सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाकरिता नवीन अभ्यासक्रम ऑगस्टपासून सुरू होणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

सागरी क्षेत्रातील कौशल्य अभ्यासक्रमामुळे रोजगार निर्मिती होईल - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १७ : सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. मत्स्यक्षेत्रातील महत्त्वाच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण आयटीआय मार्फत ऑगस्ट महिन्यापासून सुरू करण्यात येईल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळासाठी लवकरात लवकर अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बैठकीत केली.

विधानभवन येथे वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, पालघरच्या जिल्हाधिकारी  इंदूमती जाखड यावेळी उपस्थित होत्या.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) या भारताच्या कौशल्य विकास व्यवस्थेचा कणा आहेत, ज्या व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवतात. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उ‌द्योजकता विभागाकडून पीपीपी (PPP) (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) मॉडेलनुसार आयटीआय (ITI) संस्थांना जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा उ‌द्देश आहे.  हा सामंजस्य करार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत स्किल इंडिया मिशन, महाराष्ट्र आयटीआय आधुनिकीकरण धोरण 2025 आणि शाश्वत विकास उद्दीष्ट (Sustainable Development Goals) यांच्याशी सुसंगत आहे. या निर्णयामुळे रोजगार निर्मिती होवून आयटीआय काळानुरूप प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाली आहे.

जेएनपीटी, वाढवण बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता  मंत्री नितेश राणे

बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता वारंवार भासत असते. सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापन मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन जेएनपीटी, वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे. जर शासनाने परस्पर आपल्या सहकार्यातून कुशल मनुष्यबळ तयार करून रोजगार निर्मिती केली तर राज्याच्या विकासाला नक्कीच अधिक चालना मिळेल शिवाय शासनाच्या विभागांना सहाय्य ठरेल, असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत व्यक्त केले.

0000