गुरूवार, जून 5, 2025
Home Blog Page 149

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २: उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात  सामंजस्य करार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरेल. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सिंहगड शासकीय निवासस्थान येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, बोर्ड ऑफ ॲप्रेंटीसशिप ट्रेनिंगचे संचालक पी. एन. जुमले यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

नॅशनल एप्रेटीसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, त्यातील ५० टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

संचालक पी. एन. जुमले म्हणाले की, पूर्वी केवळ अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीच ॲप्रेंटीसशिप उपलब्ध होती. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत सर्व पदवीधर आणि डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनाही ॲप्रेंटीसशिप संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील १० विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांसाठी भव्य मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी यावेळी दिली.

000

काशीबाई थोरात/विसंअ

भारतीय शल्यविशारदांना ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ पुरस्कार प्राप्त; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शल्यविशारदांचा सत्कार

मुंबई, दि. २ : सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES – Society of American Gastrointestinal & Endoscopic Surgeons) परिषदेचे १२ ते १५ मार्च २०२५ या कालावधीत लॉन्ग बीच, लॉस एंजेलिस, अमेरिका येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ हा पुरस्कार भारताला मिळाला. हा पुरस्कार मिळणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानिमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शल्यविशारदांचा सत्कार करुन कौतुक केले.

मंत्रालय येथील वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या दालनात हा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले आदी उपस्थित होते.

सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) ही एक आघाडीची आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सा संघटना असून, मिनीमल अक्सेस (Minimal Access) व लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसंबंधीचे संघटनेकडून प्रस्थापित प्रोटोकॉल संपूर्ण जगभरात प्रमाण मानले जातात. ही संस्था दरवर्षी शैक्षणिक परिषदांचे आयोजन करते तसेच संशोधन व नाविन्यपूर्ण उपचार पद्धतींना प्रोत्साहन देते. या सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन (SAGES) २०२५ परिषदेसाठी ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज जी समूह रुग्णालये, मुंबई येथील १३ शस्त्रक्रिया व्हिडिओ सादर करण्यात आले होते. ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालये (ग्रँट मेडिकल कॉलेज) जगातील या प्रमुख परिषदेतील सर्वाधिक व्हिडिओ सादरीकरण आणि स्वीकृती मिळवण्याचा मान मिळवला आहे, अशी माहिती पुरस्कार प्राप्त डॉ. गिरीश बक्षी यांनी यावेळी दिली.

सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ॲण्ड एंडोस्कोपिक सर्जन परिषदेत शल्यचिकित्साशास्त्र विभागातील अध्यापक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कार्य

प्रोफेसर डॉ. अजय भंडारवार –प्यूट्झ जेघर्स सिंड्रोम (Peutz-Jeghers Syndrome) मध्ये आंत्र संरक्षक शस्त्रक्रियेचा बॉवेल प्रिर्झविंग सर्जरी (Bowel Preserving Surgery) संकल्पना प्रथमच वैद्यकीय साहित्यात मांडली. ही नवी शस्त्रक्रिया तंत्रज्ञान भविष्यकालीन उपचार पद्धतींवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकेल. तसेच, आयएसजी (ICG) कांटिफिकेशन तंत्र विकसित केले, जे आंत्र जोडणीतील गळती ॲनास्टोमोटिक बॉवेल लेक (Anastomotic Bowel Leak) आणि गुंतागुंतीचे परिणाम अचूक ओळखण्यास मदत करेल. यामुळे रुग्णांचे मृत्यूदर व गुंतागुंत टाळता येईल आणि उपचाराचे परिणाम सुधारतील.

डॉ. गिरीश बक्षी – संशोधन प्रकल्पाची रूपरेषा तयार केली आणि डॉ. भंडारवार यांना शस्त्रक्रियेत मदत केली. तसेच, त्यांनी संशोधन विश्लेषण करून अंतिम अहवाल तयार केला.

डॉ. वरूण दत्तानी – वरील दोन विषयांवर संशोधन सादरीकरण केले आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ॲबस्ट्रॅक्ट हा पुरस्कार जिंकला. त्यांच्या सादरीकरणांनी मध्ये पहिले आणि तिसरे पारितोषिक मिळाले.

डॉ. मनीष हांडे – बॉडी पॅकर सिंड्रोम (Body Packer Syndrome) वरील संशोधन सादर केले, जिथे अतिशय कमी आक्रमक तंत्राचा वापर करून रुग्णाच्या शरीरातून ड्रग पेलेट काढण्यात आला. हा उपचार पहिल्यांदाच वैद्यकीय साहित्यात नोंदवला गेला असून, त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

पुरस्कार श्रेणीतील सात पोडियम सादरीकरणात दोन सादरीकरणे सर ज.जी. रुग्णालयांमधील होती. ज्यामध्ये रुग्णसेवेसाठी नाविन्यपूर्ण आणि सुधारित शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे.

या परिषदेत प्राप्त यशामागे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मोलाचे योगदान आहे. यासाठी पुरस्कार प्राप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

0000

अर्चना देशमुख/विसंअ/

लातूर जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण करावे – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 2 : लातूर येथे भव्य विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठीची कार्यवाही जलद गतीने करावी. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रीडापट्टूंसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही टप्प्या-टप्प्याने विकास करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

जिल्हा क्रीडा संकुलाचा पुनर्विकास व लातूर येथील विभागीय क्रीडा संकुल उभारणीस गती देणेबाबत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार अमित देशमुख, क्रीडा व युवक कल्याणचे सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उप जिल्हा क्रीडा अधिकारी संगीता टकले आदिसह अधिकारी उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले की, जिल्हा क्रीडा संकुलाचे अद्यावतीकरण व नवीन क्रीडा सुविधा निर्माण  करण्याकरिता प्रत्यक्ष जागेची पाहणी करून, मुलभूत सेवांना प्राधान्य देण्यात यावे. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने अद्ययावतीकरण करण्यात यावे. तसेच प्रेक्षा गॅलरीची उभारणी आणि जुन्या प्रेक्षा गॅलरीस शेड उभारण्यात यावी. यासाठी अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही त्वरीत करावी.

याचबरोबर नांदेड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांसाठी विभागीय क्रीडा संकुल लातूर येथे उभारण्यात येणार आहे. तसेच इतर विभागीय क्रीडा संकुलासाठी उपलब्ध सोयी-सुविधांचा अभ्यास करून त्याच धर्तीवर विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भातील कार्यवाही करण्याच्या निर्देशमंत्री भरणे यांनी दिले.

आमदार अमित देशमुख यांनी क्रिकेट प्रबोधिनी उभारणे, क्रीडा संकुलाचा रस्ता, अल्पसंख्यांक वर्गातील मुलांचे वसतीगृह यासंदर्भात सूचना केल्या. यासंदर्भात क्रीडा मंत्री भरणे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

‘बालचित्रकला स्पर्धे’च्या बक्षीस रक्कमेत वाढ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,दि.२ : कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कलानिर्मितीच्या क्षेत्रात पारंगत बनविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे,  कलात्मक विचार आणि सृजनशीलतेला चालना देणे देऊन आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे असते त्यामुळे बालचित्रकला स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या बक्षीसांमध्ये वाढ करण्यात आली असून  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुधारित बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व इतर तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील  यांनी दिली.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेची द्वितीय बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

राज्यस्तरीय बक्षीस : अनुक्रमे 10 हजार, 5 हजार, 2 हजार ५००, १ हजार  असे असून  जिल्हास्तरीय बक्षीस : प्रथम  २ हजार, द्वितीय १ हजार, तृतीय ५०० तर चौथे २५० रुपये असणार आहेत.

शासकीय रेखाकला परीक्षेच्या बक्षीस रकमेतील वाढ

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षांसाठी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना दिली जाणारी बक्षीस रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. नवीन सुधारित बक्षीस रक्कम एकूण ₹४ लाख रुपये२० हजार एवढी असणार आहे.

शासकीय उच्चकला परीक्षेस मान्यता

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनमान्य अभ्यासक्रमांच्या मान्यता प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली आहे  तसेच वित्तीय नियमन आणि अर्थसंकल्प मंडळाच्या वित्तीय नियमावलीस तसेच वित्तीय वर्ष २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे

शैक्षणिक शुल्क निश्चिती

विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संस्थांमधील अभ्यासक्रमांचे तात्पुरते (Ad-hoc) शुल्क निश्चित करण्याचा अधिकार शुल्क निश्चिती समितीला देण्यात आला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या आधारावर पदविका अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कला पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी आता तीन वर्षांचा करण्यात येणार आहे. तसेच कला शिक्षण संस्थांची संलग्नता सर्व शासनमान्य कला परिसंस्थांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत मंडळाची संलग्नता घेणे बंधनकारक राहणार आहे.

फोटोग्राफी अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

फोटोग्राफी अभ्यासक्रम यापूर्वी सर ज.जी. उपयोजित कला या संस्थेमध्ये सुरू होता. परंतू तो सध्या बंद आहे. अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन फोटोग्राफी अभ्यासक्रम एक महिन्याच्या आत सुरू करण्याच निर्णय घेण्यात आला आहे.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

‘खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती संकुला’स १० कोटींचा निधी वितरीत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 2 : कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने ऑलिम्पिक पदक प्राप्त करून, जगात देशासह राज्याचे नाव उज्वल केले. त्यांच्या नावाने कुस्ती संकुल उभारणे अत्यंत अभिमानास्पद असून, यासाठी 10 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तातडीने वास्तुविशारदांमार्फत आराखडा तयार करून बांधकाम सुरू करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात दिवंगत कुस्तीपट्टू खाशाबा दादासाहेब जाधव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी तालुका संकुल समितीचे सदस्य रणजित खशाबा जाधव, प्रियांका जाधव, भारती जाधव, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, सहसंचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, तहसिलदार कल्पना ढवळे, उपअधिक्षक भुमी अभिलेख प्रविण पवार उपस्थित होते.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कुस्ती संकुल उभारण्यासाठी नजिकच्या गावाची हद्द असलेली जमीन वर्ग करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. तसेच संकुलासाठी निधी वितरीत करण्यात आला असून, तातडीने बांधकामास सुरुवात करावी. पुढील निधी टप्प्याटप्प्याने वितरीत करण्यात येणार असून, या कामास गती देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ :- राज्यात शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा ही संकल्पना व्यापक प्रमाणात यशस्वी ठरली असून या अंतर्गत विविध विभागांमार्फत आतापर्यंत ४११ कामांसंदर्भातील कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली ३७२ कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ८५ टक्के कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. सर्व विभागांनी येत्या १ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने शंभर दिवस कार्यक्रमाची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे शंभर दिवस कृती कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठक मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागांचे मंत्री, संबंधित अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शंभर दिवसांसाठीचा कृती आराखडा कार्यक्रम विभागांनी गांभीर्याने यशस्वी केला आहे. अनेक  विभागांनी यामध्ये उत्तम काम केले आहे. नागरिकांना या माध्यमातून उपयुक्त आणि तत्पर सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शंभर दिवसांसाठी कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. येत्या 1 मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर विभागांनी संकल्पित केलेली कामे व पूर्ण झालेली कामे याची माहिती उपलब्ध करुन द्यावी. त्यासोबतच काही कार्यवाही अपूर्ण राहिली असतील तर त्याची कारणे संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही श्री. फडणवीस  यांनी यावेळी दिल्या.

विभागांनी गतीमानतेने लोकोपयोगी कामे गुणवत्तेसह आणि कालमर्यादेत पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या पत्रांवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी विभागांनी आपल्यास्तरावर यंत्रणा कार्यान्वित करावी. उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या यशस्वी अमंलबजावणीसाठी तांत्रिक, प्रशासकीय आणि इतर अनुषंगिक बाबींची तातडीने पूर्तता करावी. विभागांनी उपलब्ध निधीचा सुयोग्य वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

बैठकीत एकूण 26 विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांचे 938 मुद्द्यांपैकी 411 मुद्द्यांवर (44%) पूर्णतः काम झाले आहे. तसेच, 372 मुद्दे (40%) अंतिम टप्प्यात असून ते निश्चित वेळेत पूर्ण होतील. 155 मुद्दे प्रगतीपथावर आहेत. या कामांच्या पूर्ततेबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित विभागांनी दिली. त्यासाठी त्यांना 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ श्री.शिंदे म्हणाले, शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी गतीमान काम करुन लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अनुभव जनतेला दिला आहे. त्यातून  शासनाप्रती जनतेमध्ये चांगला दृष्टीकोन तयार होत आहे. शंभर दिवस कार्यक्रम ही संकल्पना अंत्यत उपयुक्त असून जिल्हास्तरावरही चांगला बदल होत आहे. अनेक प्रकल्प, मोठी कामे शंभर दिवसाच्या कालावधीत साकारली आहेत. त्यासोबत अनेक विभागांच्या सेवा ऑनलाईन झाल्या आहेत, त्याचा जनतेला विशेष लाभ होत आहे. या सर्व उत्तम कामगिरीसाठी उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विभागांचे अभिनंदन केले.

००००

वंदना थोरात/विसंअ

विमानतळ, रेल्वे तसेच महत्त्वाच्या प्रलंबित कामांना गती देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही

बीड दि. 02 (जिमाका):- बीड जिल्हयातील विमानतळ, रेल्वे कामाची सद्यस्थिती, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, शिक्षण विभागाचे नवोपक्रम, इनक्यूबेशन सेंटर तसेच तारांगण, विद्युत वितरण, जिल्हयात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आज उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. बीड जिल्हयांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व सर्व मिळून काम करू, विमानतळ, रेल्वे तसेच महत्वाच्या प्रलंबित कामांना गती देण्यासोबतच विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, सर्वश्री आमदार सतिष चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडीत, उपमुख्यमंत्री यांचे सचिव राजेश देशमुख, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य जीवने यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बीड जिल्हयांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व आपण सर्व नागरिक यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. राज्य शासनाकडून जिल्हयातील विकासकामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशी ग्वाही देतानाचा त्यांनी सांगितले की, अनेक वर्षापासून रेल्वेमार्गाच्या सुरू असलेल्या कामाला गती देण्यात येईल. विभागीय आयुक्त बीड रेल्वेबाबत दर महिन्याला आढावा घेतील. रेल्वे मार्गाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, अशा प्रकरणी थेट सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतचे गुन्हे नोंदविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

विमानतळासाठी आवश्यक जागा बीड शहरापासून 14 किमी अंतरावर असलेल्या कामखेडा नजीक निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे तसेच विमानतळ सेवा गतीने पूर्ण करण्यात येईल, विमातळाबाबतच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आष्टी येथील वीज उपकेंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश देत उपमुयमंत्री श्री. पवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात 2 कोटी घरकुल देण्याची योजना आहे, त्यात राज्यात 20 लाख घरकुल देण्यात येणार आहेत, बीड जिल्हयात सद्यस्थितीत 85 हजार घरकुलाचे काम सुरू आहे, येत्या कालावधीत 75 हजार घरकुले पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवून काम करूया. दिवाळी नव्या घरकुलात या उपक्रमाची सुरूवात श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आली. शासकीय निधीची वाट न पाहता घरकूल उभारणाऱ्या 10 कुटुंबाचा यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान गुणवत्ता विकास अभियान 2025 या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधला जाणार आहे. विद्याथ्यांमध्ये झालेल्या शैक्षणिक सुधारणांतून भावी पिढी चांगली तयार व्हावी, या हेतूने संपूर्ण जिल्हयात हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक वर्गासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण मिळावे यासाठी 30 लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात गरज भासल्यास सीएसआर तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याचीही आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. शालेय परिसर संरक्षक भिंत, शौचालय, अंगणवाडी तसेच शैक्षणिक विकासाला सर्वाच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही असल्याचे श्री. पवार म्हणाले.

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपल्या जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था चांगली रहावी यासाठी पोलीस प्रशासनासोबतच आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनाला आवश्यक असलेला निधी तातडीने देण्यात येईल. पायाभूत सुविधा, वाहने तसेच पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक त्या बाबींची तातडीची गरज पूर्ण करण्यासाठी 16 कोटी 34 लाख रूपयांचा निधी देण्यात येत असल्याचेही श्री.पवार म्हणाले. जिल्हयात यापूर्वी देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचीही पुन्हा पडताळणी करण्यात यावी. गरज तपासूनच शस्त्र परवाना देण्यात यावा,असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या वर्षात 50 वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक निधी शासन स्तरावरून देण्यात येईल. बीडसह लगत असलेल्या परभणी, लातूर व धाराशिव या चार जिल्हयातील रुग्णांची संख्या पाहता सर्व सुविधाही देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

मराठवाड्यातील पहिले कौशल्यवर्धन केंद्र

शहराच्या मध्यवर्ती भागात आय. टी. आय. च्या तीन एकर परिसरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहे. (Incubation center) टाटाच्या सहकार्याने हे केंद्र आकारास येईल. कंपनीतर्फ १६५.१० कोटी आणि एमआयडीसी कडून ३१.११ कोटी असे एकूण १९६.९८ कोटी खर्च करून याची उभारणी करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील हे पहिले कौशल्यवर्धन केंद्र ठरणार आहे. याआधी विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली व कोकणात रत्नागिरीत अशा केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे.

कालबद्ध निधी विनियोग

यंदाच्या आर्थिक वर्षात नियोजनपूर्ण निधी विनियोग करण्याचे संकेत श्री. पवार यांनी दिले. लवकरच याबाबत बैठक घेऊन नियोजन निधीतील सर्व बाबी व यंत्रणा यांचा आढावा घेण्यात येणार असून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता गतिमान पध्दतीने प्रदान करत डिसेंबर २०२५ पूर्वी निधी खर्च होईल तसेच काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

आकर्षक असेल तारांगण

एक उत्तम आणि अद्ययावत तारांगण उभारण्यात येणार आहे. यामध्ये सर्व जिल्हाभरातील शाळकरी मुलांना सहलीच्या माध्यमातून माहिती मिळावी हा या उभारणीचा हेतू आहे. बीड शहरात येणाऱ्या प्रत्येकासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ देखील या तारांगणाच्या रूपाने उभे राहणार आहे. येथील आयटीआयच्या मोकळ्या जागेत २० कोटी रूपयांचा निधीतून तारांगण उभारण्याची योजना आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध कलाकृती आणि जिल्हयातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती ठेवण्याचे नियोजन आहे.

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या विमानतळ, रेल्वे मार्गाची स्थिती तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत सादरीकरण केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य जीवने, जिल्हा पोलीस अधीक्षक नववीन काँवत यांनीही आपल्या विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल – मंत्री गुलाबराव पाटील

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई, दि. २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आखून दिलेल्या १०० दिवसांसाठीच्या आराखड्यात निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीस प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनचे संचालक ई. रवींद्र, सहसचिव बी.जी. पवार, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे यांची उपस्थिती होती.

SPK DGIPR Mantralay Mumbai

मंत्री श्री. पाटील म्हणाले, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या बहुतेक सर्व योजनांचे उद्दिष्ट ९० ते ९५ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष नियोजन करावे. १०० दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. विभागातील अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटींची नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी तसेच आगामी काळात शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश श्री.पाटील यांनी दिले.

बैठकीत जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेतील नळ जोडणी व नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसह योजना माहिती फलक, स्रोतांचे १०० टक्के जिओ-टॅगिंग पूर्ण करण्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच पीएम जनमन योजना, शाळांमध्ये पिण्यासाठी नळजोडणी व अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे. राज्यातील १० प्रयोगशाळा आणि अन्य उपक्रमांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्वच्छ भारत मिशन

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला. गावांना हागणदारीमुक्त करण्याच्या उद्दिष्टासह अधिक गावांना मॉडेल गाव घोषित करण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली. तसेच गोवर्धन प्रकल्प, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि इतर योजनांच्या प्रगतीचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम आढावा

१०० दिवसांचा आराखडा अंतर्गत कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेच्या अनुषंगाने गतिमान प्रशासनांतर्गत संकेतस्थळांचे सुगमीकरण, कार्यालय व स्वच्छतागृहांची स्वच्छता, नागरिकांना सेवा सुलभतेने मिळवून देणे, विविध तक्रारींचा निपटारा, अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे आदी महत्त्वाच्या विषयांवरही बैठकीत सखोल चर्चा झाली.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

लक्षवेधी प्रकरणी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

ठाणे, दि. ०२ (जिमाका): ठाणे जिल्ह्यातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शिळ, सर्व्हे नं.97/1 व 17 या एमआयडीसीचा भूखंड तसेच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे व निरजंन डावखरे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

यावेळी विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे, निरंजन डावखरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाचे कार्यकारी अभियंता आर.सी.राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, प्रादेशिक अधिकारी महेंद्र पटेल, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ठाणे महानगरपालिका अभियंता श्री.जोशी, तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, भूमी अभिलेख तसेच वनविभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी प्रत्यक्ष संबधित टीटीसी औद्योगिक क्षेत्रात मौजे शिळ येथील सर्व्हे नं.97/1 व 97 या एमआयडीसीचा भूखंड तसेच शीळ, खर्डी, खान कंपाऊंड, महापे रोड येथील अनाधिकृत बांधकामबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमावेत चर्चा करून या संदर्भात असलेल्या तक्रारींबाबत कोणत्या कायदेशीर उपाययोजना करता येतील, याबाबत आढावा घेतला.

यावेळी मंत्री नाईक म्हणाले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळ, महसूल, वन विभाग, महानगरपालिका, भूमी अभिलेख यांनी एकत्रितपणे अनधिकृत बांधकामाबाबत लवकरात लवकर प्रत्यक्ष जागेची मोजणी करुन, हद्द कायम करुन अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम होवू नये, असे माझे मत आहे. परंतु, उद्योगाचा प्रश्न असेल तर मी त्याबाबत काही निर्णय घेवू शकतो मात्र, इतर विषयाबाबत निर्णय संबधित विभागास सोबत घेऊन घ्यावा लागेल. या संदर्भात संबधित विभागाकडून कायदेशीर अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

०००

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई, दि. 2 : राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून कडक कारवाई करण्यात येते. तसेच या प्रकरणी दंडात्मक कारवाईची तरतुदही करण्यात आली आहे.

पारंपरिक मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण आणि शाश्वत मासेमारीसाठी केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने 58 प्रजातींच्या किमान कायदेशीर आकारमानाबाबत शिफारस केली आहे. त्याप्रमाणे लहान आकाराचे मासे पकडणे टाळण्यासाठी कोवळ्या माशांची मासेमारी करण्यावर कृषी व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या 2 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आदेशाने 54 प्रजातीच्या किमान कायदेशीर आकारमानाचे विनियमन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 (सुधारीत – 2021) कलम 17(8)(अ) व (ब) नुसार लहान आकाराच्या माशांची मासेमारी बंदीच्या उल्लंघनासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच याविषयी जनजागृती करण्यासाठी मासळी बाजारांमध्ये फलकही लावण्यात येणार आहेत.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिट प्रकल्पाचे निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते...

0
नवी दिल्ली, 5 : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोपर्निकस मार्कस्थित महाराष्ट्र सदनात कंपोस्ट पिटच्या प्रकल्पाचे भूमिपूजन निवास आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या...

निवडणूक आयोगाची नवी डिजिटल प्रणाली : इंडेक्स कार्ड व आकडेवारी अहवालांची जलद निर्मिती

0
मुंबई, दि. ५ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक आयोगाने निवडणुका...

आर्थर रोड कारागृह पुनर्विकासाचा सुधारित प्रस्ताव सादर करावा – गृह राज्यमंत्री योगेश कदम

0
मुंबई, दि. ५: आर्थर रोड कारागृहाचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. या कारागृहाच्या पुनर्विकासाच्या नवीन आराखड्यात कर्मचारी निवास, पुरुष, महिला, तृतीयपंथी कैदी, न्यायाधीन कैदी यांच्यासाठी ...

एकल प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

0
मुंबई, दि. 5 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी...

‘झाड’ हिरवळीसह आईच्या ममतेचे प्रतीक – केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

0
नवी दिल्ली, दि. 5 : झाड हे केवळ हिरवळीचे प्रतीक नसून ते, आईच्या ममतेने प्रतीक असल्याची भावना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जागतिक...