शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 1316

जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी ५० प्रतिनिधींचे आगमन

पुणे दि. ११:  पुणे येथे १२ ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी  विविध देशांच्या सुमारे ५० प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व प्रतिनिधीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

आगमन झालेल्या  प्रतिनिधींमधे ऑस्ट्रेलिया, केनिया, श्रीलंका, ओमान, नायजेरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया, मॉरीशस, इंग्लंड, लाओस या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही  यात  समावेश आहे.

आगमनप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले. ढोल ताशाचा गजर आणि तुतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करताना खास महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही पाहुण्यांना दर्शन घडविण्यात आले. स्वागतासाठी पुणे महानगरपालिका उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा पथक, तुतारी वादाक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे आणि स्वागतपर संदेशाचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.

’नमस्ते इंडिया’म्हणून पाहुण्यांचा प्रतिसाद

आगमन झालेल्या प्रतिनिधींचे ‘अतिथी देवो भव:’ या संकल्पनेवर महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू विषद केला असता, स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया’ असा प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला. आगमनाप्रसंगी झालेल्या अनोख्या पद्धतीच्या स्वागतामुळे प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे आगमन

‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’च्या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे पुणे येथे आज सायंकाळी आगमन झाले. याप्रसंगी प्रशासनाच्यावतीने त्यांचे पुणेरी पगडी, शाल देऊन स्वागत करण्यात आले.

०००

नाला खोलीकरण भूमिपूजन, पाणंद रस्त्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर दि. ११ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या रामटेक व मौदा उपविभागाच्या व्यस्त कार्यक्रमात जलयुक्त शिवार कार्यक्रमाला प्राधान्य देत नाला खोलीकरणाचे भूमिपूजन केले, तर अन्य एका कार्यक्रमात पाणंद (पांदण) रस्त्याचे लोकार्पण केले.

उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी रामटेक व मौदा उपविभागाच्या दौऱ्यावर होते.

रामटेक येथील बैठकीनंतर मौदाकडे जाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. याच मार्गावर चाचेर गावापुढे मातोश्री पाणंदरस्ते योजनेअंतर्गत नवेगाव आष्टी शिवारातील पाणंद रस्त्यांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर काहीच अंतरावर नवेगाव आष्टी ग्रामपंचायत खंडाळा येथील नालाखोलीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात आले. एनटीपीसी यांचा सामाजिक दायित्व निधी व आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या सहभागात हे काम सुरू आहे. या ठिकाणी जेसीबीद्वारे खोलीकरणाचे काम सुरू होते. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी या कामाच्या कालमर्यादेबाबत विचारपूस केली.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जायस्वाल,खासदार कृपाल तुमाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, उपविभागीय अधिकारी संजय पवार, कामठी तहसीलदार अक्षय पोयाम, मौदा तहसीलदार मालिक विराणी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

०००

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून शहर विकासाचा आराखडा तयार करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे दि. ११: तळेगाव दाभाडे शहरातील पदाधिकारी- अधिकारी यांनी शहराच्या विकासाचा एकात्म विचार करून आराखडा तयार करावा. गरजेनुसार कोणती कामे अगोदर करावयाची आहेत त्याचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

प्रतीकनगर येथे तळेगाव दाभाडे शहरातील १२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या  भूमिपूजन  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मुख्याधिकारी एन.के. पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून  निधीचे वाटप केले जात आहे. यावर्षी पुणे जिल्ह्याला १३० कोटी रुपयांचा निधी वाढवून मिळाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरातील विविध विकास कामांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून विकासकामे दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी आणि ती वेळेत पूर्ण करावीत.

विकास कामांसाठी निधीची कमतरता  भासू दिली जाणार नाही.  विकासकामे  अपूर्ण ठेवू नका. कामे रेंगाळल्याने खर्च वाढतो. त्यामुळे ती वेळेतच पूर्ण करावीत, असे सांगून या  परिसरातील सोमेश्वर मंदिराला  ‘ क ‘ वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

           श्री. बारणे म्हणाले की, जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीचा  खूप मोठा वाटा आहे. तळेगाव दाभाडे शहर पुणे – मुंबई रस्त्यावर असल्याने या परीसरात स्थायिक होण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली आहे. या परीसरात केंद्र सरकारची विविध कार्यालये आहेत. मावळ तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ११४ गावांमध्ये चांगले काम झाले असून त्यामध्ये ५० टक्के निधी केंद्र सरकारचा आहे. दीनदयाळ ग्राम ज्योती निधीच्या माध्यमातूनही  खेडोपाड्यात वीज पुरवली जात आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत अनेक योजनांचा लाभ लाभार्थींना दिला जात आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे येथे सुरू असलेल्या आणि आज भूमिपूजन केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

विविध विकास कामांचे भूमिपूजन

मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे शहरातील नाना भालेराव कॉलनी ते म्हाडा कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे, प्लॉट नं. १ जय भवानी सुपर मार्केट ते श्री अपार्टमेंट प्लॉट नं. १७ श्री अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे, प्रतिकनगर ते श्री. दाभाडे यांचे शेत ते मुख्य नाल्यापर्यंत ९०० मी.मी. व्यासाची आर.सी.सी. पाईप गटर करणे, सिंडीकेट बँकेमागील व समोरील रस्ता तसेच नाना भालेराव कॉलनी मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे व  प्लॉट नं. २९५, कृष्णा निवास से मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे अशा विविध विकासकामांचे  भूमिपूजन करण्यात आले.

०००

नागरिकांना चकरा नकोत यासाठीच ‘शासन आपल्या दारी’ अभियान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. ११ : समाजातील सामान्यातील सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी हा यंत्रणेचा डोलारा आहे. केवळ आम्ही आयोजित केलेल्या अभियानासाठी नव्हे. तर कायमस्वरूपी कोणालाही कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागू नये यासाठीच ‘शासन आपल्या दारी अभियान ‘, राबवित असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मौदा येथील एनटीपीसी सभागृहामध्ये शासन आपल्या दारी अभियानांतर्गत मौदा उपविभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उपविभागीय स्तरावरची ही सहावी बैठक आज पार पडली. यापूर्वी हिंगणा,उमरेड, काटोल ,नरखेड या ठिकाणी मान्सून पूर्व उपविभागीय आढावा तसेच शासन आपल्या दारी अंतर्गत लाभार्थींना विविध योजनातून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते.

सकाळी रामटेक नंतर मौदा येथे बैठकीत बोलताना त्यांनी शासन आपल्या दारी हे केवळ अभियान नसून ही यंत्रणेला कायमस्वरूपी सवय व्हावी, असे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ आज मंत्री आले म्हणून लाभार्थींना लाभ दिले जाऊ नयेत. यंत्रणाच कायमस्वरूपी अशा पद्धतीची बनावी की, न्याय हक्कासाठी कोणालाही शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागू नयेत. प्रत्येकाचे लाभ त्याच्या घरापर्यंत त्याला मिळाले पाहिजे. शासकीय यंत्रणांनी आता लाभार्थींपर्यंत जाण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला बदलून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, टेकचंद सावरकर ,आशिष जायस्वाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्यासह जिल्ह्यातील व उपविभागातील अधिकारी उपस्थित होते.

उपविभागीय अधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले. तत्पूर्वी, विविध योजनांतील लाभार्थ्यांना पट्टेवाटप, प्रमाणपत्र वाटप, तसेच लाभाच्या योजनांचे पत्र देण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी अभियानाच्या उद्दिष्ट पूर्तीबद्दल गांभीर्याने काम करण्याचे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. सुमारे दीड लाख नागरिकांना लाभ द्यायचा आहे. एकही अर्ज प्रलंबित राहू नये. ज्यांना काम करताना अडचणी येतील त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील. मात्र, अडचणी सांगणारे अधिकारी बनू नका. अडचणी सोडवणारे अधिकारी बना व लोकांच्या दारावर योजना पोहोचविण्याची सवय अंगवळणी पाडा ,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी योजना, जलयुक्त शिवार योजना, जलजीवन योजना तसेच विविध आवास योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहेत. शेतकऱ्यांना शाश्वत ऊर्जा स्त्रोत निर्माण व्हावे त्यांना दिवसादेखील शेतीला पाणीपुरवठा करता यावा, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना कार्यरत आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून प्रत्येकाच्या शिवारात पाण्याचा साठा उपलब्ध व्हावा ही भूमिका आहे. पावसाच्या लहरीपणावर शाश्वत मात करण्यासाठी जलयुक्त शिवार आहे, हे लक्षात घ्या. जलजीवन मिशन अंतर्गत कोणत्याही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी राहू नये असे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे या योजनेची देखील गंभीरतेने अंमलबजावणी करावी. केवळ पाणीपुरवठ्याचे सांगाडे उभे राहता कामा नये. तर विविध जाती घटकांसाठी असणाऱ्या आवास योजनांच्या माध्यमातून कायमस्वरूपी हक्काचा निवारा मिळावा, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. याशिवाय मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजाला मोदी आवास योजनेतून दहा लक्ष घरे देण्याची आमची तयारी आहे. या संदर्भातील आदेश लवकरच येतील. त्यापूर्वी ओबीसी प्रवर्गातील लाभार्थींचा शोध घेऊन ठेवा. विविध आवास योजनातून मोठया संख्येने निवारा देऊन कोणीही बेघर राहणार नाही. आवास योजनेसाठी पुढे लाभार्थीच मिळणार नाही. अशी स्थिती निर्माण करायची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीयकृत बँकांच्या संदर्भात यावेळी काही तक्रारी बैठकीमध्ये करण्यात आल्या. कृषी कर्ज घेताना कोणत्याही कागदपत्राच्या कारणासाठी अडवणूक करू नका. या योजनाची अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य शासनाचे धोरण स्पष्ट आहे. सीबिल पहाणे, जुने आहे म्हणून नवीन नाकारणे, कागदपत्रांचे कारणे पुढे आणणे चालणार नाही. काही राष्ट्रीयकृत बँका अशा पद्धतीने शेतकऱ्यांना उगीच त्रास देत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. बँकेच्या दारातून शेतकरी परत जाणार नाही याची खबरदारी घ्या, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

०००

‘शासन आपल्या दारी’ उपक्रम पुढील काळात लोक चळवळ व्हावी –  पालकमंत्री दीपक केसरकर

  • लाभार्थ्यांची ने-आण व जेवणाची व्यवस्था उत्कृष्टरित्या पार पाडावी – उद्योग मंत्री उदय सामंत
  • १३ जून रोजी दुपारी ४ वा. तपोवन मैदानावर शासन आपल्या दारी उपक्रम होणार
  • लाभार्थींची ने-आण करण्यासाठी ७२० बसेसची व्यवस्था, तर कार्यक्रमाच्या जवळपास १२ ठिकाणी पार्किंग 
  • प्रशासकीय यंत्रणा सज्ज, कोल्हापुरातील हा कार्यक्रम राज्यातील सर्वात मोठा 
  • पालकमंत्री श्री. केसरकर व उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्याकडून तपोवन मैदानावरील तयारीची पाहणी

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील किमान ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी शासकीय योजनांचा लाभ देण्याचा संकल्प शासनाने केला आहे. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून हा कार्यक्रम सर्वांचा आहे. या माध्यमातून लोक चळवळ निर्माण होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने या कार्यक्रमानंतर ही अविरतपणे शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ पूर्व तयारी आढावा बैठकीस पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर, मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक सतीश जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अतिरिक्त महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह व  अन्य सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम असाच पुढे चालू राहिला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणांनी त्यांना आवश्यक असलेल्या निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करावी. तसेच पुढील  काळात आपल्या विभागामार्फत कोणकोणत्या विकास योजना राबिल्या जाणार आहेत याबाबतचा कृती आराखडा सादर करावा. यात प्रत्येक अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला तर प्रत्येकामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन हा कार्यक्रम लोक चळवळ बनण्यास वेळ लागणार नाही असेही त्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थींना देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधांची माहिती देण्यात यावी. एकाही लाभार्थीची गैरसोय होणार नाही याबाबत प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. प्रशासन व पोलीस विभागाने प्रत्येक तालुक्यातून लाभार्थींना घेऊन येणारी वाहने लाभार्थींना कार्यक्रम स्थळाच्या जवळपास सोडून पार्किंगच्या ठिकाणी जाण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी देऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीपूर्वक काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थींच्या नाश्त्याची व जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था, कार्यक्रमाच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था ही सर्व जबाबदारी प्रशासनाची असून ती जबाबदारी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडावी असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य विभागाने लाभार्थींच्या संख्येनुसार आरोग्य पथके तयार ठेवावीत, त्याप्रमाणेच ॲम्बुलन्सची व्यवस्था ही ठेवावी, असे ही त्यांनी सूचित केले.

लाभार्थी ने -आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्या बसेस मध्ये ज्या ठिकाणाहून लाभार्थी बसणार आहेत त्या ठिकाणचे तलाठी, ग्रामसेवक व आरोग्य सेविका बसेस मध्ये उपलब्ध राहतील. तसेच संबंधित लाभार्थ्यांना प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना समजावून सांगतील व कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना नेमून दिलेल्या कंपार्टमेंट मध्ये आणून बसवतील याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी निर्देशित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. तसेच या उपक्रमासाठी मंत्रिमहोदयांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन सुधारणा करण्यात येतील व प्रशासनाच्यावतीने या कार्यक्रमासाठी तयारी पूर्ण होत असून प्रत्येक नोडल अधिकाऱ्यावर सोपवलेली जबाबदारी ते कार्यक्षमपणे पार पाडतील व हा कार्यक्रम यशस्वी करतील असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव डॉ. शिंदे व विशेष कार्य अधिकारी श्री. हुक्केरीकर यांनीही या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या.

पालकमंत्री श्री. केसरकर व उद्योग मंत्री श्री. सामंत यांच्याकडून कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांचा कामांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना दिल्या व हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.

तपोवन मैदानावरील तयारीची पाहणी

शासन आपल्या दारी उपक्रम दिनांक १३ जून २०२३ रोजी दुपारी ४ वाजता तपोवन मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तपोवन मैदानाला प्रत्यक्ष भेट दिली व पाहणी केली. प्रशासनाने उत्तम तयारी केली असून लाभार्थी ने आण करणे तसेच सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात असेही त्यांनी सांगितले.

०००

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

पुणे, दि.११ :  ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले….  ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका …अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.

आळंदी येथील समाधी मंदिरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार – आरफळकर आदी उपस्थित होते.

मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

वारकऱ्यांसाठी सुविधा

आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

०००

व्यक्तिगत लाभाच्या योजनांची कामे गतीने करा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. ११ : प्रधानमंत्री आवास योजना, शेती व घरकुल पट्टे वाटप योजनांसारख्या शासनाच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थींपर्यंत गतीने पोहचवण्यासाठी योग्य नियोजन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामटेक येथील उपविभागीय आढावा बैठकीत केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गेल्या मे महिन्यात १९ व २० मे रोजी हिंगणा, उमरेड, सावनेर, काटोल या उपविभागाच्या मान्सून पूर्व आढावा बैठकी घेतल्या होत्या. आज रामटेक येथील उपविभागाच्या बैठकीत शासनाच्या विविध पथदर्शी योजनांचा आढावा त्यांनी घेतला.

रामटेक येथील गंगाभवन येथे आयोजित उपविभागीय स्तरावरील या बैठकीला खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जायस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभू शुक्ला, माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी यांच्यासह जिल्हा व उप विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी सादरीकरण केले. आढावा बैठकीत वाळू व इतर गौण खनिज धोरणाची अंमलबजावणी, अमृत सरोवर अभियान, जलयुक्त शिवार योजना, पी एम किसान प्रगतीचा आढावा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, पाणंद रस्ते, संजय गांधी निराधार अनुदान योजना, वैयक्तिक वन हक्क कायदा व सामूहिक वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, गाव तेथे स्मशानभूमी, टँकर व विहीर अधिग्रहण,  सर्वांसाठी घरे, राज्य पुरस्कृत  ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन कार्यक्रम, रोजगार हमी योजना, मनरेगा, प्राथमिक आरोग्य, कृषी विभागांतर्गत खरीप हंगाम पेरणी, बियाणे व खताची उपलब्धता, पुरवठा विभागाअंतर्गत अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, सेतू केंद्र, कोतवाल नियुक्ती, पोलीस पाटील नियुक्ती, स्वच्छ भारत मिशन अभियान, शासन आपल्या दारी योजना आदी योजनांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थींना कालमर्यादेत लाभ मिळण्याकडे यंत्रणेचा कल असावा, असे स्पष्ट केले. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या दोन योजनांकडे अधिक लक्ष वेधण्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांना दिवसा ओलितासाठी वीज देणे शक्य होणार आहे. त्यामुळे अतिशय गंभीरपणे या योजनेची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार आशिष जायस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावेळी काही मागण्या केल्या. समारोपात धानाच्या बोनसच्या प्रश्नाचा त्यांनी उल्लेख केला. धानाच्या बोनस संदर्भातील मागणी ई -पिक पाहणीवर आधारित असेल, तर तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले. खासगी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या लूटीकडे लक्ष घालण्याचेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, आजच्या बैठकीत जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेताना पावसाळा सुरु होण्यापूर्वी कामे पूर्ण होतील, याची खातरजमा करावी, प्रस्तावित कामांना लगेच सुरुवात करावी, मुख्यमंत्री सौर कृषी योजनेसाठी जमीन मिळविण्याचे काम युद्ध पातळीवर करावे, ज्या ठिकाणी शासकीय जमिनी नसतील तेथे खासगी जमिनी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, जमिनी हस्तांतरित करण्याच्या कामाला गती द्यावी, आदी आदेश त्यांनी दिले.

शबरी, रमाई, सोबतच ओबीसीसाठी मोदी आवास योजना जोमाने राबवण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी लाभार्थींची यादी तयार ठेवण्याचे निर्देश दिले. झुडपी जंगलाच्या क्षेत्रातील जागा प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थींना देण्याबाबतच्या अडचणीवर मात करण्यासाठी शासन निर्णय घेणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपविभागातील नगरपालिका व नगर परिषदांचा त्यांनी आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना पारशिवनी (नागरी) कामाची गती वाढविण्यात यावी, आठ दिवसात या संदर्भातील सर्व अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

नगर परिषद कन्हान येथील आवास योजनेतील कामांची गती वाढवण्याचे व प्रलंबित कामे सात दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडच्या कामकाजाचा आढावा तीन दिवसात सादर करण्याचे आदेश यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीमध्ये शेवटी पेंच व्याघ्र प्रकल्पासंदर्भातील आढावा सादर करण्यात आला. सुरुवातीला विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रतिनिधी स्वरूपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने निवेदने उपमुख्यमंत्र्यांना सादर केली.

शासन आपल्या दारीयोजनेंतर्गत शेतकऱ्यांना  उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी साहित्याचे वाटप

शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आज रामटेक व मौदा येथे उपविभागीय आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते हार्वेस्टर, ट्रॅक्टर, बी-बियाणे व विविध कृषी साहित्याचे वाटप तसेच इतर लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात शासन आपल्या दारी अभियानातंर्गत उपविभागीय स्तरावर आढावा बैठका सुरू केल्या आहेत. या योजनेंतर्गत नुकतेच  १९ व २० मे रोजी हिंगणा, उमरेड, सावनेर, काटोल या उपविभागात  उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना विविध लाभ देण्यात आला होता. आज रामटेक व मौदा येथे पुढील टप्यातील उपविभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी कृषी यांत्रिकिकरण उप अभियान अंतर्गत योगेश मोतरकर यांना कंबाइन हार्वेस्टर, किसनाबाई तिपाडे, अलका कुथे, रेखा हटवार व प्रकाश इखार यांना नवीन  ट्रॅक्टरची चाबी देण्यांत आली. ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रत्येकी एक लाख २५ हजार अनुदान देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री याच्या हस्ते विविध योजनांच्या लाभाचे प्रमाणपत्र लाभार्थींना  प्रतिनिधिक स्वरूपात देण्यात आले. यात सुखचरण अडमाची, भिकु परतेती, सहदेव आतराम, रामकिसन अडमाची  यांना वनहक्क पट्टे वाटपाचे प्रमाणपत्र वितरित करण्यांत आले.

शासकीय जागेवर अतिक्रमण करून निवास करणा-या व्यक्तींना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास याेजनेंतर्गत  शकुंतला दमाहे, गीता चौरे, देवचंद केळवदे, विमल हावरे, शालीनी कोल्हे या लाभार्थींना प्रातिनिधिक पट्टे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत संविधान महिला बचत गट, देविका महिला बचत गट, जय श्रीराम महिला बचत गट, सहेली महिला बचत गट यांना अंतर्गत कर्ज वाटप धनादेश देण्यात आले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेतांना रोजगारास मदत व्हावी म्हणून सुरज मोहकर, जिजाबाई क्षीरसागर, शालू सातपैसे, नामदेव सातपैसे यांना प्रत्येकी २० हजार कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले. सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत नीलकंठ येलुरे, सुनंदा उइके, मीरा कुंभरे या अतिक्रमणधारकांची निवासी अतिक्रमण नियमित  करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

०००

गोड्या पाण्याच्या प्रकल्पाचा खारपाणपट्ट्याला लाभ होणार  – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती, दि. ११ : बोराळा येथील गोड पाण्याच्या पायलट प्रोजेक्टमुळे खारपाणपट्ट्यातील  गावांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊन लोकांना रोज गोड पाणी प्यायला मिळेल. गोड्या पाण्यामुळे येथील संत्री, फळबागांचे उत्पादन वाढेल. येथील पाण्याचा खारटपणा प्रत्येक लीटरला २५०० मिलीग्रॅम असा आहे. आणि हे टीडीएस ५०० च्या आत आल्यावर हा प्रयोग यशस्वी ठरेल. प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर या तीन जिल्ह्यात असे ९४० प्रकल्प याच धर्तीवर निर्माण केल्यास हा प्रदेश खारपाणमुक्त प्रदेश होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बोराळा येथे व्यक्त केला.

 

केद्रींय मंत्री श्री. गडकरी यांनी दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार बळवंतराव वानखडे, किरण पातुरकर ,निवेदिता चौधरी ,बोराळा सरपंच वनिता वसु तसेच विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे, पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, दर्यापूर कृषी अधिकारी भाग्यश्री अडपावार तसेच प्रकल्पाचे मार्गदर्शक माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक सुरेश खानापूरकर यावेळी उपस्थित होते.

केद्रींय मंत्री श्री. गडकरी यांनी बोराळा येथील गोड पाणी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. ते म्हणाले की, पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला  व बुलडाणा या जिल्ह्यात पुर्णा नदीच्या गाळाचा प्रदेश आहे. या गाळाच्या प्रदेशामध्ये जवळपास ३ हजार चौ. कि. मी. क्षेत्रात खाऱ्या पाण्याची समस्या आहे. येथील पाणी खारट आहे. ते पिण्यासाठी तसेच शेतीसाठीही उपयुक्त नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीके घेण्यास अडचणी येतात. प्राचीन काळी या भागात समुद्र होता. त्यामुळे येथील भूगर्भातील पाणी खारट आहे. यावर उपाययोजना म्हणून माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भूविज्ञानशास्त्राचा प्रयोग राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्यशासनाने दीड कोटी रुपये प्रायोगिक तत्त्वावर दिले आहेत. प्रकल्पासाठी जवळच बंधारे बांधून त्यात पावसाचे गोडे पाणी साठविणार आहे. गावकरी व शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी गोडपाणी जमिनीपासून केवळ ५० फुटाच्या खोलीवर उपलब्ध करुन देण्याबाबतचा हा प्रायोगिक प्रकल्प आहे.

या प्रकल्पामुळे बोराळासह आराळा, अजितपूर आणि जसापूर या चार गावातील शेतीला गोड पाणी मिळेल. येथील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजना राबविल्यास अधिक भूभागावरील शेतीला गोड पाणी उपलब्ध होऊन बारमाही पाणी लाभेल. तसेच येथील उपलब्ध खाऱ्या पाण्याचा उपयोग करून झिंग्यांचे उत्पादन घेता येईल.

यासाठी शेततळे तयार करून त्यात खारे पाणी टाकल्यास त्यास झिंग्याची पैदास करता येईल. या पूरक व्यवसायामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होईल,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोड पाण्याचा असाच प्रयोग राजस्थान येथील गंगानगरला करण्यात आला आहे. तेथील स्थानिकांना आता खाऱ्या पाण्याचे वरदान लाभले आहे. तेथील नागरिक गोड्या तसेच खाऱ्या पाण्यामध्ये झिंग्यांची शेती करीत आहेत. त्याला परदेशामध्ये मोठी मागणी आहे. बोराळा प्रकल्पामुळे पिण्यायोग्य पाणी मिळेलच शिवाय खार पाण्यातून झिंग्यांची शेतीही करता येणार आहे. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून गोड्या पाण्यातील झिंगे आणि खाऱ्या पाण्यातील झिंगे असे उत्पादन घेता येईल. या प्रकल्पासाठी स्थानिक प्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

खाऱ्यापाण पट्ट्यात ८९४ गावांचा समावेश

या खाऱ्या पाण्याच्या पट्ट्यामध्ये एकूण ८९४ गावांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात ३५५गावे, अकोला जिल्ह्यात ३७३ गावे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये १६६ गावे असे एकूण ८९४ गावांचा हा प्रश्न आहे. यापैकी दर्यापूर तालुक्यातील १४६ गावे समाविष्ट आहेत. या भागात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी देण्याचे फार मोठे आव्हान होते. यासाठी प्रायोगिक प्रकल्प म्हणून दर्यापूर तालुक्यातील बोराळा या गावाची निवड करण्यात आली. नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला मंजूरी दिली. या भागात जमिनीपासून ५ फुटावर काळी माती आहे. त्यानंतर २५ ते ३० फुटावर पिवळी माती लागते. त्यानंतर १५ ते २० फुटाचा वाळूचा थर आहे. त्यानंतर पुन्हा पिवळी माती लागते. ही पिवळी माती पाणी घेत नाही तसेच पाणी देतही नाही. यासाठी या प्रकल्पाच्या आजूबाजूला ५०० ते १००० फुटावर ६ कुपनलिका घेण्यात आल्या. त्यांची खोली ६० फुट आहे. जमिनीपासूनच्या या वाळूच्या पहिल्या थरात जर आपण प्रचंड प्रमाणात पावसाचे गोड पाणी टाकू शकलो तर या भागामध्ये ५० फुटाच्या खोलीवरच मुबलक प्रमाणात गोड पाणी उपलब्ध होऊ शकेल. सद्यस्थितीत या वाळूच्या थरात पूर्ण खारट पाणी आहे. ते बाहेर काढण्यात येत आहे. कारण गोड पाणी आत शिरायला जागा पाहिजे. हे खारट पाणी पूर्ण काढल्यानंतर जेव्हा बंधाऱ्यामध्ये पावसाचे गोड पाणी येईल व ते खोलीच्या भागात जावून डायलुशन होऊन पाणी गोड व्हायला सुरवात होईल, अशी माहिती माजी वरिष्ठ भूजल वैज्ञानिक श्री. खानापूरकर यांनी दिली.

०००

 

विकासकामातून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

बुलढाणा, दि. ११ : केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविताना शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, आमदार प्रवीण पोटे, वसंत खंडेलवाल, आकाश फुंडकर, राजेश एकडे, प्रकाश भारसाकडे व चैनसुख संचेती उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या भागाचे भविष्य उज्वल असते. ज्यांच्याकडे पाणीसाठा नाही, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. यातून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र ५० टक्क्याहून अधिक वाढविण्यात येणार आहे, त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खारपाणपट्ट्यात ९०० प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या ठिकाणावरील खारेपाणी गोड्या पाण्याखाली आणण्यात येणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच खारपाणपट्ट्यात झिंगा उत्पादनाला वाव असल्याने यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल.  खारपाणपट्ट्यात असलेल्या खडकपूर्णा धरणामध्ये झिंगा उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी पाण्याचा अभावासह अधिक खर्चात असलेली शेती ही कारणे असल्याने याबाबतही उपाययोजना गरजेच्या आहेत. शेतकऱ्यांना समृद्ध जीवन जगण्यासाठी पाणी, रोजगार, शाळा, स्वच्छता, मालाला भाव,  मैदान, हॉस्पिटल अशा सुविधा निर्माण झाल्यास समृद्ध जीवन जगतील. शेतीचा शाश्वत विकास करताना तलाव, नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यासोबत वाहत्या पाण्याला थांबविणे आणि थांबलेले पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न झाल्यास पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे, रस्ते विकासाचे जाळे विणण्यास मदत करतात. जालना आणि सिंधी येथील ड्रायपोर्टमुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाची निर्यात करणे शक्य झाले आहे. जनतेच्या पैशातून विकासकामे करण्यात येतात. ही विकासकामे चांगल्या दर्जाचीच व्हावीत. निकृष्ट दर्जाची कामे ही जनतेशी बेईमानी करणारे आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कामांमध्ये अनेक वेळा व्यत्यय आला. मात्र, ही कामे तीन भागात पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. या कामांबद्दल लोकप्रतिनिधींचा समाधानकारक अभिप्राय ही कामे चांगली झाली असल्याची पावती आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या मलकापूर-बुलडाणा रस्ता विकासासाठी १२०० कोटी, बाळापूर -शेगाव रस्त्यासाठी ३५० कोटी, शेगाव-संग्रामपूर रस्त्यासाठी ३०० , संग्रामपूर ते सीमेपर्यंत रस्त्यासाठी ३८५ कोटी रुपयांच्या नवीन विकासकामांची घोषणा केली.

०००

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याचे शासनाचे आवाहन

मुंबई, दि. ११ : केंद्र सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग मुक्त भारत’ हा संकल्प निश्चित केला आहे. त्याचे पालन करण्यासाठी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने १२ ते २६ जून २०२३ या कालावधीत “नशा मुक्त भारत पंधरवडा” जाहीर केला आहे. अंमली पदार्थांच्या (ड्रग्स) दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ साजरा करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

सचिव श्री.भांगे म्हणाले की, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी  ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. २६ जून या जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून जनजागृती करण्यासाठी रॅली, परिसंवाद, कार्यशाळा, ई-प्रतिज्ञा मोहिमा इत्यादीद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात यावे. कार्यक्रमांमध्ये स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य घेण्यात यावे.

“नशा मुक्त भारत” चे स्वप्न साकार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात यावा, असेही सचिव श्री. भांगे यांनी सांगितले.

०००

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...