करुन सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीत बभालेश्वर-कुडुस, शिक्रापुर-रांजणगाव, जेजुरी-हिंजवडी, पडघे-वाडा आणि कोलशेत-वाडा, विशविंद-भेंडा, बभालेश्वर-राजूरी-अहिल्यानगर एमआयडीसी, बोईसर(एमआयडीसी)-डहाणू, पडघे वाडा, नागेवाडी-भोकरदन, डहाणू सुर्यानगर एमएमआरडीए आणि कावदास जव्हार,धानोरा यावल ते चोपडा, उमरेड-नागभीड, या वीज वाहिन्यांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आला.  ट्रान्समिशन नेटवर्क विस्तार योजना २०२४-३४ अतंर्गत १,५४,५२२ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून ८६,६५६ नवीन कॉरीडॉरचे काम करण्यात येणार आहे.  या संदर्भातील कामांच्या नियोजनाबाबत विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी सविस्तर माहिती दिली.

0000

 

‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद; सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म

विधानपरिषद कामकाज

मुंबई, दि. २४ : ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंद असून माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातला हा सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानपरिषदेत अभिनंदन प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या कामाला कायम आशीर्वाद देणाऱ्या वारकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा तसेच माझ्या लाडक्या बहि‍णींचा, लाडक्या भावांचा आहे, असे मी मानतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे आणि महाराष्ट्राच्या सेवेचे व्रत मला दिले. धर्मवीर आनंद दिघे यांनी जनसेवेचे संस्कार दिले. संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा पुरस्कार हा याच संस्कारांचा सन्मान आहे. या पुरस्काररूपी आशीर्वादामुळे मला कॉमन मॅनला सुपरमॅन करण्यासाठी आणखी बळ मिळो अशी प्रार्थना मी करतो, असे सांगू नको उपमुख्यमंत्री म्हणाले की, ‘भले दरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या तुकाराम महाराजांच्या ओळी मला खूप प्रिय आहेत. एखाद्याने जीव लावला, विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून द्यायची, आणि एखाद्याने दगाफटका केला तर त्याला योग्य मार्गाने वठणीवर आणायचे हीच तुकाराम महाराजांची शिकवण मी आयुष्यभर जपली.

माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मी वारकरी संप्रदायासाठी काही भरीव गोष्टी करु शकलो असं सांगून, उपमुख्यमंत्री म्हणाले की, वारकरी बंधूंचा विचार करुन इतिहासात प्रथमच आमच्या काळात वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान दिलं गेलं, वारकरी विमाछत्र योजनेत वारकऱ्यांचा विमा काढण्यात आला, वारीमध्ये लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाचे कामही मार्गी लागले. विठूरायाच्या दर्शन रांगांसाठी आपण तात्काळ निधी दिला, मंदिर हेच संस्काराचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळेच ‘ब’ श्रेणीतील तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी आपण दोन कोटीवरून थेट पाच कोटी केला. पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली. वारकऱ्यांपेक्षा कोणी व्हीआयपी नाही. पंढरपूरला आलो तर सगळा व्हीआयपी ताफा बाजूला ठेऊन बुलेटवर फिरलो असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, ही मदत म्हणजे काही उपकार नव्हेत, कारण वारकरी संप्रदायाचे या समाजावरील उपकार कोणी सात जन्म घेतले तरी फेडू शकणार नाही.

संत तुकाराम महाराज यांच्या,‘शुद्धबीजा पोटीं, फळें रसाळ गोमटीं… या वाक्याचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री म्हणाले की, महायुतीच्या सरकारच्या विचारांचे बीज शुद्ध आहे आणि त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारताची विकासाची गोमटी फळे आपल्याला मिळत आहेत. हा पुरस्कार मला कोणत्याही पदापेक्षा खूप मोठा आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटीबद्ध होतो, आहे आणि सदैव राहीन अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

विधानसभा कामकाज

राज्यात जिवंत सातबारा विशेष मोहीम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई, दि. २४ : मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींचे निराकरण तातडीने व्हावे यादृष्टीने महसूल विभागामार्फत जिवंत सातबारा विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदन केले.

दि.१ एप्रिल २०२५ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये “जिवंत सातबारा  मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्यावत करुन मयत खातेदारांच्या वारसाची नोंदींचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.असेही निवेदनात महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा ठराव पणन मंत्री यांनी विधानसभेत मांडला

मुंबई, दि. २४ : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव पणन मंत्री जयकुमार रावल यांनी  विधानसभेत मांडला.

क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याच्या प्रयोजनार्थ हा ठराव मांडला आहे.

मंत्री श्री. रावल म्हणाले,  भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

एनसीईआरटी अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आणि सीबीएससी परीक्षा पध्दती स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

मुंबई,दि.२४ राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांचा अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांची परिक्षा पध्दती स्विकारण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदन केले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यातील सुजाण पालक यांचा सहभाग, शिक्षकांची  सकारात्मक  भूमिका या माध्यमातुन नविन शैक्षणिक धोरणाची राज्यात  प्रभावी अंमलबजावणी  करण्यात येत आहे.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) यांच्याआधारे राज्याचे  स्वतःचे अभ्यासक्रम आराखडे बनवण्यात आले आहेत. यामध्ये  राज्यासाठी सकारात्मक विद्यार्थी हिताचे आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.  महाराष्ट्र राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत बनविताना राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी बनवलेली पाठ्यपुस्तके बालभारती तज्ञ समितीमार्फत अभ्यासून राज्यासाठी स्वतःची पाठ्यपुस्तके आवश्यक ते सर्व बदल करून बनविण्यात येत आहेत.

या नवीन  राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अपेक्षित कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी घोकंपट्टीवर आधारीत परीक्षा पद्धती न ठेवता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या परीक्षा पध्दतीप्रमाणे सर्वकष प्रकारचे मुल्यमापन महाराष्ट्राच्या राज्य मंडळाच्या पध्दतीत आणून आणि त्यातही आवश्यक ते बदल / सुधारणा करुन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल.

तज्ज्ञ समित्यांच्या मदतीने राज्यातील शैक्षणिक पार्श्वभूमी व राज्याच्या गरजा विचारात घेऊन राज्य अभ्यासक्रम आराखड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पायाभूत स्तर अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली.

यासंदर्भातील सर्व मसुदे SCERT च्या संकेतस्थळावर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या व त्यानुसार दोन्ही आराखडा मसुदे अंतिम करण्यात आले व त्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता  मिळाली आहे.

अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती

तज्ज्ञ समित्यांच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी (बालवाटिका १,२,३, इ. १ ली व २ री) अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती करण्यात आली व अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली आहे. नवीन पाठ्यक्रमानुसार बालभारतीमार्फत इ. १ ली पाठ्यपुस्तक निर्मिती कामकाज सुरु आहे. राज्यासाठी इ. १ री ते १० वी साठी अभ्यासक्रम / पाठ्यक्रम निर्मिती SCERTM मार्फत करण्यात येत आहे.

सी बी एस ई परीक्षापध्दतीची वैशिष्टये

  • संकल्पनांवर भर – पाठांतरापेक्षा संकल्पनांच्या समजुतीवर अधिक लक्ष दिले जाते,त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळते.
  • सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन (CCE Continuous and Comprehensive Evaluation) -विद्यार्थ्यांच्या सततच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जाते. केवळ अंतिम परीक्षांवर भर न देता, प्रकल्प, उपक्रम आणि इतर मूल्यांकन तंत्रांचा समावेश केला जातो.
  • राज्य,देश व जगाच्या पातळीवरचे ज्ञान मिळते.
  • स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सीबीएसई अभ्यासक्रमJEE, NEET, UPSC यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी फायदेशीर ठरतो.
  • सॉफ्ट स्किल्स आणि समुपदेशनावर भर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावर लक्ष केंद्रित केले जाते,त्यांना संवाद कौशल्ये, नेतृत्वगुण, सृजनशीलता आणि तणाव व्यवस्थापन शिकवले जाते.
  • सीबीएससी पॅटर्नमुळे विदयार्थ्यांनाअधिक दर्जेदार शिक्षण मिळण्यास  मदत होईल.

नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यसाहित्य  वेळापत्रकाप्रमाणे अंमलात आणण्याचे नियोजन

अंमलबजावणीचे वर्ष २०२५

इयता/वर्ग १ ली, २०२६ इयता/वर्ग २ री ३ री ४ थी व ६ वी,२०२७ इयता/वर्ग ५ वी, ७ वी ९ वी व ११ वी, २०२८ इयता/वर्ग ८ वी, १० वी व १२ वी असे असणार आहे.

राज्यमंडळ अस्तित्वात राहणार

महाराष्ट्राला उज्ज्वल शैक्षणिक परंपरा आहे. त्यामुळे राज्याचे अस्तित्व दाखवणारे राज्यमंडळ बंद करण्याचा कोणताही विचार नाही. याउलट, राज्यमंडळ या सर्व उपक्रमांमुळे अधिक सक्षम होईल जे २१ व्या शतकातील गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये आणण्यास मदतच करेल. राज्यातील इ.१० वी व इ.१२वी परीक्षा आयोजनाची जबाबदारी प्रचलित पद्धतीनुसार राज्यमंडळाकडेच असेल.राज्यमंडळ अस्तित्वात राहणार असल्याने पालकांनी आपल्या पाल्यास कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावे किंवा कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा याबाबत कोणतेही बंधन नाही.

शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य

महाराष्ट्राला संत-समाजसुधारकांची फार मोठी परंपरा आहे. नवीन अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, संत, समाजसुधारक, ऐतिहासिक व्यक्तिरेखा इत्यादी सर्व बाबींना इतिहास, भूगोल, भाषा विषय इ. सर्व संबंधीत विषयामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. SCF-SE मध्ये बाब स्पष्टपणे नमूद आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठी भाषा विषयाचे महत्व कुठेही कमी होत नाही. अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सन्मानाचेच स्थान मिळेल व हा निर्णय हा मराठी साहित्य, कला, संस्कृतीच्या उज्ज्वल परंपरेला योग्य ठरणार आहे.

शिक्षक पदभरतीसाठी स्वतंत्र पवित्र प्रणाली

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भौतिक सुविधा, शिक्षक संख्या, अशैक्षणिक कामाचा बोजा आणि त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबतही  शासन निर्णय  निर्गमित करण्यात आला आहे. अशैक्षणिक कामाचा ताण कमी करून शैक्षणिक कामच शिक्षकांकडून केले जाईल अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षक पदभरतीसाठी स्वतंत्र पवित्र प्रणाली सुरु करण्यात आलेली आहे ज्यातून हजारो शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. अनेक नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे आणि अभियानही सुरु करण्यात आले आहे.

भौतिक सुविधा संदर्भात आराखडा तयार

शाळांच्या भौतिक सुविधा यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, वर्ग खोल्या, क्रीडांगण, कुंपण इ-सुविधा  या संदर्भात आराखडा तयार केला जात आहे, यावर शासन प्राधान्याने काम  करत आहे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर विशेष लक्ष दिले असून  याकरीता कुठलाही निधी कमी पडणार नाही.

नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण

सध्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व हवामानानुसार शाळांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळा शासन मान्यता प्राप्त अनुदानित शाळा यामधील मुलांना दहावीपर्यंतचे शिक्षण आणि मुलींना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण संदर्भात नमूद करण्यात येते की नवीन अभ्यासक्रम धोरणानुसार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून शिक्षकांना ब्रिज कोर्स द्वारे सुद्धा अतिरिक्त प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामाध्यमातून

विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धाक्षम होता येईल.असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

0
मुंबई, दि. १६:  भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...

नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे...

विधानसभा इतर कामकाज

0
अर्धा तास चर्चा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक...

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १६: "एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी...

अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...