सोमवार, जून 16, 2025
Home Blog Page 1457

संरक्षण, सुरक्षेच्या क्षेत्रात संबंध दृढ करण्यास उत्सुक – ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अन्थोनी अल्बानीज

मुंबई, दि. ९ : संरक्षण सज्जता आणि सुरक्षेच्या क्षेत्रातील भारताशी संबंध आणखी दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत, असे ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अन्थोनी अल्बानीज यांनी आज येथे सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान श्री. अल्बानीज यांनी आज भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांतला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲडमिरल आर. हरिकुमार, व्हाईस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, कॅप्टन विद्याधर हरके, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान श्री. अल्बानीज म्हणाले की, ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांना परंपरा आहे. आम्हाला सहकार्याचे नव्या पर्वात प्रवेश करायचा आहे. यासाठी संरक्षण सज्जता, सुरक्षितता याचबरोबर परस्पर व्यापार आणि उद्योग आदी क्षेत्रातही सहकार्य करायचे आहे.’

पंतप्रधान श्री. अल्बानीज यांचे नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांनी स्वागत केले. तसेच त्यांना नौदलाच्या पथकाने मानवंदना दिली.

पंतप्रधान श्री. अल्बानीज यांनी आयएनएस विक्रांतची सविस्तर माहिती घेतली. विक्रांतवरील युद्ध विमानात ( लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) बसून माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांनी विक्रांतवरील नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ॲडमिरल आर हरिकुमार यांनी त्यांना आयएनएस विक्रांतची प्रतिकृती आणि क्रिकेटची बॅट भेट दिली.

००००

रवींद्र राऊत/विसंअ/

राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९ : राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत आज सादर केला. या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसूली खर्च ४ लाख ६५ हजार ६४५ कोटी आहे. महसूली तूट १६ हजार ११२ कोटी तर राजकोषीय तूट ९५ हजार पाचशे कोटी ८० लाख रुपये इतकी आहे.

यावेळी वित्तमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशाच्या अमृतकाळातील पंचामृतावर आधारित अर्थसंकल्पात ‘शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी’ या घटकासाठी २९ हजार १६३ कोटी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी ४३ हजार ३६ कोटी तरतूद आहे. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी ५३ हजार ५८ कोटी ५५ लाख तरतूद, रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल- रोजगारक्षम युवा यासाठी ११ हजार ६५८ कोटी, तर पर्यावरणपूरक विकास या घटकासाठी १३ हजार ४३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

शेतकरी कल्याणासाठी शेतीच्या विकासासाठी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासन  राज्यातील १ कोटी १५ लाख कुटुंबांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ राबवणार असल्याची  घोषणा वित्तमंत्र्यांनी  केली. या योजनेतंर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्यामार्फत 12,000 रुपयांचा सन्माननिधी प्रतिवर्षी मिळणार आहे, त्यासाठी २०२३-२४ मध्ये ६ हजार ९०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीक विमा

या योजनेत आधी विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेण्यात येत होती, त्यात आता सुधारणा करण्यात येत असून  आता शेतकऱ्यांवर कोणताच भार असणार नाही. राज्य सरकार शेतक-यांचा हप्ता भरणार असल्याने शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यासाठी 3 हजार 312 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महा कृषी विकास अभियान

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महा कृषी विकास अभियान राबविण्यात  येणार असून यामध्ये  पीक, फळ पीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत प्रक्रिया तसेच  तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी पाच वर्षांत 3 हजार  कोटी रुपये शासन उपलब्ध करून देईल.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार करण्यात आला असून आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर उपलब्ध होणार आहेत. या योजनेवर शासन एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना

200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डची निर्मिती करण्यात आली असून काजू बोंडापेक्षा प्रक्रिया केलेल्या काजू बोंडाला सात पट अधिक भाव आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी कोकणात काजू बोंड प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना राबविणार असून त्यासाठी येत्या 5 वर्षांसाठी 1 हजार 325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून राबवण्यात येणार असून आता दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळेल. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्री अन्न अभियान’ राबविण्यात येणार आहे,त्यासाठी  200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद असून  सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

नागपूर येथे कृषी सुविधा केंद्र, विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र

नागपूरमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार असून  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा त्याचा उद्देश आहे.  या केंद्रासाठी २२७ कोटी ४६ लाख रुपये देणार आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी व बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी 20 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट त्यांच्या आधार बँक खात्यात प्रतिवर्ष, प्रति शेतकरी 1800 रुपये देण्यात येणार आहे.

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा-भोजन

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असून  जेवणासाठी शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महिलांसाठी विविध सुविधा

‘मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येणार असून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जन्मानंतर मुलीला 5 हजार रुपये,   पहिलीत चार हजार रुपये, सहावीत 6 हजार रुपये, तर अकरावीत 8 हजार रुपये या टप्प्याने मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये मिळणार आहेत.

नोकरी करणाऱ्या महिलांना सध्या मासिक १० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो. महिलांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी ही मर्यादा वाढवून २५ हजार रूपये करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे मासिक २५ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत असणार आहे. तसेच शासन लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर तसेच  मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल. त्यासोबतच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येईल.

‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केले जाणार आहेत. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबविण्यात येईल.

या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा दिल्या जातील. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी आवास घरकुल योजना

इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’सुरु करण्यात येईल. यासाठी येत्या तीन वर्षात 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील. यापैकी या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार असून त्यासाठी 3600 कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत 4 लाख घरे बांधण्यात येणार असून त्यातील 2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमातीसाठी, तर 1.5 लाख इतर प्रवर्गासाठी असतील. रमाई आवास योजनेत 1.5 लाख घरांसाठी 1800 कोटी रुपयाची तरतूद असून यातील किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी असतील. शबरी, पारधी, आदिम आवास अंतर्गत 1 लाख घरे 1200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येतील.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहती अंतर्गत 50,000 घरांसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 25 हजार घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी, तर धनगर समाजासाठी  25 हजार घरे असतील.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद असून यामध्ये आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिव चरित्रावरील उद्यानासाठी 250 कोटी रुपये,  शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल. शिवकालिन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वत:च्या कर महसूलाचा सुधारित अंदाज रूपये दोन लाख ७५ हजार ७८६ कोटी आहे. यामध्ये वस्तू व सेवाकर, मूल्यवर्धित कर, मुद्रांक शुल्क व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क या करांचा वाटा दोन लाख ४३ हजार ४११ कोटी आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राज्याचे स्वत:च्या कर महसूलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट रूपये दोन लाख ९८ हजार १८१ कोटी एवढे निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे प्रस्तावित असलेल्या विविध आर्थिक उपाययोजनांमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल,असे श्री.फडणवीस म्हणाले.

व्यवसाय कर अधिनियमामध्ये ‘दिव्यांग व्यक्तीची’ व्याख्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार सुधारित करण्याचे प्रस्तावित आहे. या सुधारणेमुळे व्यवसाय कर सुटीसाठी पात्र ठरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या संख्येत वाढ होईल. तसेच व्यवसाय करातून सूट देण्याची प्रक्रिया सोपी होईल. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि रायगड जिल्हा या भौगोलिक क्षेत्रांत विमान चालन चक्की इंधनावरील (ATF) मूल्यवर्धित कराचा दर मूल्यवर्धित २५ टक्के वरून बंगळूर व गोव्याच्या समकक्ष १८ टक्के करण्याचे प्रस्तावित केले आहे.

वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांच्या संदर्भात ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क योजना यांच्या थकबाकीची तडजोड योजना – २०२३’ ही अभय योजना जाहीर करण्यात आली असून  या अभय योजनेचा कालावधी दिनांक ०१ मे, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ असेल. दिनांक ०१ मे, २०२३ रोजी प्रलंबित असलेल्या थकबाकीसाठी ही योजना लागू राहील. वैधानिक आदेशानुसार कोणत्याही वर्षासाठीची, व्यापाऱ्याची थकबाकी रुपये दोन लाखांपर्यंत असल्यास, ही रक्कम त्या वर्षासाठी पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित आहे. या अभय योजनेचा लाभ लहान व्यापाऱ्यांना अंदाजे एक लाख प्रकरणांत होईल. कोणत्याही वैधानिक आदेशानुसार व्यापाऱ्यांची थकबाकी रुपये ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ८० टक्के रकमेस माफी देण्यात येईल. लहान व मध्यम व्यापाऱ्यांना याचा लाभ अंदाजे ऐंशी हजार प्रकरणांत होईल, असे वित्तमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

वंदना थोरात/गोपाळ साळुंखे/ससं/

ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अन्थोनी अल्बानीज यांचे दिल्लीकडे प्रयाण

मुंबई, दि. 9 –  ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री अन्थोनी अल्बानीज यांचे एक दिवसाच्या मुंबई भेटीनंतर  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून दिल्लीकडे प्रयाण  झाले.

यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच राजशिष्टाचार विभागाचे व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा अर्थसंकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ९: राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

या अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करुन श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, श्री. फडणवीस यांनी मांडलेल्या पंचामृत सूत्रानुसार सर्वसामान्यांचा विकास व महाराष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा हा अर्थसंकल्प आहे.

श्री.मुनगंटीवार म्हणाले की, आज मांडलेल्या अर्थ संकल्पात शेतकरी, महिला, तरुण, नोकरदार, उद्योगपती, व्यावसायिक, या सर्वच बाबींचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्याकरिता महासन्मान योजना, अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींच्या अनुदानात भरीव वाढ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन, महिलांसाठी लेक लाडकी योजना निश्चितच दिलासा देणाऱ्या आहेत.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुढील वर्षी 350 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांसाठी 350 कोटी रुपयांची भरीव तरतूद केल्याबद्दल श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि अभिनंदन केले.

 

०००००

वर्षा आंधळे/विंसअ

राज्याला अधिक समृद्ध करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.९  सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला असून हा सामान्य जनतेसाठीचा ‘महाअर्थसंकल्प’ आणि ‘जनसंकल्प’ असल्याची  प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या अर्थसंकल्पात बार्टी, सारथी, महाज्योती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) विभागीय कार्यालय नाशिक येथे उभारण्यात येणार आहे.

विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर; शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था,अमरावती; कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे; गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर; डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई; लक्ष्मी नारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर या संस्थांना अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन विशेष अनुदान देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पुण्यातील भिडे वाडा स्मारकासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.

उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरिता उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३ हजार ६१३ कोटी ३५ लाखांची भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील सर्व घटकांना न्याय देऊन राज्याला समृद्ध करणारा विकासाचा महाअर्थसंकल्प सादर करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी दिली आहे.

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशू सिन्हा उपस्थित होत्या.

दरम्यान, उपस्थित सर्व महिलांना उद्योजिका श्रीमती शैलजा वालावलकर यांनी कामाचे व घराचे व्यवस्थापन,  ताणतणावाचे व्यवस्थापन व महिलांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले.

तसेच व्यवस्थापकीय संचालक श्री. निंबाळकर व श्रीमती अंशू सिन्हा यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मंडळातील वरिष्ठ अधिकारी डॉ मेधा वाके राजकुमार डांगर श्रीमती सुवर्ण लता कांबळे आणि त्यांनी कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

००००

निलेश तायडे/ससं

 

 

ऑस्ट्रेलिया आणि भारताचे सांस्कृतिक, वाणिज्यिक संबंध वृद्धिंगत व्हावेत – ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ॲन्थोनी अल्बानीज

मुंबई, दि. 9;       ऑस्ट्रेलिया आणि भारताचे सांस्कृतिक, वाणिज्यिक संबंध वृद्धिंगत व्हावेत यासाठी ऑस्ट्रेलियन शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ॲन्थोनी अल्बानीज  यांनी दिली. ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे हॉटेल ताज येथे ऑस्ट्रेलियन पर्यटन, संस्कृती, खाद्य पदार्थ आणि पेयपदार्थ संस्कृती, तसेच चित्रपटसृष्टी यासंदर्भातील व्यवसाय वृद्धी संदर्भात चर्चा करणासाठी व्यवसाय परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, ऑस्ट्रेलियाचे सिनेटर डॉन फॅरेल, उद्योग आणि सांस्कृतिक मंत्री मॅडेलिन किंग, ऑस्ट्रेलियाचे संसाधन मंत्री तसेच ऑस्ट्राट्रेड या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेवियर सायमोनेट, ऑस्ट्रेलियाचे भारतातील वाणिज्य दूत बेरी ओ फॅरेल यांच्यासह  उद्योजक, अभिनेते, अभिनेत्री, पर्यटन व्यवसायिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. ॲन्थोनी अल्बानीज म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी नुकत्याच झालेल्या भेटीत श्री.मोदी यांनी ऑस्ट्रेलिया आणि भारतातील व्यावसायिक संबध वृद्धिंगत करण्यासाठी सकारात्मकता दाखविली आहे.

ते पुढे म्हणाले,  ऑस्ट्रेलियात पर्यटनासाठी अनेक भारतीय येत असतात. ऑस्ट्रेलियाहून येणारे ड्राय फ्रुटस, पेय आणि खाद्यपदार्थ भारतात पसंत केले जातात. भारतातून ऑस्ट्रेलियाला 85 टक्के निर्यात तर 96 टक्के आयात होते.  त्यात शेळीचे मांस, ॲव्हाकॅडो, सी फूड, ड्राय फ्रूट्स आणि उच्च दर्जाचे  पेय याचा समावेश आहे.

क्रिकेट आणि चित्रपट या दोन्हींबाबत दोन्ही देशांतील लोकांना सारखेच प्रेम असल्याचे सांगून श्री. अल्बानीज पुढे म्हणाले, अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण ऑस्ट्रेलियामध्ये होत असते.  यापुढेही दोन्ही देशांतील चित्रपटसृष्टीतील लोक एकत्र आल्यास चित्रपट निर्मितीला नवे आयाम प्राप्त होतील.

यावेळी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ॲन्थोनी अल्बानीज यांनी त्यांच्या प्रदेशातील खाद्य पदार्थ स्वत: तयार करुन खाऊ घातले. मुंबईतील डबेवाल्यांच्या संघटनेकडून देण्यात आलेल्या बाजरीची भाकरी आणि ऑस्ट्रेलियन पद्धतीने तयार केलेल्या मशरुमच्या भाकरीचा त्यांनी आस्वाद घेतला. मुंबईच्या डबेवाल्यांनी पारंपरिक टोपी आणि डब्याची प्रतिकृती श्री. ॲन्थोनी अल्बानीज यांना भेट दिली.

अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी सौहार्दाने वागावे – परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यपालांची सूचना

मुंबई, दि. लोकशाहीमध्ये प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते व त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा असतात.  सामान्य जनतेचा अधिकाऱ्यांवर विश्वास असणे महत्त्वाचे असते व त्याकरिता अधिकाऱ्यांचे जनतेप्रति आचरण चांगले असले पाहिजे, असे सांगताना अधिकाऱ्यांनी सामान्य जनतेशी सौहार्दाने वागले पाहिजे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना केली.

भारतीय पोलीस सेवेच्या 2021 च्या तुकडीतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. ९) राज्यपाल बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रामाणिकपणे जनतेचा विश्वास संपादन करून समाजासाठी व देशासाठी काम केले तर लोक सदैव लक्षात ठेवतात; बदली झाल्यावर त्या अधिकाऱ्याचा मानसन्मान करतात. असे सांगून अधिकाऱ्यांनी आदर्श जपावे व देशाची सच्ची सेवा करावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

0000

IPS Probationary Officers call on Maharashtra Governor

 

A group of 11 Probationary officers of the Indian Police Service of the 2021 Batch called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai on Thursday (9 Mar).

 

Interacting with the officers, the Governor asked them to earn the trust of ordinary citizens by being polite and compassionate towards them.

0000

कृषी विभागाने गावनिहाय कांदा क्षेत्राचा अचूक अहवाल तयार करावा : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दि. ९ (जिमाका) :जिल्ह्यात सध्या कांदा पिकाला योग्य भाव मिळण्यासाठी, जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्र व त्याप्रमाणात होणारे कांद्याचे उत्पादन यांचा अंदाज येण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील कांदा पिकाच्या एकूण क्षेत्राची माहिती घेण्यासाठी कृषी सहायकांच्या मदतीने गावनिहाय अचूक अहवाल तयार करावा. त्याचप्रमाणे नाफेड मार्फत जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कांदा खरेदी केंद्रांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा दराबाबत आढावा बैठकीत मंत्री श्रीमती डॉ. पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., सहकार संस्थांचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, दिल्ली नाफेडचे उप व्यवस्थापक निखिल पाडदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्रीमती डॉ. भारती पवार म्हणाल्या की, कृषी विभाग व मार्केट कमिटी यांनी तयार केलेल्या अहवालात कांदा उत्पादनाबाबत तफावत नसावी. जिल्ह्यात कांदा उत्पादन क्षमता चांगली असल्याने निर्यात खुली आहे. कांदा निर्यात करतांना पोर्टवरील प्लगइन पॉईंट वाढविणे, कांदाचाळी व प्रक्रीया उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एखादी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी त्यात सर्वांचे सहकार्य व सहभाग अत्यंत महत्वाचा असतो. नाफेड मार्फत सद्यस्थितीत सुरू असलेली लाल कांदा खरेदी ही केंद्र सरकारच्या वतीने कांदा उत्पादकांना दिलेला मदतीचा हात आहे. केंद्र व राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. राज्यशासन कांदा खरेदीबाबत सकारात्मक आहे. नाफेड मार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीचा दर टप्प्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ कांदा खरेदीसाठी देखील नियोजन करणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च व त्यानुसार होणारा नफा याअनुषंगाने कांद्याला भाव मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.

या बैठकीत उपस्थित असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधीनी कांदा दर, खरेदी व निर्यात धोरणाबाबत असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच जिल्ह्यातील कांदा लागवड क्षेत्राबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी माहिती सादर केली.

०००

विधानपरिषद कामकाज

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 9 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी  असा राज्यमार्ग असून, तातडीने या रस्त्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काम पूर्ण करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विलंब होत असल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यास उत्तर देताना मंत्री श्री. चव्हाण बोलत होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रस्त्याचे रूंदीकरण तसेच चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यासंदर्भात निविदा प्राप्त असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने काम सुरू करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या इमारतीच्या कामाबाबत कार्यादेश दिला असून, फेब्रुवारी २०२५ ला हे काम पूर्ण होईल. तसेच विश्रामगृहाचे काम ही २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे.

विविध विभागाची कामे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेकेदार करत असतात. सर्व विभागांनी एकत्रित काम करणे गरजेचे असल्याने त्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात येईल. यामुळे ठेकेदार काम अपूर्ण ठेवण्याच्या पद्धतीला आळा बसणार आहे. तसेच या सॉफ्टवेअरमुळे ठेकेदार निविदा भरतानाच  ती माहिती सर्व विभागांना मिळेल.

ठेकेदारामुळे काम अपूर्ण राहिले असेल किंवा क्षमता नसताना निविदा दिली असल्यास त्यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

राज्यातील मासळी उतरविण्याची ४३ ठिकाणे  गाळ उपासणी क्षेत्रासाठी निश्चित – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. 9 : राज्यात मासळी उतरविण्याची 173 बंदरे कार्यरत आहेत. या  बंदरांमधील गाळ काढून 24 तास ही बंदरे सुरु ठेवण्याच्या कामांचे सर्वेक्षण करण्यात आले असून राज्यात 43 ठिकाणे गाळ उपासणी क्षेत्र निश्चित करण्यात आले असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत सांगितले.

राज्यातील मत्स्य बंदरामधील गाळ काढून बंदरे सुस्थितीत करण्याबाबत सदस्य जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मंत्री श्री मुनगंटीवार यांनी सांगितले की, मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी योजनेंतर्गत हर्णे, साखरी नाटे, जीवना, भरडखोल, सातपाटी ही पाच कामे करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पूरक परवानगी घेण्यात येत आहेत. तसेच ही कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश मेरीटाईम बोर्डाला देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मागील दोन वर्षात लेखाशीर्षअभावी ही कामे प्रलंबित राहिली होती. त्यामुळे प्राधान्याने लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच सन 2018 च्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हे 12 वे काम घेण्यासाठी अनुमती देण्यात येईल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील समुद्र किनारा असलेल्या सात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन मत्स्यव्यवसायाशी संबंधित सर्व प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात येऊन धोरण निश्चित करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, सचिन अहिर, रमेश पाटील यांनी सहभाग घेतला.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ/

कालावधीपूर्वी गाळप केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करणार – सहकारमंत्री अतुल सावे

मुंबई दि.  9 – पुणे येथील बारामती ॲग्रो लि. शेटफळ या साखर कारखान्याने गळित हंगामाच्या प्रारंभीची निश्चित तारखेच्यापूर्वी गाळपास सुरुवात करून कारखान्यास वितरित करण्यात आलेल्या गाळप परवान्यामध्ये नमूद अटी शर्तींचा भंग केल्याने कायदेशीर सल्ल्यानुसार  सदर कार्यकारी संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सविस्तर अहवाल मागविला असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.

१५ ऑक्टोबरपूर्वी ऊस गाळप हंगाम सुरू करून कायद्याचा भंग केल्याप्रकरणी बारामती ॲग्रो लि. शेटफळ या साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सदस्य प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधी मांडली. यास उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे बोलत होते.

मंत्री सावे म्हणाले, संबंधित साखर कारखान्याने वेळेपूर्वी गाळप सुरू केल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.  तसेच, किती गाळप करण्यात आले याचा अहवाल मागवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री सावे यांनी दिली.

0000

श्रद्धा मेश्राम/स.सं

ताज्या बातम्या

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक,दि.१५: शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावेत, अशा...

नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनआढावा

0
सातारा दि. १५ (जिमाका): नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याच्या आढाव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यातील दरे येथे बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष...

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

0
पुणे, दि. १५: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या ठिकाणी जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सायंकाळी भेट देऊन...

महिला सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि.१५: महाराष्ट्राने महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेतला आहे. राज्य नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्रयत्नशील असून त्यांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन...

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहवेदना

0
मुंबई, दि. १५: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच...