मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 244

ग्रामीण रस्त्यांची कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर, दि.०६:  गावांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.

जामखेड तालुक्यातील दौंडाचीवाडी-तरडवाडी ते जिल्हा हद्द या ३ कोटी ४६ लक्ष २० हजार रुपये किंमतीच्या आणि वंजारवाडी-तित्रंज ते जिल्हा हद्द या २ कोटी १६ लक्ष ६१ हजार रुपये किंमतीच्या रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी सभापती प्रा. शिंदे बोलत होते.

कार्यक्रमास डॉ.जयराम खोत, रवी सूर्यवंशी, नानासाहेब गोपाळगरे, केशव वनवे, ॲड. सुभाष जायभाय, सचिन घुमरे, महेश काळे, गणेश लचके, मच्छिंद्र गीते, प्रशांत कांबळे आदी उपस्थित होते.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, दौंडाचीवाडी-तरडवाडी व वंजारवाडी-तित्रंज या गावांची अनेक दिवसांची रस्त्यांची मागणी होती. हा रस्ता पूर्ण करण्याबाबत दिलेल्या शब्दाची पूर्तता आज या निमित्ताने पूर्ण होत आहे. गतकाळात तालुक्याच्या विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या १०० कोटी रुपयांच्या विकास निधीमध्ये या गावांचाही समावेश करण्यात आला होता. सुमारे पावणे सहा कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याकडे गावकऱ्यांनी जबाबदारीने लक्ष द्यावे.  गावाच्या स्मशानभूमीसाठी रस्ता, पेव्हर ब्लॉकची कामेही येत्या काळात करण्यात येतील. खर्डा-सोनेगाव रस्त्याचे खडीकरणाचे काम पूर्ण झाले असुन त्याठिकाणी डांबरीकरणाची कामे करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. जयराम खोत यांनी प्रास्ताविक केले.

०००

 

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार दि. ६ (जिमाका): गेल्या चार – पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाल्याने आतापर्यंत राज्यातील २४ जिल्हे १०३ तालुके अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात हजारो एकरांवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना अधिकाधिक मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के.ठाकरे, तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व गावकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत, काही ठिकाणी एक दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. येत्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीतचा संपूर्ण राज्याचा आराखडा आपल्यासमोर येईल. हा आराखडा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्रिमंडळासमोर सादर करून शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिकाधिक मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, गंगापूर आंबापूर अशा तीन गावांमध्ये वादळ, गारपिट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे उद्या (७ एप्रिल २०२५) नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याशी या परिस्थितीवर चर्चा करून केंद्र सरकारकडेही मदत मागणीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे, त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी थेट शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांनी शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्याबाबात आश्वस्त केले.

०००

जागतिक आरोग्य दिनी विविध आरोग्य योजनांचा शुभारंभ

मुंबई, दि.: जागतिक आरोग्य दिनानिमित्त उद्या ७ रोजी महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा – २०२५ व विविध आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट मुंबई येथे होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती, प्रा. राम शिंदे, कौशल्य रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवाचे आयुक्त तथा मुंबई राष्ट्रीय अभियानाचे संचालक अमगोथ रंगा नायक, राज्य कामगार विमा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, मुंबई आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

‘आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य’ या जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषवाक्यानुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून राज्यातील जनतेला अधिक पारदर्शक, जलद, सक्षम आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे त्यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभाग नवीन आरोग्य सेवा योजनांचा शुभारंभ करत आहे. यावेळी आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्र आरोग्य सन्मान व पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे.

खालील आरोग्य सेवा योजनांचा होणार शुभारंभ

  • e-Sushrut (HMIS System) संकेतस्थळाचे विस्तारीकरण शुभारंभ.
  • महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी प्रणालीचे (Bombay Nursing Home Act) ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण शुभारंभ.
  • राज्यातील 6 जिल्ह्यांत 6 आरोग्य संस्थांमध्ये डायलिसीस युनिटचा शुभारंभ.
  • राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामाच्या ऑनलाईन संनियंत्रण व पाठपुरावा सॉफ्टवेअरचे उद्घाटन.
  • गर्भाशयमुख कर्करोग जनजागृती (9 ते 14 वर्षे वयोगट) अभियान – कर्करोगासंबंधी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी.
  • महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ – आता कामगारांसहित सर्वसामान्य जनतेसाठीही खुली.
  • महाराष्ट्र राज्यात सीपीआर प्रशिक्षणाचे उद्घाटन व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण.
  • आरोग्य सेवा निरीक्षण प्रणालीचा शुभारंभ.
  • महाराष्ट्र आरोग्य सन्मान 2025 पारितोषिक वितरण आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आरोग्य संस्थांचा सन्मान.

०००

शेतकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ०६: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, या सुविधांचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी शहरातील रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र, शारदा प्रागंण शाळा, वसंतराव पवार नाट्यगृह, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ विश्रामगृह येथील विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी प्रादेशिक रेशीम सहायक संचालक कविता देशपांडे, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,जिल्हा रेशीम अधिकारी संजय फुले, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी पंकज भुसे आदी उपस्थित होते.

वसंतराव नाट्यगृह परिसरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेता  सुरक्षिततेच्यादृष्टीने विद्युत रोहित्र आणि संरक्षक भिंतीचे कामे करावीत. परिसरातील बैठक व्यवस्था, पायऱ्या, वाहनतळ तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान बालके यांचा विचार करुन फरशा बसवाव्यात.

शारदा प्रागंण शाळेचे काम करतांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या नियमांचे पालन करावे.  विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करण्यात यावा.

एमआयडीसी विश्रामगृहाच्या दर्शनी भागात विभागाचा लोगो लावावा. लाकडी साहित्याला वाळवी प्रतिबंधक कीटकनाशकाचा वापर करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

तालुक्यात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

०००

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.०६: दिव्यांगांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील १ टक्के निधी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आली असून आगामी काळात दिव्यांगांना सोई-सुविधेकरीता लागणाऱ्या निधीची कमतरता पडू देणार नाही; या माध्यमातून दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यशासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पंचायत समिती बारामती येथे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिणींना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, अष्टावधानी संतुलन फाउंडेशनचे भाऊसाहेब जंझिरे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, दिव्यांग बंधू-भगिणी आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. दिव्यांगांना स्वावलंबनासाठी लागणारी संसाधने आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्यास ते देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आपले योगदान देवू शकतात. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व जिल्ह्याकरीता जिल्हा वार्षिक योजनेसाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी १ टक्के रक्कम दिव्यांगांकरिता खर्च करण्याचे या वर्षापासून बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती सुरु करण्यासाठी, कृत्रिम अवयव, साधने विकत घेण्यासाठी आणि स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना राबविण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल. राज्यातही केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांगाना अधिक सोई-सुविधा मिळण्याच्यादृष्टीने विधायक सूचना कराव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

दिव्यांगांना सुलभरित्या दळणवळणाची सोय व्हावी, त्यांचे दैनंदिन जीवन सुखर करण्याकरिता अष्टावधानी संतुलन फाउंडेशनच्यावतीने १०० दिव्यांग नागरिकांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून जंझिरे कुटुंबिय आपली सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवाना मदत करीत आहे, याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. दिव्यांगांनी या सायकलीचा आपल्या व्यवसायात उपयोग करुन आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावा.

तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून त्याच्या देखभाल दुरुस्तीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. ही विकासकामे सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी बारामतीकरांची आहे. शहरात विविध ठिकाणी गाळे उभारण्यात आले असून त्यापैकी काही दिव्यांगांना देण्याचा विचार आहे. यातून त्यांना व्यवसाय उभारता येईल.

नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, कायद्याचे पालन न करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

०००

अ‍ॅड. एस. के. जैन यांचे विविध क्षेत्रातील कार्य पुण्याच्या सामाजिक विकासाला पूरक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

पुणे दि.५: समाजाचं समाजाला परत देण्याची भावना नेहमी अंगीकारणारे नामवंत ज्येष्ठ वकील एस. के. जैन यांचे कार्य पुण्याच्या सामाजिक विकासाला पूरक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ज्येष्ठ वकील अ‍ॅड. एस. के. जैन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शिवाजीनगर येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, नगर विकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्राचे महा अधिवक्ता बिरेंद्र सराफ, सौ. पुष्पा जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, एस. के. जैन यांनी वकिली क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळविला आहे. वकिली करीत असताना त्यांनी अनेक वकील घडविले.  आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांना अधिकार आणि जबाबदाऱ्या देऊन मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. वकिलीसोबतच त्यांनी अनेक क्षेत्रात काम करत असताना विश्वस्ताची भावना कधीही सोडली नाही, आपण मालक नसून विश्वस्ताची जबाबदारी पार पाडत आहोत असे मानून, आपल्याला जी जबाबदारी दिली ती लोकाभिमुख कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी काम केले. श्री जैन यांचा संपर्क व्यापक असून त्यांनी गरजूंना नेहमी मदतीची केली आहे.

याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अ‍ॅड.एस के जैन यांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एस के जैन यांना सन्मानपत्र देऊन गौरव  करण्यात आले.

श्री. जैन मनोगतात म्हणाले, हा सत्कार माझा नसून सर्व समाजसेवकांचा सत्कार आहे. समाजाने मला खूप दिलं आहे ते कधीही विसरण्यासारखं नाही. त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. जैन यांच्या कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विधीज्ञ, समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 5 :  कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देण्यासाठी इन्यक्युबेशन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. अशा कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भांडवल पुरविण्याच्या दृष्टीने राज्याने भारतीय लघु उद्योग विकास बँकेसोबत 100 कोटी रुपयांच्या निधीअंतर्गत निधी तयार केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांनो, आपल्या प्रकल्पांपुरते मर्यादित न राहता कल्पनामधील त्रुटी शोधा, यशस्वी उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या मागणीप्रमाणे व्यवसायिक आणि कौशल्याधिष्ठित मॉडेल तयार करा, याकरिता केंद्र व राज्य शासन आपल्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ मैदान, शिवाजीनगर येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, सीओईपी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र व गोवा आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डीपेक्स-२०२५’ राज्यस्तरीय चलप्रतिकृती प्रदर्शनाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या दशकापासून तरुणांमधील ज्ञान, कौशल्य आणि त्यांच्यामधील नाविन्यता एकत्रित मांडण्याची संधी ‘डीपेक्स’च्या माध्यमातून मिळत आहे. या मंचावरील संकल्पना विविध प्रयोगामध्ये रूपांतरित झाल्या आहेत.

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी

तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी तंत्रज्ञानाने उपलब्ध होत आहे. आज छोटीशी कल्पना व्यवसायिक संधीमध्ये परावर्तित होत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्र ही स्टार्टअप जननी आहे. तसेच स्टार्ट अप इंडियाचा अहवालानुसार देशात सर्वाधिक स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून होणारी गुंतवणूक असल्यामुळे देशाची स्टार्ट अप राजधानी ही महाराष्ट्र आहे.

‘विकसित भारत -2047’ या संकल्पेच्या मुळाशी देशातील युवाशक्ती व नवोन्मेषक

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत -2047’ या संकल्पेच्या मुळाशी देशातील युवाशक्ती व नवोन्मेषक होते. हीच युवाशक्ती देशाला विकासाकडे नेईल. ‘मेक इन इंडिया-मेक फॉर वर्ड’ च्या माध्यमातून इतर कुठल्याही देशाकडे नसलेले विविध उच्च प्रतीचे साहित्य आपल्या देशात तयार होत आहे. संरक्षण क्षेत्रात सुमारे ३० ते ३५ हजार कोटी रुपयांचे संरक्षण साहित्य भारत देश जगाला निर्यात करीत आहे. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न बघतांना स्वावलंबी भारत, स्वयंपूर्ण भारत आणि आत्मनिर्भर भारत अत्यंत महत्वाचा आहे. आत्मनिर्भर भारताकडे जात असताना तंत्रज्ञानयुक्त स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून नाविन्यता महत्त्वाची आहे. यामुळे  देशात आज विविध यशस्वी स्टार्टअप बघायला मिळतात. प्रत्येक टाकाऊ वस्तू ही उर्जा निर्मितीचे साधन आहे, त्यामुळे  विविध नवनवीन प्रयोग,  र्स्टाट अप आणि तंत्रज्ञानाद्वारे त्यावर प्रकिया करुन ऊर्जा निर्मिती भर देण्यात आहे, यामुळे रोजगाराला चालना मिळत आहे. टाकाऊ वस्तूपासून पुनर्वापर त्यामाध्यमातून शाश्वत विकास हेच विकसित भारताचे उद्दिष्ट आहे.

स्टार्टअपच्या परिसंस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा नाविन्यतेवर भर

आज टियर 2 आणि टियर 3 शहरामधील औद्योगिक संस्था, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी शाखेत विद्यार्थी मोठ्याप्रमाणात स्टार्टअप परिसंस्थेच्या माध्यमातून नाविन्यतेवर भर देत आहे. ते गटस्वरुपात कल्पना उदयास आणून इज ऑफ लिव्हिंग, इज ऑफ बिझिनेस तयार होतात. इज ऑफ लिव्हिंगसोबतच व्यवसायिक कल्पनेत परिवर्तन केल्यास स्वत:सोबतच अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देता येते.

ऊर्जा सुरक्षिततेकडे भारताची वाटचाल

इथेनॉल, सौर उर्जेच्या माध्यमातून ऊर्जा सुरक्षिततेकडे भारताची वाटचाल सुरु आहे. सौर उर्जेकरिता लागणारे सर्व साहित्य देशात निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे, पुढच्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना लागणारी १६ हजार मेगावॅट वीज सोलरच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळाल्यामुळे त्यांच्या पैशांची तसेच अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शासनाच्या अनुदानातही बचत होणार आहे. यातून दरवर्षी विजेच्या दरात होणारी वाढ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न करीत आहोत. नाविन्यतेच्या माध्यमातून स्वच्छ उर्जा, हरीत उर्जेकडे वाटचाल होत आहे.

उर्जा क्षेत्रात ‘नेट झिरो’कडे जाण्याचा शासनाचा प्रयत्न

पारंपरिक स्त्रोतातून  निर्माण होणाऱ्या वीजेमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत आहे. वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या परिणाम लक्षात घेऊन हरीत उर्जेद्वारे कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणायचे आहे.  राज्याला लागणाऱ्या विजेपैकी सन 2030 पर्यंत 52 टक्के वीज अपारंपारिक स्त्रोतून निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. हरित ऊजेच्या माध्यमातून २०४७ पर्यत ऊर्जा क्षेत्रात ‘नेट झिरो’कडे जाण्याचा प्रयत्न आहे,असेही श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डीपेक्स-२०२५- प्रोजेक्ट डिरेक्टरी’चे विमोचन करण्यात आले. तसेच त्यांनी प्रत्यक्ष दालनात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रोजेक्टबाबत माहिती घेत आहेत.

सृजनचे विश्वस्त डॉ. भरत अमळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी ‘डीपेक्स २०२५’ स्वागत समिती अध्यक्ष डॉ. प्रकाश धोका, सचिव प्रसेनजीत फडणवीस, निमंत्रक संकल्प फळदेसाई, अथर्व कुलकर्णी महाविद्यालयांचे कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ५  :  प्रभू श्रीरामांना आपण सर्वजण ईश्वररुपी मानतो. त्यांनी देवत्वाचा वापर न करता पशु, पक्षी व वानर यांची मदत घेऊन विश्वातील मोठी आसुरी शक्ती असणाऱ्या रावणाचा नि:पात केला. सर्वसामान्य माणूस सत्यासाठी लढला तर त्याचा विजय निश्चित आहे हे प्रभु श्रीरामांनी करुन दाखविले आहे. प्रभू श्रीरामांनी खऱ्या अर्थाने माणसांना जीवन जगण्याचे मूल्य दिले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सखी गीतरामायण व सीता स्वयंवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पुजन केले. या प्रसंगी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार  भीमराव तापकीर, हेमंत रासने, सद्‌गुरु शंकर महाराज मठाचे अध्यक्ष डॉ. मीहिर कुलकर्णी, चित्रा देशपांडे आदी उपस्थित होते.

युगपुरुषांमध्ये  प्रभू श्रीराम यांना अनन्य साधारण महत्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्रीरामांचे आयुष्य हे वेगवेगळ्या स्वरुपाचे राहिले आहे. त्यांच्यामध्ये बुद्धीमत्ता, स्थिरता, संस्कार, उत्कृष्ट शासक असे अनेक गुण होते. त्यांनी घालून दिलेल्या मुल्यांवर आपण जीवन जगले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

गीत रामायण हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. रामायणातील रामचरित्रातील विविध प्रसंगांवर ग.दि. माडगूळकर यांनी रचना केल्या आहेत व त्याला तितक्याच सुमधूर चाली सुधीर फडके बाबुजींनी दिल्या आहेत. या गीतरामायणामध्ये आनंद, दुख, अश्रु व हास्य यासह विविध भावना पहायला मिळतात. रामनवमीच्या पूर्वसंध्येला पुण्यात गीतरामयणाचा कार्यक्रम होत असल्याचा आनंदही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ. मिहिर कुलकर्णी  यांनी केले तर सूत्रसंचालन सुप्रिया गोडबोले यांनी केले. या गीतरामायण कार्यक्रमास नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मेरीटाइम दिनानिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ५ – राष्ट्रीय मेरीटाइम दिनानिमित्त राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज इंडियन सेलर्स होम, मस्जिद बंदर, मुंबई येथे भेट देऊन प्रथम व द्वितीय महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्य सचिवांनी यावेळी संपूर्ण परिसराची पाहणी करून नौसैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचे कौतुक केले. तसेच त्यांनी समुद्री क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधून नौसैनिक व शिपिंग उद्योगाशी संबंधित विविध समस्यांविषयी जाणून घेतले.

राष्ट्रीय मेरीटाइम दिन समारंभ (केंद्रीय) समितीच्या वतीने ६२ व्या राष्ट्रीय मेरीटाइम दिनानिमित्त पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता. महासंचालक (शिपिंग) आणि केंद्रीय मेरी टाईम दिन समारंभ समितीचे अध्यक्ष श्याम जगन्नाथन, उप महासंचालक (शिपिंग) व समितीचे सदस्य सचिव डॉ. पी.के. राऊत आदी या समारंभास उपस्थित होते. शिपिंग क्षेत्रातील प्रतिनिधींनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. डॉ. राऊत यांनी यावेळी इंडियन सेलर्स होम सोसायटी व स्मृती सभागृहाविषयी माहिती दिली.

वाढवण बंदराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन सहकार्य करीत असल्याचे सांगून मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी उपस्थितांना मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील परिसराच्या भविष्यकालीन विकासासाठी नव्या कल्पना देण्याचे आवाहन केले. मुंबई परिसरात जहाज बांधणीसाठी सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने दिला आहे, या उपक्रमात समुद्री उद्योगाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. समुद्री शिक्षणाबद्दल जनजागृती वाढवण्याच्या उपक्रमांचे कौतुक करून मुंबईत कार्यरत असलेल्या विविध विदेशी दूतावासांना समुद्री उद्योगासोबत चर्चा करण्यासाठी एका व्यासपीठावर आणण्याची त्यांनी तयारी दर्शवली.

इंडियन सेलर्स होम विषयी

इंडियन सेलर्स होम सोसायटी, मुंबई हे भारताच्या नौदलातील सागर वीरांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे, ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली. ही इमारत मस्जिद बंदर सायडिंग रोड आणि ठाणे स्ट्रीट यांच्या दरम्यान असलेल्या जागेवर बांधण्यात आली आहे.

या ‘होम’चा मुख्य भाग म्हणजे स्मृती सभागृह. या सभागृहाच्या भिंतींवर १२ कांस्य (ब्रॉन्झ) चे फलक लावलेले असून या फलकावर पहिल्या महायुद्धात प्राणत्याग केलेल्या भारतीय खलाशांची नावे दर्शविलेली आहेत.

या फलकांच्या वर खोदकाम केलेला एक कांस्य लेख आहे, ज्यात ‘येथे शाश्वत सन्मान आणि स्मरणार्थ २२२३ नौसैनिकांची नावे नोंदवली गेली आहेत  – रॉयल नेव्ही, रॉयल इंडियन मरीन व मर्चंट नेव्ही- जे ग्रेट वॉरमध्ये वीरमरण पावले आणि ज्यांचे समाधीस्थळ म्हणजे समुद्र आहे.’ १९१४-१९१८.

हा फलक इंग्लंडमध्ये तयार करण्यात आला असून इंपीरियल वॉर ग्रेव्ह्ज कमिशन (आताचे कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशन) यांनी प्रदान केला आहे.

या ‘होम’चे बांधकाम नोव्हेंबर १९३० मध्ये सुरू झाले आणि १४ जानेवारी १९३१ रोजी तत्कालीन मुंबईचे राज्यपाल सर फ्रेडरिक ह्यू सायक्स यांच्या हस्ते पायाभरणी झाली.

कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह्ज कमिशन ने १९६२ मध्ये हॉलमध्ये एक नवीन स्मारक जोडले, जे १९३९-४५ च्या दुसऱ्या महायुद्धात समुद्रात मृत्यू पावलेल्या रॉयल इंडियन नेव्हीचे ४३८ व भारतीय मर्चंट नेव्हीचे ६,०९३ अशा एकूण ६,५३१ खलाशांचे स्मरण करते. हे स्मारक हॉलच्या मध्यभागी काच झाकलेल्या कांस्य पेटीच्या स्वरूपात आहे. यामध्ये नावांचे पुस्तक आहे, जे मार्बलच्या पायथ्यावर ठेवलेले आहे. हे पुस्तक हिंदी भाषेत मुद्रित आहे. त्यावरील समर्पणात लिहिले आहे: ‘हे पुस्तक त्या ६५०० नौसैनिकांची व मर्चंट नेव्हीतील खलाशांची नावे धारण करते, जे आपल्या मातृभूमीसाठी सेवा करताना मृत्युमुखी पडले व ज्यांचे समाधीस्थळ केवळ समुद्र आहे.’

दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या ६५३१ खलाशांचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने होम बिल्डिंगच्या समोर एक तीन मजली इमारत उभारली, जी ७०० खलाशांच्या निवासासाठी आहे. ही इमारत सीमन्स हॉस्टेल म्हणून ओळखली जाते. निवास भाग दोन विंग्समध्ये विभागलेला असून दोन्ही इमारती मिळून १०१५ सागरी कामगारांना निवास देण्याची क्षमता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 5 :- मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन करीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “श्रीराम नवमी हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या जन्माचा उत्सव असून, हा दिवस त्यांच्या आदर्श जीवनमूल्यांची आठवण करून देतो. श्रीरामांनी दाखवलेली प्रजाहितदक्षता, सत्यनिष्ठा आणि निःस्वार्थ सेवा ही आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांच्या जीवनातून आपण एकता, शांती आणि समरसतेची शिकवण घेणे आवश्यक आहे. श्रीरामनवमीचा उत्सव सर्वांनी शांततेत, उत्साहात, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि सलोख्याने साजरा करावा,” असे आवाहन करीत उपमुख्यमंत्री अजित पवार केले प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन केले आहे.

ताज्या बातम्या

सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २१, (जि. मा. का.) : कोविड पासून सर्वजण वैद्यकीय सेवेच्या बाबतीत सतर्क झाले आहेत. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी व उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद...

0
मुंबई, २१ : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी – गरजू रुग्णांसाठी विश्वासार्ह आधार

0
भारतातील ग्रामीण, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता...

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते २२ जुलै रोजी प्रकाशन

0
मुंबई, दि. २१ :-  मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २१ :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या...